शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१८

कविता...!

'महाजनां'बद्दल 'ब्र' काढणारी 'कविता'
मृतवत असंवेदनांपेक्षा कितीतरी 'भिन्न'... 
'अखेर ए का की...' अशी अभिव्यक्ती
प्रच्छन्न प्रतिभा आज शांत आणि खिन्न...!

कुणाचंही अकाली जाणं हृदयाला घरं पाडतं. स्वच्छ मनाच्या, मुक्त अभिव्यक्तीच्या, संवेदनशील जाणिवांच्या आणि स्पष्ट, परखड विचारांच्या व्यक्तीचा मृत्यूने एका वृत्तीचा ऱ्हास होतो आणि समृद्ध समाजजीवनाची अपरिमित हानी होते. गेल्या आठवड्यात कल्पना लाजमी आणि काल कविता महाजन यांच्या अकाली जाण्याने, आधीच झपाट्याने संवेदनाहीन होत चाललेल्या पुरुषकेंद्रीत समाजाची किती आणि कशी हानी झालीय, होतेय हे कळायला काही काळ जावा लागेल... कुणी नंदिता दास 'मंटो'च संशोधन करून पुनरुत्थान करेपर्यंत किंवा अधिकच...!

काल कविताबद्दलची ही, तिच्या एकूणच अस्तित्व आणि प्रकटनाइतकीच हेलावून टाकणारी, बातमी समजल्यापासून लागलेली 'उचकी' काही केल्या थांबत नाहीये... थांबणारही नाहीये... दुसरी कविता सापडेपर्यंत...

कविताला तिच्याच या 'उचकी'ने शब्द-सुमनांजली...


कोण माझी आठवण काढतंय इतक्या तीव्रतेने
मित्र की शत्रू?
मित्र ढगात पोहोचला आहे
स्वर्गात वा नरकात
त्याच्या पापपुण्याईने.

शत्रू आहे अजून मातीवरचं एक ढेकूळ
कोण माझी आठवण काढतंय
इथून वा तिथून
तिथून वा इथून?
ब्लॉक केलेले कोळसे पेटलेत
की धुमसताहेत अनफ्रेंड केलेले लोक
की रुसलेत फ्रेंड्स
पुरेसं लक्ष न दिल्याने?
कुणाच्या आहेत या उचक्या
ज्या सतत लागताहेत
गिळू देत नाहीत अन्नाचा घास
कष्टाने मिळवलेला
उतरू देत नाहीत घोट घशाखाली
साध्या निर्मळ पाण्याचा
बघ म्हणतात छताकडे
छतापलीकडच्या आभाळाकडे
तरी थांबत नाही उचकी.

उचकी लागणे म्हणजे छाती व पोट यामधील पडदा
आणि बरगड्यांमधील स्नायू यांचे आकुंचन होणे
व त्याचवेळेस स्वर यंत्रातील स्वरतंतू
व्होकल कॉर्ड एकमेकांजवळ येणे
मी वाचते माहिती उचक्या देत देत
उचकी म्हणजे असतो
स्वरतंतू जवळ-जवळ आल्यामुळे आवाज
हे वाचून देखील थांबत नाही माझी अंधश्रद्ध उचकी.

माझ्या देहातून मी खेचून काढते प्रेतं
एक प्रेत धास्तीचं ज्यानं धमकी ऐकली होती
एक प्रेत भीतीचं ज्यानं दहशत सोसली होती
एक प्रेत अश्रूचं ज्यानं दु:खाचा चेहरा देखला प्रत्यक्ष
एक प्रेत प्रेमाचं ज्याला मृत्यूने कुजवलं
एक प्रेत आकर्षणाचं, ज्याची
आकर्षणवस्तू होती कमजोर आत्यंतिक
मी प्रेतमुक्त होते जगण्याला मोकळी
व्याकरणाच्या नियमात न बसणारा
नवा शब्द.

मी स्वागत करते उचकीचं
की बाई, स्वार्थहीन स्वरतंतु जवळ-जवळ आल्यामुळे
जन्मली आहेस तू.

- कविता महाजन

कविताच्या साहित्य संपदेसाठी कविताच्या ब्लॉगला इथे भेट द्या -
https://kavitamahajan.wordpress.com/

रविवार, २३ सप्टेंबर, २०१८

बाजार...!


image source - NFS

कुणाची साद आली मोकळ्या रानावनातून
सादेस प्रतिसादावे कसे, तटबंदी भोवताली!

दगड असो रस्त्यातला वा दृश्य ते रमणीय
जिथे मार्ग थांबला तिथेच समाधी लागली!

प्रत्येक श्वासास होती न जाणो कुणाची ओढ
भटक्यास का लाभावी झावळ्यांची सावली!

हे शहर नव्हे, बाजार जणू मांडलेला सर्वदूर
जाहिरात इथे वाहतसे माणसांच्या पखाली!

प्रज्ञेसही ना चुकती आवर्तने उत्पत्ती-लयाची
अखंड प्रतीक्षेचा शाप सुभग दृष्टीच्या भाळी!

सूत्र जगण्याचे शिकविती न कुणी अडाण्यास
स्वार्थही न उमजे जया तो तरेल कळीकाळी?

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

गणेशोत्सव...!


अलीकडे १ ऑगस्टला टिळकांची आठवण काढण्याची वेळ सहसा येत नाही. बाळ गंगाधरांनी कोकणातल्या चिखलीला जन्म घेवून आमची मोठीच सोय केली होती. ‘चिखलात जसे कमळ उगवते...’ या भांडवलावर आम्ही टिळक पुण्यतिथीची  बरीच वर्षे काढली आणि बक्षिसेही जिंकली. शिवाय जोडीला ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही!’ हा बाणेदारपणा आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!’ या जाज्वल्य देशाभिमानाचा आधारही होता. आजच्या ‘संपूर्ण स्वराज्य’ लाभलेल्या काळात कमळ, बाणेदारपणा, देशाभिमान आणखीन आधार साऱ्याच्याच बदलेल्या संदर्भात टिळकांनी काय केले असते ठाऊक नाही. कमळाबद्दल काहीही बोलून चिखलफेक चुकायची नाही, शेंगा टरफलांसकट खाण्याची नवीन पद्धत रूढ झाली असल्याने फुकटचा बाणेदारपणा दाखविण्याची कटकट नाही, देशाभिमान आणि तत्सम अनुत्पादक जाणिवांचे राष्ट्रीयीकरण केल्याने अतोनात मूल्यवर्धन झाले असून ‘आधार’ शिवाय अस्तित्वच निराधार होऊन समर प्रसंग उभा राहण्याच्या काळात टिळकांच्या अग्रलेखाचा मथळा काय असता याची कल्पनाच केलेली बरी! तथापि ‘टिळक गेल्यानंतर ज्याला समोरून येतांना बघून हातातली विडी टाकून दयावी असा माणूस पुण्यात उरला नाही...’ हे आचार्यांचे (प्रल्हाद केशव अत्रे! हो, अलीकडच्या फट् म्हणता वाल्याचा वाल्मिकी होण्याच्या काळात निव्वळ आदरार्थी संबोधनाने, ‘म्हणजे नक्की कोण’ हे चटकन समजत नाही!) विधान मात्र तंतोतंत खरे तर आहेच आणि, टिळकांच्याच श्रेणीतल्या अटलजींसारख्या ऋषीतुल्य नेत्यांच्या निवर्तण्याने लोक–नेते यांच्यातील दिवसेंदिवस रुंदावत जाणाऱ्या पोकळीत, अधिकच ठळक होत चालले आहे. आजच्या झटपट प्रसिद्धी आणि रातोरात नेतृत्व उदयाच्या काळात कुठल्या ‘फेस-ऑफ-चेंज’चा ‘चेंज-ऑफ-फेस’ होवून नावापुढे (आणि मागे) काय उपाधी-उपसर्ग लागून त्याचा जनसामान्यांस उपसर्ग होइल आणि ‘ही काय उपाधी...?’ म्हणायची वेळ येईल, काही सांगता येत नाही. किंबहुना स्वत:च्या स्वाक्षरीतच हे स्वघोषित आचार्य, बाबा, गुरुदेव आणि तत्सम उपाध्यांचा अंतर्भाव करण्यास सदर पुण्यात्मे कचरतीलच असे नाही. असो.

‘येथे बसून क्रिकेट व राजकारण याविषयी चर्चा करू नये’ अशी अमृततुल्य विनंती-वजा-सूचना-अधिक-धमकी देणाऱ्या पुण्याचा रहिवासी असल्याने ‘येथे राजकारण चर्चू या नको’ अशी खूणगाठ खरतर मी हा ब्लॉगिंगचा उपदव्याप सुरु करतांनाच मनाशी बांधली होती. पण, ‘सगळ्याच गोष्टी ठरविल्याप्रमाणे झाल्या असत्या तर सांप्रत युगांस ‘कलियुग’ कशास म्हटले असते गाढवा...!’ असे तत्वज्ञान परवाच मला एका सुबुद्ध राष्ट्रप्रेमी मित्राने कसल्याशा समर्थनार्थ अमृततुल्यचा चहा पितांना सांगितले. माझ्या या सशक्त व सश्रद्ध भाविक सन्मित्राने निदान, ‘कलियुग केव्हाच संपून पुन्हा सतयुग सुरु झाले आहे तेव्हा वत्सा, तुजप्रत कल्याण असो!’ असा आशावाद-वजा-ताकीद देवून मी ती मुकाट्याने स्वीकारावी अशी आज्ञा दिली नाही यानेच मी धन्य झालो आणि ‘आता त्याने मला दिलेले माझे भाग्य बदलण्याचे वचन काही पुरे होत नाही’ एवढाच त्याचा अर्थ काढून, समोरच्या घोटभर चहाचा घोट घेतला. मुद्दा असा की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि त्या अनुषंगाने आलेले सर्व उल्लेख यांचा खरतर कुठलाही राजकीय संदर्भ इथे अपेक्षित नव्हता. परंतु, अपरिमित जंगलतोड होऊन शहरे जंगलात शिरल्याने ‘वन्य’ जनावरे वनांचा संकोच झाल्याने जशी ‘अन्य’ भागातही आढळू लागली तद्वतच सार्वजनिक जीवनात खासगीपण आणि विवेकाचा संकोच झाल्याने, तुमची इच्छा असो वा नसो, राजकारण हे तुमच्या आयुष्यात पार आतपर्यंत शिरले आहे, तुमच्या ‘स्मार्टफोन’च्या ‘डंबयुज’मधून! तेव्हा कुठल्याही अभिव्यक्तीत त्याचे प्रतिबिंब पडणे तुम्ही काही केल्या टाळू शकत नाही. त्याचाच एक उत्तम नमुना म्हणजे हे असे मूळ विषय सोडून इतस्तत: भरकटत राहणे आणि कुणी काहीही विचारले तरी आपलाच प्रचारकी मुद्दा रेटत राहणे हे खास राजकारण्यांचे व्यवच्छेदक लक्षण सामान्य माणसांत (पक्षी: माझ्यात) सुद्धा दिसू लागणे. तेही असो.


महात्मा फुल्यांपासून डॉक्टर आंबेडकरांपर्यंत या देशाला स्वातंत्र्य व इथल्या समाजाला गौरव मिळवून देण्यासाठी झटलेल्या लोकोत्तर व्यक्तींना राजकारणी म्हणावे की समाजकारणी असल्या दूरदर्शनीय चर्चेच्या गुऱ्हाळात न पीचता आपण लोकमान्यांचे हेतू आणि उद्देश जाणून घेतले तर ‘भारतीय असंतोषाचे जनक’ आणि ‘जहाल गटाचे अध्वर्यू’ अशी सार्थ ओळख लाभलेल्या टिळकांनी गुलामगिरीची सवय झालेल्या आणि दास्यत्वाची वल्कले नेसलेल्या भारतीय मनांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवले याबद्दल दुमत नसावे. लोकमान्यांनी १८९५ साली इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध बंड पुकारण्यासाठी आणि त्यांच्या जमावबंदीच्या कायद्याला शह देण्यासाठी शिवजयंती या सांस्कृतिक आणि गणेशोत्सव या धार्मिक कार्यक्रमांना सार्वजनिक व्यासपीठ देण्यास सुरवात केली. सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिक भावनांना इंग्रज देखील वचकून असल्याने या प्रकारच्या सार्वजनिक उपक्रमातून लोकांना एकत्र आणून जनजागृती करून स्वातंत्र्य चळवळ बळकट करण्याचा टिळकांचा इरादा होता.

माणूस म्हणून टिळक किती संवेदनशील होते याचा एक किस्सा म्हणजे टिळकांच्या एका स्नेही निवर्तले आणि समाचारास जाण्यास टिळकांना कार्यबाहुल्यामुळे अंमळ विलंब झाला. टिळक त्या स्नेह्यांच्या घराजवळ गेले असता आतून त्यांना मनमोकळ्या गप्पांचे आणि निखळ हास्याचे आवाज आले. टिळकांनी विचार केला की त्यांच्या स्नेही तर निवर्तले, त्यास काही काळ लोटला आणि त्यांच्या घरचे आता त्या दु:खातून सावरून पुन्हा नवउन्मेषाने जगण्याचा प्रयत्न करीत असता मी त्यांना भेट देवून केवळ रीत म्हणून, पुन्हा तेच दु:ख उगाळून त्यांच्या जखमेवर नुकत्याच धरलेल्या खपलीस काढणे उचित होईल? असा अत्यंत समर्पक आणि समायोजनी विचार करून टिळक आल्या पावली परत फिरले.


सुमारे १२५ वर्षांपूर्वीचे जहाल गटाचे प्रतिनिधित्व करणारे टिळक आजच्या राष्ट्रवादी मवाळांपुढे सौम्यच ठरले असते आणि भलत्याच कारणांनी प्रेरित होणारा जमाव आणि त्याचे पर्यवसन पाहता टिळकांनीच जमावबंदीचा कायदा करण्याची मागणी केली असती. पण मुद्दा तोही नाही. मुद्दा आहे तो लोकमान्य बाळ गंगाधर पंत टिळकांचे आभार मानावे की कसे? गैरसमज नको, विशद करतो...

अभ्यासक अर्थतज्ज्ञ, साक्षेपी संपादक, निस्पृह देशाभिमानी, अध्यात्मिक भाष्यकार आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे आद्य प्रणेते असलेल्या लोकमान्यांप्रती समस्त भारतवर्षाने अनेकानेक कारणांसाठी नतमस्तक व्हावे आणि कृतज्ञ रहावे हे नि:संदेह. परंतु माझे कारण थोडेसे निराळे आणि अनवट आहे. नाही, ती शालेय स्पर्धेत बक्षिसे मिळविण्यात टिळकांची झालेली मदत किंवा त्यांच्या हिमालयाएवढ्या कर्तुत्वातून सतत मिळणारी प्रेरणाही नव्हे, ते तर आहेच. तुम्हाला आठवत असेल तर ‘वय’ या पोस्टमध्ये मी भारतात जन्म घेण्याचा एक फायदा सांगितला होता... दोन वाढदिवस साजरे करण्याचा, तारखेने आणि तिथीने! तर माझा तो दुसरा (की पहिला?) तिथीने येणारा वाढदिवस हा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला अर्थात गणेश चतुर्थीला असतो. या वर्षी त्या दिवशी देखील अर्धा डझन फोन आले आणि काही संदेशही. माझ्या भौतिक समृद्धीत जरी फारशी वाढ होत नसली तरी लौकिकात होतेय की काय अशी शंका घेण्यास जागा आहे, असा सोयीस्कर निष्कर्ष मी यावरून काढला. राजकारण्यांचा सामान्य जनांस झालेल्या प्रादुर्भावाचे आणखी एक उदाहरण – कुठल्याही घटनेतून आपल्याला सोयीस्कर निष्कर्ष काढणे!

आणि टिळकांचे काय? तर, त्यांनी १२५ वर्षांपूर्वी हा मुहूर्त, एका उद्दात ध्येयाने प्रेरित होऊन, एका महान (खरोखर) लोकोपयोगी कार्यासाठी निवडला आणि कोकणातल्या घराघरात बसणारा गणपती सार्वजनिक होऊन त्याचा एक उत्फुल्ल सोहळा झाला! त्याच मुहूर्तावर अस्मादिकांनी जन्म घेतल्यामुळे आमचा तिथीने येणारा वाढदिवस केवळ महाराष्ट्रच नाही तर जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे अगदी ढोल-ताशांच्या गजरात समारंभपूर्वक साजरा होतो याचे संपूर्ण श्रेय लोकमान्यांना! जणू काही या श्रेयसासाठीच गंगाधरपंतानी केशवास जन्म दिला होता!


विनोदाचा भाग सोडला तरी आजच्या काळात, माझ्या जन्माची तिथी वाजत-गाजत साजरी होते हा क्षुद्र आत्मकेंद्री विचार थोडा बाजूला ठेवला तर, आपण ज्या पद्धतीने हे उत्सव साजरे करीत सुटलो आहोत त्याबद्दल टिळकांना काय वाटत असेल आणि त्यांचा या परंपरा सुरु करण्यामागचा जो कार्यकारणभाव होता त्याचा थोडा विचार करू या? लोकांनी एकत्र येवून काही सर्जनशील घडवावे आणि लोकाभिमुख कार्यांचा प्रारंभ करावा, जनहिताच्या, समाजोद्धाराच्या उपक्रमांचा या निमित्ताने, या मुहुर्तांवर संकल्प करता येईल? केवळ मंडपांची वाढती लांबी रुंदी, मुर्त्यांची वाढती उंची आणि वाढत्या आवाजांची अहमहिका असे उत्सवाचे स्वरूप कुठल्याही सुज्ञ, विचारी मनास अपेक्षित नसेल, नसावे! गणनायक म्हणजे गणांचा नायक, अधिपती. गण म्हणजे जन-गण-मन मधले ‘गण’ म्हणजे आपण सारे! आणि त्याच्याकडे मागायची ती सुबुद्धी म्हणजे सद्सद’विवेक’बुद्धी... कुठल्याही झुंडीत सामील न होता स्वत:च्या बुद्धीने विवेक विचार करून जे पटेल त्याची कास धरण्याची वृत्ती आणि आपल्या ‘स्व’पेक्षा मोठ्या सामाजिक उद्देशासाठी कटिबद्ध राहून समर्पण करण्याची प्रवृत्ती. हे प्रत्येक गणास जमेल तेव्हाच तो गणराज मोदाने रंगून नर्तन करेल, सहस्त्र मोदकांनी तृप्त होवून ढेकर नाही देणार! प्रत्येक नागरिकाचा अन्यायाशी प्राणपणाने लढणारा मावळा झालेला पहिला तरच जाणत्या राजाचा उर अभिमानाने भरून येईल. त्याच्या पुतळ्याची उंची वाढवण्यापेक्षा त्याच्या प्राणप्रिय गडकोटांची संवर्धन केले तर त्याची उंची आपोआपच वाढेल. टिळकांनी जुलमी राजवटीत देखील आपला आवाज बुलंद ठेवला होता, कल्याणकारी लोकशाहीत तो क्षीण झाला तर ‘हेची फळ काय मम तपाला...?’ असे त्यांना वाटणार नाही...?

बघा, विचार करा. गणाधीशाला अपेक्षित असलेले गण, शिवाजीला पोटच्या मुलांप्रमाणे प्रिय असलेले मावळे आणि टिळकांना हवे असलेले अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे देशबांधव जेव्हा प्रत्येक स्वतंत्र भारतीयांत दिसतील त्या प्रत्येक दिवशी शिवजयंती, तो प्रत्येक मुहूर्त गणेशोत्सवाचा! अन्यथा, तेच ढोल-ताशे, तेच प्रदूषण, तीच पिळवणूक आणि तेच राजकारण... विंदांच्या भाषेत ‘तेच ते आणि तेच ते!’


आणि हो, नवनिर्माणासाठी 'अभियंता दिवस' अर्थात 'इंजिनीअर्स डे'च्या मन:पूर्वक शुभेच्छा! आओ बनाये एक बेहतर कल...

रविवार, ९ सप्टेंबर, २०१८

खजिना...!


विंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त आपण येथे विंदांच्या दैवी प्रतिभेचा साक्षात्कार मुख्यतः पद्य स्वरूपात बघितला. त्यात काही स्फुटं आणि ललितं देखील आले असतील. तथापि खुद्द विंदांच्या हस्ताक्षरातील त्यांनी त्यांचे सुहृद पंडित भीमसेन जोशी यांना 'पद्मविभूषण' मिळाल्याबद्दल मार्मिक अभिष्टचिंतन करतांना लिहिलेले हे स्नेहपत्र कुठल्याही साहित्यप्रकारात मोडत नसल्याने 'आऊटस्टँडिंग' ठरते आणि या विंदा भांडारातील सर्व रत्नांचा सरताज असा कोहिनुर 'ट्रेजर' म्हणून शोभते. ज्यांच्या निरंतर स्नेहाशीर्वादाने मी रोज नव्याने लिहू धजावतो अशा माझ्यावर नि:स्सीम आणि निरपेक्ष प्रेम ('माया' म्हणणार होतो पण 'तिला' भलतेच आयाम आहेत!) करणाऱ्या मानवसमूहाचे नि:संदिग्ध आणि समर्थ नेतृत्व करणाऱ्या जळगावच्या श्री. प्रदीप रस्से सरांच्या सात्विक सौजन्याने या खजिन्याचा लाभ 'इत्यादी'ला झाला असल्याने खरे तर त्यांचे आभार मानावे असे रीत सांगते. परंतु रीत संभाळण्यापेक्षा मनमीत सांभाळणे मला नेहमीच अधिक श्रेयस्कर वाटत असल्याने मी, माझ्या इतर अनेक हितचिंतक सुहृदांप्रमाणे, रस्से सरांच्या देखील ऋणातच राहू इच्छितो; 'उतराई' होण्याच्या अट्टाहासापेक्षा लेखनसाधनेत आणि एकूणच कर्तव्यात 'कुचराई' करू नये हीच खरी कृतज्ञता! मला विश्वास आहे की माझ्या या भावनेशी माझे सर्व स्नेही देखील सहमत होतील... 

शुभम भवतु I

शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८

शाळा...!



"आमचा अहवाल अर्थातच नाकारला गेला, परंतु मी एका सकारात्मक विचारमंथनाला चालना देऊ शकलो याचे मोठे समाधान मिळाले..."

"एकदा का तुम्ही जीवसृष्टीशी जवळीक कमावलीत की कोठेही असा, तुमच्या सभोवती मित्रमंडळींचा गराडा असतो..."

"केव्हाही हताश होऊ नये, आयुष्याच्या समाधानरथाला उत्साहाचे घोडे जोडून, विवेकाचा चाबूक वापरत मार्गक्रमण करत रहावे..."

सर, पर्यावरणरक्षणाबरोबरच यशस्वी, समाधानी आणि संपन्न आयुष्याच्या या त्रिसूत्रीत 'आवडीचा छंद हाच तुमचा व्यवसाय बनवा...' आणि 'श्रेयस आणि प्रेयस एकरूप करा...' ही दोन तत्वे जोडली की, परवाच्या कार्यक्रमात आपल्याकडे 'पंचसूत्री' मागणाऱ्या उत्साही कार्यकर्त्याबरोबरच सर्वच जिज्ञासूंना या 'बिनभिंतीच्या शाळे'तून 'जो जे वांछील तो ते लाहो...' ची अनुभूती येण्यास प्रत्यवाय नसावा. परवाचा जनसंवाद व या लेखाबद्दल आम्ही आपले कृतज्ञ आहोत... आता प्रतीक्षा विधायक उपक्रमाची!

शुभम भवतु I

बुधवार, ५ सप्टेंबर, २०१८

शिक्षक...!


काल शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला एका अभूतपूर्व शिक्षकाला ऐकण्याची संधी मिळाली. डॉ. माधव गाडगीळ यांनी केरळ मधील पुराच्या थैमानाचा 'कार्य-कारण-भाव' अगदी सोप्या भाषेत उलगडून सांगितला. मुळात या कार्यक्रमाला झालेली अक्षरश: अलोट गर्दी ही केवळ आशादायकच नव्हे तर अत्यंत आश्वासक होती. कुठल्याही वैचारिक कार्यक्रमात जेव्हा तरुणांची संख्या ज्येष्ठांपेक्षा कित्येक पट असते तेव्हा तो विषय, तो वक्ता आणि ते वैचारिक अभिसरण हे जागरूक वर्तमानाने घेतलेले विवेकी भविष्यवेधाचे मनोज्ञ दर्शन असते! पत्रकार भवनाचे सभागृह या विषयासाठी खूपच छोटे ठरले आणि कार्यक्रमाचा निर्धारित वेळही! परंतु यामुळे स्टेजवर वक्त्याच्या अक्षरश: पाठीमागे बसून ऐकण्याची दुर्मिळ संधीही मिळाली आणि विषयाची तंतोतंत 'पार्श्वभूमी' अशीही समजून घेता आली, ते असो!  

तथापि, सर्वप्रथम अशा प्रकारचा संवाद आयोजित करून, निर्ढावलेली नोकरशाही आणि उन्मादी दडपशाही यामध्ये कुचंबलेल्या आवाजांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल 'वनराई'चे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार! लोकशाही प्रक्रियेचा एक अदृश्य पण सर्वात निरपेक्ष आणि कणखर स्तंभ असलेला 'जनसंवाद' व त्यायोगे होणारे जन-प्रबोधन आणि स्वतंत्र, विवेकी विचारासाठी पोषक वातावरण या वैशिष्ट्यांमुळे असे उपक्रम आणि त्यातून विधायक कार्यक्रम हे, सद्य परिस्थितीत तरी, लोकशाहीचे एकमेव आशास्थान दिसते.

गाडगीळ सरांनी केरळमधील 'निसर्गा'च्या प्रकोपातील 'मानवी' हस्तक्षेपांचा शास्त्रीय आढावा तर घेतलाच पण हे करतांना त्यांनी 'विकास' या संकल्पनेचे जैन तत्वज्ञातील चौरस स्वरूप आणि नॉर्वे या अत्यंत समृद्ध आणि प्रगत देशाच्या समुद्रातून तेल काढण्याच्या नीती-नियमांबरोबरच महाराष्ट्रातील मेंढा-लेखाच्या उदाहरणातून, संघटित व विधायक विचाराने प्रेरित स्वावलंबी मनुष्यसमूह कुठल्याही राजकारणाशिवाय आपापल्या परिसराच्या सर्वसमावेशक, संयत तथा धारणाक्षम ('शाश्वत' नव्हे!) विकासाची तळी स्वतःच कशी उचलू शकतो हे मार्मिक पद्धतीने सांगितले. माझ्या इगो-वाईज या दुसऱ्या इंग्रजी ब्लॉगवर १७ जुलै २०१८ रोजी 'डेमोक्रसी' या पोस्टमध्ये मेंढा-लेखावरील डॉक्युमेंट्री शेअर केली आहे.

हा कार्यक्रम आणखी तीन कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला - एक म्हणजे, सरांच्या व्याख्यानातून, ज्या अनेक लादल्या गेलेल्या आणि पर्यावरणनाशक असमर्थनीय 'विकास'कामांचा आणि त्यामागील 'अर्थ'शास्त्र आणि कुप्रवृतींचा उलगडा झाला त्यामुळे श्रोत्यांचे प्रबोधन झाले, उपस्थितांची जाणीव-जागृती झाली आणि जिज्ञासूंना काही विधायक उपक्रमाची प्रेरणा मिळाली. यातून काही समाजोपयोगी कार्यक्रम आकारास येईल ही आशा फारच आदर्शवादी आणि भाबडी वाटली तरी फोल ठरू नये. अन्यथा, वादळी पावसात मिट्ट काळोख व्हावा आणि डोळ्यात बोट घातले तरी दिसू नये अशा अवस्थेत मेणबत्ती आणि काडेपेटी तर सापडावी पण सर्दाळलेल्या काडीपेटीतील सर्व काड्या कुचकामी ठराव्या आणि शेवटची काडी महत्प्रयासाने पेटावी तर मेणबत्तीच्या वातीला लावण्यापूर्वीच विझावी, अशी काहीशी असहाय्य अस्वस्था लोकशाहीच्या नशिबी येईल... ही भीती!

दुसरे वैशिष्ट्य - सरांनी त्यांच्या जर्मन मित्रांशी संवादाच्या माध्यमातून भारतीय मानसिकतेचे केलेले परखड विश्लेषण! त्यांचा एक जर्मन मित्र लहानपणी ऱ्हाइन नदीमध्ये मनसोक्त डुंबायचा, तरुणपणी ते जलप्रदूषणामुळे अशक्य झाले पण पर्यावरणप्रेमी जागरूक नागरिक आणि संवेदनशील प्रशासन यांच्या  सामुदायिक प्रयत्नाने ऱ्हाइन नदी पुन्हा स्वच्छ झाल्यामुळे तो मित्र आता म्हातारपणी पुन्हा नदीत डुंबू शकतो... अशी आठवण सांगून, 'मी देखील लहानपणी मुळामुठेमध्ये पोहायला जात असे आणि मला देखील माझ्या जर्मन मित्रासारखी ती संधी पुन्हा मिळाली तर हर्षवायूच होईल...!' अशी मार्मिक टिपण्णीही केली. सरांना अशी संधी मिळवून देण्याची जबाबदारी पर्यावरणप्रेमी जागरूक पुणेकरांची आहे... ही आशा!

तिसरे वैशिष्ट्य - प्रश्नोत्तरादरम्यान, नेहमीच अनुभवाला येणारी, विवादास्पद काही मिळवून त्याचे भांडवल करण्याच्या दृष्टीने, विषयाशी विसंगत आणि सहेतुक प्रश्नांची बोचणी. अशाच एका अतार्किक प्रश्नाला प्रतिसाद देतांना सर म्हणाले, 'सगळ्याच विषयातील सगळेच ज्ञान असायला मी धर्मगुरूही नाही आणि राजकारणीही...!' प्रश्नकर्त्याला उत्तर मिळाले की नाही ठाऊक नाही पण सुज्ञांना संदेश आणखीन भावना दोन्ही पोहचल्या... असाव्यात!

एक सभ्य, सुसंस्कृत आणि विवेकी समाज घडायला शिक्षकांची, गुरूंची नितांत गरज असते पण ते नेते धर्मगुरू किंवा राजकारणी असू नयेत याची समज असलेला समाजच प्रगल्भ आणि खऱ्या अर्थाने समृद्ध होतो... मग तो मध्यरात्रीचा सूर्य पहाणारा नॉर्वे असो किंवा लोकशाही व्यवस्थेतील आपल्या वनाधिकारांबद्दल अहोरात्र सजग असलेला आदिवासी मेंढा-लेखा!

आयुष्याला आकार, अर्थ आणि प्रयोजन देणाऱ्या माझ्या आजवरच्या शिक्षकांच्या भल्या मोठ्या यादीत काल आणखीन एक सन्माननीय भर पडली आणि मी आणखीनच समृद्ध, सुसंस्कारित, शिक्षित आणि कृतज्ञ झालो!

जे जे आपणासी ठावे |
ते ते इतरांसी शिकवावे |
शहाणे करुन सोडावे सकल जन ||

या धारणेने कार्यरत असलेल्या सर्व व्रतस्थ शिक्षकांना 
शिक्षकदिनाच्या कृतज्ञतापूर्वक शुभेच्छा | 

जय जय रघुवीर समर्थ I