शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१८

दुभंग...!


तेव्हा शाळांमध्ये शिक्षक होते पण मूल्य शिक्षणाचा तास नव्हता,
शिकून शहाणे होत विद्यार्थी अन शिकल्याचा फक्त भास नव्हता.
खडू-फळा, पाटी-पेन्सिल कलाभान शाळेचे अविभाज्य अंग होते,
मनोरंजन कृष्ण धवल असले तरी जगण्यात इंद्रधनुष्यी रंग होते.

सत्यमेव जयतेची जाहिरात नव्हती तो आचरणाचा भाग होता,
अनीती, लबाडी नी मतलबी दांभिकतेचा साऱ्यांनाच राग होता.
ओसंडून वाहणारा पैसा नव्हता पण जगण्याला सुभग अर्थ होता,
माणसे जपतांना क्षुद्र देवघेवीचा व्यावहारिक हिशोब व्यर्थ होता.

एकाच वर्तमानपत्रात सगळ्या वार्ता बातम्यांची मिळायची न्यूज,
दहा दैनिकांमधून कोसळायचे नाही बातमीशून्य अतिरेकी व्हयूज.
दूरदर्शन एकच एक होते जे रोज द्यायचे नेमके संकीर्ण समाचार,
कठपुतळ्यांच्या माध्यमातून चालत नसे चोवीस तास अनाचार.

तेव्हा घरांमध्ये माणसेच असायची
, झाले नव्हते त्यांचे कन्झ्युमर’,
विनोदबुद्धीही भद्र होती बोकाळला नव्हता ओंगाळवाणा हयुमर’.
अर्ध पुतळे मानवी होते, चौथरा आणि प्रेरणा दोन्ही होत्या भक्कम,
विक्रमी निर्माणांसाठी लागत नसे सामाजिक जबाबदारीची रक्कम.

साध्याभोळ्या सज्जनांचा देव सोन्याच्या पिंजऱ्यात बंदी नव्हता
,
भाबडा सत्वशील भक्तही देवाचा असा रगेल, छंदी फंदी नव्हता.
राम जन्मायचा दर वर्षी आणि कथेतून भोगायचा निमूट वनवास,
अज्ञातवासात राहून प्रकटायचा नाही, येताच निवडणुकीचा वास.

स्वर-रंग-गंध मुक्त आणि भाव सहज तथा परवडण्यासारखे होते
,
जात-धर्म-लिंग विषमता हे तर मानव्यच खरवडण्यासारखे होते.
साध्या साध्या बोलण्यालाही टोकदार तात्विक अभिनिवेश नव्हता,
विद्यार्थी आणि शासकीय सेवकांशिवाय कुणालाही गणवेश नव्हता.

तेव्हा माणसे एकमेकास चक्क भेटायची अन बोलायची भीड नव्हती,
कनेक्टेड फील करण्यासाठी स्मार्टफोन अन फेसबुकची नीड नव्हती.
ज्ञान वसे चर्चा, पुस्तके, ग्रंथातून आणि माहितीतही होता इनोसंस,
व्हॉट्सअॅप विद्यापीठ अजून व्हायचे होते 'इंस्टीट्युट ऑफ इमिनंस'.

चिंता असतील पण नव्हती भिती, आतला आवाज जागा होता,
सर्व लोकांना जोडणारा सुखदु:खाचा एकच समान धागा होता.
घरे छोटी आणि खोल्या लहान, दिखाव्याला पण नव्हती स्पेस,
अवघ्या जगण्याचीच झाली नव्हती निर्बुद्धजीवघेणी रॅट रेस.

चरितार्थ, उदरनिर्वाह, उपजीविका इतके काही कनसाईज नव्हते,
पॅकेज’, ‘डील’, ‘इएमआयसाठी वाट्टेल तसे कॉमप्रोमाईज नव्हते.
जगण्यामध्ये लाख उणीवा असतील पण समाधान काठोकाठ होते,
आत्मग्रस्त विकासाच्या हव्यासाने विग्रहाची वाढ पाठोपाठ होते.

मनोरंजनात देखील मूल्ये होती झाला नव्हता त्याचाही बाजार
,
शरीर निरोगी ठेवण्यासाठी धडपड आणि मनाला लाख आजार.
आज दुनिया मुठ्ठीमेआणि स्वच्छंद विहारास खुला आसमां है’,
पण किती लोक बाणेदारपणे म्हणू शकतात मेरे पास मां है’...?

घरं आज काठोकाठ भरलीयत दिखाव्याच्या सर्व साधन सुविधांनी
,
मनं असेनात का एकलकोंडी आणि भयग्रस्त अविश्वास, दुविधांनी.
भोगवादी जगण्यात असल्या नाही शिल्लक कुठेही अभंगाचा अंश,
अशा 'नवश्रीमंती' समृद्धीला म्हणूनच छळतो नित्य दुभंगाचा दंश!

बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८

बाल्य...!


लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा
बालपणीचा काळ रम्य
सगळ्यांना पुन्हा हवा!

तुका म्हणे बरवे जाण
व्हावे लहानाहूनी लहान
झाले मोठे, मिळवले जग
तरी कशी भागेना तहान!

जया अंगी 'मोठे'पण
तया यातना कठीण
निरागस बाल्याचे सर्वां
मिळावे मूल्य शिक्षण!

बालदिनाच्या चिमुकल्या शुभेच्छा!

शनिवार, १० नोव्हेंबर, २०१८

नमन...!

मशाल अभिव्यक्ती स्वातंत्र्याची
परिवर्तनाचा ती झंझावात होती
लढण्याचा वसा देऊन रंगभूमीस
शांत झाली एक ओजस्वी ज्योती...!


रंगमंच आणि नाटक या माध्यमाला एक नवीन परिमाण देऊन समृद्ध करणाऱ्या आणि त्याची किंमत मोजणाऱ्या
धाडसी, करारी ज्येष्ठ रंगकर्मी लालन सारंग यांच्या स्मृतीस सादर नमन!

शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८

आनंदयात्री...!


‘पु. ल. देशपांडे हे मराठी सारस्वताला पडलेलं स्वप्न होतं आणि शारदेच्या मंदिरातील तो रत्नजडीत हस्तिदंती स्तंभ आहे...’ अशा सखाराम गटणेच्या भाषेत पुलंच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ करावा असा अस्फुट विचार मनात आला होता पण खुद्द पुलंनीच या वाक्याची किती आणि कशी टिंगल केली असती या कल्पनेनं हसू फुटलं! शिवाय काल पहाटे ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण ते बालगंधर्व व्हाया ‘आशय’चा ग्लोबल असा ‘पुलोत्सव’ साजरा होत असतांना पुलंबद्दल जे जे बोललं गेलं (आणि ऐकाव लागलं), दाखवलं गेलं (आणि पहावं लागलं) तथा साकारलं गेलं (आणि भोगावं लागलं) त्या अत्यंत समृद्ध, सुभग सांस्कृतिक अनुभवाला छेद नको म्हणून ‘त्या’ वि. स. प्रेरित गोळीबंद वाक्याचा मोह टाळला आणि मराठी रत्नमाला एका मौक्तिकाला मुकली!

‘कालच्या ‘पुल’कित दिवसात पुलंच्या वि’पुल’ व्यक्तिमत्वाने साजरा झालेला ‘पुलो’त्सव एका पुरुषोत्तमाचा मना-मनांमध्ये ‘पूल’ बांधण्याच्या अट्टाहासाचा प्रवास होता...’ हे नानू सरंजामे छाप वाक्यही पुलंना फारसं मानवलं नसतंच पण तसा स्टार्ट घेतल्याशिवाय लाईन आणि लेंग्थ हवी तशी सांभाळता येणार नाही म्हणून हा रन-अप. पुल हे व्यक्ती आणखीन वल्ली म्हणून इतके अफाट आणि अथांग होते, आहेत की एक संपूर्ण दिवस आणि चार कार्यक्रम हे फारतर या अवलियाचा अल्प परिचय करून देऊ शकतात, त्यांच्या समग्र कार्याचा समर्पक आढावा नाही घेऊ शकत!


कथा लेखन-सादरीकरण, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन, ललित, स्फुटं, वैचारिक तथा सामाजिक लेखन, चित्रपट कथा-पटकथा-लेखन-दिग्दर्शन-संगीत आणि आविष्काराची एवढी साधने पुरेशी नाहीत म्हणून की काय सभा आणि मंच गाजविणारे वक्तृत्व अशा शब्दश: हरहुन्नरी आणि बहुमुखी, बहुश्रुत प्रतिभेने आयुष्यात जे जे म्हणून साकारले ते ‘अभिजात’ या प्रकारात मोडणारे होते याची साक्ष पुलंच्या लोकप्रिय पुस्तकांच्या अर्धशतकी आवृत्या, मराठीतील ‘बेस्ट-सेलर’ हा बहुमान आणि दिवसेंदिवस वाढतच जाणार ‘पुलं’ नावाचं गारुड, हे सगळे एका प्रकटनात बसविणे फक्त कठीण नाही तर अशक्य आहे!

‘ते ‘सदू आणि दादू’ बरोबर थोडं ‘नारू आणि पारु’ही लिव्हलं तर कवितेच यमकही जुळतंय की हो म्हणतो मी...’ असा प्रतिभावान सल्ला देणाऱ्या रावसाहेबांमुळे, चाळीतल्या परोपकारी गंपूमुळे, चितळे मास्तरांच्या झिजलेल्या चपलांमुळे आणि घरोघरी लग्नकार्यात भटजीपासून शेटजीपर्यंत सगळ्याची व्यवस्था पाहणाऱ्या नारायणामुळे पुलंचे बहुतेक पैलू हे चिरपरिचित असले आणि पुस्तके, मासिके तसेच दृकश्राव्य माध्यमातून (अगदी यूट्युबवरही) उपलब्ध असले तरी पुलंचा फारसा प्रकाशात आणि (प्रकाशनात) न आलेला चेहरा हा एका मार्मिक कवी आणि विचक्षण दार्शनिकाचा देखील आहे असे आमचे प्रांजळ आणि परखड(?) मत आहे! हो, अप्पा प्रधानाप्रमाणे आमचे कायस्थ रक्त आणि आईकडूनच काय कुणाकडूनही खंडो बल्लाळाशी नातं नसलं म्हणून काय, '...कवणे बाणेदार असूच नये की काय...?'


तेंव्हा पुलंमधला फारसा परिचित नसलेला कवि-भाष्यकार या निमित्ताने सादर करावा म्हणून दोन व्हिडीओज् – एक अफलातून कविता आणि एक जीवनदर्शन! पुलंबद्दल आमची लेखनसीमा म्हणजे ‘...परी या सम हा!’ आणि ‘तुझिया जातीचा मिळो आम्हां कोणी’ – हो, पुलंबद्दल काव्यात्म लिहिणे येरागबाळ्याचे काम नोहे, ‘तेथे पाहिजे जातीचे...’ म्हणजे कसे तर पुलंबद्दल त्यांचे स्नेही, सन्मित्र मंगेश पाडगांवकर म्हणाले...

पुलस्पर्श होताच दु:खे पळाली
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली
निराशेतुनी माणसे मुक्त झाली
जगू लागली, हास्य गंगेत न्हाली!

आणि ‘बाकीबाब’ बा. भ. बोरकर म्हणाले... 

जराशप्त या येथल्या जीवनाला I कलायौवने तूच उ:शापिले I
यथातप्त जीवी स्मिते पेरुनी तू I निराशेत आशेस शृंगारिले I
मिलाफुन कल्याणकारुण्य हास्यी I तुवां स्थापिला स्वर्ग या भूतली I
तुझ्यासारखा तूच आनंदयात्री I तुवां फेडिली गाठ प्राणातली I

आणि खुद्द कविवर्य पु. ल. देशपांडेंच्या काही धाडसी कविता...

१. 
एकदा तुम्ही मला
छान दिसतेस म्हणालांत
पण 'समोरच्या सरोजबाईसारखी'
हे शब्द जोडून...

२. 
बहात्तर कादंबऱ्या लिहिणारी
माझी थोर साहित्यिक आत्या
दम्याने पंचाहत्तराव्या वर्षी वारली
तेव्हा 'सुटली' म्हणायच्या ऐवजी
तुम्ही 'सुटलो' म्हणालात...

३.
माझ्या खोलीतल्या फोटोतली तरुणी
परवा मला म्हणाली,
'मला चांगलेसे स्थळ शोधून द्या ना-
इथे माझा जीव टांगल्यासारखं वाटतंय' 

४. 
अहो ज्ञानियांच्या राजा । कशाला फुकाच्या गमजा?
एकेकाळी रचिली ओवी । व्हाल का हो नवकवी?
मारे बोलविला रेडा । रेघ बी. ए. ची ओलांडा!
तुम्ही लिहावी विराणी । लिहा पाहू फिल्मी गाणी
म्हणे आळंदी गावात । तुम्ही चालवली भिंत
चालवून दाखवा झणी । एक नाटक कंपनी
बाप रखुमादेवीवरा । आमुचा च्यालेंज स्वीकारा

सोमवार, ५ नोव्हेंबर, २०१८

‘पात्र’...!


सत्वशील एकवचनी राम सांगे
महाल नको पर्णकुटी बांधाव्या
भक्त म्हणे मर्यादा पुरुषोत्तम
चला, त्याचा पुतळा उभारू या...!

बुद्ध म्हणाला अप्प दीपो भव:
तूच हो दीप मार्गास तुझिया
ते म्हणाले बुद्ध देवहोता
त्याचा पुतळा उभारू या...!

राजे वदले स्वराज्य घडवू
सारे एक होऊनी लढू या
ते म्हणाले जाणता राजा
त्याचा पुतळा उभारू या...!

फुले म्हणे टाकुनी गुलामगिरी
शिका उत्क्रांतीच्या पातळ्या
ते म्हणाले हा तर महात्मा
त्याचा पुतळा उभारू या...!

टिळक गरजले, स्वराज्य हा
जन्मसिद्ध हक्क मिळवू या
ते म्हणाले हे लोकमान्य
त्यांचा पुतळा उभारू या...!

गांधी विनवती सत्याचरणाने
स्वावलंबनाची कास धरू या
ते म्हणाले अरे, हा तर संत
याचा पुतळा उभारू या...!

आंबेडकर म्हणती सर्वांनाच हवे
स्वातंत्र्य, समता, बंधुता जगाया
ते म्हणाले हा खरा शिल्पकार
याचाही पुतळा उभारू या...!

सरदार होते मौन जाणीवेने
राष्ट्रधर्मास जागून आपल्या
ते म्हणाले हा तर उपेक्षित
याचा भव्य पुतळा उभारू या...!

----------------------------------------------------------

रात्री सारेच पुतळे पुसती एकमेकास
याच साठी का केला होता अट्टाहास?
'भारत' कुठे ज्यासाठी भोगला कारावास?
'इंडिया'मध्ये आपण उरलो फक्त इतिहास?

कर्ण असहाय्य म्हणून अर्जुन दिग्विजयी,
शुक्राचार्य धर्माचरणी अन अधर्मी द्रोण?
सामाजिक जबाबदारीही कुणाची नी
ती निभाविण्यास पात्रठरते कसे कोण...?

कुणाचे भक्तहे अन अनुयायीकुणाचे
'हारघालता पुतळ्यास ती विचारांची होते
आपल्या मार्गाने चालण्याहून हार घालणे सोपे
कठपुतळ्यांना कसे कळावे अंती हार त्यांचीच होते!

----------------------------------------------------------

टीकाकार रामदासाने नवीन वात्रटिका फाडली
'खुजेपणा लपविण्यासाठी नामी युक्ती काढली
नेत्यांची कमी होताच पुतळ्यांची उंची वाढली...'
भक्त म्हणती, 'पहा, याने पुन्हा खोडी काढली...!'

-------------------------------------------------------------