शनिवार, २९ डिसेंबर, २०१८

(अ)व्यवस्था...!


ही मला म्हणाली, ‘आपले पूर्वज आपल्यापेक्षा नक्कीच पुढारलेले होते!’
मी म्हणालो, ‘नि:संशय, उगाच का त्यांनी एवढे भव्यदिव्य निर्माण केले!’
ही म्हणाली, ‘आज एवढ्या आधुनिक तंत्रविज्ञानाने देखील ते का शक्य नाही?’
मी म्हणालो...

‘कारण तेव्हा विचार-आचार-व्यवहार यात शुद्धतेचा संस्कार होता.
समाजात काही व्यापारी होतेच पण व्यापाऱ्यांचाच समाज नव्हता...

प्रत्येक गोष्ट विक्रीला उपलब्ध नव्हती, काही कमवाव्याच लागायच्या आणि
ज्यांवर आपला अधिकार नाही त्या, मोह पडूनही, गमवाव्याच लागायच्या!

समग्र जगण्या-वागण्याची झाली व्यावसायिक वृत्ती नव्हती आणि
पदोपदी भेटणारी जाहिरात हीच एक अभि’व्यक्ती’ नव्हती.

लोक भेटायचे एकमेकांना कारणाशिवाय तसेच उदात्त हेतूंनीही
चर्चा घडायच्या चहासोबत आणि चहा शिवाय संवाद सेतूंनीही!

बुद्धी-प्रामाण्य-वादाच्या झडायच्या फैरी अन निघायचे काही ठराव सकल सृष्टी जगविण्याचे
'सृष्टी' संज्ञेत सारेच सामावयाचे, नव्हते विचार केवळ काही 'विशेष' मानव समूह तगविण्याचे!

सगळ्या राजकीय खेळींचा ‘बळी’ असला तरी शेतकरी औट घटकेचा का होईना ‘राजा’ होता
भ्रष्टाचार शिष्टाचार होण्याचा समाजमनावर व्रण नव्हता झाला, तो घाव अजून तसा ताजा होता!

आज विद्रोही कविताही वर्णनवादी शब्दबंबाळ पण उपाय शोधत नाही जाऊन मुळाशी खोल,
शिवारे भले जलयुक्त झाली असतील पण हरवत चालली माती धरून ठेवणारी मुळाची ओल!

अंतराळात उपग्रह सोडण्यापासून छोट्या देशांना मदत देण्याएवढा झाला आपला विकास आहे
वंचित मुले, भिकारी, बेघर, हताश शेतकरी अन बेरोजगार यांचे जगणे मात्र अजून भकास आहे!

समाजधारणेचे शुद्ध राजकारण होतांना धंद्यांच्या गणितात विकासाची गाडी नेहमीच फसते
आणि शांताबाईच्या शाळाबाह्य सोनूला व्हायरल होतांना पाहून अलेक्सा खळखळून हसते!'

एवढे प्रवचन ऐकून कंटाळलेली ही म्हणाली, ‘व्यवस्था बदलायची तर व्यवस्थेत राहून काम करा!’
मुंढेंच्या नव्याने पुनर्नियुक्तीची ताजी बातमी दाखवीत मी म्हणालो, ‘... आणि व्यवस्थेचे पाणी भरा?’

बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

बाबा...!

मुरलीधर देविदास अर्थात बाबा आमटे यांची आज १०४ वी जयंती. 'आधुनिक भारताचे संत' असा सार्थ सन्मान लाभलेल्या बाबांचे कुष्ठरोग निर्मुलन, नर्मदा बचाओ आंदोलन तथा वन्यजीवन संरक्षण यातील अलौकिक कार्य अवघ्या जगाला ठाऊक आहे आणि हेमलकसा आणि आनंदवन येथे बाबांची चौथी पिढी या महान कार्याची पताका आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलते आहे. आज गुगलने देखील आपल्या डूडलच्या माध्यमातून बाबांना आदरांजली देत त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे, त्याबद्दल गुगलचे अभिनंदन आणि आभार!



बाबांनी आपल्या कार्यात व्यस्त असतांनाच वाचन, लिखाण, भ्रमंती आणि विविध  प्रांतात जावून लोकांना भेटणे देखील सातत्याने सुरु ठेवले होते. यामुळेच अमृतसरच्या सुवर्णमंदिरातील खलिस्तानवादी नंग्या तलवारी चमकवणाऱ्या शिखांच्या गराड्यातील निर्भय, निडर आणि अविचल बाबांच्या असामान्यत्वाचे किस्से अत्यंत नतमस्तक भावाने सांगू शकतात.

बाबांनी ज्या कविता केल्या त्यांचा संग्रह 'ज्वाला आणि फुले' अशा अत्यंत समर्पक नावाने प्रसिद्ध झाला आणि रसिकांची दादही मिळवून गेला. हा संपूर्ण संग्रहच केवळ वाचनीय आणि संग्रहणीयच नाही अक्षरश: प्रात:स्मरणीय आणि संपूर्णत: अनुकरणीय आहे. या संग्रहातील माझी सगळ्यात आवडती मुक्त छंदातील कविता आज बाबांच्या स्मृतिप्रित्यर्थ...

गांधी : एक युगाचा चेहरा
ज्यांच्या  नजरेला तो जगत असलेल्या शतकाची हिंस्त्र स्वप्ने कैद करू शकली नाहीत
आणि इतिहासाच्या दर्पणात ज्याच्या समर्पणाचीच प्रतिमा भावी पिढ्यांना दिसेल, असा.

गांधी: एक हिमनग
धृवभूमीवरून शितप्रवाहांच्या सोबतीने व उष्ण्वृत्तांच्या रोखाने निघालेला
ज्याचे प्रचंड प्राचीन सात अष्टमांश पाण्याखाली आणि जो फक्त एका ठेंगण्याश्या उंचवट्या इतका वर.

त्याने क्षितिजाशी डोके वर काढले तेव्हां अफाट समुद्रात वाट चुकल्यासारखे
बावळट वाटण्याइतपत साधे  सरळ त्याचे ध्यान होते.
तेव्हा पुष्कळांनी त्याच्याकडे गमतीने पाहून आपली करमणूक करून घेतली
पण त्याच तुच्छतेनं सर्व समुद्रावर राज्य करणाऱ्या जहाजांचा एक काफला जेव्हा त्याच्यावर चालून गेला
तेव्हां जगाने असे पाहिले की त्या हिमनगाच्या चेहेऱ्यावरचे बालिश हास्य ढळलेले नाही
आणि त्या लढाऊ जहाजांना जलसमाधी मिळालेली आहे.

गांधी: एक कलाकार,
देश एका कोऱ्या चित्रफलकासारखा त्याच्यासमोर होता.
आणि त्या रीत्या चौकटीने त्याला बैचैन केलं होते, आव्हानिले होते.
कुंचला घेतलेला त्याचा हात प्रारंभी काहीसा थरथरत होता
तो पेलण्याचा आत्मविश्वास अजून आलेला नव्हता.
चित्रफलकावर तो टेकवण्याचे साहस अजून होत नव्हते.
म्हणून रंगत बुडवून त्याने दुसरीकडे कोठे तरी काही फटकारे ओढले.
अखेर रंगांची एक संगती त्याने साधली त्यात दारिद्र्याचा मिट्ट काळा रंग होता,
श्वेत राजनीती आणि गुढ निळे अध्यात्मही होते.
नव-विचारांच्या अनेक रंगच्छटाही होत्या.
पन्नाशी गाठता गाठता त्याला आपली स्वतःची रेषा - व्हर्जिन लाईन ऑफ क्शन - गवसली
आतून उचंबळणारा आपला टोन त्याला सापडला
सर्व गृहीतांच्या सरहद्दी पुढे ढकलणारा हाही एक पॉप आर्टिस्ट होता.
चार तपांच्या तयारीने दोन तपांच्या आत त्याने ते चित्र पुरे केले. 
एका युगमुद्रेचे चित्र !

जे एका देशाच्या चित्रफलकात मावू शकत नाही.
ज्यात एकीकडे राजधानीतल्या विजयोन्मादाचा दिखाऊ दीपोत्सव आहे
आणि दुसरीकडे रक्तलांछित अंधारात -
(जेव्हा छायाही घाबरून मागे सुटलेली, तेव्हा )
विश्वासानं काठी टेकीत टेकीत
धानाच्या बांधावरून तोल सावरीत निघालेली
एका कोटीशीर्ष विराट पुरुषाची वाटचाल आहे-
आणि एक गरजणारी नि:शब्दता आहे.
एक जहाज: बंदर गाठण्याच्या बेतात असतानाच
किनाऱ्यापाशी येऊन फसलेले.
आणि बरगड्यांना साखळ्या बांधून तो ते ओढीत आहे
एकटाच !
खेचू शकला नाही तो हे रुतलेले जहाज.
खेचण्याच्या प्रयत्नांत उर फुटून कोसळला.
नव्हे!
जहाज ओढण्याच्या शक्तीलाच
तो ओढण्याचा प्रयत्न न समजलेल्या
एका मुर्ख आवेगाने डागले !
आणि आजही ते जहाज तेथे वाट पाहत पडले आहे 
कोणी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रेन लावून
ते ओढण्याचा प्रयत्न केला आहे.
कोणी मुक्तीसेनेची वाट पाहत थांबले आहेत.
कोणी धर्मचक्र फिरवून या जहाजाचे चक्र 
फिरवण्याच्या प्रयत्नात आहेत.
कोणी ते कोळीष्टकातच फसले आहे असे समजून
अध्यात्माच्या हलक्या हातांनी ते काढू पाहताहेत.
हा गुंतावळा काढण्यासाठी ते जातात
आणि फक्त एक गोतावळा जमा करतात!
आणि सोडवण्याचे श्रेय कोणाला - म्हणून आधीच
आपसात भांडत सुटतात!!

स्वराज्यात जन्मलेली पिढीच
हे रुतलेले जहाज काढू शकणार आहे
आणि जे त्या पिढीला पकडू शकतील
तेच त्याचे खरे वारसदार ठरणार आहेत.

तप्त शलाकेसारखी ही पिढी कोण पकडील?
ती पकडण्यासाठी हवी असते अलिप्त यांत्रीकाची हिकमत!
ही हिकमत त्याच्यात होती.
त्याने प्रथम एका मिठाच्या पुडीला हात घातला
आणि मग एक साम्राज्य
मिठाच्या सात समुद्रांपलीकडे फेकून दिले.
त्याने सुतातून सुरुवात केली
आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला.
याच साध्या सुताने त्याने एक पिढीच्या पिढी आणि 
एक देशच्या देश बांधून दाखवला
पण एक देशच्या देश आणि एक पिढीच्या पिढी पकडण्यासाठी
नुसतीच हिकमत पुरी पडत नाही
त्यासाठी ताकदही लागते
भारी वजनाचा एक क्रूस वाहण्याची ताकद!
गांधी: ती हिकमत असलेला मानव
आणि ती ताकद असलेला प्रेषित
अखेर एक मानवच तर होता.
त्याने सामान्य मानवासारखे प्रमाद केले
पण सामान्य माणूस जे कबुल करीत नाही
ते त्याने जगजाहीर केले!
माणसाच्या आदिम समस्यांशी
त्यालाही धडक द्यावी लागली
मानवाच्या वास्तवतेचे रूप बुरखा काढून पाहण्याचा
त्यानेही प्रयत्न केला
आणि या प्रयत्नात पहिल्यांदा
खुद्द आपला बुरखा त्याने फाडून फेकला!

बरगड्या दिसणाऱ्या त्याच्या छातीवर दोन बिरुदे होती;
आणि एक नंगा फकीर असल्यामुळे ती बिरुदे त्याच्या मांसालाच चिकटली होती.
त्यापैकी एक होते वेदनेचेआणि दुसरे विश्वासाचे.
वेदना हा वर्तमानाचा स्वीकार होता विश्वास हे भविष्याचे आश्वासन होते.
अखेरपर्यंत वेदना आणि विश्वास या दोन किना-यातून 
त्या संतमानवाचा प्राणनद वाहत गेला.
पण त्याला तिसराही एक किनारा होता
शाश्वताचा!
आणि या तिसर्या किनार्याने प्रारंभापासून दिली होती
एक परिपक्वता!
ही परिपक्वता असली
तरच आपल्या प्रेषितत्वाचे ओझे वाटत नाही.
आणि चेहऱ्यावर कायम वसलेले असते
ते तसले शिशुचे हास्य!
जे प्रेषिताला माणसाच्या जवळ ठेवते.
तेव्हांच तो नेत्यांचा नेता
आणि जेत्यांचा विजेता होतो.

सामान्य माणसावर त्याचा असामान्य विश्वास असतो
सामान्य माणसातली असामान्य साहसे तो जागवतो
आहेत त्याच साधनातून तो आपल्या युद्धनौका घडवतो
आणि मिळतील त्याच माणसातून तो
त्यांच्या काफिल्याचे कप्तान आणि खलाशीही तयार करतो.
तो समाजसखा होऊन येतो.
मित्रभावाशिवाय दुसरी कोणतीही जादू त्याच्याजवळ नसते
म्हणून त्याच्या इतकी लगट
अज्ञान समाजाशी दुसरा कोणीही करू शकत नाही.

समाजमातेच्या  गर्भातून महान कल्पनेचे सुदृढ मुल
बाहेर पडायचे असते
तेव्हा तिची वीण उसवण्याचीही शक्यता असते.
अशा वेळी तिचे दायित्व करणारा तोच असतो
स्वरांच्या गोंधळातून गोंधळी एक लय तयार करतो
तसेच गर्दीच्या गोंधळातून
त्याचे आव्हान मंत्र उमटतात

हा संतमानव मरगळलेल्या जीवनात
वसंत फुलवीत येतो.
नेते आणि जेते हे त्याची कडू-गोड फळे
गोळा करणारे असतात.
ते भारती ओहोटीचे स्वार असतात
त्याचे स्थान मात्र भरती-ओहोटीत वाट दाखवणाऱ्या
धृवासारखे निश्चल असते.
समाज त्याच्या पालख्या घेऊन
शतकानुशतके नाचत सुटतो
जगज्जेत्यांच्या जन्मतिथ्या मात्र
शाळकरी पोरांकडून घोकंपट्टी करून लक्षात ठेवाव्या लागतात !

तुमच्या आमच्या जीवनातली शक्ती प्रतिक्रियेत खर्च होते.
त्याच्या जवळ विशुद्ध क्रिया असते.
म्हणून धबधब्यापेक्षा हजारपट मोठी
श्रावणझडीची उंची त्याला दिसते!
रोग्यात तो योगी पाहतो
आणि अस्पृश्यात त्याला हरिजन दिसतो.
आणि म्हणून तो कर्मकांडी राहू शकत नाही.
जीवनाचे संदर्भ तोडून कृतींचे अर्थ तो लावीत नाही.
गफारखानांच्या मुलासाठी तो मांसाहाराची व्यवस्था करतो 
हिंसक क्रतीकारांच्या धैर्याची तो पूजा करतो.
आणि प्रतिस्पर्ध्यांशीही वागताना त्याची मान ताठ
पण माथा झुकलेला असतो.
म्हणून त्याच्या उपवासाने
त्याला प्रतिस्पर्ध्याच्या हृदयात वास मिळतो
त्याची विशुद्ध क्रिया नसली
तर उपवासाचा उपहास होतो !
(बहुधा अशा उपवासांचा उपद्रवही होत असतो.)
त्याचा मंत्र जवळ नसला
म्हणजे त्याच्या यंत्रावर विणलेली खादी 
वैफल्याची नग्नता झाकू शकत नाही.
आणि त्याच्या तत्वांचे घटपट करत चालणारे 
बौद्धिक हस्तमैथुन
समाधानाचा फक्त भास देऊ शकते.
त्याने निर्मिती होत नाही.
विकृती मात्र निर्माण होते...

पण खांद्यावर जेव्हा क्रूस असतो
आणि डोक्याला कफन गुंडाळून जेव्हा जीवन निघालेले असते
तेव्हा त्याचा श्वासाश्वासात संकल्प असतात.
त्याच्या आचाराच्या पायाशी सिधी लोळण घेत येतात.
आणि त्याच्या विचारातून क्रांतीचा जन्म होत असतो.

आपली भूमिका संपली
म्हणजे दैदिप्यमान मृत्यूने आसमंत उजळीत
तो निघून जातो
पण बेचिराख झालेली त्याची राखही हसत असते
आणि तिच्यातून कित्येक किंग आणि ड्यूबचेक उठत असतात.
ज्याला तो क्रूस वागवता येतो
त्याच्या सोबत बारा अनुयायी असले तरी त्याचे
प्रेषितत्व घाबरत नाही.
पण खांद्यावर क्रूस नसता कोणी बारा लाख बाजारबुणगे
घेऊन निघाला.
तरी त्याचा महंत होतो
आणि महंत फक्त गादी चालवू शकतात
मन्वंतरे घडवू शकत नाहीत
(नव्या युगाचा चेहेरा कोणत्याही जुन्या साच्यात
घडवला जाऊ शकत नाही.)

गांधी महात्म्य सांगून गांधी सांगता येणार नाही.
आणि उद्याच्या पिढ्यांना त्याची ओळख पटण्यासाठी
क्वचित कॉम्प्यूटर लागेल !
पण काळाच्या भाळावर उमटलेली
ही तप्त युगमुद्रा
कोणत्याही इतिहासाला पुसून काढता येणार नाही !

- बाबा आमटे
(ज्वाला आणि फुले)

रविवार, १६ डिसेंबर, २०१८

अपराजित...?



त्या धनुर्धराला आपल्या धनुर्विद्येचा दुराभिमान होता. अनेक स्पर्धा जिंकत आणि अनेक धनुर्धरांना धूळ चारत तो एका गुरुकुलात पोहचला. आश्रमाच्या कुलगुरूंनी आपल्या पर्णकुटीत त्याचे यथोचित आदरातिथ्य केले आणि ख्यालीखुशाली विचारली. गुरूंच्या क्षमतेबद्दल अनभिज्ञ असलेल्या धनुर्धराने आपल्याच गुर्मीत आपल्या धनुर्विद्येची महती गर्विष्ठ भावाने गुरूंना सांगितली आणि त्यांनी स्वत: त्याच्या अलौकिक कौशल्याची प्रचीती घ्यावी म्हणून आग्रह धरला. ‘अतिथी देवो भव’ या संस्कृतीचे पाईक असलेल्या गुरूंनी त्याचा बालहट्ट पूर्ण करावा म्हणून त्याच्या कौशल्याचा नमुना बघायची तयारी दर्शवली.

धनुर्धराने आपले दोन्ही पाय जमिनीवर घट्ट रोवले, योग्य ती स्थिती घेतली आणि आकर्ण प्रत्यंचा ओढून एक बाण दूरवर झाडाच्या दिशेने सोडला. वायुवेगाने हवा कापीत तो बाण सरळ रेषेत झाडाच्या बुंध्यात मधोमध रुतला आणि धनुर्धराने विजयी मुद्रेने सभोवार नजर फिरवली. आश्रमातल्या विद्यार्थ्यांच्या नजरेतले कौतुक त्याला सुखावून गेले आणि आपल्या पुढील कृतीने त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा विस्मयचकित भाव पाहण्यासाठी तो अधीर झाला. त्याने दुसरा बाण प्रत्यंचेला लावला, नेम साधला आणि पुन्हा एकदा प्रत्यंचा आकर्ण ताणून बाण सोडला. या सणसणीत बाणाने झाडाच्या बुंध्यात रुतलेल्या बाणाचा मधोमध वेध घेवून, त्याच्या चिरफळ्या उडवीत त्याच्या जागी आपले टोक झाडाच्या बुंध्यात त्याच ठिकाणी रुतवले!

चोहोबाजूंनी युवा धनुर्धारंनी हर्षातिरेकाने चित्कार केले आणि धनुर्धराच्या या अतुलनीय कौशल्याने सारा आश्रम मंत्रमुग्ध झाला, भारावून गेला. जो तो ‘आपण आजवर असा श्रेष्ठ धनुर्धर कधी बघीतलाच नाही’ याचा निर्वाळा देवू लागला. या सर्वत्र कौतुकवर्षावाने मूळचा गर्विष्ठच असलेला तो धनुर्धर अधिकच मदमस्त झाला आणि त्याने सभोवार मग्रूर नजर फिरवीत विचारले, ‘आहे इथे कुणी असा धनुर्धर जो माझ्या या कौशल्याची बरोबरी करू शकेल, मला हरवू शकेल...?’ सर्व दर्शक स्तब्ध झाले, कुणालाच काही सुचेना. या सर्व घडामोडींचे मूक दर्शक असलेले आणि कुणाच्याच कुठल्याच कृतीने कणभरही विचलित न झालेले कुलगुरू आपल्या स्थानावरून उठले आणि त्यांनी धनुर्धराला आपल्या बरोबर चलण्याची खूण केली. आश्रमवासियांना चकित अवस्थेत सोडून धनुर्धर गुरूंच्या मागोमाग, थोड्या अपेक्षेने आणि बऱ्याचशा उत्सुकतेने, चालू लागला.

आश्रम मागे सोडून कुलगुरू डोंगराच्या दिशेने चालू लागले आणि धनुर्धर त्यांच्या मागे निघाला. डोंगरावर बऱ्याच उंचावर गेल्यावर त्याने बघितले की गुरु एका भल्या मोठ्या घळीपाशी थांबले आहेत जीची लांबी-रुंदी आणि खोली एखाद्या प्रवराइतकी भासते आहे. या खोल घळीच्या वर पलीकडे जाण्यासाठी एक अत्यंत जीर्णशीर्ण झालेला दोरीचा पूल बांधला आहे आणि हवेच्या हलक्याशा झोताने देखील तो पूल सर्व दिशांनी हिंदकळतो आहे, हेलकावे खातो आहे. गुरूंनी अत्यंत शांतपणे त्या अत्यंत धोकादायक भासणाऱ्या, वाऱ्याबरोबर भेलकांडणाऱ्या जर्जर अशा दोरीच्या पुलावर आपले पाय रोवले आहेत आणि क्षणार्धात ते स्थिर, निश्चल उभे आहेत. गुरूंनी एका संथ पण अखंड लयीत धनुष्य उंचावले, भात्यातून बाण काढून प्रत्यंचा ओढली, बाण लावला आणि डोळ्याचे पाते लवण्याच्या आत गुरूंच्या धनुष्यातून सुटलेला बाण वेगाने घोंगावणाऱ्या वाऱ्याचा प्रवाह तप्त सुरीप्रमाणे कापीत दूरवरच्या झाडाच्या बुंध्यात मधोमध रुतला आहे आणि त्याच्या प्रवासाचा नाद वातावरणात गुंजतो आहे! पुलावरून सावकाश जमिनीवर परतलेल्या गुरूंनी धनुर्धराला म्हटले,
‘आता तुझी पाळी...’

आपण जे बघितले त्याच्या धक्क्यातून अजूनही न सावरलेल्या धनुर्धाराने विस्फारित नजरेने आणि पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याने जोरजोरात नकारार्थी मान हलवली आणि त्या घळीच्या खोलीने गर्भगळीत झालेल्या तरुण धनुर्धराच्या अवस्थेबद्दल सहानुभूती दर्शवत कुलगुरू अत्यंत सौम्य, स्निग्ध आणि निरहंकारी स्वरात म्हणाले,
‘मित्रा, धनुर्विद्येत तु निष्णात आहेस हे नि:संशय तथापि बाण सोडतांनाची एकाग्रता आणि दृढता ज्या मनोनिग्रहाने येते त्या चंचल मनावर अजून तुला बरेच काम करायचे आहे असे दिसते! हे धनुर्धरा, तुझ्या हिताची एक गोष्ट सांगतो ती लक्षपूर्वक ऐक – मनुष्यात जोवर जिज्ञासा, नम्रता आणि शिकण्याची वृत्ती शाबित असते तोवर त्याचा समग्र विकास होत असतो; तथापि ज्या क्षणी 'मी अजिंक्य, अभेद्य तथा सर्वश्रेष्ठ असल्याने अपराजित आहे' असा गर्व, असा दंभ उत्पन्न होतो ती त्याच्या विलयाची नांदी असते...! ’

[अस्वीकृती नव्हे, खुलासा – मला अत्यंत प्रिय असलेल्या झेन कथांमधील एका अतिशय मार्मिक आणि ‘भेदक’ अशा या बोधकथेचा, माझ्या प्रकटन मर्यादेत राहून मला जमला आणि भावला तसा हा मुक्त भावानुवाद असून मूळ कल्पनेचे श्रेय झेन सिद्धांताचेच आहे. आज मला पुन्हा एकदा रस्से सरांच्या ‘टिकटिक’मधील सुयश पटवर्धन यांच्या झेन संबंधीत ‘अनुभूती’च्या वर्णनाने हे लिहिण्याची प्रेरणा मिळाली त्यामुळे त्यांचे पुन्हा एकदा आभार आणि या बोधकथेचा कुठल्याही राजकीय, सामाजिक वर्तमानाशी किंवा सांप्रत शैक्षणिक अथवा संपादकीय घडामोडीशी दुरान्वयाने देखील संबंध नाही व तसा आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!]

शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

माती...!

आमचे जळगावचे स्नेही-सुहृद, शुभचिंतक परममित्र आणि प्रेरणास्थान 'टिकटिक'कार श्री. प्रदीप रस्से सर हे खरे गोताखोर रत्नपारखी आहेत. रोज सकाळी हा गृहस्थ कुठल्या जगात फेरफटका मारून येतो आणि त्याच्या 'सुभग विश्वाच्या' पदरात त्याने वेचलेली फुले, मौक्तिके, स्वर आणि गंध, कधी एकादशी देवीच्या सुबक आणि मोहक मूर्तीच्या माध्यमातून तर कधी स्वतःच टिपलेल्या एखाद्या बालिकेच्या तन्मय मुद्रेतून आणि एरवी त्याच्या, मेंदूला फार झिणझिण्या न आणता थेट हृदयाला भिडणाऱ्या शब्दातून टिकटिकत असतो. रस्से सरांच्या या अद्भुत नित्योपासनेने आम्ही अचंबित आणि प्रभावित आहोतच, तेवढे पुरेसे नाही म्हणून हे महाशय कधी कधी असे काही शोधून आणून पदरात घालतात की वाचणाऱ्यानेही 'दुबळी माझी झोळी' म्हणत लिहायला प्रवृत्त व्हावे. बाय द वे, 'प्रवृत्त करणे' आणि 'भडकावणे' यामध्ये 'भाविक' आणि 'भक्त' यात असतो तोच फरक आहे... तंतोतंत! हे आपले उगाच पॉलिटिकली करेक्ट असावे म्हणून... असो!

आज रस्से सरांनी 'रोज मिलिगन' या कवयित्रीची अभिजाततेच्या सर्व निकषांना पार करून दशांगुळे उरणारी अत्यंत दार्शनिक तथा विचक्षण कविता 'DUST IF YOU MUST' शेअर केली आणि तिची आशयघनता, हृदयस्पर्शी मांडणी आणि शाश्वत विचार मनाला इतका भावला की हा भाव मराठीत आलाच पाहिजे या उर्मीने, 'रोज'च्या अथवा रस्से सरांच्या परवानगीशिवायच, हा मुक्त भावानुवाद उमटला. मूळ कवयित्री बद्दल फारशी माहिती माहितीजालावर उपलब्ध नसली तरी ती जिथे असेल तिथे तिची क्षमा मागून आणि रस्से सरांचे अधिकच ऋणाईत होऊन हे क्षणभंगुर जीवनावरील अनुवादित भाष्य आपल्या सर्वांच्या जाणिवांसाठी सादर...


मातीच करायची आयुष्याची जरूर करा, पण येऊ दे काही आतुनही
रंगवता येते चित्र इंद्रधनुषी रंगाने नी करता येते हितगूज पत्रातुनही!
बनवता येतो साजूक तुपातला शिरा अन लावता येते बकुळीचे रोप
अपुऱ्या इच्छांमागे धावतांना का ओढवावा फुलत्या क्षणांचा कोप?

मातीच करायची आयुष्याची जरूर करा, पण वेळेचही ठेवा भान
चढायचेत डोंगर ओलांडून नद्या आणि ते पहा वाट पाहतेय रान!
गोंजारावे स्वर जे आले भेटी, भरून घ्यावे शब्दनाद श्वासातून
सजवावे जगणे मैत्रीच्या कोंदणात, उद्धारावे मानव्य ऱ्हासातून!

मातीच करायची आयुष्याची जरूर करा, पण जगण्याचीही ऐका साद
सूर्यबिंब उगवावे डोळ्यात कधी लागावा कधी भणाणऱ्या वाऱ्याचा नाद!
कवडसे उन्हाचे सुखविणारे, पाऊस देत सृजनाची ग्वाही
आला क्षण गेला क्षण हाच क्षण फिरुनी पुन्हा येणार नाही!

मातीच करायची आयुष्याची जरूर करा, पण हे देखील लक्षात ठेवा
संध्या छाया भिवविती हृदया हे प्राक्तन कुणालाच चुकत नाही देवा!
जन्माबरोबर प्रत्येकाचे सूर्य मावळण्याइतके निश्चित आहे जाणे
मातीच होईल आयुष्याची अन कापरासारखे उडून जाईल गाणे!




या निमित्ताने, पुण्यातील 'श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल'च्या प्रांगणात उभारलेला शिवाजी महाराजांचा ब्राँझमध्ये घडविलेला अश्वारूढ पुतळा घडविणारे आणि ‘एका पुतळ्याची आत्मकथा’ या आपल्या लेखात या पुतळ्याच्या जन्माची रंजक कहाणी सांगणारे महाराष्ट्राचे पद्मश्री शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर अर्थात नानासाहेब करमरकर यांचा एक किस्सा ऐकला होता, तो आठवला.

नानासाहेबांकडे एक ‘शिष्ट’मंडळ त्यांना हव्या असलेल्या कुठल्याशा पुतळ्याच्या कामासंबंधी बोलणी करण्यासाठी गेले. नानासाहेबांनी पुतळ्याच्या तपशिलाचा अदमास घेवून काही रक्कम शिल्प बनविण्याचे शुल्क म्हणून सांगितली. शिष्टमंडळातील एका ‘विशिष्ट’ व्यक्तीला ही रक्कम खूप जास्त वाटल्याने त्यांनी थोडी सखोल चौकशी करण्याच्या मिषाने नानासाहेबांना विचारले, ‘नेमके असे काय विशेष साहित्य अन वेळ लागणार आहे पुतळा बनवायला?’ त्यावर नानासाहेब उत्तरले, ‘बाकी साहित्य आणि माझ्या वेळेचे शंभरातले १० रुपये पण पुतळ्यासाठी लागणाऱ्या मातीचे शंभरातले ९० रुपये!’ जिज्ञासू म्हणाले, ‘अशी कुठली खास माती वापरणार आहात जिची किंमत ९०% आहे?’ पद्मश्री नानासाहेब सहजभावाने उद्गारले, ‘तीच जी मी आजवर माझ्या आयुष्याची केली...!’ पुढील तपशील ज्ञात नाही...

असो. हा मातीचा महिमा आज रस्से सरांच्या ‘टिकटिक’ आणि ‘रोज’ च्या ‘Dust if you must च्या निमित्ताने!