मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

ठहराव...!


पेरलं खूप जातय पण
रुजत काहीच नाही
तर थोडं थांबावं...
जमा बरच होतंय पण
रुचत काहीच नाही
तरीही थोडं थांबावं...

आशय हरवलाय आणि
सुचत विषय नसला
तर थोड थांबावं...
सांगतोय, धावतोय पण
पोहोचत मात्र नाही
तरीही थोडं थांबावं...

हाडामासाच्या माणसांशी
भेटून बोलावं वाटलं
तर थोडं थांबावं...
भेटलोय पण शब्द नाहीत
बोलतोय पण भाव नाही
तरीही थोडं थांबावं...

डोकं हिशोबात गुंतलेलं पण
मन कशात रमेना झालं
तर थोडं थांबावं...
करतोय पण का याचा
थांग लागेना झाला
तरीही थोडं थांबावं...

मत्ता आणि सत्ता उदंड पण
अर्थहीन एकटेपण
तर थोडं थांबावं...
टोचत असेल सारखं काही
आणि बदलाव वाटलं
तरीही थोडं थांबावं...

वेगे वेगे धावतांना दिसलाच 
तळ्याकाठी विसावा
तर थोडं थांबावं...  
लाभत असेल काही अन
ते अव्हेराव वाटलं
तरीही थोडं थांबावं...

सरावाने जमतंच सारं 
पण मौज हवी वाटली
तर थोडं थांबावं... 
हरकत आणि फिरत साधूनही
‘ठहराव’ हवासा वाटला   
म्हणूनही कधी थांबावं...!

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१९

ये दोस्ती...?



म्हणजे गोष्ट तशी छोटी होती, फार काही नाही. म्हणजे असं बघा... दोन तरणेबांड, राजबिंडे तरूण होते. परिस्थितीच्या रेट्यात बिचारे फार सुशिक्षित सुसंस्कारीत होऊ शकले नाहीत, पण मनाने चांगले होते. शिक्षण आणि संस्कार थोडे कमी पडल्याने ‘नाईन टू फाईव्ह’वाला, आधी टाय आणि कालांतराने डाय लावून करायचा, सोफीस्टीकेटेड जॉब त्यांच्या नशिबी नव्हता. त्यामुळे बिचाऱ्यांना हेराफेरी, चोऱ्यामाऱ्या, दादागिरी अशा अत्यंत सौम्य स्वरूपाचे अदखलपात्र पण तरी उगाचच गुन्हेगारी समजले जाणारे उद्योग करून आपला चरितार्थ चालवावा लागे. पण दोघे स्वभावाने अतिशय चांगले होते. त्यांच्या या व्यवसायात अनेकदा शौर्य आणि पळपुटेपणा तसेच संधिसाधूपणा आणि सचोटी यांचे पेचप्रसंग उभे रहात. अशा प्रत्येक प्रसंगी, मुळचा मनाचा अतिशय स्वच्छ, दयाळू आणि इतरांबद्दल कणव असलेला मोठा, एका नाणाक्ष... आपलं, चाणाक्ष युक्तीने सत्याची बाजू घेणे भाग पाडत असे आणि सरळ वळणाच्या दोघां हातून नकळत पुण्य घडत असे.

अशाच एका धाडसी पुण्यकर्माच्या वेळी दोहोंच्या हातून एका इमानदार पुलीसवाल्याचे प्राण वाचले आणि त्या पुलीसवाल्याने याची चांगलीच याद राखली. इमानदार लोक जनरली असतात तसा हा पुलीसवाला शूरवीर आणि कर्तव्यदक्ष देखील असल्याने त्याने एका डाकूला स्वत:च्या हाताने पकडून शिक्षा देण्यासाठी जे जंग जंग पछाडले त्यामुळे एका रसिक मनाच्या, नाचगाण्याचा नवाबी शौक असलेल्या पण आपल्या डाकूगीरीत अत्यंत गब्बर असलेल्या या उलट्या काळजाच्या नराधमाचे शत्रुत्व ओढवून घेतले. परिणामी जेलमधून पळून गेलेल्या डाकूने गावाकडे, गावापासून तुटलेल्या ऊंच गढीवर, रहाणाऱ्या पुलीसवाल्याच्या संपूर्ण कुटुंबाचा बळी घेतला, देवदर्शनाला गेलेली छोटी बहु तेवढी वाचली. रामा, शिवा, गोविंदा...! नवपरिणीत बहूचे अकाली वैधव्य आणि निष्ठावान सेवक रामलाल यांच्यावर कोसळलेल्या दु:खाच्या संकटाने वेडापिसा झालेल्या सूड भावनेने पेटलेल्या पुलीसवाल्याने थेट डाकूचा तळ गाठला आणि क्रूरकर्मा असण्याबरोबरच अत्यंत कुटील असणाऱ्या डाकूने जन्मभर पुरेल अशी शिक्षा म्हणून पुलीसवाल्याचे बाहूच छाटून टाकले.

आता विनाबाहू, विधवा बहू आणि रामलाल यांच्यासह आयुष्य कंठणारा पुलीसवाल्याचा आत्मा एकाच विचाराने तडफडतो आहे... आपल्या स्वत:च्या, तळाला खिळे लावलेल्या बुटांच्या, पायांनी त्या डाकूचा खात्मा! पण हे करण्यासाठी त्याला सोशिक बहू आणि वृद्ध, थकलेला रामलाल यांचा उपयोग नाही. म्हणूनच त्याने याद राखलेल्या त्या सालस पण धाडसी आणि सुस्वभावी पण गुन्हेगारीस मजबूर जोडगोळीची एकाच पास्ट परफॉरमन्सच्या आधारे परस्पर रिक्रूटमेंट करून टाकली. गावात दाखल झालेल्या या दोघांनी खरेतर पुलीसवाल्याने केलेल्या एका गल्तीच्या भांडवलावर पहिल्याच रात्री तिजोरीवर डल्ला मारून कथा संपवली असती, पण नाही! त्यांचे मुळचे सुस्वभावीपण छोट्या बहूच्या सो-शिक रूपाने समोर उभे ठाकले आणि कथा लांबली. दोन बाहुबालींच्या द्वंद्वास सुरवात झाली तीच मुळी प्रादेशिक भाषेतील सुपरस्टारच्या राष्ट्रीय स्तरावरील गेस्ट ऐपीअरन्समधल्या बेमौत मौतीने. शक्तीप्रदर्शनाच्या जीवघेण्या खेळात हकनाक बळी जाणाऱ्या निष्पाप कोकरांच्या अंध पालकांचे हृदय पिळवटून टाकणारे शल्य म्हणजे ‘इतना सन्नाटा क्यूं है भाई...’!

सुडाने पेटलेल्या दिशाहीन प्रवासात परस्परांवर कुरघोडी करण्याच्या वर्चस्वस्पर्धेत कुणाच्या हाती काय लागले हा यक्षप्रश्न! तरुण, सोशिक, शालीन कुलीन विधवा बहुचे पुनर्वसन करून तिचा उद्धार करू पाहणाऱ्या उमद्या तरुणाने खिंड लढवतांना जीव गमावून काय साधले? उरलेला दुसरा गुलछबू बेपर्वा तरुण, ज्या मित्रासोबत याच गावात खेतीबाडी करत सुखाने संसार करण्याची आणि मित्राला ‘आया’चे काम देण्याची स्वप्ने बघितली त्या मित्राशिवाय, पाण्याच्या टाकीवर चढून मिळवलेल्या, बायकोबरोबर सुखाने संसार करू शकेल? सेन्सॉरच्या आक्षेपामुळे आणि ऐनवेळी टपकलेल्या पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे डाकूचा पायाने खात्मा करण्याचे स्वप्न बघणारा पुलीसवाला, त्या क्रूरकर्म्याला जीवंत सोडावे लागल्याने, त्याला पुन्हा पळून जाण्याची संधी मिळाली तर तो काय करेल या विवंचनेत उरलेले आयुष्य कसे काढेल? आणि रहीमचाचाच्या हृदयाला घरे पाडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर कोण, कधी आणि कसे देणार... हे उपप्रश्न!

अगदीच गांभीर्याचा ओव्हरडोस नको म्हणून कथानकात ‘सुरमा भोपाली’पासून, ‘हरिराम न्हाई’, जेलर, बसंतीकी मौसी, अशी घटकाभर मनोरंजन करणारी पात्रही होती... आहेत! या साऱ्यांना फुटेज त्या मानाने कमी असले तरी यांच्या उपस्थितीने मनोरंजनाचे वेटेज नक्कीच वाढले... वाढते! तर ही झाली ग्रेटेस्ट स्टोरी एव्हर टोल्ड... शोले – हिंदी चित्रपटसृष्टीतला सगळ्यात यशस्वी सिनेमा... जो हजार वेळा बघितल्याचे छातीठोकपणे सांगणारे नरपुंगव या भूमीत आहेत. त्याचं काय...?

आज हे सार आठवण्याचं आणि हजार वेळा बघितलेल्या शिणेमाची गोष्ट दहा हजाराव्यांदा सांगण्याचं कारण म्हणजे गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात चाललेल्या सत्ताहरण वगनाट्याचे प्रयोग आणि त्या निमित्ते रोज वर्तमानपत्रातून कोसळणारे मथळे आणि दूरदर्शनवर कोकलणारे वार्ता-हर! हर हर... 

म्हणजे गोष्ट तशी छोटीच आहे... होती! पण या ‘ग्रेटेस्ट स्टोरी एव्हर टोल्ड’ची ही ‘लॉंगेस्ट स्टोरी नेव्हर अनफोल्ड’ आवृत्ती... त्याबद्दल आम्ही काहीच म्हणणार नाही... की बुवा आम्हाला, म्हणजे जनतेला, उगाचच इमामसाहब झाल्यासारखे वाटतेय आणि कुणालातरी ठाकूर झाल्यासारखे वाटते आहे... म्हणजे बुवा गोष्ट तर संपली पण नेमकी आपली हार झाली का जीत? आता आमची भूमिका तर आम्ही सांगितली (आणि चांगली वठवली देखील!), इतर भूमिका आणि पात्रे ज्याने त्याने आपापल्या प्रज्ञेनुसार समजून घ्यावी...

हो म्हणजे, तुमचा ‘जय’ आमच्या लेखी ‘विरू’ असायचा, आम्ही जिला अखंड बडबडणारी ‘बसंती’ समजलो ती तुमचा ‘पुरे पचास हजार...’ एवढा एकच डॉयलॉग असणारा सांबा असला, ज्याला आम्ही ‘कालीया’ म्हणायचो तो तुमचा ‘धोलीया’ निघायचा आणि ज्याला आम्ही सगळ्यांचे 'हात' बांधणारा (की छाटणारा?) ‘गब्बर’ म्हणायचो तो तुमचा स्वत:चेच 'हात' गमावून बसलेला ‘ठाकूर’ असला म्हणजे? झाली का पंचाईत... म्हणून ज्याचं त्यानी पाहून घ्यावं, उगाच ‘हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है...!’ काय?
-------------------
बाळासाहेबांच्या पुण्य स्मृतीस सादर समर्पित...!

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१९

तुझिया जातीचा..



महाराष्ट्राचाविनोदआज शंभर वर्षांचा झाला. यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती नाही; श्लेष, वक्रोक्ती किंवा दर्पोक्ती तर दूरची बात. अशोक कुमारने भारताला विनासंकोच (आणि विनाकारण!) सिगारेट ओढायला शिकवले, दिलीपकुमारने संयत अभिनय म्हजे काय हे दाखवले (हं, आता त्याचं अश्राव्य बोलणं समजून घ्यायला सगळे प्राण कानात गोळा करायला लागायचे तो गोष्ट वेगळी!), राज-देव-शम्मी-राजेश यांनी रोमान्सची पायाभरणी केली (आणि चॉकलेट कुमारांचा मार्ग सुकर केला!). अमिताभने तरुणांना न्यायाविरुद्ध पेटून उठायला शिकवले (त्याच्या पुढच्या तीन पिढ्या थकल्या तरी तो अजूनही ऐन्ग्री यंग मैनच्या रुबाबात आपले स्थान राखून आहे!). लतादीदींनी आम्हाला गाणे ऐकायला, आशाताई आणि किशोरदाने ते गुणगुणायला आणि सचिनने क्रिकेट पहायला शिकवले.

आमच्यावरील हे सगळे संस्कार मान्य केले तर पुल नावाच्या गारुडाने आम्हाला निखळ, निरागस आणि निष्कपट हसायला शिकवले हे वरील सर्वाला पुरून उरणारे शत प्रतिशत सत्य! म्हणजे पुलंच्या आधी महाराष्ट्र हसतच नव्हता असे नाही. अगदी बाळकराम गोविंदाग्रज गडकऱ्यांपासून चिविं जोशी ते आचार्यांपर्यंत ‘विनोदी’ साहित्य महाराष्ट्राने बघितले, वाचले होतेच. पण, मुळातच धीर-गंभीर, नेमस्त आणि पंतोजींच्या शिस्तीत आणि वडिलांच्या धाकात वाढलेल्या मराठी घरावर, स्वातंत्र्याच्या काही दशकांपर्यंत प्रात:स्मरणीय श्रीराम, ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी महाराज आणि बलोपासक समर्थ रामदासस्वामी यांची चरित्रे आणि साने गुरुजींच्या बाळबोध कथा यांच्या संस्काराने, आदर्श व्यक्तिमत्व घडवतांना उद्दात ध्येय बाळगण्याचा जो प्रघात पडला त्याला विनोदाचे (आणि आणखीन बऱ्याच गोष्टींचे!) नाही म्हटले तरी थोडेसे वावडेच होते. दासबोधात खुद्द समर्थांनीच विनोदाची ‘टवाळा आवडे विनोद...’ अशी संभावना (कि निर्भत्सना?) करून ठेवली असल्याने विनोद हा काव्य-शास्त्र-विनोदाचा अविभाज्य भाग असला तरी जनसामान्यांना त्याचा सहज लाभ होणे जिथे दुष्कर होते तिथे पुलंनी ती वाट नुसती मोकळीच नाही तर वाहती करून दिली आणि त्यांच्यानंतरही खळाळती राहील याची सोय करून ठेवली.

राम गणेशांचा आणि चिविंचा बाळबोध विनोद हा अत्यंत मर्यादाशील, सोज्वळ, सात्विक आणि कुलीन होता तर त्याच्या बरोब्बर विरुद्ध अत्र्यांचा विनोद हा इरसाल, धसमुसळा आणि हुकुमी होता. या दोन्ही प्रकारांनी महाराष्ट्राला भुरळ घातली या बद्दल शंकाच नाही. तरी विनोद आपला वाटावा इथवर प्रगती होण्यास महाराष्ट्रास ८ नोव्हेंबर १९१९ या दिवसाची वाट बघावी लागली. लक्ष्मणराव देशपांड्यांच्या घरात जन्मलेल्या कुलदीपकाने वयाच्या पाचव्या वर्षी, आजोबांनी लिहून दिलेले १५-२० ओळींचे भाषण हावभावासहीत खणखणीत आवाजात शाळेत म्हणून दाखवून आपले पुरुषोत्तम नाव सार्थ असल्याचे सिद्ध केले आणि महाराष्ट्राच्या हातावर मनोरंजनाची एक नवीन ठसठशीत रेषा उमटली!

मुंबईला इतर कोणत्याही ‘भाई’ची ओळख होण्यापूर्वी, ‘बंबईका डॉन कौन...?’ असले उद्दाम प्रश्न न विचारता आणि ‘मनोरंजन करण्याची कला’ एवढ्या एकमेव हत्याराच्या जोरावर फक्त मुंबईच नाही तर अवघ्या मराठी प्रजेवर राज्य केल ते पुलं नावाच्या जन्मजात भाईने! मुलांचे मनोरंजन करणाऱ्याचे नाते प्रभुशी जडेल असा आशावाद बाळगणाऱ्या साने गुरुजींनी, सकल मानवतेचे सर्व प्रकारे मनोरंजन करणे हे आपले जन्मसिद्ध, एकमेव आणि स्वीकृत कर्तव्य आहे इतकेच नव्हे तर तीच आपल्या आत्म्याच्या देहधारणेची इतिकर्तव्यता आहे अशा विश्वासाने लोकांना रिझविण्यासाठी एकामागेएक कार्यक्रमांची पुरचुंडी सोडून आपला खेळ मांडणाऱ्या या विदूषकाचे कुणाकुणाशी काय आणि कसे नाते जडले असेल त्याची मोजदाद विश्व्वेश्वरालाही अशक्य!

एक माणूस एका आयुष्यात जेवढ्या म्हणून अभिजात गोष्टी करू शकतो आणि ज्या ज्या म्हणून भूमिका निभावू शकतो त्या साऱ्या तर पुलंनी निभावल्याच आणि त्या साऱ्याबद्दल अनेकांनी अनेक वेळा, अनेक प्रसंगी अनेक ठिकाणी सांगितले, लिहिले देखील आहे. आजच्या दिवशी तर सर्वच माध्यमांवर पुलंबद्दल इतके काही बघायला, ऐकायला, वाचायला मिळेल की पुलंची स्वत:ची समग्र साहित्यसंपदाही बहुदा त्यापुढे तोकडी पडेल... पण हेच ते श्रेयस जे कमवावे लागते. त्यासाठी कधी 'गुळाचा गणपती' होऊन 'बटाट्याच्या चाळी'त वास्तव्य करावे लागते तर कधी ब्लॉकमध्ये शिफ्ट झालेल्या असा मी असामी'च्या माध्यमातून 'खेळीया' होऊन 'विदूषका'चे सोंग रंगवावे लागते...

मला स्वत:ला पुलंचा एक अतिशय भावलेला किस्सा सांगून पुलंच्या जन्मशताब्दी समारोप दिनाचे औचित्य साधतो. किस्सा अर्थातच पुण्यातला आहे. पुलंनी भलेही मोठ्या मनाने महाराष्ट्राच्या जनतेला विचारले असेल, ‘तुम्हाला कोण व्हायचे आहे, मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?’ पण त्यांचे पुण्यावर ‘विशेष’ प्रेम होते हे, ‘मी राहतो पुण्यात, विद्वत्तेच्या ठाण्यात...’ या त्यांच्या परखड ‘अभिव्यक्ती’तून चांगलेच व्यक्त होते! तर किस्सा असा...

एक रिक्षा डेक्कन जिमखान्यावरील एका बंगल्यापाशी थांबली. रिक्षातून वयाने प्रौढ, शरीराने गुटगुटीत हसऱ्या बाळचेहऱ्याची एक व्यक्ती उतरली आणि म्हणाली, ‘किती झाले?’ रिक्षावाला म्हणाला, ‘पावणेतीन रुपये.’ गोंडस छबीने  तीन रुपये दिले आणि चार आणे परत येण्याची वाट पाहिली. कालत्रयी न बदलणारा रिक्षावाला नेहमीच्या सहजभावाने म्हणाला, ‘सुटे नाहीत.’ ‘अरे, इतक्या वेळेपासून रिक्षा चालवताय, जमली असेल कि चिल्लर, बघा जरा.’ ‘ओ साहेब, असेल तर द्यायला आम्हाला काय दुखतय होय? नाही म्हटलं तर सोडा जाऊ द्या की! कुठ चाराण्यात जीव अडकवताय?’ ‘हे बघा तुमच्याकडे खरंच नसतील तर सांगा. दोन मिनिटे थांबा मी वरून सुटे पावणेतीन रुपये घेऊन येतो.’

रिक्षावाला ‘काय पण येडचाप कद्रू आहे...!’ अशा भावनेने बघतच राहिला. ‘माझे तीन रुपये...!’ भानावर येत रिक्षावाल्याने तीन रुपये परत केले आणि सद्गृहस्थ दोन जिने चढून वर गेले, पाच मिनिटाने धापा टाकत परतले आणि रिक्षावाल्याच्या हातावर सुटे २ रुपये ७५ नये पैसे ठेवले. कपाळाला हात मारून रिक्षावाला आपली नेहमीची मन:शांतीची स्तोत्रे पुटपुटत रिक्षा फिरवून निघाला आणि दुसऱ्या प्रवाशाने त्याला हात केला, ‘स्टेशनला येणार का?’ मगाच्या गिऱ्हाईकाने मुडाफ केला तर लांबचं गिऱ्हाईक भेटलं या आनंदात रिक्षावाल्याने मिटर टाकला आणि आपली टकळी सुरु केली. ‘काय राव, इमानदारीचा जमानाच राहिला नाही बघा!’ ‘का? काय झालं?’ ‘बघा ना एवढं घराच्या दरवाजात सोडलं, जिमखान्यावर बंगल्यात राहतात तरी चाराणे सुटं ना बघा या चिंगूस मक्खीचूस माणसाकडून!’

‘ते गृहस्थ कोण आहेत कल्पना आहे का तुम्हाला?’
‘नाही बुवा. का, तुम्ही ओळखता का त्यांना?’
‘बाबा रे अख्खा महाराष्ट्र ओळखतो त्या माणसाला. नुसता ओळखत नाही तर जीव ओवाळून टाकतो त्यांच्यावरून!’
‘असं! का बर? काय करतात म्हणायचे ते साहेब?’
‘ते लिहितात, नाटक-सिनेमा करतात, मनोरंजनाचे कार्यक्रम करून लोकांना हसवतात, दु:ख विसरायला लावतात.’
‘काय सांगताय? मग एवढ मोठा माणूस मला चाराणे का सोड ना?’
‘कारण ते तुझे नव्हते! तुझ्या हक्काचे नव्हते. असेच पैसे साठवून ते शाळा-महाविद्यालये-वाचनालये-इस्पितळे यांना देणग्या देतात जेणे करून ज्यांची पैसे खर्च करण्याची ऐपत नाही त्यांचे शिक्षणावाचून, इलाजावाचून अडू नये, काय समजलास?’

स्टेशनवर या गिऱ्हाईकाला सोडतांना किती पैसे झालें, किती घेतले आणि किती परत दिले रिक्षावाल्याला काही समजलं नाही कारण त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता गेल्याच आठवड्यात इस्पितळात त्याच्या आईचा विनाखर्च झालेला उपचार आणि राहून राहून आठवत होता त्या लहान मुलासारख्या निरागस चेहऱ्यावरचा निर्मम भाव!

[श्री. राजा गोसावी यांनी एकदा अनौपचारिक गप्पात सुहृदांना सांगितलेला पुलंचा एक किस्सा]

तर पुन्हा एकदा पुलंना त्रिवार वंदन करून ‘...तुझिया जातीचा मिळो आम्हां कोणी...’ एवढीच प्रार्थना!

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

शनिवार...!

काही चालत आले,
काही चालवत आले
काही खुरडत आले,
काही रखडत आले.

काही उत्साहाने आले,
काही निराशेने आले...
काही मुखवटा घालून आले,
काही मुखवटा उतरवून आले.

काही वॉकिंग शुजवाले आले...
काही वॉकिंग स्टिकवाले आले.
काही मॉर्निंग वॉकवाले आले,
काही इव्हिनिंग टॉकवाले आले.

काही कडक कॉलरवाले आले...
काही विदेशी डॉलरवाले आले.
काही अपात्री संपन्न होऊन आले,
काही अभागी वैफल्य घेऊन आले.

काही सेन्ट्रल लॉकिंगवाले आले,
काही ब्रिस्क वॉकिंगवाले आले. 
काही  हेल्दी जॉगिंगवाले आले, 
काही शार्प ब्लॉगिंगवाले आले.

काही वाकण्यातही ताठर आले,
काही मागण्यातही मुजोर आले.
काही सर्वस्व गमावून दीन आले,
काही पुत्रपौत्रांनी केले हीन आले.     

काही पेन्शनवाले बुधली घेऊन आले,
काही पॅकेजवाले चलनी घेऊन आले.
काही तरूण वार्धक्य लेऊन आले,
काही वृद्ध तरूण होऊन आले...!

काही वेतनआयोगवाले दांभिक आले,
काही विवेक-त्यागवाले सांघिक आले.
काही मागण्यास थेट गाभाऱ्यात गेले,
काही पायरी ओळखून याचक झाले...!

मारुती रुईने सजला आणि तेलाने माखवला,
‘सप्ताहाची बेगमी झाली’, जो तो सुखावला...  
ब्रह्मांडाएवढा वज्रहनुमान, त्याचाही श्वास दाटला
म्हणे, ‘मंद्रादिसारखा द्रोणूही याहून हलका वाटला’!

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

निर्वात...!


गाढ स्नेह असला, तरी कधी येतात असे क्षण
दोघांच्याही मनांमध्ये दाटून येते एकटेपण...!

व्यक्तित्वाचा मूढ मुखवटा त्याच्यामागे विराट पोकळी
गर्द राने : एकाकी वाटा : चांदण्यात न्हालेली तळी...!

तोंड फिरवून बसते आभाळ, बंद होतात दिशा दाही
एकामेकांत शिरायला रस्ताच मुळी सापडत नाही...!

शब्द सारे होतात मुके, उग्र नकारांकित मन...
ओळखीच्या पोटातली ही अनोळख किती विलक्षण!

आत्म्यांच्या अलौकिक जवळिकीलाही सीमा असतात
कधी नुसते देहावरचेच खाच, खड्डे, डाग दिसतात...!

अशा वेळी करशील काय? सोडून देशील हातचा हात?
अशरणतेने रडशील, की अभिमानाने असशील ताठ?

उंच कडा मागे उभा... पुढे अथांग दरी भयाण...
स्नेहशून्य निर्वातात सावरशील? झोकशील प्राण?

- शांता शेळके

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

न्याय...!



जंगलालाही सहकाराची बाधा झाल्याने एकदा सिंह, कोल्हा आणि गाढव यांनी एकत्र शिकार करून शाही मेजवानीचा बेत आखला. शिकार करून मेजवानीसाठीचे जिन्नस तयार झाल्यावर सिंहाने गाढवाला त्यांचे भाग करून तिघात वाटणी करायला सांगितले.

बोलूनचालून गाढवच असल्याने समानतेच्या खुळचट कल्पनांनी गाढवाने त्या ढिगाचे तीन समसमान वाटे केले. हे सिंह महाराजांना मुळीच रुचले नाही व आपल्या इभ्रतीस कमीपणा आणणाऱ्या गाढवाचा राग येऊन त्यांनी त्याच्यावर झडप घालून त्याचीही शिकार केली.

आता नव्याने वाढलेल्या शिकारीच्या ढिगाची वाटणी करण्याचे काम त्यांनी कोल्ह्यावर सोपवले. धूर्तपणा आणि चलाखी स्वभावत:च असलेल्या कोल्ह्याने हुशारीने मोठ्ठाच्यामोठ्ठा ढीग सिंह महाराजांपुढे सरकवून आपल्यासाठी अगदीच किरकोळ वाटा घेतला आणि तो विनयाने सिंह महाराजांना म्हणाला,
‘झाली वाटणी!’
कोल्ह्याच्या चतुराईने खूष झालेल्या सिंह महाराजांनी आपल्या हिश्शातील आणखी काही तुकडे उदार मनाने कोल्ह्यापुढे भिरकावीत त्याला विचारले,
‘काय रे, तुला इतकी समुचित वाटणी करायला कुणी शिकवले?’

स्थितप्रज्ञ संताचे भाव चेहऱ्यावर आणून कोल्हा उत्तरला,

-------------------------------------------------------------------------------------------------------------
१९९२ साली भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या राजा राजवाडे लिखित ‘गोष्टी: माणसांच्या आणि प्राण्यांच्या’ या मुलांसाठीच्या गोष्टीतील ही एक संपूर्ण काल्पनिक गोष्ट तथा बोधकथा असून ती इथे अप्रस्तुत तथा सर्वस्वी दुर्बोध वाटल्यास किंवा तिचा, तिच्यातील पात्रांचा, घटनांचा आणि तात्पर्याचा कुठल्याही जीवित वा मृत व्यक्ती, संस्था, यंत्रणा अथवा परिसंस्थांशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तरीदेखील एक निरीक्षण या निमित्ताने नोंदवावेसे वाटते – मेजवानी म्हणून ‘विकास’ मिळणार असेल तर ‘शिकार’ अपरिहार्य ठरते आणि ‘शिकार’ ही शांत डोक्याने आणि थंड रक्ताने केलेली कत्तलच असते... मग ती ‘गाढव’ नावाच्या विवेकाची असो किंवा ‘झाड’ नावाच्या एका परिपूर्ण परिसंस्थेची! शिवाय एक जुनी जाणती शहाणीव सांगते - म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, काळ सोकावतो! 
-------------------------------------------------------------------------------------------------------------

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९

महाकवी...!



"ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे,
माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे...!"

महाराष्ट्राचा वाल्मिकी
शारदापुत्र महाकवी
गदिमांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त
शत शत प्रणाम!

महाराष्ट्र यावच्चंद्रदिवाकरौ
आपला ऋणी राहिल...!

रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

नवरस, नवरंग, नव रूपे...


या देवी सर्वभूतेषु आदि-रूपेण संस्थिता II 
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी-रूपेण संस्थिता II 
या देवी सर्वभूतेषु चैतन्य-रूपेण संस्थिता II

या देवी सर्वभूतेषु शक्ती-रूपेण संस्थिता II
या देवी सर्वभूतेषु भक्ती-रूपेण संस्थिता II
या देवी सर्वभूतेषु बुद्धी-रूपेण संस्थिता II

या देवी सर्वभूतेषु सृष्टी-रूपेण संस्थिता II
या देवी सर्वभूतेषु मातृ-रूपेण संस्थिता II
या देवी सर्वभूतेषु दया-रूपेण संस्थिता II

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः II 

शैलपुत्री-ब्रह्मचारिणी-चंद्रघंटा 
कूष्माण्डा-स्कंदमाता-कात्यायनी 
कालरात्रि-महागौरी-सिद्धिदात्री 

नवरस, नवरंग, नव रूपे तुझी... 
आदिशक्ती-आदिमाया-दुर्गा-गौरी 
स्वागतास तुझ्या सजली नवरात्री! 

शारदीय नवरात्राचा शुभारंभ – घटस्थापनेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

प्रिय लतादीदी...



प्रिय लतादीदी,

अवघ्या मानवी भावविश्वाला व्यापून उरलेल्या स्त्रीचा बुलंद पण लाघवी आवाज असलेल्या आपल्या स्वरप्रतीभेला शत शत प्रणाम! आपला पडद्यामागून येणारा आवाज नसता तर स्नेहल-सोज्वळ नूतन, खट्याळ-चुलबुली मधुबाला, धीरगंभीर मीनाकुमारी, नृत्यनिपुण वैजयंतीमाला आणि वहिदा पासून शर्मिला टागोर, हेमामालिनी, शबाना, स्मिता ते अगदी श्रीदेवी, माधुरी, जुही आणि काजोल या रुपेरी पडद्याच्या सर्व झगमगत्या तारका त्यांच्या सर्व गुणवैशिष्ट्यांसह देखील अपुऱ्या राहिल्या असत्या. जगभरात हिंदी सिनेमाची ओळख आहे ती, इतर कुठल्याच सिनेमांमध्ये न आढळणाऱ्या, गाण्यांमुळे आणि भारतीय चित्रपटातील गाण्यांचा मानबिंदू आहे... लता मंगेशकर!

षड्जं व‍दति मयूर: पुन: स्‍वरमृषभं चातको ब्रूते
गांधाराख्‍यं छागोनिगदति च मध्‍यमं क्रौञ्च ।।
गदति पंचममंचितवाक् पिको रटति धैक्‍तमुन्मदर्दुर:
शृणिसमाहतमस्‍तक कुंजरो गदति नासिक या, स्‍वरमंतिमम् ।।

संगीत दर्पणमधील या श्लोकात षडज ते निषाद या सप्तसुरांचा संबंध जसा मोरापासून हत्तीपर्यंत पशुपाक्षांशी जोडला आहे तद्वतच आपला आवाज रुपेरी पडद्यावरील बहुदा सर्वच अभिनेत्रींच्या चेहऱ्याला लाभला आहे. परमेश्वरानंतर चराचरात भरून काही शिल्लक असेल तर तो, गंधर्व किन्नरांना हेवा वाटावा असा, आपला साक्षात ईश्वरस्वरूप दैवी आवाज!

केशवसुतांनी ‘आम्ही कोण?’ याचे रसभरीत वर्णन करतांना म्हटलेले,

आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे!   

या ओळी आज कुणाचे चपखल वर्णन करीत असतील तर ते आपले... खरंच लतादीदी तुम्हाला वगळले तर तो सप्ततारांकित रुपेरी पडदा अक्षरश: क्षणार्धात गतप्रभ होईल, आपली प्रभा गमावून बसेल आणि कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारा सिनेमा आपल्या आवाजाशिवाय कवडीमोल होईल यात तिळमात्र शंका नाही. आपण केवळ हिंदी सिनेमालाच नाही तर या सृष्टीला जे दिले आहे ते ‘नक्षत्रांचे देणे’च आहे! तेवढे पुरेसे नाही म्हणून की काय, ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले...’ या भावाला मूर्त स्वरूप देणारे आणि आपण आपल्या वडिलांचे, समाजाचे ऋण फेडण्यास तत्पर आहात याची साक्ष देत, कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या ‘जीवघेण्या’ स्पर्धेला पुरून उरत दिमाखात उभे आहे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर शुश्रुषालय!

प्रतिभेचे धनी असू शकतील, दैवी गुणांची पखरण झालेले देखील काही सापडतील, स्वत:च्या अंगभूत कौशल्याला नित्य सरावाने पैलू पाडून नावाजलेल्यांची संख्या देखील कमी नाही पण हे सारे महानुभाव ज्या एकाच नावाचे निस्सीम भक्त आहेत आणि ज्या नावाने आपला बहुमान व्हावा म्हणून पुरस्कार आणि विक्रम देखील आतुर असतात ते एकच नाव या आसमंताला व्यापून उरते आणि ते म्हणजे... लता मंगेशकर!

गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी, विश्वमोहिनी...
लतादीदींना ९० व्या वाढदिवसाच्या स्नेहादरपूर्वक शुभेच्छा आणि
निरामय शतकोत्तर जीवनासाठी कोटी कोटी शुभकामना...!

लतादीदींच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त, वर उल्लेख केलेल्या अभिनेत्रींच्या यादीत जिच्या नावाचा उल्लेख राहून गेला त्या डिंपल कपाडियाच्या भावविभोर अभिनयाने सजलेले, लतादीदींनी स्वरसाज चढविलेले माझे सर्वात आवडते गीत... ‘दिल हूम हूम करे...’

रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

"आई"...!

https://www.facebook.com/tejashripradhan02/videos/390750654920578/?t=53

मुळात दूरदर्शनशी आमचा संबंध महिन्याचा महिन्याला रिचार्ज करण्यापुरता येत असल्याने त्यावरील, दिव्यदृष्टी लाभलेल्या स्वघोषित विद्वानांना ज्यात काव्य (आमचे व्हर्जन: रडगाणे) शास्त्र (आ.व्ह.: कुटील नीती) आणि विनोद (हा मात्र खरेच!) सापडतो अशा, रोज बघण्याची सक्ती असणाऱ्या तर्कदुष्ट, बेगडी आणि पसरट मालिका, टीआरपीच्या गणिताने सजविलेल्या वृत्तवाहिन्या आणि नावातच अंतर्विरोध ठासून भरलेले रिऐलिटी शोज (सत्याचा दिखावा?) बघण्याचा दुरान्वयानेही संबंध (लिहिण्याच्या ओघात योगम्हणणार होतो, त्याचा भोगझाला असता!) येत नाही. तथापि, आम्ही आयुष्यात इतर काही उल्लेखनीय, नेत्रदीपक तथा भूषणावह साधले नसले तरी, ‘जे जे आपणासी भावे, ते ते स्वजनांशी शेअर करावेअशा सक्तीभावाने भारलेले आणि ‘आला मेसेज की ढकल पुढे’चा सोशल वसा घेतलेले नेटकरी (हे स्वीकृत समाजकार्य ते लोक अतिशय ‘नेट’ लावून करतात म्हणून?) स्नेही खूपच जमवले असल्याने त्यांच्याकडून नित्यनेमाने प्रबोधन होत असते आणि कधी काही खरोखरच मौलिक हाती लागते. मालिकेतून मौलिक हे खरे तर अलौकिक! ते एक असो.

तर मुद्दा असा की अशाच आमच्या एका शुभचिंतक स्नेह्यांनी, चव-बदल म्हणून की काय, एरवीच्या प्रच्छन्न प्रबोधनात्मक प्रवचनाऐवजी हा एका मराठी मालिकेतील मौलिक प्रसंग (म्हणजे त्याची थोबाडपुस्तकावरील लिंक!) धाडला आणि त्या निमित्ते तेजश्री प्रधानला बघण्याचा योग (इथे चपखल!) आला. मराठी मालिकेकडून कसल्याच अपेक्षा(?) नसल्याने त्या माध्यमातून इतके काही विचक्षण मिळेल हा अतिशय सुखद (सांस्कृतिक?) धक्का होता!

मानवी संस्कृतीच्या इतिहासात पुरुषी मानसिकतेने (यात अनेक, किंबहुना बहुतांश, महिलाही आल्या) स्त्रीला कायमच गृहीत धरले आणि कुटुंबव्यवस्थेने ‘गृहिणी’ला हाउसवाईफ अशा नामाधीनाने मिडवाईफच्या रांगेत नेऊन ठेवले. आधुनिकतेची पुटं चढल्यावर, ‘आपण प्रोग्रेसिव्ह आहोत’ हे सिद्ध करणाऱ्या सोफेस्टीकेटेड प्रोफेशनल पुरुषाने घरातल्या ‘ति’चे प्रमोशन करून तिची हाउसवाईफ वरून ‘होममेकर’ अशी बढती केली. याने तिला समाजात मिरविण्याचा त्याचा आत्मसन्मान कदाचित सुखावत असेलही पण चार भिंतीत चिणले जाण्याच्या अना(र)कलनीय भोगाने ती दुखावत असेल हे लक्षात कोण घेतो... म्हणूनच अरुण कोलटकर त्यांच्या ‘वामांगी’मध्ये ‘आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांचं एकटेपण’ हे स्त्रीत्वाच विदारक वास्तव रख्मायच्या काळजाला भिडणाऱ्या विषादाने मांडतात!

या संदर्भात सहज आठवले म्हणून – आमच्या एका अत्यंत उच्चविद्याविभूषित आणि लब्ध-प्रतिष्ठित परिचिताने स्वत:च्या अर्धांगिनीचा चार-चौघात, ‘या घरातल्या बायकांना ना कशातलं काही कळत नाही...’ असा उद्धार केला होता. आता तो त्याच्या येनकेनप्रकारेण माया जमविणाऱ्या साठेबाज क्लाएंटचे (हो, त्यांना गिऱ्हाईक नाही म्हणत काही, ते साऱ्यांचे सर्वप्रकारे गिऱ्हाईक करत असले तरी!) बॅलंस-‘शीट’ सांभाळण्यात गुंतला होता तेव्हा याच त्याच्या कुलदीपकांच्या माऊलीने, त्याच्या भाषेत – घरातल्या बायकोने, त्याच्या संसाराच्या गणितात भर घातली नसती तर त्याच्या नातेसंबंधांच्या बॅलंसशीटमध्ये मोठ्ठा डिफीसिट आला असता याची टॅली त्याला शेवटपर्यंत लागली नाही. तेही एक असो.       

...आणि मुलांसाठी ‘आई’ म्हणजे तर घरात आल्यावर, कीहोल्डर पासून टीव्ही रिमोट पर्यंत सगळ्या हाताशी लागणाऱ्या वस्तूंबरोबर, सवयीने गृहीत धरायची गोष्ट!  ऐलेक्सा, गुगल मिनी किंवा तत्सम एको डिव्हाईसेसचा शोध लावण्याची प्रौढी मिरविणाऱ्या तंत्रज्ञानी अमेरिकी कंपन्यांना, आम्ही भारतीयांनी हा शोध लावून युगे लोटली याचा पत्ताच नाही. फक्त आम्ही तिला अशा फॅन्सी नावांनी न ओळखता, आमच्या अभिजात, दैदिप्यमान आणि सोशिक संस्कृतीला शोभेल अशा सात्विक, सालस आणि शालीन नावाने बोलवतो – “आई!” ती एक जिवंत सजीव आहे आणि तिच्या बुद्धीसह साऱ्याच संवेदना आपल्यापेक्षा हजारपटीने तीव्र आहेत कारण ती आपली केवळ जन्मदात्री नाही तर पालनकर्ती आहे याचे भान असायला तीन महत्वाच्या जाणीवा जागृत असाव्या लागतात – संवाद, सौहार्द्र आणि संवेदना! अभिजात प्रज्ञेची जागा कृत्रिम बुद्धिमत्तेने घेतल्यापासून या तीघी हरवल्यासारख्या झाल्या आहेत आणि त्यांची जागा महत्वाकांक्षा, दिखावा आणि अनास्था यांनी बळकावली आहे.

तर घराघरात आढळणाऱ्या अशा अनेक बबड्यांचे डोळे उघडण्यासाठी हा तेज(काहीही हं... श्री!) तडका चांगलाच होता. शिवाय मराठी मालिकांची लोकप्रियता बघता हा सामाजिक संदेश अगदी मना-मनात नाही तरी घरा-घरात पोहचायला हरकत नसावी. या निमित्ताने, ‘घरातल्या बायकां’ची संघटना वगैरे बांधून त्यांच्या ‘न्याय्य हक्कांसाठी लढा’ द्यायचा म्हटला तर त्यांचेच अनाठायी आणि बेसुमार ममत्व उफाळून त्याला पहिला विरोध करेल म्हणून दुसऱ्या पार्टीचेच समुपदेशन करावे या मिषाने हा लेखनप्रपंच!

खर तर ‘आई कुठे काय करते...?’ याच सणसणीत उत्तर १९८९ साली अशोक पाटोळे लिखित आणि दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित ‘आई रिटायर होतेय...’ मधून भक्ती बर्व्यांनी अतिशय मार्मिक पण करारी पद्धतीने दिले होते. ‘आई’ची ही भूमिका लोकप्रियही झाली होती हे त्या नाटकाच्या भक्तींनी केलेल्या ७५० आणि त्यांच्यानंतर स्मिता जयकरांनी केल्या १०० प्रयोगातून तसेच हिंदी व गुजराती रंगभूमीवर अनुक्रमे जया बच्चन आणि सरिता जोशी यांनी साकारलेल्या या नाटकाच्या रुपांतरीत प्रयोगातून सिद्ध होते.

पण मध्ये बराच काळ गेला... सुमारे तीस वर्षाचा. या काळात समाजात खूपच उलथापालथ झाली आणि उण्यापुऱ्या दोन पिढ्यांच्या या अवकाशात जणू कित्येक वर्षांची उत्क्रांती झाली. रंगभूमी आणि रुपेरी पडदा या दोन्हींची जागा घराघरातल्या छोट्याशा स्क्रीनने घेतली. मेंदू आणि हृदय या माणसाच्या दोन नियंत्रक अवयवांबरोबर मोबाईल हा तिसराच जीवनावश्यक घटक बनला आणि मेंदूच्या तर्कशुद्ध विचार करण्याच्या क्षमतांचे आणि हृदयाच्या मानवी संवेदनांचे नियंत्रण हा स्मार्ट डिव्हाईसच करू लागला. या स्मार्टफोनने सुरु होणाऱ्या आणि त्याला उशाशी घेऊनच संपणाऱ्या माणसाच्या दिवसात मानव्य शोधून तरी सापडेल की नाही याची शंका वाटू लागली. शिवाय कुठल्याही अनुभवात आनंद शोधण्यापेक्षा तो अनुभव या यंत्रात साठवण्याची आणि जगाला दाखवण्याची वृत्ती एवढी वाढीस लागली की ‘Hey there! I am using WhatsApp.’ ची जागा ‘I’m busy! WhatsApp is using me.’ ने केव्हा घेतली हे आत्मरत माणसाला समजलेही नाही. या सगळ्या आभासी जगातून माणसाला खडबडवून जागे करायला काही जागल्यांची समाजाला कायमच गरज असते. पूर्वी संत-महंत, दार्शनिक-विचारवंत हे काम करीत. अलीकडे अशा विभूती होतच नाहीत आणि ज्यांचा स्वत:बद्दल तसा भ्रम असतो त्याचं त्वरित निवडणुकीकरण होतं हा इतिहास ताजा आहे. ते आणखीन एक असो.

मुद्दा एवढाच की, तो तिकडे दूर मेझॉनच्या जंगलात पेटलेला वणवा असो, जी जागतिक आहे, स्थानिक आहे की राजकीय आहे याबद्दलच काय, मुळात ती आहे की नाही याबद्दलही मतभेद असणारी मंदी असो, लोकमान्यांच्या संकल्पनेला पूर्णपणे हरताळ फासून आपल्या आजूबाजूला ‘ढगाला लागली कळ...’च्या तालावर बीभत्सपणे थिरकणारा गणेश’भक्तां’चा उत्सवी (की उन्मादी?) हैदोस असो किंवा मनुष्यप्राण्यासह समस्त सृष्टीवर काळाच्या ओघात दूरगामी परिणाम करणारी लघुदृष्टी धोरणे असोत... यात आज ना उद्या बदल होईल, सुधारणा होईल, माणसाला खरेच जाग येऊन ‘...आणि माणसांचा दिवस सुरु झाला!’ असं म्हणण्याची संधी मिळेल... पण त्यासाठी वर सांगितलेल्या किमान तीन हरविलेल्या जाणिवांचा शोध घ्यावा लागेल. आणि सगळ्याच गोष्टी गुगलवर सापडत नसतात, माणसाने आजचे हे त्याचे स्वत:चे जग गुगलशिवायच घडवले आहे!

एका मराठी मालिकेतील एका प्रसंगाच्या निमित्ताने एवढे सामाजिक अभिसरण (बापरे!) होणे हेही नसे थोडके... अशा आणखी काही मालिका आल्या तर एखाददिवशी आईबरोबर अशी एखादी मालिका पाहून बघावी (की बघून पहावी?) म्हणतो... कसे?

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९

मेरा पता...!



"माझ्या घराचा क्रमांक खोडून टाकलाय मी आज...
आणि माझ्या गल्लीच्या तोंडावर लावलेली नावाची पाटीही काढून टाकलीय...
एवढेच नव्हे तर त्या रस्त्याचा दिशादर्शक फलकही पुसून टाकलाय...
पण तरीही तुम्हाला मला भेटायची अनिवार ओढ दाटलीच
तर प्रत्येक देशाच्या, प्रत्येक शहरातल्या, प्रत्येक गल्लीचे दार ठोठवा...
हा एक अभिशाप आहे तसेच एक वरदान ही,  
आणि जिथे कुठे मुक्तात्म्याची ओळख पटेल
- ध्यानी असू दे, तेच माझे घर आहे..."

“माझ्या साऱ्या रचना, कविता असो, कथा असो किंवा कादंबरी, मला ठाऊक आहे, एका अनौरस मुलाप्रमाणे आहे. माझ्या जगण्याच्या वास्तवाने माझ्या मनातील स्वप्नाशी प्रणय केला आणि त्यांच्या निषिद्ध मिलनाने या सगळ्या रचनांची उत्पत्ती झाली. मी जाणून आहे की एका अनौरस मुलाचे भोग माझ्या रचनेच्या नशिबी आहेत आणि उभे आयुष्य तिला साहित्यिक समाजाच्या कपाळावरील आठी सोसायची आहे...”

...असे मानणाऱ्या, म्हणणाऱ्या आणि जगणाऱ्या अमृता प्रीतम यांचा आज १०० वा वाढदिवस! हो, वाढदिवसच! पुतळा उभारून जयंती साजरी करण्याइतकी अमृता काही ‘ऐतिहासिक’ घटना नव्हती आणि कुठल्याही संवेदनशील, सूज्ञ आणि विवेकी मनापासून कधीच तेवढी दूरही नव्हती. म्हणूनच सुप्रसिद्ध पत्रकार-लेखक-टीकाकार खुशवंतसिंग जेव्हा तिला म्हणाले, ‘तुझ्या आयुष्याची गोष्ट इतकी क्षुल्लक आणि छोटी आहे की ती लिहिण्यासाठी रेव्हेन्यू स्टँपचा पाठकोरा भाग देखील पुरेल...', तेव्हा खुशवंतसिंगांची ही व्यंगात्मक टिप्पणी लक्षात ठेऊन अमृताने खरोखरीच जेव्हा आत्मचरित्र लिहिले त्याला शीर्षक दिले ‘रसीदी टिकट’ अर्थात रेव्हेन्यू स्टँप! प्रत्येक मुक्तात्म्याच्या मनावर आपला अमिट ठसा उमटविणारा हा स्टँप ‘अमुक’ला अभिव्यक्तीचा वसा देत कुठल्याही अभिनिवेशाशिवाय प्रकटण्याची प्रेरणा देत राहतो.

आजच्या, एका टोकाला आपल्याला अमान्य अशा कुठल्याही विचारांचे दडपशाहीने दमन, दुसऱ्या बाजूला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेला विधिनिषेधशून्य स्वैराचार आणि या दोहोंच्या अतिरेकी प्रभावात, एक संतुलित, सुसंगत व्यवस्था देऊ शकणाऱ्या संयमी, समायोजनी विवेकाचा संपूर्ण अभाव, अशा परिस्थितीत अमृताने काय आणि कसे लिहिले असते आणि त्याची परिणीती कशी झाली असती याची कल्पनाच केलेली बरी...!

अमृताने काय लिहिलं असतं याची केवळ कल्पनाच करणे शक्य असले तरी तिने अगोदरच जे लिहून ठेवलंय ते तरी समजून घ्यावे आणि जगून बघावे म्हणून तिच्या मूळ पंजाबी कविता ‘मेरा पता’चा मुक्त भावानुवाद वर सादर केला आहे. 'अद्वैत' या संकल्पनेला आध्यात्मिक विश्लेषण किंवा तत्वज्ञानी चर्चेत कोंडण्याऐवजी व्यावहारिक जगण्यातून मांडण्याची किमया साधणाऱ्या आणि त्याच्या समर्थनात अनेक विरोधांना लीलया तोंड देणाऱ्या अमृताला तिच्या १००व्या वाढदिवशी शतश: नमन आणि तिने जागवलेल्या संवेदना अनेकांच्या रंध्री भिनून प्रवाही राहतील ही अपेक्षा...

आणि हो, विसरण्यापूर्वी, आपल्या सर्वसमावेशक जाणिवांचे सातत्याने सृजनात्मक दर्शन घडविणाऱ्या गुगल टीमचे, अतिशय अभिजात पध्दतीने अमृताला वाहिलेल्या चित्रांजलीबद्दल, मन:पूर्वक आभार...

आज गुगलायला विसरू नका आणि शोधत रहा म्हणजे 'मी' सापडेल...!

रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

शहाणीव...!


जगणे जसे मुरत जाते
तशी बहरते शहाणीव
वर्तमानाची क्षणोक्षणी
वाढत जाते जाणीव...

मन सांगते ‘जगून घे,
प्रत्येक क्षण असा काही;
आला क्षण, गेला क्षण
हा क्षण फिरुनी नाही...’

जाणवते सत्य नवे
जाणाऱ्या हरेक क्षणासवे
नात्यात नांदते श्रीमंती
मायाजाल कशास हवे?

सापडलाच कधी त्यांना
चिरतारुण्याचा झरा,
पिणार थेंबही नाही, मी
नित्य मुरणाराच बरा...

मोठे मौजेचे असते
पक्व फळापरी मीपण गळणे
मोजकेच उरतात मित्र
आणि त्यांचा स्नेह रुळणे...

शिवाय केस पिकू लागतात तसा
तोलतो मी व्यवहार काट्यावर,
उमजते टाकावा जीव कशासाठी
अन काय मारावे फाट्यावर!

खुपत नाहीत कुठल्या पाऊलखुणा
न रडवणाऱ्या, न खुलवणाऱ्या,
माझ्या जगल्या क्षणांची स्मारके
आणि वाटा काही भुलवणाऱ्या...

वय जसजसे वाढते तसे
कुटुंब माझे वाढत जाई
सहचरणीसह सामावते
त्यात अजूनही बरेच काही...!

मागणे संपले कधीच
आता याचना नाही,
कृतज्ञता त्या संवेदनेची
जी मुरून रंध्रात वाही…!

चाळीशी कधीच मागे सोडून पन्नाशीच्या उंबरठयावर उभ्या असणाऱ्या आणि आता 'वाढ'दिवस साजरा करावा की 'काढ'दिवसांचा हिशोब मांडावा अशा द्विधा मनस्थितीमधील सर्वच 'मनां'साठी ही 'शहाणीव'... माझे आयुष्य ३६५ दिवसांनी समृद्ध करणाऱ्या, लन जॅक्सनसह, साऱ्या स्नेह्यांना समर्पित...!