सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

मीच...!


२७ फेब्रुवारी रोजी जन्मलेले, मुळचे गजानन रंगनाथ शिरवाडकर, दत्तकविधानाने विष्णू वामन शिरवाडकर झाले आणि आपल्या अलौकिक प्रतिभेने महाराष्ट्राचे लाडके कुसुमाग्रज! महाराष्ट्रातील लोकहितवादी मंडळाचे प्रवर्तक आणि नाशिकमधील अनेक साहित्यीक, सांस्कृतिक चळवळींचे प्रणेते असलेल्या तात्यारावांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठी भाषा दिवस साजरा करणे हे शारदेच्या उत्सवासाठी प्रत्यक्ष माऊलीने पसायदान मागण्याइतके समर्पक व औचित्यपूर्ण ठरावे.

तथापि, कुठल्याही संकल्पनेचा केवळ एक ‘दिन’ साजरा न होता त्या संबंधी जाणीव जागृत होवून ती वर्धिष्णू रहावी आणि त्यासाठी सदोदित सतर्क व कृतीशील असावे या भावनेने आजच्या मुहूर्तावर, नेटकरांना; ज्या भाषेबद्दल प्रत्यक्ष ज्ञानदेव, “माझा मर्‍हाटाचि बोलू कवतिके। परि अमृतातेही पैजेसिं जिंके। ऐसी अक्षरेचि रसिके। मेळविन। असा नि:संदिग्ध विश्वास बाळगतात तिची एक चुणूक दाखवावी म्हणून कुसुमाग्रजांच्या साहित्य सागरातून केवळ ५ रत्ने निवडून आणली आहेत.

कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा आवाका किती होता याचे केवळ भान यावे म्हणून, एक नितांत सुंदर तरल मनोहर प्रेमकाव्य ‘नाते’, विशुद्ध आणि विशाल जीवनदर्शन ‘माझे जगणे होते गाणे’, राजकारणावर अत्यंत मार्मिक आणि तेवढेच चिंतनीय भाष्य करणारी ‘अखेर कमाई’ या तीन उत्कट अविष्कारांसोबत दोन अत्यंत गहन, विचारी आणि मानवी आयुष्याचे मर्म उलगडून दाखविणाऱ्या आणि पूर्ण अधिकारवाणीने केलेल्या सूचना किंवा इशारा... ‘जपून’ आणि प्रेम’!


...एकमेवाद्वितीय कुसुमाग्रज...

१. नाते

नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही I
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही II

व्यवहार कोविदांचा होईल रोष होवो I
व्याख्येतुनीच त्यांची प्रज्ञा वाहत जाई II

ना तालराग यांच्या बंधात बांधलेला I
स्वरमेघ मंजुळाचा बरसे दिशात दाही II

गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा I
मंज़िल की जयाची तारांगणात राही II

२. माझे जगणे होते गाणे

जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी

माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामधले क्रंदन
अजणातेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरले काही
अदृष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वाहणे...

३. अखेर कमाई - कुसुमाग्रज

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले...

ज्योतिबा म्हणाले, 
शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा...
शिवाजीराजे म्हणाले,
मी फक्त मराठ्यांचा...
आंबेडकर म्हणाले,
मी फक्त बौद्धांचा...
टिळक उद्गारले,
मी तर फक्त चित्पावन ब्राम्हणांचा...

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले,
तरी तुम्ही भाग्यवान....
एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती...!


४. जपून

इथे सांडले सोक्रेटिसच्या
विखार पेल्यातले I
गौतम गांधींच्या नेत्रातील
करुणाश्रू शिंपले II
रक्त सुळाने या जमिनीवर
येशूचे ओतले I
दलदलीत या टाक प्रवासी
जपुनी जरा पाऊले II

५. प्रेम

पुरे झाले चंद्रसूर्य
पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत
स्वर्ग आहे सारा

शेवाळलेले शब्द आणिक
यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण
इंद्रधनू बांधील काय?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगिनचिठ्ठी
आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा हो
जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या
भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेलं

शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफान सगळं
काळजामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं...!

...सागरी सेतू बांधण्यासाठी आपल्या ताकदीनिशी मदत करणाऱ्या खारीस प्रभू रामचंद्राने कौतुकाने कुरवाळले होते म्हणतात... कुसुमाग्रज समजावून घेतांना, मराठीच्या वैभवशाली आणि दैवदुर्लभ हस्तिदंती महालाच्या कुठल्याशा पायरीचा लहानसा दगड होण्याचा प्रयत्न 'इत्यादी' हा आमचा खारीचा वाटा, ज्ञानराजांपासून कुसुमाग्रज, सुरेश भट आणि त्या सर्व ज्ञात अज्ञात साहित्यकारांस सादर समर्पण ज्यांनी आमच्यात माय मराठी रुजवली, जोपासली आणि तिचा लळा लावून आम्हाला तिच्या पालखीचे भोई होण्याचे अहोभाग्य मिळवून दिले...

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी!

 

रविवार, २९ जानेवारी, २०१७

मन माझे...!


चन्द्र हसला होता गालात
अन चांदणे सांडले होते...
मन माझे माझ्याशी तेव्हा,
करवादून भांडले होते...!

आठवांचा पूर येता
वेदनेचा डोंब उसळला...
हिशोब न जाणताच मी,
गणित प्रेमाचे मांडले होते...!

...मन माझे माझ्याशी तेव्हा,
करवादून भांडले होते...!

सुखाचे वावडेच असावे
असे माझे जगणे नव्हते
जवाएवढ्या सुखाला माझ्या
पण जाणिवेने कांडले होते...!

...मन माझे माझ्याशी तेव्हा,
करवादून भांडले होते...!

शनिवार, २८ जानेवारी, २०१७

प्रजासत्ताक ...!


सांभाळतो हरेक येथे
अस्मितेचा षंढ माज
सनातनी ठरतो ज्याला
राष्ट्रप्रेमाची दैवी खाज...

प्रजासत्ताक म्हणून लेवतो
निवडणूकीचा भरतारी साज II

जातीच्या तप्त तव्यावर
आपापली पोळी भाज
अस्वस्थ वर्तमानास शोभे
लोकशाहीचा जंगलराज...

प्रजासत्ताक म्हणून लेवतो
निवडणूकीचा भरतारी साज II

त्यांच्या निवडीस ना मूल्य
पण 'हिंद'पे वांझोटा नाज
ना गांधी कामास ये आता
स्वात्यंत्रवीर गुमनाम आज...

प्रजासत्ताक म्हणून लेवतो
निवडणूकीचा भरतारी साज II

संस्कृती न राखू आम्ही भले
राखू प्रतिष्ठेचा बेगडी बाज
कर्म न ये कामास आमच्या
शोभतो पण लांच्छीत ताज...

प्रजासत्ताक म्हणून लेवतो
निवडणूकीचा भरतारी साज II

स्वार्थाच्या कारणास आम्हा
ना भय ना कसली लाज
सगळे त्याज्य पचवूनीही
समुद्र ना विसरतो गाज...

प्रजासत्ताक म्हणून लेवतो
निवडणूकीचा भरतारी साज II

कधी 'साहेब' तर 'भाई' कधी
आम्हांस ना निषिद्ध व्याज
दुनियादारीच्या पखालीने
तू संस्कृतीस 'श्रीजल' पाज...

प्रजासत्ताक म्हणून लेवतो
निवडणूकीचा भरतारी साज II

रविवार, १५ जानेवारी, २०१७

उत्कट...!


परवा संध्याकाळी संदीप, वैभव आणि मिलिंदने चालू केलेली इर्शादची मैफिल, संक्रांतीची सकाळ उजाडली, मानवी आयुष्याच्या भाष्यकारांनी माझ्या आयुष्याचं सार्थक करण्याच्या व्रताला जागून जगभरातले बोधामृत माझ्यावर व्हॉटसपले आणि सूर्यदेवाच्या संक्रमणानी निसर्गात होणाऱ्या मनोहारी बदलांपेक्षा माझ्या बोलण्यात माधुर्याची अतार्किक तथा असंभव अपेक्षा केली; तेव्हा देखील बॅकग्राऊंडला सुरुच होती. संक्रात सरून मरगळलेला निवांत रविवार देखील आवरतं घेतोय आणि अंगावर येऊ घातलेला सोमवार दटावतोय तरी '...ये जो मनकी सीमा रेखा है...' चालूच! मग तोच धागा पकडून, कोळशाच्या खाणीत हिरा सापडतो म्हणतात तसे, रोज सकाळी (आणि प्रसंगी भक्क दुपारी, कातर संध्याकाळी आणि अवचित मध्यरात्री अवघड क्षणी देखील!) बरसणाऱ्या हितेच्छूकांच्या मेसेजेसच्या भाऊगर्दीत (इतके लोक माझे भले होण्यासाठी अहोरात्र धडपडत असतांना ते होत का नाही...? कलियुग दुसरे काय!) कधी कधी खणखणीत, बावनकशी, प्रच्छन्न, उत्कट, अनाघ्रात असा गद्य विचार किंवा पद्य विकार (पद्यात विचार नसतो असे जाणकार सांगतात!) सापडतो आणि त्याच्या धन्याचा थांग लागत नाही तेव्हा येणारी अस्वस्थता ही, कवितेची शेवटाची ओळ न सुचण्याच्या हुरहुरीपेक्षा कणभरही कमी नसते. 

गेल्या आठवड्यात, मला माणसात आणण्याचे असिधारा व्रत घेतलेल्या करुणाष्टकाने मला धाडलेल्या एका 'असे वाटते आजकाल...' शी भावबंध सांगणाऱ्या कवितेने झोप उडवली होती. संक्रमणाच्या निमीत्ताने त्या महाभागाला गाठायचा चंग बांधला आणि 'गुगल' दिमतीला असतांना किती वेळ गुलदस्त्यात रहाणार होते बच्चमजी! 'शतानंद' असे शिगोशीग पारमार्थिक नाव धारण करून ब्लॉगणारं हे बेणं वयाने आमच्यापेक्षा लहान भासूनही, प्रकाश संत ते आयन रँड व्हाया नेमाडे मास्तर असं सरळ वळणाने भेटल्यामुळे, 'बाकी शून्य'चा आणखी एक पंखा दृगोच्चर झाला आणि यात्रेत हरवलेला लंगोटी यार सापडावे तसे झाले.... गेल्या वर्षीची संक्रांत वैभवच्या '...तुम्ही व्हॉट्सऍपवर आहात ना... मग मी तुमचा आहे!' ने साजरी केली होती; यंदाची संक्रांत (जी 'तिळकुटी(?) चतुर्थी' पर्यंत लागू असते... इति करुणाष्टकं, आमची टाळकुटी अमावस्या आमरण लागू असते!), हे काला धन ऐवजी जे गुप्तधन सापडले आहे त्याच्या नावे... जाणकार आणि जिज्ञासूंनीं 'शतानंद'ला जरूर भेट द्यावी पण स्वतःच्या जबाबदारीवर! पुलंच्या भाषेत 'शरीराप्रमाणे मनावर देखील कोड असणारी...' आणि मंगूमामांच्या भाषेत 'स्पिरिच्युअली कॉन्स्टीपेटेड' अशा 'भाषा शुचिता'वाले विद्वान आणि फालतूगिरी करून हसणे अब्राह्मण्यम मानणाऱ्या जमातीने शक्यतो तिकडे फिरकू नये. मराठी भाषेचा गोडवा तिथे भलत्याच ठिकाणहून पाझरतांना पाहून नाक मुठीत धरायची वेळ यायची... तेव्हा सांभाळून!

तर कालच्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 'शतानंद'च्या या ओळीतून...

एखाद्या रात्री कधीतरी जमा होतात सावल्या,
गरम होतात डोळे नि तडतडतात बाहुल्या..
मुक्यानेच सांगू लागतं दुखलेलं पाणी, 
इतकं हळवं चुकूनसुद्धा असू नये कोणी..

गाऊ नये कोणी कधी उदास उदास गाणी,
कळावीत सारी दुःखं इतकं होऊ नये ज्ञानी..
वाचूच नये मुळात कुठलं जाडजूड पुस्तक,
विचारांपासून शक्यतो दूर ठेवावं मस्तक..

जशी नजरेस दिसतात तशीच पहावीत चित्रं,
जसे आपल्याशी वागतात तसेच समजावेत मित्र..
उगाच फार खोल आत नेऊ नये दृष्टी,
खऱ्या समजाव्यात साऱ्या सुखांताच्या गोष्टी..

पेनाच्या जिभेवरच सुकू द्यावी शाई, 
फार त्रास होईल असं लिहू नये काही..
हळवं बिळवं करणारे मुळात जपूच नयेत छंद,
करून घ्यावीत काळोखाची सगळी दारं बंद..

सायंकाळी एकटं एकटं फिरू नये दूर,
समुद्रकिनारी लावू नये आर्त, उत्कट सूर..
चालू नये सहसा फार ओळखीची वाट,
भेटलंच अगदी कुणी तर मिळवावेत हात..

जमल्यास चारचौघात बघावं थोडं मिसळून,
लहान मुलासारखं कधीतरी भांडावं उसळून..
आवडणार नाही पंचमीच्या चंद्राची कोर,
एवढंसुद्धा कोणी कधी होऊ नये थोर..

घट्ट घट्ट बसलेल्याही सुटतातच गाठी,
कपाळावर म्हणून सारखी आणू नये आठी..
साकळू देऊ नये फार खोल खोल रक्त,
कुणापाशीतरी नियमित होत जावं व्यक्त..

माणसांचं मनास लावून घेऊ नये फार,
होऊ द्यावा थोडा हलका त्यांचासुद्धा भार..
तुटून जावीत माणसं एवढं पाळू नये मौन,
वरचेवर करत जावा प्रत्येकालाच फोन..

ठेऊ नये जपून वहीत पिंपळाचं पान,
साध्यासुध्या गोष्टीत असा गुंतवू नये प्राण..
जमा होत राहील सारखा पापणीआड थेंब, 
इतकंसुद्धा मन लावून करू नये प्रेम..

श्वास घेणंसुद्धा अगदीच वाटू लागतं व्यर्थ,
शोधत बसू नये म्हणून जगण्याचा अर्थ..
वाटलं जर केव्हा सगळं सगळं आहे शून्य,
आहे हे असं आहे हे करून घ्यावं मान्य..” 

इतकं समजावूनसुद्धा जमा होतात सावल्या,
गच्च गच्च होतात डोळे, थरथरतात बाहुल्या..
आतून आतून सगळ्याचीच मग येत राहते चीड,
दिवस जितका सुटसुटीत तितकीच रात्र गिचमीड...

जियो यार, शतानंद... शत प्रतिशत 'आनंद'... ऋषीदा आणि गुलज़ारांचा!
भेटू म्हणे कधी तरी... तोवर तिळगुळ घ्या आणि खरं खरं बोला!

रविवार, १ जानेवारी, २०१७

शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

मी मरणावर हृदय तोलले...


आज मंगेश पाडगांवकरांचा प्रथम स्मृतिदिन... कितीही अविश्वसनीय वाटत असलं तरी काळाची पावले कोण रोखू शकलंय... त्यांच्याच अजरामर शब्द सुरांनी त्यांना आदरांजली...!
अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती ॥ ध्रु ॥

चंद्र कोवळा, पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला
जरा लाजुनि, जाय उजळुनी, काळोखाच्या राती ॥ १ ॥

फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर, परी निरंतर, गंधित झाली माती ॥ २ ॥

हात एक तो हळु थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातिल समईमधुनी, अजून जळती वाती ॥ ३ ॥

कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती ॥ ४ ॥

रविवार, २५ डिसेंबर, २०१६

व्याज...!


मनी आर्त विश्वाचे
डोळ्यात स्वप्नं वेडी...
पंख गरुडाचे अन 
पायात गंजली बेडी...!

हात बांधलेले तरी
हृदय सतार छेडी...
नागरी घुसमटीत
स्वप्नी नित्य खेडी...!

बुद्धी जखडलेली
मन पाखरं येडी...
जन्मूनी संचिताचे
कर्म व्याज फेडी...!

रविवार, २० नोव्हेंबर, २०१६

लढा...!


हार जीत ठरविण्याचे इथे
बदलले आहेत निकष काही...
दिसली ती फक्त झलक होती
त्वेषाने मी अजून लढ़लोच नाही...!

ज्या शिड्यांवरून गडगडली
माडी कचकड्याच्या दिखाव्याची...
भुलवले कितीदा मलाही, पण
पायरी ती मी कधी चढलोच नाही...!

गळून पडले उत्सवी मुखवटे अन
उसवली वीण जी विरलीच होती...
बेगडी सजावटीतून मिरविण्या
मी मुखवट्याआड दडलोच नाही...!

शस्त्र परजावीत त्यांनी आता
जी कोकरांचा काळ होती...
त्यांच्या वाराने जायबंदी होईल
इतका ठिसूळ मी घडलोच नाही...!

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०१६

On a Different 'Note'...


यंदाच्या वर्षी बाप्पाने गाऱ्हाणे ऐकले म्हणायचे... 

ये रे ये रे पावसा 
तुला देतो पैसा 
पाऊस आला मोठा 
पैसा झाला खोटा...!