मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७
सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७
विंदा जन्मशताब्दी...!
२४ ऑगस्ट २०१७ रोजी विंदांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरु केलेला ‘रोज एक कविता...’ उपक्रम लवकरच शंभरी गाठेल (एकूण ९५ कविता झाल्या, आजची ९६वी!) माझा हा उपक्रम आता माझ्या या ब्लॉगवरून अव्याहत सुरु राहील. तथापि, मी वेगवेगळ्या माध्यमातून या कविता मिळवून, त्यातून माझ्या काही विशिष्ट निकषांवर निवडून, त्यांचे शक्य तितक्या शुद्धतेने टंकलेखन करून हा उद्योग करीत असल्याने, रोज एक कविता इथे सादर होईलच असे नाही. तेंव्हा जसे जमेल तसे प्रकटण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल याबद्दल विंदांच्या चाहत्या काव्यरसिकांनी खात्री बाळगावी व लोभ असू द्यावा... आज ‘काजवे’ मधील शलाका
...असेंच जग हें !...
सत्कार्यास्तव अधम नरांचा
अनुनय करिती जगतीं सज्जन
असेंच जग हें ! शिवालयांतहि
नंदिस्पर्षाविण ना दर्शन !
Photo Credit - Mukund Utpat
सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७
प्रिय पालक,
आपल्या पाल्याच्या कुतुहलात आणि जिज्ञासेत शाळा आणि अभ्यासाचा अडसर होऊ देऊ नका आणि तुमच्या महत्वाकांक्षांसाठी त्याला काही कमी न पडू देण्याच्या नादात त्याची वाढ खुरटवून त्याला कायमचे पंगू करू नका...!
बस, इतकेच...
शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७
चित्रपती...!
महाराष्ट्राच्या औंध संस्थानामध्ये साताऱ्याजवळ, खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा झालेल्या सहा कैद्यांचे पुनर्वसन करून त्यांना आणखी एक संधी देण्याच्या, ‘स्वतंत्रपूर’ अशा अत्यंत समर्पक नाव धारण केलेल्या ‘मुक्त कारागृह’ अर्थात ‘Open Prison’ या मानसशास्त्रीय प्रयोगाबद्दल संवेदनशील साहित्यिक गदिमा (ग. दि. माडगुळकर) यांनी प्रतिभावान आणि सामाजिक जाणिवांचे भाष्यकार निर्माते-दिग्दर्शक शांताराम बापू अर्थात व्ही. शांताराम यांना सांगितले आणि जन्म झाला एका अजरामर चित्रकृतीचा – ‘दो आंखे बारह हाथ!’ १९५७ साली प्रदर्शित झालेल्या या भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिजात कलाकृतीला बर्लिनच्या ८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सिल्व्हर बीअर’ पुरस्कार मिळाला आणि ‘गोल्डन ग्लोब अवार्ड’ मधील ‘सैम्युअल गोल्डविन अवार्ड’ या श्रेणीत नामांकन देखील मिळाले. १९७५ साली या चित्रपटाचा तामिळ रिमेक ‘पलांदू वाझगा’ (एम. जी. रामचंद्रन व लता) आणि १९७६ साली तेलगु रिमेक ‘मा दैवम्’ (एन. टी. रामाराव व जयचित्रा) प्रदर्शित झाला.
या चित्रपटातील एका दृष्यात व्ही. शांताराम एका बैलाशी झुंज देतांना दिसतात. हा प्रसंग चित्रीत करतांना शांताराम बापूंच्या डोळ्याला इजा झाली पण सुदैवाने त्यांची ‘नजर’ अखेरपर्यंत शाबूत राहिली! ‘ऐ मलिक तेरे बंदे हम’ ही भरत व्यासांची जेवढी निर्मळ तेवढीच व्याकूळ रचना वसंत देसाईंच्या आर्त सुरांनी, लतादिदींच्या स्वर्गीय स्वराने आणि संध्याच्या अप्रतिम मुद्राभिनयाने अजरामर केली ती याच चित्रपटात. ‘इंडिया टाईम्स मुव्हीस्’ने २००५ साली प्रकाशित केलेल्या ‘भारतीय चित्रपट सृष्टीतील चुकवू नये असे २५ चित्रपट’ या यादीत ‘दो आंखे बारह हाथ’ला मानाचे स्थान देण्यात आले असले तरी माझ्यासाठी या चित्रपटाचे स्थान कायम अविस्मरणीय, अतुलनीय आणि अलौकिक असे आहे व राहील. त्याची कथा पुन्हा कधीतरी...
आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे आज चित्रपती व्ही. शांताराम अर्थात शांताराम बापूंचा ११६ वा जन्मदिन! कृष्ण-धवल चित्रीकरणाच्या (आणि आणखी विविध) मर्यादांमध्ये, मानवी आयुष्याचे इतके कंगोरे, कुठल्याही मोठ्या ‘स्टार’शिवाय, इतके लख्ख उजळवून दर्शकांचे डोळेच नव्हे तर भानही दिपवून टाकणाऱ्या आणि ‘चित्रपती’ अशी सार्थ उपाधी धारण करणाऱ्या शांताराम बापूंना... सलाम! असे चित्रकर्ते आणि त्यांच्या संवेदनशील मुक्त अभिव्यक्तीला ‘श्वास’ घेण्याचे स्वातंत्र्य, स्वतंत्र भारताला निरंतर लाभो हीच प्रार्थना...
जब जुल्मोंका हो सामना
तब तूही हमे थामना...
वो बुराई करे हम भलाई भरे
नही बदले कि हो कामना...
बढ उठे प्यारका हर कदम
और मिटे बैरका ये भरम...
ऐ मलिक तेरे बंदे हम
ऐसे हो हमारे करम
नेकीपर चले और बदिसे टले
ताकी हसते हुयें निकले दम...!
रविवार, २९ ऑक्टोबर, २०१७
मन निर्भय जेथे...!
भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी, स्वतंत्र भारताचे स्वप्न अनेक लोकांनी अनेक पद्धतीने पाहिले होते. नोबेल पारितोषिक विजेते विश्वकवि रवींद्रनाथ टागोर यांच्या स्वप्नातील स्वतंत्र भारताची प्रतिमा मात्र खरोखर नि:स्वार्थ, सर्वसमावेशक, जन-गण-मनास अधिनायक मानणारी अशी उद्दात असल्याने ती अद्वितीय तर आहेच पण, अद्यापही साध्य झालेली नसल्याने, निरंतर देखील आहे. तेव्हा स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आपण त्या दिशेने किती वाटचाल केली याचा आढावा सगळ्याच राष्ट्रभक्तांनी घ्यावा...
१९०१ साली मूळ कविता 'चित्त जेथा भयशून्य’ ही गुरदेवांनी बंगालीत लिहिली, त्याचा रवींद्रनाथांनी स्वत:च केलेला अनुवाद गीतांजली मध्ये १९१२ साली प्रकाशित झाला ज्याला नोबेल पारितोषिक मिळाले. त्यानंतर या कवितेचे अनेक भाषात अनुवाद झाले. मराठीतील अनुवाद अद्याप (मला तरी) आढळलेला नाही पण झाला असावा अशी खात्री आहे. इथला माझा हा प्रयत्न भाषांतर, अनुवाद किंवा रुपांतर असा नसून, मनाला अत्यंत भावलेल्या या स्वप्नरंजनातील भावार्थाचा गोषवारा मुक्त भावानुवादातून मांडण्याचा प्रयत्न (गुरुदेवांची क्षमा मागून) आहे, तो भावनेनेच समजून घ्यावा...
...मन निर्भय जेथे...
मन निर्भय जेथे आणि शीर्ष उंचावलेले
भांडार ज्ञानाचे आणि उघडुन मांडलेले I
नांदती सुखाने सर्व, आचार भले स्वतंत्र
जाती धर्म पंथ प्रांत एकत्र सांभाळलेले I
शब्द उमटती नित्य सत्याच्या गर्भातून
परिपूर्णतेसाठी जेथे अथक कर श्रमलेले I
गतानुगतिक कर्मकांडे रूढी त्याज्य जेथे
तर्काचे अधिष्ठान सद्-विवेकाने मानलेले I
तुझ्या सारथ्याने धावे मनोरथांचे वारू
क्षितीज दिव्य कार्यकारणात विस्तारलेले I
अशा स्वयंभू स्वयंपूर्णतेच्या आनंदवनात
माझ्या देशाचे उत्थान, प्रभू मी पाहिलेले I
शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७
रविवार, ३ सप्टेंबर, २०१७
शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७
बुधवार, २३ ऑगस्ट, २०१७
मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७
जन गण मन...!
जी व्यक्ती अगदी एक दिवस का होईना शाळेत गेली आहे, तिने राष्ट्रगीताबरोबर ‘प्रतिज्ञा’ देखील म्हटली, ऐकली असेल... राष्ट्रगीत समजण्यास अवघड आहे असे मानले तरी ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे...’ यात समजण्यास अवघड असे काही नसावे.
‘सद रक्षणाय खल निग्रहणाय’ असे ब्रीद असलेल्या पोलिसांचे काम लोकाभिमुख असते आणि त्यांनी नागरिकांची सेवा करणे अनुस्यूत आहे. या पोलीस दलात सेवा करण्याची जबाबदारी स्वीकारतांना, कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून जनसेवा व राष्ट्रकार्य करण्याची एक शपथ घ्यावी लागते हे समजण्यास फार विद्वत्तेची गरज नसावी.
द्रक्ष्याम शीघ्रं संबुद्धं सर्वव्याधिप्रमोचकं । वैद्यराजं महावैद्यं दुःखितानां चिकित्सकं ।। अशी ज्यांच्याबद्दल वेदकालीन धारणा आहे त्या वैद्यक व्यवसायात देखील आपले समाजकार्य सुरु करतांना लोकसेवेची शपथ देण्याची अतिशय उज्ज्वल परंपरा आपल्या देशाला लाभली आहे हे अगदी सर्वांना नाही तरी संबंधितांना माहित असावे.
वकील, अभियंते, वास्तुरचनाकार व इतर व्यावसायिक यांनी आपापल्या व्यवसायात सुसूत्रता यावी आणि समव्यवसायिकांनी संघटीत असावे म्हणून काही शिखर संस्था स्थापन करून त्याचे सदस्यत्व समव्यवसायीकांना देण्याची व्यवस्था असते. असे सदस्यत्व देतांना देखील आचारसंहितेचे नियम हे सदस्यांना बाध्य असतात.
छोटे मोठे व्यावसायिक, दुकानदार, पेढ्या व आडते अशा घटकांच्या नियमनाची प्राथमिक जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असते आणि त्यातील असंघटीत वर्गासाठी शासनाने काही आयोग अथवा मंडळांची योजना केलेली असते जी, अशा घटकांनी कायद्याच्या चौकटीत राहून आपले काम करावे यावर लक्ष ठेवून असते.
मोठ्या उद्योगांच्या नियमनासाठी ‘कॉर्पोरेट कार्य मंत्रालय’ या सारख्या शासकीय यंत्रणा कार्यरत असतात ज्या अशा उद्योगांच्या प्रक्रिया व त्यांचे आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय आयाम या संबंधी असलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या यथायोग्य अनुसरणासाठी त्यांच्या एकूण गतीविधी आणि त्याचे सादरीकरण यावर नियंत्रण ठेवतात.
समाजकारण हे मुलभूत ध्येय असले तरी त्यासाठी कराव्या लागणाऱ्या योजना, कायदे व एकूणच व्यवस्थेची देखभाल यात व्यस्त असलेले शासन, अशासकीय सेवाभावी संस्था अथवा संघटना यांचे प्रयोजन मान्य करते. अशा संस्था स्व:तची ध्येय-धोरणे व कार्यप्रणाली ठरवू शकत असले तरी धर्मादाय आयुक्ताकडून ते संमत करून घ्यावे लागते.
नागरिकांच्या हितासाठी ठरविलेली धोरणे, केलेले कायदे आणि संकल्पित योजना यांच्या अंमलबजावणीसाठी शासनास प्रशासनाची जोड लागते आणि प्रशासकीय कार्याची चौकट तत्वत: लोकाभिमुख, निष्पक्ष आणि भक्कम असणे गृहीत असल्याने लोकशाही व्यवस्थेच्या प्रशासकीय आराखड्यात फार मोठ्या त्रुटी असतात असे नाही.
नाव-गाव, जात-धर्म, खान-पान, रिती-रिवाज, आस्था-श्रद्धा, मुल्ये-निष्ठा आणि जीवनशैली या गोष्टी अत्यंत वैयक्तिक असल्याने त्या स्वत:पुरत्या, आपल्या कुटुंबापुरत्या व आपापल्या घरांपुरत्या मर्यादित ठेवून सार्वजनिक जीवनात देशाच्या नागरिकाचा राष्ट्रधर्म पाळत आपले विहित कर्तव्य निभावणे ही वरीलपैकी प्रत्येकाची संवैधानिक जबाबदारी ठरते.
वरील यादीत १३४ कोटी+ भारतीयांपैकी बहुतांचा समावेश असल्याने, या प्रत्येकाने आपापले कर्म सचोटीने, निरलसपणे आणि कर्तव्यभावनेने केल्यास, दिखाव्याच्या प्रसंगी ‘मातीशी इमान’चे भाकड निकष ठरवून देशप्रेमाची उबळ येण्याची आणि समाज-माध्यमातून आपल्या जाज्वल्य देशभक्तीची उधळण करण्याची गरज भासणार नाही.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झालेल्या भारतीयांत आज १०० कोटींची भर पडली आहे; तेंव्हा स्वातंत्र्य म्हणजे स्वत:च्या तंत्राने जगण्यास मिळालेली मुभा नव्हे तर स्वत:च्या, आपल्या बांधवांच्या, आपल्या राष्ट्राच्या आणि पर्यायाने समस्त मानवतेच्या उद्धाराची आणि उत्कर्षाची जशी संधी आहे तशीच जबाबदारीही याची जाणीव गरजेची आहे.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी २० वर्षांपूर्वी ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ या कवितेतून समस्त भारतीयांस केलेले आर्जव, आज भारताच्या सत्तराव्या स्वात्यंत्रदिनी तेवढेच खरे आहे. भारत महासत्ता होण्याची स्वप्ने बघण्यापूर्वी आपण निदान एवढे करू शकलो तर स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवात भारतमाता तिच्या सर्व लेकरांस सहस्त्र कराने अक्षय्य वरदान देईल...
स्वातंत्र्यदेवीची विनवणी
(प्रासंगिक फटका)
(अनंत फंदींचे स्मरण करून)
पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका ।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥
सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत वरू नका ॥
अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालु नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठरी दिवाभितास दडू नका ॥
जुनाट पाने गळुन पालवी नवी फुटे हे ध्यानि धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥
वेतन खाउन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतिल दुसरे, बघतिल तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥
जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।
मेजाखालुन मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥
बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥
सत्ता तारक सुधा असे पण सुराहि मादक सहज बने ।
करिन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥
प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।
इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका ॥
पाप कृपणता पुण्य सदयता संतवाक्य हे सदा स्मरा ।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥
गोरगरीबा छळू नका ।
पिंड फुकाचे गिळू नका ।
गुणीजनांवर जळू नका ।
उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका ॥
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरू नका॥
पर भाषेतहि व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी ।
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका ॥
भाषा मरता देशहि मरतो संस्कृतिचाही दिवा विझे ।
गुलाम भाषिक होउनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका ॥
कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणु नका ।
सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाचे तोडु नका ॥
पुत्र पशूसम विकती ते नर, नर न नराधम गणा तया ।
परवित्ताचे असे लुटारू नाते त्याशी जोडु नका ॥
स्वच्छ साधना करा धनाची बैरागीपण नसे बरे ।
सदन आपुले करा सुशोभित दुसर्याचे पण जाळु नका ॥
तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी ।
करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका ॥
सुजन असा पण कुजन मातता हत्यार हातामधे धरा ।
सौजन्याच्या बुरख्याखाली शेपुट घालुन पळू नका ॥
करा कायदे परंतु हटवा जहर जातिचे मनातुनी ।
एकपणाच्या मारुन बाता ऐन घडीला चळू नका ॥
समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका ।
दासी म्हणुनी पिटू नका वा देवी म्हणुनी भजू नका ॥
नास्तिक आस्तिक असा कुणीही माणुसकीतच देव पहा ।
उच्च नीच हा भेद घृणास्पद उकिरड्यात त्या कुजू नका ॥
माणूस म्हणजे पशू नसे ।
हे ज्याच्या हृदयात ठसे ।
नर नारायण तोच असे ।
लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरु नका ।
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरू नका ॥
- कुसुमाग्रज
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)








