रविवार, ११ मार्च, २०१८

चौथरा...!


घडणारे पुतळे
घडविणारे पुतळे!

बोलणारे पुतळे
बोलविणारे पुतळे,
ऐकणारे पुतळे
ऐकविणारे पुतळे!

बघणारे पुतळे
दाखविणारे पुतळे,
विचारमग्न पुतळे
अंतर्बाह्य भग्न पुतळे!

फोडणारे पुतळे
फोडविणारे पुतळे,
पूजणारे पुतळे
‘पूज्य’ ही पुतळे!

प्रेरणा ही पुतळे
धारणा ही पुतळे,
उर्जा देती पुतळे
दर्जा देती पुतळे!

तारिती पुतळे
मारिती पुतळे,
रक्षती पुतळे
भक्षति पुतळे!

साध्य पुतळे
साधन पुतळे,
साधक पुतळे
साधना ही पुतळे!

पुतळ्यांचीच दुनिया सारी
रिकाम्या डोक्यांचा पसारा
नुरता विवेक माणसापाशी
उभा चौकात भुंडा चौथरा!

बुधवार, ७ मार्च, २०१८

श्री...?

मी खर तर तिचा काही निस्सीम चाहता नव्हे, ‘भक्त’ तर नाहीच नाही. पण तिने आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडलं ते ‘सदमा’मधल्या तिच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या अदाकारीनं. समोर खुद्द कमल हसन सारखा चतुरस्त्र, अभिनय निपुण आणि यशस्वी अभिनेता असतांना या (हिंदीमधील) नवशिक्या परकरी (अक्षरशः) पोरीने त्याला केविलवाणा दाखविण्यात जे काही सहाय्य केलं ते केवळ उल्लेखनीय नव्हे तर अक्षरश: माईल-स्टोन ठरलं. तोपर्यंत असा करुण रसाचा मक्ता मीना कुमारी, शबाना, स्मिता आणि खास दाक्षिणात्य पठडीतील सिनेमांतून रेखा आणि जयाप्रदा यांनी घेतला होता.

तिचं सौंदर्य हे लौकिक अर्थाने तिचं बलस्थान नव्हतं, असू शकलही नसतं! कारण हिंदी सिनेमांत हिरो आणि हिरोईन यांची जी ठोकळेबाज प्रतिमानं निश्चित झाली होती त्यांच्याशी ती फारशी जुळत नव्हती. तिच्या मूळच्या दाक्षिणात्य कांतीचा इथल्या गौरांगनांपुढे पाड लागणं तस कठीणच होतं. शिवाय नकट्या नाकाची मुमताज इथे सुंदर म्हणून खपू शकत होती पण चाफेकळीसारखं नाक नसणं हा तिचा दोष ठरू शकत होता. आपण केवळ सौंदर्याच्या जोरावर इतर बाहुल्यांसारखं इथे टिकू शकणार नाही याची खात्री असल्याने तिने, नृत्य आणि अभिनय या आपल्या उपजत गुणांना विनोद आणि वैविध्य यांची जोड दिली कारण तिला फक्त टिकायचं नव्हतं तर स्वत:ला सिद्ध करायचं होतं.

‘सदमा’ नंतर ढीगभर सिनेमात तिने, दाक्षिणात्य पद्धतीने कवायती करत बायकी नाचणाऱ्या आणि अत्यंत बथ्थड किंवा एकदम बटबटीत अभिनयातून भावना व्यक्त करण्याचं नाटक करणाऱ्या हिरोंबरोबर निखालस बेगडी भूमिका बिनदिक्कत केल्या. सातत्य आणि टिकून राहणं महत्वाचं ही मुलभूत सूत्र तिला पक्की उमगली होती. शिवाय या प्रयोगांदरम्यान आपल्या सहकलाकारांची कुवत लक्षात आल्याने आपण या ठोंब्यांपेक्षा सगळ्याच बाबतीत सरस आहोत याची जाणीव तिला जशी होत गेली तसा तिचा ‘त्या’ पदाकडे प्रवास आपोआपच चालू झाला. शेखर कपूरच्या ‘मि. इंडिया’ मध्ये तिच्या सर्व कलागुणांना आणि तिच्या अभिनयातील खोडकरपणाला पुरेसा वाव मिळाला. अन्नू कपूरच्या प्रगल्भ साथीने तिच्या खट्याळपणाला खुलवले तर अनिल कपूर या तेव्हाच्या आघाडीच्या नायकाने तिच्यातील स्त्रीत्व फुलवून त्याच्या लोभस दर्शनाने युवकांना घायाळ केले तर युवतींना आव्हान दिले. एवढे होईपर्यंत तिचा हिंदी चित्रपट सृष्टीतील पत्ता निश्चित झाला होताच, आता फक्त दारावरील पाटीवर नावापुढे काय लिहायचे एवढाच प्रश्न होता!

दोन वर्षांनी लागोपाठ आलेल्या तिच्या दोन चित्रपटांनी त्या प्रश्नाचे उत्तर अगदी स्पष्ट, ठसठसशीतपणे आणि बोल्ड टाईपमध्ये दिले. नर्गिस-मधुबालापासून, मीनाकुमारी-वहिदा आणि हेमामालिनी-रेखा यांच्या, एकटीच्या ताकदीवर सिनेमा यशस्वी करण्याच्या कौशल्याला इतक्या वर्षात जे साधता आलं नाही ते तिने जमवून दाखवलं. ‘चांदनी’ आणि ‘चालबाज’ या एकाच वर्षात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी तिला केवळ सुपरस्टार नाही तर महानायिका बनवलं. ‘चांदनी’ ही आपल्या नेत्रपल्लवी आणि नृत्यनिपुणतेने कुणालाही भुरळ पाडावी अशी पण प्रसंगवशात द्विधा झालेली नायिका आणि तिची घालमेल तिने अत्यंत ताकदीने साकारली तर ‘चालबाज’ हा अनेक अर्थाने वेगळा असलेला सिनेमा तिला आयुष्यात बरच काही देवून आणि शिकवूनही गेला! ‘सीता और गीता’वरून बेतलेला असल्यामुळे, मुळात चक्क ‘ड्रीमगर्ल’शी तुलना या क्रमप्राप्त आव्हानाला जोड होती ती, दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत आणि ‘ढाई किलोका हाथ’वाला सनी देवोल या दोन्ही हिरोंना एकदम पुरे पडण्याची. अर्थात या दोघांतही अभावानेच आढळणारी वैशिष्ट्ये – वैविध्यपूर्ण चतुरस्त्र अभिनय आणि शास्त्रीय नृत्यकलेतील निपुणता – या तिच्या जमेच्या बाजू होत्याच. परिणाम, चालबाज लक्षात राहतो तो ‘दो बिअर देना, प्लीज...’ म्हणणाऱ्या आणि ‘किसीके हाथ ना आयेगी...’ गाणाऱ्या या ’लडकी’ मुळे, त्यातील कुठल्याही ‘पुरुषा’मुळे नाही. अनिल कपूर बरोबर तिची जोडी हिट ठरते हे सिद्ध झाले तिच्या दोन वर्षांनी आलेल्या ‘लम्हे’ने. यामधील दुसरी दुहेरी भूमिका तिने तेवढ्याच ताकदीने साकारल्याने, प्रेक्षक थियेटरमधून बाहेर पडला तो ‘मोरनी बागांमां...’ गुणगुणतचं!

तद्दन बाजारू, निव्वळ गल्लाभरू, व्यावसायिक चाकोरीबद्ध या बरोबरच प्रायोगिक, थोडेसे धाडसी आणि तरल भावस्पर्शी असे सर्व प्रकार हाताळत, आपले अढळ स्थान आणि अभिनय सामर्थ्य ती अशा टप्याटप्यावर सिद्ध करत गेली. ‘जुदाई’ मधील लौकिक समृद्धीच्या लोभापायी आपला नवरा एका गर्भश्रीमंत तरुणीशी वाटून घेणारी, प्रसंगी खंबीर तर कधी अत्यंत आगतिक आणि वैषम्यग्रस्त होणारी सामान्य मध्यमवर्गीय स्त्री अतिशय ताकदीने रंगविल्यानंतर तिने चंदेरी पडद्यावरून बरीच मोठी, जवळपास १५ वर्षांची, एक्झिट घेतली. या दरम्यान एक दोन फुटकळ सिनेमात तिने किरकोळ भूमिका केल्या पण तिचे पुनरागमन जाहीर केले ते गौरीने! गौरी शिंदे या मराठी दिग्दर्शिकेने ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमाची संहिताच तिचे आयुष्य समोर ठेवून लिहिली कि काय असे वाटावे इतकी ती या भूमिकेशी तादाम्य पावली, नव्हे यातील ‘शशी गोडबोले’ सर्वार्थाने जगली. 'जजमेंटल' शब्दाचा अर्थ समजावून घेणाऱ्या शशीच्या माध्यमातून ‘श्री’चं, लोक आपल्याबद्दल काय विचार करतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतेय असं वाटत राहतं आणि ‘मुझे प्यारकी जरुरत नही है, थोडी इज्जत चाहिये!’ हे आपल्या भाचीला सांगणारी शशी, संसारात स्थिरावलेल्या, घरातल्या निर्जीव वस्तूंसारख्या सवयीच्या पण म्हणूनच दुर्लक्षित राहणाऱ्या, चाळीशीतील सगळ्याच प्रौढ स्त्रियांची कैफियत मांडते.

तिचा शेवटचा ‘मॉम’ तिच्या, आणि प्रत्येकच स्त्रीच्या, शेवटी इतर सर्व भूमिकांवर मात करीत वरचढ ठरणाऱ्या मातृत्वाच्या, मायेपोटी वाट्टेल ते, अगदी गुन्हेगारी धाडस करण्यास धजावणाऱ्या अनाठायी खंबीरपणाचा, पण इतरांनी घेऊ नये असा, वस्तुपाठच जणू!


तिच्या ७२ हिंदी सिनेमांच्या कारकिर्दीत या केवळ ८ सिनेमांनी तिला ते पद बहाल केलं जे मधुबालापासून माधुरीपर्यंत आणि नर्गीसपासून विद्या बालनपर्यंत अनेकींना भुरळ पाडून हुलकावणी देवून गेलं. अभिनयाचं बावनकशी वरदान लाभलेल्या मीनाकुमारी, नूतन, शबाना, स्मिता, रेखा यांनाही जो बहुमान मिळाला नाही तो तिला न मागताच मिळाला. 

तिने वयाच्या चौथ्या वर्षापासून दाक्षिणात्य चित्रपटात काम सुरु केलं त्यामुळे ती शाळा-कॉलेज काही शिकलीच नाही, म्हणे! तिने अगदी लहान वयापासून खूप सोसलं, म्हणे! ती फारशी बडबडी नव्हती, म्हणे! सोशल सर्कल, प्रेस मिडिया या पासूनही ती अंतर राखून असायची, म्हणे! आपल्याशी संबंध असलेल्या, नसलेल्या विषयांत तिला कुणी कधी नाक खुपसतांना पाहिलं नाही, म्हणे! आपण आणि आपलं काम यातच ती लक्ष घालायची, म्हणे! काही विशिष्ट कारणांनी, काही अविशिष्ट परिस्थितीत तिला आधी मातृत्व व लगोलग पत्नीत्व बहाल करण्यात आलं, म्हणे! संसाराचा भार पडल्यावर तिला तिच्या स्वनिर्मित, ‘भारताची एकमेव महिला सुपरस्टार’ या अत्युच्च आणि अढळ पदाचा ऐन भरात असतांना राजीनामा द्यावा लागला, म्हणे! आणि आपल्या मुलीच्या याच क्षेत्रातील पदार्पण आणि भवितव्यासाठी पुनरागमन करून वातावरण निर्मितीत प्रमुख भूमिका निभवावी लागली, म्हणे!

या सगळ्याचा ताण आला म्हणून कि खूपच आनंद झाला म्हणून तिला झेपणार नाही इतकी घ्यावीशी वाटली, म्हणे आणि त्यातच ती तोल जाऊन बाथ-टब मध्ये पडून, बुडून मरण पावली, म्हणे!

शेवटच्या दोन परिच्छेदात ‘म्हणे’ ने वाक्याचा समारोप करण्याचे कारण म्हणजे या सगळ्या गोष्टी ऐकीव माहितीवर आधारित असून त्यांची शहानिशा होणे शक्य नाही आणि सुज्ञांनी तसा अट्टाहास करू नये ही अपेक्षा! शिवाय लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरविणाऱ्या माध्यमांच्या बेताल, निर्ल्लज आणि बाजारू मानसिकतेने या ज्वलंत ‘विषया’चा जो वापर करून घेतला आणि ‘पद्म’ पुरस्काराचीही मर्यादा न ठेवता तिचे मरणोत्तर जे धिंडवडे काढले त्याने काही राजकीय कार्यकर्त्यांनाही लाज आणली, म्हणे!

'समाजमाध्यम' नावाच्या समाजकंटकांचाच अधिक भरणा असलेल्या व्यासपीठाने माध्यमांची विश्वासार्हता कधीच धुळीस मिळवली असल्याने मुळात बातमी खरी आहे किंवा नाही हेच अलीकडे लवकर समजत नाही. पहिले दोन दिवस अनिश्चिततेत गेले, पुढचे दोन अनपेक्षित धक्क्यात आणि आणखी काही असहाय्य आगतिकतेत! तरीदेखील माध्यमांच्या दृष्टीने या 'बातमी'तलं 'कवित्व' अजून संपलेलं नाही!

आपल्याला प्रिय अशा कुणाच्या निधनाचे निखळ दु:खही लाभू नये, त्यातही ओतप्रोत नाट्यमयता भरून ‘दर्शकां’चे ‘मनोरंजन’ करावे असा विडा उचलेल्या (किंवा सुपारी घेतलेल्या) मुक्त माध्यमांच्या काळात हाती विषादाशिवाय काहीही उरत नाही. त्यातूनही वैषम्य याचे की, ‘म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो!’ अशी खंत म्हातारीला मारणारेच चलचित्रमाध्यमावरील आपल्या दुर्दर्शानातून व्यक्त करतात!

देशवासीयांचे 'दर्शक' आणि नागरिकांचे 'उपभोक्ते' करण्याच्या नादात लोकशाहीचे होणारे वस्त्रहरण उघड्या डोळ्यांनी बघणारे धृतराष्ट्र जोवर कौरव सभेत आहेत तोवर कुठल्याही स्त्रीचे ‘सौ’पण संपणार नाही, अगदी तिच्या नावात ‘श्री’ आणखीन ‘देवी’ असले तरी!

आज जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, श्रीदेवीच्या अकस्मिक, अनाकलनीय, अविश्वसनीय आणि तेवढ्याच असह्य भासणाऱ्या निधनाने, तिच्या आयुष्याचा आढावा घेतांना जाणविलेल्या, स्त्रीत्वाला पुरुषांनी घातलेल्या मर्यादा दृग्गोचर होतांना शतकानुशतकांची प्रगती आणि महिला मुक्तीच्या गप्पा 'श्री'च्या पडद्यावरील रुपासारख्या लोभस पण तेवढ्याच खोट्या वाटत आहेत. ‘महिला दिन’ आणि त्याच्या ‘शुभेच्छा’ यावरही उथळ आणि कणाहीन विनोद करून ते समाजमाध्यमात पसरविण्यात तत्पर असणाऱ्या स्खलनशील पुरुषसत्ताक मानसिकतेला जोवर एक धक्का मिळत नाही तोवर अशा कित्येक ज्ञान-कला-निपुण, कर्तुत्वसंपन्न आणि खंबीर ‘श्री’ या ‘सौ’ म्हणूनच कुढत आणि मरत राहतील.

बीज पोटी फळते तिच्या
अंकुरता मोहरणे मोठे...
पुरुषाला शाप भोगण्याचा
स्खलनातच पौरुष गोठे...! 

सनातन सत्ताकेंद्री पुरुषी मानसिकतेला
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने
परिवर्तनासाठी शुभेच्छा!

शुक्रवार, २ मार्च, २०१८

पुन्हा विंदा - धुळवड स्पेशल!




प्यालों किती तरीही,
प्याले न मोजितो मी;
आहे पिता-पिवविता,
तो एक, मानतो मी.

अवकाश हाच प्याला,
अन् काळ हीच दारू;
थेंबात सांडलेल्या,
ग्रहगोल पाहतो मी.

कक्षेवरी उगा का,
कलते वसुंधरा ही?
झुकली अशी कशाने,
तें एक जाणतो मी.

पापांत पुण्य मिसळी,
सत्यात अन् असत्य;
जो कॉकटेलकर्ता,
त्यालाच मानतो मी.

जो बाटलीत आहे,
आहेच तो बुचात;
हें सत्य नास्तिकांच्या,
डोक्यांत हाणतों मी.

द्राक्षांत आजच्या या, 
दारू असे उद्यांची;
आशा चिरंतनाची,
इतकीच ताणतो मी.

जातक, १९६५. 
सौजन्य - सन्मित्र शाम वाघ

गुरुवार, १ मार्च, २०१८

होळी...!


हिरण्यकश्यपूची भगिनी ही
आत्या विष्णूभक्त प्रल्हादाची
रक्षिते सत्वगुणी सज्जना अन
भक्षिते व्याधी अमंगळाची...!

असत्य, अनैतिक, अश्लाघ्य आणि अशाश्वत 
अशा सर्व अप्रस्तुत तथा अविशिष्ट तत्वांचे दहन करून,
सत्य, सत्व, सदाचार आणि सनातन
अशा सर्व सच्छील तथा सद्-विवेकी तत्वांना,
तप्त अग्नीत तावून सुलाखून उजळविणाऱ्या
होलिका मातेस शत शत प्रणाम 
या,अमंगळ ते सर्व भस्म करीत वसंतोत्सवाची नांदी देणाऱ्या
मंगलोत्सवाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

शुभम भवतु II

मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

एक तरी ओवी अनुभवावी...!




आज २७ फेब्रुवारी २०१८, मराठीतील ऋषितुल्य कवि विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस! या निमित्ताने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मराठी भाषाप्रेमींची मागणी आहे. अभिजातता म्हणजे काय याची चर्चा आपण येथे वाचली असेल तर अभिजातातेची व्याख्या व्यक्तीसापेक्ष आहे हे आधी मान्य करायला हवे. त्यापुढे जाऊन भाषेला अभिजात दर्जा मिळणे (वा मिळविणे) म्हणजे नेमके काय आणि तो असा मागून मिळत असतो काय याचा सविस्तर उहापोह करता येईल.

राजा शुद्धोदन आणि राणी महामायेचा राजपुत्र गौतमाने त्याला ‘बुद्ध’ म्हणावे म्हणून विपश्यना केली नव्हती, ज्ञानदेवांनी त्यांना ‘माऊली’ म्हणावे म्हणून पसायदान मागितले नव्हते, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ‘जाणता राजा’ म्हणावे म्हणून आज्ञापत्रे लिहिली नव्हती, रवींद्रनाथांना ‘गुरुदेव’ ही पदवी मागावी लागली नव्हती तसेच टिळक ‘लोकमान्य’ आणि गांधीजी ‘महात्मा’ सरकार दरबारी अर्ज करून झाले नव्हते. ज्या गोष्टी सर्वसामान्य माणसे मनोभावे स्वीकारतात आणि अनुकूल लोकाश्रय मिळवून जनमानसात रुजतात त्यासाठी मागण्या, याचना, विनंत्या किंवा अर्ज करावे लागत नाहीत; त्या कळीचे उमलून फुल व्हावे एवढ्या सहजभावाने परिणामास जातात.

अभिजातता संबंधी प्रकटनाच्या समारोपात आम्ही, सन्मित्र डॉक्टर चिंगरे यांचे निरीक्षण, ‘कुठल्याही निर्मिती प्रक्रियेतील प्रामाणिक प्रयत्नांचे सातत्य म्हणजे अभिजातता!’, आणि आम्हाला या विषयाचे प्रतीकात्मक रूपक म्हणून दृष्टांत देणाऱ्या 'वडाच्या पारंब्यां'चा उल्लेख वाचकांस स्मरत असेल. या दोन्हीचा संदर्भ ‘एखाद्या गोष्टीचे जाणीवपूर्वक सातत्य आणि प्रगल्भ समृद्धी तिच्या शाश्वततेकडे प्रवासास अनुकूल ठरते’ हे प्रमेय सुनिश्चित करण्यात सहाय्यभूत ठरावे.

तेव्हा, ‘अभिजात दर्जा’ची ओरड करण्यापेक्षा काही मुलभूत गोष्टी समजून उमजून केल्या तर ‘अमृतातेही पैजा जिंकणारी’ माऊलीची ‘कवतिकाची बोली’ अभिजात झाल्याशिवाय राहील काय? काय आहेत या मुलभूत गोष्टी -

१. मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याचा अट्टाहास त्यांची अवस्था ‘घरका ना घाटका’ अशी करतो हे आता त्या मुलांनाही पूर्णत: कळून चुकले आहे. गुगल सिमेंटिक्सच्या युगात विश्व-भाषेचा बडेजाव जसा उरला नाही तसेच, भारतातील दक्षिण राज्ये आणि रशिया, जपान, जर्मनी अशा बलाढ्य राष्ट्रांचे आपापल्या मातृभाषेवरील निष्ठेने काहीही नुकसान झाले नाही, उलट उत्कर्षच झाला हा इतिहास आहे. तेव्हा मातृभाषेतून शिक्षण हे प्रगतीस मारक नसते उलटपक्षी पूरकच असते हा मानसशास्त्रीय सिद्धांत व त्याची सभोवताली नित्य दिसणारी प्रमाणे मन:पूर्वक स्वीकारली पाहिजेत.

२. मराठी शाळा बंद करण्याऐवजी आधी पालकांना त्यांच्याबद्दल आपुलकी, विश्वास आणि बांधिलकी वाटेल आणि विद्यार्थ्यांना प्रेम, अभिमान आणि कृतार्थता वाटेल असे त्यांचे स्वरूप बदलायला हवे. भाषा हे केवळ माध्यम आहे आणि मूळ उद्दिष्ट ज्ञान मिळविणे हे आहे या विचाराची मशागत केली तर शाळांचे वर्गीकरण हे भाषावार न होता प्रतवार होईल आणि चांगल्या मराठी शाळांकडे अभिजनांचा ओघ सुरु होण्यास मदत होईल. शाळांचे अर्थकारण आणि दर्जा हे आधुनिक युगात आणि नवीन शिक्षणपद्धतीत परस्परावलंबी असल्याने, दर्जावर काम केल्यास अर्थकारण यथावकाश सुरळीत होईल हा विश्वास बाळगूनच काम करावे लागेल.

३. हे झाले धोरणात्मक आणि संस्थात्मक निर्णय आणि त्यांच्या अंमलबजावणीचे, पण नागरिक म्हणून आपली काही जबबदारी आहे की नाही? त्यातील पहिली आणि महत्वाची म्हणजे आपण आपले सर्व व्यवहार मराठीतून करणे आणि त्याची लाज नव्हे तर अभिमान बाळगणे. ज्ञानराज माऊली आणि युगप्रवर्तक जाणता राजा शिवाजी यांच्या भाषेची त्यांच्या वारसांनाच लाज वाटत असेल तर अभिजात दर्जा सोडा, ती भाषा तरी टिकेल काय? बरे, भाषेचे हे उपयोजनही कसे असावे? समर्थ म्हणतात तसे,


शुद्ध नेटके ल्याहावे शुद्ध शोधावे I
शोधून शुद्ध वाचावे चुको नये II


४. दुसरी जबाबदारी म्हणजे जास्तीत जास्त मराठी पुस्तके, शक्यतो विकत घेवून, वाचणे जेणेकरून मराठीत अधिकाधिक दर्जेदार साहित्य निर्मितीस पोषक वातावरण निर्मिती होईल आणि मराठी सारस्वतास अशी काही रत्ने मिळतील कि त्यांचा अनुवाद इतर भाषात होईल. आज अशी किती मराठी पुस्तके आपण सांगू शकतो ज्यांचा अनुवाद इतर भाषांत झालाय?

५. तिसरी आणि महत्वाची कटिबद्धता म्हणजे आपण जे लेखन करतो, अगदी भ्रमणध्वनीवरील संदेशाच्या रुपात का होईना, ते देवनागरीत आणि व्याकरण, विरामचिन्हे आणि केवळ मराठीस लाभलेले चिन्हे यांचा सुयोग्य वापर करून लिहू अशी मनाशी खुणगाठ बांधणे - प्रतिज्ञा, शपथ किंवा आश्वासन नको. विवेकी माणूस आपल्या मनाशी शक्यतो प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो आणि जेवढे व्यासपीठ मोठे तेवढे मोठे आश्वासन देतो आणि जेवढे आश्वासन मोठे तेवढी मोठी त्याची योजना होते, जी फसण्यासाठीच असते! तेंव्हा तसले काही न करता केवळ मनोमन दृढनिश्चय करू या...

दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे II

आज मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून दोन कविता वाचू या, कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची ‘नट’, आणि विंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांची, मराठी भाषा आणि शब्दांचे वैभव आणि सामर्थ्य दर्शविणारी १. 

नट – कुसुमाग्रज

नांदीनंतर
पडदा उघडला
तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो
हजारो रंगीबेरंगी शब्दांनी,
शरीरभर रोरावणा-या
असंख्य आविर्भावांनी
भीतींनी, आशांनी, अपेक्षांनी;
आता
भरतवाक्य संपल्यावर
प्रयाणाची तयारी करीत
मी उभा आहे
रंगमंचावर, एकटा,
समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच
संपूर्ण रिकामा.

मी उच्चारलेले
काही शब्द, अजूनही
प्रेक्षालयातील धूसर
मंदप्रकाशित हवेवर
पिंजारलेल्या कापसासारखे
तरंगत आहेत,
माझे काही आविर्भाव
रिकाम्या खुर्च्यांच्या हातांना,
बिलगून बसले आहेत,
मी निर्माण केलेले
हर्षविमर्षाचे क्षण
पावसाने फांद्दांवर ठेवलेल्या
थेंबांसारखे
भिंतींच्या कोप-यावर
थरथरत आहेत
अजूनही.
हा एक दिलासा
माझ्या रितेपणाला,
नाटक संपल्याची खंत-
ती आहेच.
नाटक नव्हे, तीन तासांचे
एक अर्करूप अस्तित्व
संपले आहे.
पण संपले आहे ते फक्त
इथे - माझ्याजवळ.
माझ्या त्या अस्तित्वाच्या
कणिका घेउन
हजार प्रेक्षक घरी गेले आहेत;
मी एक होतो
तो अंशाअंशाने
हजारांच्या जीवनात
- कदाचित स्मरणातही -
वाटला गेलो आहे.


१ – विंदा करंदीकर

अस्तित्वकोनाचा
विकास होऊन
एक दिवस
येतील, येतील
अस्तित्वाच्या
दोन्ही भुजा
एका रेषेत;
जाणीव, जगत
होतील एक;
राहील उभा
काळाचा द्विभाजक
आणि बनेल
विश्व निर्ब्रह्म
सरळ कोनाच्या
साक्षात्कारांत! 

अस्तित्वकोनाचा
विकास साधताना
गरोदर भाषेला
लागतात डोहाळे
सगुण शब्दांचे. 

पाहिजेत शब्द
करडे, काळे
रसाळ, रटाळ
रेखीव, रांगडे
चपळ, लंगडे
प्रगाढ, प्रशांत
पाहिजेत शब्द
जहाल, ज्वलंत 

पाहिजेत शब्द
ओंगळ, ओवळे
सात्विक, सोवळे
चेंगट, हट्टी
तर्कटी, मर्कटी
सुखरूप, स्वादिष्ट
पाहिजेत शब्द
गरोदर, गर्विष्ठ 

पाहिजेत शब्द
बकुळीच्या कुशीतले
दर्याच्या मिशीतले
पाहिजेत शब्दः
पहाटेच्या ओटीतले
थडग्याच्या मिठीतले 

पाहिजेत शब्द
मुसमुसणारे
धुसफुसणारे
कुजबुजणारे
पाहिजेत शब्द:
कडकडणारे! 

पाहिजेत शब्दः
विश्वाला आळवणारे
अणूला उचलणारे
रक्तांत मिसळणारे
गरोदर भाषेला
लागतात डोहाळे
सगुण शब्दांचे 

कारण शब्दांनिच
अमूर्त आशयाचे
मूर्त ध्वनीशी
लागते मंगल
आणि वाढतात
विचार - विकार
वर्गाच्या क्रमाने;
होतात जाणिवा
जागृत, समृद्ध!

बुधवार, २१ फेब्रुवारी, २०१८

मृत्युलेख..!

आज माईआत्याच्या निधनाने ८६ वर्षांचा एक प्रदीर्घ अध्याय आटोपला. आपल्या आजोबांबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची माझी शेवटची कडीही निखळली आणि उरलीसुरली आशाही लोपली. आत्याच्या या शेवटच्या काळातील घटना, त्यांचे संदर्भ आणि त्याचा बौद्धिक स्तरावर कार्यकारणभाव आणि अध्यात्मिक स्तरावर कर्मसिद्धांत याविषयी गेले काही दिवस स्वत:शी चिंतन आणि इतरांशी चर्वतिचर्वण यामध्ये विविध साक्षात्कार झाले. मनुष्यस्वभावाचे अनेकानेक नमुने आणि त्यांची परिस्थितीनुरूप क्षणोक्षणी बदलणारी रूपे पाहून अवाक व्हायला झाले. मानसशास्त्राच्या कितीही अभ्यासानंतर देखील माणसाचे मन ही जर एक खोल अंधारी गुहा असेल तर त्याची बुद्धी ही घनदाट जंगलातील विस्तीर्ण वृक्षाच्या पारंब्या आहेत हा शोध, नवीन नसला तरी, अंगवळणी देखील पडला नाही. हा विषय, 'शास्त्र असे सांगते!' आणि  कर्मकांडाच्या दृष्टीने आजपासून १४व्या दिवशी संपेल आणि आत्या कदाचित फक्त भिंतीवरील चित्र आणि तिच्याच शब्दात 'सठी सामाशी' निघणाऱ्या आठवणीच्या रूपात उरेल, पण या घटनेने पुन्हा एकदा घुसळून वर आणलेले मानवी आचार-विचार-वर्तन-विहार संबंधी प्रश्न आणि त्यांची आंदोलने जेवढी सनातन आहेत तेवढीच अमूर्त तथा कालातीत... 

या निमित्ताने, 'आपण सारे अर्जुन' असे म्हणणाऱ्या वपुंची आठवण होते आणि त्याच धर्तीवर 'आपण सारे अश्वत्थामा' असे म्हणावसे वाटते, प्रत्येकाची जखम फक्त वेगळी आणि ती सांभाळण्याची रीतही वेगळी. या अशाश्वत आणि अनित्य जगण्यात हरेक भळभळणारे ललाट तेवढे शाश्वत! 

आयुष्याच्या संधीकाली कधीतरी प्रकाशित करावी म्हणजे मृत्युलेख म्हणून खपून जाईल अशी कविता आज इथे टाकावीशी वाटतेय कारण अनासक्ती आणि विरक्तीचे महत्व इतके प्रकर्षाने जाणवण्याची संधी कदाचित पुन्हा मिळेल न मिळेल...
   
सकाळी दुपारी संध्याकाळी वेळी अवेळी
भटकायचा इतस्तत: विखुरल्या सारखा
गूढ शोधक नजरेने निरखायचा कणकण
वाटायचा निरुद्देश अन निरर्थकही कधी...

बोलायचा स्वत:शीच आणि कुणाशीही
लोकांना नव्हता वेळ ते जाणून घ्यायला
 कुणी म्हणे हा तर वेडा, कुणाला वाटे तत्वज्ञ
कुणा लेखी संशयित तर कुणी, 'हं! संभावित'

त्याला न तमा न फिकीर, नुसतीच वणवण
आणि विवंचना कधी भुकेल्या जीवांची…
चुकीच्या ग्रहात पडलेल्या आत्म्याने अन
एक दिवस दिली टाकून देहाची लक्तरे थकून

झाडली गोधडी काही आशाळभूत अन काही
लोभी कामचुकारांनी लोचट भूतदयेने जेव्हा
विचारांचा पाडला पाऊस कोंडल्या शब्दांनी
काही अलंकारही होती अजून न वापरलेले...

कुठलाच नव्हता पुरावा त्याच्या असण्याचा
तेव्हा ठरले कि हा ना अ-भूत-पूर्व ना भावी
'विषय संपवा!' म्हणाले सूज्ञ जाणते कुणी
पांढऱ्या पापणीचा म्हातारा म्हणाला… 'कवि!'

रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

हरकत..!

व्हॉटसएपवर शेअर झालेल्या या मर्मग्राही कवितेची जननी कोण याचा शोध लागला नाही. युगानुयुगांच्या पुरुषी दांभिकतेवर नेमका प्रहार करणाऱ्या या आशयगर्भ प्रकटनाच्या स्वामित्वाची कुणाला काही कल्पना असल्यास कृपया माहिती द्यावी. विशेष काही नाही, आभार मानायचे आहेत आणि आम्ही आम्हाला समर्पक वाटलेल्या नामकरणासह आमच्या ब्लॉगवर शेअर करण्यास त्या माऊलीची काही 'हरकत' नाही ना एवढी खात्री हवी आहे. या रचनेने पुन्हा एकदा 'वाचे बरवे कवित्व...'ची प्रचिती आली एव्हढेच.. 


मी विसळत होते उष्टी भांडी..
जेव्हा तू बोलत होतास, 
परिसंवादात 'स्त्री'च्या श्रमप्रतिष्ठेवर..
कुण्या एकीच्या तरी कष्टाची होईल किंमत म्हणून म्हंटल, 
"हरकत नाही"

मला रडवत होता तुझा अबोला,
जेव्हा प्रकाशित होतं होत 
'स्त्री-पुरुष संवादावर' तुझं पुस्तक..
कुणा एका नात्यात तरी बोलका होईल वाद म्हणून म्हंटल,
"हरकत नाही"

मला वेध लागले होते शृंगाराचे,
जेव्हा तू देत होतास बौद्धिक
'स्त्रीच्या भावनांची व्हावी कदर...'
कुण्यातरी 'ती'च्या नजरेला मिळेल होकार म्हणून म्हंटल,
"हरकत नाही"

धूळ खात होत्या माझ्या पदव्या,
जेव्हा तू अभिमानाने वाचली बातमी 
'अर्थशास्त्रातल्या स्त्रीच्या योगदानाची...'
एकीच्यातरी प्रमाणपत्राला मिळेल रोजगार म्हणून म्हंटल,
"हरकत नाही"

मी घेतंच होते गोळ्यांवर गोळ्या,
जेव्हा तू आग्रही राहिलास
तुझ्या बहिणीने दोघींवरच थांबावं..
त्यांच्या तरी वाट्याला येऊ नये माझ्या कळा म्हणून म्हंटल,
"हरकत नाही"

मी घरात होत गेले बंदिस्त,
जेव्हा तू झगडत राहिलास
'स्त्री मुक्ती'साठी...
एखादी तरी होईल भोगण्यातून मोकळी म्हणून म्हंटल,
"हरकत नाही"

एकदा बिचकून पाहिलं शेजारच्या घरातल्या कोपऱ्यात,
तर तीही काढतच होती उष्टी...
तीच्याही हाकेला नव्हती साद...
तीचही राहून गेलं होतं लाजणं...
तिचीही अधुरीच होती स्वप्नं...
तिचेही होतंच होते गर्भपात...
तीही तितकीच होती जखडलेली...

हादरले मी..
अन धावतच जाऊन पाहिलं प्रत्येक शहराच्या चौकात,
तर तोही म्हणत होता,
'हवी स्री-श्रमाला प्रतिष्ठा...'
'हवी स्त्रीपुरुषात निखळ मैत्री...'
'हवी स्त्री भावनांची कदर...'
'हवी अग्रस्थानी स्त्री...'
'हवी स्त्रीला निर्णयशक्ती...'
'हवी स्त्री मुक्तच...'

सगळीकडे फक्त 'तोच' बोलत होता...
तो 'फक्तच' बोलत होता...
तो फक्त 'बोलतच' होता...

आता मात्र मला  "हरकत आहे"...!

#वास्तविकआयुष्याचीकाल्पनिककथा

रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८

ध्रुव हालतो...?



नीतीचा भोक्ता, मनाचा सच्चा आणि शब्दाचा पक्का माणूस आपले परखड मत कधीही, कुठेही आणि कसेही व्यक्त करण्यास मुळीच कचरत नाही... ते स्वत:बद्दलचे आणि अव्यवहार्य ठरू शकणारे असले तरी! आत्मभान ही मानवी अस्तित्वाची उन्नत पायरी असली, आत्मस्तुती किंवा आत्मवंचना ही आत्मचरित्राचीच ‘स्वान्त सुखाय’ पाने असली आणि उदासीन आत्मपरीक्षण आणि त्याच्या साक्षेपी विश्लेषणाचे काव्यात्म प्रकटीकरण हे प्रसंगी आत्ममग्नतेचे लक्षण वाटले तरी ते अनुभूतीचे भावविश्व जेव्हा वैयक्तिक न राहता वैश्विक होत समस्त मानवांना सामावून घेते तेव्हा त्याचे बदलले परिमाण केवळ एका घायाळ पराभवाचा विषाद न उरता ‘विश्वाचे आर्त’ मांडणारा निषाद ठरतो! अगदी कोवळ्या वयात अशा अथांगतेचे सार उमजण्यास ज्ञानेश्वर जन्मावा लागतो आणि ‘अगदी माझ्याच मनीचे बोल हे...’ असे सर्वसामान्यांस वाटायला लावणारा भाव शब्दात बांधण्यास तो कवि करंदीकर असावा लागतो...

विंदांच्या माझ्या हृदयस्थ कवितांमध्ये मानाचे स्थान असलेली जातक मधील ही आर्त गझल...?

मी ऐकले ध्रुव हालतो

मी ऐकले ध्रुव हालतो, त्याचे काही वाटले;
माझेच काही मागचे माझ्या गळ्याशी दाटले.

विजनातल्या सुपथावरी तुजला दिल्या शपथा किती,
रहदारिच्या रस्त्यावरी ते शब्द आता फाटले.

अयशात होतो धुंद अन् सुयशात झालो सुंद मी;
हरवून माझा ध्यास मी हे काय भलते गाठले.

पंखात होती झेप अन् डंखात होती चेतना;
मी पाय येथे रोवण्या ते पंख माझे काटले.

गर्दीत मी घुसलो किती; जेथे कोणी सोबती.
साथीस उरली सावली... हे सोंग माझे कोठले?

होता कुठे, आला कुठे - तो शाश्वताचा सारथी!
दर्याच सरला मागुती की सांडपाणी आटले?

जातक, १९६५

रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

गझल आरतीचा...


श्रीयुत चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांच्या मातोश्री कोकणातल्या कुठल्याशा गावात खानावळ चालवीत. हे महाशय तेथें गल्ल्यावर बसून कविता करीत. खानावळीत जेवायला येणाऱ्या काही काव्यरसिकांनी त्यांच्या कविता म्हणे चोरून ‘मौज’मध्ये प्रकाशनासाठी ‘आरती प्रभू’ या नावाने धाडून दिल्या आणि त्या चक्क छापून आल्या. एवढेच नव्हे तर रसिकांना खूपच भावल्या देखील आणि मराठी सारस्वताला ‘आरती’ विना हा ‘प्रभू’ गमला...! विंदानी आपल्या या सन्मित्राला उद्देशून एक कविता लिहिली आणि ती वाचतांना गझलच्या अंगाने गेल्यासारखी वाटली म्हणून तिचे नामकरण केले, ‘गझल आरतीचा!’... तोच हा गझल...

निस्तब्ध टिंबाभोवती बिंबावले ज्याचें जिणे
त्याची न निरखा पाऊले; काही अती, काही उणे.

ज्याला अनोखे जाहले हे ओळखीचे चेहरे,
त्याच्या खुळ्या शब्दांतुनी त्याची कथा का शोधणे?

आकाश कातळ जाहले तेव्हाच पूरहि संपला;
धरित परके वाहते; काठास का तें आणणे?

शोधीत गेली जी गती आकाशगंगेची मुळें,
कां तिला या फूटपट्या लाकडाच्या लावणे?

ध्यास नव्हता त्याजला तुमचें भलें करीनसा;
उसनी भलाई कासया पदरांत त्यांच्या बांधणे?

अध्यास ध्यासाचाच तो; श्वास तो असण्यांतला;
उपकार श्वासाचे न या निश्वास सोडुन संपणे.

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

मी...

 

मिटता शून्यवत,
उमलता विश्वरुप मी
धरती जेवढी तेवढाच
पसरतो व्योमी...!