बुधवार, २१ एप्रिल, २०२१

गुरुजी...!

मराठी माध्यमातून शालेय शिक्षण घ्यावे लागणे ही सहानुभूती दाखविण्याची गोष्ट नसण्याच्या काळात आमचे संपूर्ण शिक्षण पूर्ण झाले. अगदी पदव्युत्तर शिक्षण आणि विद्यावाचस्पती झालेले आमचे सहाध्यायी आणि वर्गमित्र यांना कधीही मराठी माध्यमाचा अडसर वाटलेला आम्हाला जाणवला नाही; पश्चाताप किंवा लाज तर मुळीच नाही उलट, काही ‘सन्मानीय’ अपवाद वगळता, बहुतेकांना आपल्या मातृभाषेचा सार्थ अभिमान कायमच वाटत आला आहे ! किंबहुना आपली मातृभाषा नसल्याने ‘इंग्रजी’ची ओळख ब्रिटिशांची भाषा म्हणजेच ‘साहेबा’ची भाषा, म्हणजेच वाघिणीचे दूध अशी कायमच परकी राहिल्याने तिच्या बाबतीत अतिपरिचयात अवज्ञा न होता एक भीतीयुक्त दुरावा कायम राहिल्याने, त्याबाबतीत जवळीकीने येणारी कुठलीही आगळिक न होता, आमच्यासाठी ‘येस’ चा कधीही ‘येप’ वा ‘याss’ झाला नाही, ‘नो’ चा ‘नोप’ झाला नाही आणि गुरुजींचा ‘पोप’ झाला नाही ! इयत्ता पाचवी मध्ये या भाषेची तोंडओळख होतांना, ‘ही आपली मातृभाषा नसल्याने साहेबाला जेवढे मराठी (किंवा हिन्दी) येईल तेवढी इंग्रजी आपल्याला जमली तरी पुरे’ हे अत्यंत धीर देणारे बाळकडू आणि, गणितातील प्रमेयाइतकेच किचकट वाटणारे ‘स्पेलिंग’ हे प्रकरण, त्याची सहज समजेल व जमेल अशी फोड करून (Theatre – The Atre) लीलया आत्मसात करण्याचे कसब शिकवणारे गुरुजी लाभल्याने, आज त्यांच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी विविध विषयावर इंग्रजीतून लिहिलेले शोधनिबंध (Research Papers) जगभरात वाचले आणि वाखाणले जातात, ही एक उपलब्धी... त्या व्रतस्थ गुरुजींची ! 

गध्द्धेपंचविशीत ब्रह्मचर्य नासून ‘गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही...’ अशी लाजिरवाणी अवस्था होऊ नये म्हणून समाजव्यवस्थेने ‘विवाह’ नावाचा संस्कार प्रचलित केला. या योगे, दोन जीवांचे देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने मिलन व्हावे आणि दोन कुटुंबांची सुखदु:खे एकत्र बांधली जावी आणि उभयतांनी ‘नातीचरामी’ म्हणत शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाची सोबत करावी जेणे करून त्यांना, घरातील वडीलधाऱ्यांची सेवा-शुश्रूषा करतांनाच, एक सूज्ञ, सुसंस्कृत, सुशील आणि जबाबदार पिढी घडवून मनुष्य प्रजातीचे संवर्धन करता येईल अशा उदात्त हेतूने विवाह संस्काराचे प्रयोजन केलेले आहे ! शंभरातल्या ९९ नवविवाहितांना यातील काहीही माहीत असण्याची सुतराम शक्यता नाही कारण, ‘आठवतील ते मंत्र म्हणून लग्न लावणारा भटजी आणि त्याने लवकर ‘आटपावे’ म्हणून त्याला आमिष दाखवणारा, गुडघ्याला बाशिंग बांधलेला उतावीळ नवरा’ अशा, सर्वच मनोरंजन माध्यमांच्या आवडीच्या विनोदनिर्मितीत(?) संस्कार आणि त्यामागची भूमिका समजावून देण्यास न भटजीस उत्साह न नवरदेवास उसंत ! या पार्श्वभूमीवर, अक्षरश: दिवसभर चाललेला आमचा विवाह संस्कार आणि त्यातील प्रत्येक उपचाराचे शास्त्र जाणून घेण्याची आमची जिज्ञासा आणि प्रत्येकवेळी आमचा कान पकडून अत्यंत तळमळीने ते आम्हाला समजाऊन सांगण्याची आमच्या गुरुजींची चिकाटी आणि त्यामागचा व्यासंग यामुळे आमचा विवाह संस्कार केवळ प्रासंगिक सोहळा न होता सहजीवनाच्या जाणिवा समृद्ध करणारा एक निरंतर उत्सव झाला नसता तरच नवल!

उपरोक्त दोन्ही विषयांमधील समान सूत्र म्हणजे आमचे गुरुजी – श्री. बी. एन. जोशी सर! पायजमा-सदरा-टोपी-खडू या वेषातील न्यू सिटी हायस्कूलचे इंग्रजी शिक्षक आणि धोतर-सदरा-टोपी-उपरणे या वेषातील आमचे कुल-उपाध्याय! प्रकांडपंडीत विद्वान आणि आद्य व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर आम्हाला ज्यांच्या रूपाने भेटले त्या जोशी सरांनी आम्हाला इंग्रजीची मुळाक्षरे गिरवितांना तिची भीती तर वाटू दिली नाहीच उलट तिच्या गाभ्यात शिरून तिला केवळ आत्मसात करण्याचे कसबच नव्हे तर एका परक्या भाषेवर प्रभुत्व मिळविण्याची पायाभरणी करून दिली. आजही आम्ही इंग्रजांसारखे (किंवा इंग्रजाळलेल्यांसारखे!) फाडफाड इंग्रजी बोलू शकलो नाही तरी आमच्या इंग्रजी लिखाणाने साहेबालाही घाम फोडू शकतो याचे श्रेय निर्विवादपणे जोशी सरांचे ! आणि विवाहाला केवळ सोय किंवा बंधन (आजच्या बेबंद वेगाच्या धरसोडीच्या युगात ‘तडजोड’ किंवा ‘करार’) न मानता संस्कार मानल्याने समृद्ध झालेल्या आमच्या गृहस्थाश्रमाला लाभलेले मार्गदर्शन आणि आशीर्वाद हेही जोशी सरांचे आमच्यावरील स्नेहमयी अमिट ऋण... ज्यात आजन्म रहायला आम्हाला आवडेल !

आज हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे, इस्पितळात आपल्या भेटीस आलेल्या स्नेह्यानांच धीर देणाऱ्या आणि वयाच्या ८५ व्या वर्षी विषाणूशी धीरोदात्तपणे मुकाबला करणाऱ्या जिंदादील जोशी सरांची प्राणज्योत आज मालवली. पण आनंद सिनेमात अमिताभ म्हणतो, ‘आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं !’ तसे शिक्षकही संपत नसतात, त्यांनी देह ठेवला तरी त्यांचे संस्कार शाश्वत असतात... ते पिढ्यानपिढ्या निरंतर संक्रमीत होतात. त्यांचे पुतळे उभरायची गरज नसते कारण त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनातील त्यांच्या प्रतिमा कधीही पुसल्या जाऊ शकत नाही. म्हणूनच, ही जोशी सरांना श्रद्धांजली नव्हे तर त्यांच्या समस्त विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना दिलेले वचन आहे ‘...आम्ही चालवू हा पुढे वारसा...’

II श्रीराम जय राम जय जय राम II

रविवार, २८ मार्च, २०२१

चतुराई...!


सिंहाने आपल्या श्वासाची दुर्गंधी येते काय जाणून घ्यायला कुत्र्याला बोलावले.

‘माझ्या तोंडाचा घाण वास येतो काय रे?’

‘होय महाराज, येतोय खरा!’ इमानी कुत्र्याने खरेखरे सांगितले.

सिंहाला सत्य ऐकून राग आला आणि त्याने एका फटक्यात कुत्र्याचे प्राण घेतले.

खात्री करून घ्यावी म्हणून सिंहाने लांडग्याला बोलावले आणि विचारले,

‘काय रे, माझ्या तोंडाची दुर्गंधी येते काय?’

कुत्र्याचे काय झालेय ते बघून लबाड लांडगा सावधपणे म्हणाला,

‘छे, छे, महाराज! काहीतरीच काय ? तुमचा श्वास उसासारखा गोड आहे !’

खोटी स्तुती करतो म्हणून राग आल्याने सिंहाने लांडग्याच्याही नरडीचा घोट घेतला.

आता पाळी कोल्हयाची होती. सिंहाने कोल्हयाला विचारले,

‘तू नीट सांगशील का रे, माझ्या श्वासाला घाण येते का ते?’

धूर्त कोल्हयाने आपल्या मित्रांची दशा पहिली होती आणि ‘हो’ म्हणा किंवा ‘नाही’ म्हणा, मरण काही टळत नाही या कल्पनेने त्याला युक्ती सुचली !

कोल्हा म्हणाला, ‘महाराज, माफ करा पण काही दिवस झाले माझ्या तोंडाची चवही गेलीय आणि नाकाला वासही येईना झालाय...

कोरोनाची लागण झालीय बहुतेक, कोव्हिड टेस्ट करून घ्यावी म्हणतो...!’

-------------------------------------------------------------------

सत्तेपुढे शहाणपण चालत नसते पण चतुराई चालायला हरकत नसावी आणि चतुराईला कुठलेच मापदंड लावायचे कारण नाही कारण ती तशीही विधिनिषेधशून्यच असते... म्हणे! मोक्याच्या क्षणी, ‘नरो वा कुंजरोवा...’ अशा संदिग्धतेत सत्य लपवून, भारतवर्षाचा भूगोल आणि इतिहास बदलणारा ‘धर्म’ लाभलेली नीतीमत्ता, कालौघात ‘बळी तो कान पिळी’च्या वाटेने गेल्यास नवल ते काय...? तेव्हा तूर्तास, तुकोबारायांची ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही...’ ही शिकवण साफ दुर्लक्षून कुठलीच बाजू न घेता कुंपणावर बसावे आणि राजधर्म राखावा हे धूर्त कोल्हयाचे कातडीबचाऊ धोरण, श्रेयस्कर नसले तरी, अगदीच सोईस्कर... कसे ?

-------------------------------------------------------------------

खुलासा: प्राण्यांसंबंधी असलेली ही पारंपारिक जातक कथा कुणाला उपहासात्मक व्यंग भासली तर तो वाचणाराचा दृष्टिदोष आणि यातील पात्रे बातम्यांमध्ये भेटल्यासारखी वाटली तर तो निव्वळ योगायोग. सदर बोधकथा पूर्णत: अराजकीय पण मूल्य(शिक्षण) देणारी आणि केवळ प्रबोधनात्मक आहे !

...आणि हो, एवढा खुलासा करूनही कुणाला काही खटकल्यास... 

बुरा न मानो होली है !

रविवार, २१ मार्च, २०२१

कूजन...!


विषयाची धरुनी कास
बुद्धी लावली पणास
होता भ्रमनिरास
झाली गोची !

विवेकाचा होत अभाव
भावनेला मात्र वाव
राघूंना खरा भाव
पोपटपंची !

नीरक्षीर विवेक नाही
मनास धनाची ग्वाही
नांदते लोकशाही
बलवंतांची !

रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१

आरसा...!


तुपात तळली,
साखरेत घोळली
इतकी साजूक नाही
कविता माझी...

दु:ख कुरवाळेल
वेदना जोजवेल
तितकी नाजूक नाही
कविता माझी...

उगा विभोर होईल 
फुलापानी गाईल 
इतकी भावूक नाही
कविता माझी...

विवेक जागवेल 
विचार पेटवेल
तितकी घाऊक नाही
कविता माझी...

माझी कविता
माझ्यासारखी
‘मना’चा आरसा
कविता माझी...!

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

पर्याय...?


काळ चालला पुढे अन्
त्यासह सृष्टि सारी
जो बदलत नाही
त्याने घ्यावी खबरदारी..!

फुटतो बीजास अंकुर
कळीतून उमले फूल
फुलाचे होतेची फळ
जर खुडले ना मूळ..!

कालगती ही न टळे कुणा
रंक असो वा राजा
साऱ्यांना रोजच मिळतो
एक नवा दिवस ताजा...!

कुठला दिवस कुणाचा
हे ठरवितो काळ
कुठे हार जीवघेणी
कुणा विजयाची माळ...!

संधी जेव्हा चालून येते
सोने कसे होईल पाहणे
पर्याय नेहमीच असतो
संयमाने अजिंक्य राहणे...!

गुरुवार, १४ जानेवारी, २०२१

अनुबंध...!


सृजनाचा आरंभ
तेजाचा समारंभ
तीळगुळाची गोडी
अन् स्नेहाचा अनुबंध...!

रविवार, १० जानेवारी, २०२१

अज्ञ...?


स्वाभिमानी नकारांची परंपरा कालबाह्य झाली आणि
षंढ होकारांचा परिपाठ प्रचलित तथा प्रतिष्ठित झाला
त्या अर्धसत्याच्या क्षितिजावर बसलेल्या कावळ्यांना
रोजच कुठल्याशा पिंडाला चोच मारायची मुभा मिळाली
आणि रोज एक बळी देणे भाग झाले कुठल्याही घराला…

आज जे सुपात ते उद्या जात्यात एवढेही कालभान नाही
काळामागे धावणाऱ्या गांधारीच्या औक्षहीणी पौत्रादिकांना
आणि जेता म्हणून मिरविणाऱ्याचा अंगुलीमाल झालाय म्हणून
पोरगेल्या अभिमन्यूचा वध झाला की हत्या ते ठरायचेय अजून... 

अमरत्वाच्या शापाने कपाळमोक्ष झालेला अश्वत्थामा
आजही कामी येत नाही अधर्मी सुतपुत्र कर्णाच्या, कारण
मैत्र-माणुसकी-दातृत्व प्रथाच नाहीत कुठल्याच धर्माच्या
आणि कुठलाच रंग आपलासा न करणारा नकोसा होतो
प्रस्थापितांच्या लालसेला आणि स्थितिगमनी व्यवस्थेला...

या साऱ्या परात्पर असंक्रमणाच्या केंद्रस्थानी उभा
निर्माता, संचालक, प्रशासक की निव्वळ प्रतिहारी
याचे परिघावरील साऱ्यांनाच भान येत नाही तोवर
विकेंद्रीकरण देखील स्वकेंद्रितच आणि नियमनही
भले जागराचा चालो अट्टाहास जागल्याच्या स्वप्नीलतेतून...

‘परिवर्तनही संसारका नियम है... ’ म्हणून बदल क्रमप्राप्त
फक्त त्याचे मोजमाप दंडसंहिता ठरविणारे विधाते भलतेच
नियतीच्याही नियतीवर नियंत्रण मिळवू पाहणारे नियामक
छद्मविज्ञानाचे साधक म्हणून सत्ताधीशांना सहज भुलणारे
तर तत्वचिंतक डोंबाऱ्याच्या पोरासारखे… दोरीवर झुलणारे!

नेमका कुणाचा पक्ष घ्यावा की दक्ष राहावे या संभ्रमात मी...
आदिम...
अनंत…
की अज्ञ...?

Image Credit: http://www.jantakiawaz.org/category/article/news-622782

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

उन्मेष...!


कलाकार तो अदृश्य सर्वभर
ओळ उमटते कधी झर झर
पडद्यामागून रेखितो कुंचला
कधी चित्रातून निसर्ग निर्झर

गतस्मृतींनी दाटता गहिवर
उमटते भयचित्र पटलावर
नव्या चित्रात भरू रंग नवे
फुलपाखरांचा मुक्त वावर

सोसाट्याचे वारे नी वादळ
झाडे साहती जरी पानगळ
वसंताची लागताच चाहूल
कोंब नवा गर्भात सळसळ

नवा जन्म मनाच्या कुशीत
नवे कूजन नव्याने खुशीत
होऊ या सज्ज घडविण्या
येणाऱ्या वर्षा नव्या मुशीत

रविवार, २७ डिसेंबर, २०२०

निरोप...!


मित्राशी सुखदु:खाच्या मनसोक्त गप्पा झाल्यावर तो दिवेलागणीच्या वेळी घराकडे परत जायला निघाला. मित्र म्हणाला, आता थोड्या वेळातच अंधार पडेल, रात्रीचा अंधारात प्रवास करण्यापेक्षा मुक्काम कर. रात्री आणखी थोडे हितगूज करू, सकाळी ताजेतवाने होऊ आणि मग जा तू आपल्या मार्गाने...

तो म्हणाला, ‘नको! कारण, दोन गोष्टी – एक म्हणजे समारोप कधी लांबवू नये, निरोप नेहमी चटकन घ्यावा म्हणजे सहवासांच्या क्षणांचा मिळालेला आनंद दीर्घकाळ टिकतो. आणि दुसरे म्हणजे अंधाराची तमा त्यांना ज्यांना उजेडाची सवय आहे. माझ्यासारख्या जन्मांधाला कसला दिवस आणि कुठली रात्र, रात्रंदिन आम्हां तमाचाच सहारा...!’

त्याच्या स्वरातला विषाद मित्राला हेलावून गेला आणि मैत्रीच्या पोटी असलेल्या मायेच्या उबेतून मित्र म्हणाला, ‘ठीक आहे, जशी तुझी इच्छा पण थांब मी कंदील पेटवून देतो तेवढा सोबत ठेव म्हणजे माझ्या जीवाला घोर लागणार नाही.’
‘चेष्टा करतोयस का? अरे जिथे मला दिसतच नाही तिथे कंदिलाचा उजेड काय प्रकाश पाडणार...?’ तो म्हणाला.
‘मित्रा, तुला दिसत नाही हे मान्य पण तुझ्या समोरून कुणी अंधारातून आला तर कंदिलामुळे त्याला तर तू दिसशील...’

मित्राचा युक्तिवाद पटल्याने मित्राच्या इच्छेला मान देवून तो कंदील घेऊन मार्गस्थ झाला. रस्ता सवयीचा असल्याने तो झपाझप चालू लागला. बरेच अंतर पार केल्यावर आणि रात्र बरीच झाल्यावर अंधारातून अचानक कुणीसे त्याच्या अंगावर आदळले आणि तो भेलकांडला. अत्यंत सात्विक संतापाने तो ओरडला, ‘मुर्खा, दिसत नाही का...’

आपल्या अशा उद्धाराने चिडलेला वाटसरू म्हणाला,
‘हेच मीही तुला विचारू शकतो, डोळे फुटलेत का तुझे...?’
‘अरे बाबा, मी जन्मांध, माझे डोळे जन्मत:च गेलेले पण तुझ्या दृष्टीला काय झालं? तू तर बघू शकतोस ना?’
‘हो तर, मी बघू शकतो पण अमावस्येच्या रात्रीच्या एवढ्या मिट्ट काळोखात दिसायला दिव्यदृष्टी नाही मला!’
‘मित्रा, त्याची कल्पना आहे म्हणून मी हातात पेटता कंदील घेऊन चाललो आहे ना, त्याचा उजेड नाही दिसला?’
‘कंदील? कुठे आहे कंदील? अच्छा हा इकडे पडलेला होय?
त्याची वात केव्हाच निवलीय बुवा, तुम्हाला पत्ताच नाही!’

-------------------------------------------------------------------------------------
कुणाच्याही उसन्या प्रकाशाने आपला मार्ग थोडा काळ उजळल्यासारखा वाटू शकतो. मात्र वाटेतले अडथळे, खाच-खळगे टाळून दूरचा पल्ला गाठायचा तर उसना प्रकाश फार उपयोगाचा नाही, त्यासाठी ‘अप्प दीपो भव’ अर्थात ‘तूच तुझ्या मार्गाचा प्रकाश हो’ हा बुद्धाचा सल्ला मानायलाच हवा.
 
शेवटचे चार दिवस शिल्लक असलेले २०२० हे वर्ष त्या हितचिंतक मित्रासारखे आहे जे आपल्याला सहाय्यभूत ठरू शकतील अशी साधने देऊ इच्छिते. आपला पुढचा प्रवास सुखरूप व्हावा म्हणून या मित्राने आपल्याला त्यासाठी सिद्ध करण्याची एकही संधी सोडलेली नाही.

अगदी कठीण अशा घटक चाचण्या (आठवा: लॉकडाऊन), सहामाही परीक्षा (बघा: कोरोना चाचण्या) आणि आता वार्षिक परिक्षा (पक्षी: लसीकरण) घेऊन त्याने आपली चांगलीच तयारी करून घेतलेली आहे. आता आपली तयारी कितपत झाली आहे याचीच खरी परीक्षा आहे. आपण आपल्या अंत:चक्षुनी गेल्या वर्षभरातील अनुभवांकडे डोळसपणे पाहून काही शिकणार आहोत की आपल्या चर्मचक्षुंना दिसते तेच खरे मानून आंधळेपणाने भौतिकातच गुंतून पुन्हा त्याच दुष्टचक्रात अडकणार आहोत हा निर्णय सर्वस्वी आपला आहे.

एक वर्ष सरते आणि दुसरे सुरु होते म्हणजे खरतर फक्त भिंतीवरचे कालनिर्णय बदलते. वर्ष ‘बदलले’ किंवा ‘नवे’ वर्ष सुरु झाले असे तेव्हाच म्हणता येईल जेव्हा आपला दृष्टीकोन बदलेल, सवयी बदलतील, जीवनशैली बदलेल. दिवस तर रोजच नवा असतो पण त्या नव्या दिवसाचे आपण काय करणार हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर कुठल्याही पुस्तकात तर सोडा, गुगलकडे पण असू शकत नाही... ज्याचे त्यालाच शोधावे लागते. ज्याला सापडते तो सुखी-समाधानी होतो ज्याला नाही सापडत तो टीकाकार '(अतृप्त आत्मा?) होतो... बघा तुम्हाला कोण व्हायचे आहे?

...आणि हो, आपण जन्मांध असलो म्हणून काहीही बिघडत नाही, विवेकाने जगायला दूरदृष्टी लागते, डोळ्याने तर प्राण्यांनाही दिसते! दुसरे, आपल्या कंदिलाची वात विझली आहे हे समजायला उजेडाचीच गरज असते असे नाही, कंदिलाच्या काचेची ऊब कमी झाली यावरूनही ते समजायला हरकत नाही. पण त्यासाठी मन संवेदनशील हवे आणि जाणीवा प्रगल्भ... नव्या वर्षाचा कुठलाही दिखाऊ अल्पजीवी संकल्प करण्यापेक्षा हे साधता येईल...? आलेच तर सच्चिदानंद...

सरत्या वर्षाचा निरोप घेतांना त्याने दिलेला प्रकाश साठवून ठेवून स्वयंप्रकाशित होण्याचा प्रयत्न करू या... शुभम भवतु !

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

(जाय)बंदी...!

विकासाची हाव करी
नष्ट वने घनदाट...
दिशाहीन भटकता
प्राणी रोज चुके वाट !

'निती’च्या राज्याची
वाट चुकला रानगवा...
त्याला धडा शिकविण्या,
उन्मादी माणसांचा थवा !

बेबंद शहरीकरण
घुसमटतो रोज श्वास...
मृगजळामागे धावता
होती नित्य नवे भास !

कुणी गाठतो मरणा
ऊरस्फोड धावून...
अन कुणी साधतो ते
गळा फास लावून !

बहुतांचे आशास्थान
तरी वाटे मुक्ती हवी…
बदलता रचना सारी
व्यवस्थाही रोज नवी !

कोठे परंपरांचे जोखड
भक्तीची रिकामी कोठी…
तत्व हळूच गळून जाता
समष्टिहून व्यक्ती मोठी !

हत्येला वध म्हणण्याची
पुराणोक्त परंपरा आहे...
स्वसंरक्षणार्थ हिंसा येथे
सर्वच धमन्यांतून वाहे !

उरेल सापळाच फक्त
विरता मूक आकांत...
अन्वयार्थ समजविण्या
‘नीती’मान एक कांत !

सारे साऱ्यांच्या भल्याचेच
खोट संकल्पात नाही...
आमच्या नेक इराद्यांना
नडते अतिलोकशाही !