रविवार, ४ जुलै, २०२१

कौशल्य...!


कबीर विणकर होता, हातमागावर कापड विणत असे. रोजच्या उदरनिर्वाहासाठी लागेल एवढे वस्त्र रोज विणावे आणि बाजारात तेवढे दाम मिळाले की विकून घरी परतावे असा त्याचा शिरस्ता होता.

एक दिवस विणलेले वस्त्र ५ मुद्रांना विकून परतावे म्हणून बाजारात उभा राहिला. सकाळची दुपार आणि दुपारची संध्याकाळ होत आली तरी त्याच्या वस्त्रास कुणी २ मुद्रांपेक्षा अधिक देण्यास तयार होईना.

हताश झालेल्या कबीराची अवस्था पाहून एका कुशल विक्रेत्याला त्याची दया आली. विक्रेत्याने त्याच्याकडचे वस्त्र घेतले आणि बाजाराच्या चौकात उभे राहून हाळी दिली,
‘लोकहो, बघा, बघा ! या वस्त्राची पोत बघा, रंग बघा आणि किती तलम आहे ते तरी बघा. इतके सुंदर वस्त्र, जे एरवी तुम्हाला बघायलाही मिळणार नाही ते, फक्त आणि फक्त १२ मुद्रांना उपलब्ध आहे, अशी सुवर्णसंधी हातची घालवू नका !’

त्याच्या या जाहिरातीला भुललेल्या लोकांची एकच झुंबड उडाली आणि विक्रेत्याने ते वस्त्र १२ मुद्रांना हातोहात खपवले. पांगापांग झाल्यावर विक्रेता कबीराकडे आला आणि म्हणाला,
‘बघितलस ? असं कौशल्य लागतं विकायला. तुला ५ मुद्रांची अपेक्षा होती, या घे १०, दामदुप्पट ! माझ्या दलालीच्या २ मुद्रा मी ठेवतो !’

कबीर हात जोडून म्हणाला, ‘महाराज, माझ्या कामाची आणि माझ्या उत्पादनाची किंमत मला माहितीय आणि मला तेवढीच अपेक्षित आहे. वरची ‘कमाई’ ही आपल्या ‘कौशल्या’ची आहे, तेव्हा ती आपणच ठेवा आणि मला माझ्या ५ मुद्रा द्या म्हणजे मी निघतो...!’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा