शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

(जाय)बंदी...!

विकासाची हाव करी
नष्ट वने घनदाट...
दिशाहीन भटकता
प्राणी रोज चुके वाट !

'निती’च्या राज्याची
वाट चुकला रानगवा...
त्याला धडा शिकविण्या,
उन्मादी माणसांचा थवा !

बेबंद शहरीकरण
घुसमटतो रोज श्वास...
मृगजळामागे धावता
होती नित्य नवे भास !

कुणी गाठतो मरणा
ऊरस्फोड धावून...
अन कुणी साधतो ते
गळा फास लावून !

बहुतांचे आशास्थान
तरी वाटे मुक्ती हवी…
बदलता रचना सारी
व्यवस्थाही रोज नवी !

कोठे परंपरांचे जोखड
भक्तीची रिकामी कोठी…
तत्व हळूच गळून जाता
समष्टिहून व्यक्ती मोठी !

हत्येला वध म्हणण्याची
पुराणोक्त परंपरा आहे...
स्वसंरक्षणार्थ हिंसा येथे
सर्वच धमन्यांतून वाहे !

उरेल सापळाच फक्त
विरता मूक आकांत...
अन्वयार्थ समजविण्या
‘नीती’मान एक कांत !

सारे साऱ्यांच्या भल्याचेच
खोट संकल्पात नाही...
आमच्या नेक इराद्यांना
नडते अतिलोकशाही !

गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

पन्नाशी...!


नवा दिवस रोज बघावा अन प्राजक्त व्हावे
निर्माल्याच्या काळजीने का फुलणेच रहावे?

फुलांस नसते चिंता आपल्या प्रारब्ध योगाची
तळवे सुगंधीच करते निर्माल्यही सहज भावे!

क्षण थांबत नाही पळभर, काळ चालतो पुढे
सुखांनाही लागते जागा हे का मनास न ठावे?

चाफ्याच्या अबोल्याची नाळ बांधलेली वेदनेशी
मोहरण्याच्या चाहूलीने मुक्त गाणे स्वच्छंद गावे!

फुलं गळतात म्हणून कळीचं राहत नाही फुलणं
रिकाम्या गाभाऱ्यातही भक्तिरसच सर्वभर धावे!

प्रवास हा कोहम पासून सोहम पर्यंत एकलाच
‘नेती नेती’चे भान जपत प्रपंचात वैराग्य ल्यावे!

रंगूनी रंगात साऱ्या रंग असावा वेगळा
मुक्तात्मा स्वयंभू, जाणतो सारेच कावे!

निर्माल्याच्या काळजीने का फुलणेच रहावे?
नवा दिवस रोज बघावा अन प्राजक्त व्हावे...

प्रिय बंधुसखा योगाचार्य कुमार अर्थात रंगांचा किमयागार वैभव पुराणिक याचे
नाबाद अर्धशतकाबद्दल मनस्वी अभिनंदन आणि निरामय शतकासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

दुभंग


चित्रपट या सर्वात लोकाभिमुख आणि लोकप्रिय प्रबोधन मंचावर बुद्धीचा कस आणि जाणिवांची मशागत करीत पोसलेल्या समाजाला, ‘मेरे पास मां है...’ चा सोयीस्कर विसर पडला पण ‘जब तक एक भाई बोल रहा है एक भाई सुन रहा है, जब एक मुजरीम बोलेगा तब एक पुलीस अफसर सुनेगा...!’ यातील दुभंग मात्र चांगलाच मानवला. म्हणजे एकतर भावनावश होऊन इमोशनल ब्लैकमेल नाहीतर थेट कर्तव्य कठोरता... एक संवेदनशील माणूस दुसऱ्या संवेदनशील माणसाशी केवळ माणूस म्हणून, कुठलीही संधी न साधता, थेट संवाद साधू शकत नाही...?

नैतिकता, सचोटी, नीतिमूल्ये अशी सामाजिक लक्षणे कधीच कालबाह्य झाल्याने व्यवहारात कुचकामी ठरु लागली आणि बाजारशरणता, नफेखोरी, चंगळवाद आणि या सगळ्याला एका सूत्रात बांधून आधुनिक जगण्याची जणू काही संहिताच ठरलेली ‘हमाम मे सब नंगे...’ ही प्रगत मान’सिक’ता ‘नव-मूल्यव्यवस्थे’ची धरोहर ठरली. या व्यवस्थेमध्ये मूळ संतवचनाचा ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू कुपंथ किंवा होऊ श्रीमंत...’ असा पंथ-विचार प्रचलित झाला आणि नैतिकतेची केवळ व्याख्याच नव्हे तर परिमाण, आयाम आणि अर्थात परिणामही पूर्णत: बदलले.

अशा सभोवतालात, व्यक्ती, वृत्ती आणि कृती यात अभंग राहून, ‘मी आणि माझे कर्म’ म्हणजेच ‘माझे अस्तित्व आणि माझे कर्तृत्व’ या दोन निराळ्या गोष्टी नसून माझीच अभिन्न अभिव्यक्ती आहे असे मानणारे; तळ्यातल्या सुरेख  बदके पिल्लातले कुरुप वेडे पिल्लू ठरले नसते तरच नवल! स्वत:च्या सचोटीचा अभिमान बाळगणे म्हणजे अत्यंत मागासलेपणाचे लक्षण ठरणाऱ्या आजच्या अधिभौतिक काळात प्रामाणिकपणा जपणे हे निखालस धाडसाचे काम ठरावे... ही या सर्वात प्रगत जीव – होमो सेपियन अर्थात ‘शहाण्या माणसा’ची शोकांतिका!

सांप्रत सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय विषयांवर अत्यंत निर्भीडपणे परखड भाष्य करण्याची एकही संधी न सोडणारे आणि समाजातील सर्व स्तरातील घडामोडींवर आपल्या चाणाक्ष नजरेने बारीक लक्ष ठेवून त्यातील विसंगतीवर प्रत्यही मर्मग्राही विवेचन करणारे आमचे धुळ्याचे सन्मित्र वैद्यराज डॉक्टर सचिन चिंगरे यांची एकूणच साहित्यिक प्रतिभा आणि विशेषत: काव्यप्रतिभा हा स्वतंत्र प्रबंधाचा विषय असल्याने प्रस्तुत प्रस्तावना आटोपती घेऊन मूळ विषयाकडे वळावे हे उत्तम. आज आमच्या या प्रिय वैद्यराजांची एक अगदी रोखठोक, करकरीत आणि प्रत्येक विवेकी माणसाला विचार करायला भाग पाडणारी आणि संवेदनशील माणसाच्या काळजाला हात घालणारी रचना... विकार मर्यादेपलीकडे बळावला की त्याला शल्यकर्म हाच उपाय याची जाणीव करून देणारी, कोडग्या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आणि सुखासीनतेला कडूजहर डोस पाजणारी...

एक नाजा़यज प्रिस्क्रिप्शन

उन्हाळा, हिवाळा, पावसाळा...
साऱ्या ऋतुंमध्ये तेवढ्याच घोटवलेल्या व्यावसायिक उत्साहाने ओथंबून 
तो येतो औपचारिक अदबीने माझ्या केबिनमध्ये. 
नीटनेटका पोशाख, चेहेरा व देहाच्या मर्यादित हालचाली,
भाषेची सफाई आणि विक्रेत्याला आवश्यक आग्रही वृत्ती नी आर्जव या आयुधांनी सज्ज! 
भांडवलशाहीचा दूत, जागतिकीकरणाचा प्रतिनिधी, चंगळवादाचा चेला, 
व्यापाराचा नोकर, आणि प्रवाहपतीततेचा एक संसारी गृहस्थ गुलाम! 
तो वितरण व प्रबोधनाची फॅन्सी झूल पांघरुन येतो. 
मी पोटापाण्याच्या धंद्याला सेवेचा पांढराशुभ्र मुलामा पांघरुन बसलेलो...

पावसाळ्यात डायरिया-मलेरिया, उन्हाळ्यात डिस्-युरिया (उन्हाळी लागणे), हिवाळ्यात न्यूमोनिया... 
साऱ्या रोग-राक्षसांवर चालणारी अस्त्रं दाखवतो त्याच्या भात्यातली.
पूर्वी मुली भरपूर होत्या तेव्हा उपवर कन्येची गरजू माता
मुलीत असले-नसलेले सारे गुण खुलवून सांगायची,
तसं तो कौतुक करतो त्याच्या कंपनीच्या औषधांचं...
कधी किंमत, कधी चव, कधी वेष्टन, कधी नाविन्य, कधी उपयुक्तता, कधी काही... 
मग त्याच्या मजबूत चामडी बॅगेतून तो काढतो काही सँपल्स् आणि 
फळविक्रेता फळं छान रचून ठेवतो, तशी लयबद्ध सराईतपणे मांडतो माझ्या काचेच्या टेबलावर. 
सणासुदीला तो आणतो मिठाई, कधी दिवाळीत दिवे, पणत्या,अत्तर, परफ्यूम. 
अधूनमधून आणतो तो छानश्या भेटवस्तू... 
कधी पेन, कधी फुलदाणी, कधी किचनवेअर 
सतत आठवण येण्यासाठी त्यावर छापलेल्या कंपनीच्या नावासह.

मग तो सांगतो मला काही प्रोफेशनल स्कीम्स. 
इतकं लिहिल्यावर इतके भरपूर.. 
तितकं लिहिल्यावर या वस्तू पुरेपूर
आणि तितकं टार्गेट केलंत तर बँकॉक पट्टाया सिंगापूर...
त्याच्या परीटघडीच्या वस्रांतून पाझरत असतो आसमंतात एखादा मंद व्यावसायिक सुगंध. 
त्याच्या आशाळभूत नजरेत चमकतात आकर्षक आमिषं.

तसं सोपं असतं!
अ‍ॅसिडिटी नसतानाही प्रत्येकाला लिहिली अँटासिड कॅप्सूल, 
किंवा कमतरता नसूनही प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी लिहीलं एखादं सीरप, 
किंवा हिमोग्लोबिन कमी, अशक्तपणा पटवून देऊन लिहीलं एखादं टॉनिक 
सातत्याने, आयेदिन लिहीलं सर्वांना एखादं महागडं व्हिटॅमिन, किंवा प्रोटीन, 
तर अगदीच सोपं!
थेंबे थेंबे तळे साचे. 

पण नेमकं त्या क्षणी 
मला आठवतो जवळच्या खेड्यातून विश्वासाने लहानग्या नातवाला माझ्या दवाखान्यात आणणारा, 
भर उन्हात अनवाणी चालणारा कळकट मळकट पारधी पेरु भोसले... 
मला आठवते मायबाप सरकारच्या दोन चारशे रुपयांच्या पेंशनची चातकासारखी वाट पाहणारी 
आणि मग अशक्तपणासाठी एखादी 'शक्तीची सलाईन' लावून दे म्हणणारी भागिरथी आजी... 
किंवा डाळीसाळीच्या गुप्त डबाबँकेतून काढलेल्या दहावीसच्या नोटा पुन्हा पुन्हा मोजून,
चंची रिकामी करुन, मला देणारी एखादी गरीब मंगला गृहलक्ष्मी... 
कधी जुगारात हरलेल्याने निराश संथपणे पत्ते टाकावेत टेबलावर,
तसे जड हातांनी खिशातल्या आजच्या शेवटच्या नोटा काढून देणारा बाप राजू हमाल. 

त्यांना लिहू मी एखादं जास्तीचं औषध? 
त्यांच्या घाम रक्तावर की डोळ्यात तरळलेल्या पाण्याच्या इंधनावर 
उजळवू मी माझ्या उंची ऐषआरामी स्वप्नांचे दीप ? 
त्या अनवाणी, सायकलवर, लाल डब्याच्या एसटीत, 
जनावरासारखी माणसं कोंबलेल्या जीपगाडीत प्रवास करणाऱ्यांकडून
वसूल झालेल्या छोट्या छोट्या अनैतिक वर्गणीवर फिरु मी विमानात? 
त्या झोपडीवासियांच्या किंचित पण निरंतर शोषणाने फुलवू माझ्या बंगल्यात मी सुखाचा मळा? 

हिपोक्रॅटीस दु:खी होतो, भगवान धन्वंतरी डोळे वटारतो... 
नाही होता येत डॉक्टर आमटे, 
पण झालंच पाहिजे का डॉक्टर भामटे ? 
नाही तर नाही सिंगापूर 
पण होईल ना सहज शनी शिंगणापूर. 
आणी मी नम्रपणे नाकारतो ऑफर.
छोट्याश्या धैर्याने मी नाकारतो 
एक नाजा़यज प्रिस्क्रिप्शन...

...डॉ सचिन चिंगरे, धुळे 
७४९९६१३९१२, ९४२३४९३२१८

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

कविता...!


दिवाळीचे चार दिवस आणि इतरही बऱ्याच वेळा माझ्या व्हॉट्सऍप स्टेट्स मध्ये ज्या सजीव चित्रांची मुक्त पखरण असते त्या कलाकृतींमागचा सर्जक हात आणि योगगुरू असलेला माझा बंधुसखा कुमार हा नेमस्त गृहस्थ एरवी गंभीर भासत असला तरी आयुष्याकडे बघण्याची एक अम्लान, निकोप आणि मार्मिक दृष्टी बाळगून आहे हे त्याच्या अत्यंत निकटवर्तीयांना चांगलेच ठाऊक आहे. हे महाशय कधीतरी कविताही करतात हे गुपित मी फारसं कुणाला सांगू नये असा त्याचा आग्रह असल्याने मी ते कुणालाच न सांगता फक्त इथे इत्यादीवर प्रकाशित करतोय कारण इकडे फारसं कुणी फिरकत नाही असं मी त्याला पटवलयं आणि त्यालाही ते पटलंय! 

तेव्हा, कुणाला काही कळण्याच्या आत पटकन त्याची एक छोटीशी कविता...

पाऊस माती वारा पाणी...
पक्षी गातात सुरेल गाणी...
हिरवा निसर्ग निळे आकाश...
थांबून जरा पाहू सावकाश...
अरे ही तर कविताच झाली...
लिहू चार ओळी खाली...
-
-
-
-
खालच्या ओळी नाहीच सुचल्या...
वरच्या ओळी चिंब भिजल्या...
एक गोष्ट मात्र जाणवली...
एखादीच ओळ अगदी मनातली...
-       वैभव पुराणिक, नासिक

रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

गोताखोर...?

मुलांचं 'करीयर' चांगलं घडावं म्हणून...
लहानपणापासून त्यांना दिवसभर कुठल्या ना कुठल्या...
क्लास, ट्रेनिंग किंवा डेव्हलपमेंट ॲक्टीव्हीटी मध्ये गुंतवून,
सतत घड्याळाच्या काट्याला बांधून घ्यायला लावून आणि
ते जे जे काही करतील त्यात पुढे (पुढे?) राहण्यासाठी...
एका निरंतर स्पर्धेच्या अंतहीन गर्तेत लोटून,
अष्टोप्रहर जिंकण्याचा विचार आणि
त्यासाठी लागेल ती तडजोड करण्याचे
बाळकडू पाजणाऱ्या पालकांनी,
‘बेटा, आज तरी लवकर घरी ये...’ किंवा
‘मुले आम्हांला वेळच देऊ शकत नाही...’
असे म्हणणे हे गोताखोराने,
'मला पोहण्याचा आनंदच घेता येत नाही...'
असे म्हणण्यासारखे नव्हे काय...?

...दिवाळीच्या सुट्टीमध्ये फराळासोबत तेवढचं बुद्धीलाही खाद्य;

'डाएट'वर असाल तर सोडून द्या... दीक्षित आणि दिवेकरांवर!

शुभ दीपावली!

रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

निर्गुण...?



बोलभांड ते चिडीचूप
अळीमिळी गुपचिळी
लोकशाहीची नवी खेळी
देखीली गा !

काळ आला वेळ आली
तसे धुरंधरही धारातिर्थी
लाभार्थी झाले शरणार्थी
एकाएकी !

चढती कमान उतरतेही
निसर्गचक्र वलयाकार
त्यात निर्गुणही साकार
कधी कधी !

बाजू पालटता 
बदलाचे वारे 
भासती न्यारे 
सर्वालागी !

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

विजय...!


भक्ती-शक्ती, दया-माया, लक्ष्मी-बुद्धी ‘रूपेण संस्थिता’
अशा ‘देवी-स्वरूप’ मुलीस जन्मालाच न येऊ देण्यापासून,
तिच्या आयुष्यात पदोपदी काटे पसरण्यात धन्यता मानणाऱ्या,
निसर्गत: तिला भोगवस्तू म्हणून शुद्र लेखणाऱ्या दांभिक समाजात...

आपल्या मातृशालेचे संस्कार संवैधानिक उच्चपदावरून मिरविणाऱ्या
पालकांच्या जल्पकांनी सामाजिक सौहार्द्राला धार्मिक रंगात हिणवणे,
‘जय जवान जय किसान’ आणि ‘सत्यमेव जयते’ यांच्या थडग्यावर   
मतपेटीसाठी नागरिकांना त्यांच्या मुलभूत हक्कांचे प्रलोभन देणे...

काही दशकांच्या एकत्रित प्रयत्नांच्या फलश्रुतीला सुरुंग लावत  
प्रतिकात्मक गर्दीला अभिवादन करत अदृश्य मानवंदना स्वीकारणे
या साऱ्यात दशाननाचे नेमके कुठले प्रतिक दहन झाले आणि
कशात ‘राम’ उरला... या विचारात बुडालेली ‘विजयादशमी!’

रावणही आपल्यातच आहे आणि रामही,
मात्र अंती कोण जिंकेल हे ठरेल,
आतील विकार बळावतो की विवेक
आणि विखार वाढतो की विचार यावर!   

तोवर, खालावलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी
माध्यमातून ओसंडून वाहणाऱ्या साजऱ्या वस्तूंची
खरेदी करण्यासाठी लगबग करू या,
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर...!

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

मास्क...!



अलीकडे बोलत नाहीस म्हणे...

मास्क लावलाय ना जीव वाचवण्यासाठी... स्वत:चा; आत्मनिर्भर असायला हवे म्हणून!
तसा लावला कधीचाच आहे, आज दिसतोय सगळ्यांना... उघड उघड, एकमेकाचा 

म्हणजे असं बघा साधारण चलन आलं चलनात आणि
दळणवळण सुरू झालं... आडवळणानं, तेव्हापासून घालतोय मुखवटा!
आता तो मास्क म्हणून केवळ लब्धप्रतिष्ठितच नाही तर 
ब्रँडेड, अनिवार्य, कायदेशीर आणि वॉशेबल ही झाला! 
त्याच्याशिवाय जगायच म्हटलं तर होतो मुजोर कायदेभंग 
आणि एकटे पडण्याचा धोका... तो वेगळाच
काही बोलावे म्हणून तोंड उघडलं तर नुसतच मायमिंग... 
शब्द गिळावेच लागतात, काढयासोबत 
पण नाहीतरी बोलण्याची मुभा सगळ्यांना होतीच कधी...?
आणि बोललीच समजा उसासून...
ऐकतयं कोण आणि समजतयं कुणाला? 

धून वही सुनाई देती है जंहा ध्यान लगा हो!
बाकी... इतना सन्नाटा हमेशाका है भाई! 
बरं अस्वस्थ वर्तमानाचं भविष्यातील इतिहासासाठी चित्रण करावं तर,
कागद एसीतल्या कार्पोरेटचा आणि शाई उन्हात राबत्या मजूराची... 
कशी व्हावी युती आणि कशी घ्यावी आघाडी?
थोडे आगाडी बाकी पिछाडी अन चलती का नाम गाडी
असंच चाललंय युगानुयुग...

शेवटी तीनच चेहरे खरे... ययाती, देवयानी आणि कचाचे;
बाकी सगळेच मुखवटे 'कच'कड्यांचे... शुक्राचार्यांसह!
 
आणि लिहिलाही समजा इतिहास आजच्या वर्तमानाचा,
उद्याच्या भविष्यासाठी... कुणी काही शिकेल म्हणता...?  
अहो, जो ‘जाणता माणूस’ स्वत:च्या उत्क्रांतीपासून आणि
अनेकानेक राज्यक्रांत्यातून तर सोडाच,
अजूनही ज्याच्या सावटाखाली वावरतोय त्या
स्थानबद्ध साचलेपणातून काही शिकतांना दिसत नाही,
तो आपण ‘जाणते’ कसे झालो आणि नेणतेपणी 
उलट्या प्रवसास का लागलो समजून घेईल म्हणता?
नाव नको...!

तरी आशा सोडून चालणार नाही... 
'रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल...' एक कवि म्हणतो
आणि दुसरा म्हणतो ‘अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...’
मग उमेद हरून आणि प्रयत्न सोडून कसे चालेल?

मी नाहीच सोडलीय आशा आणि थोडी धुगधुगी आहे...
अजूनही उमेदीत शिल्लक... 
फक्त कधीतरी खूप विषाद दाटून येतो
माणुसपणाचा... अमानुष होतांना!
मग उचलावा वाटतो छिन्नी हातोडा, 
नको तो भाग फोडून काढण्यासाठी
आणि घडविण्यास ते शिल्प...
जे ‘माणूस’ शब्दात पहिले असेल नियतीने!

बघू, जमेलही म्हणे कधीतरी, कुणी सांगावं...!

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

मर्मबंधातली ठेव ही… २

बंडूकाकांच्या कविता इत्यादीवर याव्यात ही आमची इच्छा फलद्रूप होतांना खरेतर काकांना सरप्राइज द्यायचे म्हणून त्यांची मदत घ्यायची नव्हती. पण यासाठी आवश्यक ऐवज आमच्याकडे लिखित स्वरूपात सापडेना झाला आणि स्वत:च्या स्मृतीच्या (किंवा ‘भक्ति’-’भावा’च्या?) भरवशावर उगाचच चुकीचे काहीही दडपून छापून टाकायला हे काही कुणाचे मुखपत्र नसल्याने, काकांकडूनच या कविता संवादून घ्यायचे ठरले. काकांच्या या दुसऱ्या कवितेला निश्चितच अजून किमान दोन कडवी आहेत याची आम्हाला खात्री होती, पण काकांना त्या दिवशी या दुसऱ्या कवितेची एकूण तीनच कडवी आठवली. तथापि काकांचा सुपुत्र तन्मय याने काकांना आठवण करून दिल्याने उर्वरित तीन कडव्यांबद्दल काकांची खात्री झाली आणि आमचे समाधान!

मग त्या दडून बसलेल्या तीन कडव्यांची शोध मोहीम सुरू झाली आणि शेवटी काकांनाच त्यांच्या एका जुन्या वहीत ही संपूर्ण कविता सापडली आणि आम्हा सगळ्यांना ‘आज मुझे उस बूढ़ी अलमारी के अन्दर पुराना इतवार मिला है...!’ असे ‘गुलजार’ फिलिंग आले. शिवाय काकांच्या पहिल्या कवितेच्या निमित्ताने सुरू झालेल्या ‘डाऊन द मेमरी लेन...’ प्रवासात दरम्यान अनेक सहप्रवासी सामील झाले आणि अनेकानेक गतस्मृतींना उजाळा मिळाला. या समुद्रमंथनातून अर्थातच अनेक रत्ने हाती लागली, त्या साऱ्यांना देखील इत्यादीवर मानाचे पान यथावकाश मिळेलच; तूर्त काकांची दुसरी कविता...

या कवितेच्या जन्माची कथा मोठी रंजक असली तरी काका ती जशी खुलवून सांगतात तशी मला शक्य नसल्याने आणि माझ्या प्रतिभेच्या(?) मर्यादांची मला पुरेपूर जाण असल्याने मी अधिक फुटेज न खाता फक्त एवढेच सांगतो की ही कविता काकांनी चक्क इरेस पडून केली आहे. ‘कविता करणे ऐऱ्यागैऱ्याचे काम नव्हे, त्यासाठी दैवी प्रतिभा लाभावी लागते’ अशी अंधश्रद्धा (‘श्रद्धा डोळस कशी असेल, ती अंधच असावी लागते...’ इति काका!) बाळगणाऱ्या आणि त्या काळी गाजणाऱ्या (आणि आजही एक मानदंड असलेल्या) एका अत्यंत लोकप्रिय गझलेचे, ते जणू काही पसायदानच असावे अशी भलामण करत असलेल्या एका भक्ताच्या उद्बोधनासाठी अक्षरश: बसल्या बसल्या कागद पेन मागवून काकांनी ही गझल लिहिली आहे...

अशा तऱ्हेने जन्मलेल्या या नितांतसुंदर गझलेचे, काळाच्या ओघात राहून गेलेले, नामकरण करण्याची आणि तिला गीताचे रुपडे देण्यासाठी धृवपद आणि कडवी अशी रचना करण्याची क्रिएटिव्ह लिबर्टी (??) मी काकांच्या अनुमतीने घेतली आहे, त्यात काही न्यून आढळल्यास तो सर्वस्वी माझा दोष असल्याने मूळ रचनेच्या रसपरिपोषात त्याचा अडथळा मानू नये. आज सादर आहे काकांची ही दुसरी अभिजात रचना…

रात्र

शृंगार चांदण्याचा नेसून रात्र गेली,
निःशब्द यातनांना भेदून रात्र गेली II धृ II

श्वासांवरी हवाला जग शांत झोपलेले,
माझ्याच मंचकी या जागून रात्र गेली II १ II

जागेपणी कळेना मनी काय स्वप्न होते,
दारात स्वप्न तोरण बांधून रात्र गेली II २ II

दिवसा कधी न कळल्या ज्या सूक्ष्म तरल गोष्टी,
त्या सर्व भावनांना स्पर्शून रात्र गेली II ३ II

निद्रेस मीही जेव्हा बोलावण्यास धजलो,
निद्रेस दूर तेव्हा पळवून रात्र गेली II ४ II

मी 'थांब, थांब' म्हणता ती चालली निघाली,
'येते पुन्हा उद्या मी' सांगून रात्र गेली II ५ II

- गोपाळ बापू पुराणिक (१९८५)

रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

मर्मबंधातली ठेव ही...!

३० ऑक्टोबर २०१८ च्या ‘कवित्व’ या पोस्टमध्ये आमचे आजोबा अण्णा अर्थात ‘केशवतनय’ यांचा अत्यल्प परिचय झाला होता आणि अण्णांपासून सुरु झालेली साहित्यिक प्रतिभेची परंपरा आज पाचव्या पिढीत समृद्ध होतांना पाहून समाधान वाटते. आमच्या वडिलांची दुसरी पिढी आणि या पिढीतील ज्येष्ठ, आमचे थोरले काका, यांच्याबद्दल १ ऑक्टोबर २०१८ च्या ‘गदिमा’ या पोस्टमध्ये आपण वाचले. आज या दुसऱ्या पिढीतील सर्वात धाकटे काका गोपाळ पुराणिक अर्थात आम्हां तिसऱ्या पिढीतील सर्वांचे अत्यंत लाडके बंडूकाका यांच्या प्रतिभेची एक झलक पाहू या.

वर्तमानपत्रामध्ये बंडूकाकांनी पुष्कळ लिखाण केले आणि त्यांचे तत्कालीन राजकारणावर आणि इतरही सामजिक, सांस्कृतिक विषयांवर केलेले मार्मिक भाष्य हे त्या वर्तमानपत्राच्या स्थानिक आवृत्तीचा मानबिंदू (आजच्या बाजारू पत्रकारितेच्या भाषेत टीआरपी!) होते. काकांनी अनेक क्षेत्रात उमेदवारीही केली आणि मुशाफिरीही केली पण जीवनाचा चिंतनशील भाष्यकार तथा रसाळ कथाकथनकार ही त्यांची सगळ्यात आवडती भूमिका! कुठल्याही घटनेचे, प्रसंगाचे अथवा कथेचे अत्यंत तपशीलवार तरीही रंजक वर्णन करावे ते काकांनीच. या ग्रहणशक्ती आणि सादरीकरणाच्या कौशल्याचा त्यांना फारसा व्यावहारिक उपयोग झाला नाही (किंवा करता आला नाही) पण यामुळे लोकसंग्रह उदंड झाला!

आम्ही लहान असतांना तर बासरी, हार्मोनियम वाजवणारे, एकामागून एक धमाल गोष्टी सांगणारे, हिंदी चित्रपट आणि त्यातील गाण्यांचे इत्यंभूत ज्ञान असणारे आणि त्या काळातील प्रथेनुसार राजेश खन्नाचे फॅन असल्याने त्याची स्टाईल कॉपी करणारे 'काका' आम्हां मुलांचे हिरो नसते तरच नवल! काव्य-शास्त्र-विनोदाची गोडी आम्हांला लागली ती काकांमुळेच. वाचनाच्या व्यसनामुळे दिवाळी अंकांचे फिरते वाचनालय चालवायची आयडिया आम्हाला सुचली तिचे श्रेयही काकांचे. ते वाचनालय जरी फारसे चालले नसले तरी त्या निमित्ताने त्या वर्षीचे बहुतेक सारे दिवाळी अंक आम्हांला वाचायला मिळाले आणि शिवाय काही संग्रही ठेवता आले याचाच आनंद जास्त! कलाभान जपतांना व्यवहारज्ञानाचा सपशेल अभाव हा संस्कारही बहुदा काकांमुळेच नकळत घडला असावा... असो!

अशा आमच्या हरहुन्नरी, कलाकार आणि कबिरी वृत्तीच्या काकांनी काही पद्य रचना केल्या नाहीत असे कसे होईल? काकांच्या कविता हा एक स्वंतत्र विषय असला तरी त्यांच्या एका अतिविशिष्ट रचनेसाठी आजची पोस्ट. सर्वकालीन समाजव्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण दाखवून देतांना स्वत:च्या व्यक्तिमत्वाचे परखड परीक्षण आणि तेही ऐन तिशीमध्ये करणे हे सोपे काम नाही. या अभिव्यक्तीसाठी कर्णाहून सुयोग्य आणि चपखल रूपक कालत्रयी सापडणे शक्य नाही म्हणूनच काकांनाही तो मोह टाळता आलेला नाही. भल्या भल्या प्रतिभावंतांना भुरळ पाडणारी कर्णाची व्यामिश्र व्यक्तिरेखा काकांनी आत्मानुभवाच्या पातळीवर अशी काही प्रतिबिंबित केलीय की याला कर्णाचे लघुत्तम चरित्र म्हणण्यास खुद्द कर्णाचाही आक्षेप नसावा!

आयुष्याच्या भाष्यकाराची चिंतनशीलता, सिद्धहस्त गझलकाराची गेयता आणि प्रकटनातल्या प्रामाणिकपणाची मोहकता अशा त्रिगुणांनी सजलेल्या या रचनेला इत्यादीवर मानाचे पान देण्याची अनेक वर्षांची दुर्दम्य इच्छा आज पूर्ण होण्यास पुन्हा एकदा मदत झाली ती बंधुसखा योगगुरू कलाकार रंगवैभव अर्थात कुमारची! छापील स्वरुपात काकांकडे आणि हस्तलिखित स्वरुपात आम्हां दोघांकडे असलेल्या या रचनेच्या प्रती कुठल्या ना कुठल्या कारणाने गहाळ झाल्या आणि काही केल्या कुणालाही सापडेना. खुद्द काकांनाही संपूर्ण रचना मूळ स्वरुपात स्मरत असेल का अशा संभ्रमात खूपच कालापव्यय झाला.

शेवटी, कुठल्यातरी निमित्ताने काकांशी भ्रमणध्वनीवर संभाषण चालू असतांना योगगुरूंनी अत्यंत खुबीने या विषयी संवाद साधत काकांची कळी खुलवली आणि गतस्मृतींना उजाळा देत, ‘जलते है जिसके लिये...’ स्टाईलमध्ये काकांच्या डिक्टेशनने संपूर्ण गझल उतरवून घेतली! आपल्या छापील अक्षरात ‘होतो महारथी मी...’ कागदावर उतरवून त्याचा फोटो काढून तत्परतेने मला पाठवला तेव्हा तेवढ्याच तत्परतेने ती टंकलिखित करून ठेऊन लवकरात लवकर इत्यादीवर प्रकाशित करणे मला आगत्याचे वाटले! हे ‘नमनाला घडाभर तेल’ नसून, हिऱ्याला शोभिवंत करणारे कोंदण मिळावे म्हणून केलेला अट्टाहास आहे याची प्रचीती येईल ही अपेक्षा! तेव्हा, आजच्या मुहूर्तावरगोपाळ बापू पुराणिक अर्थात आमचे लाडकेबंडूकाका यांची ही एक अभिजात रचना...

कर्ण

होतो महारथी मी पण कर्ण नाव होते…
त्यांच्याच सोंगट्या अन् त्यांचेच डाव होते !

स्पर्धेत कोणत्याही माझा नसा प्रवेश... 
त्यांचेच पंच आणि त्यांचेच गाव होते !

सांभाळली सुबुद्धी अन रंक जाहलो मी... 
गेले लुबाडूनी जे सगळेच राव होते !

त्यांनीच मांडले हो घनघोर युद्ध जेव्हा... 
माझ्या शरांत तेव्हा गतिमान ठाव होते !

मी एकटाच होतो समरांगणी लढाया... 
त्यांच्याकडून लढण्या साक्षात देव होते !

भगवंत कृष्ण म्हणूनी जग वंदते जयाला... 
माझ्या समोर त्याचे फसवे ठराव होते !

होतो महारथी मी पण कर्ण नाव होते… 
त्यांच्याच सोंगट्या अन् त्यांचेच डाव होते !

- गोपाळ बापू पुराणिक (१९८५)