रविवार, २१ जानेवारी, २०२४

रामराया...!


रामजन्मभूमी राष्ट्रोत्सवाच्या निमित्ताने,

"कल्पनेचा प्रांत तो माझा एकांत।
तेथें मी निवांत बैसेईन बैसेईन सुखरुप क्षणैक।
पाहिन विवेक राघवाचा स्वरुप राघवाचे अत्यंत कोमळ।
जेथें नाही मळ, माईकांचा माईकांचा मळ जाय तत्क्षणीं ।
रामदरुशणीं रामदास।"

या 'समर्थ' भावनेने, समर्थ रामदासांनी सकल जनहितार्थ 
प्रभू रामचंद्राला घातलेली ही आर्त साद...

कल्याण करी रामराया ।
जनहित विवरी ।।
तळमळ तळमळ होतची आहे ।
हे जन हाति धरी दयाळा ।।

अपराधी जन चुकतची गेले ।
तुझा तूचि सावरी दयाळा ।।
कठीण त्यावरी कठीण जाले ।
आतां न दिसे उरी दयाळा ।।

‘कोठे जावे काय करावे ।
आरंभिली बोहली दयाळा ।।’
दास म्हणे आम्ही केले पावलो ।
दयेसी नाहीं सरी दयाळा ।।

जय जय रघुवीर समर्थ 


शनिवार, ६ जानेवारी, २०२४

रहस्य...!


त्या दुकानदाराने आपल्या मुलाला जगाचे ज्ञान व्हावे म्हणून जगातल्या शहाण्या माणसाकडे पाठवले.

शहाणा म्हणजे ज्ञानी आणि ज्ञानी म्हणजे कुणी साधू-तपस्वी अशी अटकळ बांधून मुलगा त्याच्या शोधात निघाला.

वाळवंटातल्या ४० दिवसांच्या प्रवासानंतर मुलगा पोहोचला ती कुण्या साधूची कुटी नव्हती तर धनिकाचा प्रशस्त महाल होता. तिथे ध्यान-धारणा, मंत्र-जाप, पूजा-साधना असले काहीही चाललेले नव्हते तर खूप वर्दळ होती. लोक येत जात होते. सौदे ठरत होते, व्यवहार पार पडत होते. जगातल्या सर्वोत्तम खानपानाची रेलचेल होती. वातावरणात संगीत होते, सुगंध होता, उल्हास होता. शहाणा (आणि श्रीमंत) माणूस साऱ्यांशी आपुलकीने बोलत होता, हवे-नको बघत होता.

मुलाकडे लक्ष जाण्यास त्याला जवळपास दोन तास लागले. मुलाचा येण्याचा उद्देश त्याने समजून घेतला पण त्याला जे हवे होते ते, 'सुखाचे रहस्य' समजावून सांगण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता म्हणून त्याने मुलाला त्याचे घर पाहून दोन तासाने परत भेटू असे सुचवले. मुलाला फक्त एकच गोष्ट करायची होती, यजमानाने दिलेला चमचा आणि त्यातले तेलाचे दोन थेंब पूर्ण वेळ सांभाळत घर पहायचे होते.

मुलाने महालाचे संगमरवरी खांबांनी सजलेले रुंद वऱ्हांडे, मखमली पायघड्या घातलेले उंच जिने, फुलांच्या ताटव्यांनी सजलेले गवाक्ष, भरजरी रेशमी पडद्यांनी नटलेले नक्षिकाम केलेले भव्य दरवाजे खिडक्या या साऱ्यांच्या साक्षीने घराचा दौरा पूर्ण केला - सारे लक्ष हातातील चमच्यावर लक्ष केंद्रित करून दोन तासांनी शहाण्या माणसाकडे परतला!

शहाणा माणूस म्हणाला, 'मग, कसे वाटले माझ्या शयनगृहातील गालिचे, मुदपाकखान्यातील लाकडी कारागिरी, वाचनालयातील पुस्तके आणि कल्पकतेने सजवलेल्या भिंती, माळीबुवांनी १० वर्षांच्या अथक मेहनतीने फुलवलेला आणि निगुतीने राखलेला बगीचा आणि त्यातील थुई थुई नाचणारे कारंजे...?'

मुलगा फारच शरमला आणि वरमून म्हणाला, 'माझे सारे लक्ष चमच्यातील तेलाकडे असल्याने मी यातील काहीही बघू शकलो नाही, त्याचा सुखद अनुभव घेऊ शकलो नाही, मला माफ करा...!'

'मग पुन्हा एकदा जा आणि मी जगभरातून जमविलेल्या साऱ्या किमती, कलात्मक आणि सुंदर गोष्टींचा आनंद घेऊन पुन्हा मला भेट. ज्या माणसावर विश्वास ठेवायचा त्याचे घर नीट निरखून बघायलाच हवे, नाही का...?'

मुलाने समाधानाने पुन्हा चमचा उचलला आणि या वेळी साऱ्या गोष्टी नीट बघून, त्यांच्या सौंदर्याचे आस्वादन करीत घराचा फेरा पूर्ण केला आणि अतिशय सुखावत सुस्मित चेहऱ्याने शहाण्या माणसास सामोरा गेला.

'... पण चमच्यातले तेल कुठेयं...?' शहाण्या माणसाने मुलाच्या हाताकडे बघत विचारले. मुलाचे तिकडे लक्ष जाताच त्याचा आनंदाने फुललेला चेहरा क्षणार्धात खर्र्कन उतरला...

'असं बघ मुला, मी तुला एवढाच सल्ला देऊ शकतो..', शहाणा माणूस अत्यंय शहाणिवेने म्हणाला, 'तू शोधतोयस त्या सुखाचे रहस्य एवढेच आहे की जगातील साऱ्या चांगल्या, हव्याशा गोष्टींचा मनसोक्त उपभोग घ्या, रसास्वादन करा पण ते करताना हातातल्या चमच्यातील तेलाचे दोन थेंब कधीही विसरू नका, नजरेआड होऊ देऊ नका...!'

---------------------------------

पावलो कोएलो यांच्या 'दि अल्केमिस्ट' या अप्रतिम पुस्तकातील ही अत्यंत बोधप्रद गोष्ट आज नव्याने आठवण्याचे कारण म्हणजे नव्या वर्षाचा संकल्प नव्हे. असे काही संकल्प करायचे नाही असा संकल्प सोडण्याइतकी शहाणीव आम्हाला अल्केमिस्टच्या आधीच आली होती. तेव्हा तसे काही प्रयोजन नाही.

फक्त गेल्या वर्षाचा अखेरचा काळ खूपच घडामोडींचा, धावत्या का होईना गाठीभेटींचा आणि...
"कभी पास बैठो तो कहूं दर्द क्या है,
अब यूँ दूर से पूछोगे तो खैरियत ही कहेंगे..!"
याचा एहसास होण्याचा,
असा संमिश्र भावनांचा ठरला म्हणून पुन्हा एकदा 'पावलो'ची आठवण बाकी काही नाही... 

तेव्हां, मी माझ्या जीवनशैलीत सकृतदर्शनी कुठलेही बदल केलेले नसल्याने पण विचारशैली अधिक मुक्त, प्रवाही आणि चिंतनशील करण्याच्या धोरणामुळे बौद्धिकांसाठी, बुद्धिप्रामाण्यवादासाठी कायमच उपलब्ध आहे, राहीन...!

ताल्लुकात बढ़ाने हैं तो कुछ,
आदतें बुरी भी सीख ले गालिब,
कोई ऐब न हो तो लोग,
महफ़िलों में नहीं बुलाते...!

बस इतना ही...

रविवार, २४ डिसेंबर, २०२३

पुस्तकं...!


काल बऱ्याच वर्षांनी प्रापंचिक कर्मे आणि व्यावहारिक कर्तव्ये यातून जाणीवपूर्वक वेळ काढून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या विश्वविक्रमी 'पुणे पुस्तक महोत्सवा'ला भेट दिली. तेथील हजारो पुस्तकांपैकी शेकडो घ्यावीशी वाटली तरी काही मूलभूत मर्यादा - उदा. त्यासाठी लागणारा निधी, तेवढे सगळे वाचण्यासाठी लागणारा अवधी आणि एक पुस्तक एकदा वाचून झाल्यावर त्याचे काय करायचे ही उपाधी अशा सगळ्या मध्यमवर्गीय विवंचनांमुळे नेहमीप्रमाणे मध्यममार्ग काढून झेपतील तेवढीच पुस्तके घेतली, आता एकेक वाचून हातावेगळे करण्यासाठी वेळेचे नियोजन सुरु आहे.

कालचा संपूर्ण दिवस साहित्यिक, सांस्कृतिक आणि काव्य-शास्त्र-विनोदाने सुफळ सम्पूर्ण करावा म्हणून सायंकाळी २३ व्या कोथरूड साहित्यिक कलावंत सम्मेलनाला हजेरी लावली आणि अशोक नायगावकरांच्या अध्यक्षीय भाषणाचा लाभ (अक्षरश:) घेतला. अध्यक्षीय भाषणाची प्रत प्रेक्षकात वितरित करण्याची प्रथा आहे पण आम्हाला अद्याप ती मिळू शकलेली नाही, प्रयत्न सुरु आहेत, मिळताक्षणी येथे प्रसृत केली जाईल.

अध्यक्षीय भाषणानंतर यंदाच्या पुरुषोत्तम करंडक विजेत्या एकांकिकांचे सादरीकरण होते. त्यातील पहिली खडकी महाविद्यालयाची 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील...' ही, निसर्गाची हानी आणि वनवासींना लक्ष्य करून होणाऱ्या विकासावर जळजळीत भाष्य करणारी एकांकिका आशय-विषयात खोली असणारी असली तरी सादरीकरणात खूपच बालीश वाटावी अशी होती. अर्थात महाविद्यालयाच्या युवक-युवतींचा नवथर उत्साह आणि सादरीकरणातील मर्यादांचा विचार करता प्रयत्न स्तुत्यच म्हणायचा.

स. प. महाविद्यालयाची 'कृष्णपक्ष' ही नेहमीप्रमाणे साऱ्याच आघाड्यांवर उजवी असल्याने अधिक प्रभावी आणि रंजक असणे स्वाभाविकच होते. नाट्यशास्त्रातील साऱ्या नियम-आयामांचा उत्कृष्ट वापर आणि अत्यंत घोटीव, सुसंबद्ध टीमवर्क यामुळे, अॅसिड हल्ल्यात विद्रूप झालेल्या तरुणीची व्यथा असा गंभीर विषय, सावळ्या कृष्णाच्या रूपकातून मांडण्याची कल्पना जेवढी कल्पक तेवढेच त्याचे सादरीकरण मोहक करण्यात हे युवक यशस्वी झाले हे निश्चित.

कालचा दिवस असा अत्यंत प्रॉडक्टिव्ह आणि फुलफीलींग गेल्यामुळे आज काहीतरी चांगले लिहून त्याचे 'उद्या'पन करावे म्हणून गुलज़ारांच्या या आणखी एका अत्यंत भावस्पर्शी कवितेचा हा मुक्त भावानुवाद. गुलजारांच्या नखाचीही सर नसल्याने या प्रकटनाकडे मूळ कलाकृतीशी तुलनात्मकदृष्टया साधर्म्य न बघता भावार्थाच्या दृष्टीने तादात्म्य बघावे ही विंनती...

मोबाईल किंवा लॅपटॉपवर झरझर चालणाऱ्या माझ्या बोटांकडे
आशेने बघत राहतात पुस्तके काचेच्या बंद दाराआडून...
'किती दिवस झाले त्या बोटांचा ओलसर स्पर्श अनुभवून...'
या परित्यक्त भावनेतून केविलवाणी झालेली पुस्तके
आताशा झोपेत चालू लागली आहेत म्हणे...

पुस्तकांनी जी जीवनमूल्ये शिकवली
ज्या धारणा विकसित केल्या
ज्या जाणिवा समृद्ध केल्या
त्या आताशा बेघर झाल्यात.
जी नाती, जे ऋणानुबंध त्यांनी ऐकवले
ते सारे सारे आता विरलेत, उसवलेत वाटते...

पान उलटावं तर एक खोल उसासा स्पष्ट ऐकू येतो,
आणि बऱ्याच शब्दांचे तर अर्थच गळून पडलेत.
ज्यावर आता अर्थ उगवत नाहीत असे
निष्पर्ण पिवळ्या खोडासारखी भासते ती शब्दावली...

पेल्यांनी ज्यांना कालबाह्य अडगळ करून टाकले
अशी मातीच्या गडूसारखी इतस्ततः विखुरलेली
बरीचशी बोधवचने, सुविचार, सुभाषिते पण आहेत त्यात !

पान उलटवतांना जीभेला कागदाचा जो स्वाद यायचा,
आता प्लास्टिकच्या निर्जीव स्पर्शाने फक्त क्लिक होते
आणि एका पाठोपाठ एक तर
कधी एकमेकावर स्वार होणारी
असंख्य खिडक्यांची झडी लागते...

कधी छातीवर ठेऊन झोपी जात असू...
कधी मांडीवर घेऊन जोजवत असू...
कधी गुडघ्यांचे डेस्क करून वाचतांना
नतमस्तक होऊन त्यावरच माथा टेकत असू ...
पुस्तकांशी जे घट्ट गूळपीठ होतं त्याची चव गेली !

पुस्तकांतून मिळणारी माहिती, ज्ञान एरवीही मिळत राहील...
कदाचित आणखीन सोप्या प्रकारे,
जास्त भरभर, पण...

पुस्तकातून अवचित गवसणारी ती वाळलेली फुले
त्या सुगंधीत चिठ्ठया
ते मधुर चिठोरे...
पुस्तकं मागण्याच्या, पडण्याच्या, उचलण्याच्या मिषाने
बांधले, गुंफले, फुलले जाणारे अनुबंध
त्यांचं आता काय होणार यापुढे...?
तसं काही घडणार नाही...
बहुदा !
--------------------------------------

मूळ रचना...

रविवार, १७ डिसेंबर, २०२३

डिटॉक्स...!

कृत्रिम बुद्धिमत्तेने साकारलेली प्रतिमा 

'स्क्रीन टाईम' फार जास्त होतो या जाणिवेने,
माणसाला बऱ्याच काळात स्वयंप्रज्ञेने सुचलेली,
डिजिटल डिटॉक्सची आयडिया चांगलीच आहे...

पण त्यासोबत, किंवा तत्पूर्वी...

विकासाच्या अविवेकी कल्पना,
उपभोगधर्मी संवेदनाशून्य बाजारमूल्ये
द्वेषमूलक आणि अंधश्रद्ध धार्मिक कट्टरता
पुढे जाण्याच्या शर्यतीने गाठलेला अनावर वेग
दिवसेंदिवस निष्कारण टोकदार होत चाललेल्या अस्मिता
लोकाभिमुख संस्थांचे 'जनहितार्थ' होणारे सरसकट सपाटीकरण
या सगळ्याचा अत्यंत धूर्तपणे वापर करून घेणारे नफ्फड राजकारणी
...आणि ज्या शहाण्यांनी या साऱ्याला वेसण घालावी त्यांचे जाणीवपूर्वक लाभार्थी मौन...

या विषारी व्यवस्थेचेही निर्विषीकरण झाले पाहिजे, करायला हवे !

अन्यथा...
षडरिपूग्रस्त माणसांची व्यवस्थेला फार अडचण होते म्हणून,
एआयने ह्यूमन डिटॉक्स करण्याची वेळ फार दूर नाही...

सजीव सृष्टीच्या इतिहासातले ते ठरेल
पहिले आणि एकमेव...
सेल्फ-एक्स्टिंक्शन...!

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

गंधार...!


एके दिवशी तानसेनाच्या कर्णमधुर संगीताने तृप्त होऊन अकबर शयनगृहाकडे निघाला असता काही विचाराने थांबून तानसेनाला म्हणाला, 'तुझे संगीत केवळ स्वर्गीय आहे. तुझ्या गायन-वादनाने साऱ्यांचे चित्त प्रफुल्लित होते, चराचर उत्फुल्लित होतात. तुझ्या दर्जाचा असा दुसरा कलाकार या धरतीवर असूच शकत नाही. तू अद्भुत, अलौकिक, एकमेवाद्वितीय आहेस यात शंकाच नाही. परंतु माझ्या मनात असे आले की ही कला तुलाही कुणी तरी शिकवली असणार ना? याची साधना करण्याची प्रेरणा देणारा कुणी असेलच ना? तू ही गुरु केला असशीलच ना?'

तानसेन उत्तरला, 'महाराज, अर्थात मला गुरु आहेत आणि त्यांची योग्यता एवढी थोर आहे की मी तर त्यांच्या पायाची धूळ देखील नाही. तुम्ही फक्त मलाच पाहिलं, ऐकलं आहे म्हणून तुम्हाला मी थोर वाटतो. उंट जोपर्यंत पर्वताजवळ जात नाही तोपर्यंत त्याला खऱ्या उंचीची जाणीव होत नाही...'

अकबर म्हणाला, 'असे असेल आणि तुझे गुरु जर हयात असतील तर आत्ता, या क्षणी त्यांना दरबारात हजर कर, त्यासाठी जे करावे लागेल ते कर, जे द्यावे लागेल ते द्यायची माझी तयारी आहे. पण मला आत्ता, या क्षणी त्यांना भेटलेच, ऐकलेच पाहिजे...!'

तानसेन  म्हणाला, 'महाराज तीच तर अडचण आहे! माझ्या गुरूंना कुणीही काहीही देऊ करू शकत नाही कारण त्यांना कसलीच अपेक्षा नाही आणि कुणीही त्यांना आपल्याला हवे तेव्हा हवे ते करण्याची आज्ञाही देऊ शकत नाही कारण त्यांना कसली भीतीही नाही. तुम्हाला त्यांना पहायचे, ऐकायचेच असेल तर ते जिथे असतील तेथे जाऊन आणि ते जेंव्हा गातील तोपर्यंत संयमाने वाट पाहूनच ऐकायला लागेल...'

हरिदास फकीर - तानसेनांचे गुरु, यमुना किनारी रात्री तीनच्या सुमारास गातात, नाचतात असे समजल्यावर अकबर तानसेनासह यमुना किनारी लपून बसला. एका संगीततज्ञाला ऐकण्यासाठी अकबराच्या दर्जाच्या सम्राटाने रात्री-अपरात्री लपून-छपून बसण्याचे जगाच्या ज्ञात इतिहासातील हे एकमेव उदाहरण असावे.

अकबर आणि तानसेन रात्रीच्या थंडीत एका झोपडीच्या आडोशाला लपून बसले. जवळपास पूर्ण रात्र सरत आल्यावर, पहाटेच्या सुमारास अकबराच्या कानावर अशी एक धून पडली की त्याच्या डोळ्यातून पाणी झरू लागले. हरिदास फकीर देहभान विसरून तन्मयतेने गाऊ लागले, नाचू लागले आणि अकबराच्या शरीरावर त्याने पूर्वी कधीही अनुभवले नव्हते असे रोमांच उभे राहिले. 

सकाळी मंत्रमुग्ध, भारावलेल्या अवस्थेत अकबर महालापाशी परत आला तेव्हा तानसेनाला म्हणाला, 'मी आजवर समजत होतो की तू जगातला सर्वश्रेष्ठ संगीततज्ञ आहेस, तो माझा भ्रम आज मोडला. तू म्हणालास तसे खरोखरच तुझ्या गुरूंच्या समोर तू काहीच नाहीस. पण मला एक सांग, तू तुझ्या गुरूंसारखे का गाऊ, वाजवू शकत नाहीस...?'

तानसेन म्हणला, 'अगदी सोपी गोष्ट आहे महाराज, मी काही मिळावे म्हणून गातो तर माझे गुरु त्यांना काही मिळालेय म्हणून गातात. मला जे साध्य करायचे आहे त्यात माझा जीव अडकतो म्हणून मी प्राणपणाने गाऊ शकत नाही. मी स्वत:ला झोकून देऊ शकत नाही. मला जे मिळवायचे आहे ते अन्य मार्गाने मिळाले तर मी संगीत सोडून तो मार्ग पत्करेल कारण संगीत माझ्यासाठी काही मिळविण्याचे केवळ एक साधन आहे. त्यात प्राण फुंकणे मला जमणारच नाही. कारण पुढे काही मिळवायचे आहे म्हणून माझी साधनेची धडपड आहे. पण माझ्या गुरूंना काही मिळाले आहे, साध्य झाले आहे म्हणून ते देहभान हरपून, तल्लीन होऊन गातात, नाचतात. त्यांची उन्मनी अवस्था पूर्णत्वातून, वर्तमान क्षणातून आली आहे, कुठल्याही भूत-भविष्यातून नाही. म्हणून त्यांची सर मला येणे कालत्रयी शक्य नाही...' 

'...पण त्यांच्या या अवस्थेचे कारण काय, कशामुळे ते असे भरून वाहू शकतात...?'

'नदी का वाहते आहे? फुलं का उमलताहेत? सूर्य-चंद्र का तळपत आहेत? जीवनप्रवाह का चालू आहे? कारण सारी सृष्टी आतून जगते, उमलते, फुलते. फुलं फुलतात कारण फुलण्यात आनंद आहे, सूर्य उगवतो कारण उदयात आनंद आहे, पक्षी कूजन करतात कारण गाण्यात आनंद आहे, हवा वाहते, वृक्ष डोलतात, नदी वाहते, झरे खळखळतात... सगळीकडे आनंदी, उत्सवी वातावरण आहे. केवळ माणूसच दगडासारखा निर्जीव झालाय. त्याला हे समजत नाही आपले अस्तित्व हाच आनंदाचा ठेवा आहे, हाच जीवनोत्सव आहे आणि हीच जगण्याची उर्मी आहे... आत्ता, इथे, या क्षणी...!'

-----------------------------------------------------------------------     

हरिदासाची ही कथा आज आठवण्याचे कारण ठरलेली आरती प्रभूंची ही कविता... 

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा...


पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा... 

शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा... 

देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा... 

पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा... 

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात,
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा...


यातील घरदार टाकुनी दूर गावा जाणे म्हणजेच... लौकिकाचे स्तोम सोडून प्राप्त क्षणात उन्मनी अवस्थेला पोहचणे. ते साधले तरच विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडण्याची शक्यता... असे कवीच्या मनात असावे, असे मनाला वाटते!  

म्हणजे नक्की कसे हे सांगायचे तर, परवा कुठल्या एका टिपणासाठी काही संदर्भ शोधण्याचे रिकामे उद्योग करत असतांना, 'मोह मोह के धागे...' हाती लागले आणि, विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडणे म्हणजे काय याची प्रचिती तर आलीच पण त्या आधीच्या ओळींमधल्या तारा विजेच्या असाव्या असा जोरका झटका जोरसेच बसला जेव्हा वरुण ग्रोव्हरच्या मर्मग्राही शब्दांना आणि मोनाली ठाकूरच्या काळजात रुतणाऱ्या आवाजाला स्वरसाज, 'आग लगा दूंगा, आग लगा दूंगा...' वाल्या ज्वलनशील अन्नू मलिकने चढवलाय, हे समजले! अशा सटीसामाशी दिलेल्या मास्टरपीसमुळे या माणसाचे हजार गुन्हे माफ करावेच लागतात... 

मी म्हणतोय म्हणून नव्हे, स्वतः ऐकून ठरवा... 
'तू होगा जरा पागल तुने मुझको है चुना...' 
'के तेरी झूटी बातें मै सारी मान लुं...'
असले काळजात घुसणारे शब्द आणि तो मध्येच सनईचा पीस...
अरे देवा! डोळे मिटून ऐकले की होणारच अवस्था...
उन्मनी !

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०२३

द्वंद्व...!


आशा निराशेचा
खेळ जीवघेणा
द्वंद्व आणि बाणा
अविनाशी...

उजळाव्या नित्य
उषा आणि निशा
नव्या दाही दिशा
माझ्यासाठी...!

रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३

विवेकदीप...!

Life is a balance between holding on and letting go...! 
                                                                                                    – Rumi


जलपर्णीने आच्छादलेले पाणी अतिशय नेत्रसुखद वाटते. 

पाण्यावर हिरवागार गालिचा घालावा असे दृष्य मनाला गारवा देते. 
'किती ही निसर्गाची अद्भुत किमया...' असे ही मनास वाटू शकते. 
तथापि जलपर्णी कधीही शुद्ध, नितळ, वाहत्या पाण्यावर पोसली जात नाही. 
ती पोसली जाते पाण्यातील प्रदूषित घटकांवर.
त्यामुळे जलपर्णीचे अस्तित्व हे प्रदूषित पाण्याचे निदर्शक ठरते.
अर्थात जलपर्णी निळकंठासारखे पाण्यातील हलाहल पचवून घेते हेही खरे.
जलपर्णी दूषित पाण्याचे नैसर्गिक पद्धतीने शुद्धीकरण करते यातही तथ्यांश आहेच. 
परंतु जलपर्णीच्या अस्तित्वाने पाण्याचे मूळ प्रवाही, निवळशंख स्वरूप नष्ट होते. 
सूर्यकिरणे पाण्याच्या तळापर्यंत पोहचू शकत नाहीत. 
तेव्हा, 'जलपर्णी मारक की तारक' हा वाद आपण जलतज्ञ आणि पर्यावरणवाद्यांवर सोडून देऊ. 

पण अनिर्बंध 'विकासा'ने येणारी 'समृद्धी' ही या जलपर्णीसारखीच असल्याने तिचा विचार करायलाच हवा. पाणी प्रवाही, निर्मळ, नितळ आणि प्रदूषणमुक्त ठेवल्यास जलपर्णीला खाद्यच मिळणार नाही. कुठलाही सजीव खाद्याशिवाय जगणे, वाढणे शक्यच नसल्याने, शुद्ध पाण्यात जलपर्णी फोफावण्याची शक्यताच नाही... न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी !

विवेकशून्य विकास आणि अनैतिक समृद्धी यांचा लोभ आणि बडेजाव टाळता आला तर अशी दिखाऊ जलपर्णी उगवणारच नाही आणि मानवी संस्कृतीचा नितळ प्रवाह अखंड वाहता राहील.

म्हणूनच 'भावार्थदीपिके'च्या पंधराव्या अध्यायात माऊली म्हणतात...

सुर्ये आधिष्ठीली प्राची 
जगा जाणिव दे प्रकाशाची 
तैसी श्रोतया ज्ञानाची 
दिवाळी करी

मी अविवेकाची काजळी ।
फेडूनि विवेकदीप उजळी
ते योगिया पाहे दिवाळी
निरंतर

संपन्नता, समृद्धी, विकास आणि भरभराटीच्या दिवाळीत सद्विवेकाचा दीप उजळू दे 
हीच या तेजोत्सवी प्रार्थना आणि हाच या प्रकाशपर्वचा संदेश...! 

असतो मा सद्गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मा अमृतं गमय ।

शुभम भवतु !

रविवार, २९ ऑक्टोबर, २०२३

सु-बुद्ध...!


नको इर्षा नको दंभ
माणुसकीचा आरंभ
जपण्यास कालत्रयी
युद्ध नको बुद्ध हवा...

कहाण्या त्या उगाळती
संस्कृतीही डागाळती
जाते मानव्य जळूनी
रक्षिण्या संयम हवा... 

अत्याचार झाले फार
अघोरी सारा संहार
अनावर हे आघात
पुसण्या अ-शोक हवा...

जग धावे सैरावैरी
उतावीळ नरनारी
भुलूनी ज्या 'विकासा'स
त्यांसही विवेक हवा...

षडरिपूंचा विळखा
'अहं' वेळीच ओळखा
विखारी विकारी जग
माणूस सु-बुद्ध हवा...

युद्ध नको बुद्ध हवा...!

मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०२३

दश-हरा...!

 

कुठले सोने लुटायचे 
कुठली देवी पुजायची 
कसला उत्सव करायचा
कुठल्या सीमा उल्लंघायच्या...

याच्या सद्-विवेकाचा
दंभ-विकारावर  विजय...

हीच विजयादशमी... हाच दश-हरा...!

आत्मारामाने अहंकाराच्या विलयाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

शनिवार, १४ ऑक्टोबर, २०२३

बोध...!



जिंदा बाप कोई न पुजे,
मरे बाद पुजवाये |
मुठ्ठी भर चावल लेके,
कौवे को बाप बनाय ||

कांकर पाथर जोरि के,
मस्जिद लई चुनाय |
ता उपर मुल्ला बांग दे,
क्या बहरा हुआ खुदाय ||

मुंड मुड़या हरि मिलें,
सब कोई लेई मुड़ाय |
बार-बार के मुड़ते,
भेंड़ा न बैकुण्ठ जाय ||

जीवन में मरना भला,
जो मरि जानै कोय
|
मरना पहिले जो मरै,
अजय अमर सो होय ||

मैं जानूँ मन मरि गया,
मरि के हुआ भूत |
मूये पीछे उठि लगा,
ऐसा मेरा पूत ||

भक्त मरे क्या रोइये,
जो अपने घर जाय |
रोइये साकट बपुरे,
हाटों हाट बिकाय ||

जब लग आश शरीर की,
मिरतक हुआ न जाय |
काया माया मन तजै,
चौड़े रहा बजाय ||

- संत कबीर