मंगळवार, २९ मे, २०१८

'मी सावरकर'


सन्मित्र डॉ. सचिन चिंगरे, धुळे यांनी, 
'मी सावरकर' एक अभिनव वक्तृत्व स्पर्धा २०१८ साठी 
'वरिष्ठ गट - ४५ ते ६०' या श्रेणीत पाठविलेला त्यांच्या प्रकटनाचा व्हीडीओ.

सोमवार, २८ मे, २०१८

तात्याराव...!

स्वतंत्र भारत आणि मातृभूमीच्या प्रेमास समर्पित विशिष्ट हिंदुत्वाचा विचार मांडणारे, आद्य क्रांतिकारक, धीरोद्दात्त स्वातंत्र्यसेनानी, मुत्सद्दी राजकारणी, विद्याननिष्ठ तत्वज्ञ, जातीअंताचे तत्वज्ञान मांडणारे समाजसुधारकांचे प्रणेते आणि असीम प्रतिभा तथा अफाट बुद्धिमत्ता यांचा अनोखा संगम असलेले भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धीचे चळवळींचे द्रष्टे धुरीण - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उर्फ तात्याराव यांची आज १३५वी जयंती. 

‘१८५७चा स्वातंत्र्य समर’ या ग्रंथात या दैवी प्रतिभेच्या साहित्यिकाने, ब्रिटीशांनी ज्याचा 'फसलेले बंड' अशी नोंद करून बेदखल करण्याचा प्रयत्न केला, तो 'स्वातंत्र्यसंग्राम' कसा होता याची अत्यंत तर्कशुद्ध आणि शास्त्रीय मांडणी करून देशवासीयांच्या अस्मितेला केवळ आवाहनच केले नाही तर स्वातंत्र्यलढ्याच्या यज्ञकुंडातला वन्ही चेतविण्यासाठी आपल्या आयुष्याच्या समिधा केल्या.

ओजस्वी विचार, अमोघ वक्तृत्व, अभिजात प्रकटन, अलौकिक ध्येर्य आणि असाधारण प्रतिभा लाभलेल्या या एकमेवाव्द्वितीय पुरुषोत्तमाने सुमारे १०,००० पाने मराठीत आणि १,५०० पाने इंग्रजीत एवढे विपुल आणि समृद्ध लेखन केले आहे. ते वाचण्याचा, समजून घेण्याचा आणि आचरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हीच या महापुरुषास खरी आदरांजली ठरेल.

श्री. नित्सुरे सरांनी स्वातंत्र्यवीरांच्या १००व्या जयंती निमित्ताने रचलेली कविता आज या प्रसंगी स्वत: गाऊन दाखवली त्याचे चित्रीकरण सर्वांसाठी...

रविवार, २० मे, २०१८

राज-का-रण...!


कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने गेले पाच दिवस लोकशाही व एकूणच राजकीय व्यवस्थेचा जो फड रंगला त्यामुळे नागरिकांच्या राजकीय भानाचा, त्यातील सहभागाचा आणि त्या संबंधी परिपक्वतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. आपल्याला खरेखुरे लोकशाही राज्य हवे असल्यास नागरिकांच्या जाणीव जागृती, राजकीय आकलन क्षमता-विकास आणि राजकारणातील सक्रीय सहभागाला पर्याय नाही हे सत्य पुन्हा नव्याने अधोरेखित झाले. या निमित्ताने जर्मन कवि, नाटककार व रंगकर्मी बेरटोल्ट ब्रेक्ट याने त्याचे अत्यंत परखड विचार नि:संदिग्धपणे ज्या कठोर शब्दात मांडलेत ते जाणून घ्यायलाच हवेत. मूळ जर्मन प्रकटनाचा हा मराठीतील मुक्त अनुवाद...

जगात निरनिराळ्या प्रकारचे अशिक्षित आढळतात परन्तु सर्वात वाईट अडाणी हा 'राजकीय-अशिक्षित' होय. तो काहीही ऐकत नाही, काहीही पहात नाही आणि कुठल्याही राजकीय घडामोडीत भाग घेत नाही. त्याला, आपल्याला लागणाऱ्या डाळ-तांदूळ, पीठ-मीठ, भाडे-तोडे, औषध-पाणी आणि एकूणच जीवनावश्यक सर्वच घटकांचे दाम राजकीय धोरणांवर ठरतात, याचा एकततर पत्ताच नसतो किंवा तमा नसते. एवढेच नाही तर या महाभागाला आपल्या राजकीय अनास्थेचा एवढा दंभ असतो की तो ‘मला राजकारणाविषयी मनस्वी घृणा आहे’ असे छातीठोकपणे सांगत हिंडतो. अशा महामूर्खास या गोष्टीचा मुळी पत्ताच नसतो की त्याच्या राजकीय घडामोडींपासून अलिप्त रहाण्याने समाजात वेश्या, अनाथ बालके, भुरटे चोर-लुटारू एवढेच नव्हे तर शोषण करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे लांगुलचालन करणारे भ्रष्ट राजकारणी यांची वाढ होत असते...!

शनिवार, १२ मे, २०१८

दिनविशेष...!


आज मातृदिन आणि पपांचा वाढदिवस!

'चला पालकत्व साजरे करू या...' या माझ्या महत्वाकांक्षी उपक्रमाला याहून अधिक चांगला मुहूर्त मिळणे शक्य नाही. आज या कार्यक्रमाची संहिता पक्की करण्याचे काम सुरु करतांना, 'आई-बाप' या विषयी वपुंचे विचार केवळ संस्मरणीयच नाही तर अत्यंत सूचक व म्हणूनच वंदनीय ठरतात.

वपु म्हणतात...

"नजर शाबूत असलेला बाप मुलाला एकदाच जन्म देऊन थांबत नाही, आयुष्यभर तो जन्मच देत असतो. मुलाला मोकळेपणी फिरून देणे, तो एक स्वयंभू जीव आहे हे जाणणं, त्याला त्याची स्वतःची सुखदु:ख आहेत याचं स्मरण ठेवणं, लोभ-मोह-माया या मर्यादांनी तो स्वतंत्रपणे बांधला गेला आहे याची ओळख होणं आणि आयुष्याला सामोरं जाण्यासाठी त्याला सगळे मार्ग मोकळे ठेवणं... हे जो बाप करतो तो प्रतिक्षणी मुलाला जन्म देतो!"

"मुलाच्या हातून एखादी चूक झाली तर आईला तो स्वतःचा अपमान वाटतो, पण बापाला, त्या चुकीचे परिणाम मुलालाच जास्त भोगावे लागतील, याची चिंता वाटते. वार झाला तर आई जखमेवर फुंकर घालते, बाप वरच्यावरच वार पेलून धरतो..."

आयुष्यात ज्यांना असे आई-बाप लाभतात त्यांना निराळे मातृदिन - पितृदिन साजरे करावे लागत नाहीत. आई-बापाची नित्य दखल घेणं, काळजी घेणं हा कर्तव्यभावनेने व्यावहारिक पातळीवर करायचा उपचार न राहता मनोमन जागवायचा संस्कार आणि नित्य सहर्ष साजरा करायचा आचार होतो.

तेंव्हा आजच दिवस अनेकार्थाने खासच... आपण धन्य आहोत या भावनेने आणि ऋणाईत आहोत या जाणिवेने साजरा करण्याचा... मर्मबंधात पिंपळपानासारखा जपून ठेवण्याचा...

...म्हणून आजचा दिनविशेष!

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

भाविक...!

ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु।। 
अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप।। 
दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा।। 
तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती।।

ढोंगी अध्यात्मिक गुरु आसाराम याला बलात्कारप्रकरणी शिक्षा - बातमी  

बाबा-बापू-बुवा-गुरु
हे तर केवळ नाविक
देवत्व देती तयांना
अंध भक्त भाविक...!

मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

'एपिक'...!


कविता ही गोष्टच मुळी अद्भुत अन गूढरम्य.
वर्डस्वर्थच्या व्याख्येनुसार स्वमग्नतेच्या एकांतात उफाळून येणाऱ्या उत्कट भावनांचा उत्स्फूर्त अविष्कार!
खर तर भावनांच्या सच्चेपणा व्यतिरिक्त कवितेला अधिक निकष असण्याचे कारण नाही.
विंदांच्या भाषेत सांगायचे तर कवितेला काय लागते – कागद आणि 'पेन'  'शील'!
पन्नास वर्षे वय वाढल्याने विंदांच्या कवितेच्या निकषात ताल, लय, गेयता आणि आधुनिक ‘मूल्य’ यांची वाढीव भर स्वाभाविकच म्हणायची.
आध्यात्मिक ‘स्वान्त सुखाय’ कर्म जेव्हा लौकिक मोहांकडे झुकते तेव्हा अभिजाततेचा क्षय होण्याची शक्यता अधिक.
कागदाची जागा ‘स्क्रीन’ने, ‘पेन’ची साजरेपणाने आणि ‘शीला’ची व्यवहाराने घेतल्यावर कविता थोडी घुसमटली तर नवल काय?
पण अशा घडीव, बांधील, बेगडी आणि ‘प्रेरित’ काव्यरतिबाच्या काळात काही रानफुले जेव्हा निरपेक्षतेने उमलून वाऱ्यासोबत नि:संदर्भ डोलतात तेव्हा ते पाहण्याचा आनंद जेवढा निखळ असतो तेवढाच तो अनुभव अभिजात... आजच्या पिढीच्या भाषेत ‘एपिक’!

आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे मधुराणी प्रभुलकर यांनी कवितेची निर्मिती प्रक्रिया कवींकडून जाणून घेण्यासाठी सुरु केलेला उपक्रम ‘कवितेचे पान’ आणि या यू ट्यूब व्यासपीठावर आश्लेषा महाजन यांच्याशी त्यांच्या शंभर प्रेमकवितांचा काव्यसंग्रह ‘मनभावन’ निमितत्ताने केलेले हितगूज. खुद्द कवयित्रीकडून प्राप्त झालेल्या या लिंकबद्दल मन:पूर्वक आभार मानून यावर माझी प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता मी सन्मान म्हणून स्वीकारतो! ‘जन्मजान्हवी’ निमित्ताने झालेला आमचा परिचय ‘वहाण’च्या चर्चेने खुलला तेव्हाचं हे पाणी निराळे असल्याची चाहूल लागली होती. स्त्री-मनाचे पापुद्रे उलगडून दाखविण्याची कवयित्रीची हातोटी विलक्षण आहे हे जाणवले होतेच. तथापि स्त्री-वादी लेखिका, कवयित्री किंवा कुणीही सहसा पुरुषद्वेष्ट्या आणि पर्यायाने विद्रोही आणि म्हणून रुक्ष, परखड तथा अनरोमैंटिकच लिहितात असा एक समज सर्वत्र पहावयास मिळतो, तो या निमित्ताने गैर ठरला!

उभे-आडवे यमक हा ना. धो. महानोरांच्या रचनांमधला मोहक ठसका जेवढा गोड तेवढाच झणझणीत! कवयित्रीच्या या छंदाचे प्रभावी उपयोजन, नावातच ‘तटतटून’ येणारे मेघ आणि...
“घननिळ नभाचा तोल
सुटे, कल्लोळ उफाडा वेडा
कैफात सुखाच्या चूर
नदीला पूर पहा उरमोडा...”
हा अस्सल गावरान विभ्रम प्रेमी मनाला भावला नाही तरच नवल.

तर, सुमंदारमाला या आडव्या वृत्तातला विरूपेच्या रूपकाने येणारा तत्वचिंतक प्रेमभाव वेगळा असला तरी तो देखील विदग्धच आहे. शंभरापैकी केवळ दोनच कविता ऐकून, त्यांच्या उमलण्याच्या प्रक्रियेची उकल कवियत्रीकडूनच ऐकल्याने, उरलेल्या वाचण्याची / ऐकण्याची ओढ लावणारा हा ‘मनभावन’ अनुभवायलाच हवा!

‘कवितेचे पान’ या सृजनात्मक प्रवासाचा अदमास घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपक्रमाबद्दल मधुराणी प्रभुलकर यांचे आभार, प्रेमशतकी काव्यसंग्रह ‘मनभावन’ सादर करणाऱ्या कवयित्री आश्लेषा महाजन यांचे अभिनंदन आणि अधिक सर्जक प्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

गुरुवार, १९ एप्रिल, २०१८

एक तितली...



तंत्रज्ञानातील अफाट प्रगतीमुळे आणि बदलत्या मूल्यव्यवस्थांच्या झगमगाटात आजच्या पिढीला ही चित्रफित अनेक अर्थांनी बाळबोध आणि सुमार वाटणे शक्य आहे, तथापि अॅनिमेटेड फिल्म या अभिनव प्रकाराशी आमची ओळख करून देणारी ही चित्रफित आमच्या उमलत्या भावविश्वाचा सुभग भाग असल्याने तिला आमच्या आयुष्यात आणि स्मरणात अढळ स्थान आहे... आज हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे १९७४ साली, कुठल्याही आधुनिक संगणक प्रणालीशिवाय केवळ चित्रांच्या आणि फिल्मच्या माध्यमातून ही भावस्पर्शी प्रबोधनपर शॉर्टफिल्म बनविणाऱ्या भीमसेन खुराणा यांचे काल वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. आमचे बौद्धिक, भावनिक आणि सांस्कृतिक आयुष्य समृद्ध करणारे जे अनेक अदृश्य हात होते त्यातील आणखी एक काल विसावला... हे ऋण जन्मोजन्मी फिटणे शक्य नाही. कृतज्ञतापुर्वक आदरांजली!

बुधवार, १८ एप्रिल, २०१८

गोविंद...!


किती निर्भया संपल्या तरी, भय इथले संपत नाही...!

भारताच्या कानाकोपऱ्यातून रोज येणाऱ्या भयानक, हिडीस आणि राक्षसी क्रौर्याच्या बातम्या आणि त्यावरून चालणारे राजकारण हे जेवढे लज्जास्पद आहे तेवढेच गर्हणीय! अशा झुंडशाहीच्या आक्रमक वातावरणात श्वास घेणारी पिढी विचारशून्य, विवेकहीन, प्रतिक्रियाजन्य आणि कणाहीन जन्मल्यास राष्ट्र म्हणून आपण कुठल्या तोंडाने 'बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो' गाणार आहोत आणि महासत्ता होण्याचे स्वप्न बघणार आहोत? मानवतेला अभिमान वाटेल असे राष्ट्र घडविणाऱ्या युवकांच्या ओठावर आपल्या गौरवशाली वैभवाची प्रेरणादायक स्तुतीगीते असतात; 'सेल्फी मैने ले लिया' आणि 'पप्पी दे पारूला' असली अभिरुचीशून्य, थिल्लर आणि बीभत्स गाणी सिगारेटबरोबर ओठावर मिरवणारी पिढी विकारच निर्माण करू शकते, विचार नाही...!

सभोवतालच्या अशा अत्यंत भयावह, निराशा आणि उद्वेगजनक परिस्थितीत आपण परिस्थितीशरण तथा हतबल आहोत असे जिथे भल्याभल्या धुरंधरांची भावना आहे तिथे लहानग्या बालिका आणि त्यांच्या तथाकथित आधुनिक (अबला) नारी असलेल्या माता काय करणार...?


पण नाही... झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या या देशात लोकशाही मार्गाने घडणाऱ्या घटनांवर काही विचक्षण भाष्य करण्यास काही महिलाच पुढे आल्या तर त्यात नवल ते काय? हेमा बिसावा यांची ही शॉर्ट फिल्म नाक्यानाक्यावर वासुगिरी करणाऱ्या भामट्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालेल ही अपेक्षा आणि ज्यांच्या जीवावर ही कीड पोसली जाते त्या सत्तालोलुप, तत्वशुन्य आणि संधिसाधू टोळधाडीचेही डोळे उघडतील ही अपेक्षेची परमावधी! आणि कुणाचेच प्रबोधन नाहीच होऊ शकले तर पुष्यमित्र उपाध्यायांनी चेतावणी देऊन ठेवली आहेच...


छोडो मेहंदी खड्ग संभालो
खुद ही अपना चीर बचा लो
द्यूत बिछाये बैठे शकुनि,
मस्तक सब बिक जायेंगे
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे I  

कब तक आस लगाओगी तुम,
बिक़े हुए अखबारों से,
कैसी रक्षा मांग रही हो
दुशासन दरबारों से I

स्वयं जो लज्जा हीन पड़े हैं
वे क्या लाज बचायेंगे
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आयंगे I

कल तक केवल अँधा राजा,
अब गूंगा बहरा भी है
होठ सी दिए हैं जनता के,
कानों पर पहरा भी है I

तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे,
किसको क्या समझायेंगे?
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयंगे I

-पुष्यमित्र उपाध्याय

आणि हे कसे करावे यासाठी एक सूचक व्हिडीओ 'शिवाजी ट्रेल'च्या 'हिस्ट्री क्लब' उपक्रमात प्रशिक्षण घेऊन नित्य सराव करणाऱ्या रणरागीणींचा...

शनिवार, ७ एप्रिल, २०१८

सूत्र...!


सूर्याची डूब झंकारते क्षितिज
सागराला मिळते धरणी मात्र,
सांज दाटता खुलतो किनारा
भेटता तो दिवस अन् ती रात्र...!

मंद सावल्या दूर पसरता
सांद्र सूर अन् भरते पात्र
उत्कट आवेगांना येतो बहर
श्वास फुलता, मोहरतात गात्र...!

सृजनाला आस ज्याची
प्रत्येक जीव निसर्गपुत्र
सहवेदनेत आणि याच
सापडते जगण्याचे सूत्र...!

गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

भविष्य...?



मनुष्य कितीही पराक्रमी, धाडसी, करारी आणि कर्तुत्ववान असला तरी आयुष्यात कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या पेचप्रसंगात आगतिक होतोच. अशा दिग्मूढ अवस्थेत अगदी विवेकी, प्रखर बुद्धिवादी आणि टोकाचा प्रयत्नवादी मनुष्यदेखील हतबुद्ध होतो आणि ‘हात दाखवून’ अवलक्षण करून घेतो. गर्भावस्थेतील अर्भकाच्या नखांनी भवतालच्या नाजूक आवरणास इजा होवू नये म्हणून निसर्गत: वळलेली मूठ हातावर निरनिराळ्या रेषा, खळगे आणि उंचवटे तयार करते आणि, स्वावलंबी होण्यास सर्व प्राण्यात सर्वाधिक वेळ घेणारं माणसाचं बाळ या हस्त-सामुद्रिकामध्ये ‘भविष्य’ – जी घडविण्याची गोष्ट असते पाहण्याची नव्हे – ती शोधत बसतं! हेही ठीक. मनुष्यजन्माच्या क्रमप्राप्त अनेकविध अपरिहार्यतांपैकी ती देखील एक मानण्यास प्रत्यवाय नसावा, पण म्हणून कुणी देवाधिदेव जगदीश्वर जो कि साक्षात 'नारायण' त्याचा हात बघून त्याचे ‘भविष्य’ वर्तवले तर...

अशा अचाट कल्पना सुचून त्यांना अफाट परिणाम आणि परिमाणही दिला नाही तर ते विंदा कसले? खुद्द परमेश्वराचे हस्त सामुद्रिक पाहून आकाशवाणी करणाऱ्या विंदांचा हा ‘देवेंद्र’ अविर्भाव पाहून कुणीही म्हणेल... 'नारायण, नारायण!'

भविष्य 

छत्रीप्रमाणे अवकाशाची
उघडझाप
करणाऱ्या तुझ्या हातावर

हे परमेश्वरा!

आकाशगंगेची दिगंत धनरेषा,
शुक्राचा उंचवटा,
सर्व ठीक.
पण तुला परदेशगमनाचा योग नाही.