रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

‘मना’पासून…!


आमचे आजोबा बापू केशव पुराणिक (अण्णा) अर्थात कवी केशवतनय यांच्या निवडक साहित्याचे टंकलेखन करून ते जतन करावे या उपक्रमाअंतर्गत, अण्णांनी केलेले श्रीमद् भगवद् गीतेचे समश्लोकी सुबोध रूपांतर ‘ओवी-गीता’ या रचनेचे पुनर्मुद्रण करण्याच्या आमच्या प्रयत्नास आपण सर्वांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद उत्साह वाढविणारा ठरला. कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो ‘ओवी-गीता’ या रचनेच्या द्वितीय आवृत्तीचा विमोचन कार्यक्रम, अण्णांच्या १२१व्या जयंतीच्या मुहूर्तावर शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी पुणे येथे स्नेही-सुहृदांच्या स्नेहल उपस्थतीत पार पडला.


अण्णांच्या १२१वी जयंती, भारताचा ७९वा स्वातंत्र्यदिन आणि जन्माष्टमी तथा ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीची पूर्वसंध्या असा चौरस मुहूर्त असल्याने असा योग पुन्हा जुळून येणे शक्य नव्हते म्हणून हा सोहळा याच दिवशी करण्याचे अनेक दिवसांपासून योजिले होते आणि तो संकल्प सिद्धीस जाण्यास अनेकांचा हातभार लागला, त्या सर्वांचा हा ‘मना’तला… 


ऋणनिर्देश 


आपल्या आजच्या या अनौपचारिक कौटुंबिक सोहळ्याला लाभलेले अभ्यासू, व्यासंगी पाहुणे, सर्व गीताप्रेमी रसिक आणि केशवतनय परिवाराचे सदस्य, त्यांचे आप्त, स्नेही व सुहृद, नमस्कार!


कौरवांचे ११ आणि पांडवांचे ७ असे १८ औक्षहिणी सैन्य सलग १८ दिवस लढले ते महाभारताचे युद्ध संपले. पांडवांनी युद्ध जिंकले असले तरी पार्थसारथी श्रीकृष्णाने आपला रथ भरधाव वेगाने दौडवत कुरुक्षेत्रापासून बऱ्याच लांब अंतरावर नेऊन एका निर्मनुष्य ओसाड-उजाड माळरानावर उभा केला आणि अर्जुनाला आज्ञा केली, “पार्था, सर्वप्रथम रथाच्या शीर्षस्थानी लावलेली हनुमंताची पताका उतरव आणि ती हातात घेऊन तू पायउतार हो. हनुमंताची पताका घेऊन रथापासून दूर सुरक्षित अंतरावर जाऊन उभा रहा.” 


गेले अठरा दिवस भगवंताच्या अगाध लीलांसह त्याचे विराटरूप दर्शन याची देही याची डोळा घेतले असल्याने, यामागेही त्याची काही योजना असेल याची खात्री असल्याने, रथावरील हनुमंताची पताका उतरवून अर्जुन दूर जाऊन उभा राहिला. श्रीकृष्णाने रथातील एक पाऊल उचलून जमिनीवर ठेवले तसे रथ डगमगू लागला. मोडेल की काय असे वाटू लागले. भगवंताने जसे दुसरे पाऊल उचलले तसा रथ उन्मळून पडला, कोसळला. भगवंतांचे दुसरे पाऊल जमिनीवर टेकून भगवंत जसा एक पाऊल पुढे सरकला तसा अर्जुनाचा रथ भस्म झाला, रथ उभा होता त्या जागी राखेचा एक मोठा ढीगारा तेवढा उरला!


निमिषार्धात घडलेल्या या सगळ्या घटनाक्रमाकडे भयचकित होऊन पाहणाऱ्या अर्जुनाला श्रीकृष्ण कधी त्याच्या बाजूला येऊन उभा राहिला त्याचा पत्ताही लागला नाही. पार्थाकडे नेहमीच्या सुस्मित वदनाने आणि स्नेहार्द नजरेने पाहणाऱ्या स्थिर-चित्त भगवंताला अर्जुन विचारता झाला, “योगेश्वरा, हा रे काय आणखीन एक चमत्कार?”


तेव्हा शांत, संयमित स्वरात कृष्ण म्हणाला, “हा शेवटचा चमत्कार! पार्था, तुला काय वाटले तू धुरंधर, रणवीर, सर्वश्रेष्ठ धनुर्धर असलास तरी कौरवांकडे महायोद्धयांची कमी होती काय? अरे, सूर्यपुत्र कर्ण हा युद्धकौशल्यात तुझ्यापेक्षा तसूभरही कमी नव्हता. त्याने आणि त्याच्या तोडीच्या योद्धयांनी डागलेल्या सर्व अस्त्र-शस्त्रांचा तुझ्या रथावर प्रभाव होता. केवळ सर्व देव-देवतांचा प्रतिनिधी हनुमंत त्यांच्या आशीर्वादरूपाने रथावर उंच फडकत होता आणि साक्षात मी रथाचे सारथ्य करीत होतो म्हणून ती सारी शस्त्रे त्याक्षणी निष्प्रभ ठरत होती. पण हनुमंताची पताका उतरवल्याने आणि मी पायउतार होताच त्या सर्व अस्त्र-शस्त्रांचा परिणाम एकाएकी प्रभावी होऊन तुझा रथ त्यात भस्म झाला...”


कुठलीही गोष्ट यशस्वी झाली तर ती मी केली हा माणसाचा भ्रम दूर होऊन त्याचे पाय जमिनीवर रहावेत म्हणूनच योगेश्वराने ही माया रचली असावी. सर्वप्रथम ‘अहं’चा त्याग करायला शिकायचे आहे आणि तेव्हढी एकच गोष्ट साधण्यासाठी मनुष्य जन्म अपुरा पडतो…


या तथाकथ्य प्रसंगातून कृष्णाने दिलेली ही शिकवण मला माझ्यापुरते गीतासार वाटते. संसारातही असेच अनेक अदृष्य हात आपल्या रथाचे रक्षण करीत असतात, आपल्याला मार्ग दाखवीत असतात. म्हणूनच समर्थ म्हणतात, 


सामर्थ्य आहे चळवळीचे I 

जो जो करील तयाचे I 

परंतु तेथे भगवंताचे I 

अधिष्ठान पाहिजे II


जय जय रघुवीर समर्थ!


कदाचित यासाठीच आपल्या संस्कारात चार प्रकारचे ऋण सांगितले आहे - देव ऋण, ऋषी ऋण, मातृपितृ ऋण आणि समाज ऋण. हे ऋण फेडण्यापेक्षा ते जाणणे, मानणे आणि त्या ऋणात रहाणे अधिक श्रेयस्कर कारण त्यामुळे ऋणानुबंध दृढ होतात असे आपली संस्कृती सांगते. तेव्हा आम्ही या ऋणात राहू इच्छित असलो तरी ऋणनिर्देशास प्रत्यवाय नसावा.


समर्थांनी मूर्ख लक्षणांमध्ये ‘सांगे वडिलांची कीर्ती…’ असेही एक लक्षण सांगितले असले तरी आजोबांबद्दल काही म्हटल्याची कुठे नोंद आढळली नाही तेव्हा ते धारिष्ट्य करायला हरकत नसावी. शिवाय या उद्योगाला स्वार्थाबरोबरच सांस्कृतिक आणि सामाजिक किनारही आहे.


अण्णांनी ‘केशवतनय’ या उपनामाने अध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक विषयांवर विविध साहित्यप्रकारात विपुल लेखन केले. धुळ्याच्या मीरा धाराशिवकर यांनी २५ वर्षं संशोधन करून अथक मेहनतीने लिहिलेल्या आणि राजवाडे संशोधन मंडळाने प्रकाशित केलेल्या ‘खान्देशातील साहित्यिक व त्यांचे साहित्य – एक अवलोकन’ या शोधनिबंधात अण्णांच्या कार्याची दखल घेतली आणि गेल्या हजार वर्षातील खान्देशातील साहित्यिकांच्या यादीत अण्णांच्या साहित्याला चार विभागात स्थान मिळाले ही आमच्यासाठी भूषणावह बाब!


दुसरे म्हणजे मराठी भाषा जगविण्याबद्दल जे ‘राज’कारण चालते त्यात ‘वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे…’ असेही एक पालुपद असते. यासंदर्भात पुलंचा एक किस्सा सांगतात. पुलंनी ही ओरड ऐकली तेंव्हा ते म्हणाले, ‘वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे असे मला वाटत नाही, फक्त वाचण्याचा क्रम चुकतो. तारुण्यात फॅन्टसी वाचण्यात काय हशील, तेव्हा ती घडविण्याची रग असते, असायला हवी. आणि आयुष्य कसे जगावे सांगणारा दासबोध म्हातारपणी वाचून काय उपयोग? तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि फॅन्टसी वाचण्याशिवाय गत्यन्तर नसते!’


पुलंना चुकीचा वाटलेला हा क्रम ठिक करायचा तर योग्य वयात सुयोग्य गोष्टी वाचायला हव्या आणि त्यासाठी त्या आकर्षक स्वरुपात सहज उपलब्ध असायला हव्या. आजच्या, एआय कडून अतार्किक मालिकांच्या सुमार भागांचा रतीब घालण्याच्या काळात सृजनशील नवनिर्मितीवर किती विसंबून रहावे हा प्रश्नच असल्याने, आपल्यापाशी जे काही अभिजात उपलब्ध आहे त्याची पुनर्निर्मिती करावी असे वाटले. पण ही सदिच्छा झाली, तिचा उपक्रम करण्यासाठी अनेक हातांची गरज होती. कुठलाही विधायक, सर्जक उपक्रम सिद्धीला नेण्यासाठी अनेकांच्या आशीर्वादाची, आधाराची, सहकार्याची, किमान सदिच्छांची गरज असते.


ओवी-गीतेची छापील प्रत काढण्याचे ठरविले तेव्हा अनेक प्रश्न होते, शंका होत्या आणि अर्थातच थोडीशी हुरहुरही होती. हो, अण्णांनी बऱ्याचदा निभावली असली तरी आम्ही ही प्रकाशकाची भूमिका पहिल्यांदाच निभावणार होतो! विद्याताई, तिचे यजमान मदनराव यांनी त्यांचे चिरंजीव हर्षदच्या मदतीने संपूर्ण ओवीगीता स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर टाईप करून मोठेच काम केलेले असले तरी त्याला पुस्तकरूपात आणणे सोपे नव्हते. पुस्तक छपाईला जाण्यापूर्वी करावयाचे मुद्रित शोधन अर्थात प्रूफ रिडींगचे अत्यंत जिकिरीचे काम अण्णांचा नाशिकस्थित नातू वैभव शामकांत पुराणिक अर्थात आमचा बंधुसखा कुमार याने नेहमीच्या नेमस्तपणे पार पाडले. एव्हढी सगळी सिद्धता झाल्यावर मुखपृष्ठ, मलपृष्ठाचे डिझाईन आणि पृष्ठ-मांडणीचे छोटेसे पोषाखी काम अस्मादिकांनी पार पाडले.


मुद्रण व्यवसायाची तोंडओळख असली तरी बारकावे माहीत असण्याचे कारण नव्हते. या कामी मदतीला धावून आला अण्णांचे बंधू अप्पाकाकांचा नातू प्रसाद प्रभाकर पुराणिक. धुळ्याच्या का. स. वाणी संस्थेशी अनेक वर्षे निगडित असल्याने आणि मुद्रण व्यवसायातील अभ्यासक्रमांना मार्गदर्शनाचा अनुभव असल्याने त्याने मुद्रणाची जबाबदारी समर्थपणे पेलली. निर्मितिमूल्यात कुठलीही तडजोड न करण्याची कल्पना कितीही रम्य असली तरी वपुंच्या पार्टनरने, ‘काव्याची दुसरी बाजू व्यवहाराचीच’ असे बजावले असल्याने जमाखर्चाचा ताळमेळ जमविण्यासाठी काही एक देणगी-मूल्य ठरविणे क्रमप्राप्त असले तरी ते पुस्तकावर छापू नये, आपण हवे ते योगदान करू असे सर्वानुमते ठरल्याने पुस्तकावर कुठेही किमतीचा उल्लेख नसला तरी या आवृत्तीसाठी एक प्रत १०० रुपयांना असे मूळ देणगीमूल्य आणि अधिक प्रतींसाठी यथोचित सवलत देण्याचे ठरले.


पुस्तकाचे साहित्यिक मूल्य ठाऊक असले तरी त्याचे भौतिक वजन किती असते याबद्दल अनभिज्ञ असल्याने या छापील पुस्तकांचे गट्ठे अंदाजे १५० किलो भरल्याने ते धुळ्याहून पुण्याला आणणे हे एक दिव्यच होते. ती जबाबदारी स्वखुशीने स्वीकारून नेहमीप्रमाणे काळजीपूर्वक पार पाडली ती आमचे साडू मकरंद शिंगणवाडे यांनी! पुण्यासारख्या ठिकाणी कार्य सिद्धीस नेण्याचे सामर्थ्य ‘श्रीं’नी व्यवस्थापकाकंडे आऊटसोर्स केलेले असते. या कार्यक्रमासाठी हे सभागृह सर्व सुविधांसह उपलब्ध करून देणारे देशपांडे दाम्पत्य देखील मूळ खान्देशचेच आहे आणि या कार्यक्रमाचे चित्रिकरण करण्यासाठी लाभलेला युवक हा एरवी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे बुवा यांच्या ‘कीर्तनविश्वया युट्युब चॅनलसाठी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळतो हा एक सुभग योगायोग!


साहेबाच्या भाषेत सांगायचे तर ‘लास्ट बट नॉट द लिस्ट’ म्हणजे आमचे सर्व कुटुंबीय ज्यांनी आपापल्या परीने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लावला. त्यातही साहेब म्हणतो तसे, ‘बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन, देअर इज अ वुमन… टेलिंग हिम यू आर रॉंग!’ आता साहेबाने ही वुमन नक्की कोण, म्हणजे आई, बहीण, मैत्रीण की बायको याचा खुलासा केला नसला तरी आपल्या संस्कृतीत तिला ‘गृहिणी’... संपूर्ण गृह जिचे ऋणी आहे ती गृहिणी, असा मान देण्याची पद्धत आहे! नित्य दिनक्रमात आमचे घर आणि अशा प्रासंगिक उपक्रमात त्याच्या सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या माझ्या बेटर हाफच्या भक्कम आधाराशिवाय असे धाडस करणे तर लांब, त्याची कल्पनाही करता येणे मला शक्य नाही. तेंव्हा या उपक्रमाला आई-पपा, बायको-मुलगी यांची साथ अमूल्य!     


जाता जाता… 


द्वितीय आवृत्ती विमोचनाच्या आठवडाभरात संपली आणि तृतीय आवृत्तीची नोंदणीही सुरु झाली आहे…

भगवंताची कृपा, अण्णांचा आशीर्वाद, कुटुंबीयांचा पाठींबा आणि आपला स्नेह यामुळेच हे शक्य झाले… 


…अजून काय हवे!


धन्यवाद!


शुभम भवतु !


धुळ्याच्या दैनिक आपला महाराष्ट्र आणि पुण्याच्या लोकमतने या कार्यक्रमाची घेतलेली दखल

सोमवार, ९ डिसेंबर, २०२४

स्मरणरंजन...!


आमचे आजोबा, बा. के. पुराणिक उर्फ 'केशवतनय' अर्थात 'अण्णा' यांचा अत्यल्प परिचय 'कवित्व' (मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८), 'श्री गुरुचरित्र' (रविवार, १२ डिसेंबर, २०२१), 'ओवी-गीता' (शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२), या पोस्ट्समधून झाला. मीरा धाराशिवकर यांनी अनेक वर्षांच्या अथक परिश्रमाने आणि मोठ्या चिकाटीने साकारलेल्या खान्देशातील इ.स. १२ व्या शतकापासून थेट साल २०१४ पर्यंतच्या साहित्यिकांच्या योगदानाचा ग्रंथ राजवाडे संशोधन मंडळ, धुळे यांनी प्रकाशित केला. त्याची प्रत आम्हाला अलीकडेच प्राप्त झाली. त्यात चार विभांगामध्ये अण्णांच्या नावाचा आणि कार्याचा उल्लेख आला ही आमच्यासाठी मोठी गौरवाची बाब! 

अण्णांचे ज्येष्ठ सुपुत्र म्हणजेच आमचे थोरले काका शामकांत पुराणिक यांचाही अत्यल्प परिचय 'गदिमा' (सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८). या पोस्टमध्ये झाला. काकांची ज्येष्ठ सुकन्या सौ. विद्या मदन कुलकर्णी हिचा परिचय 'ओवी-गीता' (शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२) या पोस्टमधून झाला आणि 'गीत ज्ञानेश्वर' कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना आपण तिला पाहिले. थोरल्या काकांची पत्नी आणि विद्याताई, विनया आणि आमचा बंधुसखा कुमार यांची आई म्हणजे आमच्या थोरल्या सुशीला काकू!

गोष्टी-वेल्हाळ सुशीला काकू व्यावहारिक गृहकर्तव्ये नेमस्तपणे पार पाडतांना सतत जुन्या आठवणीत रमलेल्या असत आणि त्यांच्या गतायुष्यातील घटना, किस्से अतिशय रसाळपणे कथन करीत. गेल्या वर्षी काकू गेल्यानंतर, ताईच्या वहीत जपून ठेवलेल्या या मोरपिसांचा पिसारा फुलवून, काकूंच्या आठवणींची ऊब सतत सोबत रहावी या कल्पनेला, 'ती आई होती म्हणूनी...' या स्मरणरंजन पुस्तिकेच्या रूपात मूर्त स्वरूप आले. 

अण्णांच्या साहित्यिक प्रतिभेपुढे आम्हां भावंडांचे लिखाण म्हणजे अगदीच 'मख़मल में टाट का पैबंद' (ताईच्या भाषेत 'थेंबुटा') असले तरी वारसा पुढे चालू राहिला आणि आता मैत्रेयीही हिंदी, इंग्रजीत तिच्या पद्धतीने तो पुढे नेतेय हेही नसे थोडके...      

तसे पाहू गेल्यास, 'ती आई होती म्हणूनी...' हे एक अत्यंत खाजगी, वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रकटन असले तरी, त्याचा सुमारे शतकभराचा पैस पाहता, त्यात मध्यमवर्गीय समाजमनाचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. शिवाय, वपु म्हणतात तसे, 'As you write more and more personal becomes more and more universal', या न्यायाने प्रत्येक प्रकटन आपापल्या परीने वैश्विक असतेच. 

कुठल्याही व्यवस्थेला नावे ठेवतांना, आपणही त्या व्यवस्थेचा भाग आहोत आणि त्यामुळे आपणही त्या अवस्थेस अंशतः कारणीभूत आहोत हे स्वीकारणे शहाणपणाचे लक्षण असते. 'समाज' तर माणसांनीच घडवलेला असल्याने त्याची दुरवस्था झाली असेल तर तो दोष कुणाचा? पूर्वीची माणसे, त्यांच्या जीवननिष्ठा, ध्येय-धारणा आणि मूलभूत जीवनमूल्ये यांना तिलांजली देऊन, 'पूर्वीचे दिवस राहिले नाहीत हो आता...' असे रडगाणे लावून आठवणींचे कढ काढण्यात काय हशील?

बदलत्या जीवनशैलीतील कालसापेक्ष आधुनिक गोष्टींचा विवेकी स्वीकार करतांना आणि पूर्वी होऊन गेलेल्या मोठया माणसांची स्तवने गातांना, त्यांच्या प्रतिमांचे पूजन करतांनाच, त्यांच्या संस्कारांचे जतन-संवर्धन, त्यांच्या उदात्त विचारांचे आचरण आणि त्यांच्या शिकवणुकीचे पालन केल्यास बिघडलेल्या समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यास प्रत्यवाय नसावा.

'परिस्थिती बदलली म्हणून माणसाने बदलू नये, माणुसकी सोडू नये...' या दुर्दम्य आशावादाने हा उहापोह, आज सुशीला काकूंच्या प्रथम स्मृतिदिनी, त्यांच्या नेमस्त, प्रेरणादायी आयुष्यास समर्पित...

इतिश्री !

रविवार, ३ नोव्हेंबर, २०२४

बहिणाबाई...!

तोंडओळख म्हणजे ओळख नव्हे. ओळख आहे म्हणजे मैत्र असेलच असे नाही. मैत्र जुळले तरी स्नेह वाढेल असे नव्हे आणि स्नेह जोपासला तरी नातं तयार होईलच याची खात्री नाही. तद्वतच केवळ नातं आहे म्हणून माया, स्नेह असेलच असं नाही. नातं असल्याने मैत्र, ओळख असेलच याची खात्री नाही. याऊलट काही ओळखी, नाती ही जवळची, सख्खी नसूनही तिथे नाळ जुळलेली असते. ते संबंध कुठल्याच नात्याच्या, निमित्ताच्या, नियोजनाच्या बांधील नसतात, तिथे फक्त बांधिलकी असते.

बऱ्याचदा विशिष्ट प्रसंगात जवळच्या, सख्ख्या नात्यातल्या, जिवलग मैत्रीच्या व्यक्तींचे वागणे अनाकलनीय वाटते आणि ती ओळख नवीन भासते. आणि अशा वेळी प्रश्न पडतो… हीच का ती व्यक्ती जिला आपण ओळखून आहोत असे आपल्याला वाटत होते…? वेळीप्रसंगी ज्यांची भेट घडते, सहवास लाभतो त्यांची ही कथा तर आभासी माध्यमांवरील काँटॅक्ट्स, कनेक्ट्स, फॉलोअर्स बद्दल न बोललेलेच बरे… त्यातले कित्येक प्रत्यक्ष भेटले तर ठार ओळखू येत नाहीत किंवा ओळख देत नाहीत असा अनुभव आहे!

आज या नात्याच्या विश्लेषणाचे निमित्त म्हणजे आजचा दिनविशेष - भाऊबीज! लौकिक अर्थाने दिवाळसणाची सांगता करणारा भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सव. महाराष्ट्रात आज ‘लाडक्या बहिणी’साठी बकध्यानाचे प्रयोग कितीही जोरात चालले असले तरी त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्व कमी होत नाही. राजकीय प्रयोगांचे कवित्व ‘वर्षा’अखेरीस संपेल पण मुक्ताई-ज्ञानोबाचे भावबंध कालातीत होते, आहेत आणि राहतील. त्यासाठी भाऊबीजेला अभिजात दर्जा मिळून शासकीय व्हायची गरज नाही.

इगो म्हणजे सर्च फॉर अनडिव्हायडेड अटेंशन आणि हा इगो कागदाला चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते… इति वपु. सर्टिफिकेटचे कागद जेवढे जास्त तेवढा इगो मोठा. सर्टिफिकेट्स आणि त्यायोगे येणारा इगो आहे म्हणून माणूस जाणता असेल, सूज्ञ असेल, संवेदनशील किंवा समंजस असेलच असे नाही कारण यातले कुठलेच गुण शिकून येत नाहीत; जाणीवेने जगण्यातून येतात. आमच्या सकल खान्देशची बहिणाबाई शाळेची पायरीसुद्धा चढली नव्हती पण तिच्या जगण्याची जाण बघा…

जगतभगिनी असलेल्या बहिणाबाईंनी त्या काळी अत्याधुनिक मानल्या गेलेल्या जळगावातल्या पहिल्या ‘स्टीम प्रिंटिंग मशीन’, म्हणजे आजच्या संदर्भात सांगायचे तर ‘मशीन लर्निंग’ बद्दल आपल्या प्रगल्भ जाणीवेतून आणि काळाच्या पलीकडे पाहणाऱ्या द्रष्ट्या नजरेतून जो विचार मांडला आहे तो आजच्या किती सुशिक्षित, उच्चशिक्षित तथा उच्चपदस्थ, शीर्षस्थ नेतृत्वांच्या पचनी पडेल सांगणे कठीण आहे.

कोरा कागद देखील त्यावर उमटलेल्या शब्दांमुळे शहाणा होतो आणि इगो चिकटलेले कितीही कागद साठवून माणूस कसा ‘येडजाना’ राहतो ही कल्पनाच किती हृद्य आणि ही जाणिव किती मनोज्ञ आहे... सकल मानव्याच्या विश्वाचे आर्त ज्यांच्या मनी प्रकाशले अशा संत ज्ञानदेव-मुक्ताई ही भावंड आणि त्यांची परंपरा चालविणाऱ्या, सकल जनांची बहिणाबाई यांची ही कालातीत भाऊबीज आजच्या मुहूर्तावर !

मंमई बाजारावाटे
चाले धडाड-दनाना
असा जयगावामधी
नानाजीचा छापखाना

नानाजीचा छापखाना
त्यात मोठे मोठे पुठ्ठे
तसे शाईचे दराम
आन कागदाचे गठ्ठे

किती शिशाच्या चिमट्या
ठसे काढले त्यावर
कसे निंघती कागद
छापीसनी भरभर

चाले ‘छाप्याचं यंतर’
जीव आठे बी रमतो
टाकीसनी रे मंतर
जसा भगत घुमतो

मानसापरी मानूस
राहतो रे येडजाना
अरे होतो छापीसनी
कोरा कागद शहाना!

सर्व भावंडांना भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा…!

शुभम् भवतु !

संपूर्ण कविता नितीन रिंधे यांच्या ब्लॉगवर मिळाली, त्यांचे आभार!

बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४

वि-सर्जन...!


‘निघालास…?’
'प्रत्येक गोष्टीची निर्धारित वेळ असते आणि तिच्या उत्पत्ती, स्थैर्य आणि लय यांचे नियोजन चुकले तर सृष्टीचा तोल बिघडतो. भूतलावर माझ्या नैमित्तिक आगमनाची आणि प्रस्थानाची वेळ ठरलेली आहे, ती चुकवून कसे चालेल…?’
‘इतक्या वर्षांच्या या परंपरेची ‘मना’ला सवयच होत नाही बघ, दर वेळी कंठ दाटून येतो! तुझ्या, आणि अशा सणावारांच्या निमित्ताने घरी येणाऱ्या जिवलगांच्याही, सहवासाचे क्षण कापरासारखे उडून गेल्यासारखे वाटतात…!’
‘कापरासारखे नको म्हणूस, उदबत्तीसारखे म्हण! ती पेट घेत नाही, मंद जळत राहते आणि तिने पसरविलेला सुगंध नंतरही बराच काळ आसमंतात दरवळत राहतो, ‘मना’ला प्रसन्न करतो!’
‘तू शेवटी तत्वमसि… बुद्धीची देवता! तत्वज्ञानाचे दाखले देऊन आम्हां पामरांची समजूत काढणे तुला काय कठीण?’
‘प्रश्न समजुत काढण्याचा नाही, प्रश्न समजून घेण्याचा, सर्जन आणि वि-सर्जन दोघांचे भान असण्याचा आहे!’
‘म्हणजे?’
‘सांगतो.’

‘सप्तचिरंजीवांपैकी एक, पराशरपुत्र वेदमुनी महर्षी व्यासांनी वेद, पुराणं, महाभारत अशा अनेक प्राज्ञ रचना केल्या. ब्रह्मदेवाच्या सल्ल्यानुसार लेखनिक म्हणून त्या कार्यात सहकार्य करण्याची त्यांनी मला विनंती केली. खरं सांगायचं तर हे काम करण्यास मी काही फारसा उत्सुक नव्हतो. ते शक्य तितके लवकर आटोपावे म्हणून मी अट घातली की त्यांनी अखंड, विनाविराम श्लोक रचित जावे जेणेकरून मला न थांबता माझे लेखनकार्य सत्वर सिद्धीस नेता येईल. माझी चलाखी महामुनींनी क्षणार्धात ओळखली आणि त्यांनीही एक अट घातली… 
‘मी अखंड रचित जाईन, पण आपण जे लिहितो आहोत त्याचा अर्थ तुला समजायला हवा. न समजता-उमजता तू एक अक्षरही लिहिता कामा नये!’ 

स्वतःच्या बुद्धी आणि प्रज्ञेवर माझा पूर्ण विश्वास असल्याने मी ती अट सहज कबूल केली आणि आमचे कार्य सुरु झाले. लिहिता लिहिता माझ्या लक्षात आले की व्यासमुनी अधूनमधून अवघड श्लोक सांगत आहेत. त्याचा अर्थ लावायला मला थोडा अधिक अवधी लागत असे. तेवढ्या वेळात मुनीवर पुढील श्लोक रचून तयार ठेवीत असत. त्यांच्या या विलक्षण प्रतिभेने मी मंत्रमुग्ध झालो आणि अधिकाधिक मन लावून समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो.’

‘हे सगळे चमत्कारिक आणि अलैकिक आह! अर्थात हे महामुनी आणि बुद्धीदेवातले आदान-प्रदान असल्याने ते तसे असणारच म्हणा, आम्हां सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे…!’
‘मुळीच नाही! कुठलाही शास्त्रविचार हा विद्वत्ता मिरविण्यासाठी मांडला जात नसतो, तो अंतिमतः सर्वसामान्यांच्या हितासाठीच योजलेला असतो, फक्त जजमेंटल न होता आणि कुणालाही जज न करता तो समजून घेता यायला हवा.’
‘आता तूही आम्हांला ‘जज’ न करता यातले आमचे ‘हित’ समजून सांगितलेस तर बरे!’
‘असं बघ, खळखळत्या पाण्यासारखे प्रवाही जीवन हे सोप्या श्लोकांसारखे आहे, ते सहज, अखंड वाहत असते. पण प्रवाहाचा रेटा अनियंत्रित होऊन विनाशकारी ठरू नये म्हणून त्याचे नियोजन करणे, त्या प्रवाहाच्या वेगाला कुठेतरी बांध घालणे आवश्यक असते. ते नियमन, तो बांध म्हणजे अवघड श्लोक, जे वाटेत आले म्हणून गडबडून जायचं नसतं, त्या निमित्ताने आपली जाण, आपले भान अधिक सजग करायचे असते. मिळालेला वेळ, जे घडले त्याच्या विश्लेषणात, अन्वयार्थ लावण्यात, समजून घेण्यात सत्कारणी लावायचा असतो.’
‘म्हणजे आमच्या सिग्नल किंवा स्पीडब्रेकर्ससारखं म्हण की, देवा!’
‘मलाही ती प्रतिमा वापरण्याचा मोह झाला होता, पण त्या वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या रंगात भेद न करणारे उदंड रंगनिरपेक्ष वाहनचालक आणि काही काही अशास्त्रीय तथा विध्वंसक गतिरोधक पाहून - ते वाहनांची गती रोखण्यासाठी आहेत, समस्त वाहनच निर्दाळण्यासाठी आहेत की चालकाच्या मेरुदंडाची परीक्षा घेण्यासाठी - हे न कळल्याने मी तो मोह टाळला. असो.’
‘देवा, तुझीही विनोदबुद्धी दूरदर्शनवरील हास्यास्पद कार्यक्रम बघून फारच तल्लख झालेली दिसते. तर तू सांगत होतास…’
‘हो, उगाच राजकारण्यांसारखं विषय भरकटवू नकोस! खरी गंमत तर पुढेच आहे.’
‘यात गंमतही आहे?’
‘ती असतेच, फक्त पाहण्याची निकोप, मिश्किल दृष्टी हवी!’

‘तर असे आमचे लेखनकार्य सुरु असतांना, सतत लिहिण्याच्या ताणाने म्हण किंवा जे लिहितो आहे त्याच्या आशयभाराने म्हण, माझी पिसाची लेखणी मोडली!’
‘काहीतरीच काय देवा, तुझी लेखणी मोडायला तो काय चायनीज स्वस्त आणि टाकाऊ बॉलपेन होता काय?’
‘अरे, गोष्टी पडायच्या, मोडायचा किंवा कोसळायच्या असतात तेव्हा कसलेही निमित्त पुरते, समुद्र किनाऱ्यावरच्या खोपटाचे झावळ्यांचे छप्परही न उडवू शकणाऱ्या वाऱ्याच्या वेगाचे देखील… काय समजलास?’
‘…आणि त्यायोगे आणखी काहीतरी भव्यदिव्य घडणार असते, ते मी विसरलोच! सॉरी, काहीही जज करायचं नाही असं ठरलंय नाही का आपलं, चुकलो!’
‘तर मुद्दा असा की माझी लेखणी मोडली पण दिलेल्या शब्दाला जागणे भाग होते. तेंव्हा स्वीकृत जबाबदारीत हेळसांड नको आणि तत्परतेने काही करायला हवे म्हणून मी माझा एक दात उपटून काढला आणि त्याची लेखणी केली. त्यामुळे तेव्हापासून मला ‘एकदन्त’ हे नवीनच नामाभिदान मिळाले ते वेगळेच.’
‘तू पण ग्रेटच आहेस हं देवा! साधी सही करायला सुद्धा दुसऱ्याचे पेन वापरणाऱ्या आणि जमले तर ते आपल्याच खिशाला लावून घेणाऱ्या आम्हां माणसांकडून तू काहीच कसे शिकत नाहीस? चक्क स्वतःचाच दात उपटलास? सतत दुसऱ्याचे दात उपटण्यात किंवा त्याच्याच घशात घालण्यास सिद्ध असलेल्या मानवांकडून एखादीतरी ‘सिद्धी’ मिळवायचीस!’
‘लेको, तुम्ही कितीही फाजील लाडाने ‘बाप्पा, बाप्पा’ करून मला माणसावळण्याचा प्रयत्न केलात तरी मला पार्थिवातही माझे देवत्व जपायला नको? आपला ‘धर्म’ पाळायला नको? ‘सारेच करतात!’ आणि ‘चलता है!’ म्हणत, निष्ठा-मूल्य-तत्व सोयीस्कररीत्या मागच्या खिशात टाकून कळपात सामील व्हायला आणि खुर्चीवर बसतांना ते पडलेच तर, ‘गडबडीत कुठे हरवले कुणास ठाऊक!’ म्हणायला मी ना हाडामांसाचा मानव आहे ना हाडाचा राजकारणी! आणि ‘सिद्धी’च कौतुक तू मला नको सांगूस…!’
‘सॉरी देवा, माणसांत राहून त्यांच्यासारखा क्षुद्र विचार करायची सवय झाल्याने माझ्याकडून आगळीक झाली. वन्स अगेन माय सिन्सिअर अपॉलॉजी. तू नसलास तरी मी मर्त्य मानवच असल्याने माफी मागून मोकळं होण्याची सिद्धी मी साधलीय… त्यांच्याकडून!’

‘असो! या विषयांना ना खोली आहे, ना अंत, ना अर्थ, निष्कारण माझा खोळंबा तेवढा व्हायचा, निघू दे आता मला…’
‘हो, तुला आत्ता निरोप दिल्याशिवाय, ‘पुढच्या वर्षी लवकर या' कसे म्हणणार…? पण ते गमतीचं काय?’
‘कुठल्या गमतीचं?’
‘तू देणार होतास ना जातांना, विसरलास?’
‘अरे, आपले आगत-स्वागत-कौतुक होत असतांना हुरळून जाऊन तोंडाला येईल ते बोलायला आणि वेळ आली की ‘तो मी नव्हेच’ म्हणायला मी अजून कुठलीच नाटक कंपनी जॉईन केली नाहीये आणि कुठलाच फॉर्म भरला नाहीये. शिवाय, ना मी व्यापारी आहे ना दलाल. मी माझ्या भक्ताला फसवेन कसा? तर ती गंमत म्हणजे… विवेक!’
‘विवेक…?’

‘हो, विवेक!
समजल्या-उमजल्याशिवाय, ‘मना’ला पटल्याशिवाय कशाचेही अनुसरण, अनुकरण, फॉरवर्ड न करण्याचा… विवेक!
आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बेगडी काळात, दिसते किंवा कानावर पडते त्यावर भक्तिभावाने अंधविश्वास न ठेवता ते अभ्यासाने पारखून पाहण्याचा… विवेक!
आयुष्यात अडचणीचे प्रसंग आले की विमनस्कता दाटून येणारच. अशा परीक्षा पाहणाऱ्या क्षणांना गुरु करण्याचा… विवेक!
आपल्या जीवनधारणांशी प्रामाणिक राहून आपली स्वीकृत जबाबदारी निष्ठेने, प्रेरणेने आणि चिकाटीने पार पाडण्याचा… विवेक!
‘परिवर्तन ही संसार का नियम है’ - सर्जनाबरोबर विसर्जनही येते याचे भान ठेवून संयम बाळगण्याचा, धीरोदात्तपणे प्राप्त परिस्थिती स्वीकारण्याचा… विवेक!
महाभारताच्या युद्धामध्ये, दानशूर, धुरंधर योद्धा आणि अर्जुनापेक्षा कणभर सरसच असलेल्या कर्णाचा पराजय काय सांगतो. सतत इतरांची असूया, इर्षेने वाढणारा द्वेष, जे आपले नाही ते बळकविण्यासाठी संघर्षाची खुमखमी बाळगली तर विवेकाचा नाश होतो आणि विनाशाला आमंत्रण होते. म्हणून धैर्य-शौर्याबरोबर जपायचा तो… विवेक!
‘विश्वाचे आर्त…’ जाणून ज्ञानदेवांनी केलेली विश्वप्रार्थना आणि ‘बुडतां हे जन न देखवे डोळां’ हे तुकोबारायांचे समाजभान जागृत ठेवून स्वयंप्रेरणेने जनजागृतीसाठी जो जागर करता येईल तो करत राहण्याचा… विवेक!
स्नेह, संवेदना, बंधुता, सौहार्द, जाणीवा यांचे नित्य सर्जन आणि...
षडरिपूंचे सतत विसर्जन करण्याचा... विवेक!      

एकदन्त होऊन मी माझ्या दाताची लेखणी केली, गर्दीतला एक सामान्य माणूस म्हणून तू दातांच्या कण्या करून जनहिताच्या चार गोष्टी तर सांगू शकतोस? शेवटी, ‘व्यासोच्छिष्टम जगत्सर्वंम…’ हेच सत्य, मी नवीन काय सांगणार?’
‘देवा, आपल्या ऋणानुबंधातले, ऋण सारे तुझे आणि बंध सारे माझे हे आज मला नव्याने जाणवले… मधले ‘अनु’सरणीय ते शोधण्याचा माझा प्रयत्न असाच निरंतर चालू राहील, लेखणीला तुझा आशिर्वाद तेवढा असू दे…’

'तथास्तु !’

शनिवार, ७ सप्टेंबर, २०२४

स्वागत...!


‘आलास, ये…!’
‘पोहचलो बाबा एकदाचा!
विमानं आणि ड्रोन यांना टाळत भूतलावर पुण्यनगरीत पाय ठेवला तर, काय ती ट्रॅफिक आणि काय ते रस्ते? नळस्टॉपला तर माझा मूषक मरता मरता वाचला!’
‘देवा, वर्षातून एकदाच येतोस आणि तुझी ही अवस्था, आम्हां भक्तांचा विचार कर, आम्ही हे रोज सकाळ-संध्याकाळ भोगत असतो… विनातक्रार!’
‘का? तक्रार का नाही करीत तुम्ही? याला कुणीतरी जबाबदार असेल ना?’ 
‘दहा दिवसांसाठी पाहुणा म्हणून आला आहेस, उगाच आमच्या भोगांच्या खोलात नको शिरूस.
मस्त रहा, मजा कर! ढोल-ताशे, गाणी ऐक, आवडतील त्या फ्लेवरचे मोदक मनसोक्त खा, भक्तांना आशीर्वाद दे आणि आपल्या घरी रवाना हो. आम्हाला आमचे जिणं भोगू… आपलं, जगू दे!’
‘असं का म्हणतोस? मला परका समजतोस का? मग कशाला प्रेमाने बाप्पा बाप्पा करत असतोस?’
‘तसं नाही रे देवा! तुझ्याशिवाय आम्हाला आहेच कोण तारणारा? पण आभाळंच फाटलं असेल तर ठिगळ कुठे आणि किती लावणार?’
‘म्हणजे, मला समजलं नाही…?’

‘असं बघ देवा, 
गाव-खेडे किंवा छोटे-मोठे शहर नाही, ‘स्मार्ट सिटी’ म्हटल्या जाणाऱ्या शहरांच्या रस्त्यांची आणि वाहतुकीची ही दयनीय, शोचनीय अवस्था… 
नाल्यांवर होणाऱ्या अतिक्रमणांनी पाण्याचे बदलते प्रवाह आणि ओढे-नाल्यांपेक्षा वाईट अवस्था नदीची, समुद्राची आणि एकूणच पर्यावरणाची…
सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरांमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यांसारखे रोज वाढणारे गंभीर, हिडीस गुन्हे…
महापुरुषांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करण्यास जराही न कचरणारे आणि शक्तिप्रदर्शनासाठी वाट्टेल त्या थराला जाणारे वाचाळ, संवेदनाहीन, अविवेकी राजकारणी… 
मतपेटीच्या राजकारणासाठी करदात्यांच्या जीवावर राबविल्या जाणाऱ्या योजना आणि त्यांचाही मोह न सुटणारे अपात्र, नालायक, निर्ल्लज लाभार्थी...
शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रांमध्येही, मुलांच्या भविष्याशी तडजोड करीत सर्रास चालणारा बुभुक्षित, लाचार गैरव्यवहार…
कशा कशाला ठिगळं लावायचं आणि कुणी…?’
‘तू फारच त्रासलेला दिसतोस साऱ्या परिस्थितीने?
अशा उद्विग्न मनाने माझं स्वागत करणार आहेस…?’
‘माफ कर देवा, मला तुला तसा फील द्यायचा नव्हता पण तू विचारलंस म्हणून वर्षभराचा विषाद बाहेर पडला… मला माफ कर!’
‘वेडा आहेस का? माफी कसली मागतोस…?
मला काय तुझी मनस्थिती समजत नाही? आणि तू मला नाही तर कुणाला सांगणार आहेस…?’
‘थँक्स देवा, मला समजून घेतल्याबद्दल. चल तू फ्रेश हो, मी पूजेची तयारी करतो…’
‘हो, अवश्य! बरं, आता माझं एक ऐकायचं… 
पुढचे दहा दिवस या कशाचाही विचार न करता निखळ, निकोप मनाने माझा पाहुणचार करायचा. 
मग जातांना मी तुला एक गंमत देईन. कबूल…?’

‘कबूल…!’

रविवार, २५ ऑगस्ट, २०२४

रफू...!

 

हे ओरखडे कसले 

अनुभवांनी जाणिवांवर घातलेले घाव

की मला घडवण्याचा आयुष्याचा प्रयत्न…?


आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने नेहमीप्रमाणे कालपासूनच शुभेच्छांचा ओघ सुरु झाला. गुगल, जीमेलचे आपल्या लॉगीनला रंग उधळत शुभेच्छा देण्याचे पर्सनलाइज्ड जेस्चर असो, आपण ज्या ज्या गोष्टीत ‘इन्व्हेस्ट’ केले आहे त्या ‘म्युच्युअल’ रिलेशनच्या कराराला जागून आपल्या विशेष ‘फंडां’ची… आपलं, दिवसांची नोंद ठेऊन ऑटोमेटेड का होईना शुभेच्छा वेळच्या वेळी पाठवणारे अत्यंत व्यावहारिक संबंध असोत की कुठल्याच विधिनिषेध, नीतिनियमांची तमा न बाळगता थेट ‘मना’ला भिडणारे तरल भावगर्भ काव्यमय ऋणानुबंध असोत… कुठ्ल्याही सदिच्छांनी एक वेगळीच ताकद, एक अनामिक ऊर्जा, एक अक्षय्य उमेद आणि निखळ आनंद मिळतो हे निश्चित! एसेमेस, फोन आणि सोशल मीडियावरील संदेश हे औक्षणाचे तबक असले आणि त्यांना बर्थडे केकची गोडी असली तरी स्वहस्ताक्षरातल्या पत्ररूपी काव्यात्म शुभेच्छा या, औक्षणाच्या तबकातल्या तेज:पुंज दिव्यासारख्या मुहूर्ताचा क्षण अन क्षण झळाळून टाकतात… मंगल, उत्फुल्ल, प्रकाशमान करतात; केकवरल्या आईसिंग आणि चेरीच्या अवीट माधुर्यासारख्या!


सन्मित्र दिनाने आमच्या पत्रव्यवहारात पडलेल्या बऱ्याच काळाच्या खंडानंतर, मधली दरी सांधून घेण्यासाठी बर्थडे गिफ्ट म्हणून जो पूल बांधला त्यावर किती झुलावे आणि किती नाही असे झालेय. शिवाय हे त्याचे छापील हस्ताक्षरातले पत्र त्याने अगदी मुहूर्तावर स्वहस्तेच डिलिव्हर केल्याने त्याची खुमारी अधिकच वाढली. त्या पत्रात जागोजागी पेरलेल्या चारोळ्या माझ्याच काही जुन्या अभिव्यक्ती असल्याने त्या इथे पुन्हा उधृत करण्यात काही हशील नाही. तथापि दिनाने या निमित्ताने केलेली कविता नवी, कोरी-करकरीत आणि आस्वादनीय असल्याने तिचा उल्लेख इथे आवश्यक ठरतो… 


पर्णहीन झाडाने अबोल गूढ संदेश दिला 

जाताजाता शिशिराने वसंतास मार्ग दिला. 

वसंताची खोड जुनी, आल्या आल्या जातो म्हणाला 

प्रफुल्लीत मोहर सृष्टीला अन् मोगऱ्यास गंध दिला. 

ग्रीष्म झळाळे शाश्वत, सूर्यास आकाशी नेमला 

पारावरल्या सावलीने, उन्हास टेकण्या आधार दिला 

बरसण्यास आतुर ढग, आभाळी तुंबला 

रोमारोमात भरून घेण्या, वर्षावाने मग थेंब दिला 

नवरात्र शरदाची रंगीत, उत्सवाचा भरवी मेळा

कोजागिरीच्या आभाळास, शुभ्र दुधाळ चंद्र दिला 

हुडहुडीला उब शेकोटीची, पहाटेस उटणे अभ्यंगाला 

फराळाच्या ताटासोबत, हेमंताने स्नेहभाव दिला 

गुच्छ सहा ऋतूंचा असा, ‘मना’स मी अर्पिला 

आनंदाच्या दिवसासाठी, कवितेत गुंफून शब्द दिला !


नेहमीप्रमाणे दिनाने प्रेरणा आणि क्ल्यू दिल्यावर मला कविता न रचून कसे चालेल…?

तेंव्हा आजच्या निमित्ताने आजवरच्या आयुष्याने दिलेली ही शहाणीव… 


चिरंजीव…? 


निरंतर वाहणे हेच जीवन  

तुंबून साचण्याचा सोस कशाला,

सुख कुठलेच नसते चिरंजीव 

गमावले त्याचा अफसोस कशाला!


जन्म-मृत्यू एका श्वासाचे अंतर 

धरून ठेवण्याचा अट्टाहास कशाला,

‘मना’स रमण्याची साधने कितीक 

जे न साधते त्याचा उपहास कशाला! 


सृजन जर हे स्वान्त-सुखाय   

हवी उसनी ती दाद कशाला, 

भरभरून मिळता सौख्य जगण्याचे 

जे निसटले त्याची मोजदाद कशाला…?


गेल्या रविवारी वयाची नव्वदी पूर्ण केलेल्या गुलझार सरांचे शब्द आठवून वाढत्या वयात उमेद जोपासावी हे उत्तम…  


“थोड़ा सा रफू करके देखिये ना,

फिर से नयी सी लगेगी,

ज़िन्दगी ही तो है…”

 

आजच्या प्रसंगी आठवणीने मला शुभेच्छा देणाऱ्या साऱ्या स्नेही-सुहृदांचे 'मना'पासून आभार!

स्नेह आहेच, तो निरंतर वृद्धिंगत व्हावा हीच अपेक्षा... 

 

शुभम भवतु !

रविवार, १० मार्च, २०२४

गुफ्तगू ...!


मनातले व्यक्त करण्याची खुमखुमी, लिहिण्याची अतोनात हौस आणि हाताशी असलेला मुबलक वेळ एवढ्या भांडवलावर 'इगो-वाईज'च्या रूपाने ब्लॉगिंगचे केलेले धाडस आज १ लाख पृष्ठदृश्ये (व्हिजिटर्स काउंट)च्या दिशेने वेगाने वाटचाल करतेय.

सुचतील आणि रूचतील त्या कविता संग्रहित रूपात कायम आणि सहज उपलब्ध असाव्या म्हणून सुरु केलेल्या या मराठी ब्लॉग 'इत्यादी'चा उद्योग देखील पौगंडावस्थेतून वयात येतांना ५० हजार पृष्ठदृश्ये (व्हिजिटर्स काउंट)चा आकडा पार करून दौडत पुढे निघाला आहे.

सॉक्रेटिसच्या, "The way to gain a good reputation is to endeavor to be what you desire to appear..." या बोधवाचनाच्या प्रचितीसाठी 'बी[अ]कॉज' ही वर्डप्रेस साईट सुरु केली, तिला आजवर ११,६७५ लोकांनी भेट दिली आणि तिथे प्रकाशित केलेली 'उत्तरदायित्व' ही, 'सीएसआर'ची संकल्पना मराठीत समजावून सांगणारी पोस्ट बरीच लोकप्रिय ठरली, 'व्हायरल' झाली का म्हणानात!

याशिवाय, लिंक्डइन या व्यावसायिक समाजमाध्यमावर आजवर प्रकाशित केलेल्या एकूण ३७ पोस्टस् पैकी, 'व्हाय सम एम्प्लॉईज आर रेडी टू डाय फॉर देअर बॉस' या पोस्टने रचलेला १२३४ लाईक्स आणि २३१ कॉमेंट्सचा वैयक्तिक विक्रम, 'आनंद मल्लीगवड' यांच्याबद्दलच्या 'लेक मॅन ऑफ इंडिया' पोस्टवरील २५०००+ इम्प्रेशन्स, ६५०+ लाईक्स १३ रिपोस्ट्स आणि ८ कॉमेंट्स (अँड काउंटिंग...) एवढ्या प्रचंड फरकाने नुकताच मोडला!

सरतेशेवटी, 'रिसर्च गेट' या शोधनिबंधांचे संग्रहण, प्रकाशन करणाऱ्या अभ्यासस्थळावर प्रकाशित केलेल्या २३ निबंधांच्या १४,४४४ वाचनांसह, कर्वे समाजसेवा संस्थेचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात अधिक वाचला गेलेला लेखक मी आहे असे आकडेवारी सांगते.  

आता ही काय मार्च एंडिंगची आकडेमोड चालू आहे की काय असा गैरसमज होऊन माझ्या हिशोबी(?) वागण्यावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी या समग्र आकडेवारीच्या मुळाशी यावे हे उत्तम... अन्यथा शेवटी आकडेवारीच सगळ्याच्या मुळाशी येते हे आपण नित्य अनुभवतोच, नाही का? (पहा: जातनिहाय वर्गीकरण आणि तिकीट वाटप यांचा अन्योन्य संबंध)

तर, प्रश्न असा की या सगळ्याने मी काय साधले? म्हणजे मला याचा नेमका बेनिफिट (ऑफ डाउट...?) काय झाला? सुमारे हजारभर पाने लिहून मला जेवढे व्यक्त व्हायचे होते तेव्हढे होता आले का? आतल्या विद्रोही धुमसण्याला काही सर्जक मूर्त रूप देता आले का? या सगळ्या खटाटोपातून जे कमवले (पैशाव्यतिरिक्तही बरंच काही कमवता येतं, किंबहुना शाळेतल्या स्काऊट सारखी तीच खरी कमाई, हे द्रव्यसंमोहित समाजाला कसे कळावे?) आणि जमवले त्याने मी समाधानी आहे का?

तर, हो, निश्चितच! पण आज, या साऱ्याच्या जोडीला, माझ्या निखळ आनंदाचे, अतीव समाधानाचे आणि सार्थक कृतार्थतेचे कारण वेगळेच आहे...

इगो-वाईज या माझ्या पहिल्या इंग्रजी ब्लॉगवर मी 'फादरहूड' सिरीजमध्ये माझ्या पितृत्वाच्या भावनांना वाट मोकळी करून दिली ज्या योगे मैत्रेयीच्या प्रगतीच्या काही टप्प्यांची नोंद झाली. 'बी[अ]कॉज'वर 'मेटॅव्हर्स' मध्ये तिच्या प्रोफेशनल अचिव्हमेन्टची झलक दिसली. शिवाय अधून-मधून तिचा सहभाग, सहयोग असलेल्या राष्ट्रीय सामाजिक कार्यक्रमांची झलकही व्हॉटसऍप स्टेट्सद्वारा मिळत असतेच. त्यामुळे तो वसा तिने समर्थपणे पेलला आहे यात शंकाच नाही.

परवा मात्र तिने जो सुखद धक्का दिला त्याने, 'आज मैं उपर, आसमां नीचे...' अशी उन्मनी अवस्था झाली नसती तरच नवल! एकतर मुळात या बिझी मुलांनी स्वतःहून काही शेअर करायला मुहूर्ताची वाट पहावी लागते आणि जे केले ते थेट असे हृदयाचा ठाव घेणारे असेल तर हर्षवायूच नाही का होणार? तिच्या मम्मीच्या भाषेत, 'हत्तीवरून पेढे वाटण्याची तयारी...!' पण वेळेसोबत पुढे निघून गेलेले काटे टोचलेल्यांनी, रिकाम्या डायलची तुतारी करून ती फुंकायला हत्तीवरून गड (सुतावरून स्वर्गच्या चालीवर!) गाठल्याने आणि आसपासच्या बहुतांश मंडळीत साखरेचा प्रादुर्भाव आढळल्याने, तो मनसुबा 'मना'तच राहिला!

तर ही मुलगी अशीच संध्याकाळी कुठल्या टेकडीवर स्वमग्न अवस्थेत भटकत असतांना तिला काही सुचलं आणि तिने ते शब्दबद्ध केलं... तीच ही काव्यानुभूती... गुलजारांच्या 'दिल ढुंढता है...' बद्दल ऐकलेलंही नसतांना त्याच्याशी थेट नातं सांगणार हे प्रकटन, काव्याच्या व्याख्येबरोबर गजलेशीही इमान राखून असणारं आणि आयुष्याबद्दल चिंतनशील पण तेव्हढंच संवादी भासणारं! 

इत्यादीवर अस्मादिकांसह इतरही कुणाचे काही प्रकाशित करतांना इतका परमानंद मला कधीही झाला नसावा. त्याचे कारण केवळ, हा अण्णांचा पुढे चालू रहाणारा वारसा आहे, एव्हढेच नाही तर निव्वळ वंशसातत्यापेक्षा जनुकीय उत्क्रांतीने मनुष्यासह साऱ्याच प्राण्यांचे आणि पर्यायाने सृष्टीचे भले होईल यात मला मुळीच शंका वाटत नाही किंबहुना माझी तशी खात्रीच आहे.

तेंव्हा आपले अधिक प्रगत, अधिक सूज्ञ, अधिक विचारी, विवेकी आणि अधिक संवेदनशील रूप पाहता येणे हेच विकसित होण्याचे प्रबुद्ध लक्षण आहे. अन्यथा महाकाय, सर्वभक्षी, सर्वशक्तिमान डायनासॉरस नामशेष कसे झाले असते? 

असो, तर मैत्रेयीची इत्यादीवरची ही पहिली(वहिली) हिंदी/उर्दू कविता/गज़ल...

एक अंजान शहरमें,
एक धुंदलिसी शाममें
कई रोजकी खयालोंसे 
कुछ पल के लिये दूर होकर,
मन हीं मनमें गुफ्तगू चलती हैं !

वो पल याद आते हैं,
मन के अलमारीयोंमें जो बंद रखें हुए हैं !
वो पल जिसमें सुकून और शांती होती थी
जब हम मासूम और खुश हुआ करते थे,
जब सबके चेहरोंपर नकाब नहीं थे,
जब हम आझाद थे, बंधे हुए थे सिर्फ मनमर्जीयोंसे !

वो पल मिलते नहीं हैं अब,
बस ढुंढता रहता हैं मन उन्हें,
जिंदगीके खामोशीयोंमें…! 

चहाच्या बिलामागे, 'माझं सुखं माझं सुखं हंड्या झुंबर टांगलं, माझं दुःख माझं दुःख तळघरात कोंडलं...' हा बहिणाबाईंचा समग्र मनुष्यजन्माचा अभंग लिहितांना, 'काव्याची दुसरी बाजू व्यवहाराचीच...' असे प्रबोधनही करणाऱ्या वपुंच्या 'पार्टनर'ने, 'साऱ्याच गोष्टींचे विश्लेषण करता येत नाही, करायचे नसते. 'काही' गोष्टींचा निखळ, मनमुराद आनंद घ्यायचा असतो...' असा अत्यंत व्यावहारिक सल्ला 'श्री'ला दिलेला आठवतोय. तो ग्राह्य मानून आज या अभिव्यक्तीचा केवळ आनंद घ्यायचा विचार आहे...

आता याही वारशाची हमी मिळालीय म्हणतांना, तिने तेव्हढं फायनांशियल प्लॅनींगही शिकून घेतलं की पार्टनरची चहाच्या बिलाचा पाठपोट वापर करणारी फिलॉसॉफी सफळ संपूर्ण झाली म्हणायची. मग तिला मार्च एन्डचं टेन्शनही राहणार नाही आणि मी सर्वातून सर्वार्थाने निवृत्त व्हायला मोकळा...

बाय द वे, मुलीने अजूनही काही लिहिलंय असं ऐकतो, बघू या... वाट, ते 'इत्यादी'ला लाभण्याची !

मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४

दीन...!


सहानुभूती 

उभे भंवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकांची होय दाटी गर्दी
प्रभा दीपांची फुले अन्तराळी
दौलतीची नित चालते दिवाळी !
कोपर्‍यासी गुणगुणत अन् अभंग
उभा केव्हांचा एक तो अपंग
भोवतींचा अंधार जो निमाला
ह्रदयि त्याच्या जणु जात आश्रयाला !
जीभ झालेली ओरडून शोष
चार दिवसांचा त्यातही उपास
नयन थिजले थरथरति हातपाय
रूप दैन्याचे उभे मूर्त काय ?
कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनि पसरल्या कराला
तोच येई कुणि परतुनी मजूर
बघुनि दीना त्या उधाणून ऊर
म्हणे, राहिन दिन एक मी उपाशी
परी लाभू दे दोन घास यासी
खिसा ओतुनि त्या भुक्या ओंजळीत
चालु लाग तो दीनबंधु वाट !
आणि धनिकांची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात !

- कुसुमाग्रज

रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

ज्ञानपीठ...!


आम्ही शाळेत असतांना एका टप्प्यावर संपूर्ण १०० मार्कांसाठी हिंदी किंवा संस्कृत अथवा ५० मार्कांसाठी संस्कृत आणि ५० मार्कांसाठी हिंदी निवडण्याचा पर्याय होता. पर्याय असण्याचे, ते दिले जाण्याचे आणि समोरच्याची निवड स्वीकारली जाण्याचा तो काळ होता.

शिवाय घरात वडीलधारी माणसे असल्याने, कुठलेही धोरणात्मक निर्णय हे प्रथम हायकोर्टाकडे आणि यथावकाश सुप्रीम कोर्टाकडे नेण्याची आणि त्यांचे निर्णय शिरसावंद्य मानण्याचाही काळ होता - अगदी रामराज्यच का म्हणानात.

स्वत:च्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना परदेशी धाडून सोयीनुसार इथल्या व्यवस्थेवर ताशेरे ओढण्याचा किंवा तिचा उदो उदो करण्याचा आणि इथल्या वंचितांसाठी गळे काढण्याच्या अमेरिकन 'मार्क्स'वादी मध्यमवर्गीय (आणि मार्गीय!) वृत्तीच्या पायाभरणीचा तो काळ.

तेंव्हा 'संस्कृत' हा 'स्कोअरिंग सब्जेक्ट' असल्याने तो १०० मार्कांसाठी घेऊन आपले (गुण)मूल्य वाढवून घ्यावे या मताचा रेटा प्रबळ होता. पण आम्ही पहिल्यापासूनच पुलंचे चाहते (भावनावेगात 'भक्त' लिहिणार होतो!) आणि त्यामुळे 'मार्क्सविरोधी' गटात असल्याने विषयांचा उपभोग मार्कांसाठी असतो हा मूल्यवर्धित विचार आमच्या 'मना'ला आजही समजलेला नसल्याने आणि विषय, त्यातही भाषा, अभ्यासण्यात अधिक रुची असल्याने आम्हाला 'बेस्ट ऑफ बोथ वर्ल्डस'चा पर्याय मोहवत होताच.

त्याच आशेने सदर मामला सुप्रीम कोर्ट अर्थात आमचे आजोबा अण्णा यांच्याकडे गेला असता, आम्ही काही वकिली करण्याअगोदरच अण्णांनी नेहमीच्या धोरणी, करारी, आणि नि:संदिग्धपणाने आपला फैसला सुनावला - 'संस्कृत सर्व भाषांची जननी आणि आपल्या संस्कृतीची धरोहर असल्याने ती अवगत असलीच पाहिजे तथापि हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्याने आणि बहुतांश भारतीयांची बोलीभाषा असल्याने ती देखील सवयीची असली पाहिजे. तस्मात, दोन्ही भाषांच्या ५०-५० मार्कांचा पर्याय निवडावा!'

आमची अवस्था 'आज मैं उपर...' अशी झाली नसती तरच नवल! पुढे या निर्णयाचा मान राखून आम्ही शाळेत असतानाच, अण्णांनी लिहिलेल्या संस्कृत 'जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरीयसी' हे प्रकटन आणि 'परदेसी पोस्टमन' या नाटुकलीतील हिंदी भाषिक पोस्टमनच्या भूमिकेतून, आमच्या दोन्ही भाषांवरील शालेय प्रभुत्वाचा दाखला देऊन अण्णांना आपल्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही याची काळजी घेतली. शिवाय दोन्ही विषयात अगदी स्कोअरिंग नसले तरी गौरवास्पद मार्क्स मिळवून त्याही आघाडीवर तो निर्णय सार्थ ठरवला.

आज हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे काल जाहीर झालेले ५८वे भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार - उर्दू साहित्यातील कार्याबाबत गुलजार यांना हा पुरस्कार देण्यात आला असून यासोबतच संस्कृत पंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांनाही ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.

भाषा हे विचारांचे माध्यम असले तरी ती तुम्हाला समृद्ध कशी करते याची दोन उदाहरणे म्हणजे या दोन भाषा. संस्कृतने आम्हांला संस्कार दिले, आणि आधी हिंदी आणी नंतर उर्दूने आमच्या संवेदना, जाणिवा समृद्ध केल्या. संस्कृतने आईच्या शिस्तीने वाढवले तर उर्दूने मावशीची प्रेमळ माया केली. या दोन्ही भाषांचा एकत्र होणारा सन्मान बघून आपल्या आजोबांच्या द्रष्टेपणाची पुन्हा एकदा प्रच्छन्न प्रचिती तर येते आहेच शिवाय स्वतःच्या भाग्याचा हेवा देखील वाटतो आहे. अगदी, '... पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति, कुतो मनुष्य:' असा !

या निमित्ताने 'अंधार सरो आणि उजेड पडो' या एकाच आशादायी भावनेचे या दोन्ही भाषांतील प्रकटीकरण किती मनोज्ञ आहे पहा...

‘असतो मा सत् गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय।’

आणि कोव्हीडच्या अत्यंत निराशेच्या काळात मानवी मनाला उभारी देण्यासाठी गुलज़ारांनी लिहिलेले 'धूप आने दो...'

धूप आने दो

मीठी मीठी है
बहुत खूबसूरत है
उजली रोशन है
जमीं गुड़ की ढेली है
गहरी सी सहमी हवा उतरी है
इस पर लगेना धुंध से
हटकर जरा से एक और ठहरो

धूप आने दो

आफताब उठेगा तो
किरणों से छानेगा वो
गहरी गहरी नीली हवा में
रोशनी भर देगा वो
मीठी हमारी जमीं
बीमार ना हो
हट के बैठो जरा
हटके जरा थोड़ी जगह तो दो

धूप आने दो...

तळटीप: गुलज़ारांबद्दल कितीही लिहिले तरी कमीच पडावे आणि 'दुबळी माझी लेखणी...'ची प्रचिती यावी अशी परिस्थिती. पण सर्व काही आपणच करावे / लिहावे असा 'अहं ब्रह्मास्मि...' अविर्भाव निदान या विषयात तरी असू नये. तेंव्हा, प्रथितयश लेखक त्यांच्या समर्थ लेखणीतून, जिवंत जाणिवेतून आणि नित्य प्रवाही संवेदनांतून जे लिहितात त्यानेही समृद्ध व्हावे म्हणून आतंरजालावरील हे दुवे...