रविवार, ३ जुलै, २०२२

'...हम नहीं तोडेंगे?'

अडीच वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०१९ मध्ये लिहिलेल्या 'ये दोस्ती...' चा उत्तरार्ध लिहावा लागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते... इतक्या अनाकलनीय, अनैसर्गिक आणि अकल्पित घडामोडींने स्व(?)रुपास आलेल्या आघाडीत बिघाडी करण्याची बहुतांची मनीषा लपून राहिली नसली तरी तिचे पर्यवसन त्याहूनही अधिक वैचित्र्यपूर्ण आणि विस्मयकारक असावे हे मात्र नवलच.

शोलेच्याच रुपकातून सांगायचे तर हे म्हणजे - 

...गब्बरने ठाकूरचा काटा काढून मित्रशोकात पिऊन बेधुंद झालेल्या वीरूला बसंतीच्या मौसीला पुन्हा एकदा इमोशनल ब्लॅकमेल करून, बसंतीचे लग्न हिराशी लावून देतांना सांबाला कन्यादान करायला लावले. यामुळे हताश झालेल्या रामलाल, इमामचाचा आणि राधा यांनी आपल्या आधीच हतबल असलेल्या आयुष्याला आणखीनच डागण्या मिळालेल्या पाहून हवेलीला कुलुप लावून, चाव्या कमरेला खोचून काही दिवस गाव सोडायचा निर्णय घेतला म्हणून कालिया खुश झाला...

...असा काहीसा क्लायमॅक्स तोही दोनदा (अबब!) घडला.. भूमिका आणि पात्रे पुन्हा एकदा आपण आपली निवडून घ्यावी... आपला नाव घ्यायचा काम नाय... आणि ते लोकशाही बिकशाही बकवास करून डोक्याची मंडई करायचा तर मुळीच काम नाय, कळ्ळा का...? कुठेही नेऊन ठेवला असला तरी 'जय महाराष्ट्र' माझा...!  


...आणि तो प्रामाणिकपणामुळे तिन्ही कुऱ्हाडी मिळवणारा लाकूडतोड्या, 'कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ...' म्हणजे नेमकं काय हे विचारत का फिरतोय, कुणास ठाऊक?

कुणी जाल का... सांगाल का...?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा