बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

देणं…!

कण कण झुरलो
क्षण क्षण साठवितांना
वाटले खर्चू निवांत
त्यांना आठवितांना...

खिसे उसवत राहिले
कितीही टाके घालून
वरुन सुख भरले तरी
गळून जाई खालून...

एक दिवस ठरवले आता
‘मना’प्रमाणेच रहावे
शिल्लक वेळ देऊन
सुख मिळते का पहावे...

जमापुंजी उघडून बघता
उरलो होतो कफल्लक
क्षण सारे उडून गेले...
पोकळी तेवढी श्रीशिल्लक !

मग म्हटले भेटू स्वत:ला
करू नये कशाचीच गय
तर समोर कुणी आगंतुक,
आरशाचे वाढले होते वय...

न्याहळून पहिले तर
केसांवर दिसली रुपेरी झाक
थकलेला चेहरा म्हणाला,
‘माझं देणं देऊन टाक…!’

बोध...!


पन्नास म्हणजे अर्धशतक... एवढा काळ टिकलो याचे आंतरिक समाधान आणि, ‘ठरवलं तर शतकही गाठता येईल’ अशी ओढ लावणारी वेडी आशा. पन्नाशीला अनेक संदर्भ नव्याने उमगू लागतात. पंचविशीतला बाणेदार ध्येयवाद किंवा ‘कर लो दुनिया मुठ्ठीमें’ ही राजसी महत्वाकांक्षा व्यवहाराचे टक्के-टोणपे खाऊन वरमलेली असते आणि, ‘अरेच्चा, हे असे आहे होय, हरकत नाही वेगळ्या दृष्टीनेही पाहू या...’ एवढा उदारमतवादी दृष्टिकोन विकसित झालेला असतो... नव्हे, व्हावाच लागतो, कारण त्याशिवाय तरणोपाय नाही ही शहाणीव रोज वाढते वय नित्यनेमाने देत असते. शारीरिक क्षमता अतिसूक्ष्मपणे का होईना पण दिवसेंदिवस कमी होतेय ही जाणीव फारशी सुखावाह नसली तरी, रोज नव्याने उगवणारा पांढरा केस हे म्हातारपणाचे लक्षण मानण्यास साफ नकार देण्याइतक्या, तरुण मनाच्या संवेदना तीव्र असल्याने तो तातडीने कलप तरी केला जातो किंवा कलम तरी.

‘तरुण आहे रात्र अजूनी...’ ही आता थोडी कल्पनारम्य स्थिती वाटू लागली असली तरी ‘वय निघून गेले...’ म्हणायलाही मन धजावत नाही अशी ही त्रिशंकू परिस्थिती. पंचविशीतला चेहरा मनातून पूर्णपणे पुसला गेला नसला तरी आठवावा लागण्याइतपत धूसर नक्कीच झालेला असतो. ‘कितने दूर कितने पास...’ ही भावना फक्त तरुणपणीचे मोरपंखी दिवस, पाऊल न वाजवता आयुष्यात आलेले आणि कायमची हुरहूर लावून गेलेले चेहरे, मैफिलींसह इतरही कारणांसाठी जागविलेल्या रात्री, भावनांच्या आवर्तनात तरलतेच्या पलीकडे जाऊन ‘दुनियादारी’ शिकवून गेलेले प्रसंग, सोयीसाठी बांधलेले आणि गैरसोय होताच मोडलेले (भाव?)बंध एवढ्यापुरतीच मर्यादित न राहता विरक्ती, मुक्ती, मोक्ष किंवा किमानपक्षी वैकुंठाच्या बाबतीत तरी प्रबळ होत जाते.

खऱ्या अर्थाने मिड-वे किंवा हाफ-वे म्हणावे अशी ही वाटचाल. शिल्लक अंतर हे पार केलेल्या अंतराइतके नक्कीच नसले तरी उरलेला प्रवास घडलेल्या प्रवासाइतकाच, किंबहुना मोठाच, भासणार याची जाणीव पदोपदी करून देणारा हा टप्पा. कमावले त्याचे समाधान आणि गमावले त्याची हुरहूर अशा संमिश्र भावनांच्या हिंदोळ्यावर आयुष्याशी तडजोड करून ‘समन्वय’ साधतांना ‘अनुराग’ आणखीन ‘अस्मिता’ दोन्ही जपण्याची प्रामाणिक धडपड. भोगाच्या मायाजालातून स्वेच्छा-मुक्ती नाही आणि अभोगी विरक्तीचा विनाअट स्वीकार नाही. आहे त्यात संपूर्ण समाधान नाही पण स्पर्धा करण्याइतकी इर्षाही नाही. ठसठसणारे दु:ख नाही, आतडे पिळवटणारी वेदना नाही पण निवृत्त व्हावे इतकी इतिकर्तव्यता नाही आणि समाधानी असावे इतके सुखही नाही, अशी ही अस्थिर संभ्रमित अवस्था... तरुणांच्या दृष्टीने अधेड आणि ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला मिळण्यास अजून बराच अवकाश असल्याने त्यांच्या दृष्टीने ‘...तसे तरुण आहात!’

तस बघितलं तर ही अवस्था आजच्या लाईफ-स्टाईलचे तंतोतंत रुपक असायला हरकत नसावी. माणसाने स्वत:ची प्रगती आणि विकास करण्याच्या नादात तो अशा टप्प्यावर उभा आहे की नेमके काय कमावले आणि काय गमावले याचा सारासार विचार केल्यास आत्मसन्मान, समाधान, मन:शांती, नीतीमत्ता आणि सदसद्विवेक यांच्या बदल्यात मिळवली ती लाभार्थी तडजोड, नश्वर समृद्धी, निरंतर अस्थैर्य, बेगडी प्रतिष्ठा आणि विपरीत विचार आणि त्यातून उत्पन्न होणारे विकार आणि विखार.

अर्थात एकेरी वाटेवर ‘परती’चा मार्ग नसतो म्हणूनच हवी ‘उपरती’... ती कुण्या एका अमुकच्या पन्नाशीला झाली काय किंवा साऱ्यांच्या असोशीला झाली काय, भरकटलेल्याला योग्य मार्ग दाखवल्याशी मतलब. प्रवास अटळ आहे म्हणून जसे गतानुगतिक होण्याची गरज नाही तसेच अगतिक होण्याचीही गरज नाही... दिशा योग्य, वेग वाजवी आणि मन शुद्ध राखल्यास ठिकाण सापडतेच.

आज आयुष्याच्या मध्यावर आणि एका अपरिहार्य टप्प्यावरची ही आत्मिक अनुभूती... उद्या असेल?

कालाय तस्मै नम:

मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

जोडे...!



इवल्या इवल्या अस्तव्यस्त आठवणी
क्षणांच्या हिरवळीवर इतस्ततः पसरलेल्या
त्यावर अनवाणी चालत चालत
इतक्या दूर निघून आलो
की आता विसरायला झालेय...
...जोडे कुठे काढून ठेवले होते.   

 

टाच नाजूक होती निघालो होतो तेव्हा

अजूनही आहे थोडीशी मृदु...

...आणि राहील तशीच

जोवर कडू-गोड आठवणी

खट्याळपणे गुदगुल्या करून

तिला हुळहुळवतील...

 

खरंच...

विसरायला झालेय

जोडे नेमके कुठे काढलेत ते

पण कधी वाटतं...

आता त्यांची गरज नाही...

...आणि कदाचित...

उपयोगही !

रविवार, ११ जुलै, २०२१

जंटलमन...!


‘सुहाना सफर और ये मौसम हंसी...’, ‘जंटलमन, जंटलमन, जंटलमन...’, ‘नैन लड गई है...’ पासून ‘मांगके साथ तुम्हारा...’, ‘मधुबनमे राधिका नाचे रे...’ व्हाया ‘सुखके सब साथी दुखमें न कोई...’, ‘रामचंद्र कह गये सियासे...’ ते ‘आज पुरानी राहोंसे कोई मुझे आवाज न दे...’ पर्यंत, केवळ गाण्यांच्या रेंजमधून अदाकाराच्या ताकदीची कल्पना यावी असा चित्रेतिहास लिहिणारा ‘कोहिनूर’ म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार मुहम्मद युसुफ खान अर्थात सर्वांचा लाडका दिलीप कुमार ! पुढे ज्या खानावळीत जेवून अनेकांची वजनं आणि प्रतिष्ठा(?) नको तितकी वाढली आणि बहुतेकांच्या डोक्यात हवा गेली त्या भक्तजीवी खानेसुमारीचा कुलपुरुष हा मूळ खान ! अत्यंत कोवळ्या वयात, चित्रपट निर्मितीचा वारसा लाभलेल्या आणि ‘द ग्रेटेस्ट शोमन’ होण्याच्या वाटेवर दमदार पावलं टाकणाऱ्या राजला थेट भिडण्याचा याचा ‘अंदाज’च ‘आगाज ऐसा है तो अंजाम क्या होगा...’ याची झलक द्यायला पुरेसा होता. केवळ ६५ चित्रपट करून आणि जिवंतपणी स्वत:च्या मृत्युच्या अफवा अनेकदा ऐकून सगळ्याला अक्षरश: पुरून अख्यायिका [Legend] म्हणून उरलेला हा महानायक !

आम्ही शाळेत असतांना कृष्णधवल दूरचित्रवाणीसंचावर जुन्या चित्रपट गीतांचा ‘चित्रहार’ नावाचा कार्यक्रम लागत असे. त्यावेळी या महाशयांना वरीलपैकी कुठल्यातरी गीतावर ताल धरतांना पाहिलेले. त्यामुळे आमची तोंडओळख दूरदर्शनवर पुसटशी झाली असल्याने त्यांच्याबद्दल फारसा स्नेह किंवा लगाव असण्याचे कारणच नव्हते; चाहता होण्याचा तर प्रश्नच नव्हता. कडक इस्त्रीचे पांढरे कपडे (विशेषत: विजार) घालतो आणि खूप छान नाचतो(?) म्हणून जितेंद्र आवडता नट असण्याची आमची बाळबोध अभिरुची पुढे अमिताभच्या आमच्या आयुष्यातील एन्ट्रीने हळूहळू परिपक्व होत गेली. माध्यमिक शाळेपासून महाविद्यालयापर्यंत हिंदी सिनेमाचा आमचा अवकाश अमिताभ या एकाच नावाने व्यापून राहिल्यामुळे, आर्ट फिल्म, पॉवरफुल कंटेंट आणि मेथड ॲक्टिंग आमच्या आयुष्यात येईपर्यंत आम्हाला इतर कुठल्याही अभिनेत्याबद्दल फारसा जिव्हाळा नव्हता.

दिलीपकुमारला प्रथमच नव्या रंगीत चित्रपटात आणि थेटरात पाहण्याचा योग आला त्यालाही कारणीभूत अमिताभच. ‘शक्ती’ मध्ये अभिनयाची जबरदस्त जुगलबंदी असल्याच्या जोरदार चर्चा कानावर आल्याने, ‘आपल्या’ अमिताभला अभिनयात टक्कर देणारा हा कोण सुपरमॅन या उत्सुकतेपोटी आम्ही शक्ती पहिला आणि खरं सांगायचं तर त्या वयात तो आम्हाला समजलाही नाही आणि आवडला तर मुळीच नाही. ’शोले’ आणि ‘दिवार’मधल्या अमिताभच्या मृत्यूने काळजाला झालेली जखम अजूनही भरलेली नसतांना ‘शक्ती’मध्ये त्याला पुन्हा मारायची काय गरज होती या उद्विग्नेत ती अभिनयाची जुगलबंदी का काय ती आम्हाला स्पर्शसुद्धा करू शकली नाही. शिवाय ‘आमच्या’ अमिताभच्या विरोधात असलेल्या व्यक्तिरेखेने आमच्या मनात घर करण्याचे कारणच नव्हते.

गद्धेपंचविशी सरली आणि आमची गाढवाची शिंगे यथावकाश गळून पडली. (याबद्दल दुमत असू शकते ती गोष्ट वेगळी !) सिनेमा, नाटक हे दिग्दर्शकाचे माध्यम असते या बहुमुल्य ज्ञानाबरोबर, हिरो आणि अभिनेता यातला फरक समजू लागला. अभिनय म्हणजे नेमके काय आणि तो कशाशी खातात याचा वस्तुपाठ संजीवकुमार-जया भादुरी यांच्या नैसर्गिक अभिनयाने शिकवला आणि भूमिका जगणे म्हणजे काय हे अमोल पालेकर, शबाना आझमी, ओम पुरी, स्मिता पाटील आणि नसिरुद्दीन शाह या दिग्गजांनी अक्षरश: बोटाला धरून शिकवले. एवढा गृहपाठ झाल्यावर आम्हाला अभिनय रसग्रहणाच्या बिगरीत प्रवेश मिळाला आणि आम्ही एका नव्या दृष्टीने सिनेमा बघू लागलो.

बुद्धाला झालेली पहिली बोधी म्हणजे, ‘आपल्या आधीही अनेक बुद्ध होऊन गेलेत आणि पुढेही अनेक होणार आहेत...’ ही होती असे सांगतात. आमची पात्रता ही निर्बुद्ध राहण्याची किंवा फारतर हतबुद्ध होण्याची असल्याने आम्हाला आमच्या पातळीनुसार झालेली बोधी ही होती की मेथड ॲक्टिंग हा काही इरफान, अभय देवल, नवाजुद्दिन, पंकज त्रिपाठी किंवा केके यांचा नवनूतन अविष्कार नसून बलराज साहनी, मधुबाला, मीनाकुमारी, गुरुदत्त, नूतन आदी कलाकार भूमिका समजावून घेऊन ती आपल्या सहजसुंदर नैसर्गिक अभिनयाने जगण्याचा जो अनुभव देत असत तीच मेथड ॲक्टिंग. आणि यातला सार्वकालिक बाप माणूस म्हणजे दिलीपकुमार ! या उद्बोधनानंतर, कुठल्याही नव्या विषयात आकंठ बुडण्यात पटाईत असलेले आम्ही मागे हटतो की काय ? उणेपुरे ६५ सिनेमे बघायला कितीसा वेळ लागतो...

अर्थात युट्युब, नेटफ्लिक्सच्या अभावात, दूरदर्शनवर दाखवले जाणारे जुने सिनेमे, ते लावणारे थिएटर आणि मिळाल्याच तर व्हिडीओ कैसेट यावरच सारी भिस्त असल्याने आम्हाला हे मिशन काही सहजासहजी पुरे करता आले नाही. तरीही मिळाले तेवढ्या भांडवलावर दिलीपकुमारला आमच्या आवडत्या अभिनेत्यांच्या यादीत अत्युच्य स्थान देणे सहज शक्य झाले. त्याच्या फिल्मोग्राफचा आमचा प्रवास उलटा... म्हणजे ‘सौदागर, कर्मा, विधाता, मशाल, शक्ती, क्रांती’ पासून ‘राम और श्याम, लीडर, मुगल-ए-आज़म, गंगा-जमुना, मधुमती, नया दौर, देवदास’... असा असला तरी दिलीपकुमार आवडण्याचा आमचा क्रम सरळ आणि चढताच राहिला आहे.

सहअभिनेत्रींमध्ये देविकाराणी, वैजयंतीमाला, मधुबाला ते लीना चंदावरकर असा ६ दशके पसरलेला पैस, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे ८ फिल्मफेअर पुरस्कार, किशोर कुमार पुरस्कार, असंख्य (न)कलाकारांचा प्रेरणास्त्रोत आणि कोट्यावधी प्रेक्षकांचा हृदयस्वामी असलेला दिलीपकुमार ‘दीदार’ ‘देवदास’ मुळे ‘ट्रॅजेडी किंग’ ठरला असला तरी कुठल्याही चौकटीत बंदिस्त नव्हता. त्याने ‘नया दौर’ बनवून जी वाट प्रशस्त करून दिली तीवरून चालतांना बहुतेकांना त्याची पायधूळ मस्तकी लावून आणि त्याच्या निसर्गदत्त ओरिजिनल प्रतिभेची प्रयत्नपूर्वक नक्कल करून आपली तुंबडी भरावी लागली.

केवळ अभिनयातच नाही तर आशय-विषयातही त्याच्या कलाकृतींनी नव्या दिग्दर्शकांना भुरळ पाडली. नसता, ऑस्कर पर्यंत मजल मारलेला आशुतोष गोवारीकरचा ‘लगान’ ‘नया दौर’वर बेतला नसता (‘सुन मितवा...’ हे गाणे ‘साथी हाथ बढाना...’ची सही सही नक्कल आहे आणि ‘परफेक्शनिस्ट’ आमिरचा ‘भुवन’ हा ‘नया दौर’ मधल्या ‘शंकर’चा जुळा भाऊ शोभतो) आणि मूळ चित्रपटाच्या कित्येक पट पैसे खर्चलेला, भव्यदिव्य सेट्स आणि संगीतनृत्याने फटी बुजवण्याचा प्रयत्न करणारा आणि अभिनयाची पराकाष्ठा करण्याचा हास्यास्पद प्रयत्न करणारा शाहरुख आणि संजय लीला भन्सालीचा ‘देवदास’ माधुरी, ऐश्वर्या, जैकी श्रॉफ एवढी तगडी स्टारकास्ट असूनही शरत्च्चंद्र चटोपाध्याय, बिमल रॉय आणि दिलीपकुमारच्या साध्याच, लो-बजेट, कृष्णधवल पण अत्यंत खऱ्याखुऱ्या उत्कट आणि भावविव्हल ‘देवदास’च्या पासंगालाही पुरला नाही. उलट स्वत:ला सुपरस्टार समजणाऱ्या मिमिक्री किंगच्या मर्यादा त्यामुळे ठसठशीतपणे स्पष्ट झाल्या.

शेवटी, केवळ तीन गोष्टी ज्या या महानायकाला इतरांपेक्षा वेगळा आणि प्रणेता ठरविण्यास पुरेशा आहेत – दिलीपकुमारला अभिनय करावा लागला नाही, तो प्रत्येक भूमिका समजून-उमजून अक्षरश: जगला म्हणूनच त्याचे अनुकरण करून त्याच्या पुढच्या पिढीतील अभिनेत्यांना आपापल्या कारकिर्दीची सुरवात करावी लागली, हे एक !

‘बैराग’च्या अनुभवाने त्याने आपली बदलेली भूमिका समजून घेतली आणि ‘शक्ती’पासून आपली मुख्य अभिनेता ते सहअभिनेता (‘चरित्र अभिनेता’ हे संस्करण आम्हाला फारच विचित्र वाटते, त्यामुळे इतर अभिनेत्यांना ‘चरित्रहीन’ म्हणायचे की काय अशी एक कुशंका आमच्या चिकित्सक मनाला येते!) ही बदलेली ओळख तेवढ्याच ताकदीने केवळ स्वीकारली नाही तर अक्षरश: गौरवीली. अन्यथा, पोरगेलेसे अनिल कपूर (मशाल) आणि विवेक मुश्रन (सौदागर) तर सशक्त, स्वत:ला सिद्ध केलेले अमिताभ (शक्ती) आणि शत्रुघ्न सिन्हा (क्रांती) हे लौकिक अर्थाने नायक असतांना ते चित्रपट दिलीपकुमारने आपल्या अनुभवी, कणखर खांद्यांवर पेलले नसते. आपल्या भूमिकेबद्दल अत्यंत चोखंदळ असणे हे वैशिष्ट्यही मूलत: दिलीपकुमारचेच... मग 'बैराग' त्याला निमित्त ठरत असला तरी !

‘शतकाचा महानायक’ म्हणून गौरवला गेलेला, आमचा लाडका हिरो अमिताभ म्हणतो की हिंदी चित्रपटांचा इतिहास लिहायचा झाल्यास तो दोन स्पष्ट भागात लिहावा लागेल – दिलीपकुमारपूर्वी आणि दिलीपकुमारनंतर ! आजवरच्या हिंदी सिनेमातील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी सुपरस्टारच्या या एका विधानातच खरतर सारे काही आले, तरी सगळ्यांच्या माहितीकरता आणि नोंदीकरता येथे हे सांगणे उचित ठरावे –

आज भयंकर ग्लॅमर आणि अफाट पैसा मिळविणाऱ्या आणि त्याच्या जोरावर काहीही करू धजावणाऱ्या सिनेनटांना, हा मार्ग प्रशस्त करून दिला तो दिलीपकुमारने... अभिनेत्यांनी दिग्दर्शकाकडे मासिक वेतनावर काम करण्याची प्रथा मोडीत काढून, अभिनेत्याने आपल्या कामाचे ‘मानधन’ आपण ठरविण्याची नवीन रीत सुरु करून त्याने आपल्या पुढल्या पिढ्यांना मान आणि धन दोन्ही मिळवता येईल याची सोय करून दिली...

तेव्हा त्या अर्थानेही ‘नया दौर’ घडविणारा या ‘आझाद’चा ‘अंदाज’ ‘निराला’ होता हे काय सांगायला हवे ? आमच्या लेखी हिंदी चित्रपटांच्या १०० वर्षांच्या इतिहासात केवळ दोनच खरेखुरे सुपरस्टार झाले ज्यांनी प्रवाहपतीत न होता प्रवाहाला वेगळे वळण देण्याचा यशस्वी प्रयत्न केला... त्यातील एक अध्याय आज संपला !

हिंदी सिनेमाचा आजवरचा स्वयंभू सम्राट आणि जंटलमन महानायकाला अखेरचा दंडवत... अलविदा दिलीपसाब...!

रविवार, ४ जुलै, २०२१

कौशल्य...!


कबीर विणकर होता, हातमागावर कापड विणत असे. रोजच्या उदरनिर्वाहासाठी लागेल एवढे वस्त्र रोज विणावे आणि बाजारात तेवढे दाम मिळाले की विकून घरी परतावे असा त्याचा शिरस्ता होता.

एक दिवस विणलेले वस्त्र ५ मुद्रांना विकून परतावे म्हणून बाजारात उभा राहिला. सकाळची दुपार आणि दुपारची संध्याकाळ होत आली तरी त्याच्या वस्त्रास कुणी २ मुद्रांपेक्षा अधिक देण्यास तयार होईना.

हताश झालेल्या कबीराची अवस्था पाहून एका कुशल विक्रेत्याला त्याची दया आली. विक्रेत्याने त्याच्याकडचे वस्त्र घेतले आणि बाजाराच्या चौकात उभे राहून हाळी दिली,
‘लोकहो, बघा, बघा ! या वस्त्राची पोत बघा, रंग बघा आणि किती तलम आहे ते तरी बघा. इतके सुंदर वस्त्र, जे एरवी तुम्हाला बघायलाही मिळणार नाही ते, फक्त आणि फक्त १२ मुद्रांना उपलब्ध आहे, अशी सुवर्णसंधी हातची घालवू नका !’

त्याच्या या जाहिरातीला भुललेल्या लोकांची एकच झुंबड उडाली आणि विक्रेत्याने ते वस्त्र १२ मुद्रांना हातोहात खपवले. पांगापांग झाल्यावर विक्रेता कबीराकडे आला आणि म्हणाला,
‘बघितलस ? असं कौशल्य लागतं विकायला. तुला ५ मुद्रांची अपेक्षा होती, या घे १०, दामदुप्पट ! माझ्या दलालीच्या २ मुद्रा मी ठेवतो !’

कबीर हात जोडून म्हणाला, ‘महाराज, माझ्या कामाची आणि माझ्या उत्पादनाची किंमत मला माहितीय आणि मला तेवढीच अपेक्षित आहे. वरची ‘कमाई’ ही आपल्या ‘कौशल्या’ची आहे, तेव्हा ती आपणच ठेवा आणि मला माझ्या ५ मुद्रा द्या म्हणजे मी निघतो...!’

शनिवार, २६ जून, २०२१

गोधडी...!

प्रिय दिना,

चपळपण मनाचें मोडितां मोडवेना ।
सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥
घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा ।
म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥

ज्याला हे समजते, उमजते आणखीन साधते तोचि एक समर्थ बाकी सगळेच असमर्थ! जगात असे काय आहे ज्याला समर्थ-स्पर्श झालेला नाही…?तरीदेखील आपल्या अल्पबुद्धीनुसार या अनंत अनाकलनीय पसाऱ्याचा अर्थ लावतांना कधी कधी विपर्यास होणार तर कधी बुद्धिभेदहेतू प्रामाणिक आहे आणि प्रयत्नात खोट नाही तोवर सारेच क्षम्य आणि स्वीकारणीय देखीलतेव्हा अप्रिय निसर्गक्रमाची फार विषादात्मक उजळणी नको आणि तपशिलांची अतिचिकित्साही. न पेक्षा चिंतन आणि प्रकटनाचे अधिष्ठान इतरत्र हलवावे आणि चपळ मनास अन्य विषयी गुंतवावे

सध्या एका प्रदर्शनानिमित्त सौ. स्वाती, आदित्य आणि काकूंसह पुण्यास वास्तव्यास आहे आणि त्यांचा मुक्काम १८ पर्यंत असेल असे 'विश्वसनीय' सूत्रांकडून समजते. कुमार काका स्वत:हून अशा सुवर्ण संधीचा लाभ घेतील व ती साजरी करण्यास मित्रांना आमंत्रित करतील अशी अपेक्षा करणे म्हणजे 'मी शाकाहारी आहे म्हणून सिंह मला खाणार नाही' अशा आत्यंतिक भाबडेपणाच्या कल्पनारंजनासारखे ठरावे. तेव्हा आपल्या अति महत्वाकांक्षी सवंगड्यांकडून अधिक अपेक्षा न करता आपण स्वत:हून नासिक वारी करावी काय असा विचार होतोयआपली काय भूमिका…?

बदलेल्या विषयाच्या उत्तरार्थ 'वेगळ्या' प्रतिसादाच्या अपेक्षेत… 

मनीष   

----------------------------------------------------------------------- 

उपरोक्त पत्राच्या मायन्यातील दिना म्हणजे आमचा जीवलग, प्राणसखा, परममित्र दिनेश मनोहर चंद्रात्रे जो आज पन्नाशीचा होतोय! (त्याच्या नावाआधी लावलेल्या प्रत्येक विशेषणाला एक वेगळा, सघन आणि हृद्य संदर्भ आहे, त्यांचे प्रयोजन साहित्यिक सौंदर्यापेक्षा आत्मिक अनुभूतीशी जवळीक सांगणारे असल्याने साऱ्यांनाच त्यांची स्पंदने जाणवतीलच असे नाही आणि म्हणूनच तशी अपेक्षाही नाही!) आमच्या जवळपास चाळीस वर्षांच्या मैत्रीच्या सप्तरंगी गोधडीत सगळ्यात ठसठशीत रंग असेल तर तो निरंतर (अक्षरश:!) संवादाचा आणि साऱ्या तुकड्यांना घट्ट धरून ठेवणारा धागा असेल तर तो निर्हेतुक (तंतोतंत!) स्नेहाचा... बंधुसखा कुमार, दिना आणि मी हे त्रिकूट शालेय जीवनापासून एकत्र होते आणि आज कुमार आणि मी आपापल्या प्राक्तनाने (की कर्माने?) धुळ्याच्या विरहात इतरत्र स्थायिक असतांनाही दिना, त्याच्या धारणांवर असतो तसाच, धुळ्यात ठाम आहे! मी नव्वदच्या सुमारास पुण्यास आल्यापासून आमचा पत्रसंवाद सुरु झाला आणि आज गेली तीन दशके तो शेकडो पत्रांच्या माध्यमातून निरंतर सुरु आहे आणि... राहील! वरील पत्र हे त्याच मर्मबंधातल्या ठेवीतील एक मोरपीस...

कुमारला जन्मत:च कलेची अलौकिक दैवी देणगी लाभल्याने त्याला अविष्कारांसाठी साधनांची कधीच कमतरता नव्हती... नाही, आम्हां दोघांचे तसे नव्हते. शाळेत निबंध लिहिण्याची आवड आणि वक्तृत्व, रंगमंचीय अविष्कार यातील गोडी यामुळे माझी हाती लेखणी आली आणि मी अखंड बोलू आणि मनसोक्त लिहू लागलो. दिनाने यथावकाश या दोन्ही माध्यमात मुशाफिरी केली आणि त्याच्या काही स्केचेस आणि विशिष्ट कवितांनी कुमारला आणि मलाही भुरळ घातली. दिनाच्या अत्यंत संवेदनशील मनाची तेवढीच आर्त ही एक अभिव्यक्ती बघा...    

दोन शब्द बोलण्यास येथे त्यांना उसंत नाही
माझी ही कहाणी कुणास ही पसंत नाही

सुई धाग्याने विणू म्हटले नात्यांचे वस्त्र
टोचून घेण्यास माझ्या, जरा ही अंत नाही

पानगळ, झळांची मला झाली पुरती सवय;
ऋतुचक्रात माझ्या आता उरला वसंत नाही

परिघाकडून केंद्राकडे प्रवास हा अटळ
सहनशील क्षितिज माझे अनंत नाही

कर्म-भोग घेऊन शिरी, जरी चालतो एकला;
क्रुसावर हासणारा, मी मुळीच संत नाही!

या बरोबरच दिनाने मला लिहिलेली असंख्य पत्रे हा मराठी भाषा समृद्ध करणारा वस्तुपाठ ठरावा. कविता आणि पत्रे याबरोबर दिनाने काही ललित लिहिण्याचा प्रयत्न केला आणि तो समृद्धी अर्थात ‘समू’साठी असल्याने जेवढा भावविभोर तितकाच उत्कट आणि संवादी झाला नसता तरच नवल...

 गेल्या वर्षीपासून मनुष्य जमातीवर विषाणूचे जे अभद्र सावट पडले आहे त्याची झळ दिनालाही बसली आणि त्याच्या अतिसंवेदनशील मनाने त्याची नोंद घेतांना त्याच्या मूळ विरक्त वृत्तीने उचल खाल्ली. या संदर्भात त्याने अगदी अलीकडे लिहिलेल्या ‘काही नोंदी समूच्या...’ ला दाद देण्यासाठी जी कविता मी त्याला धाडली होती ती आजच्या दिवसासाठी मी राखून ठेवली होती... आज दिनाच्या पन्नाशीनिमित्त त्याला या कवितेची सस्नेह भेट...

लयाची खंत नको

मागे उत्पत्ती उभी

सूर्य अस्तास जाता

नवी चंद्रकोर नभी...!

 

ओहोटी अन पानगळ

ऋतुचक्र अक्षत राहे

भरतीचा वसंत येता

चैतन्य भरून वाहे...!

 

काही लयास जाते तसे

उगवते रोज नवे काही

शून्यातून उमलते

शून्यातले अर्थवाही...!

 

दिना, आज सकाळच्या संदेशात म्हटले तसे...

“पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन आणि

नाबाद शतकासाठी मन:पूर्वक शुभेच्छा...!”

 

नेहमीप्रमाणे... अजून बरेच बोलायचे, लिहायचे, सांगायचे, ऐकायचे आहे... 

पुन्हा कधीतरी...

रविवार, ६ जून, २०२१

म्होरक्या...!

शरद ऋतूचा काळ होता. आदिवासी आपल्या म्होरक्याकडे गेले. या वेळी हेमंत आणि शिशिरात थंडी कशी  पडेल कडक, सौम्य की नेहमीसारखीच, विचारायला. म्होरक्या मूळचा आदिवासीच असला तरी आधुनिकतेची झळ बसल्याने, निसर्गाशी नाळ अगदीच तुटली नसली तरी पूर्वीसारखी घट्टही राहिली नव्हती. त्यामुळे आकाशाकडे बघून, मातीला नाक, कान लावून आणि वाऱ्याच्या स्पर्शातून पूर्वी जसे वातावरणाचा अंदाज बांधता येई तसा अलीकडे येईनासा झाला असल्याने म्होरक्याला स्वत:चीच खात्री वाटेनाशी झाली होती !

परंतु तो म्होरक्या असल्याने लोक त्याच्याकडे आशेने बघताय म्हणतांना त्याला भाकीत वर्तवणे क्रमप्राप्तच होते. तेव्हा त्याने, हुशारी आणि सतर्कता या आपल्या नेतृत्वगुणांच्या आधारे, लोकांना सांगितले, ‘या वर्षी थंडीचा कडाका चांगलाच असणार आहे तेव्हा तुम्ही सारे आतापासून लाकडे गोळा करून ठेवाल तर बरे !’

आपल्या लोकांना असे सांगितले तर खरे पण आपणही खात्री करून घ्यावी म्हणून म्होरक्याने जवळच्या गावातल्या पोस्टात जाऊन वेधशाळेला दूरध्वनी केला आणि ‘या वर्षी हिवाळा कसा असणार आहे ?’, विचारले. वेधशाळेने सांगितले, ‘या वर्षी हिवाळा कडक असणार असे दिसतंय !’

म्होरक्या आपल्या लोकात परतला आणि त्यांना आणखीन लाकडं गोळा करण्याच्या सूचना दिल्या.

एका आठवड्याने म्होरक्या पुन्हा पोस्टात गेला आणि वेधशाळेशी संपर्क करून म्हणाला, ‘यावेळी कडाक्याची थंडी पडणार आहे असेच आपली यंत्रणा सांगतेय ना ?’ वेधशाळा म्हणाली, ‘अलबत ! या वर्षीचा हिवाळा मोठा कठीण असणार आहे !’

म्होरक्या पाड्यावर परतला आणि आपल्या माणसांना म्हणाला, ‘मित्रांनो, अगदी बारकाईने शोध घ्या आणि लाकडाचा एक एक तुकडा, झाडाचे खोड, ढलपी, फांदी, काडी-कचरा, जे मिळेल ते जमवून ठेवा !'

सुमारे दोन आठवड्यांनी म्होरक्या पुन्हा पोस्टात गेला आणि वेधशाळेशी संपर्क करून म्हणाला, ‘तुम्हाला नक्की खात्री आहे ना की यावर्षी फारच कडाक्याची थंडी पडणार आहे ?’ वेधशाळा म्हणाली, ‘आता तर प्रश्नच उरला नाही, या वर्षी कदाचित शतकातली सर्वाधिक गोठवणारी थंडी पडणार असे दिसतेय !’

‘तुम्हाला एवढी खात्री कशामुळे वाटतेय...?’ म्होरक्याने विचारले.

वेधशाळा म्हणाली, ‘आदिवासी वेड्यासारखे लाकडं गोळा करताहेत...!’

 ---------------------------------------------------------------------------------

पोस्ट पूर्णपणे अराजकीय असून केवळ कार्यकारणभाव समजून घेण्याचा वस्तुपाठ म्हणून सांगितली आहे. फारतर कालच्या विश्व पर्यावरण दिवसाचा ‘उपसंहार’ (आजच्या प्रच्छन्न चंगळवादी काळात किती समर्पक !) समजायला हरकत नाही.

तथापि या निमित्ताने तीन गोष्टींचा उहापोह करायला हरकत नसावी - 

- माणसाची भविष्याचा ‘वेध’ घेण्याची कमकुवत होत चाललेली कुवत.
- समूहांच्या नियोजनातील माणसाची अक्षम्य धोरणशून्यता आणि कमालीचे परस्परावलंबित्व.
- नैसर्गिक परिसंस्थेचा अतिसामान्य (खरतर नगण्य!) घटक असूनही तीवर स्वामित्व गाजविण्याची माणसाची राक्षसी लालसा.

वाचा आणि विचार करा... आधी विचार, मग आचार आणि यथावकाश व्यवहार !

रविवार, ३० मे, २०२१

गॉसिप...!


एके दिवशी सॉक्रेटीसचा एक अनुयायी तावातावाने सॉक्रेटीसपाशी आला. त्याला मुळीच धीर धरवत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरून तो खूपच अस्वस्थ आणि उत्तेजित असल्याचे अगदी स्पष्ट दिसत होते. तो सॉक्रेटीसला म्हणाला, ‘महाराज, मी आत्ता आपल्याबद्दल असे काही ऐकले आहे की ते मला आपल्याला ताबडतोब सांगायलाच हवे...'

‘अरे वा, असे आहे का? बघू या तरी...’ नेहमीच्या शांतपणे सॉक्रेटीस उत्तरला.
याला सॉक्रेटीसची अनुमती समजून उतावळा अनुयायी बोलायला लागला,
‘मी आत्ता अमुकला बोलतांना ऐकलं...’
‘हं, हं, थांब जरा. हे बघ कुणीही मला काही सांगू म्हटले तर त्याला माझ्या तीन चाचण्यांवर खरे उतरावे लागते. ही माझी तीन-पदरी चाळणी आहेस म्हणालास तरी चालेल.’
‘महाराज, मी इथे तुम्हाला काही महत्वाचं सांगू पहातोय अन तुम्ही हे चाळण्याचं काय काढलंत?’

‘कसं आहे ना मित्रा, दुसऱ्याबद्दल तिसऱ्याने सांगितलेली गोष्ट चौथ्याला रंगवून सांगणे हा मनुष्य स्वभाव आहे, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. पण आपण काय ऐकावे आणि कशाकडे दुर्लक्ष करावे हा अधिकार ज्याचा त्याच्याकडे सुरक्षित आहेच की... मी त्याचा तंतोतंत वापर करतो एवढचं !’

‘बरं, बरं... सांगा तरी काय चाळण्या आहेत तुमच्या?’ अनुयायी नाराजीने म्हणाला. त्याच्या उत्साहावर पाणी तर पडलेच होते पण जे ऐकले ते सांगण्याची उर्मी कमी झाली नव्हती.      

‘पहिली चाळणी, जी गोष्ट तू मला सागणार आहेस ती पूर्णत: सत्य असल्याची तुला खात्री आहे...?’
‘तसं मला खात्रीपूर्वक कसं सांगता येईल, ती गोष्ट मला दुसऱ्या कुणी सांगितली आहे...’
‘हरकत नाही, बरं ती गोष्ट माझ्याबद्दलची एखादी चांगली गोष्ट आहे की वाईट आहे...?’
‘खरं तर वाईटच आहे, म्हणून तर मला राग आला आणि ताबडतोब तुम्हाला सांगावीशी वाटली...’
‘असं होय, किती माया करतोस माझ्यावर ! पण तरी एक शेवटची चाचणी तरी पास होते का बघू या...’
‘तेवढी पास झाली तर सांगू द्याल ना मला...?’
‘अवश्य ! आता मला सांग, तू मला जे सांगू म्हणतोयस त्याने माझा किंवा किमान तुझा तरी काही फायदा होणार आहे ? त्या गोष्टीचा मला, तुला किंवा खरं तर कुणालाही काही उपयोग आहे...?
खजील झालेला, हिरमुलेला अनुयायी मान खाली घालून म्हणाला,
‘नाही, महाराज मला नाही वाटत त्या गोष्टीचा कुणालाही, विशेषत: तुम्हाला, काहीही उपयोग होईल...!’
 
‘मित्रा, जी गोष्ट मुळात सत्य आहे की नाही माहित नाही, जी चांगली देखील नाही आणि जिचा कुणालाच काही उपयोग होण्याची सुतराम शक्यता नाही अशी गोष्ट तुला सांगावीशीच का वाटते...? आणि त्यासाठी एवढं अधीर होण्याचं, उत्तेजित होण्याचं काय कारण...? हीच उर्जा अधिक चांगल्या विधायक कामी नाही वापरता येणार...?’

-------------------------------------- 

मुळात ‘गॉसिप’ हे माणसाचं अत्यंत आदिम, सर्वव्यापी आणि मोफत मनोरंजनाचं साधन आहे. अनुपस्थित असलेल्या आपल्या ‘स्नेही’जनांबद्दल अनुचित बोलणे, त्यांच्या सवयी, धारणा, श्रद्धा यांची टिंगल उडविणे हा एक हलक्या प्रतीच्या करमणुकीचा सुलभ (विशेषणाचे निवड जाणीवपूर्वक केलेली आहे !) मार्ग आहे.

त्यातून आजच्या सोशल मिडीयाच्या काळात या गॉसिप प्रकारांना विविधरंगी आणि बहुढंगी व्यासपीठं उपलब्ध झाल्याने सगळीकडे नुसता गदारोळ माजला आहे आणि एकमेकाची उणीदुणी काढण्याची, एकमेकाबद्दल गरळ ओकण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. या पार्श्वभूमीवर सॉक्रेटीसची ही शहाणीव केवळ मार्गदर्शक नाही तर अनुकरणीय ठरावी म्हणून ही उठाठेव !

‘आला मेसेज की ढकल पुढे...’ या सवयीला जरा मुरड घालून, सॉक्रेटीसच्या वरील तीन चाळण्या लावून जे काही गाळीव उरेल(?) तेवढ्याचीच ढकलाढकल करण्याचे आणि सर्वांना सोसल तेवढच सोशल करण्याचे पथ्य पाळले तरी, समाजमाध्यमांच्या नियमन करणाऱ्या व्यवस्थेवरील ताण बऱ्यापैकी कमी होईल...
 
...आणि हो, ‘मना’चा ब्रेक उत्तम ब्रेक’ या तत्वावर आधारित 'सेल्फ-सेन्सॉरशीप इज द बेस्ट सेन्सॉरशीप' हेही लक्षात असू द्यावे म्हणजे अभ्यासोन विवेकाने प्रकटल्यास कुठल्याच कारवाईची, कुठल्याही समाजमाध्यमावर बंदी केली जाण्याची वेळ येणार नाही !

शुभम भवतु !

रविवार, २३ मे, २०२१

या चिमण्यांनो...


एक छोटीशी चिमणी आपल्याच नादात चिवचिवत भुर्रकन इथून तिथे उडत होती. तेवढ्यात एक भलामोठा भेसूर काळा पक्षी तिला ओलांडून पुढे झेपावला आणि मागे वळून चिमणीकडे बघत स्वतःशीच पुटपुटला, 'हे कसे शक्य आहे...?'

त्याचा अवतार, अविर्भाव आणि उद्गाराने भ्यायलेली चिमणी आणखी जोरात उडू लागली. काहीच वेळात पुन्हा तो काळा पक्षी तिच्या मागून येऊन तिला ओलांडून जातांना पुन्हा पुटपुटला, 'हे कसे शक्य आहे...?'

आता प्राणभयाने थरथरणारी चिमणी आपल्या इवल्याशा पंखात सगळी शक्ती एकवटून सर्व ताकदीनिशी उडू लागली. पुन्हा काहीच वेळात काळा पक्षी तिच्याच मागावर असल्यासारखा झेपावला आणि जाता जाता म्हणाला, 'हे कसे शक्य आहे...?'

भीतीने अर्धमेली झालेली चिमणी नकळत इतक्या वर गेली की साऱ्या छोट्या पक्षांचे टप्पे ओलांडून थेट गरुडाच्या अवकाशात दाखल झाली. गगनभरारी मारत सावजाचा शोध घेणारा गरुड आपल्या बाजूला इवल्याशा चिऊताईला बघून हादरला !

'चिऊताई, तू इथे एवढ्या वर काय करतेस...?'
'बर झालं गरुडदादा तू भेटलास. अरे, एक भलामोठा काळा पक्षी केव्हापासून माझ्या मागे लागलाय आणि, 'हे कसे शक्य आहे, हे कसे शक्य आहे...' असे म्हणून मला घाबरवतोय...'
'काळजी करु नकोस, मी तुला लांब त्या उंच डोंगरकपारीत नेऊन ठेवतो. तू तिथे विश्रांती घे, तोपर्यंत तो पक्षीही तू सापडत नाहीस म्हणून कंटाळून निघून जाईल. मग तू सावकाश खाली उतर आणि जा आपल्या घरट्यात परत. चल, बस माझ्या पाठीवर, मी आत्ता पोहोचवतो तुला उंच डोंगरात...'

चिमणीला खूपच हायसे वाटले आणि सुरक्षित होण्याच्या कल्पनेने ती पटकन् गरुडाच्या पाठीवर बसली. गरुड ढगांच्या वर आकाशात झेपावला आणि खरोखरच अगदी काही क्षणात उंच डोंगर कपारीत पोहचला. तिथे सारे कसे शांत शांत आहे हे पाहून चिऊताईला हुरूप आला. 

'गरुडदादा, तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाही, आज तू नसतास तर मी काही वाचले नसते बघ !' 'काय चिऊताई तू पण, आपण पंखवाले पक्षी एकमेकांच्या उपयोगी नाही पडलो तर काय शेपटीवाले प्राणी येतील आपल्या मदतीला...? काहीतरीच तुझं ! बरं, आता इथे थोडावेळ विश्रांती घे, फळं खा, पाणी पी आणि ताजीतवानी होऊन सावकाश खाली उतर, मला निघायला हवं...'

चिमणीच्या निरोप घेऊन गरुड खाली झेपावला आणि पुन्हा सावज शोधण्याच्या कामात गर्क झाला. असाच काही वेळ गेला आणि उंच डोंगरावरच्या आपल्या गरुडासनाकडे परतत असताना वाटेत गरुडाला तो काळा पक्षी भेटला.

'अरे, तू इथे काय करतोयस ? पुन्हा त्या बिचाऱ्या चिमणीला उगाच घाबरवू नकोस !' गरुड म्हणाला.
'पक्षीराज, मी स्वतःच्या इच्छेने काही करत नसतो, मी फक्त आज्ञापालन करतो!' काळा पक्षी उत्तरला.
'म्हणजे ? मी समजलो नाही !' गरुडाने विस्मयाने विचारले.
'अहो, पक्षीराज मी काळदूत आहे, माझा मालक काळ जेव्हा सांगेल तेव्हा, जिथे सांगेल तिथे आणि ज्यांचे सांगेल त्यांचे प्राण हरण करणे हेच माझे काम !'
अजूनही निटसा उलगडा न झालेला गरुडाने विचारले, 'पण मग त्यासाठी चिऊताईला घाबरवायची काय गरज...?'

'अहो असं काय करताय ? त्या चिमणीचाच जीव घ्यायचा आदेश होता पण ते काम मला उंच डोंगरकपारीत करण्याच्या सूचना होत्या. वेळ भरत चालली होती आणि इतक्या कमी वेळात ही एवढीशी चिमणी एवढ्या उंच डोंगरावरच्या कपारीत पोहचणार कशी हेच मला समजत नव्हतं. काळाची वेळ आणि ठिकाण चुकणं कदापि शक्य नाही म्हणून मी म्हणत होतो, 'हे कसे शक्य आहे...!' असो, आपल्या मदतीने माझी कामगिरी फत्ते झाली त्याबद्दल आपले मनापसून आभार...!'

-------------------------------------------------------------------

या पारंपारिक जातककथेचे बाळबोध तात्पर्य 'काळाचा महिमा गौरविणारे विधिलिखित' असे काहीसे असावे. तथापि आजच्या संदर्भात हे तात्पर्य आपण 'भित्यापाठी ब्रह्मराक्षस' असे समजायला हरकत नाही. चिऊताई हे आपल्यासारख्या सामान्य प्रजेचे रूपक असेल तर पक्षीराज गरुड ही 'व्यवस्था' अर्थात 'सिस्टीम' मानायला हरकत नाही, जिचा एक पंख शासन, दुसरा प्रशासन आणि चोच अर्थात मुखपत्र म्हणजे मिडिया आहे. काळ घिरट्या मारतो आहेच आणि अजाणतेपणी ही व्यवस्थाच चिऊताईची वेळ भरण्यास मदत करून काळदूताची सोय करतेय... 

तेव्हा, सुमारे ९०% विकार हे मानसिक असतात, दुर्बल मन शरीराची प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) कमी करते आणि अशक्त शरीरसंस्था किटाणू-विषाणूंच्या सहज शिकार होतात... एवढी त्रिसूत्री लक्षात ठेवून सर्व खबरदारी नेमस्तपणे घेतली तर गरुडाच्या अवकाशात पोहचण्याची वेळच येणार नाही...

शुभम भवतु !
----------------------------------------------------------

बाय द वे... बरेच वर्ष झाले, टेरेसवर पसरलेले दाणे टिपायला आणि भांड्यातले पाणी प्यायला सकाळी चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या अलीकडे दिसत नाहीत. कुठे गेल्यात कोण जाणे... की वयोमानानुसार आपलीच दृष्टी अधू झालीय...?

शनिवार, २२ मे, २०२१

वि-भक्त...!

https://ibpf.org/seclusion-being-on-the-other-side-of-the-door/

आता मी माझा नाही
पण म्हणून तुमचा आहे असेही नाही

दिंडीत नाचलो म्हणून वारकरी झालो नाही
पिंडीत साचलो म्हणून धारकरी झालो नाही
याच्या विनोदाला हसतो म्हणून उजवा होत नाही
त्याच्या मांडणीला फसतो म्हणून डावाही होत नाही

माझ्या असण्याचे वाटप लशीइतके स्वस्त नाही आणि
माझे नसणे पोकळी निर्माण करण्याएवढे ध्वस्त नाही
मला गृहीत धरून चालणे ही असू शकेल त्यांची भूक
किंवा निर्णयाच्या क्षणी अवसानघात करेल अशी चूक...?

कळपांना वळण लावून थेट करता येते सरळ
बुद्धिभेद करून ओकायला लावता येते गरळ
सारेच प्राणी-मात्र आज्ञा मानतीलच असे नाही
काही मूर्खांना वाटते असावे आपले मत काही

तुमच्यात बसतो-हसतो म्हणून माझा कणा मोडत नाही
गारूड्याचे दुध प्यायला म्हणून नाग फणा सोडत नाही
रचणाऱ्यांना जेव्हा जडेल अपौरुषाची व्याधी
उतावळा अभिमन्यूच भेदेल चक्रव्यूह कधी

हल्ली माझ्यात मी नसेनही
पण म्हणून मी तुमच्यातलाही होत नाही...!