गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२

संचित...!

 चित्र:  वैभव  पुराणिक, नासिक

श्वासावर लक्ष असो
जगण्याचा वाटो सण
परतूनी येत नाही
आला क्षण गेला क्षण

चष्मा एका प्रतलाचा
रंग अनेक अदृष्य
भान राखून मितींचे
मौनातून व्हावे भाष्य

काय देणे काय घेणे
हिशोबाची वही बंद
संचिताच्या मार्गावर
चालण्याचा उरो छंद

चोरवाटा आडवाटा
विसरुनी हेवेदावे
संवेदना जागवून
स्वत:कडे परतावे

मन आत्मा की शरीर
कोठे शोधावे मीपण ?
अज्ञाताच्या वाटेवर
सारे प्रवासी आपण

श्वासावर लक्ष असो
जगण्याचा वाटो सण
परतूनी येत नाही
आला क्षण गेला क्षण

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

 शब्द: दिनेश चंद्रात्रे, धुळे

वाढदिवसाचे औचित्य साधून आपापल्या भावनांना चित्राक्षरांचा साज चढविणाऱ्या
सन्मित्रांच्या या भावगर्भ, अर्थगर्भ, सूचक तथा समर्पक अभिव्यक्तींनी
माझा अर्धशतकोत्तर प्रथम वाढदिवस अधिकच समृद्ध आणि सुफल झाला नसता तरच नवल...!
बालमित्रांच्या 'आभाराचा भार कशाला...?' नाही का गुरुजी ?

सादर प्रणाम !

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

कृष्णसखा...!

चित्र सौजन्य: वैभव पुराणिक, नासिक 

पंचेंद्रियरुपी पांडवांना
षडरिपूंच्या कौरवांशी लढतांना
सगळ्यात अवघड युद्ध
लढावे लागते ते कर्णाशी
कारण...
कायम उपेक्षल्याने
आत्म्याच्या अतृप्त वासनांना
आणि मनस्वी दुखावल्याने
मैत्रीच्या कोंदणात
विखार जोपासणाऱ्या
धुरंधराला जिंकणे सोपे नसते,
विवेकी सारथ्याशिवाय !
म्हणूनच...
विकार सांभाळायला
आणि कर्णाचा अर्जुन व्हायला,
सख्याच्या रुपातला
कृष्ण भेटायला हवा,
कृष्ण भेटायलाच हवा...!

जन्माष्टमीच्या शुभेच्छा...!

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

प्रतिज्ञा...?


कडक उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलातील तळ्याचे पाणी संपत चालले होते. तळ्यातील पाणीही आटले. हत्तीचा कळप पाण्याच्या शोधात होता . पाणी कोठेच मिळत नव्हते. हत्तीच्या कळपाचा राजा म्हणाला, मला दुसऱ्या जंगलातील सर्वात मोठे तळे माहित आहे आपण तिकडे जाऊयात. हत्तींना पिण्यासाठी पाणी हवेच होते. सगळे दुसऱ्या जंगलाकडे निघाले. तीन रात्री प्रवास केल्यानंतर हत्तीचा कळप त्या सर्वात मोठ्या तळ्याजवळ आले.

त्या सर्वात मोठ्या तळ्याच्या परिसरात ससे निवास करीत होते. तळ्याच्या आसपास मातीत बिळे करून ते राहत होते. तीन रात्रीचा प्रवास करून आलेल्या हत्तींना पाणी बघताच पाण्याच्या दिशेने धाव घेतली. आपल्यामुळे सशांची घरे नष्ट होत आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही. हत्तीच्या पहिल्या फेरीत खूप ससे मारले गेले रोजच हत्ती पाणी पायायला येऊ लागले आणि सशांची हानी होवू लागली. सशांना या परिस्थितीवर उपाय शोधणे भाग होते.

सशांच्या कळपातील एक हुशार ससा हत्तींच्या राजाला भेटायला गेला.
ससा म्हणला, 'महाराज आमचे थोर राजे चंद्रमहाराज यांनी आपणास तळ्यातील पाणी पिण्यास मनाई केली आहे.'
तेव्हा हत्तींच्या कळपाच्या राजाने त्याला विचारले, 'कोठे आहे तुमचा राजा?'
तेव्हा ससा म्हणाला, 'चला मी तुम्हाला त्यांच्या कडे घेऊन जातो.'

सशाने लांबच्या रस्त्याने हत्तीला तळ्यापर्यंत नेले. ते पोहोचेपर्यंत चंद्र आकाशात आला. तळ्यात चंद्राचे प्रतिबिंब पडले होते.
त्याकडे बोट दाखवून ससा म्हणाला, 'ते बघा आमचे महाराज रागाने थरथरत आहेत.'

हत्ती हे दृश्य पाहून घाबरला. पाण्यात हलणारे प्रतिबिंब पाहून हत्तीने सशाची क्षमा मागितली. सर्व हत्तींना घेऊन त्यांचा राजा जंगलाबाहेर पडला ससे आता आनंदाने तळ्याभोवती राहू लागले.

बुद्धिर्यस्य बलं तस्य निर्बुद्धेश्च कुतो बलम् ।
वने सिंहो यदोन्मत्तः मशकेन निपातितः ॥

'भाषण' (साभार: भाडीपा) आणखीन गोष्ट (साभार: पंचतंत्र) दोन्ही पूर्णपणे अराजकीय आहेत.

भारत मेरा देश है।
सभी भारतीय मेरे भाई-बहन हैं।
मैं अपने देश से प्यार करता हूं और मुझे इसकी समृद्ध और विविध विरासत पर गर्व है।
मैं हमेशा इसके योग्य बनने का प्रयास करूंगा।
मैं अपने माता-पिता, शिक्षकों और सभी बड़ों का सम्मान करूंगा और सभी के साथ शिष्टाचार का व्यवहार करूंगा।
मैं सभी जानवरों का सम्मान करता हूं और अपने देश और अपने लोगों के लिए, मैं अपनी भक्ति की प्रतिज्ञा करता हूं।
उनकी भलाई और समृद्धि में ही मेरी खुशी है।
जय हिन्द!


स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा !

रविवार, २४ जुलै, २०२२

डिस्टोपियेन...?


एकचालकानुवर्ती व्यवस्थेमध्ये भविष्यातील भयावह तथा दूरगामी परिणामांची दडलेली सूक्ष्मरूपी बीजे उघड करून दाखविणे हे डिस्टोपियेन प्रकटनाचे अत्यंत मोलाचे योगदान. समाजातील, व्यवस्थेतील त्रुटी दाखवून, त्यांच्या गंभीर परिणामांपासून वाचण्याचे 'लोकशाहीप्रणित समाजवाद' सारखे उपाय सुचवणाऱ्या पर्यायी व्यवस्थेची कल्पना मांडणे, ही वर्तमानाच्या तथाकथित 'टीकाकारांची' आणि निर्भीड भविष्यवेधी भाष्य करणाऱ्या विवेकदक्ष लेखकांची भूमिका. समाज सजग, सतर्क आणि संवेदनशील राहण्यास अशा लेखकांची आणि त्यांच्या परखड लेखनाची नितांत गरज असते. कारण, मुळात स्थितीगमनी आणि सुस्त समाजमन हे बदलास अनुकूल नसते आणि जे बदल सुखवस्तू, सुखासीन तथा लब्धप्रतिष्ठित वर्गास गैरसोयीचे असतील त्यांना केवळ दुर्लक्षून मारणे हे त्यातल्या त्यात 'सभ्यते'चे लक्षण. आणि निषेधाची, विरोधाची, अगदी हमरीतुमरीची वेळ आलीच तर (स)माजमाध्यमे आहेतच दिमतीला ! 'अगा जे घडलेची नाही...' हे बकध्यान फारच सोयीचे आणि 'ध्यान'स्वरूप असल्याने त्याला लाभणारी अध्यात्मिक किनारही भरजरी !

तथापि, बहुसंख्यांनी डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरीचे सोंग घेतले आणि तारस्वरात, 'ऑल इज वेल...' अशी बोंब ठोकली तरी, दुधाची राखण करण्यासाठी सदैव दक्ष राहण्याचा वसा घेतलेल्या विवेकबुद्धीला झोपेचे सोंग घेता येत नाही. मग अशी तर्कनिष्ठ विवेकबुद्धी कधी बुद्धाच्या, 'अप्प दीपो भव:...' या स्वयंभू मार्गदर्शनातून, कधी तुक्याच्या, 'बुडतां हे जन, न देखवे डोळां...' अशा मायाळू कळवळ्यातून, तर कधी समर्थांच्या, 'मूर्खांची लक्षणे...' या प्रच्छन्न उपदेशातून व्यक्त होते तर कधी जॉर्ज ऑर्वेलच्या, 'बिग ब्रदर इज वॉचिंग यू ...' आणि दिलीप कुलकर्णींच्या, 'नो एनर्जी इज ग्रीन (ऑर 'क्लीन', फॉर दॅट मॅटर!) एनर्जी !' अशा चेतावणीतून डोळ्यात झणझणीत अंजन घालते. 

बहुतांनी या साऱ्याकडे, आपल्या क्षुद्र, क्षणिक आणि दांभिक स्वार्थासाठी दुर्लक्ष केले आणि, आज कोंबडा झाकून ठेवायचा प्रयत्न केला तरी 'उद्या' सूर्य उगविल्याशिवाय रहायचा नाही...! सृष्टी सर्वतोपरी आहे आणि तिच्या चक्राला बाधा आणणाऱ्या प्रजातींचा योग्य तो समाचार घेण्याचे सामर्थ्य तिच्या ठायी नसते तर तिने मुळात जीवसृष्टी निर्माणच केली नसती. मुद्दा (आणि प्रश्न!) आहे तो आपल्या अस्तित्वाचा. आणि अजूनही आपण, 'ही व्यवस्था काही मी तयार केली नाही, मी एकटा त्यात काय करू शकणार आहे...?' असा मध्यममार्गीय, कातडीबचाऊ पवित्रा घेणार असू, तर एवढेच सांगावेसे वाटते कि... 

निदान भौगोलिक, राजकीय, सामाजिक परिस्थितीचे किमान भान येण्यासाठी, तिच्या नजीकच्या भविष्यात होऊ घातलेल्या पर्यवसनाची जाण होण्यासाठी; सो कॉल्ड बेस्ट सेलर्स, बिकाऊ मीडिया आणि पकाऊ व्हॉट्सअँप फॉर्वर्ड याशिवाय, आपल्याशी, आपल्या पुढच्या पिढ्यांशी थेट निगडित असे काही तर्कशुद्ध, विवेकी, समर्पक वाचण्याची सवय लावून घेऊ या...

आज हे सारे नव्याने उगाळण्याचे कारण म्हणजे, काल 'अनंत यशवंत' उर्फ 'नंदा खरे' यांचे झालेले निधन. ज्या नावाने 'गुगल सर्च'वर एक प्रतिमा देखील मिळणे अवघड, त्याची दखल 'डिजिटल' प्रगत महाराष्ट्राने का घ्यावी हा प्रश्नही रास्तच. मुळात संत-महंत, सुधारक-वैज्ञानिक, विद्वान-विचारवंत, लेखक-साहित्यिक अशा महानुभावांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अशा नावाची लेखिका(?) पण होती हे आम्हाला ठाऊक असण्याचे कारणच काय, आमच्या कधी ऐकण्यात सुद्धा नाही आले असे काही नाव ! प्रसिद्धीपरांग्मुखता अनसोशल ठरल्याने तो मोठाच व्यक्तीदोष असण्याच्या काळात समाजविन्मुख राहणे हे पापच...  मान्य, अगदीच मान्य. स्थापत्य अभियंत्याचे शिक्षण आणि व्यवसाय असणाऱ्या नागपूरच्या कोणा एका गृहस्थाने, पुणेरी प्राध्यापकीय अभिनिवेशाने चिंतन आणि लेखन करणे हे महाराष्ट्राच्या सहजी पचनी पडण्यासारखे नाही, अगदीच मान्य ! त्यामुळे प्रस्थापित वर्तमानपत्रांनी खरे सरांच्या निधनाची घेतलेली छोटीशी का होईना दखल 'मना'ला स्पर्शून गेली. 

आता तुम्हाला या नावाची ओळख झाली आहेच तर खरे सरांच्या न चुकता वाचाव्या अशा पाच पुस्तकांची नावे सांगून तुमचे गुगलण्याचे कष्ट वाचवतो... 
१. कहाणी मानवप्राण्याची
२. अंताजीची बखर
३. बाजार
४. ऐवजी
५. उद्या

शिवाय यामुळे उत्सुकता वाढलीच, तर समग्र नंदा खरे साहित्य येथे पहा... 
https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=4930282049228319742 

माणसे आणि व्यक्ती येतात आणि जातात, विचार आणि वृत्ती चिरकाल राहतात. तेंव्हा खरे सरांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली वगैरे म्हणण्याचा किंवा सरांना श्रद्धांजली वगैरे वाहण्याचा प्रश्नच नाही, त्यांच्या विचाराचा शक्य होईल तेवढा प्रचार आणि प्रसार हीच त्यांची स्मृती जपणारी आदरांजली...!

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि...!

रविवार, १७ जुलै, २०२२

अ-शोक...!


गडगडले सारे स्तंभ I वनराज होई मुखस्तंभ I
उरला केवळ दंभ I लोकशाही II

घोडे चौफेर उधळता I बाजारास ये उधाण I
सांडास अवताण I त्राही त्राही II  

प्रतिके अन प्रतिमान I सारेच बदलून वेष I
पोसती प्रच्छन्न द्वेष I बारमाही II

सामर्थ्याचे प्रतिक I वैराग्य घेई ओढून I
राज्य सत्ता सोडून I शोक नाही II

अनिर्बंध सत्ताकांक्षा I नाही रोक टोक I  
हतबुद्ध अ-शोक I भारवाही II

नावे त्याच्या प्रतिमा I कारुण्यमूर्ती राजस I
होता स्पर्श तामस I रौद्र दाही II

दर्शनी क्रुद्ध भाव I भयप्रद त्रिमिती I
अदृश्य चौथी मिती I ठोकशाही II

तरी सारे आलबेल I म्हणे हेच रामराज्य 
बाकी सारे सारे त्याज्य I लवलाही II

रविवार, १० जुलै, २०२२

नाविक...!

चित्र: राम खरटमल

विठ्ठल रंग
विठ्ठल संग
विठ्ठल प्रीत
विठ्ठल गीत

विठ्ठल डोह
विठ्ठल मोह
विठ्ठल श्वास
विठ्ठल ध्यास

विठ्ठल नाव 
विठ्ठल भाव
आम्ही भाविक
विठ्ठल नाविक 

नामाचा महिमा
भक्तीचा महापूर 
होडी चढता बिनघोर
दिसो लागे पैलतीर...!

रविवार, ३ जुलै, २०२२

'...हम नहीं तोडेंगे?'

अडीच वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०१९ मध्ये लिहिलेल्या 'ये दोस्ती...' चा उत्तरार्ध लिहावा लागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते... इतक्या अनाकलनीय, अनैसर्गिक आणि अकल्पित घडामोडींने स्व(?)रुपास आलेल्या आघाडीत बिघाडी करण्याची बहुतांची मनीषा लपून राहिली नसली तरी तिचे पर्यवसन त्याहूनही अधिक वैचित्र्यपूर्ण आणि विस्मयकारक असावे हे मात्र नवलच.

शोलेच्याच रुपकातून सांगायचे तर हे म्हणजे - 

...गब्बरने ठाकूरचा काटा काढून मित्रशोकात पिऊन बेधुंद झालेल्या वीरूला बसंतीच्या मौसीला पुन्हा एकदा इमोशनल ब्लॅकमेल करून, बसंतीचे लग्न हिराशी लावून देतांना सांबाला कन्यादान करायला लावले. यामुळे हताश झालेल्या रामलाल, इमामचाचा आणि राधा यांनी आपल्या आधीच हतबल असलेल्या आयुष्याला आणखीनच डागण्या मिळालेल्या पाहून हवेलीला कुलुप लावून, चाव्या कमरेला खोचून काही दिवस गाव सोडायचा निर्णय घेतला म्हणून कालिया खुश झाला...

...असा काहीसा क्लायमॅक्स तोही दोनदा (अबब!) घडला.. भूमिका आणि पात्रे पुन्हा एकदा आपण आपली निवडून घ्यावी... आपला नाव घ्यायचा काम नाय... आणि ते लोकशाही बिकशाही बकवास करून डोक्याची मंडई करायचा तर मुळीच काम नाय, कळ्ळा का...? कुठेही नेऊन ठेवला असला तरी 'जय महाराष्ट्र' माझा...!  


...आणि तो प्रामाणिकपणामुळे तिन्ही कुऱ्हाडी मिळवणारा लाकूडतोड्या, 'कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ...' म्हणजे नेमकं काय हे विचारत का फिरतोय, कुणास ठाऊक?

कुणी जाल का... सांगाल का...?

रविवार, २६ जून, २०२२

परतवारी...!


दिसावा असा उंबरा
जेथे टेकवावा माथा
लोकगंगा तारेल ती
लिहिता यावी गाथा...!

त्याच्या सावळ्याशा
रंगात रंगूनी जावे...
कान्ह्याची ती बासरी
मीरेचे घुंगरू व्हावे...!

मन व्हावे मुक्त असे
नको खेद नको हर्ष
एकातरी उद्गाराला
होवो तुक्याचा स्पर्श...!

गजर पडता कानी
हरीनाम मुखी यावे
भक्तीच्या रिंगणात
पावली नाचून गावे...!

दरवर्षी सुख पहावे
अशी घडावी वारी
तिच्या तोलामोलाची
साधावी परतवारी...!

वैष्णवांचा लाभो वसा
देहात पंचप्राण ल्यावे
पाऊली चाल चालता
जगण्याचे सोने व्हावे...!

सन्मित्र दिनेशला एकावन्नाव्या वाढदिवसाच्या अध्यात्मिक शुभेच्छा ...!

बुधवार, २२ जून, २०२२

शनिवार, ४ जून, २०२२

श्रद्धेय...?


साऱ्याच दिव्यांच्या नशिबी
लख्ख पेटती वात नाही...
अन् एकदाच भोगून संपेल
अशी कुठलीच जात नाही...!

वाऱ्यास ना लाभे विसावा
वेळेस धरण्या हात नाही...
पाण्यास वाहणे निरंतर
साचण्यात ती बात नाही...!

पालवी पानगळीची ग्वाही
पक्षी ऋतुविना गात नाही...
चवबदल करण्यास काही
साप टाकीत कात नाही...!

सोहळे आवाजी मोठे
न्यूनावर मात नाही...
गोंधळ बाहेर घातला
पण संवाद आत नाही...!

शास्त्रार्थात बद्ध महाबळी
स्वयंभू तोही जन्मजात नाही
सक्ती असेल साधूमहंतांस
श्रद्धेय असे काही यात नाही...!