रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४

मुक्त...!


माझ्या कालच्या दुर्दम्य आशावादाची त्वरित दखल घेऊन कविवर्य सन्मित्र दिनेशने 'स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग' ची मराठी आवृत्ती केवळ प्रसवली नाही तर तिच्यावर अत्यंत लयबद्ध अष्टाक्षरी संस्कार करण्याची किमया सुद्धा साधली याबद्दल त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच! 

या प्रकटनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ रूपांतरण किंवा निव्वळ अनुवाद नव्हे तर, मूळ बीजकल्पनेशी नाते सांगणारी संपूर्ण स्वतंत्र आणि स्व-छंद अभिव्यक्ती आहे कारण, यात डोकावणारी अनामिका रॉबर्ट फ्रॉस्ट यांना अभिप्रेत होती काय हे खात्रीने सांगता येणार नाही. 

ही कविता पाठयपुस्तकात 'धडा' म्हणून असल्याने, तो 'शिकविण्या'च्या उद्देशाने जे संदर्भ आढळतात त्यात, कवितेतील घर हे त्या जंगलाच्या मालकाचे(?) फार्म हाऊस(??) असल्याचे विवरण येते. शिवाय फ्रॉस्ट यांनीही 'हिज' असे पुरुषवचनी संबोधन वापरले आहे, त्याचाही संदर्भ या विवेचनास असावा असे वाटते.

तथापि, सन्मित्र दिनेशच्या कवितेचा आत्मा हा नेहमीच प्रेयसीच्या एका विरह-विव्हल प्रियकराचा राहिल्याने त्याला ते घर तिचे असावे असे वाटणे जेवढे स्वाभाविक तेवढेच रोमँटिक! त्या निमित्ताने एक वेगळाच 'ठहराव' बघायला मिळाल्याने रसिकांच्या आनंदानुभूतीत भरच पडेल यात शंका नाही! 

दिनेशच्या कवितेच्या आत्म्याला नेहमीच एक अध्यात्मिक किनारही अनुभवता येत असल्याने, त्याने त्याच्या आवृत्तीचा समारोप अध्यात्मिक पद्धतीने करणे क्रमप्राप्तच होते. फ्रॉस्टना ते देखील तसे म्हणायचे नसावे असे वाटते. फ्रॉस्टच्या, सामान्य माणसाला नित्य तोंड द्याव्या लागणाऱ्या व्यावहारिक, धोरणी द्वंद्वाला दिनेशने कर्म-धर्म-संयोगाचे एक वेगळेच परिमाण दिले, तेही कौतुकास्पद!

कार्यबाहुल्यामुळे इतर कवी मित्रांना अजून यावर प्रकटता आले नसावे असे मानून, यथावकाश आणखीनही काही आवृत्त्या अनुभवयास मिळतील ही अपेक्षा. पण तूर्तास आस्वाद घेऊ या सन्मित्र दिनेशच्या या खास अष्टाक्षरी अभिव्यक्तीचा...       

झाडी दाट ही कुणाची
आहे मलाही ठाऊक
घर गावात तिचे ते
उबदार अन् भावूक

थबकलो इथे असा
निरखत अश्या क्षणी
गोठलेले रान गार
नसेलही तिच्या मनी

घोडा अबलख माझा
थरारला तो ही खास
असा का थांबलो येथे
नसे घर आसपास

गोठलेला तलाव हा
अन् झाडी घनदाट
सांजवेळ कातर शी
पाही ती कुणाची वाट

चूक ना उमजे त्यास
करी घंटानाद मंद
घोंघावतो वारा फक्त
आणि बर्फवृष्टी कुंद

आहे सुंदर जंगल
घनदाट खोल जरी
काही शपथा जुन्या
सांभाळतो मी ही उरी

दूरवर चालणे माझे
कर्म हे कर्तव्ययुक्त
भोग सारे संपवून
व्हावे अखेर मी मुक्त!

- दिनेश चंद्रात्रे, धुळे

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

वादियां और वादे...!

‘हर घडी बदल रही है रूप ज़िंदगी…’ अशा भयाकारी वेगाने बदलणाऱ्या जगात नव्याचे जुने व्हायला हल्ली फार काळ लागत नाही. कळीचे फूल होऊन देवाच्या चरणस्पर्शाने त्याचे निर्माल्य व्हायला जेवढा काळ लागतो त्याहूनही कमी वेळात ‘नव्या’ गोष्टी ‘जुन्या’ होत चालल्यात, फक्त ‘देव’ (आणि 'भाव') तेवढे बदलले आहेत.

बरं, यात फक्त अन्नपदार्थ, कपडेलत्ते, खेळ-मनोरंजन, संस्कृती-उपक्रम, साधन-उपकरणेच नाही तर गाडी-घोडे, स्थावर-जंगम, सोयी-सुविधा यांच्यासह आवडी-निवडी, आचार-विचार, सखे-सोबती, सगे-सोयरे आणि मूल्य-तत्वे सारेच बुलेट ट्रेनच्या वेगाने आऊट डेटेड होतांना दिसते.

पूर्वी 'टूथ' हा फक्त विस्डम संदर्भातच असे त्यामुळे त्याच्याशी निगडित विस्डमही शाबूत होते. आता त्याची जागा 'ब्ल्यू' टूथ ने घेतल्याने त्याच्या उठवळ धरसोडपणाचे वैशिष्ट्यपूर्ण आणि बहुपयोगी लक्षण त्याच्या वापरकर्त्यात आढळले तर, ‘वाण नाही पण गुण लागला’ म्हणायचं. शिवाय सारे काही (प्र)दर्शनीय झाल्याने स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात ‘दिसेल ते’ कैद करण्याची चढाओढ पाहता, क्षणांचे अनुभव संवेदनेत रुजून त्यांच्या जोपासनेने जाणिवा समृद्ध होण्यासाठी आवश्यक तो संयम, ती स्थिरता, तो ठहराव, ते भान अभावानेच दिसते.

या भयावह वेगामुळे जे अपघात संभवतात त्यांचे दूरगामी परिणाम अधिक धोकादायक आहेत. 'पागल, ये मत सोच की जिंदगीमें कितने पल है, ये देख हर पलमें कितनी जिंदगी है...!' ही मुन्नाभाई फिलॉसॉफी सांगणारी उत्तान नाच करणारी नर्तकी असली तरी त्यामुळे त्यातले तत्व मुळीच हीन ठरत नाही, किंबहुना हे समजावून सांगायला तिच्याइतकी अधिकारी व्यक्ती दुसरी नाही असाही एक दृष्टिकोन असू शकतो. पण त्या एका क्षणात असलेली जिंदगी बघायची, आस्वादायची वृत्ती मात्र ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, कुठेच एक्सप्रेस डिलिव्हरीसाठी ऑर्डर करता येत नाही; ती जोजवावी, जोपासावीच लागते.

सौंदर्याचे, भव्यतेचे, उदात्ततेचे आस्वादन करण्यासाठी लागणारी रसिकता जगण्याच्या गरजांमध्ये कशी घुसमटते याचे क्लासिक उदाहरण असलेली रॉबर्ट फ्रॉस्ट यांची, आख्यायिका बनून उरलेली कविता 'स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग' १०२ वर्षांची झाली तरी आजही तेवढीच, किंबहुना अधिकच समर्पक आहे. आज जगण्याच्या धबडग्यातून वेळ काढून तिचे रसास्वादन करावे आणि जमेल तसा मुक्त भावानुवाद करावा म्हणून हा खटाटोप. आता हे प्रकटन राष्ट्रभाषेत का मातृभाषेत का नाही या मागे काही मोठी वैचारिक/तात्विक/'राज'कीय भूमिका वैगरे नाही तर या कवितेचा एकूण बाज पहाता तिला मातृभाषेत आणायला अधिक प्रतिभा, योग्यता आणि अभ्यास पाहिजे असे जाणवल्याने ही सोईस्कर पळवाट का म्हणानात! इतर कवी मित्रांनी या कामी मदत केली तर तेही लवकरच साधेल... हा दुर्दम्य आशावाद!

ये किसकी हसीं वादियां है जानता हूँ शायद मैं…
गावमेही घर है उसका पता हैं मुझे फिर भी
वो मुझे यहाँ ठहरा हुआ नहीं देखेगा 
इन वादियांके नजारे देखते हुए…
सालकी सबसे गहिरी शामके वक्त 
बर्फसी झील और वादियोंके बीच 
कोई बस्तीभी नजरमें नहीं ऐसी जगह...

क्यूँ रुका हूं मैं, मेरा घोडा है परेशान
उसने अपने गलेकी घंटीको हीलाया
ये जानने की कहीं कोई भूल तो नहीं
उतनी ही आवाज गुंजी
हवाकें हलके झोको और गिरती बर्फके सिवा...

वादियां हसीं हैं, गहिरी और लुभावनी भी
लेकिन जो वादे किये है जिंदगीसे, उन्हे निभाना होगा मुझे…
रोज सोनेसे पहले मिलोंका फासला तय करना होगा मुझे,
रोज सोनेसे पहले मिलोंका फासला तय करना होगा मुझे...!

या कवितेची जन्मकथा थोडी रंजक असल्याने इथे सांगणे उचित ठरावे. रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी जून १९२२ मध्ये, 'न्यू हॅम्पशायर' या कवितासंग्रहासाठी, त्याच नावाची दीर्घ कविता रात्रभर जागून लिहून काढली. कविता संपत आली तेंव्हा उजाडू लागले होते आणि त्या पहाटवाऱ्यात सूर्योदयाचा आनंद घ्यायला घराबाहेर उभे असतांना पूर्णपणे मुक्त, ताणविरहित (तुरिया?) अवस्थेत रॉबर्टना ही कविता सुचली आणि जणू काही झपाटल्यासारखी त्यांनी ती एकहाती लिहून काढली. म्हणजे विल्यम वर्ड्स्वर्थ यांच्या कवितेच्या व्याख्येत चपखल बसणाऱ्या आणि कवीची उदात्त निर्मितीनंतरची उत्कट भावावस्था तंतोतंत मांडणाऱ्या या कवितेने इतिहास रचणे विधिलिखितच होते...!

रॉबर्ट फ्रॉस्ट हे अमेरिकेचे एक अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्याबरोबरच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूं यांचे अत्यंत आवडते कवी होते. पंडित नेहरूंच्या शेवटच्या काळात त्यांच्या पलंगाच्या बाजूच्या मेजावर रॉबर्ट फ्रॉस्ट यांचे एक पुस्तक पडलेले असे आणि त्यातील या कवितेचे पान उघडे असे ज्यातील शेवटच्या चार ओळी त्यांनी अधोरेखित केलेल्या होत्या...

"...The woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep..."

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

परिच्छेद...!


"...शाळेच्या त्या छोट्या जगातून बाहेरच्या मोठ्या जगात पाऊल टाकल्याला आता अकरा वर्षे झाली. पण अजूनही सर्वत्र मला विषमतेची तीच ओंगळ आणि भयंकर दृश्ये दिसत आहेत. बाजारात, देवळात, विद्यालयात, नाटकगृहात, प्रवासात, सभासंमेलनात, लग्नमंडपात, स्मशानभूमीत - कुठेही पाहा. जीवनाच्या या महारोगाने आपल्याला पुरे ग्रासून टाकले आहे, समाजपुरुषाचे शरीर त्याने विलक्षण विद्रूप आणि बधिर करून सोडले आहे, या शारीरिक विकृतीचा परिणाम त्याच्या आत्म्यावरही झाला आहे असेच दिसून येईल. डोळे मिटून भारतीय संस्कृतीचा जप करीत आणि आपल्या आध्यात्मिक वारशाची स्थानी-अस्थानी प्रौढी मिरवीत आपण गेली शेकडो वर्षे एका स्वप्नसृष्टीत वावरत आलो आहो. धर्म व व्यवहार, विचार व आचार, इच्छा व कृती यात उभारलेली राक्षसी भिंत धुळीला मिळविण्याकरिता करावी लागणारी प्रचंड धडपड आमच्यापैकी एखादाच थोर आत्मा क्वचित करतो. जमल्यास त्याचा आणि आणि ते साधले नाही तर त्याच्या शिकवणुकीचा मुडदा पडून आम्ही पुन्हा स्वप्नसृष्टीतल्या आपल्या मोठेपणात मश्गूल होऊन जातो. आम्हाला सर्वोदय हवा, आम्हाला रामराज्य हवे! 'सर्वे तु सुखिनः सन्तु' या मंत्राचा उद्घोष कानांवर पडला की, आमच्या अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहतात! पण हे सारे शेख महंमदाचे मनोराज्य सत्यसृष्टीत उतरविण्याकरिता आर्थिक आणि सामाजिक समतेची जी बैठक तातडीने निर्माण व्हायला हवी, ती उभारण्याचे अवघड आणि कष्टप्रद काम करायला आम्ही तयार नाही. परंपरागत स्वार्थावर निखारे ठेवल्यावाचून समता या शब्दाला काही अर्थ नाही, जीवनविषयक दृष्टिकोनातली क्षुद्रता नाहीशी झाल्याशिवाय खरीखुरी सामाजिक क्रांती अवतार घेऊ शकणार नाही हे सनातन कटू सत्य आहे. पण आजच्या झटपट सुधारणेच्या काळात याचा विचार करायला मंत्र्यांपासून विचारवंतापर्यंत कुणालाच वेळ नाही. आजकालची आपली सारी धडपड सत्प्रवृत्त आहे असे मानले, तरी पायावाचून उभारलेल्या चित्रपटातल्या क्षणभंगुर लाकडी मंदिरावर सोन्याचा कळस चढविण्यापेक्षा तिची किंमत अधिक नाही. कळत-नकळत सामाजिक विषमतेचे खरेखुरे राक्षसी स्वरूप लपविण्याचीच अद्यापि आपण कोशीस करीत आहोत! कुणी तिला तत्वज्ञानाच्या सात पडद्यांआड  ठेवतो, कुणी तिला धार्मिक बुरखा पांघरायला  देतो, कुणी तिला पांडित्याच्या अलंकारांनी झाकून टाकतो. पण कुठलीही व्याधी - मग ती वैयक्तिक असो वा सामाजिक असो - लपवून कधीच बरी होत नाही! या दृष्टीने मी 'पूजास्थान' ही गोष्ट चाळू लागलो म्हणजे तिच्यात एकप्रकारचा दुबळेपणा मला आता जाणवतो! तिच्यातले सत्य अधिक तीव्रतेने, अधिक उग्रतेने आणि अधिक विशाल अशा पार्श्वभूमीवर चित्रित करण्याचा मी पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे..."       
वि. स. खांडेकर
११.५.४९

'गुणा: पूजास्थानं गुणिषु नच लिंग नच वय: I
इयत्ता पाचवीला संस्कृत शिकवितांना धडयात आलेल्या या वचनाने जन्म दिला 'पूजास्थान' या लघुकथेला आणि तिला 'अश्रू आणि हास्य' या संग्रहात सामील करतांना तिच्या जन्मकथेनिमित्त जे चिंतन झाले त्या प्रदीर्घ प्रस्तावनेतील; साऱ्या धोरणी धारणा, अद्भुतरम्य कल्पना आणि स्वप्नरंजित आभास - यांना छेद देणारा हा परिच्छेद! पंचाहत्तर वर्षात देश खूप पुढारला, प्रगती झाली, विकास झाला, ओबडधोबड जगण्याला मऊमुलायम आधुनिकतेचा स्पर्श झाला... सारे खरेच. पण बरोब्बर ७५ वर्षांपूर्वीच व्यक्त झालेल्या या चिंतनीय वास्तवाचे काय? वि. स. खांडेकर या लेखकाच्या माध्यमातून व्यक्त झालेला पण कुणाही विचारी, संवेदनशील आणि विवेकी माणसाचा असू शकणारा हा विषाद पंचाहत्तर वर्षात किती कमी झाला... की वाढला? आणि तसे असेल तर एक प्रगत समाज म्हणून आपणही ७५ वर्षांची ही गाथा अधिक विशाल पार्श्वभूमीवर नव्याने चितारायला नको...?

निदान प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? 

ये जो शहतीर है पलकों पे उठा लो यारो
अब कोई ऐसा तरीका भी निकालो यारो

दर्दे—दिल वक़्त पे पैग़ाम भी पहुँचाएगा
इस क़बूतर को ज़रा प्यार से पालो यारो

लोग हाथों में लिए बैठे हैं अपने पिंजरे
आज सैयाद को महफ़िल में बुला लो यारो

आज सीवन को उधेड़ो तो ज़रा देखेंगे
आज संदूक से वो ख़त तो निकालो यारो

रहनुमाओं की अदाओं पे फ़िदा है दुनिया
इस बहकती हुई दुनिया को सँभालो यारो

कैसे आकाश में सूराख़ हो नहीं सकता
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो

लोग कहते थे कि ये बात नहीं कहने की
तुमने कह दी है तो कहने की सज़ा लो यारो

- दुष्यंत कुमार

रविवार, २१ जानेवारी, २०२४

रामराया...!


रामजन्मभूमी राष्ट्रोत्सवाच्या निमित्ताने,

"कल्पनेचा प्रांत तो माझा एकांत।
तेथें मी निवांत बैसेईन बैसेईन सुखरुप क्षणैक।
पाहिन विवेक राघवाचा स्वरुप राघवाचे अत्यंत कोमळ।
जेथें नाही मळ, माईकांचा माईकांचा मळ जाय तत्क्षणीं ।
रामदरुशणीं रामदास।"

या 'समर्थ' भावनेने, समर्थ रामदासांनी सकल जनहितार्थ 
प्रभू रामचंद्राला घातलेली ही आर्त साद...

कल्याण करी रामराया ।
जनहित विवरी ।।
तळमळ तळमळ होतची आहे ।
हे जन हाति धरी दयाळा ।।

अपराधी जन चुकतची गेले ।
तुझा तूचि सावरी दयाळा ।।
कठीण त्यावरी कठीण जाले ।
आतां न दिसे उरी दयाळा ।।

‘कोठे जावे काय करावे ।
आरंभिली बोहली दयाळा ।।’
दास म्हणे आम्ही केले पावलो ।
दयेसी नाहीं सरी दयाळा ।।

जय जय रघुवीर समर्थ 


शनिवार, ६ जानेवारी, २०२४

रहस्य...!


त्या दुकानदाराने आपल्या मुलाला जगाचे ज्ञान व्हावे म्हणून जगातल्या शहाण्या माणसाकडे पाठवले.

शहाणा म्हणजे ज्ञानी आणि ज्ञानी म्हणजे कुणी साधू-तपस्वी अशी अटकळ बांधून मुलगा त्याच्या शोधात निघाला.

वाळवंटातल्या ४० दिवसांच्या प्रवासानंतर मुलगा पोहोचला ती कुण्या साधूची कुटी नव्हती तर धनिकाचा प्रशस्त महाल होता. तिथे ध्यान-धारणा, मंत्र-जाप, पूजा-साधना असले काहीही चाललेले नव्हते तर खूप वर्दळ होती. लोक येत जात होते. सौदे ठरत होते, व्यवहार पार पडत होते. जगातल्या सर्वोत्तम खानपानाची रेलचेल होती. वातावरणात संगीत होते, सुगंध होता, उल्हास होता. शहाणा (आणि श्रीमंत) माणूस साऱ्यांशी आपुलकीने बोलत होता, हवे-नको बघत होता.

मुलाकडे लक्ष जाण्यास त्याला जवळपास दोन तास लागले. मुलाचा येण्याचा उद्देश त्याने समजून घेतला पण त्याला जे हवे होते ते, 'सुखाचे रहस्य' समजावून सांगण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता म्हणून त्याने मुलाला त्याचे घर पाहून दोन तासाने परत भेटू असे सुचवले. मुलाला फक्त एकच गोष्ट करायची होती, यजमानाने दिलेला चमचा आणि त्यातले तेलाचे दोन थेंब पूर्ण वेळ सांभाळत घर पहायचे होते.

मुलाने महालाचे संगमरवरी खांबांनी सजलेले रुंद वऱ्हांडे, मखमली पायघड्या घातलेले उंच जिने, फुलांच्या ताटव्यांनी सजलेले गवाक्ष, भरजरी रेशमी पडद्यांनी नटलेले नक्षिकाम केलेले भव्य दरवाजे खिडक्या या साऱ्यांच्या साक्षीने घराचा दौरा पूर्ण केला - सारे लक्ष हातातील चमच्यावर लक्ष केंद्रित करून दोन तासांनी शहाण्या माणसाकडे परतला!

शहाणा माणूस म्हणाला, 'मग, कसे वाटले माझ्या शयनगृहातील गालिचे, मुदपाकखान्यातील लाकडी कारागिरी, वाचनालयातील पुस्तके आणि कल्पकतेने सजवलेल्या भिंती, माळीबुवांनी १० वर्षांच्या अथक मेहनतीने फुलवलेला आणि निगुतीने राखलेला बगीचा आणि त्यातील थुई थुई नाचणारे कारंजे...?'

मुलगा फारच शरमला आणि वरमून म्हणाला, 'माझे सारे लक्ष चमच्यातील तेलाकडे असल्याने मी यातील काहीही बघू शकलो नाही, त्याचा सुखद अनुभव घेऊ शकलो नाही, मला माफ करा...!'

'मग पुन्हा एकदा जा आणि मी जगभरातून जमविलेल्या साऱ्या किमती, कलात्मक आणि सुंदर गोष्टींचा आनंद घेऊन पुन्हा मला भेट. ज्या माणसावर विश्वास ठेवायचा त्याचे घर नीट निरखून बघायलाच हवे, नाही का...?'

मुलाने समाधानाने पुन्हा चमचा उचलला आणि या वेळी साऱ्या गोष्टी नीट बघून, त्यांच्या सौंदर्याचे आस्वादन करीत घराचा फेरा पूर्ण केला आणि अतिशय सुखावत सुस्मित चेहऱ्याने शहाण्या माणसास सामोरा गेला.

'... पण चमच्यातले तेल कुठेयं...?' शहाण्या माणसाने मुलाच्या हाताकडे बघत विचारले. मुलाचे तिकडे लक्ष जाताच त्याचा आनंदाने फुललेला चेहरा क्षणार्धात खर्र्कन उतरला...

'असं बघ मुला, मी तुला एवढाच सल्ला देऊ शकतो..', शहाणा माणूस अत्यंय शहाणिवेने म्हणाला, 'तू शोधतोयस त्या सुखाचे रहस्य एवढेच आहे की जगातील साऱ्या चांगल्या, हव्याशा गोष्टींचा मनसोक्त उपभोग घ्या, रसास्वादन करा पण ते करताना हातातल्या चमच्यातील तेलाचे दोन थेंब कधीही विसरू नका, नजरेआड होऊ देऊ नका...!'

---------------------------------

पावलो कोएलो यांच्या 'दि अल्केमिस्ट' या अप्रतिम पुस्तकातील ही अत्यंत बोधप्रद गोष्ट आज नव्याने आठवण्याचे कारण म्हणजे नव्या वर्षाचा संकल्प नव्हे. असे काही संकल्प करायचे नाही असा संकल्प सोडण्याइतकी शहाणीव आम्हाला अल्केमिस्टच्या आधीच आली होती. तेव्हा तसे काही प्रयोजन नाही.

फक्त गेल्या वर्षाचा अखेरचा काळ खूपच घडामोडींचा, धावत्या का होईना गाठीभेटींचा आणि...
"कभी पास बैठो तो कहूं दर्द क्या है,
अब यूँ दूर से पूछोगे तो खैरियत ही कहेंगे..!"
याचा एहसास होण्याचा,
असा संमिश्र भावनांचा ठरला म्हणून पुन्हा एकदा 'पावलो'ची आठवण बाकी काही नाही... 

तेव्हां, मी माझ्या जीवनशैलीत सकृतदर्शनी कुठलेही बदल केलेले नसल्याने पण विचारशैली अधिक मुक्त, प्रवाही आणि चिंतनशील करण्याच्या धोरणामुळे बौद्धिकांसाठी, बुद्धिप्रामाण्यवादासाठी कायमच उपलब्ध आहे, राहीन...!

ताल्लुकात बढ़ाने हैं तो कुछ,
आदतें बुरी भी सीख ले गालिब,
कोई ऐब न हो तो लोग,
महफ़िलों में नहीं बुलाते...!

बस इतना ही...

रविवार, २४ डिसेंबर, २०२३

पुस्तकं...!


काल बऱ्याच वर्षांनी प्रापंचिक कर्मे आणि व्यावहारिक कर्तव्ये यातून जाणीवपूर्वक वेळ काढून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या विश्वविक्रमी 'पुणे पुस्तक महोत्सवा'ला भेट दिली. तेथील हजारो पुस्तकांपैकी शेकडो घ्यावीशी वाटली तरी काही मूलभूत मर्यादा - उदा. त्यासाठी लागणारा निधी, तेवढे सगळे वाचण्यासाठी लागणारा अवधी आणि एक पुस्तक एकदा वाचून झाल्यावर त्याचे काय करायचे ही उपाधी अशा सगळ्या मध्यमवर्गीय विवंचनांमुळे नेहमीप्रमाणे मध्यममार्ग काढून झेपतील तेवढीच पुस्तके घेतली, आता एकेक वाचून हातावेगळे करण्यासाठी वेळेचे नियोजन सुरु आहे.

कालचा संपूर्ण दिवस साहित्यिक, सांस्कृतिक आणि काव्य-शास्त्र-विनोदाने सुफळ सम्पूर्ण करावा म्हणून सायंकाळी २३ व्या कोथरूड साहित्यिक कलावंत सम्मेलनाला हजेरी लावली आणि अशोक नायगावकरांच्या अध्यक्षीय भाषणाचा लाभ (अक्षरश:) घेतला. अध्यक्षीय भाषणाची प्रत प्रेक्षकात वितरित करण्याची प्रथा आहे पण आम्हाला अद्याप ती मिळू शकलेली नाही, प्रयत्न सुरु आहेत, मिळताक्षणी येथे प्रसृत केली जाईल.

अध्यक्षीय भाषणानंतर यंदाच्या पुरुषोत्तम करंडक विजेत्या एकांकिकांचे सादरीकरण होते. त्यातील पहिली खडकी महाविद्यालयाची 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील...' ही, निसर्गाची हानी आणि वनवासींना लक्ष्य करून होणाऱ्या विकासावर जळजळीत भाष्य करणारी एकांकिका आशय-विषयात खोली असणारी असली तरी सादरीकरणात खूपच बालीश वाटावी अशी होती. अर्थात महाविद्यालयाच्या युवक-युवतींचा नवथर उत्साह आणि सादरीकरणातील मर्यादांचा विचार करता प्रयत्न स्तुत्यच म्हणायचा.

स. प. महाविद्यालयाची 'कृष्णपक्ष' ही नेहमीप्रमाणे साऱ्याच आघाड्यांवर उजवी असल्याने अधिक प्रभावी आणि रंजक असणे स्वाभाविकच होते. नाट्यशास्त्रातील साऱ्या नियम-आयामांचा उत्कृष्ट वापर आणि अत्यंत घोटीव, सुसंबद्ध टीमवर्क यामुळे, अॅसिड हल्ल्यात विद्रूप झालेल्या तरुणीची व्यथा असा गंभीर विषय, सावळ्या कृष्णाच्या रूपकातून मांडण्याची कल्पना जेवढी कल्पक तेवढेच त्याचे सादरीकरण मोहक करण्यात हे युवक यशस्वी झाले हे निश्चित.

कालचा दिवस असा अत्यंत प्रॉडक्टिव्ह आणि फुलफीलींग गेल्यामुळे आज काहीतरी चांगले लिहून त्याचे 'उद्या'पन करावे म्हणून गुलज़ारांच्या या आणखी एका अत्यंत भावस्पर्शी कवितेचा हा मुक्त भावानुवाद. गुलजारांच्या नखाचीही सर नसल्याने या प्रकटनाकडे मूळ कलाकृतीशी तुलनात्मकदृष्टया साधर्म्य न बघता भावार्थाच्या दृष्टीने तादात्म्य बघावे ही विंनती...

मोबाईल किंवा लॅपटॉपवर झरझर चालणाऱ्या माझ्या बोटांकडे
आशेने बघत राहतात पुस्तके काचेच्या बंद दाराआडून...
'किती दिवस झाले त्या बोटांचा ओलसर स्पर्श अनुभवून...'
या परित्यक्त भावनेतून केविलवाणी झालेली पुस्तके
आताशा झोपेत चालू लागली आहेत म्हणे...

पुस्तकांनी जी जीवनमूल्ये शिकवली
ज्या धारणा विकसित केल्या
ज्या जाणिवा समृद्ध केल्या
त्या आताशा बेघर झाल्यात.
जी नाती, जे ऋणानुबंध त्यांनी ऐकवले
ते सारे सारे आता विरलेत, उसवलेत वाटते...

पान उलटावं तर एक खोल उसासा स्पष्ट ऐकू येतो,
आणि बऱ्याच शब्दांचे तर अर्थच गळून पडलेत.
ज्यावर आता अर्थ उगवत नाहीत असे
निष्पर्ण पिवळ्या खोडासारखी भासते ती शब्दावली...

पेल्यांनी ज्यांना कालबाह्य अडगळ करून टाकले
अशी मातीच्या गडूसारखी इतस्ततः विखुरलेली
बरीचशी बोधवचने, सुविचार, सुभाषिते पण आहेत त्यात !

पान उलटवतांना जीभेला कागदाचा जो स्वाद यायचा,
आता प्लास्टिकच्या निर्जीव स्पर्शाने फक्त क्लिक होते
आणि एका पाठोपाठ एक तर
कधी एकमेकावर स्वार होणारी
असंख्य खिडक्यांची झडी लागते...

कधी छातीवर ठेऊन झोपी जात असू...
कधी मांडीवर घेऊन जोजवत असू...
कधी गुडघ्यांचे डेस्क करून वाचतांना
नतमस्तक होऊन त्यावरच माथा टेकत असू ...
पुस्तकांशी जे घट्ट गूळपीठ होतं त्याची चव गेली !

पुस्तकांतून मिळणारी माहिती, ज्ञान एरवीही मिळत राहील...
कदाचित आणखीन सोप्या प्रकारे,
जास्त भरभर, पण...

पुस्तकातून अवचित गवसणारी ती वाळलेली फुले
त्या सुगंधीत चिठ्ठया
ते मधुर चिठोरे...
पुस्तकं मागण्याच्या, पडण्याच्या, उचलण्याच्या मिषाने
बांधले, गुंफले, फुलले जाणारे अनुबंध
त्यांचं आता काय होणार यापुढे...?
तसं काही घडणार नाही...
बहुदा !
--------------------------------------

मूळ रचना...

रविवार, १७ डिसेंबर, २०२३

डिटॉक्स...!

कृत्रिम बुद्धिमत्तेने साकारलेली प्रतिमा 

'स्क्रीन टाईम' फार जास्त होतो या जाणिवेने,
माणसाला बऱ्याच काळात स्वयंप्रज्ञेने सुचलेली,
डिजिटल डिटॉक्सची आयडिया चांगलीच आहे...

पण त्यासोबत, किंवा तत्पूर्वी...

विकासाच्या अविवेकी कल्पना,
उपभोगधर्मी संवेदनाशून्य बाजारमूल्ये
द्वेषमूलक आणि अंधश्रद्ध धार्मिक कट्टरता
पुढे जाण्याच्या शर्यतीने गाठलेला अनावर वेग
दिवसेंदिवस निष्कारण टोकदार होत चाललेल्या अस्मिता
लोकाभिमुख संस्थांचे 'जनहितार्थ' होणारे सरसकट सपाटीकरण
या सगळ्याचा अत्यंत धूर्तपणे वापर करून घेणारे नफ्फड राजकारणी
...आणि ज्या शहाण्यांनी या साऱ्याला वेसण घालावी त्यांचे जाणीवपूर्वक लाभार्थी मौन...

या विषारी व्यवस्थेचेही निर्विषीकरण झाले पाहिजे, करायला हवे !

अन्यथा...
षडरिपूग्रस्त माणसांची व्यवस्थेला फार अडचण होते म्हणून,
एआयने ह्यूमन डिटॉक्स करण्याची वेळ फार दूर नाही...

सजीव सृष्टीच्या इतिहासातले ते ठरेल
पहिले आणि एकमेव...
सेल्फ-एक्स्टिंक्शन...!

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

गंधार...!


एके दिवशी तानसेनाच्या कर्णमधुर संगीताने तृप्त होऊन अकबर शयनगृहाकडे निघाला असता काही विचाराने थांबून तानसेनाला म्हणाला, 'तुझे संगीत केवळ स्वर्गीय आहे. तुझ्या गायन-वादनाने साऱ्यांचे चित्त प्रफुल्लित होते, चराचर उत्फुल्लित होतात. तुझ्या दर्जाचा असा दुसरा कलाकार या धरतीवर असूच शकत नाही. तू अद्भुत, अलौकिक, एकमेवाद्वितीय आहेस यात शंकाच नाही. परंतु माझ्या मनात असे आले की ही कला तुलाही कुणी तरी शिकवली असणार ना? याची साधना करण्याची प्रेरणा देणारा कुणी असेलच ना? तू ही गुरु केला असशीलच ना?'

तानसेन उत्तरला, 'महाराज, अर्थात मला गुरु आहेत आणि त्यांची योग्यता एवढी थोर आहे की मी तर त्यांच्या पायाची धूळ देखील नाही. तुम्ही फक्त मलाच पाहिलं, ऐकलं आहे म्हणून तुम्हाला मी थोर वाटतो. उंट जोपर्यंत पर्वताजवळ जात नाही तोपर्यंत त्याला खऱ्या उंचीची जाणीव होत नाही...'

अकबर म्हणाला, 'असे असेल आणि तुझे गुरु जर हयात असतील तर आत्ता, या क्षणी त्यांना दरबारात हजर कर, त्यासाठी जे करावे लागेल ते कर, जे द्यावे लागेल ते द्यायची माझी तयारी आहे. पण मला आत्ता, या क्षणी त्यांना भेटलेच, ऐकलेच पाहिजे...!'

तानसेन  म्हणाला, 'महाराज तीच तर अडचण आहे! माझ्या गुरूंना कुणीही काहीही देऊ करू शकत नाही कारण त्यांना कसलीच अपेक्षा नाही आणि कुणीही त्यांना आपल्याला हवे तेव्हा हवे ते करण्याची आज्ञाही देऊ शकत नाही कारण त्यांना कसली भीतीही नाही. तुम्हाला त्यांना पहायचे, ऐकायचेच असेल तर ते जिथे असतील तेथे जाऊन आणि ते जेंव्हा गातील तोपर्यंत संयमाने वाट पाहूनच ऐकायला लागेल...'

हरिदास फकीर - तानसेनांचे गुरु, यमुना किनारी रात्री तीनच्या सुमारास गातात, नाचतात असे समजल्यावर अकबर तानसेनासह यमुना किनारी लपून बसला. एका संगीततज्ञाला ऐकण्यासाठी अकबराच्या दर्जाच्या सम्राटाने रात्री-अपरात्री लपून-छपून बसण्याचे जगाच्या ज्ञात इतिहासातील हे एकमेव उदाहरण असावे.

अकबर आणि तानसेन रात्रीच्या थंडीत एका झोपडीच्या आडोशाला लपून बसले. जवळपास पूर्ण रात्र सरत आल्यावर, पहाटेच्या सुमारास अकबराच्या कानावर अशी एक धून पडली की त्याच्या डोळ्यातून पाणी झरू लागले. हरिदास फकीर देहभान विसरून तन्मयतेने गाऊ लागले, नाचू लागले आणि अकबराच्या शरीरावर त्याने पूर्वी कधीही अनुभवले नव्हते असे रोमांच उभे राहिले. 

सकाळी मंत्रमुग्ध, भारावलेल्या अवस्थेत अकबर महालापाशी परत आला तेव्हा तानसेनाला म्हणाला, 'मी आजवर समजत होतो की तू जगातला सर्वश्रेष्ठ संगीततज्ञ आहेस, तो माझा भ्रम आज मोडला. तू म्हणालास तसे खरोखरच तुझ्या गुरूंच्या समोर तू काहीच नाहीस. पण मला एक सांग, तू तुझ्या गुरूंसारखे का गाऊ, वाजवू शकत नाहीस...?'

तानसेन म्हणला, 'अगदी सोपी गोष्ट आहे महाराज, मी काही मिळावे म्हणून गातो तर माझे गुरु त्यांना काही मिळालेय म्हणून गातात. मला जे साध्य करायचे आहे त्यात माझा जीव अडकतो म्हणून मी प्राणपणाने गाऊ शकत नाही. मी स्वत:ला झोकून देऊ शकत नाही. मला जे मिळवायचे आहे ते अन्य मार्गाने मिळाले तर मी संगीत सोडून तो मार्ग पत्करेल कारण संगीत माझ्यासाठी काही मिळविण्याचे केवळ एक साधन आहे. त्यात प्राण फुंकणे मला जमणारच नाही. कारण पुढे काही मिळवायचे आहे म्हणून माझी साधनेची धडपड आहे. पण माझ्या गुरूंना काही मिळाले आहे, साध्य झाले आहे म्हणून ते देहभान हरपून, तल्लीन होऊन गातात, नाचतात. त्यांची उन्मनी अवस्था पूर्णत्वातून, वर्तमान क्षणातून आली आहे, कुठल्याही भूत-भविष्यातून नाही. म्हणून त्यांची सर मला येणे कालत्रयी शक्य नाही...' 

'...पण त्यांच्या या अवस्थेचे कारण काय, कशामुळे ते असे भरून वाहू शकतात...?'

'नदी का वाहते आहे? फुलं का उमलताहेत? सूर्य-चंद्र का तळपत आहेत? जीवनप्रवाह का चालू आहे? कारण सारी सृष्टी आतून जगते, उमलते, फुलते. फुलं फुलतात कारण फुलण्यात आनंद आहे, सूर्य उगवतो कारण उदयात आनंद आहे, पक्षी कूजन करतात कारण गाण्यात आनंद आहे, हवा वाहते, वृक्ष डोलतात, नदी वाहते, झरे खळखळतात... सगळीकडे आनंदी, उत्सवी वातावरण आहे. केवळ माणूसच दगडासारखा निर्जीव झालाय. त्याला हे समजत नाही आपले अस्तित्व हाच आनंदाचा ठेवा आहे, हाच जीवनोत्सव आहे आणि हीच जगण्याची उर्मी आहे... आत्ता, इथे, या क्षणी...!'

-----------------------------------------------------------------------     

हरिदासाची ही कथा आज आठवण्याचे कारण ठरलेली आरती प्रभूंची ही कविता... 

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा...


पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा... 

शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा... 

देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा... 

पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा... 

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात,
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा...


यातील घरदार टाकुनी दूर गावा जाणे म्हणजेच... लौकिकाचे स्तोम सोडून प्राप्त क्षणात उन्मनी अवस्थेला पोहचणे. ते साधले तरच विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडण्याची शक्यता... असे कवीच्या मनात असावे, असे मनाला वाटते!  

म्हणजे नक्की कसे हे सांगायचे तर, परवा कुठल्या एका टिपणासाठी काही संदर्भ शोधण्याचे रिकामे उद्योग करत असतांना, 'मोह मोह के धागे...' हाती लागले आणि, विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडणे म्हणजे काय याची प्रचिती तर आलीच पण त्या आधीच्या ओळींमधल्या तारा विजेच्या असाव्या असा जोरका झटका जोरसेच बसला जेव्हा वरुण ग्रोव्हरच्या मर्मग्राही शब्दांना आणि मोनाली ठाकूरच्या काळजात रुतणाऱ्या आवाजाला स्वरसाज, 'आग लगा दूंगा, आग लगा दूंगा...' वाल्या ज्वलनशील अन्नू मलिकने चढवलाय, हे समजले! अशा सटीसामाशी दिलेल्या मास्टरपीसमुळे या माणसाचे हजार गुन्हे माफ करावेच लागतात... 

मी म्हणतोय म्हणून नव्हे, स्वतः ऐकून ठरवा... 
'तू होगा जरा पागल तुने मुझको है चुना...' 
'के तेरी झूटी बातें मै सारी मान लुं...'
असले काळजात घुसणारे शब्द आणि तो मध्येच सनईचा पीस...
अरे देवा! डोळे मिटून ऐकले की होणारच अवस्था...
उन्मनी !

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०२३

द्वंद्व...!


आशा निराशेचा
खेळ जीवघेणा
द्वंद्व आणि बाणा
अविनाशी...

उजळाव्या नित्य
उषा आणि निशा
नव्या दाही दिशा
माझ्यासाठी...!

रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३

विवेकदीप...!

Life is a balance between holding on and letting go...! 
                                                                                                    – Rumi


जलपर्णीने आच्छादलेले पाणी अतिशय नेत्रसुखद वाटते. 

पाण्यावर हिरवागार गालिचा घालावा असे दृष्य मनाला गारवा देते. 
'किती ही निसर्गाची अद्भुत किमया...' असे ही मनास वाटू शकते. 
तथापि जलपर्णी कधीही शुद्ध, नितळ, वाहत्या पाण्यावर पोसली जात नाही. 
ती पोसली जाते पाण्यातील प्रदूषित घटकांवर.
त्यामुळे जलपर्णीचे अस्तित्व हे प्रदूषित पाण्याचे निदर्शक ठरते.
अर्थात जलपर्णी निळकंठासारखे पाण्यातील हलाहल पचवून घेते हेही खरे.
जलपर्णी दूषित पाण्याचे नैसर्गिक पद्धतीने शुद्धीकरण करते यातही तथ्यांश आहेच. 
परंतु जलपर्णीच्या अस्तित्वाने पाण्याचे मूळ प्रवाही, निवळशंख स्वरूप नष्ट होते. 
सूर्यकिरणे पाण्याच्या तळापर्यंत पोहचू शकत नाहीत. 
तेव्हा, 'जलपर्णी मारक की तारक' हा वाद आपण जलतज्ञ आणि पर्यावरणवाद्यांवर सोडून देऊ. 

पण अनिर्बंध 'विकासा'ने येणारी 'समृद्धी' ही या जलपर्णीसारखीच असल्याने तिचा विचार करायलाच हवा. पाणी प्रवाही, निर्मळ, नितळ आणि प्रदूषणमुक्त ठेवल्यास जलपर्णीला खाद्यच मिळणार नाही. कुठलाही सजीव खाद्याशिवाय जगणे, वाढणे शक्यच नसल्याने, शुद्ध पाण्यात जलपर्णी फोफावण्याची शक्यताच नाही... न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी !

विवेकशून्य विकास आणि अनैतिक समृद्धी यांचा लोभ आणि बडेजाव टाळता आला तर अशी दिखाऊ जलपर्णी उगवणारच नाही आणि मानवी संस्कृतीचा नितळ प्रवाह अखंड वाहता राहील.

म्हणूनच 'भावार्थदीपिके'च्या पंधराव्या अध्यायात माऊली म्हणतात...

सुर्ये आधिष्ठीली प्राची 
जगा जाणिव दे प्रकाशाची 
तैसी श्रोतया ज्ञानाची 
दिवाळी करी

मी अविवेकाची काजळी ।
फेडूनि विवेकदीप उजळी
ते योगिया पाहे दिवाळी
निरंतर

संपन्नता, समृद्धी, विकास आणि भरभराटीच्या दिवाळीत सद्विवेकाचा दीप उजळू दे 
हीच या तेजोत्सवी प्रार्थना आणि हाच या प्रकाशपर्वचा संदेश...! 

असतो मा सद्गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मा अमृतं गमय ।

शुभम भवतु !