रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४
मुक्त...!
शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४
वादियां और वादे...!
‘हर घडी बदल रही है रूप ज़िंदगी…’ अशा भयाकारी वेगाने बदलणाऱ्या जगात नव्याचे जुने व्हायला हल्ली फार काळ लागत नाही. कळीचे फूल होऊन देवाच्या चरणस्पर्शाने त्याचे निर्माल्य व्हायला जेवढा काळ लागतो त्याहूनही कमी वेळात ‘नव्या’ गोष्टी ‘जुन्या’ होत चालल्यात, फक्त ‘देव’ (आणि 'भाव') तेवढे बदलले आहेत.
बरं, यात फक्त अन्नपदार्थ, कपडेलत्ते, खेळ-मनोरंजन, संस्कृती-उपक्रम, साधन-उपकरणेच नाही तर गाडी-घोडे, स्थावर-जंगम, सोयी-सुविधा यांच्यासह आवडी-निवडी, आचार-विचार, सखे-सोबती, सगे-सोयरे आणि मूल्य-तत्वे सारेच बुलेट ट्रेनच्या वेगाने आऊट डेटेड होतांना दिसते.
पूर्वी 'टूथ' हा फक्त विस्डम संदर्भातच असे त्यामुळे त्याच्याशी निगडित विस्डमही शाबूत होते. आता त्याची जागा 'ब्ल्यू' टूथ ने घेतल्याने त्याच्या उठवळ धरसोडपणाचे वैशिष्ट्यपूर्ण आणि बहुपयोगी लक्षण त्याच्या वापरकर्त्यात आढळले तर, ‘वाण नाही पण गुण लागला’ म्हणायचं. शिवाय सारे काही (प्र)दर्शनीय झाल्याने स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात ‘दिसेल ते’ कैद करण्याची चढाओढ पाहता, क्षणांचे अनुभव संवेदनेत रुजून त्यांच्या जोपासनेने जाणिवा समृद्ध होण्यासाठी आवश्यक तो संयम, ती स्थिरता, तो ठहराव, ते भान अभावानेच दिसते.
या भयावह वेगामुळे जे अपघात संभवतात त्यांचे दूरगामी परिणाम अधिक धोकादायक आहेत. 'पागल, ये मत सोच की जिंदगीमें कितने पल है, ये देख हर पलमें कितनी जिंदगी है...!' ही मुन्नाभाई फिलॉसॉफी सांगणारी उत्तान नाच करणारी नर्तकी असली तरी त्यामुळे त्यातले तत्व मुळीच हीन ठरत नाही, किंबहुना हे समजावून सांगायला तिच्याइतकी अधिकारी व्यक्ती दुसरी नाही असाही एक दृष्टिकोन असू शकतो. पण त्या एका क्षणात असलेली जिंदगी बघायची, आस्वादायची वृत्ती मात्र ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, कुठेच एक्सप्रेस डिलिव्हरीसाठी ऑर्डर करता येत नाही; ती जोजवावी, जोपासावीच लागते.
सौंदर्याचे, भव्यतेचे, उदात्ततेचे आस्वादन करण्यासाठी लागणारी रसिकता जगण्याच्या गरजांमध्ये कशी घुसमटते याचे क्लासिक उदाहरण असलेली रॉबर्ट फ्रॉस्ट यांची, आख्यायिका बनून उरलेली कविता 'स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग' १०२ वर्षांची झाली तरी आजही तेवढीच, किंबहुना अधिकच समर्पक आहे. आज जगण्याच्या धबडग्यातून वेळ काढून तिचे रसास्वादन करावे आणि जमेल तसा मुक्त भावानुवाद करावा म्हणून हा खटाटोप. आता हे प्रकटन राष्ट्रभाषेत का मातृभाषेत का नाही या मागे काही मोठी वैचारिक/तात्विक/'राज'कीय भूमिका वैगरे नाही तर या कवितेचा एकूण बाज पहाता तिला मातृभाषेत आणायला अधिक प्रतिभा, योग्यता आणि अभ्यास पाहिजे असे जाणवल्याने ही सोईस्कर पळवाट का म्हणानात! इतर कवी मित्रांनी या कामी मदत केली तर तेही लवकरच साधेल... हा दुर्दम्य आशावाद!
या कवितेची जन्मकथा थोडी रंजक असल्याने इथे सांगणे उचित ठरावे. रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी जून १९२२ मध्ये, 'न्यू हॅम्पशायर' या कवितासंग्रहासाठी, त्याच नावाची दीर्घ कविता रात्रभर जागून लिहून काढली. कविता संपत आली तेंव्हा उजाडू लागले होते आणि त्या पहाटवाऱ्यात सूर्योदयाचा आनंद घ्यायला घराबाहेर उभे असतांना पूर्णपणे मुक्त, ताणविरहित (तुरिया?) अवस्थेत रॉबर्टना ही कविता सुचली आणि जणू काही झपाटल्यासारखी त्यांनी ती एकहाती लिहून काढली. म्हणजे विल्यम वर्ड्स्वर्थ यांच्या कवितेच्या व्याख्येत चपखल बसणाऱ्या आणि कवीची उदात्त निर्मितीनंतरची उत्कट भावावस्था तंतोतंत मांडणाऱ्या या कवितेने इतिहास रचणे विधिलिखितच होते...!
रॉबर्ट फ्रॉस्ट हे अमेरिकेचे एक अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्याबरोबरच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूं यांचे अत्यंत आवडते कवी होते. पंडित नेहरूंच्या शेवटच्या काळात त्यांच्या पलंगाच्या बाजूच्या मेजावर रॉबर्ट फ्रॉस्ट यांचे एक पुस्तक पडलेले असे आणि त्यातील या कवितेचे पान उघडे असे ज्यातील शेवटच्या चार ओळी त्यांनी अधोरेखित केलेल्या होत्या...
शनिवार, २७ जानेवारी, २०२४
परिच्छेद...!
रविवार, २१ जानेवारी, २०२४
रामराया...!
तेथें मी निवांत बैसेईन बैसेईन सुखरुप क्षणैक।
पाहिन विवेक राघवाचा स्वरुप राघवाचे अत्यंत कोमळ।
जेथें नाही मळ, माईकांचा माईकांचा मळ जाय तत्क्षणीं ।
रामदरुशणीं रामदास।"
शनिवार, ६ जानेवारी, २०२४
रहस्य...!
शहाणा म्हणजे ज्ञानी आणि ज्ञानी म्हणजे कुणी साधू-तपस्वी अशी अटकळ बांधून मुलगा त्याच्या शोधात निघाला.
वाळवंटातल्या ४० दिवसांच्या प्रवासानंतर मुलगा पोहोचला ती कुण्या साधूची कुटी नव्हती तर धनिकाचा प्रशस्त महाल होता. तिथे ध्यान-धारणा, मंत्र-जाप, पूजा-साधना असले काहीही चाललेले नव्हते तर खूप वर्दळ होती. लोक येत जात होते. सौदे ठरत होते, व्यवहार पार पडत होते. जगातल्या सर्वोत्तम खानपानाची रेलचेल होती. वातावरणात संगीत होते, सुगंध होता, उल्हास होता. शहाणा (आणि श्रीमंत) माणूस साऱ्यांशी आपुलकीने बोलत होता, हवे-नको बघत होता.
मुलाकडे लक्ष जाण्यास त्याला जवळपास दोन तास लागले. मुलाचा येण्याचा उद्देश त्याने समजून घेतला पण त्याला जे हवे होते ते, 'सुखाचे रहस्य' समजावून सांगण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता म्हणून त्याने मुलाला त्याचे घर पाहून दोन तासाने परत भेटू असे सुचवले. मुलाला फक्त एकच गोष्ट करायची होती, यजमानाने दिलेला चमचा आणि त्यातले तेलाचे दोन थेंब पूर्ण वेळ सांभाळत घर पहायचे होते.
मुलाने महालाचे संगमरवरी खांबांनी सजलेले रुंद वऱ्हांडे, मखमली पायघड्या घातलेले उंच जिने, फुलांच्या ताटव्यांनी सजलेले गवाक्ष, भरजरी रेशमी पडद्यांनी नटलेले नक्षिकाम केलेले भव्य दरवाजे खिडक्या या साऱ्यांच्या साक्षीने घराचा दौरा पूर्ण केला - सारे लक्ष हातातील चमच्यावर लक्ष केंद्रित करून दोन तासांनी शहाण्या माणसाकडे परतला!
शहाणा माणूस म्हणाला, 'मग, कसे वाटले माझ्या शयनगृहातील गालिचे, मुदपाकखान्यातील लाकडी कारागिरी, वाचनालयातील पुस्तके आणि कल्पकतेने सजवलेल्या भिंती, माळीबुवांनी १० वर्षांच्या अथक मेहनतीने फुलवलेला आणि निगुतीने राखलेला बगीचा आणि त्यातील थुई थुई नाचणारे कारंजे...?'
मुलगा फारच शरमला आणि वरमून म्हणाला, 'माझे सारे लक्ष चमच्यातील तेलाकडे असल्याने मी यातील काहीही बघू शकलो नाही, त्याचा सुखद अनुभव घेऊ शकलो नाही, मला माफ करा...!'
'मग पुन्हा एकदा जा आणि मी जगभरातून जमविलेल्या साऱ्या किमती, कलात्मक आणि सुंदर गोष्टींचा आनंद घेऊन पुन्हा मला भेट. ज्या माणसावर विश्वास ठेवायचा त्याचे घर नीट निरखून बघायलाच हवे, नाही का...?'
मुलाने समाधानाने पुन्हा चमचा उचलला आणि या वेळी साऱ्या गोष्टी नीट बघून, त्यांच्या सौंदर्याचे आस्वादन करीत घराचा फेरा पूर्ण केला आणि अतिशय सुखावत सुस्मित चेहऱ्याने शहाण्या माणसास सामोरा गेला.
'... पण चमच्यातले तेल कुठेयं...?' शहाण्या माणसाने मुलाच्या हाताकडे बघत विचारले. मुलाचे तिकडे लक्ष जाताच त्याचा आनंदाने फुललेला चेहरा क्षणार्धात खर्र्कन उतरला...
'असं बघ मुला, मी तुला एवढाच सल्ला देऊ शकतो..', शहाणा माणूस अत्यंय शहाणिवेने म्हणाला, 'तू शोधतोयस त्या सुखाचे रहस्य एवढेच आहे की जगातील साऱ्या चांगल्या, हव्याशा गोष्टींचा मनसोक्त उपभोग घ्या, रसास्वादन करा पण ते करताना हातातल्या चमच्यातील तेलाचे दोन थेंब कधीही विसरू नका, नजरेआड होऊ देऊ नका...!'
रविवार, २४ डिसेंबर, २०२३
पुस्तकं...!
मोबाईल किंवा लॅपटॉपवर झरझर चालणाऱ्या माझ्या बोटांकडे
आशेने बघत राहतात पुस्तके काचेच्या बंद दाराआडून...
'किती दिवस झाले त्या बोटांचा ओलसर स्पर्श अनुभवून...'
या परित्यक्त भावनेतून केविलवाणी झालेली पुस्तके
आताशा झोपेत चालू लागली आहेत म्हणे...
पुस्तकांनी जी जीवनमूल्ये शिकवली
ज्या धारणा विकसित केल्या
ज्या जाणिवा समृद्ध केल्या
त्या आताशा बेघर झाल्यात.
जी नाती, जे ऋणानुबंध त्यांनी ऐकवले
ते सारे सारे आता विरलेत, उसवलेत वाटते...
पान उलटावं तर एक खोल उसासा स्पष्ट ऐकू येतो,
आणि बऱ्याच शब्दांचे तर अर्थच गळून पडलेत.
ज्यावर आता अर्थ उगवत नाहीत असे
निष्पर्ण पिवळ्या खोडासारखी भासते ती शब्दावली...
पेल्यांनी ज्यांना कालबाह्य अडगळ करून टाकले
अशी मातीच्या गडूसारखी इतस्ततः विखुरलेली
बरीचशी बोधवचने, सुविचार, सुभाषिते पण आहेत त्यात !
पान उलटवतांना जीभेला कागदाचा जो स्वाद यायचा,
आता प्लास्टिकच्या निर्जीव स्पर्शाने फक्त क्लिक होते
आणि एका पाठोपाठ एक तर
कधी एकमेकावर स्वार होणारी
असंख्य खिडक्यांची झडी लागते...
कधी छातीवर ठेऊन झोपी जात असू...
कधी मांडीवर घेऊन जोजवत असू...
कधी गुडघ्यांचे डेस्क करून वाचतांना
नतमस्तक होऊन त्यावरच माथा टेकत असू ...
पुस्तकांशी जे घट्ट गूळपीठ होतं त्याची चव गेली !
पुस्तकांतून मिळणारी माहिती, ज्ञान एरवीही मिळत राहील...
कदाचित आणखीन सोप्या प्रकारे,
जास्त भरभर, पण...
पुस्तकातून अवचित गवसणारी ती वाळलेली फुले
त्या सुगंधीत चिठ्ठया
ते मधुर चिठोरे...
पुस्तकं मागण्याच्या, पडण्याच्या, उचलण्याच्या मिषाने
बांधले, गुंफले, फुलले जाणारे अनुबंध
त्यांचं आता काय होणार यापुढे...?
तसं काही घडणार नाही...
रविवार, १७ डिसेंबर, २०२३
डिटॉक्स...!
माणसाला बऱ्याच काळात स्वयंप्रज्ञेने सुचलेली,
डिजिटल डिटॉक्सची आयडिया चांगलीच आहे...
उपभोगधर्मी संवेदनाशून्य बाजारमूल्ये
द्वेषमूलक आणि अंधश्रद्ध धार्मिक कट्टरता
पुढे जाण्याच्या शर्यतीने गाठलेला अनावर वेग
दिवसेंदिवस निष्कारण टोकदार होत चाललेल्या अस्मिता
लोकाभिमुख संस्थांचे 'जनहितार्थ' होणारे सरसकट सपाटीकरण
या सगळ्याचा अत्यंत धूर्तपणे वापर करून घेणारे नफ्फड राजकारणी
...आणि ज्या शहाण्यांनी या साऱ्याला वेसण घालावी त्यांचे जाणीवपूर्वक लाभार्थी मौन...
षडरिपूग्रस्त माणसांची व्यवस्थेला फार अडचण होते म्हणून,
पहिले आणि एकमेव...
सेल्फ-एक्स्टिंक्शन...!
रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३
गंधार...!
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा...
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा...
शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा...
देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा...
पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा...
तारांवरी पडावा केव्हा चुकून हात,
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा...
बुधवार, १५ नोव्हेंबर, २०२३
द्वंद्व...!
रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३
विवेकदीप...!
जलपर्णीने आच्छादलेले पाणी अतिशय नेत्रसुखद वाटते.










