रविवार, २६ जुलै, २०२०

उपसंहार...!



गेल्या चार महिन्यापासून कोरोना विषाणूच्या सावटाखाली, एकामागे एक ५ लॉकडाऊन भोगलेल्या पुणेकरांना उद्यापासून थोडा दिलासा मिळणार असला तरी, कोरोनाचे काय करायचे?’ या त्रिलोक व्यापून दशांगुळे शेष तात्कालिक प्रश्नासह, त्याच्याच अनुषंगाने काही मुलभूत प्रश्नांचा आढावा घेणे गरजेचे ठरते. या विषाणूशी लढण्यासाठी अनेक शासकीय व्यवस्था, स्वयंसेवी संस्था आणि अनेकानेक अनामिक करोना योद्धे अहोरात्र प्राणाची बाजी लावून लढत असले तरी, या विषाणूच्या अनिर्बंध फैलावाने अनेक घटनात्मक व्यवस्थांच्या आणि लोकाभिमुख संस्थापानांच्या मर्यादा उघड झाल्या’, हे सत्यही नाकारता येत नाही.

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदाबरहुकुम स्वत:ला ‘अहर्निशं सेवामहे’ उपलब्ध करून देणारे पोलीस दल आणि स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अखंडित आरोग्यसेवा देणारे वैद्यक, परिचारिका व त्यांचे सहाय्यक यांच्या निरपेक्ष कार्याला सलाम करून, त्यांना या परिस्थितीत ढकलणाऱ्या व्यवस्थेचे आणि त्यामागील कार्यकारण भावाचे विश्लेषण करणे आवश्यक वाटते. या विषयाच्या खोलात जातांना जागतिक अर्थकारण, भौगोलिक राजकारण, नवमूल्यव्यवस्थाधीन बाजारपेठ आणखीन भ्रामक विकासाचे घातसूत्र असे अनेक आयाम असले तरी त्या साऱ्याचा प्रस्तुत प्रकटनात अंतर्भाव न करता, व्यक्ती – समष्टी – सृष्टी यांचा मनुष्यधर्माच्या परिप्रेक्ष्यातून उहापोह करू या.

स्वत:च्या उत्कर्षासाठी, सोयीसाठी आणि सुरक्षित, आरामदायी जगण्यासाठीची धडपड अनुचित नसली तरी अशी अभिलाषा ही व्यक्तीनिष्ठ आणि परिणामी संकुचित असते. अशा स्वार्थी धडपडीने इतर कुणाचे दमन किंवा प्रसंगी नुकसानही होऊ शकते आणि या ‘इतर’मध्ये समस्त सृष्टीमधील कुणीही, अगदी ‘पर्यावरण’ही असू शकते. स्वत:च्या विलासी वास्तव्यासाठी कुणा धनिकाने बहुमजली प्रासाद बांधणे आणि समाजधनातून, सामुहिक श्रमदानातून गाडगेबाबांनी गावोगावी धर्मशाळा बांधणे यांचा तौलनिक अभ्यास केला तर हा मुद्दा सूर्यप्रकाशाइतका लख्ख समजू शकतो. अलीकडच्या कळीच्या शब्दांच्या अर्थात ‘कीवर्ड्स’च्या काळात ज्याला ‘कॉमन गुड’ म्हणतात त्याला आपल्या संस्कृतीमधील ‘वैश्विक कल्याण’ आणि त्यासाठी योग्य जीवनमूल्यांची जोपासना ही शिकवण चिरंतन आहे.

व्यक्तीनिर्माणाआधी (किंवा शिवाय) समाजधारणा अथवा राष्ट्रनिर्माण म्हणजे हलक्या प्रतीच्या तांदळाची बिरबलाची खिचडी शिजत का नाही म्हणून चिंतीत होण्यासारखे आहे. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार या न्यायाने, व्यक्तीतच न रुजलेली जीवनमूल्ये समाजात कुठून येणार आणि असा मूल्यहीन (पण मौल्यवान?) समाज मनुष्यधर्माची जोपासना करून वैश्विक कल्याण साधण्यासाठी सृष्टीशी त्याची जन्मजात बांधिलकी कशी जपणार हा मूळ प्रश्न आहे. ‘समूहप्रिय’ असलेल्या माणसाने आपल्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी ‘समाज’ नावाची व्यवस्था तयार केली आणि तिच्या धारणेसाठी काही नियम, कायदेकानून तयार केले असे मानले तर समस्त मनुष्यप्राण्यांचे काही समान हक्क मान्य करायला हवे. सामाजिक सुरक्षिततेच्या निकषांमध्ये केवळ दोनच मुलभूत गोष्टींचा समावेश करायचा ठरवला तरी, निरामय स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी निदान प्राथमिक आरोग्यसेवा आणि, सर्वांना समान संधी मिळावी म्हणून किमान शिक्षणसुविधा यांना अग्रक्रम मिळायलाच हवा.

प्राप्त परिस्थितीत नेमक्या याच दोन आघाड्यांवर आपण केवळ चीतपट झालेलोच नाही तर अगदीच भांबावलेलो आहोत हे त्या विषयीच्या रोजच्या बदलत्या निर्णयांमागील धरसोड वृत्तीने स्पष्ट दिसून येते. असे होण्याचे कारण हे दोन फसलेल्या नीतींचे फलित असावे काय? संकुचित लघुदृष्टी तात्कालिक योजनांमध्ये सर्वसमावेशक सर्वकालिक दूरदृष्टीच्या अभावामुळे भविष्यवेधी नियोजनातील निर्णायक त्रुटी आणि ‘शिक्षण’ या संकल्पनेच्या मुळातच अत्यंत चुकीच्या धारणेमुळे सपशेल फसलेले शिक्षणविषयक धोरण आणि त्याची तेवढीच निर्बुद्ध विध्वंसक कार्यवाही!

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणि स्मार्ट उपकरणांच्या काळात माणसे देखील स्मार्ट व्हायला हवी असतील तर शिक्षणाचा मूळ उद्देश हा स्मार्ट होणे एवढाच असायला हवा आणि स्मार्ट असण्याचे केवळ तीन निकष पुरेसे ठरावे –

१. प्रश्न पाडणारी जिज्ञासा आणि पडलेले प्रश्न विचारण्याचे, त्यांची समर्पक उत्तरे शोधण्याचे स्वातंत्र्य,
२. सुचलेल्या उत्तरांवर, कल्पनांवर कृती करण्याची धडाडी आणि अशा कृती आराखड्यांना पोषक वातावरण,
३. आपल्या कृतीच्या समग्र परिणामांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची सामाजिक बांधिलकी.

अशा प्रकारच्या तत्वनिष्ठ शिक्षणप्रणालीतून तयार झालेले युवक कुठल्याही क्षेत्रात गेले तरी स्वार्थापूर्वी (किंवा किमान स्वार्थाबरोबर तरी) समाजस्वास्थ्याचा म्हणजेच ‘यष्टी’ बरोबर ‘समष्टी’चाही विचार करतील आणि सृष्टीचे संवर्धन ओघानेच होईल. अशा तरुणांचे नियोजन हे अगदी परिपूर्ण (परफेक्ट) नसले तरी सर्वसमावेशक आणि भविष्यवेधी नक्कीच असेल. मग भले यासाठी आपल्याला एका संपूर्ण पिढीच्या परिवर्तनाची प्रतीक्षा करावी लागली तरी हरकत नाही!

आणि हो जाता जाता... कोरोनावर औषध सापडेपर्यंत, उपलब्ध साऱ्या संभाव्य उपायांचा भडिमार करण्यापेक्षा, केवळ एकच गोष्ट आपल्या हातात आहे – आपली प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) वाढवणे आणि हे करण्यासाठी ज्यांनी शरीर-बुद्धी-चित्त यांना सुदृढ राखण्यासाठी कायम किमान योगसाधना केली आहे, करीत आहेत त्यांना निश्चितच धोका कमी, खरतर नगण्य आहे. तद्वतच शिक्षण, प्रशिक्षण, शिबिरे, कार्यशाळा या ‘केजी ते पिजी’च्या माध्यमातून आपण मुलांवर, युवकांवर अक्षरश: हजारो प्रकारच्या ‘ज्याला स्कोप आहे’ अशा विषय-कौशल्यांचा भडीमार करत असतो. त्या सगळ्या ऐवजी एकच अत्यंत मुलभूत कौशल्य मुलांनी वृत्तीत बाणवले तर त्यांना आयुष्यात कधीच कशाचीही उणीव भासणार नाही... ते कौशल्य म्हणजे शिकायला शिकणे (लर्निंग टू लर्न!) आजच्या तथाकथित ‘शिक्षणा’चा सारा भर हा लर्निंग (शिकणे) सोडून ‘अर्निंग’ (कमावण्यावर) आहे आणि तो मुख्यत्वे बदलेली जीवनमूल्ये, अनाठायी आदर्श आणि अत्यंत आत्मकेंद्री विचार याचा परिपाक आहे.

‘मी म्हणजे व्यक्ती हा समष्टीचा अर्थात (मानव) समूहाचा भाग आहे आणि समष्टीचा सृष्टीशी अन्योन्य संबंध असल्याने माझ्या प्रत्येक विचार-विकार आणि कृती-रीतीचा एक तदनुषंगिक सर्वव्यापी परिणाम होत असतो आणि तो ‘पूर्णात्पूर्णमुदच्यते’ न्यायाने माझ्यापासून सुरु होऊन माझ्यातच विलय पावतो आणि तरीही शिल्लक राहतो...’ ही शिकवण मानवधर्माचे मूलतत्व आहे, ते समजून घेऊन धारण करणे यात विश्वकल्याण आहे हेच अंतीम सत्य!

शुभम भवतु!

बुधवार, १ जुलै, २०२०

टाहो...!


ना नाचल्या
दिंडी पताका 
टाळ-मृदूंगाचा
स्वरही मुका,
रिंगण न धरी
फेरा म्हणून
ज्ञाना विव्हल,
उदास तुका...!

विठ्ठल नामाचा रे टाहो...!

शनिवार, २७ जून, २०२०

गर्भ...!



थेंब साचला टपोरा,
पहिल्याच पावसात
नाही पाहिले तुला
किती एक दिवसात!

मन ओढाळ झाले,
पावसाच्या सरीगत
कसे जपावे हे जीणे
रोज वाढत्या दरीगत!

मेघ काळा-सावळा
नभी ओथंबून राहे
घननिळा कान्हा मग
मनी साचूनही वाहे!

पाऊस नितळ निर्मळ
नदी-झऱ्या जोडी पंख
डोळ्यातले पाणी खारे
त्याचे पाणी निवळशंख!

मोर फुलवी पिसारा,
भूमी उघडोनी चोच
वाट पाहे त्या थेंबाची
देण्या सृजनाची पोच!

बीज रुजावे जीवाचे
सडा मायेचा पडावा
मातीला गर्भ राहता
नवा माणूस घडावा!

पुन्हा एकदा सन्मित्र दिनेशच्या आग्रहाखातर
त्याच्या वाढदिवसाची सप्रेम भेट म्हणून सस्नेह...!

शनिवार, ६ जून, २०२०

बक्षीस...!


अधाशीपणाने खातांना लांडग्याच्या घशात हाड अडकलं.
जीव गुदमरू लागला म्हणून तो करकोचाकडे गेला.
म्हणाला, ‘तू तुझ्या लांब, टोकदार चोचीने माझ्या घशात अडकलेलं हाड काढून दिलंस तर मी तुला मोठ्ठं बक्षीस देईन!’
करकोच्याने मोठ्ठ्या बक्षिसाच्या मोहाने लांडग्याचा जीव वाचवायला त्याची मदत करायचं ठरवलं.
करकोच्याने अतिशय शिताफीने आपली चोच लांडग्याच्या घशात टाकून अडकलेलं हाड बाहेर काढलं.
घसा मोकळा झाल्यावर लांडग्याला हायसं वाटलं आणि त्याने मोकळा श्वास घेतला.
‘माझं बक्षीस?’ करकोचा म्हणाला. 
‘अरे, तुझी मान माझ्या जबड्यात असतांना मी तिचा लचका तोडला नाही याहून मोठं काय बक्षीस हवं तुला?’

शुक्रवार, ५ जून, २०२०

योग...?

आज जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा असा योग (?) जुळून आला आहे. भौगोलिकदृष्ट्या विभागलेल्या देशांच्या सीमा रक्षणासाठी सैनिक तैनात आहेत आणि मानसिक दृष्ट्या दुभंगलेल्या (भारतीय) पुरुषांच्या आयुरारोग्याच्या रक्षणासाठी घरोघरी सावित्री कटिबद्ध आहेत. परंतु सैनिक उभी असलेली जमीन आणि पुरुष 'कर्ता' असलेली घरं आतून दुभंगली आहेत; झाडाच्या मुळांनी जमीन आणि सावित्रीच्या संस्कारांनी घरं अबाधित ठेवली आहेत! तेव्हा वटपौर्णिमा आणखीन पर्यावरण दिन दोन्ही साजरी करण्याची गरज उरणार नाही तो सुदिन लवकर येवो या 'सदिच्छे'सह आजच्या मुहूर्तावर हे मुक्त चिंतन...          


जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून
वडाला सुताचे बंडल गुंडाळणाऱ्या
रुढीग्रस्त सावित्रीच्या मनात आले...
'पुढल्या जन्मी भूमिका बदलल्या तर
गाठणार नाही मी सुताने स्वर्ग,
लादणार नाही तिच्यावर पातिव्रत्य
आणि सुटका करेन तिची
आणि रितीबद्ध वडाचीही...
एकाएकी!'



रविवार, ३१ मे, २०२०

भान...!


पृथ्वीतलावरील समस्त मनुष्य जातीस वेठीस धरणाऱ्या 'करोनोविषाणूमुळे स्वत:च्याच घरात कैद करणाऱ्या 'लॉकडाऊन'चे पाचवे आवर्तन उद्यापासून सुरु होईल. या पाचव्या आवृत्तीमुळेकरोना आता आपल्या पाचवीलाच पुजलाय अशा धारणेने लोक 'सरपे कफन'च्या चालीवर, 'मुहंपे मास्कबांधून त्याच्याशी लढायला तयार झालेत. 'करोनानामशेष होणे नजीकच्या भविष्यात तरी शक्य नाही असे जैव वैज्ञानिक सांगत आहेत. तेव्हा, 'त्याला घाबरून किती काळ लपून बसणारत्यापेक्षा शक्य ती खबरदारी घेऊन जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणणे उचित!यावर सर्वच धुरिणांचे एकमत झालेले दिसते. तेव्हा तूर्तास तरी आपण या वळणावर न विसावता पुढील मार्गक्रमण टप्प्याटप्प्याने का होईना चालू करणार आहोत असे (शुभ?) संकेत मिळत आहेत.


लॉकडाऊनच्या या संपूर्ण काळात सगळ्यांना निवांत वेळ असेल आणि अंतर्मुख होण्यासारखी परिस्थिती आणि तेवढी सवड देखील असेल असे गृहीत धरून मंगळवार, दि. २४ मार्चला लिहिलेल्या ‘इष्टापत्ती’ने सुरवात करून मी त्यानंतरच्या प्रत्येक शनिवार-रविवारी ‘इनफीजम’चा प्रचार आणि प्रसार करणारे लेखन करण्याचा प्रयत्न केला जेणे करून, ‘याजसाठीं केला होता अट्टहास । शेवटचा दिस गोड व्हावा...!’ ही तुकोबांची वाणी सार्थ ठरावी. आज मी या विषयाचा समारोप करण्यासाठी एक कविता सादर करतोय जिची प्रेरणा पुन्हा एकदा मला सन्मित्र दिनेशकडून मिळाली. यापुढेही माझ्या लिखाणाचा आशय-विषय आणि बाणा-बाज बदलणार नसला तरी यापुढे त्यावर करोनाचे आणि लॉकडाऊनचे सावट नसेल ही अपेक्षा!


स्वामी तिन्ही जगांचा
स्वत:स समजे जणू
नामोहरम करण्या
पुरला एक विषाणू...

निसर्गाचे चक्र अव्याहत
मोहर पहिल्या सारखा
आपल्याच कर्माने मात्र
माणूस माणसा पारखा...

हेही दिवस जातील
तशी संपेल भ्रांत ही
धडा मात्र विसरू नये
अन कर्म-सिद्धांतही...

सांभाळावी सुबुद्धी
अन संवेदनाही
अन्यथा फिरुनी
भेटेल वेदना ही...

कष्टकरीही भागीदार
विसर तयांचा न पडो
पुन्हा एकल्या वाटेवर
प्रवास त्यांचा न घडो...

मृत्युसमोर सारे एक
सद्गुणी आणि भ्रष्ट
समतेची गुढी उभारू
विषमता करण्या नष्ट...

विवेक बसू दे रक्षिण्या
विकार सारे भंगू दे,
प्रज्ञेचा जागर होता
सौहार्द्र हृदयी रंगू दे...!

जळूनी दंभ सारा
माणसास भान यावे
नवेन्मेशातून त्याने
निसर्गाचे गान गावे...!

शनिवार, ३० मे, २०२०

व्यत्यास...!


संध्याकाळच्या वेळी गावात पोहचलेल्या प्रवाशाने रात्री त्या गावातच मुक्काम करायचे ठरवले. आसपास वास्तव्यास चांगली जागा मिळते का याचा शोध घेत तो एका विश्रामगृहापाशी आला. मालकाशी चौकशी करून त्याने निर्णय घेण्यापूर्वी खोली बघण्याची इच्छा दाखवली आणि अनामत म्हणून काउंटरवर २००० रुपयांची नोट ठेवली.

पाहुणा खोली बघायला वर गेल्याबरोबर मालकाने ती नोट उचलली आणि बाजूच्या किराणा दुकानात जावून आपली २००० रुपयांची उधारी भागवली. किराणा दुकानदार ती नोट घेऊन तात्काळ घाऊक विक्रेत्याकडे गेला आणि त्याने आपली उधारी भागवली. घाऊक मालाच्या व्यापाऱ्याने ताबडतोब आपल्या मुलाला ते पैसे कर्जाच्या हप्त्यापोटी पतपेढीत भरायला पाठवले. पण २००० रुपये हातात पडल्याबरोबर मुलाला आपली विश्रामगृहाची उधारी आठवली आणि तो धावतच त्याच विश्रामगृहाच्या मालकापाशी पोहचला आणि तीच २००० रुपयाची नोट पुन्हा त्याच काउंटरवर पुन्हा एकदा विसावली.

प्रवासी मालकापाशी परतला आणि विश्रामगृहातील कुठलीही खोली आपल्या मनास आली नाही असे सांगून, एव्हाना अर्ध्या गावाचा प्रवास करून आलेली आपली २००० रुपयाची नोट उचलून चालता झाला.

तात्पर्य: कुणालाही प्रत्यक्षात काहीही लाभ झाला नाही पण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आणि उधार की जिंदगी चालू राहिली.

---------------------------------------------------------------------

काही खुलासे:

१. प्रस्तुत लेखकाने १६ मे २०२० रोजी लिहिलेल्या 'वर्तुळ' या लेखामध्ये  ज्या वर्तुळाकार अर्थव्यवस्थेचा (Circular Economy) उल्लेख केला होता त्याचे हे उदाहरण नव्हे! त्या लेखामधील बुद्धाच्या कथेचा या गोष्टीशी सुतराम संबध नाही आणि लावायचा झालाच तर तो आहे - व्यत्यास!

२. सुमारे १० वर्षांपूर्वी इन्टरनेटवर खूपच लोकप्रिय झालेल्या '१०० डॉलर बिल' या गंमतकोड्याचा हा मुक्ताविष्कार आहे. सदर कोडे आणि त्यातील कूटप्रश्न हे दोन्ही 'अर्थ'हीन तथा 'अनर्थ'कारी असल्याचा निर्वाळा अर्थतज्ञ देतात.

३. याच्या मूळ लेखकाच्या हेतूची कल्पना नाही पण प्रस्तुत लेखकाचा उद्देश हा केवळ मनोरंजन एवढाच आहे. तसेच सदर लेख संपूर्णपणे अराजकीय असून त्यात विनाकारण सांप्रत घटनांचे संदर्भ शोधू नये ही विनंती!

शनिवार, २३ मे, २०२०

मन:शांती...!


तुझे आहे तुजपाशी I 
परि तू जागा चुकलासी II

- तुकोबा

रविवार, १७ मे, २०२०

झू...!



निवांतपणे रवंथ करीत बसलेल्या उंटाच्या पिल्लाने अचानक काही सुचून आपल्या आईला विचारले,
‘आई, आपले पाय असे लांबडे, फताडे, पसरट का आहेत?’
‘बाळा, वाळवंटात धावतांना पाय वाळूत रुतून आपला वेग कमी होऊ नये म्हणून आपले पाय असे आहेत, बरं!’
थोड्या वेळाने आणखी काही सुचून पिल्लू म्हणाले,
’आई, आपल्या पापण्या या अशा एवढ्या जाड्याभरड्या आणि ओबडधोबड का आहेत; नाजूक, रेखीव का नाहीत?’
‘अरे, वाळवंटात कधीही वाळूचे वादळ सुटते, त्यामुळे उडणारी वाळू आपल्या डोळ्यात जाऊ नये, आपल्या डोळ्यांना त्यामुळे इजा होऊ नये म्हणून आपल्या डोळ्यांच्या सुरक्षेसाठी आपल्या पापण्या अशा आहेत!’
या उत्तराने समाधान झालेसे वाटून गप्प झालेले पिल्लू थोड्या वेळाने पुन्हा म्हणाले,
‘आई, आपल्या पाठीवर हे असे भले मोठ्ठे कुबड का आहे, मला ते मुळीच आवडत नाही! घोड्यासारखी आपली पाठ तुळतुळीत का नाही?’
‘बेटा, वाळवंटात पाण्याचं दुर्भिक्ष असते की नाही? दिवसेंदिवस पाणी न मिळता रहावे लागते. मग अशा काळात तहानेने आपला जीव जाऊ नये म्हणून आपण पाठीवरील या कुबडात पाणी साठवून ठेऊ शकतो, नाही का?’

पिल्लाला खुपणाऱ्या आपल्या सगळ्या शारीरिक व्यंगांचे महत्व आईने समजावून सांगितल्यावर पिल्लाला अगदी वेगळाच आणि भलताच भाबडा प्रश्न पडला...

‘आई, तू सांगतेयस ते सारे खरे असेल तर आपण इथे 'झू'मध्ये काय करतोय...?’

-----------------------------------------------------------------------

प्राप्त परिस्थितीत, कुंठीत झालेल्या बुद्धीला आणि गोठलेल्या भावनांना विधायक दिशा आणि कृतीशील  विचार देण्याशिवाय या गोष्टीचे काहीही प्रयोजन नाही आणि आपल्या सभोवातली घडणाऱ्या घटना आणि त्यांचे स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय वा जागतिक पातळीवर तथा आर्थिक, सामाजिक, राजकीय परिप्रेक्ष्यातील पडसाद यांच्याशी काही अनुषंगिक संदर्भ आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा!

शनिवार, ९ मे, २०२०

बंदी...!



मायावी जगाकडे पाठ फिरवून उंच टेकडीवर झोपडी बांधून विजनवासात जीवन कंठणाऱ्या तपस्व्याने, कातरवेळी वाटसरूची चाहूल लागताच त्याची अडचण ओळखली. टेकडी चढून श्वास फुललेल्या पाहुण्यास बसण्यास आसन, प्यायला माठातील पाणी दिले आणी काहीही न बोलता भोजनाची सिद्धता सुरू केली, 'पांथस्थाचे यथाशक्ती आतिथ्य करावे आणि उजाडल्यावर त्याला निरोप द्यावा' अशा विचाराने.

पाहुणा पहाटे उठला तो कर्कश्श आवाजाने. पाहतो तर साधू झोपडीत नाही पण मधोमध एक पिंजरा टांगला आहे आणि त्यातील पोपट न थांबता एकच शब्द सारखा किंचाळतो आहे... 'स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य...' ऐहिक जगातील मोहमायेचा त्याग करून नि:संग झालेल्या साधूने एका निरागस पक्षाची अशी कोंडी करावी याचे मुसाफिराला मोठे आश्चर्य वाटले. त्याने तातडीने त्या बंदिस्त जीवाला मुक्ती देण्याची मोहीम हाती घेतली.

वाटसरूने पिंजऱ्याच्या दाराची कडी काढली. दार सताड उघडले आणि तो पक्षाने बाहेर येण्याची वाट बघू लागला. काही वेळ झाला तरी पोपट पिंजऱ्यातून बाहेर येत नाही हे बघून पाहुण्याने आपल्या हाताने पोपटाला बाहेर काढायचे ठरवले आणि पिंजऱ्यात हात घातला. जेवढ्या वेगाने हात आत गेला त्याच्या दुप्पट वेगाने परतला कारण पोपटाने आपल्या बाकदार चोचीने त्यावर हल्ला केला!

या प्रकाराने स्तिमित झालेल्या पांथस्थाला काय करावे सुचेना. परंतु त्या अभागी जीवाला मुक्ती मिळवून देण्याचे सत्कार्य आपल्याच हातून पार पडले पाहीजे या दृढनिश्चयाने मनोनिग्रह करून त्याने आपली पक्षीमुक्तीमोहीम पुन्हा सुरू केली. थोडा वेळ झटापट करून तो पोपटाला पिंजऱ्यातून बाहेर काढण्यात यशस्वी झाला आणि त्याने पोपटाला मोकळ्या आकाशात उंच भिरकावून दिले. आपल्या  सत्कर्माच्या स्वानंदात मुग्ध होऊ घातलेल्या मुसाफिराच्या लक्षात आले की मगाच्या झटापटीत त्याचा हात चांगलाच जायबंदी होऊन रक्तबंबाळ झाला आहे!

'नदीवर जाऊन शुचिर्भूत व्हावे, संन्याशाचा निरोप घ्यावा, जमलंच तर हाताच्या जखमेला मलमपट्टी करावी आणि पुढील प्रवासाला निघावे' असा विचार करून पाहुणा नदीवर आला. अन्हिक उरकून आपली पोटली घेण्यासाठी टेकडीवरील झोपडीत परतला. संन्याशाची तर काहीच चाहूल नाही पण जसजसे झोपडीजवळ जावे तसतसा एक चीरपरिचीत किनरा आवाज हळूहळू कर्कश्श होऊ लागला. झोपडीत पोहचून पाहतो तर, छिन्नविछिन्न झालेल्या, चहू बाजूने तारा लोंबून उघड्या पडलेल्या पिंजऱ्याच्या मोडकळीस आलेल्या दांडीवर बसून त्याने मोठ्या सायासाने मुक्त केलेला पोपट प्राणपणाने किंचाळतोय...

'स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य...!'
------------------------------------------------------------

आचाराची विचाराशी नाळ तुटलेली असली की उच्चार हा फक्त उपचार उरतो... पोपटपंची का म्हणानात! आपल्याच स्वप्रतिमेच्या सोनेरी पिंजऱ्यात कैद असलेल्या जीवास मुक्त विहारातील मौज कशी कळावी? कैद ही मनोवस्था आहे तर मुक्ती ही प्रवृत्ती. ती ज्याच्या ठायी वास करते तो मुक्तात्मा कुठल्याही परिस्थितीत स्वत:ला जखडून ठेवत नाही आणि जो मनाने बंदिवान तो कधीही मुक्त होऊ शकत नाही. मग लॉकडाऊन असो कि नसो!

'कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही,
पण गगनभरारीचे वेड रक्तातच असाव लागत.
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही...!' 
- वपु