शनिवार, २ मे, २०२०

उद्या...?


राजा होता एक. दोन राण्या, गुणी प्रजा, सुपीक जमिनी, दुभती जनावरं आणि शब्द झेलायला आतुर दरबारी. राण्यासुद्धा अगदी बहिणी-बहिणींसारख्या एकोप्याने नांदणाऱ्या आणि प्रजासुद्धा सगळे कायदेकानून पाळणारी. शेजारी राज्यांशी मैत्रीपूर्ण सबंध आणि अडीअडचणीला धावून येणारे जीवलग.

दृष्ट लागावी असे सुखचित्र सारे. पण असे असूनही राजाला सुख समाधान म्हणून नाही, सतत चिंता आणि निद्रानाश. बरं चिंता करावी असे काही नाही पण, ‘आज सगळे ठीक चाललेय... उद्या?’ याला काय उत्तर? ना स्तवन गाणाऱ्या भाटांकडे, ना राजवैद्यांकडे, ना प्रकांड पंडितांकडे ना चतुर प्रधानजींकडे!

या राजाच्या पदरी एक सेवक. काम काय तर महालाची साफसफाई करणे, निगा राखणे. गावकुसावर एका छोट्याशा झोपडीत आपल्या पत्नीसोबत सुखाने संसार करणे. हा सेवक बघावे तेव्हा आनंदात, मस्तपैकी गाणी गुणगुणत मन लावून आपले काम करतोय. जणू कुणी कलाकारच चित्र रंगवतोय की मूर्ती घडवतोय!

राजाला मोठे आश्चर्य वाटे. तस बघितलं तर हा खरतर दरिद्री, जेमतेम खाऊन-पिऊन सुखी. याच्याकडे न पैसा-अडका, न जमीन-जुमला, न धन-संपत्ती, हा नेमका कशामुळे एवढा आनंदात राहतो? माझ्यासारख्या एका सार्वभौम, दिग्विजयी आणि श्रीमंत राजाला साध्य नाही असे कोणते सुख याला साधले आहे...?

राजा असला तरी मनुष्यच असल्याने, दुसऱ्याच्या दु:खाने विव्हल होण्यापेक्षा आपल्याला दुष्प्राप्य असणाऱ्या दुसऱ्याच्या छोट्याशाही सुखाने विदग्ध होणे त्यालाही चुकले नव्हते. तेव्हा हा आपला य:कश्चित सेवक नेमका आनंदी तरी कसा राहतो याचे कारण शोधून काढण्याचे काम त्याने आपल्या चतुर, हिकमती आणि करामती प्रधानावर सोपवले.

जन्मत:च चतुर आणि विचक्षण असणाऱ्या प्रधानाला, फळ्यावरील रेषा न खोडता लहान कशी करायची चांगलेच ठाऊक होते. आपला धनी, आपले महाराज हेच आपले पोशिंदे असल्याने त्यांची मर्जी राखणे, त्यांना खुश करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे याची प्रधानजींना पूर्ण कल्पना होती. राजाला समाधान लाभत नसले तर दुसरा तोडगा होता...

प्रधानजींनी सेवकाच्या दाराशी सुवर्णमुद्रांनी भरलेली थैली ठेवण्याची व्यवस्था केली. सेवक घरी पोहचला. पाहतो तर दारात थैली पडलेली. उचलून आत आणली आणि उघडून पाहतो तर डोळे विस्फारले. ‘माझं नशीब उघडलं, आजवरच्या कष्टांचं चीज झालं, मला धनलाभ झाला... अगं ऐकलस का?’ म्हणत हर्षाने नाचू लागला.

चुलीपाशी कामात असलेली बायको पदराला हात पुसत बाहेर येऊन पाहते तो नवरा आनंदाने बेभान होऊन नाचत सुटलेला. त्याच्या हातात थैली आणि त्यात सुवर्णमुद्रा! सेवकाच्या बायकोच्या आनंदालाही पारावार उरला नाही पण तेवढ्यात सावध होऊन ती अंगभूत व्यवहारचातुर्याने म्हणाली, ’अहो, नाचत काय बसलात? किती आहेत मोजल्यात का?’

बायकोकडे कौतुकाने पहात सेवक म्हणाला, ‘खरंच की, आनंदाच्या भरात सुख नेमकं किती आहे तेच मोजायला विसरलो!’ सुवर्णमुद्रा जमिनीवर ओतल्या आणि नवरा-बायको उत्कंठेने मोजू लागली. ९९! ‘अहो, असं कसं होईल, थांबा मी मोजते!’ बायकोने मोजल्या... ९९! ‘तू ना वेंधळीच आहेस, थांब, मी नीट मोजतो!’ ९९!

नवरा-बायकोने एकेकट्याने, आलटून-पालटून, एकत्र, राशी बनवून सुवर्णमुद्रा किमान शंभरवेळा मोजल्या... ९९! ‘थैलीला कुठे भोक पडलंय का बघ, एखादी बाहेर कुठे पडली असेल तर मी बघून येतो...’ म्हणत सेवक त्याच्या झोपडीबाहेरचा जवळ-जवळ सगळा रस्ता धुंडाळून आला, पण कुठेही सुवर्णमुद्रा पडलेली नाही, थैलीला भोकही नाही!

रात्र झाली, दिवेलागणीची वेळ झाली. जेवायची वेळ टळून गेली तरी दोघांना भूक लागली नाही. न जेवता, फक्त पाणी पिऊन दोघे अंथरुणावर पडले पण झोपेचा पत्ता नाही. एरवी जमिनीला पाठ लागताच घोरू लागणारा सेवक आणि त्याची बायको डोळे मिटून झोपेशिवाय तळमळताय, मनात सारखा एकच विचार, ‘एक सुवर्णमुद्रा कुठे गहाळ झाली?’

दुसऱ्या दिवशी सकाळी बायको प्रथम भानावर आली आणि म्हणाली, ‘अहो, ऐकलत का? नाहीतरी त्या सुवर्णमुद्रा आपल्याला विनासायास मिळाल्या आहेत. म्हणजे भगवंताची या मागे काहीतरी योजना असली पाहिजे. आपण एक सुवर्णमुद्रा कमी आहे, ती कुठे गेली याचा विचार करण्यापेक्षा मेहनतीने ती कमवू आणि शंभर पूर्ण करू!’

मनी विचार करता सेवकाला व्यवहारी बायकोचे म्हणणे पटले आणि ती म्हणतेय तसे आपण कष्ट करून, काटकसरीने जगून, आणखी एक सुवर्णमुद्रा कमवू आणि आपल्या ९९ सुवर्णमुद्रांची शंभरी पूर्ण करु असा निश्चय करून तो कामावर निघाला. राजवाड्यात रोजच्या कामाला लागतांना त्याच्या चेहऱ्यावर समाधान नव्हते आणि ओठांवर गाणे नव्हते...

चेहऱ्यावर संभ्रम, देहबोलीत तणाव आणि कामात लक्ष नाही अशा अवस्थेतील सेवकाला बघून राजा मनोमन थोडासा सुखावला पण त्याहून अधिक चक्रावला. वर्षानुवर्षे ज्या सेवकाला त्याने अत्यंत मनापासून, आनंद घेऊन, गाणी गुणगुणत काम करतांना बघितले त्याला असे बघणे राजाला साहवेना. त्याने प्रधानजींना सेवकाच्या या अवस्थेचे कारण विचारले.

‘विशेष काही नाही, महाराज, त्याला कालपासून ९९ मंडळाचं सभासद करून घेतलं आहे, आता तो असाच दिसणार!’ राजा अधिकच संभ्रमित झाला, ‘प्रधानजी, ’९९ मंडळ’ हा काय प्रकार आहे?’

‘ते होय, ते एका विशिष्ट प्रकारच्या माणसांचं मंडळ आहे, महाराज...’ गालात जीभ घोळवत प्रधानजी उत्तरले,
‘आज सुखासमाधानाने जगण्यासाठी जे हवे आहे ते सारे यथास्थित मिळालेले असतांनाही, ‘उद्याचं काय...?’ या लोभात, आपल्याला किंचित अधिक मिळालं तर आपण याहून जास्त आणि आजपेक्षा उद्या अधिक सुखी होऊ अशा कल्पनेने जी माणसं मुळात त्यांची नसलेली आणि त्यामुळे न हरवलेली शंभरावी सुवर्णमुद्रा शोधण्यात जगणं विसरतात त्याचं मंडळ!’

राजाने यातून काय बोध घेतला आणि त्याला मन:शांती मिळाली की नाही माहित नाही... सेवकाची झोप मात्र उडाली ती कायमची...!
-----------------------------------------------------------------
एका अत्यंत लोकप्रिय नागरी दंतकथेनुसार, भारतीय तरूण परदेशात, विशेषत: अमेरिकेत, जातो, स्थिर-स्थावर होतो. त्याला तिथल्या स्वतंत्र, मुक्त, सुखासीन जीवनाची भुरळ पडते. नव्याची नवलाई ओसरली की ते जीवनमानही अंगवळणी पडते. साधारण चाळीशी ओलांडली की या मूळच्या भारतीय संस्कारातील मुलाला आपल्या पौगंडावस्थेतील मुलांवर होऊ घातलेल्या पाश्चात्य संस्कारांची काळजी वाटून, 'आता पुरे झाले, गड्या आपला गाव बरा! आ, अब लौट चाले...' असे वाटू लागते.

बापाच्या मनाला ही काळजी असली तरी आता ग्रीन कार्ड होल्डर असलेल्या सुखवस्तू नागरिकाचा अमेरिकन भुलभुलैयाचा मोह सुटत नाही म्हणून तो स्वत:ची समजूत घालतो... 'अजून फक्त एक वर्ष! तेवढं झालं की कायमच जाऊ या की परत 'जन गण मन...' म्हणायला!'

...आणि हे मग दर वर्षी असच घडत राहतं! याला म्हणतात एक्स + १ सिंड्रोम - एक विकार प्रवृत्ती... ही त्या '९९ मंडळा'ची लहानपणी यात्रेत हरवलेली जुळी बहिण...!

पण या दोन्ही भावंडांना टाळण शक्य आहे...
मुळात राजाच सुखी-समाधानी झाला तर...
प्रधानजी राजाला खुश करण्याऐवजी राजाला समजावू शकला तर...
सेवकाने दाराबाहेर पडलेली थैली स्वीकारलीच नाही तर...

उणीवेच्या जाणीवेने मन:स्वास्थ्य हिरावून घेण्याआधी शहाणीव भेटली तर...? 

हे शक्य होईल...?
निदान या सक्तीच्या निवांतपणात स्वतंत्र, स्वयंभू आणि समग्र विचार करायला वेळ आहे तोवर...? अगदी लगेच आजच नाही, पण...
...उद्या?

रविवार, १९ एप्रिल, २०२०

द्वंद्व...!



आपल्या अंतर्मनात दोन लांडग्यांच द्वंद्व अहर्निश चालू असत, बर का मुला!
आजोबा आपल्या नातवाला आयुष्याचं तत्वज्ञान गोष्टीरूपाने सांगत होते.
यातला एक लांडगा असतो दुष्ट तो म्हणजे आपला क्रोध, असूया, दु:ख, पश्चाताप, लोभ, मद, विषाद, अपराध-भावना, न्यूनगंड, असत्य, स्वार्थ, खोटा बडेजाव, विधिनिषेधशून्य स्पर्धा, बेगडी प्रतिष्ठा, स्वकेंद्रित क्षुद्रपणा आणि अहंकार.
...आणि दुसरा? लक्षपूर्वक ऐकणाऱ्या मुलाने उत्सुकतेने विचारले.
दुसरा असतो सुष्ट तो म्हणजे आनंद, मन:शांती, प्रेम, आशा, निर्मळ, निरागस भाव, नम्रता, सहानुभूती, भूतदया, सहवेदना, औदार्य, सत्य, करुणा आणि विश्वास! ही लढाई जशी तुझ्या-माझ्या आत चालली आहे तशीच प्रत्येक दुसऱ्या माणसाच्या मनातही निरंतर चालली आहे.
मुलगा थोडा वेळ विचारात पडला आणि बालसुलभ जिज्ञासेने म्हणाला, आजोबा, शेवटी यातला कुठला लांडगा जिंकतो?
आयुष्य बघितलेल्या आजोबांनी सहज स्वरात उत्तर दिलं,
आपण ज्याचं भरण-पोषण करू तो...!
---------------------------------------------------------------------------------
सामान्य परस्थितीत गळेकापू स्पर्धेच्या ऐहिक जगात मानभावी सामाजिक प्रतिष्ठेचं सोंग वठविण्यासाठी पहिल्या लांडग्याचे यथास्थित भरण-पोषण करून आपण त्याला धष्टपुष्ट बनवीत असतोच. आणि पर्यायाने ही अंतर्मनातील लढाई त्यानेच जिंकण्याची सोयही अनायसे करून ठेवीत असतो.

पण आत्ता सारख्या असामान्य, स्पर्धाविहीन, समसमान परिस्थितीत आपण जेव्हा आपल्याच जगण्याकडे थोड्या निवांतपणे आणि ‘सुखदु:खे समे कृत्वा...’ अशा साक्षेपी भावाने पाहू शकतो तेव्हा, नाईलाज म्हणून का होईना, दुसऱ्या लांडग्याला थोडा खुराक लावायला काय हरकत आहे. न जाणो तेवढ्याच पोषणाने तरतरी येऊन एका नव्या आवेशाने तो पाहिल्यावर मात करायचा...?

ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि II

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

उपरती...!


सकाळी आपल्या लांब पसरलेल्या सावलीकडे पाहून कोल्हा म्हणाला, ‘आज मला जेवायला उंट पाहिजे...!’
सकाळभर उंटाच्या शोधात हिंडून दमलेल्या कोल्ह्याने दुपारी पायाशी जमा झालेल्या सावलीकडे बघितले आणि म्हणाला, 
‘...उंदीरही चालेल खर तर!'
----------------------------------------------
आपण कोण आहोत आणि आपली गरज किती हे आपल्या प्रतिमेवर अवलंबून असू नये.
ते तसे भासल्यास निसर्ग योग्य वेळी आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतो...
आत्ताचा ठहराव याची जेवढी जाणीव देईल तेवढीच शहाणीव देखील... अर्थात ज्याला उपरती होईल त्याला!

शुभम भवतु !

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

माया...?



नारदमुनींनी एकदा कृष्णाला विचारले, प्रभूमाया म्हणजे हो काय...?’
सुहास्यवदन कृष्ण प्रश्न टाळून हलकेसे स्मित करता झाला.
याला मायावी म्हणतात ते उगीच नाही!’नारद मनी म्हणाले.

काही दिवस गेले आणि नारदांना कृष्णाकडून वनविहारचे आमंत्रण आलेप्रत्यक्ष कृष्णाच्या आमंत्रणाने हरखून गेलेल्या नारदमुनींच्या मनात कुठलाही संदेह उमटला नाहीमोठ्या उत्साहात नारद श्रीकृष्णासोबत प्रसन्न चित्ताने वनविहाराला निघाले

बघता बघता नगर मागे पडले आणि घनदाट जंगल सुरू झालेसूर्य माथ्यावर आलाकृष्ण एका झाडाखाली विसावला आणि श्रमाने दमल्या आवाजात म्हणाला,
नारदाउष्मा खूपच वाढलाय आणि माझ्या घशाला कोरड पडली आहेकुठे पाणी मिळते का बघतोस?’
देवातुम्ही इथे विश्राम कराजवळच झऱ्याचा आवाज येतोयमी पळभरात पाणी घेऊन हा आलोच.’
आणि नारद आवाजाच्या रोखाने झऱ्याच्या शोधात निघाले.

जवळच भासणारा आवाज हळूहळू लांब जाऊ लागला आणि चालण्याचा वेग वाढवून नारद जंगल तुडवत धावू लागलेबराच वेळ धावल्यावर नारदांचा श्वास फुलला आणि आता अधिक धावणे शक्य नाही असे त्यांना वाटते न वाटते तोच निबीड वाटणारे अरण्य अचानक संपले आणि एक छोटेसे टुमदार गांव लागलेगावातल्या पहिल्याच घरच्या दारावर नारद थांबले आणि तहानेने कासावीस झालेल्या जीवाला शांत करण्यासाठी पाणी मागावे म्हणून दारावर थाप मारून दार उघडण्याची प्रतीक्षा करू लागले.

थोड्याच वेळात एक अत्यंत रूपवती तरुणीने दार उघडले आणि हा कोण अभ्यागत अशा विचारात ती कमरेवर हात ठेऊन उभी राहिलीतिच्या त्या लावण्याने आणि मोहक विभ्रमांनी संमोहित झालेल्या नारदांना आपल्या तहानेचा पूर्ण विसर पडला आणि ते त्या युवतीशी बोलण्यात मश्गुल झाले.

उन्हं कललीदिवस सरला आणि शेतावर गेलेला तरुणीचा बाप घरी परतलापाहतो तर कुणा वाटसरुशी मुलगी बोलत उभी आहेबापाने पाहुण्याला घरात बोलावलेविचारपूस केली आणि आता अंधाराचे पुढे जाणे ठीक नाही म्हणून दोन घास खाऊन रात्रीला मुक्काम ठेऊन सकाळी उजाडल्यावर मार्गक्रमण करण्याची सूचना केलीनारदांना ही कल्पना फारच आवडल्याने त्यांनी तत्काळ स्वीकारली.

दुसरे दिवशी भल्या पहाटे उठूनप्रातर्विधी आटोपून शेतकरी आपल्या शेतावर गेला आणि नदीवर स्नानसंध्येला गेलेले नारद सर्व आटोपून शेतकऱ्याच्या घरी येऊन पुन्हा मुलीशी गुलूगुलू बोलत बसलेहाच दीनक्रम दोन-तीन दिवस चालला आणि पाहुणा हलण्याचे नाव घेत नाही म्हटल्यावर चार पावसाळे पाहिलेला शेतकरी काय ते उमजला.
माझी एकुलती एक मुलगीतिला जन्माचा जोडीदार मिळाला तर मला तरी आणखी काय हवेतुमचे लग्न लावून देतोरहा इथेच घरजावई म्हणून आणि माझं ओझं हलकं करा.’ म्हणाला.

नारदांना आपल्या कानांवर विश्वास बसेनाअगदी हर्षवायूच व्हायचा बाकी राहीला आणि शेतकऱ्याचा इरादा बदलण्याअगोदर नारद गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर उभे राहिले आणि त्यांचा सुखाचा संसार सुरू झालासासरेबुवांबरोबर रोज शेतावर जावेते सांगतील ते काम शिकावेकरावे आणि थकून घरी यावेजेवण झाल्यावर बायकोशी सुखदु:खाच्या चार गोष्टी करीत झोपी जावे असे सुखासीन आयुष्य चालले.

कालगतीनुसार संसरेबुवांना देवाज्ञा झाली आणि दरम्यान पाठीला पाठ लावून आलेली चार चिल्लीपील्ली अंगणात खेळू लागलीअशा सगळ्या सुखा-समाधानाच्या दिवसात २४ वर्षे उलटली.

...आणि एक दिवस सारे गाव रात्री झोपेत असतांना अचानक मोठा हल्लकल्लोळ माजलासारे वाट फुटेल तिकडे सैरावैरा धावू लागले. नदीला पूर आलानदीला पूर आला... धावाधावाजीव वाचवा...’ असा आरडाओरडा चहू बाजूंनी ऐकू येऊ लागलानारदांची सुखनिद्रा भंग झाली आणि भानावर येत त्यांनी हाती लागेल ते द्रव्यधान्यकपडेलत्तेदाग-दागिने गाठोडयात भरून बायको आणि चारही मुलांना घराबाहेर काढले आणि तेही इतरांसारखे जीवाच्या आकांताने धावू लागले.

बघता बघता पाणी वाढू लागले आणि हात धरलेला मोठा मुलगा हात सुटून पाण्याच्या प्रवाहात ओढला गेलात्याला वाचवायला म्हणून पाण्यात पाय टाकलेल्या बायकोच्या हातातला हात सुटून दुसरा मुलगाही एक मोठ्या लोंढयाने ओढून नेलाडोळ्यासमोर दोन मुलांना जलसमाधी मिळालेली बघूनबायकोचा हात अधिकच घट्ट धरून नारदांनी तिला बाजूला ओढले तर त्या हिसक्याने बायकोच्या कडेवरचे मूल पाण्यात पडले आणि प्रवाहाला लागलेया सर्व प्रकाराने हतबुद्ध झालेल्या नारदांनी एका झाडाच्या बुंध्याचा आधार घ्यावा म्हणून पाय टाकला तर तो नेमका खोलात पडून त्यांच्या कडेवरील मुलंही निसटले आणि तोल जाऊन भेलकांडत पुढे तोंडावर पडल्याने नारदांच्या हातून बायकोचा हातही सुटलानवऱ्याच्या आधारावर विसंबून बेसावध असलेल्या बायकोला खळाळत्या पाण्यात तोल सांभाळणे अवघड होत असतांनाच मागून आलेल्या लोंढयाच्या रेट्याने नारदांच्या बायकोला त्यांच्या डोळ्यासमोर प्रवाहात ओढून नेले!

या सगळ्या प्रकाराने भयचकित झालेल्या आणि दु:स्वप्नाप्रमाणे भासणाऱ्या या साऱ्या गोष्टींची संगती लावण्याच्या प्रयत्नातभकास चेहऱ्याने विमनस्क अवस्थेत कमरेपर्यंत पाण्यात उभ्या असलेल्या नारदांच्या कानी मृदू आवाजातले स्निग्ध शब्द पडले,

वत्सापाणी आणतोयस नाएक पळ की रे झाला...!’
-------------------------------------------------------------------------------------------

नारदांना माया म्हणजे काय हे दाखविणारा कृष्णकलियुगात आपल्याला तो वस्तुपाठ द्यायला करोनाच्या रूपाने आलाय कायया निमित्ताने मुळात जंगल तुडवत आपण हा प्रवास काकुठून आणि कशासाठी सुरू केला होता हे एकदा निवांतपणे तपासून पाहू या का...? आणि होमोहमाया त्यागूनअंगाला राख फासून वैराग्य वगैरे सामान्य माणसांचे काम नव्हे आणि संसारी माणसासाठी ते उचितही नव्हेतेव्हा दुसरे टोक गाठायची काहीच गरज नाहीगदिमांनी संत गोरा कुंभाराच्या रुपकातून दिलेला मोलाचा सल्ला मानला तरी पुष्कळ आहे... काय म्हणतात गदिमा?

तुझे रूप चित्ती राहोमुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दाससुखे करो काम!

लौकिक अर्थाने ऐहिकातून वानप्रस्थाला जाण्याची मुळी गरजच नाहीमायामोहाबद्दलची आसक्ती हळूहळू कमी करीत निरासक्त मनाने संसारातील विहित कर्म करित राहणे हाच वानप्रस्थाश्रमहे साधले तर नित्यकर्मही साधनेपेक्षा वेगळे नाही आणि अशा निर्विकार जगण्यातून क्षणोक्षणी मिळणारा आनंद हा मोक्षाहून निराळा नाही!

बघाआता करोनाच्या निमित्ताने तरी निर्विकार होणं पटतंय का…!

मंगळवार, २४ मार्च, २०२०

इष्टापत्ती...?


‘मिलॅनियम इयर’चा मान मिळालेलं २००० साल अनेक अर्थाने विलक्षण, वैशिष्ट्यपूर्ण आणि म्हणून संस्मरणीय ठरलं. या सहस्त्रकाच्या अंतिम वर्षाने ‘इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी’ अर्थात माहितीजालाच्या क्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडवली आणि एका नव्या, माणसांस पूर्णपणे अज्ञात असलेल्या, वेगळ्याच विश्वाची दारे उघडून 'ग्लोबल व्हिलेज'ची झलक दाखवली आणि आधुनिक माणूस अधिकच बहिर्मुख झाला. याच वर्षी हॉलीवूडने जगाला एक नितांत सुंदर चित्रपट दिला – 'कास्ट अवे'. या चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळवले आणि ‘बेस्ट इनअॅनिमेट ऑब्जेक्ट’ (सर्वोत्तम अचल वस्तू) या, यापूर्वी कधीही न बघितलेल्या, श्रेणीचा पुरस्कारात अंतर्भाव करायला भाग पाडून इतिहास घडवला. या पुरस्काराचा पहिला, एकमेव आणि शेवटचा (अद्याप तरी!) मानकरी होण्याचे भाग्य लाभलेलं ‘विल्सन’ हे पात्र (?) समजून घेण्यासाठी 'कास्ट अवे' बघायलाच हवा. पण मुद्दा तो नाही, ‘कास्ट अवे’बद्दल बोलण्या-लिहिण्यासारखं खूप काही असलं तरी इथे त्याचा संदर्भ द्यायचा आहे तो माणसाने कालौघात हरविलेल्या अंतर्मुखतेसाठी.

‘कास्ट अवे’ची थोडक्यात कथा अशी की ‘फेडेक्स’ या जगविख्यात कुरियर कंपनीचे एक विमान पॅसिफिक समुद्रात कोसळते आणि फेडेक्सचा त्या विमानातील एक अधिकारी ‘चक नोलॅण्ड’ एका तराफ्याच्या आधार मिळाल्याने समुद्रात बुडून जलसमाधी मिळण्यापासून वाचतो आणि एका निर्जन बेटावर पोहोचतो. अस्वीकार – संताप – तडजोड – हतबलता – स्वीकार या मनोवस्थांच्या चक्रात अनादी अनंत भासणाऱ्या काळासाठी अडकलेल्या 'चक'च्या, वेळोवेळी बदलणाऱ्या मनस्थितीचे चित्रण, माणसांस ग्रासणारे षडरिपू आणि मोहविणाऱ्या नवरसांची अनुभूती देऊन जाते. त्या अर्थाने ही कलाकृती अभिजात आहे हे निर्विवादच, पण केवळ इतकेच नाही.

आजवर मी जितक्या वेळा हा चित्रपट बघतो त्या प्रत्येक वेळी मला नवीन काही समजते, उमजते. आणि कितीही वेळा बघितला तरी आणखीन एकदा पाहण्याची उर्मी जरा देखील कमी होत नाही. असे दुसऱ्या कुठल्याही चित्रपटाच्या बाबतीत सहसा घडत नाही. मग 'कास्ट अवे' मध्ये नेमके असे काय आहे?

हॉलीवूडच्या चित्रपटांच्या मानाने बरीच अधिक, साधारणपणे भारतीय चित्रपटांची असते तेवढी, म्हणजे अडीच तास लांबी असूनही हा चित्रपट लांबलेला तर वाटत नाहीच उलट, कुठलेही फाजील अंगविक्षेप आणि लिंगबदल केलेली हिडीस पात्रे यांच्या माध्यमातून विनोदनिर्मितीचा केलेला किळसवाणा प्रयत्न, भडक, उत्तान आणि कर्णकर्कश्श 'आयटम नंबर्स' आणि ‘लास्टची फाईट’ यांच्या भडिमाराशिवाय देखील एवढा वेळ कसा गेला याचा पत्ताही लागत नाही. याचे कारण आशयाचा आवाका, विषयाचा विस्तार आणि सादरीकरणातला प्रामाणिकपणा! पण याहूनही महत्वाची आणि विलक्षण गोष्ट म्हणजे त्यात सांगितलेल्या गोष्टीचा गाभा आणि विवेचनाचा अन्वयार्थ!

२० वर्षांपूर्वी प्रथम आणि गेल्या २० वर्षात असंख्य वेळा बघितलेल्या या चित्रपटाबद्दल मला नेहमीच असे वाटते की मनुष्य प्राणी अर्थात होमो सेपियन या सजीवाच्या ‘उगम, विकास आणि स्थिती’ची इतकी समर्पक, इतकी मर्मग्राही आणि तितकीच निरुपणात्मक कहाणी दुसरी असू शकत नाही. मॅश्लोने सुचविलेल्या माणसाच्या गरजांच्या मनोऱ्याचे इतके प्रत्ययकारी चित्रण आणि नाट्यरूपांतरण माझ्या पाहण्यात तरी दुसरे नाही. स्ट्रगल फॉर एग्सिस्टन्स अर्थात जगण्यासाठीची धडपड, जीवंत रहाण्याची अहमहिका ते अस्तित्वाचे प्रयोजन शोधण्याची जिज्ञासा या माणसाच्या आयुष्याच्या प्रवासाचे आदिम प्रेरणा ते आध्यात्मिक तितिक्षा असे अत्यंत प्रभावशाली आणि प्रबोधनकारी चित्रण म्हणजे 'कास्ट अवे'!

याच नवीन सहस्त्रकाच्या आरंभीच्या वर्षाने म्हणजे २००० सालाने प्रगत आणि संगणक साक्षर माणसाला एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले – सोशल मिडिया अर्थात समाज माध्यम! तसा १९९७ पासूनच ‘सिक्स डिग्रीज’च्या माध्यमातून सुरु झालेला हा प्रवास ओपन डायरी (१९९८), मायस्पेस/फ्रेंडस्टर/लिंक्डइन (२००३), ऑर्कुट (२००४) या मार्गाने २००५ साली ‘फेसबुक’च्या रूपाने प्रस्थापित झाला. आजच्या तारखेला अक्षरश: शेकड्याने असलेल्या समाज माध्यमांनी वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन अशा पारंपारिक माध्यमांना केवळ स्पर्धा दिली आहे असे नाही तर त्यांचा अवकाश संकुचित करण्यास सुरवात केली आहे. आज कुठलीही बातमी दुसऱ्या कुठल्याही माध्यमास समजण्यापूर्वी समाजमाध्यमावर दाखल होते आणि अक्षरश: निमिषार्धात व्हायरल होऊन लाखो, करोडो लोकांच्या हाती पडते.

व्हॉटस्अॅप या समाजमाध्यमाने फेसबुक या सर्वाधिक वापराच्या समाजमाध्यमाशी हातमिळवणी करून लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे आणि आज प्रत्येक स्मार्टफोनधारकाकडे हे आयुध असणे क्रमप्राप्त झाले आहे. जनमानसातील या साधनाची लोकप्रियता आणि लोकांचे त्यावरील अवलंबित्व याची उपयुक्तता अत्यंत चाणाक्षपणे हेरून त्याचा ‘योग्य तो’ उपयोग करण्यात दोन समाजघटकांनी तत्परता दाखवली – जाहीरातदार विक्रेते आणि धूर्त राजकारणी! अर्थात नवमूल्यव्यवस्थेत आणि आधुनिक समाजरचनेत एकूणच (मूल्य?)व्यवस्था याच दोन ‘समाजधुरीणां’च्या हाती असल्याने या नव्याने सापडलेल्या सोयीस्कर आणि प्रभावी माध्यमाचे ‘उपयोजन’ त्यांनी ‘यथोचित’ पद्धतीने केले नसते तरच नवल!

मुळात सोशल नेट्वर्किंग अर्थात समाजातील व्यक्तींनी विविक्षित प्रेरणांनी, विशिष्ट उद्देशांनी आणि काही एक धोरणाने एकत्र येण्यासाठीचे एक व्यासपीठ आणि त्यातून घडणाऱ्या सामाजिक अभिसरणातून समाजाला काही उपयुक्त मूल्ये, सेवा मिळाव्या अशा समन्वयी विचाराने सुरु झालेला हा प्रवास आज ज्या अवस्थेत आहे ते केवळ चिंतनीयच नाही तर अत्यंत शोचनीय आहे. काही सन्मानीय अपवाद वगळता या माध्यमाचा उपयोग विधायक कारणांसाठी, लोकहिताच्या कार्यांसाठी, सकलजनहितार्थ तर राहू दे, निदान एका समाजाच्या, एका वर्गाच्या, एका व्यक्तीच्या का होईना भल्यासाठी केला जातो आहे असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरावे. एकमेकावर कुरघोडी करण्याची चढाओढ, युयुत्सु वृत्तीने केलेली स्पर्धा, सवंग लोकप्रियतेच्या नादाने आपल्या सुमार अभिव्यक्तीचे निलाजरे प्रदर्शन आणि या सगळ्यावर मात करणारे गलिच्छ राजकारण या पलीकडे या, अन्यथा अत्यंत प्रभावशाली, माध्यमाचा सदुपयोग क्वचितच होतांना दिसतो.

उण्यापुऱ्या २० वर्षांच्या आयुष्यात समाजमाध्यम या एका अतिशय प्रत्ययकारी ठरू शकणाऱ्या साधनाची संधीसाधूंनी जी अवस्था केली आणि त्याच्या मूळ उद्देशालाच केवळ हरताळ फासला एव्हढेच नाही तर त्याची ‘उपयुक्तता’ ज्या मार्गांनी आणि ज्या उद्देशांसाठी वापरली त्याने साधन-शुचिता तर विन्मुख झालीच पण अनेक विवेकी आणि सत्शील व्यक्तींना ‘सोशल मिडिया सुईसाईड’ अर्थात ‘समाजमाध्यम आत्महत्या’ करून या लोकाभिमुख व्यासपीठाकडे पाठ फिरवण्यास भाग पाडले. ‘कोण होतास तू, काय झालास तू...?’, ‘याजसाठी केला होता अट्टाहास...?’ आणि ‘नरेची केला किती हीन हा नर!’ असे सारे ज्यांच्याबद्दल एकाच वेळी वाटावे असे माध्यम(कु)कर्मी या, अन्यथा लोकशाहीस पोषक ठरू शकणाऱ्या, अत्यंत उपयोगी साधनाची जेवढी हानी करतात तेवढी दुसरे कुणीही ठरवून सुद्धा करू शकणार नाही. प्रगत अवस्थेतील माणसाने काय करू नये याचा वस्तुपाठ म्हणजे आजच्या अविवेकी समाजमाध्यमींची लाजिरवाणी अवस्था!अर्थात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून गौरविल्या जाणाऱ्या मुख्य प्रवाहातील माध्यमींची अवस्था फार भूषणवाह किंवा कौतुकास्पद आहे असे मुळीच नव्हे पण तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे, तो असू दे...!

आज ‘कास्ट अवे’ आणि सोशल मिडीयाचा उदय-विकास-स्थिती या दोहोंचा एकत्र उहापोह करण्याचे प्रयोजन – करोना! जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या या विषाणूने दोन गोष्टी पुन्हा एकदा सिद्ध केल्या – फक्त निसर्गाने भाग पाडल्यास आणि केवळ मृत्युभयानेच माणूस ‘रॅट-रेस’मधून तात्पुरता पॉज घेतो आणि सदोदित ‘बाहेर’ भिरभिरणारी नजर ‘आत’ वळवून थोडा अंतर्मुखही होतो, हे एक. दुसरे म्हणजे ‘डेथ इज अ ग्रेट इक्विलायझर’ म्हणजे मृत्यु दारात उभा राहिल्यावर स्त्री-पुरुष, काळे-गोरे, उच्च-नीच, जाती-धर्म, गरीब-श्रीमंत, शोषित-शोषक, राजा-प्रजा सारे सारे भेद गळून पडतात आणि माणूस अत्यंत मुलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करून अनावश्यक गोष्टींवर काट मारायला शिकतो. या दरम्यान, किती गोष्टी खरोखरच निकडीच्या आहेत आणि आपण किती अनावश्यक गोष्टींच्या मागे धावतो, त्या जमा करून आपल्याच गरजा विनाकारण किती वाढवून ठेवतो याचे त्याला जे क्षणिक भान आणि (दांभिक का असेना) विरक्ती येते, तो बोनस किंवा... बोधी!

या शिवाय आपल्या खऱ्या-खुऱ्या सुखाच्या जागा सापडायला मदत होते ते समाधान निराळे आणि... आत्मिक! या निमित्ताने, धूळ खात पडलेल्या पुस्तकांवरची धूळ झटकली जाते आणि आपला तरुणपणीचा फेव्हरीट लेखक नव्याने भेटतो... लहानपणी जे वाद्य वाजवतांना तहानभूक हरपून तंद्री लागायची त्यावरची गवसणी काढली जाते आणि ‘सूर तेचि छेडीता, गीत उमटले नवे...’ ची अनुभूती मनाला प्रसन्न करून जाते... कॉलेजमधील कवितांची वही आणि तिच्यातील खुण करून ठेवलेले पान मनावर मोरपीस फिरवून जाते तर वाळून गेलेल्या रंगपेटीत पाणी घालून रंगांना जीवंत करण्यात आणि नव्याने निसर्गचित्र रंगविण्यात वेगळीच समाधी लागते... पुरुषांना घरकाम करण्याचा, आपले पाककौशल्य दाखविण्याचा आणि स्त्रियांना वाचन-लिखाणाचा अवसर मिळतो.. आपल्या जिवलगांना मनसोक्त वेळ देता येतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरील निखळ आनंदाने आपलेच मन फुलून येते... एक ना दोन!

करोना व्हायरस जीवघेणा ठरू शकतो आणि त्याच्या विरुद्ध लढायला हवेच. या विषाणूला हद्दपार करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या स्वास्थ्यकर्मींना त्यांच्या कामात शक्य ती मदत करणे, प्रोत्साहन देणे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्यच आहे आणि ते आपण जरूर करू या... फक्त एक विनंती आहे – त्या निमित्ताने मिळालेल्या निवांतपणाचा सदुपयोग करण्यासाठी ‘ये कहां आ गये हम...’ याचा विचार जरूर करावा आणि ‘ये वो मंजिल तो नहीं...’ असे, मनाच्या कुठल्याशा अंधाऱ्या कोपऱ्यात, जरी वाटले तरी त्या ‘मंजिल’चा, त्यासाठी ज्या मार्गावर चालतोय त्या मार्गाचा आणि त्यामागील अंत:प्रेरणेचा एकदाच, फक्त एकदाच फेरविचार जरूर करा... मी म्हणतोय म्हणून नव्हे, तुम्ही स्वत:ला तेवढे देणे नक्कीच लागता म्हणून. कारण आपण आपले मार्ग बदलले नाही तर निसर्ग सर्वशक्तिमान आहे आणि तो त्याचे निर्णय घ्यायला मुखत्यार आहे हे आपण पाहतो आहोतच...

अरे हो, एक सांगायचं राहीलच, ‘कास्ट अवे’ ज्याच्या कल्पनेतून जन्मला आणि जो त्यातील ‘चक नोलॅण्ड’च पात्र अक्षरश: जगला तो 'टॉम हॅन्क्स' आणि त्याची पत्नी 'रिटा विल्सन' करोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत आणि आत्ता ऑस्ट्रेलियामध्ये त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यात सुधारणा होते आहे...! आणि हो, आता हाताशी वेळ आहेच तर या करोनाला इष्टापत्ती समजून टॉम हॅन्क्सचा ‘कास्ट अवे’ बघाल तेव्हा जमलच तर ‘जेम्स कॅमेरून’चा ‘द अॅबीज’ ही बघून टाका... मनात आणलं तर निसर्ग काय करू शकतो याची आणखी एक झलक...!

बाय द वे, २ जी, ३ जी, ४ जी या मालिकेतील ‘५ जी’च्या आगमनाचा करोनाशी संबंध आहे असेही एक गृहीतक मांडले जात आहे! नेचर्स वेज आर नेचर्स वेज...

शुभम भवतु!

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

राजनीती...?



दिल्ली विधानसभा २०२० निवडणुकांच्या ऐतिहासिक निर्णयाचे राजकीय अभ्यासकांचे विश्लेषण जे काही असेल ते असो, एक शांतीप्रिय, विवेकी, सुबुद्ध आणि जबाबदार नागरिक (याला आम आदमी म्हणावे असा आग्रह नाही!) या सर्व घटनाक्रमाकडे कसा बघतो आणि त्याचे या विषयीचे काय आकलन आहे हे पक्षीय राजकारणापलीकडे पाहू गेल्यास जे उमजते ते असे

१. समाजव्यवस्था विकसित झाल्यानंतर एका लोकाभिमुख शासन-प्रशासनाची जी गरज निर्माण झाली त्या गरजेचे मूळ हे किमान सोयीसुविधा पुरविणारी जीवनशैली, यथोचित आरोग्य सुविधा, चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि सार्वजनिक पातळीवरील सामान्य जीवनमान अर्थात सामाजिक सुरक्षा याहून अधिक नव्हते. शासनाकडून या आणि इतक्याच मूलभूत गोष्टींची पूर्तता व्हावी अशी जनसामान्यांची अपेक्षा असते. या बरोबर फारतर रोजगार निर्मिती, समान संधी, परस्पर पूरक बाजारपेठ आणि समायोजनी, जबाबदार प्रशासन यांची अपेक्षा असू शकते. या पलीकडे सामान्य माणसाला अधिक अपेक्षा नसतात त्यामुळेच तो प्रासंगिक प्रलोभनांना फार काळ भुलत नाही.

२. जगाला लोकशाहीची एक सुसूत्र आणि सटीक व्याख्या देणाऱ्या अब्राहम लिंकनच्या मते, तुम्ही सर्व लोकांना काही काळ बुद्दू बनवू शकता आणि काही लोकांना पूर्णवेळ फसवू शकता, पण सर्व लोकांना सर्व काळ मूर्ख बनवू शकत नाही. सामान्य माणसाच्या ज्या मूलभूत शहाणीवेवर गांधीजींचा आत्यंतिक विश्वास होता आणि ज्या विश्वासाच्या बळावर त्यांनी व्हॉट्सऐप, फेसबुक शिवाय एक प्रचंड नेटवर्क, केवळ उभचं नाही तर प्रवाही आणि कार्यरत केलं, त्याच समग्र आणि एकसंध शहाणीवेचा हुंकार म्हणजे लोकशाही... ती विजयी झाली. 

३. लोकशाही व्यवस्था हि निश्चितच एक परिपूर्ण परिसंस्था आहे आणि तिच्या गुणसूत्रांमध्ये सामान्य 'जन' किंवा सर्वसाधारण 'लोक' यांची स्पंदने जिवंत ठेवण्याची आणि टिपून घेण्याची एक अंतःस्थ शक्ती आहे. अतिरेकी, अविवेकी प्रचार, मतांचे जातीनिहाय, धर्माधिष्ठित ध्रुवीकरण, जनमानसाशी विपरीत अशा अतार्किक तथा असंबद्ध मुद्द्यांचा गाजावाजा आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेतील, मते विकत घेण्यापासून मते चोरण्यापर्यंतचे, गैरप्रकार या सगळ्यांना पुरून उरण्याची धुगधुगी लोकशाही व्यवस्थेत अद्यपी शिल्लक आहे याची या निमित्ताने आलेली प्रचिती हा मोठाच दिलासा. प्रजासत्ताकाच्या ७० वर्षांनंतरही देशाच्या साक्षात राजधानीमध्येही ६२.५९% एवढेच मतदान होणे हे चिंतनीय असले तरी निदान तेवढे तरी लोक मतदानासाठी उशिरापर्यंत रांगेत उभे राहतात आणि कुठल्याही भुलाव्याला, आमिषाला बळी न पडता आणि अत्यंत विपरीत परिस्थितीतसुद्धा आपल्या सद्सदविवेक बुद्धीला जागून मतदान करतात हेही नसे थोडके.

४. ‘लोकांना सर्व काही मोफत हवे असते आणि ते जो पुरवितो त्यास अनुमोदन देणे स्वाभाविकच आहे असाही एक विचार प्रवाह या निमित्ताने उमटतांना दिसला. हा केवळ हेत्वारोप म्हणून सोडूनही देता येईल पण त्याचे दूरगामी परिणाम आणि गांभीर्य बघता त्याचा प्रतिवाद करणे क्रमप्राप्त ठरते. या संदर्भात तूर्तास एवढेच प्रतिपादन पुरेसे ठरावे की मोफत देणारा जर जे ‘वाटायचे’ ते राजरोस वाटत असेल आणि त्यातील प्रत्येक पैशाचा हिशोब दाखविण्यास कचरत नसेल तर त्यात काहीही गैर (‘भ्रष्टाचार’?) आहे असे म्हणणे हा केवळ द्वेषमूलक पोटशूळ ठरावा, दूरदर्शी द्रष्टेपणा नव्हे. ‘म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो’ अशी कळकळ दाखवणाऱ्यांनी, व्यापक जनहितासाठी स्वातंत्र्योत्तर काळात कुणी काय केले आणि त्याचे कालौघात काय झाले याचा जरूर धांडोळा घ्यावा.

५. लोकनेत्याचा मूळ विचार जर विधायक, सर्वव्यापी, आणि धारणाक्षम (शाश्वत नव्हे!) असेल, त्याचे धोरण जर सर्वसमावेशक, संतुलित आणि निष्पक्ष विकासाचे असेल आणि त्याला अभियांत्रिकी तथा व्यवस्थापनातील उच्च शिक्षणाचा आधार असेल तर सुशासनाचे एक प्रारूप केवळ शब्दात न रंगविता प्रत्यक्षात कसे राबविता येऊ शकते याचा वस्तुपाठ या निमित्ताने बघायला मिळाला. तो एकमेव किंवा बरोबरच असेल असे नाही आणि सदा सर्वकाळ योग्यच ठरेल असाही दावा नाही, परंतु तसाही विकल्प असू शकतो याचा उत्तम नमुना निश्चितच आहे.

शेवटी, वचननामा, जाहीरनामा, संकल्पपत्र आणि अशा इतर अनेक ‘आश्वासक’ शब्दांचे बुडबुडे हवेत उडविणाऱ्या आणि साम-दाम-दंड-भेद यापैकी कुठल्याही आणि प्रसंगी साऱ्याच कुटनीतीचा वापर करून ‘जिंकण्याची पात्रता’ या एकमेव निकषावर उमेदवारीच्या तिकीटांची खिरापत वाटत निवडणुकांभोवती केंद्रित झालेल्या राजकारणाला निडरपणे पण सभ्यतेची, सुशिक्षिततेची आणि सुसंस्कृततेची कुठलीही मर्यादा न ओलांडता प्रश्न विचारीत कुणी जर, ‘राजनीती बदलने आये है, जी!’ म्हणत ते वारंवार सप्रमाण सिद्धही करत असेल तर या सकारात्मक बदलाबद्दल, सर्व पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन, त्याचे अभिनंदन करणे हे देखील जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही व्यवस्थेतील स्वतंत्र देशाच्या सजग आणि जबाबदार नागरिकाचे कर्तव्यच आहे... नाही का?

राजधानीने घालून दिलेला धडा समजून घेऊन या खंडप्राय देशातील इतर राज्ये आणि त्या योगे संपूर्ण राष्ट्र तिचा कित्ता गिरवतील आणि लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी, निवडणूका जशा आणि ज्या मुद्यांवर लढवायला हव्यात तशा लढवतील ही अपेक्षा आणि आशा.

शुभम भवतु!

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०

पक्षी...!



उडून जाता चित्रातील रंग
उरावी मागे धुरकट नक्षी...
काळाच्या फांदीवर तसे
आपण सारे क्षणांचे पक्षी...!

रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

हे मना...



हे वेड्या मना...
किती स्वप्ने अन किती कामना
शोध घेशी तू आपुलाच का मना?

भरकटणारी वाळवंटी रेंगाळते वाट अशी,
आपुल्याच दरियातली तृषार्त लाट जशी!
गूढ कसले आहे अन दुविधा ही कसली,
वाटते सावली आहे उभी समोर ठाकली...

अंत ओढवल्यागत काय काळजी वाटली,
सांग या रितेपणी कुणाची ओढ दाटली?
जगणे हरवलेले आणि जाणीव दु:ख काढते,
सारं शांत भोवती हृदयी धडधड का वाढते?


साऱ्याच वाटांवर काटे, 
अन स्वप्नील हृदयी वेदना...
व्याकूळ सारेच भोवताली 
तू का एकला मना...?

हे वेड्या मना...
किती स्वप्ने अन किती कामना
शोध घेशी तू आपुलाच का मना?