रविवार, २८ मे, २०२३

सतीचे वाण...!


विनायक दामोदर सावरकर अर्थात तात्याराव या ओजस्वी प्रतिभेच्या युगपुरुषाने जे 
अलौकिक कार्य करून ठेवले त्यातील भाषाप्रभू महाकवी आणि विज्ञाननिष्ठ सुधारक ही त्यांची दोन रूपे मला अधिक भावतात. पैकी, सर्वगुणसंपन्न उत्कृष्ट काव्यप्रतिभेचा याहून अधिक भाषासमृद्ध, प्रतिभासंपन्न, आशयघन आणि तेजस्वी नमुना माझ्या पाहण्यात नसल्याने सावरकरांची २५ कडवी आणि १०० ओळींची "माझे मृत्युपत्र" ही संपूर्ण कविता...         

वैशाखिचा कुमुदनाथ नभात हांसे
यच्चन्द्रिका धवल सौधातली विलासे
घाली स्वये जल जिला प्रिय बाल खासे
जाई फूले चिमुकली नटली सुवासे ll १ ll

आले घरी सकल आप्त सह्रद जिवाचे
आनंदमग्न कुल गोकुल काय साचे
आदर्श दीप्ति-शुचिता-धृति यौवानांचे
पाहून जे तरुण मंडल कीर्ति नाचे ll २ ll

प्रेम हृदे विकसली नव-यौवनाच्या
गंधे सुवासित उदात्त सुसंस्कृतिच्या
दिव्या लता तरुसी जे गृह बाग़ झाला
ज्यां पौर हर्षित वदे जन "धर्मं-शाला" ll ३ ll

स्वयंपाक त्वां निजकरें कुशले करावा
प्रेमें तुझ्या अधिकची सु-रसाल व्हावा
संवाद सर्व मिळुनी करितां नितान्त
जेवावयासी बसलो जईं चांदण्यात ll ४ ll

श्री रामचंद्र वनवास कथारसाला
कीं केवीं देश इटली रिपु-मुक्त झाला
तानाजिचा समरधीर तसा पोवाडा
गावा चित्तोडगढ वा शनिवार वाडा ll ५ ll

झाली कशी प्रियकरा अपुली अनाथा
दुर्दास्यखिन्न शरछिन्न विपन्न माता
शोकें विवंचुनी तिच्या जईं मोचनाचे
केलें अनंत तरुणा उपदेश साचे ll ६ ll

तो काल रम्य मधुरा प्रिय संगती ती
ते चांदणे नवकथा रमणीय रात्री
ते ध्येय दिव्या निज मातृ-विमोचानाचे
तो उग्र निश्चयही ते उपदेश साचे ll ७ ll

झाल्या तदा प्रियकरा सह आण-भाका
त्या सर्व देवी वहिनी, स्मरति तुम्हां कां
"बाजीप्रभु ठरू" वदे युव संघ सर्व
"आम्ही चित्तोड़ युवती" युवती सगर्व ll ८ ll

कीं घेतले व्रत न हे अम्ही अन्धतेने
लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्ग माने
जे दिव्य-दाहक म्हणोनी असावयाचे
बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे ll ९ ll

ज्या होती ते प्रियजन सह आण-भाका
त्यांते स्मरोनी मग सांप्रत हे विलोका
नाही पूरी उलटली जरी आठ वर्षे
तों कार्यसिद्धि इतुकी मन का न हर्षे ?? ll १० ll

आसेतु पर्वत उचम्बळला स्वदेश
वीराकृति धरित टाकुनी दीनवेष
भक्तांचिया रघुपदी झुलतात झुंडी
जाज्वल्य होयही हुताशन यज्ञकुंडी ll ११ ll

तो यज्ञ सिद्ध करण्यास्तव उग्र दीक्षा
जे घेती येई तइं तत्कृतिची परीक्षा
"विश्वचिया अखिलमंगल धारणाला
बोला असे कवण भक्ष्य हुताशनाला ?" ll १२ll

आमंत्रण प्रभु रघुत्तम सोडितां हे
दिव्यार्थ देव !!! अमुचे कुल सज्ज आहे
हे साध्वी !! गर्जुनी असे पहिल्या हविचा
हा ईश्वरी मिळविला अम्ही मान साचा ll १३ ll

धर्मार्थ देह बदलो ठरले नितान्त
ते बोल-फोल बालिश नचि बायकांत
ना भंगली भिउनिया धृति यातनान्ना
निष्काम कर्मरति योग ही खंडिला ना ll १४ ll

ज्या होती तैं प्रियजना सह आण-भाका
केल्याची सत्य कृतिने अजि ह्या विलोका
दीप्तानलात निज मातृ-विमोचनार्थ
हा स्वार्थ जाळुनि अम्ही ठरलो कृतार्थ ll १५ ll

हे मातृभूमि तुजला मन वाहियेले
वक्तृत्व वाक्-विभव ही तुज अर्पियेले
तुंतेंची अर्पिली नवी कविता वधूला
लेखां प्रति विषय तूची अनन्य झाला ll १६ ll

त्वत्-स्थंडिले ढकलिले प्रिय मित्र-संघा
केलें स्वये दहन यौवन देह-भोगा
त्वत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा
तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा ll १७ ll

त्वत्-स्थंडिली ढकलली गृह-वित्त-मत्ता
दावानालात वहिनी नव-पुत्र-कांता
त्वत्-स्थंडिली अतुल-धैर्यनिष्ठ बंधू
केला हवि परम कारुण पुण्यसिंधू ll १८ ll

त्वत्-स्थंडिला वरी बळी प्रिय बाळ झाला
त्वत्-स्थंडिला वरी अता मम देह ठेला
हे काय बंधू असतो जरी सात आम्ही
त्वत्-स्थंडिलीच असते दिधले बळी मी ll १९ ll

संतान ह्या भारतभूमिस तीस कोटि
जे मातृभक्ति सज्जन धन्य होती
हे आपुले कुल ही तय मध्ये ईश्वरांश
निर्वंश होउनी ठरेल अखंड वंश ll २० ll

कीं ते ठरों ही अथवा न ठरो परंतु
हें मातृभू अम्ही असो परिपूर्ण हेतु
दीप्तानलात निज मातृ-विमोचनार्थ
हा स्वार्थ जाळुनि अम्ही ठरलो कृतार्थ ll २१ ll

ऐसे विवंचुनी अहो वहिनी !! व्रताते
पाळोनी वर्धन करा कुल दिव्यतेतें
श्रीपार्वती तप करीं हिम-पर्वती ती
कीं विस्तवात हसल्या बहुराजपुती ll २२ ll

तें भारतीय ललना-बल-तेज काही
अद्यापि या भरतभूमित लुप्त नाही
हें सिद्ध होइल असेंच उदार उग्र
वीरांगने !! तव सुवर्तन हो समग्र ll २३ ll

माझा निरोप तुजला येथुनी हाच देवी
हा वत्स-वत्सल तुझ्या पदी शीर्ष ठेवी
सप्रेम अर्पण असो प्रणति तुम्हांते
आलिंगन प्रियकरा मम अंगनेते ll २४ ll

कीं घेतले व्रत न हे अम्ही अन्धतेने
लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्ग माने
जे दिव्य-दाहक म्हणोनी असावयाचे
बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे ll २५ ll

आणि, या काव्यातील "...की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने..." या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पुष्ट्यर्थ, सावरकरांचे नातू सात्यकी यांचा विज्ञाननिष्ठ सावरकर हा लेख इथे वाचा.

रविवार, ७ मे, २०२३

नाळ...!


फुलाचा गंध मोहवतो
भ्रमराचं गुंजन वेडावतं
रानफूल व्हावं वाटलं किती,
नाळ तुटणं अवघड असतं...

तोडावे वाटतात सारे पाश
जगून घ्यावे वाटते निर्धास्त
नेमस्तपण आडवं येतं,
नाळ तुटणं अवघड असतं...

उद्याची मुळी चिंता नको
फक्त आज हरायचं नसतं
कालची खंत नको म्हणता,
नाळ तुटणं अवघड असतं...

भिरकावून द्यावे सारे संकेत
बंध सारे तोडून वहावे मस्त
लांघाव्या साऱ्या मर्यादा पण,
नाळ तुटणं अवघड असतं...

मनापासून हसलो तर
कुठलं ओझं अवजड नसतं
धाय मोकलून रडलो तर
नाळ तुटणं अवघड नसतं...!

सोमवार, १ मे, २०२३

...माझा !


कातळालाही बोलती करती लेणी
परंपरेचा वसा जणू पंढरीची वारी

बाणा रामशास्त्री अन् परखड वाणी
विवेक रक्षण्या लेखणीची मातब्बरी

शारदेचा वरदहस्त अन गंधर्वगान
गानकोकिळा शोभीवंत सूर-सागरी

फाळके-गदिमा-आचार्य अन पुलं-तें-नेमाडे  
खाशाबा-सचिन फडके पताका गगनावरी

उकडीचे मोदक मधुर पुरणपोळी सणावारी
वस्त्रांच्या महाराण्या राजस पैठणी नऊवारी

पसायदान, गाथा आणि शाहिरी
सर्वस्पर्शी आमची मुशाफिरी

गडकोटांचे भक्कम बुरुज ही खूण सुराज्याची 
जाणता राजा अन सुधारकांची फौज ही न्यारी 

इतिहास शौर्याचा तसा भक्तीचा
संस्कृतीची धुरा मराठी खांद्यावरी

सूज्ञ समावेशक आज्ञापत्रांचे पाईक होण्या 
महाराष्ट्र धर्म नांदत राहो समृद्धीच्या दारी...!

समस्त मराठी जनांस ६३व्या महाराष्ट्र दिनाच्या बाणेदार शुभेच्छा...!

रविवार, २३ एप्रिल, २०२३

उत्थान...!


जेत्यांचा इतिहास घडविण्याच्या नादात
जगाचा भूगोल बदलतो राहतो सतत
आणि घटना-पुनर्लेखनाच्या कर्मठपणात
परंपरेची जळमटं लटकत राहतात...

गैरसोयीच्या गोष्टींपासून पळ काढण्यासाठी 
नामांतराने विषयांतर साधत असेल,
पण म्हणून लोकसंख्येच्या विस्फोटाने  
लोकशाही समृद्ध होत नसते...

तरीही, वंशसातत्य या महत्वाच्या विषयात,
 शेजाऱ्याला मागे टाकून आपण पहिला नंबर काढला
आणि एकादशीच्या घरी शिवरात्र बोलावली
या सांस्कृतिक उत्थानाचे झेंडे मिरवू नये... 

...असे काही नाही !

रविवार, १६ एप्रिल, २०२३

#प्रिये

“As you write more and more personal 
becomes more and more universal.”

वपुंच्या 'पार्टनर' मधील या वाक्याची 'गुड रीड्स'ने 'क्वोटेबल क्वोट्स'मध्ये नोंद घ्यावी याचे जेव्हढे अप्रूप तेवढाच आनंद आणि अभिमान ! पण आज मुद्दा तो नाही. आज मुद्दा आहे व्यक्त होण्याचा.

नागराज म्हणतो,
'माझ्या हातात नसती लेखणी
तर असती छिन्नी, सतार, बासरी 
किंवा कुंचला... 
मी कशानेही उपसत राहीलो असतो
हा अतोनात कोलाहल मनातला...' 

याच धर्तीवर आज म्हणावसं वाटतंय, 
'माझ्या उरावर नसती देणी 
तर असती निरूपणं, स्फुटं, ललितं  
किंवा कविता...
मी निवांत व्यक्त होत राहिला असतो
मांडायला खळबळ जनमनातली...'

जगरहाटी आणि दुनियादारीच्या धबडग्यात हल्ली हे थोडे बाजूला पडतंय, मान्य. 
पण प्रत्येकवेळी आपलीच प्रतिभा पणाला लावून संवेदना मूर्त करायला हवी असा काही नियम नाही. आणि सॅटिसफॅक्शन नसतांना करत रहायला तो काही जॉब ही नाही. (बाय द वे, 'जॉब सॅटिसफॅक्शन' हे पण एक ऑक्सिमोरॉन असल्याचा शोध नव्यानेच लागला, ती ही एक उपरती !)

आपलीच भावना कुणी अधिक प्रभावीपणे व्यक्त केली आणि आपण तिच्याशी सबाह्याभ्यंतरी तादाम्य पावू शकत असू, तर अशा प्रतिभाविष्काराचे यथोचित श्रेय-नामोल्लेखासह प्रयोजन का असू नये...?

कवी नारायण पुरी यांची २०१७ मध्ये, #प्रिये ने सोशल मीडियावर गाजलेली 'प्रेमाचा जांगडगुत्ता' ही आत्यंतिक प्रामाणिक तथा मनस्वी कळकळ, काही नवीन संदर्भांसह ताज्या रूपात... 

शनिवार, १ एप्रिल, २०२३

अमर...?


'ही कविता मरत नाही' - या २२ जून २०२२ च्या पोस्टमध्ये विंदांनी त्यांच्या 'सब घोडे बारा टक्के...' या कवितेच्या सादरीकरणात त्या कवितेतील परिस्थती काही केल्या बदलत नसल्याने ती कविता मरत नसल्याची खंत व्यक्त केली होती. कवितेच्या भलत्याच अमरत्वाचे दु:ख विंदांनी मांडले.

कवी हा मर्त्य मानवच असल्याने त्याला मृत्यू अटळ आहे. पण विचार, फिलॉसॉफी आणि इंटेंशन कालातीत असल्याने ते व्यक्तीच्या मृत्यूनंतरही भूत बनून मानगुटीवर बसू शकतात. मग  आयुष्यभर सचोटीने जगलेल्या आणि व्यवस्थेत सुधार करण्याची जिद्द न सोडणाऱ्या 'आझाद'चा असा 'भूतनाथ' होतो आणि त्याला, '...जिसके पास डेसिग्नेशन है उसके पास इंटेंशन नहीं और जिसके पास सजेशन है उसके पास पोझिशन नहीं...' याचा विषाद वाटतो.

तथापि, मेल्यावरही समाजसेवेचा वसा सोडू न शकणाऱ्या अशा सजग नागरिकाची संभावना, 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद मिरवणारा व्यवस्थेचा अग्रीम प्रतिनिधी, "xxxxx याचं काही होत नाही, इसको मरनेके बादभी अकल नही आयी...!" अशी करतो... 

हेच अंतिम (आणि कालातीत ?) सत्य, बाकी जगत मिथ्या !

चालायचंच...?

बुधवार, २२ मार्च, २०२३

'गुढी उभारनी'


दोन वर्षांपूर्वीच्या
'कानूस...?' या बहिणाबाईंच्या बोलगीतांवरील पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे, कुठल्याही प्रकारचे प्रमाणीत डॉक्युमेंटेशन उपलब्ध नसल्याने, तुक्याची गाथा जशी लोकगंगेने तारली तशा बहिणाबाईंच्या रचना खान्देशाने आपल्या श्रुती-स्मृतींमध्ये जिवंत ठेवल्याने त्यांच्याबद्दल खात्रीने काही दावा करता येणे अवघड असले तरी त्यातील अस्सल माणूसपण आणि समृद्ध जाणिवां या निश्चित वैश्विक असल्याने त्यांच्या अभिजाततेबद्दल दुमत नसावे.

आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने बहिणाबाईंची, शुभेच्छांसोबत दरडावणारी आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही रचना, आजच्या - जाणिवा बोथट आणि भलत्याच संवेदना नको तेवढ्या टोकदार झालेल्या - काळात करण्याचे धारिष्ट्य कुणी करेलसे वाटत नाही. शिवाय, आपल्याच पोटच्या अपत्यांना, पाल्यांना देखील ओरडायची चोरी असणाऱ्या अधुनिक जीवनशैलीत, थेट समाजालाच चार गोष्टी ऐकवण्यासाठी (नीतिमत्ता, नैतिक अधिकार असली थेरं कालबाह्य झाल्याने) जी 'पुण्याई' लागते ती कमावलेला 'ऐसा कौन माईका लाल होगा...?'

तेव्हा आपल्याच भावना बहिणाबाईंनी १०० वर्षांपूर्वी व्यक्त केल्यात असे मानून म्हणू या...

आरंभ होई चैत्रमासीचा
गुढ्या-तोरणे सण उत्साहाचा

गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी

गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा

अरे, उठा झाडा आंग
गुढीपाडव्याचा सन
आतां आंगन झाडूनी
गेली राधी महारीन

कसे पडले घोरत
असे निस्सयेलावानी
हां हां म्हनतां गेला रे
रामपहार निंघूनी

आतां पोथारा हे घर
सुधारा रे पडझडी
करीसन सारवन
दारीं उभारा रे गुढी

चैत्राच्या या उन्हामधीं
जीव व्हये कासाईस
रामनाम घ्या रे आतां
रामनवमीचा दीस

पडी जातो तो 'पाडवा'
करा माझी सुधारनी
आतां गुढीपाडव्याले
म्हना 'गुढी उभारनी'

काय लोकाचीबी तर्‍हा
कसे भांग घोटा पेल्हे
उभा जमीनीच्या मधीं
आड म्हनती उभ्याले

आस म्हनूं नही कधीं
जसं उभ्याले आडवा
गुढी उभारतो त्याले
कसं म्हनती पाडवा ?

~ बहिणाबाई चौधरी

सोमवार, २० मार्च, २०२३

चिवचिवाट...?

चित्र: वैभव पुराणिक, नासिक 

चार वर्षांपूर्वी आजच्या जागतिक चिमणी दिवशी लिहिलेल्या 'चिऊताई...!' या पोस्टची आठवण झाली ती सन्मित्र शामने चिमण्यांची ठवण करून दिलेल्या इंद्रजित भालेराव यांच्या या हृद्य कवितेने...

बाप म्हणायचा काढलेली नखं
दारात कधीच नयेत टाकू
दाणे समजून खातात चिमण्या
आणि मरतात आतडी फाटू फाटू

सुगी संपली की बाप
देवळात नेऊन कणसं बांधायचा
सुगीत हाकललेल्या चिमण्यांसाठी
पाण्याचं मडकं बांधून पुण्य सांधायचा

पाखरं असल्या तरी ओळखायच्या
बापाच्या मनीचा भाव
तेव्हा सुगी संपली तरीही
चिमण्या सोडीत नसायच्या गाव 

अंगणातले दाणे टिपायला आता चिमण्या येत नाहीत कारण (प्र)गतीशील माणसाला ना अंगण उरलं ना त्यात बागडणाऱ्या चिमण्या. अलिकडे बाळाला घास भरवायला, जोजवायाला चिऊ-काऊची गरजच उरली नाही, मोबाईलवर क्लिक केलं की हव्या तेवढ्या चिमण्या आणि हवा तेवढा चिवचिवाट... असा आभासी संस्कार पिढी घडवेल...?

आजच्या 'मटा गोल्ड'मध्ये खुद्द चिमणीनेच 'काय चाल्लंय काय...' हा माणसाला पत्रातून विचारलेला प्रश्न ऐकून थोडतरी अंतर्मुख व्हायला होत का बघा...!

रविवार, १९ मार्च, २०२३

अप्रूप…!


माणूस संपर्कात येतो. व्यावहारिक कारणांनी परिचय होतो.
काही सामाईक गोष्टींनी ओळख वाढते. हळूहळू स्नेह जुळतो.
मग कधीतरी कुठल्यातरी विशिष्ट आवडीचे धागे जुळतात.
ती आवड अभिव्यक्तीशी निगडित असेल तर गुंतणे सुखावह वाटते.
आणि अभिव्यक्ती काव्यरूप असेल तर त्या नात्याचे वेगळेच अप्रूप…!

वय वाढत जाते तशी संवेदनशीलता वाढणे, मन हुळहुळे होणे, जाणीवा अलवार होणे स्वाभाविकच. पण वाढत्या वयात मनोव्यापारांच्या अभिव्यक्तीचे साधन नित्य जोपासणे सहजसाध्य नव्हे.
कारण उमेद, उन्मेष, उत्साह, ऊर्जा… सहसा तरुणाईशी संदर्भित अशी ही लक्षणे.
ज्येष्ठांच्या ठायी ती आढळली की वाटते ते अप्रूप…!

स्वतःच्या पंचाहत्तरीला स्वरचित ९५ कवितांचे सचित्र पुस्तक, अत्यंत कल्पक तथा समर्पक नामकरणासह, केवळ खाजगी वितरणासाठी प्रकाशित करून स्नेह्यांना ते कॅनव्हासच्या लिफाफ्यात कुरियरने धाडण्याची कल्पना केवळ कवीमनालाच सुचू शकते.
यासाठी लागणारी चिकाटी, शिस्तप्रियता, नियोजन कौशल्य आणि संयम हे अप्रूप…!

अशा आनंदयात्रीच्या स्नेह्यांच्या यादीत आपली वर्णी लागणे, एव्हढेच नव्हे तर, प्रस्तावना लिहिण्याच्या प्रस्तावाला, आपला वकूब आणि मर्यादा ओळखून दिलेल्या सविनय नकाराची व्यथा देखील एका कवितेतून व्यक्त करून, मनी कुठला सल न बाळगता, आता पुस्तकावरील अभिप्रायाची प्रतिक्षा देखील कवितेतून व्यक्त करणे याचे अप्रूप…!

आजकाल काहीही, कधीही, कुठेही आणि कसही साजरं करण्याचं सर्वत्र फोफावलेलं फॅड आणि ‘रीएलिटी’चाही ‘शो’ करणाऱ्या प्रच्छन्न दिखाऊ जगात, कुणीतरी काही विशिष्ट क्षण संस्मरणीय करण्यासाठी करत असलेला प्रामाणिक आटापिटा आणि तो 'लाईव्ह' अथवा 'व्हायरल' न करता निवडक स्नेह्यांसोबत, हितगुज करावा तसा, साजरा करण्याची कल्पना याचे अप्रूप…!

‘अविनाश भोसेकर सर’ या आमच्या, ‘सुमंत्रच्या विनयाताईंचे यजमान’ या रूपाने परिचित आणि यथावकाश सुपरिचित झालेल्या चिरतरुण स्नेह्यांनी त्यांच्या पंचाहत्तरी निमित्त संकलित, संपादित आणि प्रकाशित करून आम्हाला सप्रेम भेट केलेले त्यांचे चित्ररूप ‘अविनाशी कवितांकुर...' हे आजचे खरेखुरे अप्रूप…!

यातील सर्व कवितांचे रसास्वादन करून त्यावर एक स्वतंत्र पोस्ट लिहिण्याचा मानस आहेच. आज, आपण उपभोगत असलेल्या सुख-सुविधांच्या महिन्याच्या बिलांव्यतिरिक्त आणि आपणच ऑनलाईन ऑर्डर केलेल्या सामानाशिवाय, काहीतरी अनपेक्षित, आपल्या ताजेपणाने ‘मना’ला प्रफुल्लित करणारे आणि निर्व्याज सुखावणारे पार्सल डिलिव्हर झाले याचा जेव्हढा आनंद तेवढेच… अप्रूप !

सरांना अखंड 'कवितांकुरा'साठी प्रवाही प्रतिभेच्या आणि निरोगी दीर्घायुष्याचा 'अविनाशी' शुभेच्छा !

शुभम भवतु !

रविवार, ५ मार्च, २०२३

अगतिक...!


असंगाशी संग I प्राणाशी गाठ I
भरला काठोकाठ I पापकुंभ II

येई तारण्या I म्हणे युगंधर I
तो ही धुरंधर I संभ्रमित II

स्वार्थांध सत्ता I हेच एक सत्य I
ओशाळते नित्य I माणुसकी II

अधर्मी धर्म I राहतो उदास I
त्याचा अदमास I कुणालागी II

सारेच संत I सदाच दसरा I
चेहरा हसरा I अगतिक II

वाढो मानव्य I विवेकी जागृत I
प्रवाही पण मृत I दैवगती II

रंगात रंगूनी I ठोकली हाळी I
आली आली होळी I धूळधाण II

उन्हां कधी लाभो I भाग्य सावलीचे I
आर्त माऊलीचे I ऐकावे गा II