मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०२३

दश-हरा...!

 

कुठले सोने लुटायचे 
कुठली देवी पुजायची 
कसला उत्सव करायचा
कुठल्या सीमा उल्लंघायच्या...

याच्या सद्-विवेकाचा
दंभ-विकारावर  विजय...

हीच विजयादशमी... हाच दश-हरा...!

आत्मारामाने अहंकाराच्या विलयाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

शनिवार, १४ ऑक्टोबर, २०२३

बोध...!



जिंदा बाप कोई न पुजे,
मरे बाद पुजवाये |
मुठ्ठी भर चावल लेके,
कौवे को बाप बनाय ||

कांकर पाथर जोरि के,
मस्जिद लई चुनाय |
ता उपर मुल्ला बांग दे,
क्या बहरा हुआ खुदाय ||

मुंड मुड़या हरि मिलें,
सब कोई लेई मुड़ाय |
बार-बार के मुड़ते,
भेंड़ा न बैकुण्ठ जाय ||

जीवन में मरना भला,
जो मरि जानै कोय
|
मरना पहिले जो मरै,
अजय अमर सो होय ||

मैं जानूँ मन मरि गया,
मरि के हुआ भूत |
मूये पीछे उठि लगा,
ऐसा मेरा पूत ||

भक्त मरे क्या रोइये,
जो अपने घर जाय |
रोइये साकट बपुरे,
हाटों हाट बिकाय ||

जब लग आश शरीर की,
मिरतक हुआ न जाय |
काया माया मन तजै,
चौड़े रहा बजाय ||

- संत कबीर

रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

निरोप...!


'निघालास...?' 
'हो, थकलो. जातो आता.'
'बरंय, भेटू पुढल्या वर्षी!'
'प्रयत्न करतो, जमेलच असं नाही!'
'काय बोलतोस, 
तूच असं म्हणालास तर आम्ही अचकट-विचकट गाण्यांवर कुणापुढे नाचायचं...?'
'हा विचार त्यांनी करायचा ज्यांनी माझी अशी अवस्था केली!'
'त्यांनी म्हणजे कुणी, अशी म्हणजे कशी...?'
'किती प्रश्न विचारतोस, तुला भीती नाही वाटत?'
'वाटते ना म्हणून तर पार्थिवाला विचारतोय...!'
'तसा ऐकणार नाहीस तर तू...!'
'तू सांगून तर बघ...'

'त्यांनी म्हणजे ज्यांनी वि-सर्जनातल्या विवेक आणि विरक्ती ची विकृती केली...
त्यांनी म्हणजे ज्यांनी उत्सवातल्या उन्मेषला तिलांजली देऊन उन्मादाची सक्ती केली...
त्यांनी म्हणजे ज्यांनी सांस्कृतिक चळवळीला राजकीय शक्तिप्रदर्शनाचा आखाडा केला... 
त्यांनी म्हणजे ज्यांनी लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडला आणि भाविकांचे अंधभक्त केले... 
त्यांनी म्हणजे ज्यांनी देवाला सुपरहिरो, प्रार्थनेला फिल्मी केले आणि भक्तीचा इव्हेंट केला..
त्यांनी म्हणजे ज्यांनी अंधानुकरणाच्या बाळकडूने पिढ्या न् पिढ्या नासवल्या...
त्यांनी म्हणजे... जाऊ दे, तुला माझा हा विषाद सांगून काय उपयोग?
तू एक साधा सर्वसामान्य सहिष्णू संवेदनशील सपाट भारतीय... 
व्यवस्थेसाठी फक्त एक खर्चिक उपभोक्ता आणि मतिशून्य 'मत'...
तू त्यांचं काय करू शकणारेस?'

'देवा, मला असं अंडरएस्टीमेट करू नकोस, 
तू 'वेनस्डे' आणि 'सिर्फ एक बंदा काफी है' पाहिले नाहीस का रे?'
'हे कितीही फिल्मी वाटले तरी,
तुझ्या याच पॉझिटिव्ह थिंकिंग ने मला दरवर्षी पुन्हा येण्याची उमेद मिळते...!'
'मग, यायलाच लागेल तुला. 
दांभिक कितीही वाढले तरी तुला एकाही भाविकाला अंडरएस्टीमेट करून कसे चालेल...?'
'लब्बाड आहेस तू! जातो मी आता, राजवैद्यांना गाठायला हवं लवकर...'
'का रे? ऑल वेल...?'
'नथिंग सिरीयस रे, थोडे डोळे चुरचुरतायत आणि कानाला दडे बसल्यासारखं झालंय...!'
'तू पण ना देवा, 
उगाच सगळं डोळ्यात तेल घालून बघत बसतोस आणि कान देऊन ऐकतोस,
त्याचेच परिणाम आहेत हे...'
'हो का? मग तुझ्याकडे आहे का यावर काही उपाय...?'
'हो तर, आम्ही सगळे मर्त्य मानव झालो आहोत तसा हो की तूही...'
'कसा...?'
'बधीर...!'

रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

पोकळी...!


पोकळीने घेतली जागा स्वतःची
उत्सवाची सर्व गर्दी पांगल्यावर…

सन्मित्र शामने ‘मुसाफिर’ सदानंद बेंद्रे यांची ही अत्यंत दार्शनिक अल्पाक्षरी धाडली आणि तिच्या संपूर्णतेचा शोध घेतांना सापडले नचिकेत जोशींचे जागेच असलेले चांदणे.

अस्तित्वाच्या पूर्णतेच्या शोधात आपल्यापुरते आकलन झालेल्या जीवन-जाणिवा हेच अध्यात्म. कोहम् पासून सोहम् अर्थात अहं ब्रह्मास्मि पर्यंतचा प्रवास आणि नेति नेति ते इदं न मम याची प्रचिती हेच सामान्य संवेदनशील माणसाचे आत्मज्ञान. हे ज्ञान जेव्हा सभोवतालाची जाण आणि जगण्याचे भान देते तेव्हा त्या अनुभूतीची प्रचिती तथा अभिव्यक्ती भिन्न असली तरी त्यातील अंतस्थ सूत्र एकच असते याची जाणीव करून देणाऱ्या या गझल स्वरूपातील दोन रचना.

एक नचिकेत जोशी यांच्या ‘चांदणे जागेच आहे’ या त्यांच्या अलीकडे प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहातील...

एकटा आहे बरा मी, कोणत्या चर्चेत नाही
रात्र माझी, स्वप्न माझे झोप उसनी घेत नाही. 

मी तुझ्यावर प्रेम केले व्हायचे होऊन गेले
मी अशा क्षुल्लक चुकांना फार किंमत देत नाही. 

आखल्या रेषेत हल्ली बरसते आभाळ माझे
एकही वादळ आता त्याच्या सोबतीला येत नाही. 

आपुल्या नात्यास कोणी पाहिजे ते नाव द्यावे
ते तसेही कोरलेले या हातच्या रेषेत नाही. 

धूळ आहे, मळभ आहे, ही हवाही उष्ण आहे
उंच आकाशात उडण्याचा मनाशी बेत नाही. 

ताटवे फुलतात बाकी आजही बागेत माझ्या
फुल तू चुरगाळलेले आजही बागेत नाही. 

एक आहे विश्व माझे माणसांनी घेरलेले
फक्त मी सोडून का कुणी तुझ्या दुनियेत नाही. 

पालखी उठताच माझी दोन डोळे चिंब झाले
आणि विझण्याची तयारी माझी या राखेत नाही. 

वाहत्या गर्दीत माझा शोध घेणे व्यर्थ आहे
मुखवटे आहेत तेथे त्यात हा नचिकेत नाही.

आजची दुसरी गझल, आमचे सर्जक सन्मित्र डॉ. सचिन चिंगरे यांच्या 'एक नाजायज प्रिस्क्रिप्शन...' या मुक्तछंदातील प्रकटनाचे एक्स्टेंशन वाटणारी आणि भावगर्भिततेत नचिकेत जोशींच्या गझलेशी जुळी भासणारी पण केवळ आत्ममग्नतेत न रमता, डॉक्टरांच्या नेहमीच्या सर्वव्यापी आणि सर्वसाक्षी विचक्षण परिप्रेक्ष्यानुसार एकूणच मानव्यावर भाष्य करणारी...

इतके मिळवल्यावर कळते जगण्याला इतके लागत नाही
भरुन पावते तन बिचारे बुभुक्षा द्वाड मनाची भागत नाही.

लख्ख उजेडाची रात ही डोळ्यांनी उघड्या लोक झोपती
दिवस काळेकुट्ट तरी कुणी मिटून डोळेही जागत नाही.

कुठून शिकला मानव नकळे सराईत रोबोटता चलाख ही
राहिला ना मित्र मित्रासम शत्रूही शत्रूसम वागत नाही.

बेल वाजते उघडतो दरवाजा तितकेच सवयीचे खुले अल्पस्मित
पांढरपेशा शहरी नशिबी कडकडून गळाभेटीचे स्वागत नाही.

मुकाट मरतो रोज जितेपणी लोकतांत्रिक मरण मतदाता राजा
धनुष्य मोडले तोफा विझल्या आग कुणीच डागत नाही.

हवे लबाडांना रुपये चैनीला हा याचनेचाही धंदा झाला
व्रतस्थ माधुकरी, पोटार्थी भिक्षा कुणी मागत नाही.

या दोन्ही रचना एकत्र सादर करण्यामागे तुलना अथवा स्पर्धेचा भाव नसून रविवारच्या काव्यमैफिलीचा नमुना पेश करण्याचा मानस आहे. शिवाय ‘मुसाफिर’सह तीनही कविवर्यांची आणि अर्थात शामचीही अनुमती गृहीत धरलेली आहे, कुणाचीही याविषयी हरकत नसेल ही अपेक्षा !

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३

वरदान...!



जवळपास १५ वर्षांपासून ही खंत व्हायरल होते आहे. दर वर्षी गणेश चतुर्थीला तर तिची हमखास आठवण येते. 'इत्यादी'वरच ही वेदना आजपर्यंत दोनदा प्रकटलीय, आज तिची ही तिसरी वेळ. याची कारण दोन - 

एक म्हणजे, दिवसेंदिवस समाजाच्या भौतिकतेत भौमितिक प्रमाणात वाढणाऱ्या रुची आणि वृद्धीने या देव आणि भक्ताच्या काल्पनिक संवादातील समर्पकता वाढून या अभिव्यक्तीतील विषाद अधिकच गहिरा होत चाललाय. 

दुसरे असे की, काव्यशास्त्र तथा पद्याच्या यमनियमात चपखल बसणारी ही काव्यरचना नसली तरी तिचा आशय-विषय आणि भाव-भान हे थेट काळजाला भिडणारे असल्याने त्याची 'प्रेरित' अथवा 'संपादित' आवृत्ती बनविण्याची गरज नाही.

तेंव्हा, या रचनेच्या अज्ञात कर्त्याला पुन्हा एकदा शतश: नमन करून आणि माऊलींच्या 'जो जे वांच्छिल तो ते लाहो, प्राणिजात' या पसायदानास स्मरून, त्याने देवाकडे मागितलेले वरदान सकळ मानव जातीस लाभो ही बाप्पाचरणी प्रार्थना ! 

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
'दोन क्षण दम खातो' म्हणून माझ्या घरी टेकला
'उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला'
मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला…

तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस?
मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस?
मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक…

'इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो
काय करू आता सार मॅनेज होत नाही
पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाही

इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सिस्टीम झालीये हॅंग
तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग
चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात'

माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन
मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन
एम बी एचे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे?
डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस का रे?

असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेउन टाक
तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक
म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको
परत येउन मला दमलो म्हणायला नको

माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्प झाला खुश
'माग' म्हणाला 'हवं ते एक वर देतो बक्षिस
सी ई ओ ची पोझिशन, टाऊनहाऊस ची ओनरशिप
ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप'

मी हसलो उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं?

'पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं'
'सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं'
'हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव'
'प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव'

'देशील आणून परत माझी हरवलेली नाती'
'नेशील मला परत जिथे आहे माझी माती'
'इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं'
'आईबापाचं कधीही न फ़िटणारं देणं'

'कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर'
'भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार'
'य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान'
'देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान?'

"तथास्तु" म्हणाला नाही सोंडेमागून नुसता हसला,
सारं हाताबाहेर गेलंय पोरा… "सुखी रहा" म्हणाला !

या रचनेचा रचयिता जसा आजवर अज्ञात आहे तद्वत सदर रचना निनावी असल्याने, हत्ती आणि आंधळ्यांच्या गोष्टीनुसार ज्याला जो बोध झाला किंवा जो भाव भावला तसे नामकरण या रचनेच्या नशिबी आहे. माझे गेल्यावेळचे आकलन हे 'दहा दिवसाच्या खातिरदारीनंतर भक्त बाप्पाची त्याच्या संदेशासह बोळवण करतात म्हणून बाप्पाने नुसत्या आशिर्वादावर भक्ताची बोळवण केली...' असे असल्याने तेव्हा मी 'बोळवण' असे बारसे केले होते तथा आज मला यातील आशेची उमेद अधिक भावल्याने आजचे या रचनेचे नाव आहे... 'वरदान...!' 

काव्यरसिकांना, याच संदर्भातली माझी 'ऐकतोयस ना...?' ही एका फोटोवरून सुचलेली रचना इथे वाचता येईल.

शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३

आशा...!


"गुलजार, आरडी आणि आशाताई या त्रिवेणी संगमाच्या स्निग्ध प्रवाहात जे मोती वेचले त्यातील ‘मेरा कुछ सामान...’ हा शीर्षस्थ शुभ्र मौक्तिक. याच्या तोडीचे पुन्हा कधी आयुष्यात मिळेल, गवसेल, लाभेल असे काही वाटले नव्हते. पण या आमच्या गोताखोर स्नेह्यांनी पुन्हा एकदा कलासागरात डुबकी मारून काढले काय तर हे अमृत... “तुमुल कोलाहल कलह में मैं ह्रदय की बात रे मन...” आता याबद्दल या माणसाचे आभार कसे मानावे...?"

एप्रिल २०१९ मध्ये लिहिलेल्या या 'कोलाहल' पोस्टचा विषय बोजड, तत्वचिंतनात्मक धाटणीचा असला तरी त्याला सुभग, सुनीत आणि सुश्राव्य करणारा मोहक स्वर काल ९० वर्षांचा झाला. लतादीदींचा स्वर अलौकिक, दैवी तथा असामान्य होता हे निर्विवाद पण आशाताईंनीच एका मुलाखतीत साभिनय (मिमिक्री हा आशाताईंचा आणखी एक कलागुण ज्यास म्हणावा तसा वाव मिळाला नाही) सांगितले तसे, लतादीदींचा स्वर हा देवघरातल्या समईसारखा सात्विक, स्निग्ध आणि सालस होता त्याला, 'दम मारो दम...' चा ठसका जसा झेपला नसता तशी 'रात अकेली है...' मधले उन्मादक आव्हानही पेलवले नसते आणि 'मेरा कुछ सामान...' च्या मुक्तछंदातला छांदिष्टपणाही मानवला नसता. या सगळ्यांना अक्षरश: पुरून उरणारा एकमेव आवाज म्हणजे आशा भोसले !

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही कदाचित गायन प्रकारात एकमेव असलेल्या या गांधर्वकन्येने सुमारे २० भाषांमध्ये ११,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केल्याची नोंद २०११ सालातील आहे. पुढील १२ वर्षात त्यात अजून किती भाषा आणि गाणी यांची भर पडली असेल हे एक तो मंगेशीच जाणे ! आजही स्टेजशो करण्याची उर्मी, ऊर्जा आणि उत्साह असलेल्या या चमत्काराचे नाव 'आशा' शिवाय निराळे काय असू शकले असते...! 

थेट सचिनदा, ओ पी नय्यर, खैय्याम पासून पंचम, इलायाराजा, ए आर रहमान पर्यंत अशी दिग्गज संगीतकारांची आणि, 'पिया तू अब तो आ जा...' अशा उन्मादक पासून 'इन आँखोंकी मस्ती...' अशा आव्हानात्मक, ते मराठीतील, 'जिवलगा राहिले दूर घर माझे...' अशा आर्ततेची रेंज पदरी बाळगणारी आणि तेवढ्याच डौलाने मिरवणारी आशा काल नव्वदीची झाली असे तिला बघून कुणालाही पटणार नाही ! म्हणूनच विंदांच्या शब्दात थोडा बदल करून सांगायचे तर,

'आशा'त आजच्या ही गाणे असे उद्याचे,
स्वप्न चिरंतनाचे इतकेच जाणतो मी...!'

बाय द वे, उडत्या, फिल्मी गितांशिवाय क्लासिकल अर्थात शास्त्रीय प्रकारात आशाने फार काही केले नाही असे मानणारे वेळ काढून वरील अल्बममधील चीजा जरूर ऐकतील ही...आशा !

आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृङ्खला । 
यया बद्धा: प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङ्गुवत् ॥

सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

बोझा...!

नसरुद्दीन जंगल में लकड़ी काटने गया था।

दिन के अंत में, उसने लकड़ियों का बंडल बनाया, लेकिन गट्ठर को गधे पर रखने के बजाय, उसने बंडल को अपने सिर पर रख लिया। फिर वह गधे पर चढ़ गया और शहर में चला गया।

“नसरुद्दीन!” उसका एक दोस्त चिल्लाया। “तुम लकड़ी का गट्ठर अपने सिर पर क्यों ले जा रहे हो? क्या इससे दर्द नहीं होता?”

"इससे दुख होता है," नसरुद्दीन ने स्वीकार किया, "लेकिन मैं भार साझा करने में मदद करना चाहता था।"

“मुझे अभी भी समझ नहीं आया,” नसरुद्दीन के दोस्त ने हैरान होकर कहा।

“गधा मुझे ले जा रहा है,” नसरुद्दीन ने समझाया, “लेकिन मैं लकड़ी ढो रहा हूँ।”

----------------------------------------------------------

“इस कहानी के सभी पात्र और घटनाए काल्पनिक है, इसका किसी भी व्यक्ति या घटना से कोई संबंध नहीं है। यदि किसी व्यक्ति या प्राणी से इसकी समानता होती है, तो उसे मात्र एक संयोग कहा जाएगा।”

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

रानकवी... गानकवी !


आम्ही शाळेत असतांना एकमेव करमणुकीचे साधन म्हणजे रेडिओ. या उपकरणाला कारण माहित नसतांना उगाचच ट्रान्सिस्टर म्हणण्याचीही फॅशन त्या काळी होती. समस्त जगात काय चाललेय हे सांगणाऱ्या बातम्यांपासून चित्रपट गीते, भावगीते, आणि 'नभोनाट्य' असे भारदस्त नाव धारण करणारे श्रवणीय नाटक असे मनोरंजनपर कार्यक्रम यातूनच आमचे सामाजिक भान, सांस्कृतिक जडणघडण आणि वैश्विक आकलन यांचे संवर्धन होत असे. आजच्या 'चाट जीपीटी' तंत्रज्ञानाच्या आवाक्याने च्याट्म चाट पडण्याच्या जमान्यात आमची वाढ खुजी वाटत असली तरी ती निकोप होती आणि आमच्या नेमस्त 
आयुष्याला पुरली देखील !

तर या आकाशवाणीवर मराठी गीतांच्या कार्यक्रमात अनेकदा लागणारे एक ठेकेबाज गाणे आम्हाला फार आवडायचे, ते म्हणजे - 'जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी..!' यातील शब्दांचा ग्रामीण बाज, दोन्ही गायकांनी लावलेला सूर आणि घोळवलेले स्वर, त्याला अधिकच परिणामकारक करणारी पारंपरिक वाद्यांची साथ आणि एकूणच श्राव्यानुभव अधिकच समृद्ध करणारा अफलातून कोरस... या साऱ्याची संस्कारक्षम 'मना'स भूल पडली नसती तरच नवल. हे 'मना'वर गारुड करणारे गीत कुणी लिहिले आहे याची बालसुलभ कुतुहूलाने चौकशी करता आमच्या अबोध साहित्यिक जाणिवेत भर पडली एका नावाची - ना. धों. महानोर ! ही आमची आणि त्यांची पहिली ओळख. पण ती गाण्याच्या माध्यमातून झाल्याने आमच्यासाठी त्यांची पहिली ओळख 'गानकवी' !

ग्रामीण जीवनाबद्दलचे आमचे निमशहरी भान हे शेती, बैलजोडी आणि बैलगाडी यापुरते मर्यादित असल्याने आणि ग्रामीण कवितेचा आमचा पैस विठ्ठल वाघांच्या, 'काळ्या मातीत मातीत...' याच्या पलीकडे पोहचत नसल्याने, शंकर पाटलांची खरीखुरी ग्रामीण कथा जशी आम्हाला उशीराने भेटली, तसेच रानवाटा दाखविणारे ना. धो. हे 'रानकवी' आहेत ही यथावकाश झालेली बोधी !

'जैत ते जैत' हा अनेक कारणांसाठी कायमच आमचा आवडता राहिलेल्या चित्रपटातील गेय गीते, बोल गाणी ही याच रानकवींनी लिहिली आहेत एवढी शिदोरी त्यांच्याशी नाळ जुळायला पुरेशी होती. पुढे आम्ही 'किशोर' वयातून 'कुमार' वयात आलो तसे, 'गोऱ्या देहावरती कांती...', 'नभं उतरू आलं...', 'घन ओथंबून येति...', 'चिंब पावसानं रान झालं आबादानी...' पासून थेट, 'भर तारुण्याचा मळा', 'राजसा जवळी जरा बसा...' अशा बैठकीच्या लावण्यांपर्यंत गानकवी आमचे दैवत झाले नसते तरच नवल !

पण याही साऱ्या, आकाशातली नक्षत्र खिशात घेऊन फिरण्याच्या मोरपंखी काळात, विंदा, कुसुमाग्रज, बाकीबाब यांच्यासह  कबीर, रुमी, गालिब आम्हाला भुरळ घालत असतांना आमच्या अलवार 'मना'वर फुंकर घालायला आला डॉ. जब्बार पटेलांचा 'मुक्ता' ! 'जैत रे जैत' नंतर तब्बल १६ वर्षांनी या अत्यंत क्रिएटिव्ह जोडगोळीने पुन्हा एकदा रानकवितांची मेजवानी दिली. मुक्ता मध्ये सोनाली, अविनाश, विक्रम गोखले यांच्या अभिनयाच्या तोडीचे किंबहुना अधीकच भुरळ घालणारे काही असेल तर ती सगळी गीते आणि मधून मधून सुकामेव्यासारख्या पेरलेल्या कविता. जयश्री शिवराम यांच्या अत्यंत वेगळ्याच धाटणीच्या करकरीत आवाजाने सजलेल्या 'जाई जुईचा गंध मातीला...' या गीताच्या सुरवातीचे आलाप कधीही केव्हाही कानावर पडले तर अंगावर सरसरून काटा येतो. यात आवाजाची जादू आहे हे नि:संशय पण मुळात ते शब्द तेवढे काळजाचे ठाव घेणारे नसते तर हा परिणाम साधलाच असता असे नाही. बघा कसे आहेत ते शब्द...


एकेका शब्दात आणि रूपकात एवढी ताकद आहे की याला कविकल्पना म्हणावे की सकल मानवी जीवनाचा 'नैसर्गिक' साक्षात्कारी दृष्टांत, असा प्रश्न पडावा. आणि हे झाले फक्त प्रसिद्धी पावलेल्या गीतांबद्दल. महानोरांच्या साऱ्याच काव्याविष्काराचा समग्र धांडोळा घ्यायचा तर ही जागा अपुरी पडायची आणि असे धाडस करू म्हणणाऱ्या पामराच्या मर्यादित व्यासंगाचे पितळ उघडे पडायचे. 

काल ना. धों. महानोर नावाच्या रानकवीने अखेरचा श्वास घेतला, आपल्या अवीट गोडीच्या अफाट रानमेव्याचे असीम भांडार मागे ठेऊन. ज्याच्या प्रत्येक उद्गारात निसर्ग आणि विशेषतः पाऊस कायम ओसंडून वाहत राहिला त्याला देहातून मुक्त करण्यासाठी निसर्गाने चिंब पावसाळी वेळच निवडावी याला नियती म्हणावे की निसर्गाची काव्यत्मकता...?

आमच्यासाठी गानकवी असलेल्या या कविश्रेष्ठास आम्हांला प्राणप्रिय असलेल्या 'मुक्ता'मधील त्यांच्या एका नितांत सुंदर आणि अत्यंत रोमांचक पावसाळी कवितेची शब्दांजली...

मन चिंब पावसाळी, झाडांत रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले

पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी
शिडकाव संथ येता झाडें निळी कुसुंबी

घरट्यात पंख मिटले झाडांत गर्द वारा
गात्रांत कापणारा ओला फिका पिसारा

या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे

रानात एककल्ली सुनसान सांजवेळी
डोळ्यांत गल्बतांच्या मनमोर रम्य गावी

केसांत मोकळ्या त्या वेटाळुनी फुलांना
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे

मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यांत गुंतलेले.

मंगळवार, २५ जुलै, २०२३

शिरिषासन...!

बरोब्बर ५ वर्षांपूर्वी ६ जून २०१८ ला शिरीष कणेकर सरांना याच ठिकाणी त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त शतायुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या, त्यांच्याबद्दल इतक्या लवकर असं काही लिहावं लागेल असं दु:स्वप्नातही वाटलं नव्हतं. अर्थात कालाय तस्मै नमः म्हणून साऱ्याच गोष्टी पचवाव्याच लागतात. अलीकडेच लिहिले तसे, घेतलेला श्वास सुद्धा धरून ठेवता येत नाही, आवडत्या गोष्टीही त्यागाव्या लागतात, एवढेच काय, प्राणपणाने जपलेल्या आणि साऱ्यांचा रोष पत्करून घट्ट धरून ठेवलेल्या तत्त्वांना देखील मुरड घालावी लागते तर आवडती माणसं कशी धरून ठेवता येणार...?

ज्या माणसांनी आपलं आयुष्य केवळ सुसह्यच नाही तर समृद्ध केलं आणि आपल्या नेहमीच्या 'पाणक्या'च्या जगण्याला काही क्षण का होईना 'चाणक्या'च्या अविर्भावाची झळाळी दिली त्यांच्या जाण्याचा त्रास होणे स्वाभाविक असले तरी, त्यांनी आपल्या आयुष्यात येऊन अजरामर करून ठेवलेल्या क्षणांचे आणि केव्हाही त्यांच्या सहवासाचा लाभ घेता येईल अशा शब्दरूपी खजिन्याचे सान्निध्य-सौख्य नाकारून कसे चालेल?

कणेकर सरांबद्दल लिहिण्यासारखे अजूनही खुप काही असले तरी, त्यांच्या एकूणच मिश्किल, खोडसाळ, 'लगाव बत्ती' म्हणत 'चहाटळकी' करणाऱ्या लिखाणात त्यांनी कधीतरी असे जे गंभीर, आत्मचिंतनपर लिहिले ते 'मना'ला जास्तच भिडले. आता ते 'ये हृदयीचे ते हृदयी...' या तादाम्यामुळे की त्यातील 'करुणे'च्या स्पर्शाने ते सांगता नाही येणार! 

'डॉ. कणेकरांचा मुलगा'मध्ये त्यांनी आठवण सांगितली की त्यांचे वडील त्यांना म्हणायचे, 'मिस्टर शिरिष, एवढं लिहिता तुम्ही, पण वाचतं का कुणी?' याच आत्मकथनात त्यांनी लिहून ठेवलयं - 'डॉ. कणेकरांचा मुलगा एवढीच माझी आयुष्यभर ओळख राहिली आणि एवढी ओळख मला एका आयुष्याला पुरली देखील...!' 

आयुष्यात भेटलेल्या माणसांबद्दल, मित्रांबद्दल ते लिहितात, ‘देवानं नामी नग जन्माला घातलेत. मला त्यांचा आणि त्यांना माझा सहवास घडवून देवानं आमच्यावर अनंत उपकार केलेत. आम्ही सगळे मिळून जगात धुमाकूळ घालीत असू. देवाच्या सर्कशीतले आम्ही विदूषक आहोत. आम्ही हसवतो. आम्हांला हसतात. आम्ही अश्रूंना पापण्यांवर रोखून धरतो. घुसखोरी करू देत नाही. आम्हांला इरसाल म्हणा, वाह्यात म्हणा, नग म्हणा... आयुष्याचं ओझं वाहण्यासाठी असे साथीदार हवेत.’      

आणि शेवटी, जिवंतपणी आपल्या मृत्युलेखाची कल्पना करणारा हा अवलिया लिहून ठेवतो...

"माझा एपिटाफ लिहायचा झालाच तर लिहा की प्रत्यक्ष मरण येण्यापूर्वी हा माणूस खुप आधीच मेला होता, फक्त ही गोष्ट त्याने जगापासून लपवून ठेवली..."  

शिरीष कणेकरांना श्रद्धांजली वैगरे लिहिणे फारच अवघड वाटते तेंव्हा, '...तुझिया जातीचा मिळो आम्हां कुणी...' आणि 'तुमचा वसा आम्हां मिळो, सांभाळता येवो...' या प्रार्थनेपलीकडे फार काही लिहवत नाही...

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावकः। 
न चैनं क्लेदयन्त्यापो 
न शोषयति मारुतः।I

शिरीष कणेकर सरांबद्दल आंतरजालावरील काही दुवे :  

https://www.saamana.com/author-journalist-shirish-kanekar-80th-birthday-on-6-june/
https://eetyadee.blogspot.com/2018/06/102-not-out.html
https://www.esakal.com/saptarang/atul-parchure-write-article-saptarang-121107
https://prahaar.in/the-name-shirish-kanekar-is-enough/
https://www.esakal.com/saptarang/miliind-ghangrekar-wrtie-article-saptarang-121095
https://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118327.html?1161380086
http://shireeshkanekar.blogspot.com/
https://en.wikipedia.org/wiki/Shirish_Kanekar

गुरुवार, २० जुलै, २०२३

'सुशि'...!




११ जुलै ला 'सुशि'ला जाऊन २० वर्षे झाली. 

काल 'दुनियादारी' या संजय जाधव यांच्या मराठी चित्रपटाला १० वर्षे झाली. 

'वाढत्या' वयामुळे काळ फारच भरभर सरकतो आणि 'रात ढल जाये पर दिन ना जाये...' अशी परतवारीची प्रचिती प्रबळ होत राहते. अगदी कालच लिहिल्यासारखी वाटणारी 'दुनियादारी' ही पोस्ट आज दहा वर्षांची झाली. ही पोस्ट लिहिण्याचे निमित्त ठरलेल्या दिपक दादा आणि, आज याची आठवण करून देऊन 'इगो-वाईज'वरील या पोस्टचा दुवा 'इत्यादी'वर देण्याचे निमित्त ठरलेले सहकारी डॉ. नितीन जाधव, यांचे 'मना'पासून आभार ! 

खरं तर सुशिच्या 'समांतर'वर वेबसेरीज बनविण्याचा सतीश राजवाडेंचा धाडसी प्रयोग कसा 'सम अंतर'च राहिला आणि प्रेक्षकांशी सोडा, कथेशीही तादात्म्य कसा पावू शकला नाही या वरही एक पोस्ट लिखना बनता है. पण असे प्रयोग, ज्यांना 'सुशि' नावाचे गारुड काय आहे याची कल्पनाही नाही त्यांना 'सुशि'ची निदान तोंडओळख होण्यासाठी 'निमित्तमात्र' ठरतेय म्हणतांना अशा धाडशांचे (खलाशांच्या धर्तीवर) स्वागतच करायला हवे.  

समग्र 'सुशि' समजणे येरागबाळ्याचे काम नोहे आणि ते 'जाता... येता' इतके सहजसाध्यही नव्हे, नुसतीच 'लटकंती' व्हायची ! तरी 'सुशि'च्या रेंजची साधारण 'झलक' मिळण्यासाठी वाचायची पुस्तके:
१. दुनियादारी (उपरोल्लेखित चित्रपट पाहणे हा पर्याय नाही!)
२. समांतर (पहा: वरील सूचना, वेब सिरीज नव्हे!)
३. तलखी 
४. कल्पांत 
५. लटकंती 
६. दास्तान
७. वास्तविक       

'सुशि'ला लौकिकार्थाने ऐहिक जगातून जाऊन २० वर्षे झाली असली तरी त्याचे निकट सान्निध्य जाणवून देतो तो त्याने मागे ठेवलेला 'खजिना'. मनावर 'क्रमशः' 'बरसात चांदण्याची' करीत 'क्षण क्षण आयुष्या'तले 'मूड्स' आणि 'शेड्स' सांभाळीत 'असीम' 'अंमल' करणाऱ्या आणि कठीणातल्या कठीण प्रसंगीही 'हाSत तिच्या' 'एवरीथिंग... सोSसिम्पल' वाटेल असा 'माहौल' बनविणाऱ्या 'उस्ताद' सुशि नावाच्या 'मानवाय तस्मे नमः' असाच भाव 'सुशि'च्या चाहत्यांच्या 'मना'त 'कणा कणाने' फुलत राहतो...

किशोरदा, अमिताभ पासून नवाज, सचिन पर्यंत, जे 'आपले' वाटतात त्यांचाबद्दलच्या स्नेहादरात कुठेही कसर न करताही ज्यांचा, मानभावी आदरपूर्वक उल्लेख टाळून, सहजभावाने एकेरी उल्लेख होतो त्या यादीत 'सुशि'चे स्थान केवळ उच्चच नाही तर अढळ ! 'आदरणीय सुहास शिरवळकर' असे म्हणणे म्हणजे, बायकोला 'हर हायनेस' किंवा 'माय लॉर्ड' संबोधीत वेडावून दाखविल्यासारखे कर्णकटू वाटते. किशोर जसा आपला, सचिन जसा आपला तसा 'सुशि'ही आपलाच. या लोकांचे आपल्या मनातील स्थान आणि वय दोन्ही अबाधीत, जणू गोठवून (आणि साठवूनही) ठेवलेले... कालजयी !

तेंव्हा 'सुशि'चा मुलगा असला तरी श्री. सम्राट सुहास शिरवळकर यांचा नुकताच झालेला परिचय हा त्यांना थेट अरेतुरे करण्याइतपत मुरलेला नसल्याने तिथे संस्कार आडवे येतात. यांवर खुद्द 'सुशि' काय म्हणाला असता यावरचे कट्टामंथन उद्बोधक ठरावे. तेही 'सुशिप्रेमेच्छा बलीयसी...!' या लघुसूक्तानुसार लवकरच घडेल ही अपेक्षा !

सुशिच्या संपूर्ण लेखनसूचीसाठी हा ब्लॉग पहा:
http://suhasshirvalkar.blogspot.com/