रविवार, २६ जून, २०२२

परतवारी...!


दिसावा असा उंबरा
जेथे टेकवावा माथा
लोकगंगा तारेल ती
लिहिता यावी गाथा...!

त्याच्या सावळ्याशा
रंगात रंगूनी जावे...
कान्ह्याची ती बासरी
मीरेचे घुंगरू व्हावे...!

मन व्हावे मुक्त असे
नको खेद नको हर्ष
एकातरी उद्गाराला
होवो तुक्याचा स्पर्श...!

गजर पडता कानी
हरीनाम मुखी यावे
भक्तीच्या रिंगणात
पावली नाचून गावे...!

दरवर्षी सुख पहावे
अशी घडावी वारी
तिच्या तोलामोलाची
साधावी परतवारी...!

वैष्णवांचा लाभो वसा
देहात पंचप्राण ल्यावे
पाऊली चाल चालता
जगण्याचे सोने व्हावे...!

सन्मित्र दिनेशला एकावन्नाव्या वाढदिवसाच्या अध्यात्मिक शुभेच्छा ...!

बुधवार, २२ जून, २०२२

शनिवार, ४ जून, २०२२

श्रद्धेय...?


साऱ्याच दिव्यांच्या नशिबी
लख्ख पेटती वात नाही...
अन् एकदाच भोगून संपेल
अशी कुठलीच जात नाही...!

वाऱ्यास ना लाभे विसावा
वेळेस धरण्या हात नाही...
पाण्यास वाहणे निरंतर
साचण्यात ती बात नाही...!

पालवी पानगळीची ग्वाही
पक्षी ऋतुविना गात नाही...
चवबदल करण्यास काही
साप टाकीत कात नाही...!

सोहळे आवाजी मोठे
न्यूनावर मात नाही...
गोंधळ बाहेर घातला
पण संवाद आत नाही...!

शास्त्रार्थात बद्ध महाबळी
स्वयंभू तोही जन्मजात नाही
सक्ती असेल साधूमहंतांस
श्रद्धेय असे काही यात नाही...!

शनिवार, १४ मे, २०२२

आवाज कुणाचा...?


मुल्ला नसिरुद्दीन तातडीच्या कामासाठी गावातून चालला होता. वाटेत मासळी बाजार लागला. तिथे ही तोबा गर्दी. नुसती झुंबड उडालेली. जिकडे तिकडे आरडाओरड. सगळेच तारस्वरात बोलतायत. कुणाचा कुणाला पत्ता नाही. अन अशा गदारोळात मुल्ला अचानक खाली बसला आणि अंथरायला काही मिळतंय का शोधू लागला.

त्याच्या आजूबाजूची माणसं चक्रावली. या बाबाला काय झालं म्हणून विचारू लागली.
तर मुल्ला म्हणाला,
'नमाज का वक्त हो चला है, उसीका इंतजाम कर रहा हूँ!'
'आपको कैसे पता चला नमाजका वक्त हो रहा है?'
'क्यूँ? मस्जिदसे अजानकी आवाज नहीं सुनाई पडी?'
'मुल्लाजी, यहाँ अपने बाजूवाला क्या बोल रहा है सुन नहीं सकते इतना शोरगुल है, आपको कोसो दूर मस्जिदकी अजान कहाँसे सुनाई दी?'

मुल्ला उठून उभा राहिला. खिशातून एक नाणे काढले. टॉस करावे तसे हवेत उंच उडविले. बाजाराच्या थंडगार दगडी फरशीवर नाणे टणकन आपटले आणि त्याचा खणखणीत आवाज सगळीकडे घुमला. रणधुमाळी माजलीये असं वाटणाऱ्या बाजारात क्षणात स्मशानशांतता पसरली. साऱ्या माना आवाजाच्या दिशेने वळल्या. सगळेच आपापले खिसे चाचपून बघत भिरभिरत्या नजरेने पडलेल्या नाण्याचा शोध घेऊ लागले.   

...आणि या अचानक स्तब्ध झालेल्या बाजारात मुल्लाने दिलेले उत्तर बराच वेळ रेंगाळत राहिले... 

'बेटा, आवाज वोही सुनाई देती है जहाँ ध्यान लगा हो...!' 

-------------------------------------------------------

गोंगाटाला नसतोच धर्म
चिथावणीचा कुठला रंग,
कायद्याचा होवो न होवो
समरसतेचा होतोच भंग !

संवेदना जाणीवा हव्या
नको वेगळे सायलेन्स झोन्स,
शांततेला हवे सूज्ञ अन्
नॉइज-कॅन्सलिंग हेडफोन्स !

आतला आवाज ऐकण्यास
गोंगाट करायला हवा म्यूट,
समजून घ्यावे अर्थकारण
बाकी 'राज'कारण सारे झूट !

रविवार, ३ एप्रिल, २०२२

अनमास्क...!

माणसाने विषाणूच्या सावटाखाली जगण्यास आज दोन वर्षे पूर्ण झाली आणि दोन वर्षांपूर्वी २५ मार्च २०२०च्या चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्यास लिहिलेल्या उमेद या पोस्टमध्ये, 'कास्ट अवे' सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या माध्यमातून व्यक्त केलेली 'तुझे आहे तुजपाशी...' ही शहाणीव आणि 'हेही दिवस जातील...' हा आशावाद आज फलद्रुप होतांना दिसतो आहे. 'शुरुआतका कोई अंत नहीं...' या उमेदीने पुन्हा नव्याने सुरवात करतांना, 'मास्क'चे निर्बंध हटविलेच आहेत तर मोकळ्या हवेत भरभरून श्वास घेताना आणि करोनाने मोह-मायेचे क्षणभंगुरत्व सिद्धच करून दाखवले आहे तर या नव्या अंतर्ज्ञानाच्या प्रकाशात सारेच मुखवटे टाकून द्यायला जमतेय का बघू या...?

निदान प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे मी म्हणतो...
जमेलही हळू हळू कुणी सांगावे... काय..?


उदंड झाले रे सोस
माणूस थकला जीव
शिकला धडा मोलाचा
पिंडीत शोधतो शीव...

आता आणि मोह नको 
नको मायेचा पसारा 
जमवले गमवले
कोरा झाला पट सारा... 

भय भेद भ्रम भ्रांत
सारेच लयास जावो
आराधना हो सफल 
आराध्य साऱ्यांना पावो... 

प्रश्नांच्या गर्तेस मिळो
उजळ मार्गाचा फाटा
फिटो जाळे निबिडाचे
दिसू दे प्रकाशवाटा... 

नवी आशा नव्या दिशा
स्वप्ने पाहू पुन्हा नवी
चिंतामुक्त जगण्यास
फक्त नवी उर्मी हवी...!

रविवार, १३ मार्च, २०२२

जयाजयौ...?


पराकोटीची लालसा 
स्वार्थाची परिसीमा
भेदाभेद पवित्र
एकाएकी... 
 
मायावी लौंदांची
रोजच सुंदोपसुंदी 
माणुसकीची हार  
पदोपदी...  
 
व्यक्तिपूजा साकार
जयघोष नामाचा  
नामाचा गजर
सर्वभरी...  
 
बळी तो कान पिळी 
सत्तेपुढे सचोटीची   
तत्व अन् मूल्ये
धारातीर्थी... 
 
कुणा हाती झाडू 
कुठे दाती तृण  
विवेक विचार 
त्यागलागी... 
 
बुडतां हे जन  देखवे डोळां
'तुका म्हणेहेच सत्य 
बाकी सत्योत्तर 
मनमानी !

मंगळवार, ८ मार्च, २०२२

वामांगी...!

देवळात गेलो होतो मधे
तिथ विठ्ठल काही दिसेना
रखमाय शेजारी
नुसती वीट

मी म्हणालो ऱ्हायल
रखमाय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोक ठेवायच

पायावर ठेवलेल डोक
काढून घेतल
आपल्यालाच पुढ माग
लागेल म्हणून

आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठ गेला
दिसत नाही

रख्माय म्हणाली
कुठ गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला

मी परत पाह्यल
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथ
कोणीही नाही

म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूच मला जरा
कमीच दिसत

दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकड जरा
होत नाही

कधी येतो कधी जातो
कुठ जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले

आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कस कुणी
सांगितल नाही

आज एकदमच मला
भेटायला धावून आल
अठ्ठावीस युगांच
एकटेपण...

- अरुण कोलटकर

ज-आगतिक महिला-दीन-विशेष...!

रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

गाभारा...!


(स)माजमाध्यमाने चांगलीच सोय करून दिल्याने स्वतः:ला लेखक अथवा त्याहून सुलभ म्हणजे कवी समजणाऱ्यांचे अक्षरश: पेव फुटलेले असतांना भाषेच्या भवितव्याबद्दल एवढी तळमळ, कळकळ आणखीन हळहळ व्यक्त करणारे मान्यवर व्यवहार कुठल्या भाषेतून करतात याचा धांडोळा घेतल्यास बरेच जावईशोध लागल्यामुळे भोवळ आल्याशिवाय राहणार नाही.

वरील प्रकटनातील भाषाविशिष्ट स्वर-व्यंजन,  उपरोध आणि त्यांच्या उपयोजनाचे प्रयोजन अर्ध्या जरी प्रस्तुत भाषाभिमान्यांस समजले, उमजले तरी, अमृताशी पैजा जिंकणाऱ्या माऊलींच्या आणि छत्रपतींच्या प्राकृत भाषेचे प्राक्तन बदलल्याशिवाय राहणार नाही आणि 'अभिजातते'च्या नावाने गळे काढण्याची कदापि गरज पडणार नाही.

याबाबतीत अल्लामा इकबाल यांचा 'खुदीको कर बुलंद इतना...' सल्ला शिरोधार्य मानायलाच हवा. वापर नसलेल्या गोष्टी कालौघात नामशेष होतात हे सांगायला आजच्या ब्ल्यू टूथ आणि ओटीपीच्या काळात डार्विनची गरज नसावी. वापर हा सवयीतून येतो आणि सवय संस्कारातून येते. संस्कारासाठी अध्ययन, चिंतन, मनन, प्रकटन यांचा परिपाठ असावा लागतो. अन्यथा, तथाकथित भाषाभिमान्यांचे अरुण्यरुदन हे आज महाराष्ट्रात चाललेल्या राजकीय शिमग्याइतकेच निंदनीय तथा शोचनीय ठरल्यास नवल नाही.  असो!

'शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस...'

असा वस्तुनिष्ठ सल्ला देणाऱ्या आत्मनिष्ठ, समाजनिष्ठ जाणिवांचा धनी आणि शब्दरत्नाकराचा महामेरू, वि. वा. उर्फ तात्याराव शिरवाडकर अर्थात महाराष्ट्राचे वैभव कुसुमाग्रज यांचा आज ११० वा जन्मदिवस. या निमित्ताचे औचित्य साधून हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करणे अभिमानास्पदच पण केवळ सोहळ्यांच्या परंपरेने संस्कृती विकास पावत नसते, त्यासाठी काही तत्वांचा, मूल्यांचा, संस्कारांचा वसा घ्यावा लागतो. कथनी आणि करणी मधला फरक राजकारण्यांना शोभत असला तरी रयतेने तरी त्या वाटेने जाऊ नये. अन्यथा 'यथा राजा तथा प्रजा' या न्यायाने समाजात दांभिकता बोकाळण्यास वेळ लागत नाही. 

आजच्या निमित्ताने, ज्यांच्या नावाने हा जयघोष चालला आहे त्या कुसुमाग्रजांनी समाजव्यवस्थेतील  दोषांवर आणि दांभिकतेवर कोरडे ओढण्याची एकही संधी कधी हातची जाऊ दिली नाही. त्यासाठी त्यांच्या अखेर कमाईस्वातंत्र्यदेवीची विनवणीसहानभूतीसिंहस्थ या कविता जरूर वाचाव्या मात्र आजच्या परिस्थितीला अगदीच समर्पक असणारी कुसुमाग्रजांची ही कविता... सामाजिक-राजकीय उद्बोधनासाठी.

गाभारा

दर्शनाला आलात? या..
पण या देवालयात, सध्या देव नाहीगाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्‍यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते
सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,
पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्‍या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.
- कुसुमाग्रज

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

तेजोनिधी..!


डॉक्टर सचिन चिंगरे ! जुन्या शाळूसोबत्याची प्रौढपणी, कळत्या(?) वयात नव्याने झालेली हीच खरी ओळख. सचिन आणि मी इयत्ता दहावीपर्यंत एकाच वर्गात शिकलो असलो तरी शाळेतला सचिन मला फारसा आठवत नाही. आम्हा लिंबूटिंबू मुलांच्या मानाने किंचित मोठा दिसणारा आणि पौरुषाच्या खुणा पौगंडावस्थेपासून बाळगणारा सचिन माझ्या मैत्र परिघात (आजच्या भाषेत रेंजमध्ये!) असणे शक्यच नव्हते आणि त्यामुळे आमच्या बालमैत्रीचे योग नसल्याने त्याचे त्या वयातले अनेक भोग टळले ! (शंका असल्यास जाणकारांस विचारा !) पण राशीला असलेले ग्रह सहसा पिच्छा सोडत नाहीत तद्वत मी त्याच्या राशीला बसणे हे त्याचे भागधेयच होते आणि माझे पुरुषस्य भाग्यमं !

अत्यंत व्यावहारिक (व्यावसाईक म्हणणे सिर्फ बेवकुफीही नहीं, बे(ई)मानी होगी ! आठवा: ‘नाजायज प्रिस्क्रिप्शन’!) कारणाने सुमारे ३० वर्षांच्या खंडानंतर आम्ही सन्मित्र दिनेशच्या सदिच्छेने भेटलो त्याला आज सुमारे ७ वर्षे लोटली. माझ्या नेहमीच हुळहुळणाऱ्या हृदयाच्या निमित्ताने २०१५ च्या दिवाळीत मी सचिनला खऱ्या अर्थाने ‘भेटलो’ आणि आजवर केवळ ऐकलेले आणि सहसा पहिल्याच भेटीत जवळपास अशक्य असणारे ‘हृदया हृदय येक जाले। ये हृदयीचे ते हृदयी घातले। द्वैत न मोडता केले। आपणा ऐसे अर्जुना।’ अनुभवले... तंतोतंत! असे होण्यामागे – सौख्य, आनंद आणि उन्मेष बहुरंगी, बहुढंगी असले तरी सद्भाव, आर्त आणि विवेक एकरंगी असतात (मोनोटोनोस का म्हणानात) – हे एक कारण असावे का ? ते काहीही असले तरी चिंगरेंच्या सौख्यपंचकाला भेटल्यावर लगोलग मला जे सुचले ते असे...   

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५
सर्वव्याधिप्रमोचकं I
परिस्थितीची सम्यक जाण
सहजीवनाचा निकोप वसा
बहुतांच्या स्वास्थ्यावर दोघे
सोडत जाती निरामय ठसा…!

वैद्यकव्यवसायाप्रती माझ्या अस्वस्थ जाणिवांमध्ये वैद्यकशास्त्रायोगे मुलभूत परिवर्तनास कारणीभूत ठरलेल्या धुळ्याच्या डॉ. सचिन व डॉ. सौख्या चिंगरे (नावात अर्थाबरोबरच सौ. देखील अनुस्यूत असणे किती विलक्षण!) या सुविद्य वैद्यक दंपतीस सस्नेह. माझ्या शतायुषाच्या संकल्पास दृढ करणारा सचिन आपला वर्गमित्र आहे याचा अवर्णनीय आनंद आणि सार्थ अभिमान येथे प्रकट करणे प्रस्तुत ठरावे. शुभम भवतु…I

येथून सुरू झालेला प्रवास कवितेच्या माध्यमातून नित्य नवी वळणे घेत काव्य-शास्त्र-विनोदाच्या मार्गाने मैत्र जुळवून गेला आणि फोनवर तासंतास बोलणाऱ्या माझ्या मित्रमंडळात आणखी एक मूल्यवर्धक भर पडली. आम्हाला चर्चेसाठी कुठलाही विषय वर्ज्य नसल्याने, स्कुल ऑफ थॉट भिन्न असल्या तरी मानवी आयुष्याच्या मूलभूत धारणा आणि कवीमनाला शाप असणाऱ्या संवेदनशील जाणिवा समांतर असल्याने आमच्या सहवेदना एकरूप होत राहिल्या... राहतील !

आज डॉक्टरला वाढदिवसाच्या निमित्ताने काही काव्यात्म शुभेच्छा द्याव्या अशी उर्मी खूप होती पण सूर्याला  काजवे दाखविण्यात काय हशील या विचाराने आणि 'कविता विचारप्रधान की भावनेचे प्रकटन...?' या आमच्या दिनाच्या घरी रंगलेल्या चर्चेत भावनाविवशतेला माझा कौल मिळाल्याने मला डॉक्टरबद्दल उचंबळून आलेल्या साऱ्याच भावना आज, आत्ता ताबडतोब व्यक्त करायला जमेल असे नाही... त्यासाठी लागणारी प्रतिभा काही वेगळीच असते !

तेव्हा 'गेले द्यायचे राहूनी...' ही खंत उराशी बाळगून, या पोस्टचे शीर्षक सार्थ ठरवणारा, डॉक्टरने मला दिलेला  मित्रत्वाचा प्रेमळ सल्ला... 


इत्यादीवर डॉक्टरचे इत्यादी     

अभिजातता...!'मी सावरकर'

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

संस्कार...!


काल आमच्या विवाहसंस्काराला २५ वर्षे पूर्ण झाली, सिल्व्हर ज्युबिली अर्थात रौप्य महोत्सव का म्हणानात ! तब्बल २५ वर्षे म्हणजे दोन तपांहून अधिक काळ... दोघांच्या तपश्चर्येची दोन आवर्तने झाली की... बघता बघता ! आणि या सहप्रवासात जगाला दाखवण्यासारखी लौकिक जमापुंजी फारशी नसली तरी मर्मबंधात जपण्यासारखी उपलब्धी अक्षरश: अगणित ठरावी. मात्र आम्हाला अभिमान आणि समाधान वाटावे अशी दृष्य प्राप्ती म्हणजे आमचे कन्यारत्न - मैत्रेयी ! 

डोळ्यांचे ऑपरेशन झालेले असतांना, डोळ्यांवर काळा गॉगल चढवून मुलीने आमच्या मैरेजच्या ट्वेन्टी फिफ्थ एनिवर्सरीचा जो नेत्रदीपक सोहळा ऑर्गनाईज केला तो अगदीच संस्मरणीय झाला - एकदम एपिक, यु नो ! व्हेन्यूच्या निवडीपासून मेन्यूच्या संयोजनातील केवळ टेस्टच नाही तर विवेक-विचारही आम्हाला स्पर्शून गेला. त्यातून, आमच्या २५ वर्षांच्या सहप्रवासाच्या क्षणचित्रांचे कोलाज, त्याला रोमँटिक फील देणारी सजावट आणि गुलाबपाकळ्यांच्या वृष्टीपासून, २५ दिव्यांचे औक्षण आणि २५चा फ्रूटकेक असा दोन्ही संस्कृतींचा संगम केवळ समर्पकच नाही तर आत्यंतिक मनोहारी ठरला. या सर्व संयोजनात तिला तिचे दोघे भाऊ आणि दोन्ही मावशांची मोलाची साथ लाभली.

२८ वर्षांपूर्वी आईपपांच्या लग्नाला २५ वर्षे झाली तेव्हा, धुळ्याच्या घरातच आमच्या वकुबानुसार आम्ही एक छोटेखानी रौप्य महोत्सव साजरा केला होता. काल मुलीने असाच कार्यक्रम अतिशय कलात्मक आणि आधुनिक पद्धतीने साजरा केल्याने एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे अतीव समाधान तर आहेच शिवाय यथोचित संस्कार संक्रमित झाल्याचा मन:पूर्वक आंनद !

असाच सुवर्ण, अमृत आणि हिरक महोत्सवही साजरा करण्याचे बळ आणि संधी मिळो हीच प्रार्थना ! 

शुभम भवतु !