रविवार, २ जुलै, २०२३

उष:काल होता होता...?


बरोब्बर एक वर्षांपूर्वी लिहिलेल्या '...हम नहीं तोडेंगे?' या 'ये दोस्ती...?' च्या उत्तरार्धाचा तिसरा अंक लिहिण्याची वेळ इतक्या लवकर येईल अशी कुशंकाही 'मना'ला आली नव्हती. 'वर्षभरात मूलबाळ झालं नाही म्हणून तुमची मुलगी नांदवत नाही...' असं म्हणणाऱ्या पारंपरिक खाष्ट आणि नेमस्त आक्रस्ताळ्या सासवा हल्ली सीरियलमध्ये सुद्धा न दाखविण्याइतका महाराष्ट्र नक्कीच पुरोगामी झालाय. त्यामुळे, आधी नाकारलेल्या गर्लफ्रेंडशी मुलाचे लगोलग दुसरे लग्न लावून, अजून संसारात नीटशा न रुळलेल्या सुनेला सवत आणण्याचा खटाटोप तर विचारांनी गतानुगतिक आणि जीवनशैलीत अत्याधुनिक अशा सोशलमिडिऑकर सासवा देखील करणार नाहीत... अगदी मालिकांमध्ये सुद्धा ! तशी केवळ कल्पनाच नाही तर लगे हातो कृती देखील करून मोकळ्या झालेल्या महाराष्ट्र शासनाला आता कुणीही, 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा...?' विचारण्याचे धाडस करू नये. याहून अधिक झोपमोडीचे, स्वप्नभंगाचे आणि कुठंही पोहचण्याचे भोग समृद्ध, प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या नशिबी असू नये.

कहानीमें ट्विस्ट असा आहे की या लोकांनी केवळ कथा, पात्र आणि विषयच नाही तर अख्खा सिनेमाच बदलून टाकलाना राव ! आम्ही हिंदी 'शोले' म्हणून जो समजून घेण्याचा अटोकाट प्रयत्न करत होतो तो यांनी रविवारच्या भर दुपारी मराठी 'सिंहासन' करून टाकला ! चव्वेचाळीस वर्षांपूर्वी अरुण साधू यांच्या 'मुंबई दिनांक' व 'सिंहासन' या कादंबऱ्यावर आधारित विजय तेंडुलकरांनी लिहिलेला आणि जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला 'सिंहासन' हा चित्रपट केवळ अभिजातच नाही तर अजरामर आहे आणि यातील 'दिगू' हा सप्तचिरंजीवांनंतर जन्मलेला आठवा चिरंजीव आहे हे आज महाराष्ट्राच्या राजकारणाने सिद्ध केलं !

या निमीत्ताने रुमीची एक गोष्ट आठवली...

काहीच कारण नसतांना उंटाची आणि कोल्ह्याची दोस्ती जमली. दोघे आता पोटापाण्यासाठी सोबतच हिंडू लागले. जंगलात भटकतांना आपापल्या आहारानुसार आणि पचविण्याची ताकदीनुसार अन्न शोधू लागले. एकदा उंटाने मन वर करून बघितले तर त्याला नदीच्या पलीकडे उंचच उंच उगवलेले उसाचे शेत दिसले. ऊस दोघांना अतिप्रिय असल्याने त्यांनी पलीकडे जाऊन मेजवानी झोडाण्याचा बेत आखला.

कोल्ह्याला पोहता येत नसल्याने त्याने उंटाला विनंती केली की उंटाने त्याला पाठीवर घेऊन नदी पार करून द्यावी. दोस्तीखातर एवढे करणे काही फार मोठे काम नसल्याने उंटाने सहज कोल्ह्याला पाठीवर बसवले आणि नदी ओलांडली. दोघे उसाच्या शेतात शिरले आणि मनसोक्त चरले. पोटभर ऊस खाऊन झाल्यावर कोल्ह्याला कोल्हेकुई करण्याची हुक्की आली. त्याने सुरवात करताच काकुळतीला येऊन उंट म्हणाला, 'मित्रा, तू हे काय करतोयस...? अशाने उसाच्या मालकाला जाग येईल आणि तो आपल्याला बदडून काढेल !'

कोल्हा आपल्याच तंद्रीत असल्याने उंटाला म्हणाला, 'जेवण झाल्यावर कोल्हेकुई करण्याची माझी सवय आहे त्याला मी काय करू? तसे केल्याशिवाय माझा जेवणाचा आनंद पुरा होत नाही...!' आणि त्याने सूर लावला. त्याच्या आवाजाने शेतकरी लाठ्या-काठ्या घेऊन धावत आले. त्यांना बघून कोल्ह्याने पळ काढला आणि झुडपांमध्ये लपून बसलं.. उंटाला न पळणे शक्य होते न लपणे. शेतकऱ्यांनी उंटाला चांगला चोप दिला आणि शेतातून हुसकावून लावले.

संध्याकाळ होत आली तशी जंगलाकडे परतण्याची वेळ झाली. आता कोल्ह्याला उंटाची विनवणी करण्याशिवाय पर्याय नव्हता. तो खजील चेहऱ्याने उंटाला म्हणाला, 'मित्रा, माझ्याकडून चूक झाली खरी, पण आपली दोस्ती सच्ची असली तर तू मोठ्या मनाने मला नक्कीच माफ करशील आणि मला आपल्या पाठीवरून नदी पार करून जंगलात परत नेशील, हो ना?'

मोठ्या मनाचा उंट म्हणाला, 'हो तर! आपण पक्के मित्र आहोत, मी तुला असा एकटाच सोडीन होय? चल बैस माझ्या पाठीवर !' आणि दोघे जंगलाकडे परत निघाले. नदीच्या प्रवाहाच्या मधोमध आल्यावर उंट अचानक खाली बसू लागला आणि कोल्ह्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले आणि तो गटांगळ्या खाऊ लागला. कसाबसा जीव मुठीत धरून तो उंटाला म्हणाला, 'मित्रा, तू हे काय करतोयस? अशाने माझा जीव जाईल ना !'

उंट म्हणाला, 'माफ कर, मित्रा, मी तुला सांगायचे विसरलो, जेवण झाल्यावर पाण्यात डुंबायची मला सवय आहे, तसे केल्याशिवाय मला जेवल्याचे समाधान मिळत नाही...!'

----------------------------------------------------------------------------------------------------

उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला, महाराष्ट्राने रविवारच्या दुपारच्या झोपेचे खोबरे करून घेऊन एका अजब सोहळ्यात 'गुरुची विद्या गुरूला...' याची याची देही याची डोळा प्रचिती घेतली एवढाच काय तो या साऱ्या जांगडगुत्त्याचा अन्वयार्थ...

छत्रपती ते बाळासाहेब, साऱ्यांच्या आत्म्यांस शांती लाभो...
---------------------------------------------------------------------------------------------------

गुरुवार, २९ जून, २०२३

' विठ्ठल '...!


विंदांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून २४ ऑगस्ट २०१७ ते २३ ऑगस्ट २०१८ या वर्षात, विंदांची 'रोज एक कविता' असा उपक्रम राबवितांना, कशा कुणास ठाऊक पण विंदांच्या काही अत्यंत मार्मिक आणि 'मना'ला अतिप्रिय असणाऱ्या कविता निवडायच्या राहून गेल्या, आवड आणि निवड यात कदाचित हाच फरक असावा ! 'गेले द्यायचे राहूनी...' ची ही आर्तता आज आषाढीच्या निमित्ताने अधिकच हुरहुरली ती चक्क विठ्ठलाची कविता या उपक्रमातून निसटल्याने !

श्वास देखील फार काळ धरून ठेवता येत नाही, तो ही सोडूनच द्यावा लागतो... पुन्हा श्वास घेण्यासाठी ! श्वास धरून ठेवण्याचा 'प्राणायाम' करण्यासाठी (सहज)'योग' साधावा लागतो आणि तो साधला तर (जीवन)'सिद्धी' अप्राप्य नाही एवढे सोपे अध्यात्म ज्याला कळले त्याला स्थूल-सूक्ष्माचा पोथीबाध्य उहापोह करण्याची गरज नाही.

विद्वानांनी पोथी-पुराणात कैद करून ठेवलेले अद्वैत तत्वज्ञान संतवाणीने जनसामान्यांसाठी सहज सोपे करून भक्तिरसात वर्णिले म्हणूनच तुक्याची गाथा इंद्रायणीत बुडवूनही लोकगंगेने तारली. त्याच संतसंप्रदायाचा वारसा सांगणाऱ्या साहित्यिकांनी आपल्या अत्यंत व्यावहारिक आणि मार्मिक प्रकटनातून हे तत्वज्ञान वाहते ठेवले.

अद्वैत सिद्धांताचे आणि, 'वेदांनाही नाही कळला अंतपार याचा...' या अध्यात्मिक प्रकटनाचे, जनसामान्यांस सुचेल, रुचेल आणि पचेल अशा सहज मार्मिक स्वरूपात निरूपण करणारी विंदांची ही रचना, आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने !

पंढरपूरच्या वेशी बाहेर
एक आहे छोटी शाळा..
सर्व मुले आहेत गोरी
एक मुलगा कुट्ट काळा...

दंगा करतो मस्ती करतो
खोड्या करण्यात आहे अट्टल...
मास्तर म्हणतात करणार काय ?
न जाणो , असेल ' विठ्ठल '...

- विंदा करंदीकर

सोमवार, २६ जून, २०२३

वसंत...!


मैफिलीत शेर तुझ्यावरचे, दाद मिळवित होते
क्षण दु:खी माझे.. गजलेस असे सजवित होते

निरोप घेतांना वळून पाहिलेस तू पुन्हा पुन्हा
यश हे प्रेमातले माझे असे घवघवीत होते

पाकळ्या डायरीतल्या देतात अजून ग्वाही
फूल तू माळलेले.. तेव्हा टवटवीत होते

रस्ते तुझे फिरुन झाले जगभरातले अनेकदा
पाय अनवाणी माझे तिच पायवाट मळवित होते!

कबुतरावर विसंबण्याचे गेले ते दिवस अखेर...
स्टेटस रोजचे... तुझी ख्याली खुशाली कळवित होते

ग्रीष्माने होता फुलविला मोगरा अनेकदा परंतु...
फुल तुझ्या केसातले आज...वसंतास जळवित होते!!

दिनेश
१४ एप्रिल २०२३ 

'मना'ने चिरतरुण असलेल्या सन्मित्र दिनेशला 
वाढदिवसानिमित्त त्याच्या या गझले इतक्याच रोमँटिक शुभेच्छा...!

रविवार, २५ जून, २०२३

ब्रिदिंग स्पेस...!


आजच्या दुभंगलेल्या काळात जगण्याची शैली प्रच्छन्न दांभिक असणं नवलाचं नाही. स्किझोफ्रेनिया, डिमेन्शिया, अल्झायमर यांचे सारेच पेशन्ट डायग्नॉस होतातच असेही नाही. आणि असले विकार असाध्य असल्याने त्यांच्यावर नियंत्रण एवढाच उपाय असल्याचे वैद्यक सांगते.

इच्छा असो वा नसो, डाव मांडावा ही लागतो आणि साधावा ही लागतो, भिडू पाहून आणि... पाडून ! अतिप्रिय गोष्टी टाळून, त्यांच्याच चिरांनी सजवाव्या लागतात नावडत्या गोष्टींचे बिलोरी अन् बेगडी महाल. तडजोड करण्याची सवय अंगवळणी पडली की नव्या जोडणीला जात नाहीत जुने तडे... तडतडणारे !

मूल्याधारित व्यवस्थेचे मार्केट डेरिव्हेटीव्ह थ्री ट्रिलियनच्या महत्त्वाकांक्षेने प्राचीन मूल्यव्यवस्थेसाठी रडत नाही. ब्ल्यू टूथ आणि ओटीपीच्या सोयीने कार्यभाग साधता येतो कुठलीही खूण-गाठ मागे न ठेवता... डिसॅपिरिंग मेसेजसारखा. अशा सभोवतालात विचारांना थारा नसतो, बोकाळतात फक्त विकार, फोफावतो अविवेकी दंभ... विनाशकारी !

..आणि मग संवेदनशील,विचारी, हळव्या शतशः विदीर्ण 'मना'ला पर्याय उरत नाही, सारे तुकडे गोळा करून... स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करण्याशिवाय...

कल्याणची युवा कवियत्री विशाखा विश्वनाथ हिला 'स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना' या तिच्या पहिल्याच कवितासंग्रहासाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला याचं जेवढं कौतुक तेवढंच समाधान ! हे समाधान आणि हा आनंद शाळकरी मुलींच्या वेणीसारखा दुपेडी आहे...

आजच्या काळात कुणीतरी कुठल्याही अभिनिवेशाशिवाय, अभिलाषेशिवाय, दबावाशिवाय मुक्तपणे व्यक्त होतंय, होऊ शकतंय याचे समाधान आणि अशा प्रयत्नांची केवळ दखलच घेतली जात नाहीये तर चक्क पुरस्काराने दाद दिली जातेय याचा मनस्वी आनंद... अगदी हृषिदांच्या आनंद इतका खणखणीत !

आजच्या अत्यंत इंटरेस्टिंग पण तेवढ्याच फ्रस्टेटींग काळाचा आलेख कवितेतून मांडण्याचे होतील तेवढे प्रयत्न स्तुत्यच आहेत आणि हवे देखील आहेत... कुचंबणा, घुसमट, कोंडी जेवढी व्यक्त होईल तेवढे समग्र समाजभान जागृत होऊन समाजमन प्रगल्भ तथा विकसित होण्याचा मार्ग प्रशस्त होण्याची शक्यता बळावते.

तेंव्हा, प्रतिभा आणि तपशील भले भिन्न असले तरी, भावनेचा पोत आणि व्यक्त होण्याची आतुरता जोवर अस्सल आहे तोवर या अंतर्द्वंदाला सामोरे जातांना, स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करायला एकमेकांना बळ मिळत राहील... देता येईल !

विशाखाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि असेच व्यक्त होत रहाण्यासाठी तिला तिच्याच एका कवितेतून निरंतर शुभेच्छा...

जुन्या नोकरीतल्या शेवटच्या संध्याकाळी
घरी परतून येताना वाटतं
आजवर जमा झालेला सगळा पैसा 
लावून टाकावा माझ्या पहिल्या डॉक्युमेंट्रीवर
मग आठवते 
उच्चशिक्षणासाठी ओघाने चांगली नोकरी मिळावी
म्हणून घेतलेली ऍडमिशन
त्याची पेंडिंग फी
आणि जुन्या आणि नव्या नोकरीतल्या 
चार दिवसाच्या ब्रिदिंग स्पेस मधल्या पहिल्या रात्री
उशाला घेऊन झोपते मी माझ्या पहिल्या डॉक्युमेंट्रीचं स्वप्नं.

रविवार, २८ मे, २०२३

सतीचे वाण...!


विनायक दामोदर सावरकर अर्थात तात्याराव या ओजस्वी प्रतिभेच्या युगपुरुषाने जे 
अलौकिक कार्य करून ठेवले त्यातील भाषाप्रभू महाकवी आणि विज्ञाननिष्ठ सुधारक ही त्यांची दोन रूपे मला अधिक भावतात. पैकी, सर्वगुणसंपन्न उत्कृष्ट काव्यप्रतिभेचा याहून अधिक भाषासमृद्ध, प्रतिभासंपन्न, आशयघन आणि तेजस्वी नमुना माझ्या पाहण्यात नसल्याने सावरकरांची २५ कडवी आणि १०० ओळींची "माझे मृत्युपत्र" ही संपूर्ण कविता...         

वैशाखिचा कुमुदनाथ नभात हांसे
यच्चन्द्रिका धवल सौधातली विलासे
घाली स्वये जल जिला प्रिय बाल खासे
जाई फूले चिमुकली नटली सुवासे ll १ ll

आले घरी सकल आप्त सह्रद जिवाचे
आनंदमग्न कुल गोकुल काय साचे
आदर्श दीप्ति-शुचिता-धृति यौवानांचे
पाहून जे तरुण मंडल कीर्ति नाचे ll २ ll

प्रेम हृदे विकसली नव-यौवनाच्या
गंधे सुवासित उदात्त सुसंस्कृतिच्या
दिव्या लता तरुसी जे गृह बाग़ झाला
ज्यां पौर हर्षित वदे जन "धर्मं-शाला" ll ३ ll

स्वयंपाक त्वां निजकरें कुशले करावा
प्रेमें तुझ्या अधिकची सु-रसाल व्हावा
संवाद सर्व मिळुनी करितां नितान्त
जेवावयासी बसलो जईं चांदण्यात ll ४ ll

श्री रामचंद्र वनवास कथारसाला
कीं केवीं देश इटली रिपु-मुक्त झाला
तानाजिचा समरधीर तसा पोवाडा
गावा चित्तोडगढ वा शनिवार वाडा ll ५ ll

झाली कशी प्रियकरा अपुली अनाथा
दुर्दास्यखिन्न शरछिन्न विपन्न माता
शोकें विवंचुनी तिच्या जईं मोचनाचे
केलें अनंत तरुणा उपदेश साचे ll ६ ll

तो काल रम्य मधुरा प्रिय संगती ती
ते चांदणे नवकथा रमणीय रात्री
ते ध्येय दिव्या निज मातृ-विमोचानाचे
तो उग्र निश्चयही ते उपदेश साचे ll ७ ll

झाल्या तदा प्रियकरा सह आण-भाका
त्या सर्व देवी वहिनी, स्मरति तुम्हां कां
"बाजीप्रभु ठरू" वदे युव संघ सर्व
"आम्ही चित्तोड़ युवती" युवती सगर्व ll ८ ll

कीं घेतले व्रत न हे अम्ही अन्धतेने
लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्ग माने
जे दिव्य-दाहक म्हणोनी असावयाचे
बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे ll ९ ll

ज्या होती ते प्रियजन सह आण-भाका
त्यांते स्मरोनी मग सांप्रत हे विलोका
नाही पूरी उलटली जरी आठ वर्षे
तों कार्यसिद्धि इतुकी मन का न हर्षे ?? ll १० ll

आसेतु पर्वत उचम्बळला स्वदेश
वीराकृति धरित टाकुनी दीनवेष
भक्तांचिया रघुपदी झुलतात झुंडी
जाज्वल्य होयही हुताशन यज्ञकुंडी ll ११ ll

तो यज्ञ सिद्ध करण्यास्तव उग्र दीक्षा
जे घेती येई तइं तत्कृतिची परीक्षा
"विश्वचिया अखिलमंगल धारणाला
बोला असे कवण भक्ष्य हुताशनाला ?" ll १२ll

आमंत्रण प्रभु रघुत्तम सोडितां हे
दिव्यार्थ देव !!! अमुचे कुल सज्ज आहे
हे साध्वी !! गर्जुनी असे पहिल्या हविचा
हा ईश्वरी मिळविला अम्ही मान साचा ll १३ ll

धर्मार्थ देह बदलो ठरले नितान्त
ते बोल-फोल बालिश नचि बायकांत
ना भंगली भिउनिया धृति यातनान्ना
निष्काम कर्मरति योग ही खंडिला ना ll १४ ll

ज्या होती तैं प्रियजना सह आण-भाका
केल्याची सत्य कृतिने अजि ह्या विलोका
दीप्तानलात निज मातृ-विमोचनार्थ
हा स्वार्थ जाळुनि अम्ही ठरलो कृतार्थ ll १५ ll

हे मातृभूमि तुजला मन वाहियेले
वक्तृत्व वाक्-विभव ही तुज अर्पियेले
तुंतेंची अर्पिली नवी कविता वधूला
लेखां प्रति विषय तूची अनन्य झाला ll १६ ll

त्वत्-स्थंडिले ढकलिले प्रिय मित्र-संघा
केलें स्वये दहन यौवन देह-भोगा
त्वत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा
तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा ll १७ ll

त्वत्-स्थंडिली ढकलली गृह-वित्त-मत्ता
दावानालात वहिनी नव-पुत्र-कांता
त्वत्-स्थंडिली अतुल-धैर्यनिष्ठ बंधू
केला हवि परम कारुण पुण्यसिंधू ll १८ ll

त्वत्-स्थंडिला वरी बळी प्रिय बाळ झाला
त्वत्-स्थंडिला वरी अता मम देह ठेला
हे काय बंधू असतो जरी सात आम्ही
त्वत्-स्थंडिलीच असते दिधले बळी मी ll १९ ll

संतान ह्या भारतभूमिस तीस कोटि
जे मातृभक्ति सज्जन धन्य होती
हे आपुले कुल ही तय मध्ये ईश्वरांश
निर्वंश होउनी ठरेल अखंड वंश ll २० ll

कीं ते ठरों ही अथवा न ठरो परंतु
हें मातृभू अम्ही असो परिपूर्ण हेतु
दीप्तानलात निज मातृ-विमोचनार्थ
हा स्वार्थ जाळुनि अम्ही ठरलो कृतार्थ ll २१ ll

ऐसे विवंचुनी अहो वहिनी !! व्रताते
पाळोनी वर्धन करा कुल दिव्यतेतें
श्रीपार्वती तप करीं हिम-पर्वती ती
कीं विस्तवात हसल्या बहुराजपुती ll २२ ll

तें भारतीय ललना-बल-तेज काही
अद्यापि या भरतभूमित लुप्त नाही
हें सिद्ध होइल असेंच उदार उग्र
वीरांगने !! तव सुवर्तन हो समग्र ll २३ ll

माझा निरोप तुजला येथुनी हाच देवी
हा वत्स-वत्सल तुझ्या पदी शीर्ष ठेवी
सप्रेम अर्पण असो प्रणति तुम्हांते
आलिंगन प्रियकरा मम अंगनेते ll २४ ll

कीं घेतले व्रत न हे अम्ही अन्धतेने
लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्ग माने
जे दिव्य-दाहक म्हणोनी असावयाचे
बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे ll २५ ll

आणि, या काव्यातील "...की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने..." या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पुष्ट्यर्थ, सावरकरांचे नातू सात्यकी यांचा विज्ञाननिष्ठ सावरकर हा लेख इथे वाचा.

रविवार, ७ मे, २०२३

नाळ...!


फुलाचा गंध मोहवतो
भ्रमराचं गुंजन वेडावतं
रानफूल व्हावं वाटलं किती,
नाळ तुटणं अवघड असतं...

तोडावे वाटतात सारे पाश
जगून घ्यावे वाटते निर्धास्त
नेमस्तपण आडवं येतं,
नाळ तुटणं अवघड असतं...

उद्याची मुळी चिंता नको
फक्त आज हरायचं नसतं
कालची खंत नको म्हणता,
नाळ तुटणं अवघड असतं...

भिरकावून द्यावे सारे संकेत
बंध सारे तोडून वहावे मस्त
लांघाव्या साऱ्या मर्यादा पण,
नाळ तुटणं अवघड असतं...

मनापासून हसलो तर
कुठलं ओझं अवजड नसतं
धाय मोकलून रडलो तर
नाळ तुटणं अवघड नसतं...!

सोमवार, १ मे, २०२३

...माझा !


कातळालाही बोलती करती लेणी
परंपरेचा वसा जणू पंढरीची वारी

बाणा रामशास्त्री अन् परखड वाणी
विवेक रक्षण्या लेखणीची मातब्बरी

शारदेचा वरदहस्त अन गंधर्वगान
गानकोकिळा शोभीवंत सूर-सागरी

फाळके-गदिमा-आचार्य अन पुलं-तें-नेमाडे  
खाशाबा-सचिन फडके पताका गगनावरी

उकडीचे मोदक मधुर पुरणपोळी सणावारी
वस्त्रांच्या महाराण्या राजस पैठणी नऊवारी

पसायदान, गाथा आणि शाहिरी
सर्वस्पर्शी आमची मुशाफिरी

गडकोटांचे भक्कम बुरुज ही खूण सुराज्याची 
जाणता राजा अन सुधारकांची फौज ही न्यारी 

इतिहास शौर्याचा तसा भक्तीचा
संस्कृतीची धुरा मराठी खांद्यावरी

सूज्ञ समावेशक आज्ञापत्रांचे पाईक होण्या 
महाराष्ट्र धर्म नांदत राहो समृद्धीच्या दारी...!

समस्त मराठी जनांस ६३व्या महाराष्ट्र दिनाच्या बाणेदार शुभेच्छा...!

रविवार, २३ एप्रिल, २०२३

उत्थान...!


जेत्यांचा इतिहास घडविण्याच्या नादात
जगाचा भूगोल बदलतो राहतो सतत
आणि घटना-पुनर्लेखनाच्या कर्मठपणात
परंपरेची जळमटं लटकत राहतात...

गैरसोयीच्या गोष्टींपासून पळ काढण्यासाठी 
नामांतराने विषयांतर साधत असेल,
पण म्हणून लोकसंख्येच्या विस्फोटाने  
लोकशाही समृद्ध होत नसते...

तरीही, वंशसातत्य या महत्वाच्या विषयात,
 शेजाऱ्याला मागे टाकून आपण पहिला नंबर काढला
आणि एकादशीच्या घरी शिवरात्र बोलावली
या सांस्कृतिक उत्थानाचे झेंडे मिरवू नये... 

...असे काही नाही !

रविवार, १६ एप्रिल, २०२३

#प्रिये

“As you write more and more personal 
becomes more and more universal.”

वपुंच्या 'पार्टनर' मधील या वाक्याची 'गुड रीड्स'ने 'क्वोटेबल क्वोट्स'मध्ये नोंद घ्यावी याचे जेव्हढे अप्रूप तेवढाच आनंद आणि अभिमान ! पण आज मुद्दा तो नाही. आज मुद्दा आहे व्यक्त होण्याचा.

नागराज म्हणतो,
'माझ्या हातात नसती लेखणी
तर असती छिन्नी, सतार, बासरी 
किंवा कुंचला... 
मी कशानेही उपसत राहीलो असतो
हा अतोनात कोलाहल मनातला...' 

याच धर्तीवर आज म्हणावसं वाटतंय, 
'माझ्या उरावर नसती देणी 
तर असती निरूपणं, स्फुटं, ललितं  
किंवा कविता...
मी निवांत व्यक्त होत राहिला असतो
मांडायला खळबळ जनमनातली...'

जगरहाटी आणि दुनियादारीच्या धबडग्यात हल्ली हे थोडे बाजूला पडतंय, मान्य. 
पण प्रत्येकवेळी आपलीच प्रतिभा पणाला लावून संवेदना मूर्त करायला हवी असा काही नियम नाही. आणि सॅटिसफॅक्शन नसतांना करत रहायला तो काही जॉब ही नाही. (बाय द वे, 'जॉब सॅटिसफॅक्शन' हे पण एक ऑक्सिमोरॉन असल्याचा शोध नव्यानेच लागला, ती ही एक उपरती !)

आपलीच भावना कुणी अधिक प्रभावीपणे व्यक्त केली आणि आपण तिच्याशी सबाह्याभ्यंतरी तादाम्य पावू शकत असू, तर अशा प्रतिभाविष्काराचे यथोचित श्रेय-नामोल्लेखासह प्रयोजन का असू नये...?

कवी नारायण पुरी यांची २०१७ मध्ये, #प्रिये ने सोशल मीडियावर गाजलेली 'प्रेमाचा जांगडगुत्ता' ही आत्यंतिक प्रामाणिक तथा मनस्वी कळकळ, काही नवीन संदर्भांसह ताज्या रूपात... 

शनिवार, १ एप्रिल, २०२३

अमर...?


'ही कविता मरत नाही' - या २२ जून २०२२ च्या पोस्टमध्ये विंदांनी त्यांच्या 'सब घोडे बारा टक्के...' या कवितेच्या सादरीकरणात त्या कवितेतील परिस्थती काही केल्या बदलत नसल्याने ती कविता मरत नसल्याची खंत व्यक्त केली होती. कवितेच्या भलत्याच अमरत्वाचे दु:ख विंदांनी मांडले.

कवी हा मर्त्य मानवच असल्याने त्याला मृत्यू अटळ आहे. पण विचार, फिलॉसॉफी आणि इंटेंशन कालातीत असल्याने ते व्यक्तीच्या मृत्यूनंतरही भूत बनून मानगुटीवर बसू शकतात. मग  आयुष्यभर सचोटीने जगलेल्या आणि व्यवस्थेत सुधार करण्याची जिद्द न सोडणाऱ्या 'आझाद'चा असा 'भूतनाथ' होतो आणि त्याला, '...जिसके पास डेसिग्नेशन है उसके पास इंटेंशन नहीं और जिसके पास सजेशन है उसके पास पोझिशन नहीं...' याचा विषाद वाटतो.

तथापि, मेल्यावरही समाजसेवेचा वसा सोडू न शकणाऱ्या अशा सजग नागरिकाची संभावना, 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद मिरवणारा व्यवस्थेचा अग्रीम प्रतिनिधी, "xxxxx याचं काही होत नाही, इसको मरनेके बादभी अकल नही आयी...!" अशी करतो... 

हेच अंतिम (आणि कालातीत ?) सत्य, बाकी जगत मिथ्या !

चालायचंच...?