रविवार, ३ एप्रिल, २०२२
अनमास्क...!
रविवार, १३ मार्च, २०२२
जयाजयौ...?
स्वार्थाची परिसीमा
भेदाभेद पवित्र
एकाएकी...
मायावी लौंदांची
रोजच सुंदोपसुंदी
व्यक्तिपूजा साकार
जयघोष नामाचा
सर्वभरी...
बळी तो कान पिळी
धारातीर्थी...
कुणा हाती झाडू
बुडतां हे जन न देखवे डोळां
'तुका म्हणे' हेच सत्य
मंगळवार, ८ मार्च, २०२२
वामांगी...!
रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२
गाभारा...!
पण या देवालयात, सध्या देव नाहीगाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते
सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,
पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.
गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२
तेजोनिधी..!
सर्वव्याधिप्रमोचकं I
इत्यादीवर डॉक्टरचे इत्यादी
रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२
संस्कार...!
शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२
पंचविशी...!
वस्तू-व्यक्ती, भावना-कल्पना यांना 'वापरता' येते
इतके साधे-सोपे सोईस्कर 'सत्य' गमलेच नाही त्याला
'अर्थ' आणि 'कारण' दोघांना पारखाच होता तो नेहमी
करायचा निरुपयोगी उद्योग, निर्हेतुक निर्ममपणाने...
म्हणायचा वेळ फार जातो 'उत्पादक' काम करण्यात
होणार नव्हतेच त्याचे काही, नाहीच झाले या मर्त्य जगात !
जिथे ज्याला बघावे तो व्यस्त, 'उपयोगी' कामात सतत व्यग्र.
हा हिंडायचा, कायम गडबडीत असणाऱ्या गर्दीचे धक्के खात
किंवा पहुडायचा हिरव्यागर्द माळरानावर निळ्याशार आकाशाखाली
प्राणी-पक्ष्यांच्या जोडीने निसर्गाच्या नाद-रस-रंग-गंधाची किमया अनुभवत
उमटायच्या त्या जाणीवा चित्र-शिल्प-शब्द-सुरांतून... अभिनिवेशाशिवाय !
कर्मचाऱ्यांच्या स्वर्गात एवढा रिकामटेकडा बघून अचंबा वाटला तिला
म्हणाली काम देऊ तुला, माझा एक हंडा देऊ पाणी भरून आणायला?
हा म्हणाला, हंडा दे पण असे उत्पादक उद्योग करायला वेळ नाही मला...
हंडा घेतला आणि उभा-आडवा रंगवून दिला निरर्थक रंग-रेषांनी...
तिला कळेचना याचे काय करावे... पण काहीतरी नवीन जाणीव जागी झाली
त्या रिबिनींनी केस बांधून स्वतःला निरखण्यात तिचा कामाचा वेळ वाया जाऊ लागला
केवळ तीच नाही तर आणखीनही काही लोक याच्या नादी लागून कलाकृती करू लागले
आता मात्र धुरिणांना आपल्या स्वर्गात हे निरर्थक लोण पसरणे धोक्याचे वाटू लागले आणि...
त्यांनी याला कर्मचाऱ्यांच्या स्वर्गातून हाकलून लावण्याचे ठरवले, एवढ्यात चित्रगुप्त प्रकटला!
त्याला खूपच बरे वाटले, सुटका झाल्यासारखे... इथे कुणाला कशासाठी वेळच नाही म्हणे !
तो निघाला तर... आजवर कधीही ऐकले, बघितले तर काय कल्पिले देखील नाही
असे अघटित त्या दिवशी त्या कर्मचाऱ्यांच्या स्वर्गाने बघितले.
ती चक्क त्याच्या सोबत निघाली, तो जाईल तिथे जायला...
कर्मचाऱ्यांच्या स्वर्गातल्या समस्त ज्येष्ठ-श्रेष्ठ अनुभवी विद्वानांना
त्यांच्या त्या निरुपयोगी निर्णयाचा न हेतू समजला न अर्थ... कधीही !
-----------------------------------------------------------------------------------------
असो, आज ही कथा आठवण्याचे कारण म्हणजे तिने तो निरर्थक, निरुपयोगी, निर्हेतुक निर्णय घेतला त्याला आज २५ वर्षे झाली... बाकी काही नाही !
शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२
ओवी-गीता
शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२
संक्रमण
रविवार, २ जानेवारी, २०२२
संकल्प...!
विविध संस्कृतींमध्ये नववर्ष वेगवेगळ्या वेळी आणि निरनिराळ्या पद्धतीने साजरे होत असले तरी सध्या सर्वत्र प्रचलित असलेल्या ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार १ जानेवारीला सुरु होणाऱ्या नवीन वर्षाचे वारे वाहू लागले की, त्या संस्कृतींच्या अंधानुकरणाने आपल्या मानसिक गुलामगिरीचे प्रच्छन्न दुर्दर्शन घडवीत न चुकता(?) करायची पहिली गोष्ट म्हणजे थर्स्टी फर्स्टची पार्टी आणि दरवर्षी न पाळण्यासाठी करण्याची दुसरी गोष्ट म्हणजे तेच ते संकल्प... शिळ्या कढीला नव्याने उकळी आणावी तसे! (बाय द वे, 'संकल्प' हे करतांनाच 'सोडा' असे म्हणतात याला काय म्हणावे?) आपल्या संस्कृतीमध्ये नित्योपासनेचे महत्व अनुभवसिद्ध असल्याने, वर्षाच्या सुरवातीला आरंभशूरपणे संकल्प करून, सकाळी बोललेले दुपारी विसरण्याची राजकीय सोय अंगी बाणवल्याप्रमाणे, ते सिद्धीस नेण्याऐवजी स्वत:ची वृद्धी सांभाळण्याची स्वकेंद्री वृत्ती बळावण्याचे खर तर काहीच कारण नाही... पण लक्षात कोण घेतो?
कालच, 'काय म्हणतोय तुमचा नवीन वर्षाचा संकल्प?' या उत्सुक प्रश्नाचे उत्तर देतांना आम्ही ज्या 'फोमो'च्या प्रादुर्भावाचा उल्लेख केला त्याचेच एक लक्षण म्हणजे अशा अयोग्य, अस्थानी आणि अनिष्ट 'शिष्टा'चारांच्या चालीरीती होणे. काय सांगता, 'करोना' आणखीन 'ओमायक्रॉन' मलेरियाचे डास ठरावे एवढ्या वेगाने फैलावणाऱ्या आणि अनेक दुर्धर मानसिक आजारांचे केंद्र असलेला 'फोमो' तुम्हाला माहीत नाही? अहो, 'फिअर ऑफ मिसिंग आऊट'! आणि याची चाचणी अगदी मोफत आणि सुलभ आहे. शिवाय चाचणी हाच उपचार असलेला हा माणसाच्या ज्ञात इतिहासातला एकमेव विकार असावा. तुम्हाला 'फोमो'ची लक्षणं आहेत का हे तपासून पाहण्यासाठी एवढेच करा... सुमारे ३० मिनिटे कुठल्याही प्रकारच्या समाजमाध्यमापासून दूर रहा... श्वास जड झाला, हातापायाला कंप सुटला, घशाला कोरड पडली, जीव घाबरा झाला, घाम फुटला तर घाबरून जाऊ नका, फोन हातात घ्या. आराम पडल्यास अभिनंदन! तुम्हाला बीपी, शुगर, थायरॉईड कसलाही त्रास नाही... फक्त 'फोमो' आहे.
असो, वर्षाची सुरवात (तरी) टीकेच्या भडिमाराने नको, उगाच लोकांच्या संकल्पात मोडता घातल्याचे पाप लागायचे... इट्समायसीन म्हटल्यासारखे ! तर मुद्दा होता संकल्पाचा ! मूळ विषयाला बगल देऊन भलत्याच विषयाचे चऱ्हाट लावायला जे मार्केटिंग (की सेलिंग?) स्किल्स लागतात ते या जन्मात तरी जमणे नाही, तेव्हा आपल्या नेहमीच्या आत्मघातकी 'एक घाव दोन तुकडे' स्टाईलने विषय संपवावा हे उत्तम... गेल्या सुमारे ३० वर्षांपासून ('जबसे होश संभाला है...' म्हणायची सोय नाही, कुठे सांभाळता येतोय अजून तरी?) आमचे संकल्प आमच्या कवितांतून वेळोवेळी जाहीर झाले आहेत आणि बहुतांना ते अगदी स्वप्नील, बाळबोध किंवा थेट वेडगळही वाटले आहेतच. त्यामुळे आज हा दोष स्वतः:कडे न घेता एका अज्ञात कवीने आमच्याच संकल्परुपी भावना अत्यंत प्रत्ययकारी पद्धतीने मांडल्या आहेत, त्याच आमचा आजीवन संकल्प म्हणून सादर करतोय... मुळात दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून प्रसारित झालेल्या या प्रेरणादायी आणि विलक्षण महत्वाकांक्षी रचनेमागील संवेदनशील मनाचा आम्हाला अद्याप शोध लागू शकलेला नाही. आपणापैकी कुणाकडे याबद्दल काही सप्रमाण माहिती असल्यास कृपया कळवावी म्हणजे ज्याचे/जिचे श्रेय त्याला/तिला सन्मानपूर्वक देता येईल.
संपू दे अंधार सारा
उजळू दे आकाश तारे
गंधाळल्या पहाटेस येथे
वाहू दे आनंद वारे….
जाग यावी सृष्टीला की
होऊ दे माणूस जागा
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे
घट्ट व्हावा प्रेम धागा…
स्वच्छ सारे मार्ग व्हावे
अन् मने ही साफ व्हावी
मोकळ्या श्वासात येथे
जीवसृष्टी जन्म घ्यावी…
स्पंदनांचा अर्थ येथे
एकमेकांना कळावा
ही सकाळ रोज यावी
*माणसाचा देव व्हावा…
*देव झालेल्यांचे / ठरविले गेलेल्यांचे पायही कसे मातीचेच आहेत अन विकारही किती (अ)मानवी आहेत हा ताजा इतिहास बघता शेवटच्या ओळीत फक्त थोडा बदल सुचवासा वाटतो...
'अन् पशूचा माणूस व्हावा...!'
