रविवार, ३ एप्रिल, २०२२

अनमास्क...!

माणसाने विषाणूच्या सावटाखाली जगण्यास आज दोन वर्षे पूर्ण झाली आणि दोन वर्षांपूर्वी २५ मार्च २०२०च्या चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्यास लिहिलेल्या उमेद या पोस्टमध्ये, 'कास्ट अवे' सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या माध्यमातून व्यक्त केलेली 'तुझे आहे तुजपाशी...' ही शहाणीव आणि 'हेही दिवस जातील...' हा आशावाद आज फलद्रुप होतांना दिसतो आहे. 'शुरुआतका कोई अंत नहीं...' या उमेदीने पुन्हा नव्याने सुरवात करतांना, 'मास्क'चे निर्बंध हटविलेच आहेत तर मोकळ्या हवेत भरभरून श्वास घेताना आणि करोनाने मोह-मायेचे क्षणभंगुरत्व सिद्धच करून दाखवले आहे तर या नव्या अंतर्ज्ञानाच्या प्रकाशात सारेच मुखवटे टाकून द्यायला जमतेय का बघू या...?

निदान प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे मी म्हणतो...
जमेलही हळू हळू कुणी सांगावे... काय..?


उदंड झाले रे सोस
माणूस थकला जीव
शिकला धडा मोलाचा
पिंडीत शोधतो शीव...

आता आणि मोह नको 
नको मायेचा पसारा 
जमवले गमवले
कोरा झाला पट सारा... 

भय भेद भ्रम भ्रांत
सारेच लयास जावो
आराधना हो सफल 
आराध्य साऱ्यांना पावो... 

प्रश्नांच्या गर्तेस मिळो
उजळ मार्गाचा फाटा
फिटो जाळे निबिडाचे
दिसू दे प्रकाशवाटा... 

नवी आशा नव्या दिशा
स्वप्ने पाहू पुन्हा नवी
चिंतामुक्त जगण्यास
फक्त नवी उर्मी हवी...!

रविवार, १३ मार्च, २०२२

जयाजयौ...?


पराकोटीची लालसा 
स्वार्थाची परिसीमा
भेदाभेद पवित्र
एकाएकी... 
 
मायावी लौंदांची
रोजच सुंदोपसुंदी 
माणुसकीची हार  
पदोपदी...  
 
व्यक्तिपूजा साकार
जयघोष नामाचा  
नामाचा गजर
सर्वभरी...  
 
बळी तो कान पिळी 
सत्तेपुढे सचोटीची   
तत्व अन् मूल्ये
धारातीर्थी... 
 
कुणा हाती झाडू 
कुठे दाती तृण  
विवेक विचार 
त्यागलागी... 
 
बुडतां हे जन  देखवे डोळां
'तुका म्हणेहेच सत्य 
बाकी सत्योत्तर 
मनमानी !

मंगळवार, ८ मार्च, २०२२

वामांगी...!

देवळात गेलो होतो मधे
तिथ विठ्ठल काही दिसेना
रखमाय शेजारी
नुसती वीट

मी म्हणालो ऱ्हायल
रखमाय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोक ठेवायच

पायावर ठेवलेल डोक
काढून घेतल
आपल्यालाच पुढ माग
लागेल म्हणून

आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठ गेला
दिसत नाही

रख्माय म्हणाली
कुठ गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला

मी परत पाह्यल
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथ
कोणीही नाही

म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूच मला जरा
कमीच दिसत

दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकड जरा
होत नाही

कधी येतो कधी जातो
कुठ जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले

आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कस कुणी
सांगितल नाही

आज एकदमच मला
भेटायला धावून आल
अठ्ठावीस युगांच
एकटेपण...

- अरुण कोलटकर

ज-आगतिक महिला-दीन-विशेष...!

रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

गाभारा...!


(स)माजमाध्यमाने चांगलीच सोय करून दिल्याने स्वतः:ला लेखक अथवा त्याहून सुलभ म्हणजे कवी समजणाऱ्यांचे अक्षरश: पेव फुटलेले असतांना भाषेच्या भवितव्याबद्दल एवढी तळमळ, कळकळ आणखीन हळहळ व्यक्त करणारे मान्यवर व्यवहार कुठल्या भाषेतून करतात याचा धांडोळा घेतल्यास बरेच जावईशोध लागल्यामुळे भोवळ आल्याशिवाय राहणार नाही.

वरील प्रकटनातील भाषाविशिष्ट स्वर-व्यंजन,  उपरोध आणि त्यांच्या उपयोजनाचे प्रयोजन अर्ध्या जरी प्रस्तुत भाषाभिमान्यांस समजले, उमजले तरी, अमृताशी पैजा जिंकणाऱ्या माऊलींच्या आणि छत्रपतींच्या प्राकृत भाषेचे प्राक्तन बदलल्याशिवाय राहणार नाही आणि 'अभिजातते'च्या नावाने गळे काढण्याची कदापि गरज पडणार नाही.

याबाबतीत अल्लामा इकबाल यांचा 'खुदीको कर बुलंद इतना...' सल्ला शिरोधार्य मानायलाच हवा. वापर नसलेल्या गोष्टी कालौघात नामशेष होतात हे सांगायला आजच्या ब्ल्यू टूथ आणि ओटीपीच्या काळात डार्विनची गरज नसावी. वापर हा सवयीतून येतो आणि सवय संस्कारातून येते. संस्कारासाठी अध्ययन, चिंतन, मनन, प्रकटन यांचा परिपाठ असावा लागतो. अन्यथा, तथाकथित भाषाभिमान्यांचे अरुण्यरुदन हे आज महाराष्ट्रात चाललेल्या राजकीय शिमग्याइतकेच निंदनीय तथा शोचनीय ठरल्यास नवल नाही.  असो!

'शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस...'

असा वस्तुनिष्ठ सल्ला देणाऱ्या आत्मनिष्ठ, समाजनिष्ठ जाणिवांचा धनी आणि शब्दरत्नाकराचा महामेरू, वि. वा. उर्फ तात्याराव शिरवाडकर अर्थात महाराष्ट्राचे वैभव कुसुमाग्रज यांचा आज ११० वा जन्मदिवस. या निमित्ताचे औचित्य साधून हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करणे अभिमानास्पदच पण केवळ सोहळ्यांच्या परंपरेने संस्कृती विकास पावत नसते, त्यासाठी काही तत्वांचा, मूल्यांचा, संस्कारांचा वसा घ्यावा लागतो. कथनी आणि करणी मधला फरक राजकारण्यांना शोभत असला तरी रयतेने तरी त्या वाटेने जाऊ नये. अन्यथा 'यथा राजा तथा प्रजा' या न्यायाने समाजात दांभिकता बोकाळण्यास वेळ लागत नाही. 

आजच्या निमित्ताने, ज्यांच्या नावाने हा जयघोष चालला आहे त्या कुसुमाग्रजांनी समाजव्यवस्थेतील  दोषांवर आणि दांभिकतेवर कोरडे ओढण्याची एकही संधी कधी हातची जाऊ दिली नाही. त्यासाठी त्यांच्या अखेर कमाईस्वातंत्र्यदेवीची विनवणीसहानभूतीसिंहस्थ या कविता जरूर वाचाव्या मात्र आजच्या परिस्थितीला अगदीच समर्पक असणारी कुसुमाग्रजांची ही कविता... सामाजिक-राजकीय उद्बोधनासाठी.

गाभारा

दर्शनाला आलात? या..
पण या देवालयात, सध्या देव नाहीगाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्‍यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते
सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,
पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्‍या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.
- कुसुमाग्रज

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

तेजोनिधी..!


डॉक्टर सचिन चिंगरे ! जुन्या शाळूसोबत्याची प्रौढपणी, कळत्या(?) वयात नव्याने झालेली हीच खरी ओळख. सचिन आणि मी इयत्ता दहावीपर्यंत एकाच वर्गात शिकलो असलो तरी शाळेतला सचिन मला फारसा आठवत नाही. आम्हा लिंबूटिंबू मुलांच्या मानाने किंचित मोठा दिसणारा आणि पौरुषाच्या खुणा पौगंडावस्थेपासून बाळगणारा सचिन माझ्या मैत्र परिघात (आजच्या भाषेत रेंजमध्ये!) असणे शक्यच नव्हते आणि त्यामुळे आमच्या बालमैत्रीचे योग नसल्याने त्याचे त्या वयातले अनेक भोग टळले ! (शंका असल्यास जाणकारांस विचारा !) पण राशीला असलेले ग्रह सहसा पिच्छा सोडत नाहीत तद्वत मी त्याच्या राशीला बसणे हे त्याचे भागधेयच होते आणि माझे पुरुषस्य भाग्यमं !

अत्यंत व्यावहारिक (व्यावसाईक म्हणणे सिर्फ बेवकुफीही नहीं, बे(ई)मानी होगी ! आठवा: ‘नाजायज प्रिस्क्रिप्शन’!) कारणाने सुमारे ३० वर्षांच्या खंडानंतर आम्ही सन्मित्र दिनेशच्या सदिच्छेने भेटलो त्याला आज सुमारे ७ वर्षे लोटली. माझ्या नेहमीच हुळहुळणाऱ्या हृदयाच्या निमित्ताने २०१५ च्या दिवाळीत मी सचिनला खऱ्या अर्थाने ‘भेटलो’ आणि आजवर केवळ ऐकलेले आणि सहसा पहिल्याच भेटीत जवळपास अशक्य असणारे ‘हृदया हृदय येक जाले। ये हृदयीचे ते हृदयी घातले। द्वैत न मोडता केले। आपणा ऐसे अर्जुना।’ अनुभवले... तंतोतंत! असे होण्यामागे – सौख्य, आनंद आणि उन्मेष बहुरंगी, बहुढंगी असले तरी सद्भाव, आर्त आणि विवेक एकरंगी असतात (मोनोटोनोस का म्हणानात) – हे एक कारण असावे का ? ते काहीही असले तरी चिंगरेंच्या सौख्यपंचकाला भेटल्यावर लगोलग मला जे सुचले ते असे...   

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५
सर्वव्याधिप्रमोचकं I
परिस्थितीची सम्यक जाण
सहजीवनाचा निकोप वसा
बहुतांच्या स्वास्थ्यावर दोघे
सोडत जाती निरामय ठसा…!

वैद्यकव्यवसायाप्रती माझ्या अस्वस्थ जाणिवांमध्ये वैद्यकशास्त्रायोगे मुलभूत परिवर्तनास कारणीभूत ठरलेल्या धुळ्याच्या डॉ. सचिन व डॉ. सौख्या चिंगरे (नावात अर्थाबरोबरच सौ. देखील अनुस्यूत असणे किती विलक्षण!) या सुविद्य वैद्यक दंपतीस सस्नेह. माझ्या शतायुषाच्या संकल्पास दृढ करणारा सचिन आपला वर्गमित्र आहे याचा अवर्णनीय आनंद आणि सार्थ अभिमान येथे प्रकट करणे प्रस्तुत ठरावे. शुभम भवतु…I

येथून सुरू झालेला प्रवास कवितेच्या माध्यमातून नित्य नवी वळणे घेत काव्य-शास्त्र-विनोदाच्या मार्गाने मैत्र जुळवून गेला आणि फोनवर तासंतास बोलणाऱ्या माझ्या मित्रमंडळात आणखी एक मूल्यवर्धक भर पडली. आम्हाला चर्चेसाठी कुठलाही विषय वर्ज्य नसल्याने, स्कुल ऑफ थॉट भिन्न असल्या तरी मानवी आयुष्याच्या मूलभूत धारणा आणि कवीमनाला शाप असणाऱ्या संवेदनशील जाणिवा समांतर असल्याने आमच्या सहवेदना एकरूप होत राहिल्या... राहतील !

आज डॉक्टरला वाढदिवसाच्या निमित्ताने काही काव्यात्म शुभेच्छा द्याव्या अशी उर्मी खूप होती पण सूर्याला  काजवे दाखविण्यात काय हशील या विचाराने आणि 'कविता विचारप्रधान की भावनेचे प्रकटन...?' या आमच्या दिनाच्या घरी रंगलेल्या चर्चेत भावनाविवशतेला माझा कौल मिळाल्याने मला डॉक्टरबद्दल उचंबळून आलेल्या साऱ्याच भावना आज, आत्ता ताबडतोब व्यक्त करायला जमेल असे नाही... त्यासाठी लागणारी प्रतिभा काही वेगळीच असते !

तेव्हा 'गेले द्यायचे राहूनी...' ही खंत उराशी बाळगून, या पोस्टचे शीर्षक सार्थ ठरवणारा, डॉक्टरने मला दिलेला  मित्रत्वाचा प्रेमळ सल्ला... 


इत्यादीवर डॉक्टरचे इत्यादी     

अभिजातता...!'मी सावरकर'

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

संस्कार...!


काल आमच्या विवाहसंस्काराला २५ वर्षे पूर्ण झाली, सिल्व्हर ज्युबिली अर्थात रौप्य महोत्सव का म्हणानात ! तब्बल २५ वर्षे म्हणजे दोन तपांहून अधिक काळ... दोघांच्या तपश्चर्येची दोन आवर्तने झाली की... बघता बघता ! आणि या सहप्रवासात जगाला दाखवण्यासारखी लौकिक जमापुंजी फारशी नसली तरी मर्मबंधात जपण्यासारखी उपलब्धी अक्षरश: अगणित ठरावी. मात्र आम्हाला अभिमान आणि समाधान वाटावे अशी दृष्य प्राप्ती म्हणजे आमचे कन्यारत्न - मैत्रेयी ! 

डोळ्यांचे ऑपरेशन झालेले असतांना, डोळ्यांवर काळा गॉगल चढवून मुलीने आमच्या मैरेजच्या ट्वेन्टी फिफ्थ एनिवर्सरीचा जो नेत्रदीपक सोहळा ऑर्गनाईज केला तो अगदीच संस्मरणीय झाला - एकदम एपिक, यु नो ! व्हेन्यूच्या निवडीपासून मेन्यूच्या संयोजनातील केवळ टेस्टच नाही तर विवेक-विचारही आम्हाला स्पर्शून गेला. त्यातून, आमच्या २५ वर्षांच्या सहप्रवासाच्या क्षणचित्रांचे कोलाज, त्याला रोमँटिक फील देणारी सजावट आणि गुलाबपाकळ्यांच्या वृष्टीपासून, २५ दिव्यांचे औक्षण आणि २५चा फ्रूटकेक असा दोन्ही संस्कृतींचा संगम केवळ समर्पकच नाही तर आत्यंतिक मनोहारी ठरला. या सर्व संयोजनात तिला तिचे दोघे भाऊ आणि दोन्ही मावशांची मोलाची साथ लाभली.

२८ वर्षांपूर्वी आईपपांच्या लग्नाला २५ वर्षे झाली तेव्हा, धुळ्याच्या घरातच आमच्या वकुबानुसार आम्ही एक छोटेखानी रौप्य महोत्सव साजरा केला होता. काल मुलीने असाच कार्यक्रम अतिशय कलात्मक आणि आधुनिक पद्धतीने साजरा केल्याने एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे अतीव समाधान तर आहेच शिवाय यथोचित संस्कार संक्रमित झाल्याचा मन:पूर्वक आंनद !

असाच सुवर्ण, अमृत आणि हिरक महोत्सवही साजरा करण्याचे बळ आणि संधी मिळो हीच प्रार्थना ! 

शुभम भवतु !

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

पंचविशी...!


त्याला उपयोगितेचे महत्वच उमजले नाही कधी
वस्तू-व्यक्ती, भावना-कल्पना यांना 'वापरता' येते
इतके साधे-सोपे सोईस्कर 'सत्य' गमलेच नाही त्याला
'अर्थ' आणि 'कारण' दोघांना पारखाच होता तो नेहमी
करायचा निरुपयोगी उद्योग, निर्हेतुक निर्ममपणाने...
म्हणायचा वेळ फार जातो 'उत्पादक' काम करण्यात
होणार नव्हतेच त्याचे काही, नाहीच झाले या मर्त्य जगात !

पण चित्रगुप्ताच्या गफलतीने पोहचला कर्मचाऱ्यांच्या स्वर्गात,
जिथे ज्याला बघावे तो व्यस्त, 'उपयोगी' कामात सतत व्यग्र.
हा हिंडायचा, कायम गडबडीत असणाऱ्या गर्दीचे धक्के खात
किंवा पहुडायचा हिरव्यागर्द माळरानावर निळ्याशार आकाशाखाली
प्राणी-पक्ष्यांच्या जोडीने निसर्गाच्या नाद-रस-रंग-गंधाची किमया अनुभवत 
उमटायच्या त्या जाणीवा चित्र-शिल्प-शब्द-सुरांतून... अभिनिवेशाशिवाय !

ओढ्यावरून पाणी भरायच्या कामात गर्क तिने पाहिले एकदा याला
कर्मचाऱ्यांच्या स्वर्गात एवढा रिकामटेकडा बघून अचंबा वाटला तिला
म्हणाली काम देऊ तुला, माझा एक हंडा देऊ पाणी भरून आणायला?
हा म्हणाला, हंडा दे पण असे उत्पादक उद्योग करायला वेळ नाही मला...
हंडा घेतला आणि उभा-आडवा रंगवून दिला निरर्थक रंग-रेषांनी...
तिला कळेचना याचे काय करावे... पण काहीतरी नवीन जाणीव जागी झाली

यथावकाश त्याने तिचे इतस्ततः उडणारे केस बांधायला रंगीबेरंगी रिबीनी बनवल्या
त्या रिबिनींनी केस बांधून स्वतःला निरखण्यात तिचा कामाचा वेळ वाया जाऊ लागला
केवळ तीच नाही तर आणखीनही काही लोक याच्या नादी लागून कलाकृती करू लागले
आता मात्र धुरिणांना आपल्या स्वर्गात हे निरर्थक लोण पसरणे धोक्याचे वाटू लागले आणि...
त्यांनी याला कर्मचाऱ्यांच्या स्वर्गातून हाकलून लावण्याचे ठरवले, एवढ्यात चित्रगुप्त प्रकटला!

म्हणाला याला चुकूनच इकडे आणले होते, योग्य ठिकाणी नेऊन सोडतो, काळजी नसावी.
त्याला खूपच बरे वाटले, सुटका झाल्यासारखे... इथे कुणाला कशासाठी वेळच नाही म्हणे !
तो निघाला तर... आजवर कधीही ऐकले, बघितले तर काय कल्पिले देखील नाही
असे अघटित त्या दिवशी त्या कर्मचाऱ्यांच्या स्वर्गाने बघितले.
ती चक्क त्याच्या सोबत निघाली, तो जाईल तिथे जायला... 
आणि आणखीनही काही निघाले.
कर्मचाऱ्यांच्या स्वर्गातल्या समस्त ज्येष्ठ-श्रेष्ठ अनुभवी विद्वानांना
त्यांच्या त्या निरुपयोगी निर्णयाचा न हेतू समजला न अर्थ... कधीही !

-----------------------------------------------------------------------------------------

असो, आज ही कथा आठवण्याचे कारण म्हणजे तिने तो निरर्थक, निरुपयोगी, निर्हेतुक निर्णय घेतला त्याला आज २५ वर्षे झाली... बाकी काही नाही ! 

...आणि, पन्नाशीनिमित्त माझ्या अकर्माचे डॉक्टरांनी केलेले मार्मिक निरूपण हे या रूपकाची प्रेरणा असल्याने, त्यांचे मन:पूर्वक आभार !

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

ओवी-गीता


आमचे आजोबा अण्णा अर्थात बापू केशव पुराणिक यांच्या केशवतनय या उपनामाने केलेल्या प्रकाशित, अप्रकाशित लेखनाचे टंकलेखन करून आंतरजालावर सर्वांच्या संदर्भासाठी जतन करण्याच्या आमच्या उपक्रमास व्यापक जनाधार मिळेल तेव्हा मिळो, तूर्तास त्यास ‘विद्या’धार मिळाल्याने अण्णांची तिसरी लोकप्रिय रचना ‘ओवी-गीता’ आज माऊलीचरणी समर्पित करण्याची संधी मिळत आहे !

ज्ञात मानवी इतिहासात, देवाचे मानवीकरण आणि मानवाचे दैवीकरण जेथे एकत्रित पाहता येते आणि षड्-रिपुग्रस्त मानवी आयुष्याचे कालातीत तत्वज्ञान जेथे सहज सुगम भाषेत प्रत्ययास येते असा महाभारत हा एक अद्भुत ग्रंथ ! यातील ‘गीतासार’ हा अलौकिक मूलमंत्र जो जगभर प्रचलित आहे. अनेकांच्या आयुष्याची धारणा आणि धर्माचा आधार असलेली गीता साध्या-सोप्या मराठीत ओवीबद्ध करून नित्यपठणासाठी सार्थ करण्यासाठीचा हा प्रयत्न त्याच्या सद्हेतुसह समजून घ्यायला हवा म्हणून लेखकाचे मनोगत समाविष्ट केले आहे, ते जरूर वाचावे. 

या रचनेच्या टंकलेखनाची संपूर्ण जबाबदारी स्वयंप्रेरणेने स्वीकारून अत्यंत निष्ठापूर्वक पार पाडल्याबद्दल अण्णांची ज्येष्ठ नात सौ. विद्या मदन कुलकर्णी [पूर्वाश्रमीची विद्या  शामकांत पुराणिक] म्हणजेच आमची विद्याताई आणि तिचे यजमान आणि आमचे जावई-कम-स्नेही श्री. मदनराव कुलकर्णी या उभयतांचे आम्ही ऋणी आहोत तसेच त्यांना तांत्रिक बाबींमध्ये मोलाची मदत करणारे त्यांचे सुपुत्र हर्षद कुलकर्णी याचेही मन:पूर्वक आभार ! कुलकर्णी परिवाराने सश्रद्धतेने केलेल्या कामाच्या तपासणीची चोख जबाबदारी पुराणिकांकडून पुन्हा एकदा अण्णांचे नाशिकस्थित नातू श्री. वैभव शामकांत पुराणिक व सौ. स्वाती या उभयतांनी निगुतीने पार पाडली. 

विद्याताईच्या आध्यात्मिक ओढीची अशी आत्मिक अनुभूती आमचे मनोबल उंचावणारी आणि आमच्या या उपक्रम-निश्चयांस अधिकच दृढता देणारी ठरली. गीतज्ञानेश्वरच्या निवेदनातील ताईची उत्स्फूर्तता यावेळी तिच्या टंकलेखनाच्या कौशल्यातही प्रतीत झाल्याने सदर टंकलेखनाच्या तपासणीचे काम सुकर झाल्याचा अनुभव आहे. अर्थात या कामातील आमचा वाटा आता खारीचाही नसल्याने ‘मुंगी होऊन साखर खाणे…’ म्हणजे काय याची आम्ही सदेह प्रचिती घेत आहोत. श्रीमदभगवद्गीतेचे रसाळ आणि सुबोध निरूपण करणाऱ्या माऊलीच्या चरित्रांस ‘मुंगी ऊडाली आकाशी…’ संबोधण्यामागची प्रेरणा अशीच असावी का…?

असो. तूर्तास तरी विषयांतर नको, याबद्दल पुन्हा कधीतरी… 

ओवी-गीतेच्या पीडीएफ प्रतीचा दुवा -

शुभम भवतु !

संवत्सर प्लव, शके १९४३, पौष संकष्टी चतुर्थी शुक्रवार, २१ जानेवारी २०२२.

शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

संक्रमण

 
त्रास सारे ठरूनी तीळमात्र 
'मना' लाभो गोड विसावा...
आकांक्षांना फुटुनी धुमारे,
पतंग हा गगनी भिडावा...!

सर्वांना मकर संक्रमणातून उत्तरायणात प्रवेशणाऱ्या तेजपर्वाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

रविवार, २ जानेवारी, २०२२

संकल्प...!

विविध संस्कृतींमध्ये नववर्ष वेगवेगळ्या वेळी आणि निरनिराळ्या पद्धतीने साजरे होत असले तरी सध्या सर्वत्र प्रचलित असलेल्या ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार १ जानेवारीला सुरु होणाऱ्या नवीन वर्षाचे वारे वाहू लागले की, त्या संस्कृतींच्या अंधानुकरणाने आपल्या मानसिक गुलामगिरीचे प्रच्छन्न दुर्दर्शन घडवीत न चुकता(?) करायची पहिली गोष्ट म्हणजे थर्स्टी फर्स्टची पार्टी आणि दरवर्षी न पाळण्यासाठी करण्याची दुसरी गोष्ट म्हणजे तेच ते संकल्प... शिळ्या कढीला नव्याने उकळी आणावी तसे! (बाय द वे, 'संकल्प' हे करतांनाच 'सोडा' असे म्हणतात याला काय म्हणावे?) आपल्या संस्कृतीमध्ये नित्योपासनेचे महत्व अनुभवसिद्ध असल्याने, वर्षाच्या सुरवातीला आरंभशूरपणे संकल्प करून, सकाळी बोललेले दुपारी विसरण्याची राजकीय सोय अंगी बाणवल्याप्रमाणे, ते सिद्धीस नेण्याऐवजी स्वत:ची वृद्धी सांभाळण्याची स्वकेंद्री वृत्ती बळावण्याचे खर तर काहीच कारण नाही... पण लक्षात कोण घेतो?

कालच, 'काय म्हणतोय तुमचा नवीन वर्षाचा संकल्प?' या उत्सुक प्रश्नाचे उत्तर देतांना आम्ही ज्या 'फोमो'च्या प्रादुर्भावाचा उल्लेख केला त्याचेच एक लक्षण म्हणजे अशा अयोग्य, अस्थानी आणि अनिष्ट 'शिष्टा'चारांच्या  चालीरीती होणे. काय सांगता, 'करोना' आणखीन 'ओमायक्रॉन' मलेरियाचे डास ठरावे एवढ्या वेगाने फैलावणाऱ्या आणि अनेक दुर्धर मानसिक आजारांचे केंद्र असलेला 'फोमो' तुम्हाला माहीत नाही? अहो, 'फिअर ऑफ मिसिंग आऊट'! आणि याची चाचणी अगदी मोफत आणि सुलभ आहे. शिवाय चाचणी हाच उपचार असलेला हा माणसाच्या ज्ञात इतिहासातला एकमेव विकार असावा. तुम्हाला 'फोमो'ची लक्षणं आहेत का हे तपासून पाहण्यासाठी एवढेच करा... सुमारे ३० मिनिटे कुठल्याही प्रकारच्या समाजमाध्यमापासून दूर रहा... श्वास जड झाला, हातापायाला कंप सुटला, घशाला कोरड पडली, जीव घाबरा झाला, घाम फुटला तर घाबरून जाऊ  नका, फोन हातात घ्या. आराम पडल्यास अभिनंदन! तुम्हाला बीपी, शुगर, थायरॉईड कसलाही त्रास नाही... फक्त 'फोमो' आहे.

असो, वर्षाची सुरवात (तरी) टीकेच्या भडिमाराने नको, उगाच लोकांच्या संकल्पात मोडता घातल्याचे पाप  लागायचे... इट्समायसीन म्हटल्यासारखे ! तर मुद्दा होता संकल्पाचा ! मूळ विषयाला बगल देऊन भलत्याच विषयाचे चऱ्हाट लावायला जे मार्केटिंग (की सेलिंग?) स्किल्स  लागतात ते या जन्मात तरी जमणे नाही, तेव्हा आपल्या नेहमीच्या आत्मघातकी 'एक घाव दोन तुकडे' स्टाईलने विषय संपवावा हे उत्तम... गेल्या सुमारे ३० वर्षांपासून ('जबसे होश संभाला है...' म्हणायची सोय नाही, कुठे सांभाळता येतोय अजून तरी?) आमचे संकल्प आमच्या कवितांतून वेळोवेळी जाहीर झाले आहेत आणि बहुतांना ते अगदी स्वप्नील, बाळबोध किंवा थेट वेडगळही वाटले आहेतच. त्यामुळे आज हा दोष स्वतः:कडे न घेता एका अज्ञात कवीने आमच्याच संकल्परुपी भावना अत्यंत प्रत्ययकारी पद्धतीने मांडल्या आहेत, त्याच आमचा आजीवन संकल्प म्हणून सादर करतोय... मुळात दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून प्रसारित झालेल्या या प्रेरणादायी आणि विलक्षण महत्वाकांक्षी रचनेमागील संवेदनशील मनाचा आम्हाला अद्याप शोध लागू शकलेला नाही. आपणापैकी कुणाकडे याबद्दल काही सप्रमाण माहिती असल्यास कृपया कळवावी म्हणजे ज्याचे/जिचे श्रेय त्याला/तिला सन्मानपूर्वक देता येईल.     

संपू दे अंधार सारा

उजळू दे आकाश तारे

गंधाळल्या पहाटेस येथे

वाहू दे आनंद वारे….


जाग यावी सृष्टीला की

होऊ दे माणूस जागा

भ्रष्ट सारे नष्ट व्हावे

घट्ट व्हावा प्रेम धागा…


स्वच्छ सारे मार्ग व्हावे

अन् मने ही साफ व्हावी

मोकळ्या श्वासात येथे

जीवसृष्टी जन्म घ्यावी…


स्पंदनांचा अर्थ येथे

एकमेकांना कळावा

ही सकाळ रोज यावी

*माणसाचा देव व्हावा…

*देव झालेल्यांचे / ठरविले गेलेल्यांचे पायही कसे मातीचेच आहेत अन विकारही किती (अ)मानवी आहेत हा ताजा इतिहास बघता शेवटच्या ओळीत फक्त थोडा बदल सुचवासा वाटतो...

'अन् पशूचा माणूस व्हावा...!'