शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३

आशा...!


"गुलजार, आरडी आणि आशाताई या त्रिवेणी संगमाच्या स्निग्ध प्रवाहात जे मोती वेचले त्यातील ‘मेरा कुछ सामान...’ हा शीर्षस्थ शुभ्र मौक्तिक. याच्या तोडीचे पुन्हा कधी आयुष्यात मिळेल, गवसेल, लाभेल असे काही वाटले नव्हते. पण या आमच्या गोताखोर स्नेह्यांनी पुन्हा एकदा कलासागरात डुबकी मारून काढले काय तर हे अमृत... “तुमुल कोलाहल कलह में मैं ह्रदय की बात रे मन...” आता याबद्दल या माणसाचे आभार कसे मानावे...?"

एप्रिल २०१९ मध्ये लिहिलेल्या या 'कोलाहल' पोस्टचा विषय बोजड, तत्वचिंतनात्मक धाटणीचा असला तरी त्याला सुभग, सुनीत आणि सुश्राव्य करणारा मोहक स्वर काल ९० वर्षांचा झाला. लतादीदींचा स्वर अलौकिक, दैवी तथा असामान्य होता हे निर्विवाद पण आशाताईंनीच एका मुलाखतीत साभिनय (मिमिक्री हा आशाताईंचा आणखी एक कलागुण ज्यास म्हणावा तसा वाव मिळाला नाही) सांगितले तसे, लतादीदींचा स्वर हा देवघरातल्या समईसारखा सात्विक, स्निग्ध आणि सालस होता त्याला, 'दम मारो दम...' चा ठसका जसा झेपला नसता तशी 'रात अकेली है...' मधले उन्मादक आव्हानही पेलवले नसते आणि 'मेरा कुछ सामान...' च्या मुक्तछंदातला छांदिष्टपणाही मानवला नसता. या सगळ्यांना अक्षरश: पुरून उरणारा एकमेव आवाज म्हणजे आशा भोसले !

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही कदाचित गायन प्रकारात एकमेव असलेल्या या गांधर्वकन्येने सुमारे २० भाषांमध्ये ११,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केल्याची नोंद २०११ सालातील आहे. पुढील १२ वर्षात त्यात अजून किती भाषा आणि गाणी यांची भर पडली असेल हे एक तो मंगेशीच जाणे ! आजही स्टेजशो करण्याची उर्मी, ऊर्जा आणि उत्साह असलेल्या या चमत्काराचे नाव 'आशा' शिवाय निराळे काय असू शकले असते...! 

थेट सचिनदा, ओ पी नय्यर, खैय्याम पासून पंचम, इलायाराजा, ए आर रहमान पर्यंत अशी दिग्गज संगीतकारांची आणि, 'पिया तू अब तो आ जा...' अशा उन्मादक पासून 'इन आँखोंकी मस्ती...' अशा आव्हानात्मक, ते मराठीतील, 'जिवलगा राहिले दूर घर माझे...' अशा आर्ततेची रेंज पदरी बाळगणारी आणि तेवढ्याच डौलाने मिरवणारी आशा काल नव्वदीची झाली असे तिला बघून कुणालाही पटणार नाही ! म्हणूनच विंदांच्या शब्दात थोडा बदल करून सांगायचे तर,

'आशा'त आजच्या ही गाणे असे उद्याचे,
स्वप्न चिरंतनाचे इतकेच जाणतो मी...!'

बाय द वे, उडत्या, फिल्मी गितांशिवाय क्लासिकल अर्थात शास्त्रीय प्रकारात आशाने फार काही केले नाही असे मानणारे वेळ काढून वरील अल्बममधील चीजा जरूर ऐकतील ही...आशा !

आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृङ्खला । 
यया बद्धा: प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङ्गुवत् ॥

सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

बोझा...!

नसरुद्दीन जंगल में लकड़ी काटने गया था।

दिन के अंत में, उसने लकड़ियों का बंडल बनाया, लेकिन गट्ठर को गधे पर रखने के बजाय, उसने बंडल को अपने सिर पर रख लिया। फिर वह गधे पर चढ़ गया और शहर में चला गया।

“नसरुद्दीन!” उसका एक दोस्त चिल्लाया। “तुम लकड़ी का गट्ठर अपने सिर पर क्यों ले जा रहे हो? क्या इससे दर्द नहीं होता?”

"इससे दुख होता है," नसरुद्दीन ने स्वीकार किया, "लेकिन मैं भार साझा करने में मदद करना चाहता था।"

“मुझे अभी भी समझ नहीं आया,” नसरुद्दीन के दोस्त ने हैरान होकर कहा।

“गधा मुझे ले जा रहा है,” नसरुद्दीन ने समझाया, “लेकिन मैं लकड़ी ढो रहा हूँ।”

----------------------------------------------------------

“इस कहानी के सभी पात्र और घटनाए काल्पनिक है, इसका किसी भी व्यक्ति या घटना से कोई संबंध नहीं है। यदि किसी व्यक्ति या प्राणी से इसकी समानता होती है, तो उसे मात्र एक संयोग कहा जाएगा।”

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

रानकवी... गानकवी !


आम्ही शाळेत असतांना एकमेव करमणुकीचे साधन म्हणजे रेडिओ. या उपकरणाला कारण माहित नसतांना उगाचच ट्रान्सिस्टर म्हणण्याचीही फॅशन त्या काळी होती. समस्त जगात काय चाललेय हे सांगणाऱ्या बातम्यांपासून चित्रपट गीते, भावगीते, आणि 'नभोनाट्य' असे भारदस्त नाव धारण करणारे श्रवणीय नाटक असे मनोरंजनपर कार्यक्रम यातूनच आमचे सामाजिक भान, सांस्कृतिक जडणघडण आणि वैश्विक आकलन यांचे संवर्धन होत असे. आजच्या 'चाट जीपीटी' तंत्रज्ञानाच्या आवाक्याने च्याट्म चाट पडण्याच्या जमान्यात आमची वाढ खुजी वाटत असली तरी ती निकोप होती आणि आमच्या नेमस्त 
आयुष्याला पुरली देखील !

तर या आकाशवाणीवर मराठी गीतांच्या कार्यक्रमात अनेकदा लागणारे एक ठेकेबाज गाणे आम्हाला फार आवडायचे, ते म्हणजे - 'जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी..!' यातील शब्दांचा ग्रामीण बाज, दोन्ही गायकांनी लावलेला सूर आणि घोळवलेले स्वर, त्याला अधिकच परिणामकारक करणारी पारंपरिक वाद्यांची साथ आणि एकूणच श्राव्यानुभव अधिकच समृद्ध करणारा अफलातून कोरस... या साऱ्याची संस्कारक्षम 'मना'स भूल पडली नसती तरच नवल. हे 'मना'वर गारुड करणारे गीत कुणी लिहिले आहे याची बालसुलभ कुतुहूलाने चौकशी करता आमच्या अबोध साहित्यिक जाणिवेत भर पडली एका नावाची - ना. धों. महानोर ! ही आमची आणि त्यांची पहिली ओळख. पण ती गाण्याच्या माध्यमातून झाल्याने आमच्यासाठी त्यांची पहिली ओळख 'गानकवी' !

ग्रामीण जीवनाबद्दलचे आमचे निमशहरी भान हे शेती, बैलजोडी आणि बैलगाडी यापुरते मर्यादित असल्याने आणि ग्रामीण कवितेचा आमचा पैस विठ्ठल वाघांच्या, 'काळ्या मातीत मातीत...' याच्या पलीकडे पोहचत नसल्याने, शंकर पाटलांची खरीखुरी ग्रामीण कथा जशी आम्हाला उशीराने भेटली, तसेच रानवाटा दाखविणारे ना. धो. हे 'रानकवी' आहेत ही यथावकाश झालेली बोधी !

'जैत ते जैत' हा अनेक कारणांसाठी कायमच आमचा आवडता राहिलेल्या चित्रपटातील गेय गीते, बोल गाणी ही याच रानकवींनी लिहिली आहेत एवढी शिदोरी त्यांच्याशी नाळ जुळायला पुरेशी होती. पुढे आम्ही 'किशोर' वयातून 'कुमार' वयात आलो तसे, 'गोऱ्या देहावरती कांती...', 'नभं उतरू आलं...', 'घन ओथंबून येति...', 'चिंब पावसानं रान झालं आबादानी...' पासून थेट, 'भर तारुण्याचा मळा', 'राजसा जवळी जरा बसा...' अशा बैठकीच्या लावण्यांपर्यंत गानकवी आमचे दैवत झाले नसते तरच नवल !

पण याही साऱ्या, आकाशातली नक्षत्र खिशात घेऊन फिरण्याच्या मोरपंखी काळात, विंदा, कुसुमाग्रज, बाकीबाब यांच्यासह  कबीर, रुमी, गालिब आम्हाला भुरळ घालत असतांना आमच्या अलवार 'मना'वर फुंकर घालायला आला डॉ. जब्बार पटेलांचा 'मुक्ता' ! 'जैत रे जैत' नंतर तब्बल १६ वर्षांनी या अत्यंत क्रिएटिव्ह जोडगोळीने पुन्हा एकदा रानकवितांची मेजवानी दिली. मुक्ता मध्ये सोनाली, अविनाश, विक्रम गोखले यांच्या अभिनयाच्या तोडीचे किंबहुना अधीकच भुरळ घालणारे काही असेल तर ती सगळी गीते आणि मधून मधून सुकामेव्यासारख्या पेरलेल्या कविता. जयश्री शिवराम यांच्या अत्यंत वेगळ्याच धाटणीच्या करकरीत आवाजाने सजलेल्या 'जाई जुईचा गंध मातीला...' या गीताच्या सुरवातीचे आलाप कधीही केव्हाही कानावर पडले तर अंगावर सरसरून काटा येतो. यात आवाजाची जादू आहे हे नि:संशय पण मुळात ते शब्द तेवढे काळजाचे ठाव घेणारे नसते तर हा परिणाम साधलाच असता असे नाही. बघा कसे आहेत ते शब्द...


एकेका शब्दात आणि रूपकात एवढी ताकद आहे की याला कविकल्पना म्हणावे की सकल मानवी जीवनाचा 'नैसर्गिक' साक्षात्कारी दृष्टांत, असा प्रश्न पडावा. आणि हे झाले फक्त प्रसिद्धी पावलेल्या गीतांबद्दल. महानोरांच्या साऱ्याच काव्याविष्काराचा समग्र धांडोळा घ्यायचा तर ही जागा अपुरी पडायची आणि असे धाडस करू म्हणणाऱ्या पामराच्या मर्यादित व्यासंगाचे पितळ उघडे पडायचे. 

काल ना. धों. महानोर नावाच्या रानकवीने अखेरचा श्वास घेतला, आपल्या अवीट गोडीच्या अफाट रानमेव्याचे असीम भांडार मागे ठेऊन. ज्याच्या प्रत्येक उद्गारात निसर्ग आणि विशेषतः पाऊस कायम ओसंडून वाहत राहिला त्याला देहातून मुक्त करण्यासाठी निसर्गाने चिंब पावसाळी वेळच निवडावी याला नियती म्हणावे की निसर्गाची काव्यत्मकता...?

आमच्यासाठी गानकवी असलेल्या या कविश्रेष्ठास आम्हांला प्राणप्रिय असलेल्या 'मुक्ता'मधील त्यांच्या एका नितांत सुंदर आणि अत्यंत रोमांचक पावसाळी कवितेची शब्दांजली...

मन चिंब पावसाळी, झाडांत रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले

पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी
शिडकाव संथ येता झाडें निळी कुसुंबी

घरट्यात पंख मिटले झाडांत गर्द वारा
गात्रांत कापणारा ओला फिका पिसारा

या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे

रानात एककल्ली सुनसान सांजवेळी
डोळ्यांत गल्बतांच्या मनमोर रम्य गावी

केसांत मोकळ्या त्या वेटाळुनी फुलांना
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे

मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यांत गुंतलेले.

मंगळवार, २५ जुलै, २०२३

शिरिषासन...!

बरोब्बर ५ वर्षांपूर्वी ६ जून २०१८ ला शिरीष कणेकर सरांना याच ठिकाणी त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त शतायुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या, त्यांच्याबद्दल इतक्या लवकर असं काही लिहावं लागेल असं दु:स्वप्नातही वाटलं नव्हतं. अर्थात कालाय तस्मै नमः म्हणून साऱ्याच गोष्टी पचवाव्याच लागतात. अलीकडेच लिहिले तसे, घेतलेला श्वास सुद्धा धरून ठेवता येत नाही, आवडत्या गोष्टीही त्यागाव्या लागतात, एवढेच काय, प्राणपणाने जपलेल्या आणि साऱ्यांचा रोष पत्करून घट्ट धरून ठेवलेल्या तत्त्वांना देखील मुरड घालावी लागते तर आवडती माणसं कशी धरून ठेवता येणार...?

ज्या माणसांनी आपलं आयुष्य केवळ सुसह्यच नाही तर समृद्ध केलं आणि आपल्या नेहमीच्या 'पाणक्या'च्या जगण्याला काही क्षण का होईना 'चाणक्या'च्या अविर्भावाची झळाळी दिली त्यांच्या जाण्याचा त्रास होणे स्वाभाविक असले तरी, त्यांनी आपल्या आयुष्यात येऊन अजरामर करून ठेवलेल्या क्षणांचे आणि केव्हाही त्यांच्या सहवासाचा लाभ घेता येईल अशा शब्दरूपी खजिन्याचे सान्निध्य-सौख्य नाकारून कसे चालेल?

कणेकर सरांबद्दल लिहिण्यासारखे अजूनही खुप काही असले तरी, त्यांच्या एकूणच मिश्किल, खोडसाळ, 'लगाव बत्ती' म्हणत 'चहाटळकी' करणाऱ्या लिखाणात त्यांनी कधीतरी असे जे गंभीर, आत्मचिंतनपर लिहिले ते 'मना'ला जास्तच भिडले. आता ते 'ये हृदयीचे ते हृदयी...' या तादाम्यामुळे की त्यातील 'करुणे'च्या स्पर्शाने ते सांगता नाही येणार! 

'डॉ. कणेकरांचा मुलगा'मध्ये त्यांनी आठवण सांगितली की त्यांचे वडील त्यांना म्हणायचे, 'मिस्टर शिरिष, एवढं लिहिता तुम्ही, पण वाचतं का कुणी?' याच आत्मकथनात त्यांनी लिहून ठेवलयं - 'डॉ. कणेकरांचा मुलगा एवढीच माझी आयुष्यभर ओळख राहिली आणि एवढी ओळख मला एका आयुष्याला पुरली देखील...!' 

आयुष्यात भेटलेल्या माणसांबद्दल, मित्रांबद्दल ते लिहितात, ‘देवानं नामी नग जन्माला घातलेत. मला त्यांचा आणि त्यांना माझा सहवास घडवून देवानं आमच्यावर अनंत उपकार केलेत. आम्ही सगळे मिळून जगात धुमाकूळ घालीत असू. देवाच्या सर्कशीतले आम्ही विदूषक आहोत. आम्ही हसवतो. आम्हांला हसतात. आम्ही अश्रूंना पापण्यांवर रोखून धरतो. घुसखोरी करू देत नाही. आम्हांला इरसाल म्हणा, वाह्यात म्हणा, नग म्हणा... आयुष्याचं ओझं वाहण्यासाठी असे साथीदार हवेत.’      

आणि शेवटी, जिवंतपणी आपल्या मृत्युलेखाची कल्पना करणारा हा अवलिया लिहून ठेवतो...

"माझा एपिटाफ लिहायचा झालाच तर लिहा की प्रत्यक्ष मरण येण्यापूर्वी हा माणूस खुप आधीच मेला होता, फक्त ही गोष्ट त्याने जगापासून लपवून ठेवली..."  

शिरीष कणेकरांना श्रद्धांजली वैगरे लिहिणे फारच अवघड वाटते तेंव्हा, '...तुझिया जातीचा मिळो आम्हां कुणी...' आणि 'तुमचा वसा आम्हां मिळो, सांभाळता येवो...' या प्रार्थनेपलीकडे फार काही लिहवत नाही...

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावकः। 
न चैनं क्लेदयन्त्यापो 
न शोषयति मारुतः।I

शिरीष कणेकर सरांबद्दल आंतरजालावरील काही दुवे :  

https://www.saamana.com/author-journalist-shirish-kanekar-80th-birthday-on-6-june/
https://eetyadee.blogspot.com/2018/06/102-not-out.html
https://www.esakal.com/saptarang/atul-parchure-write-article-saptarang-121107
https://prahaar.in/the-name-shirish-kanekar-is-enough/
https://www.esakal.com/saptarang/miliind-ghangrekar-wrtie-article-saptarang-121095
https://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118327.html?1161380086
http://shireeshkanekar.blogspot.com/
https://en.wikipedia.org/wiki/Shirish_Kanekar

गुरुवार, २० जुलै, २०२३

'सुशि'...!




११ जुलै ला 'सुशि'ला जाऊन २० वर्षे झाली. 

काल 'दुनियादारी' या संजय जाधव यांच्या मराठी चित्रपटाला १० वर्षे झाली. 

'वाढत्या' वयामुळे काळ फारच भरभर सरकतो आणि 'रात ढल जाये पर दिन ना जाये...' अशी परतवारीची प्रचिती प्रबळ होत राहते. अगदी कालच लिहिल्यासारखी वाटणारी 'दुनियादारी' ही पोस्ट आज दहा वर्षांची झाली. ही पोस्ट लिहिण्याचे निमित्त ठरलेल्या दिपक दादा आणि, आज याची आठवण करून देऊन 'इगो-वाईज'वरील या पोस्टचा दुवा 'इत्यादी'वर देण्याचे निमित्त ठरलेले सहकारी डॉ. नितीन जाधव, यांचे 'मना'पासून आभार ! 

खरं तर सुशिच्या 'समांतर'वर वेबसेरीज बनविण्याचा सतीश राजवाडेंचा धाडसी प्रयोग कसा 'सम अंतर'च राहिला आणि प्रेक्षकांशी सोडा, कथेशीही तादात्म्य कसा पावू शकला नाही या वरही एक पोस्ट लिखना बनता है. पण असे प्रयोग, ज्यांना 'सुशि' नावाचे गारुड काय आहे याची कल्पनाही नाही त्यांना 'सुशि'ची निदान तोंडओळख होण्यासाठी 'निमित्तमात्र' ठरतेय म्हणतांना अशा धाडशांचे (खलाशांच्या धर्तीवर) स्वागतच करायला हवे.  

समग्र 'सुशि' समजणे येरागबाळ्याचे काम नोहे आणि ते 'जाता... येता' इतके सहजसाध्यही नव्हे, नुसतीच 'लटकंती' व्हायची ! तरी 'सुशि'च्या रेंजची साधारण 'झलक' मिळण्यासाठी वाचायची पुस्तके:
१. दुनियादारी (उपरोल्लेखित चित्रपट पाहणे हा पर्याय नाही!)
२. समांतर (पहा: वरील सूचना, वेब सिरीज नव्हे!)
३. तलखी 
४. कल्पांत 
५. लटकंती 
६. दास्तान
७. वास्तविक       

'सुशि'ला लौकिकार्थाने ऐहिक जगातून जाऊन २० वर्षे झाली असली तरी त्याचे निकट सान्निध्य जाणवून देतो तो त्याने मागे ठेवलेला 'खजिना'. मनावर 'क्रमशः' 'बरसात चांदण्याची' करीत 'क्षण क्षण आयुष्या'तले 'मूड्स' आणि 'शेड्स' सांभाळीत 'असीम' 'अंमल' करणाऱ्या आणि कठीणातल्या कठीण प्रसंगीही 'हाSत तिच्या' 'एवरीथिंग... सोSसिम्पल' वाटेल असा 'माहौल' बनविणाऱ्या 'उस्ताद' सुशि नावाच्या 'मानवाय तस्मे नमः' असाच भाव 'सुशि'च्या चाहत्यांच्या 'मना'त 'कणा कणाने' फुलत राहतो...

किशोरदा, अमिताभ पासून नवाज, सचिन पर्यंत, जे 'आपले' वाटतात त्यांचाबद्दलच्या स्नेहादरात कुठेही कसर न करताही ज्यांचा, मानभावी आदरपूर्वक उल्लेख टाळून, सहजभावाने एकेरी उल्लेख होतो त्या यादीत 'सुशि'चे स्थान केवळ उच्चच नाही तर अढळ ! 'आदरणीय सुहास शिरवळकर' असे म्हणणे म्हणजे, बायकोला 'हर हायनेस' किंवा 'माय लॉर्ड' संबोधीत वेडावून दाखविल्यासारखे कर्णकटू वाटते. किशोर जसा आपला, सचिन जसा आपला तसा 'सुशि'ही आपलाच. या लोकांचे आपल्या मनातील स्थान आणि वय दोन्ही अबाधीत, जणू गोठवून (आणि साठवूनही) ठेवलेले... कालजयी !

तेंव्हा 'सुशि'चा मुलगा असला तरी श्री. सम्राट सुहास शिरवळकर यांचा नुकताच झालेला परिचय हा त्यांना थेट अरेतुरे करण्याइतपत मुरलेला नसल्याने तिथे संस्कार आडवे येतात. यांवर खुद्द 'सुशि' काय म्हणाला असता यावरचे कट्टामंथन उद्बोधक ठरावे. तेही 'सुशिप्रेमेच्छा बलीयसी...!' या लघुसूक्तानुसार लवकरच घडेल ही अपेक्षा !

सुशिच्या संपूर्ण लेखनसूचीसाठी हा ब्लॉग पहा:
http://suhasshirvalkar.blogspot.com/

रविवार, ९ जुलै, २०२३

चातक...?


इष्क-विष्क, दिल-मोहोब्बत, प्यार-व्यार आणि ह्रदय पिळवटणारी वेदना यांच्या खालोखाल (किंवा बरोबरीने), 'पाऊस' हा संवेदनशील कविमनांचा कदाचित सर्वात लाडका विषय असावा. शिवाय या भावनांचा ओलावा रसिकाच्या थेट काळजाला भिडण्यासाठी पावसाचा जो मुक्तहस्ते वापर होतो, तो जमेस धरता, काव्यप्रेरणेच्या विषयात पावसाने पहिला नंबर काढायला हरकत नसावी. सन्माननीय, प्रथितयश कवीश्रेष्ठांपासून, प्रत्येक पहिल्या पावसात कावळ्याच्या छत्री टाईप उगवणाऱ्या, 'कवी काय म्हणतो...' अशा अविर्भावाच्या हौशी कवींपर्यंत, पावसाला विषयवस्तू बनविण्याचा मोह कुणालाही टाळता आलेला नाही. या साऱ्या कवितांची नोंद घ्यायची म्हटली तर खंड-काव्य-सूची करायला लागेल आणि त्या प्रबंधासाठी ही जागा आणि व्यासंग दोन्ही अपुरे पडतील.

अलीकडे साऱ्याच गोष्टी बेभरवशाच्या, अनियमित आणि तऱ्हेवाईक झाल्या असल्याने पावसालाही त्याची लागण झाल्यास नवल नाही. 'नेमेचि येतो मग पावसाळा...' हे 'सृष्टीचे कौतुक' आता केवळ छापील ओळीतूनच शिल्लक असल्याने आणि 'बाळा'ने आपले वेगळ्याच विषयातील कुतूहल शमविण्यासाठी भलत्याच मार्गांची निवड केली असल्याने त्याला कसलेच कौतुक वाटणे कधीच बंद झाले आहे. त्याला आता फक्त 'वॉव मोमेंटचे क्रेव्हिंग' असते, यु नो !

अशा परिस्थितीत, कितीही पारंपरिक, संस्कृतीजन्य आणि 'अभिजात' असले तरी, 'ये रे ये रे पावसा...' ला रिटायर होण्याशिवाय पर्याय नाही. पण त्यामुळे पोकळी वैगरे तयार होण्याचे कारण नाही, आजच्या अत्याधुनिक जीवनशैलीत, लोकल-मेट्रो-बस पासून मंदिर-शाळा-हॉटेल साऱ्या ठिकाणी पुढच्याला हुसकावून आपला नंबर लावण्याची इतकी 'चढा'-'ओढ' आहे की शहरात कुठेही ब्रिथिंग स्पेसही शिल्लक नाही याचा प्रत्यय पदोपदी येतो. बऱ्याच अर्बनाईट्सना तर पाऊस ही अनावश्यक कटकट वाटते, बघा: सौमित्रची कविता - 'त्याला पाऊस आवडत नाही...'

तर मुद्दा असा की प्रत्येक पावसाळ्यात पाऊस या विषयावर कवितांचा अक्षरश: पाऊस पडतो पण सगळ्याच कविता 'मना'ला भिडतात, पापणी भिजवतात किंवा हृदय ओलावतात असे नाही. सवडीने निवड करू म्हटलं तर ऋतू बदलून गुलाबी थंडीच्या कवितांचा सिझन उगवायचा ! पण सन्मित्र प्रसादने पाठविलेल्या या कवितेने काही घाव ताजे केले आणि बऱ्याच जुन्या जखमा नव्याने भळभळू लागल्या. 'गेले ते दिन गेले...' ची आर्त जाणीव अधिक गहिरी करणाऱ्या आणि दाहक वर्तमानाच्या वास्तव चित्रणाबरोबर, भविष्यातील धोक्यांचे सूचन करणारी ही कविता.

अत्यंत बारकाईने शोध घेऊनही, सदर कवितेमागील भावना आणि तिचे प्रत्ययकारी सृजन करणाऱ्या दार्शनिक कविमनाचा थांगपत्ता लागू शकलेला नाही. एक अगदीच क्षीण दुवा सापडला तो फेसबुकावर Unofficial: Poetry या पेजवर पण तिथेही विश्वासार्ह, सप्रमाण नामोल्लेख आढळत नाही. प्रत्येक कलाकाराला त्याच्या कलाकृतीच्या श्रेयसौजन्याचं भाग्य लाभतच असं नाही आणि त्यामुळे त्या कलाकृतीच्या रसास्वादनात काही उणीव राहते असंही नाही, पण त्या काव्यानुभवात चिंब झाल्यावर मनाच्या तळाशी राहते ती, ...मऊ पिसांच्या सात थरांच्या गादीवर झोपतांना, त्याच्या तळाशी असलेला इवलासा मोती टोचणाऱ्या राजकन्येच्या टोचणीसारखी... त्या अदृश्य निर्मात्याला जाणून घेण्याची हुरहूर ! 

काही समजले तर जरूर कळवा, चातकाप्रमाणे वाट पाहतोय...! 

पाऊस

चोचीने कोरले नखांनी ऊकरले
तरी जमिनीत झरा लागत असे,
व्याकुळलेल्या जिवांची पूर्वी
सहज तहान भागत असे !

'येरे येरे...' म्हणताच
पाऊस येत असे मोठा,
त्यालाही ठाऊक असे
पैसा आहे खोटा !

पैसा खोटा होता तरी
माणूस मात्र खरा होता,
प्रत्येकाच्या काळजात
जिव्हाळ्याचा झरा होता !

'ये गं ...ये गं' म्हणताच
सर यायची धावून,
चिमुकल्यांच्या मडक्याला
तीही न्यायची वाहून !

एकदा पाऊस आला की
मुक्कामी राहत असे,
निघून जा म्हटलं तरी;
मुद्दाम जात नसे !

हल्ली 'येरे येरे...' म्हटलं तरी
पाऊस साद देत नाही,
ख-या पैशालाही
मुळीच दाद देत नाही !

कत्तल केली जंगलांची
पशू-पक्षी राहिले नाही,
जमिनीला भोसकताना
मागेपुढे पाहिले नाही !

हौद हरवले गुरांचे
पाणपोई दिसत नाही,
बाजार मांडलाय पाण्याचा
ह्यावर विश्वास बसत नाही !

कॅन, बाॅटल, टँकर आले
मडके केंव्हाच फुटले,
कशी येणार सर धावून
नाते आपुलकीचे तुटले !

कुठे राहिली ओढ्याला
सांग बरं ओढ ?
कितीही प्रगती केली विज्ञानाने
पाऊस होतो का डाऊनलोड ?

तुझ्या स्वार्थासाठी
पाऊस येईल तरी कशाला ?
तुझ्यामुळेच कोरड पडली
नदी-विहिरीच्या घशाला !

तूच भोग तुझी फळे
फेड तुझे तूच पातक,
बघ कसा शाप देतोय
तहानलेला चातक !

- अनामिक

रविवार, २ जुलै, २०२३

उष:काल होता होता...?


बरोब्बर एक वर्षांपूर्वी लिहिलेल्या '...हम नहीं तोडेंगे?' या 'ये दोस्ती...?' च्या उत्तरार्धाचा तिसरा अंक लिहिण्याची वेळ इतक्या लवकर येईल अशी कुशंकाही 'मना'ला आली नव्हती. 'वर्षभरात मूलबाळ झालं नाही म्हणून तुमची मुलगी नांदवत नाही...' असं म्हणणाऱ्या पारंपरिक खाष्ट आणि नेमस्त आक्रस्ताळ्या सासवा हल्ली सीरियलमध्ये सुद्धा न दाखविण्याइतका महाराष्ट्र नक्कीच पुरोगामी झालाय. त्यामुळे, आधी नाकारलेल्या गर्लफ्रेंडशी मुलाचे लगोलग दुसरे लग्न लावून, अजून संसारात नीटशा न रुळलेल्या सुनेला सवत आणण्याचा खटाटोप तर विचारांनी गतानुगतिक आणि जीवनशैलीत अत्याधुनिक अशा सोशलमिडिऑकर सासवा देखील करणार नाहीत... अगदी मालिकांमध्ये सुद्धा ! तशी केवळ कल्पनाच नाही तर लगे हातो कृती देखील करून मोकळ्या झालेल्या महाराष्ट्र शासनाला आता कुणीही, 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा...?' विचारण्याचे धाडस करू नये. याहून अधिक झोपमोडीचे, स्वप्नभंगाचे आणि कुठंही पोहचण्याचे भोग समृद्ध, प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या नशिबी असू नये.

कहानीमें ट्विस्ट असा आहे की या लोकांनी केवळ कथा, पात्र आणि विषयच नाही तर अख्खा सिनेमाच बदलून टाकलाना राव ! आम्ही हिंदी 'शोले' म्हणून जो समजून घेण्याचा अटोकाट प्रयत्न करत होतो तो यांनी रविवारच्या भर दुपारी मराठी 'सिंहासन' करून टाकला ! चव्वेचाळीस वर्षांपूर्वी अरुण साधू यांच्या 'मुंबई दिनांक' व 'सिंहासन' या कादंबऱ्यावर आधारित विजय तेंडुलकरांनी लिहिलेला आणि जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला 'सिंहासन' हा चित्रपट केवळ अभिजातच नाही तर अजरामर आहे आणि यातील 'दिगू' हा सप्तचिरंजीवांनंतर जन्मलेला आठवा चिरंजीव आहे हे आज महाराष्ट्राच्या राजकारणाने सिद्ध केलं !

या निमीत्ताने रुमीची एक गोष्ट आठवली...

काहीच कारण नसतांना उंटाची आणि कोल्ह्याची दोस्ती जमली. दोघे आता पोटापाण्यासाठी सोबतच हिंडू लागले. जंगलात भटकतांना आपापल्या आहारानुसार आणि पचविण्याची ताकदीनुसार अन्न शोधू लागले. एकदा उंटाने मन वर करून बघितले तर त्याला नदीच्या पलीकडे उंचच उंच उगवलेले उसाचे शेत दिसले. ऊस दोघांना अतिप्रिय असल्याने त्यांनी पलीकडे जाऊन मेजवानी झोडाण्याचा बेत आखला.

कोल्ह्याला पोहता येत नसल्याने त्याने उंटाला विनंती केली की उंटाने त्याला पाठीवर घेऊन नदी पार करून द्यावी. दोस्तीखातर एवढे करणे काही फार मोठे काम नसल्याने उंटाने सहज कोल्ह्याला पाठीवर बसवले आणि नदी ओलांडली. दोघे उसाच्या शेतात शिरले आणि मनसोक्त चरले. पोटभर ऊस खाऊन झाल्यावर कोल्ह्याला कोल्हेकुई करण्याची हुक्की आली. त्याने सुरवात करताच काकुळतीला येऊन उंट म्हणाला, 'मित्रा, तू हे काय करतोयस...? अशाने उसाच्या मालकाला जाग येईल आणि तो आपल्याला बदडून काढेल !'

कोल्हा आपल्याच तंद्रीत असल्याने उंटाला म्हणाला, 'जेवण झाल्यावर कोल्हेकुई करण्याची माझी सवय आहे त्याला मी काय करू? तसे केल्याशिवाय माझा जेवणाचा आनंद पुरा होत नाही...!' आणि त्याने सूर लावला. त्याच्या आवाजाने शेतकरी लाठ्या-काठ्या घेऊन धावत आले. त्यांना बघून कोल्ह्याने पळ काढला आणि झुडपांमध्ये लपून बसलं.. उंटाला न पळणे शक्य होते न लपणे. शेतकऱ्यांनी उंटाला चांगला चोप दिला आणि शेतातून हुसकावून लावले.

संध्याकाळ होत आली तशी जंगलाकडे परतण्याची वेळ झाली. आता कोल्ह्याला उंटाची विनवणी करण्याशिवाय पर्याय नव्हता. तो खजील चेहऱ्याने उंटाला म्हणाला, 'मित्रा, माझ्याकडून चूक झाली खरी, पण आपली दोस्ती सच्ची असली तर तू मोठ्या मनाने मला नक्कीच माफ करशील आणि मला आपल्या पाठीवरून नदी पार करून जंगलात परत नेशील, हो ना?'

मोठ्या मनाचा उंट म्हणाला, 'हो तर! आपण पक्के मित्र आहोत, मी तुला असा एकटाच सोडीन होय? चल बैस माझ्या पाठीवर !' आणि दोघे जंगलाकडे परत निघाले. नदीच्या प्रवाहाच्या मधोमध आल्यावर उंट अचानक खाली बसू लागला आणि कोल्ह्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले आणि तो गटांगळ्या खाऊ लागला. कसाबसा जीव मुठीत धरून तो उंटाला म्हणाला, 'मित्रा, तू हे काय करतोयस? अशाने माझा जीव जाईल ना !'

उंट म्हणाला, 'माफ कर, मित्रा, मी तुला सांगायचे विसरलो, जेवण झाल्यावर पाण्यात डुंबायची मला सवय आहे, तसे केल्याशिवाय मला जेवल्याचे समाधान मिळत नाही...!'

----------------------------------------------------------------------------------------------------

उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला, महाराष्ट्राने रविवारच्या दुपारच्या झोपेचे खोबरे करून घेऊन एका अजब सोहळ्यात 'गुरुची विद्या गुरूला...' याची याची देही याची डोळा प्रचिती घेतली एवढाच काय तो या साऱ्या जांगडगुत्त्याचा अन्वयार्थ...

छत्रपती ते बाळासाहेब, साऱ्यांच्या आत्म्यांस शांती लाभो...
---------------------------------------------------------------------------------------------------

गुरुवार, २९ जून, २०२३

' विठ्ठल '...!


विंदांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून २४ ऑगस्ट २०१७ ते २३ ऑगस्ट २०१८ या वर्षात, विंदांची 'रोज एक कविता' असा उपक्रम राबवितांना, कशा कुणास ठाऊक पण विंदांच्या काही अत्यंत मार्मिक आणि 'मना'ला अतिप्रिय असणाऱ्या कविता निवडायच्या राहून गेल्या, आवड आणि निवड यात कदाचित हाच फरक असावा ! 'गेले द्यायचे राहूनी...' ची ही आर्तता आज आषाढीच्या निमित्ताने अधिकच हुरहुरली ती चक्क विठ्ठलाची कविता या उपक्रमातून निसटल्याने !

श्वास देखील फार काळ धरून ठेवता येत नाही, तो ही सोडूनच द्यावा लागतो... पुन्हा श्वास घेण्यासाठी ! श्वास धरून ठेवण्याचा 'प्राणायाम' करण्यासाठी (सहज)'योग' साधावा लागतो आणि तो साधला तर (जीवन)'सिद्धी' अप्राप्य नाही एवढे सोपे अध्यात्म ज्याला कळले त्याला स्थूल-सूक्ष्माचा पोथीबाध्य उहापोह करण्याची गरज नाही.

विद्वानांनी पोथी-पुराणात कैद करून ठेवलेले अद्वैत तत्वज्ञान संतवाणीने जनसामान्यांसाठी सहज सोपे करून भक्तिरसात वर्णिले म्हणूनच तुक्याची गाथा इंद्रायणीत बुडवूनही लोकगंगेने तारली. त्याच संतसंप्रदायाचा वारसा सांगणाऱ्या साहित्यिकांनी आपल्या अत्यंत व्यावहारिक आणि मार्मिक प्रकटनातून हे तत्वज्ञान वाहते ठेवले.

अद्वैत सिद्धांताचे आणि, 'वेदांनाही नाही कळला अंतपार याचा...' या अध्यात्मिक प्रकटनाचे, जनसामान्यांस सुचेल, रुचेल आणि पचेल अशा सहज मार्मिक स्वरूपात निरूपण करणारी विंदांची ही रचना, आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने !

पंढरपूरच्या वेशी बाहेर
एक आहे छोटी शाळा..
सर्व मुले आहेत गोरी
एक मुलगा कुट्ट काळा...

दंगा करतो मस्ती करतो
खोड्या करण्यात आहे अट्टल...
मास्तर म्हणतात करणार काय ?
न जाणो , असेल ' विठ्ठल '...

- विंदा करंदीकर

सोमवार, २६ जून, २०२३

वसंत...!


मैफिलीत शेर तुझ्यावरचे, दाद मिळवित होते
क्षण दु:खी माझे.. गजलेस असे सजवित होते

निरोप घेतांना वळून पाहिलेस तू पुन्हा पुन्हा
यश हे प्रेमातले माझे असे घवघवीत होते

पाकळ्या डायरीतल्या देतात अजून ग्वाही
फूल तू माळलेले.. तेव्हा टवटवीत होते

रस्ते तुझे फिरुन झाले जगभरातले अनेकदा
पाय अनवाणी माझे तिच पायवाट मळवित होते!

कबुतरावर विसंबण्याचे गेले ते दिवस अखेर...
स्टेटस रोजचे... तुझी ख्याली खुशाली कळवित होते

ग्रीष्माने होता फुलविला मोगरा अनेकदा परंतु...
फुल तुझ्या केसातले आज...वसंतास जळवित होते!!

दिनेश
१४ एप्रिल २०२३ 

'मना'ने चिरतरुण असलेल्या सन्मित्र दिनेशला 
वाढदिवसानिमित्त त्याच्या या गझले इतक्याच रोमँटिक शुभेच्छा...!

रविवार, २५ जून, २०२३

ब्रिदिंग स्पेस...!


आजच्या दुभंगलेल्या काळात जगण्याची शैली प्रच्छन्न दांभिक असणं नवलाचं नाही. स्किझोफ्रेनिया, डिमेन्शिया, अल्झायमर यांचे सारेच पेशन्ट डायग्नॉस होतातच असेही नाही. आणि असले विकार असाध्य असल्याने त्यांच्यावर नियंत्रण एवढाच उपाय असल्याचे वैद्यक सांगते.

इच्छा असो वा नसो, डाव मांडावा ही लागतो आणि साधावा ही लागतो, भिडू पाहून आणि... पाडून ! अतिप्रिय गोष्टी टाळून, त्यांच्याच चिरांनी सजवाव्या लागतात नावडत्या गोष्टींचे बिलोरी अन् बेगडी महाल. तडजोड करण्याची सवय अंगवळणी पडली की नव्या जोडणीला जात नाहीत जुने तडे... तडतडणारे !

मूल्याधारित व्यवस्थेचे मार्केट डेरिव्हेटीव्ह थ्री ट्रिलियनच्या महत्त्वाकांक्षेने प्राचीन मूल्यव्यवस्थेसाठी रडत नाही. ब्ल्यू टूथ आणि ओटीपीच्या सोयीने कार्यभाग साधता येतो कुठलीही खूण-गाठ मागे न ठेवता... डिसॅपिरिंग मेसेजसारखा. अशा सभोवतालात विचारांना थारा नसतो, बोकाळतात फक्त विकार, फोफावतो अविवेकी दंभ... विनाशकारी !

..आणि मग संवेदनशील,विचारी, हळव्या शतशः विदीर्ण 'मना'ला पर्याय उरत नाही, सारे तुकडे गोळा करून... स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करण्याशिवाय...

कल्याणची युवा कवियत्री विशाखा विश्वनाथ हिला 'स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना' या तिच्या पहिल्याच कवितासंग्रहासाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला याचं जेवढं कौतुक तेवढंच समाधान ! हे समाधान आणि हा आनंद शाळकरी मुलींच्या वेणीसारखा दुपेडी आहे...

आजच्या काळात कुणीतरी कुठल्याही अभिनिवेशाशिवाय, अभिलाषेशिवाय, दबावाशिवाय मुक्तपणे व्यक्त होतंय, होऊ शकतंय याचे समाधान आणि अशा प्रयत्नांची केवळ दखलच घेतली जात नाहीये तर चक्क पुरस्काराने दाद दिली जातेय याचा मनस्वी आनंद... अगदी हृषिदांच्या आनंद इतका खणखणीत !

आजच्या अत्यंत इंटरेस्टिंग पण तेवढ्याच फ्रस्टेटींग काळाचा आलेख कवितेतून मांडण्याचे होतील तेवढे प्रयत्न स्तुत्यच आहेत आणि हवे देखील आहेत... कुचंबणा, घुसमट, कोंडी जेवढी व्यक्त होईल तेवढे समग्र समाजभान जागृत होऊन समाजमन प्रगल्भ तथा विकसित होण्याचा मार्ग प्रशस्त होण्याची शक्यता बळावते.

तेंव्हा, प्रतिभा आणि तपशील भले भिन्न असले तरी, भावनेचा पोत आणि व्यक्त होण्याची आतुरता जोवर अस्सल आहे तोवर या अंतर्द्वंदाला सामोरे जातांना, स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करायला एकमेकांना बळ मिळत राहील... देता येईल !

विशाखाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि असेच व्यक्त होत रहाण्यासाठी तिला तिच्याच एका कवितेतून निरंतर शुभेच्छा...

जुन्या नोकरीतल्या शेवटच्या संध्याकाळी
घरी परतून येताना वाटतं
आजवर जमा झालेला सगळा पैसा 
लावून टाकावा माझ्या पहिल्या डॉक्युमेंट्रीवर
मग आठवते 
उच्चशिक्षणासाठी ओघाने चांगली नोकरी मिळावी
म्हणून घेतलेली ऍडमिशन
त्याची पेंडिंग फी
आणि जुन्या आणि नव्या नोकरीतल्या 
चार दिवसाच्या ब्रिदिंग स्पेस मधल्या पहिल्या रात्री
उशाला घेऊन झोपते मी माझ्या पहिल्या डॉक्युमेंट्रीचं स्वप्नं.