शनिवार, १४ मे, २०२२

आवाज कुणाचा...?


मुल्ला नसिरुद्दीन तातडीच्या कामासाठी गावातून चालला होता. वाटेत मासळी बाजार लागला. तिथे ही तोबा गर्दी. नुसती झुंबड उडालेली. जिकडे तिकडे आरडाओरड. सगळेच तारस्वरात बोलतायत. कुणाचा कुणाला पत्ता नाही. अन अशा गदारोळात मुल्ला अचानक खाली बसला आणि अंथरायला काही मिळतंय का शोधू लागला.

त्याच्या आजूबाजूची माणसं चक्रावली. या बाबाला काय झालं म्हणून विचारू लागली.
तर मुल्ला म्हणाला,
'नमाज का वक्त हो चला है, उसीका इंतजाम कर रहा हूँ!'
'आपको कैसे पता चला नमाजका वक्त हो रहा है?'
'क्यूँ? मस्जिदसे अजानकी आवाज नहीं सुनाई पडी?'
'मुल्लाजी, यहाँ अपने बाजूवाला क्या बोल रहा है सुन नहीं सकते इतना शोरगुल है, आपको कोसो दूर मस्जिदकी अजान कहाँसे सुनाई दी?'

मुल्ला उठून उभा राहिला. खिशातून एक नाणे काढले. टॉस करावे तसे हवेत उंच उडविले. बाजाराच्या थंडगार दगडी फरशीवर नाणे टणकन आपटले आणि त्याचा खणखणीत आवाज सगळीकडे घुमला. रणधुमाळी माजलीये असं वाटणाऱ्या बाजारात क्षणात स्मशानशांतता पसरली. साऱ्या माना आवाजाच्या दिशेने वळल्या. सगळेच आपापले खिसे चाचपून बघत भिरभिरत्या नजरेने पडलेल्या नाण्याचा शोध घेऊ लागले.   

...आणि या अचानक स्तब्ध झालेल्या बाजारात मुल्लाने दिलेले उत्तर बराच वेळ रेंगाळत राहिले... 

'बेटा, आवाज वोही सुनाई देती है जहाँ ध्यान लगा हो...!' 

-------------------------------------------------------

गोंगाटाला नसतोच धर्म
चिथावणीचा कुठला रंग,
कायद्याचा होवो न होवो
समरसतेचा होतोच भंग !

संवेदना जाणीवा हव्या
नको वेगळे सायलेन्स झोन्स,
शांततेला हवे सूज्ञ अन्
नॉइज-कॅन्सलिंग हेडफोन्स !

आतला आवाज ऐकण्यास
गोंगाट करायला हवा म्यूट,
समजून घ्यावे अर्थकारण
बाकी 'राज'कारण सारे झूट !