रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

विजय...!


भक्ती-शक्ती, दया-माया, लक्ष्मी-बुद्धी ‘रूपेण संस्थिता’
अशा ‘देवी-स्वरूप’ मुलीस जन्मालाच न येऊ देण्यापासून,
तिच्या आयुष्यात पदोपदी काटे पसरण्यात धन्यता मानणाऱ्या,
निसर्गत: तिला भोगवस्तू म्हणून शुद्र लेखणाऱ्या दांभिक समाजात...

आपल्या मातृशालेचे संस्कार संवैधानिक उच्चपदावरून मिरविणाऱ्या
पालकांच्या जल्पकांनी सामाजिक सौहार्द्राला धार्मिक रंगात हिणवणे,
‘जय जवान जय किसान’ आणि ‘सत्यमेव जयते’ यांच्या थडग्यावर   
मतपेटीसाठी नागरिकांना त्यांच्या मुलभूत हक्कांचे प्रलोभन देणे...

काही दशकांच्या एकत्रित प्रयत्नांच्या फलश्रुतीला सुरुंग लावत  
प्रतिकात्मक गर्दीला अभिवादन करत अदृश्य मानवंदना स्वीकारणे
या साऱ्यात दशाननाचे नेमके कुठले प्रतिक दहन झाले आणि
कशात ‘राम’ उरला... या विचारात बुडालेली ‘विजयादशमी!’

रावणही आपल्यातच आहे आणि रामही,
मात्र अंती कोण जिंकेल हे ठरेल,
आतील विकार बळावतो की विवेक
आणि विखार वाढतो की विचार यावर!   

तोवर, खालावलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी
माध्यमातून ओसंडून वाहणाऱ्या साजऱ्या वस्तूंची
खरेदी करण्यासाठी लगबग करू या,
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर...!

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

मास्क...!



अलीकडे बोलत नाहीस म्हणे...

मास्क लावलाय ना जीव वाचवण्यासाठी... स्वत:चा; आत्मनिर्भर असायला हवे म्हणून!
तसा लावला कधीचाच आहे, आज दिसतोय सगळ्यांना... उघड उघड, एकमेकाचा 

म्हणजे असं बघा साधारण चलन आलं चलनात आणि
दळणवळण सुरू झालं... आडवळणानं, तेव्हापासून घालतोय मुखवटा!
आता तो मास्क म्हणून केवळ लब्धप्रतिष्ठितच नाही तर 
ब्रँडेड, अनिवार्य, कायदेशीर आणि वॉशेबल ही झाला! 
त्याच्याशिवाय जगायच म्हटलं तर होतो मुजोर कायदेभंग 
आणि एकटे पडण्याचा धोका... तो वेगळाच
काही बोलावे म्हणून तोंड उघडलं तर नुसतच मायमिंग... 
शब्द गिळावेच लागतात, काढयासोबत 
पण नाहीतरी बोलण्याची मुभा सगळ्यांना होतीच कधी...?
आणि बोललीच समजा उसासून...
ऐकतयं कोण आणि समजतयं कुणाला? 

धून वही सुनाई देती है जंहा ध्यान लगा हो!
बाकी... इतना सन्नाटा हमेशाका है भाई! 
बरं अस्वस्थ वर्तमानाचं भविष्यातील इतिहासासाठी चित्रण करावं तर,
कागद एसीतल्या कार्पोरेटचा आणि शाई उन्हात राबत्या मजूराची... 
कशी व्हावी युती आणि कशी घ्यावी आघाडी?
थोडे आगाडी बाकी पिछाडी अन चलती का नाम गाडी
असंच चाललंय युगानुयुग...

शेवटी तीनच चेहरे खरे... ययाती, देवयानी आणि कचाचे;
बाकी सगळेच मुखवटे 'कच'कड्यांचे... शुक्राचार्यांसह!
 
आणि लिहिलाही समजा इतिहास आजच्या वर्तमानाचा,
उद्याच्या भविष्यासाठी... कुणी काही शिकेल म्हणता...?  
अहो, जो ‘जाणता माणूस’ स्वत:च्या उत्क्रांतीपासून आणि
अनेकानेक राज्यक्रांत्यातून तर सोडाच,
अजूनही ज्याच्या सावटाखाली वावरतोय त्या
स्थानबद्ध साचलेपणातून काही शिकतांना दिसत नाही,
तो आपण ‘जाणते’ कसे झालो आणि नेणतेपणी 
उलट्या प्रवसास का लागलो समजून घेईल म्हणता?
नाव नको...!

तरी आशा सोडून चालणार नाही... 
'रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल...' एक कवि म्हणतो
आणि दुसरा म्हणतो ‘अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...’
मग उमेद हरून आणि प्रयत्न सोडून कसे चालेल?

मी नाहीच सोडलीय आशा आणि थोडी धुगधुगी आहे...
अजूनही उमेदीत शिल्लक... 
फक्त कधीतरी खूप विषाद दाटून येतो
माणुसपणाचा... अमानुष होतांना!
मग उचलावा वाटतो छिन्नी हातोडा, 
नको तो भाग फोडून काढण्यासाठी
आणि घडविण्यास ते शिल्प...
जे ‘माणूस’ शब्दात पहिले असेल नियतीने!

बघू, जमेलही म्हणे कधीतरी, कुणी सांगावं...!