मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४

दीन...!


सहानुभूती 

उभे भंवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकांची होय दाटी गर्दी
प्रभा दीपांची फुले अन्तराळी
दौलतीची नित चालते दिवाळी !
कोपर्‍यासी गुणगुणत अन् अभंग
उभा केव्हांचा एक तो अपंग
भोवतींचा अंधार जो निमाला
ह्रदयि त्याच्या जणु जात आश्रयाला !
जीभ झालेली ओरडून शोष
चार दिवसांचा त्यातही उपास
नयन थिजले थरथरति हातपाय
रूप दैन्याचे उभे मूर्त काय ?
कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनि पसरल्या कराला
तोच येई कुणि परतुनी मजूर
बघुनि दीना त्या उधाणून ऊर
म्हणे, राहिन दिन एक मी उपाशी
परी लाभू दे दोन घास यासी
खिसा ओतुनि त्या भुक्या ओंजळीत
चालु लाग तो दीनबंधु वाट !
आणि धनिकांची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात !

- कुसुमाग्रज

रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

ज्ञानपीठ...!


आम्ही शाळेत असतांना एका टप्प्यावर संपूर्ण १०० मार्कांसाठी हिंदी किंवा संस्कृत अथवा ५० मार्कांसाठी संस्कृत आणि ५० मार्कांसाठी हिंदी निवडण्याचा पर्याय होता. पर्याय असण्याचे, ते दिले जाण्याचे आणि समोरच्याची निवड स्वीकारली जाण्याचा तो काळ होता.

शिवाय घरात वडीलधारी माणसे असल्याने, कुठलेही धोरणात्मक निर्णय हे प्रथम हायकोर्टाकडे आणि यथावकाश सुप्रीम कोर्टाकडे नेण्याची आणि त्यांचे निर्णय शिरसावंद्य मानण्याचाही काळ होता - अगदी रामराज्यच का म्हणानात.

स्वत:च्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना परदेशी धाडून सोयीनुसार इथल्या व्यवस्थेवर ताशेरे ओढण्याचा किंवा तिचा उदो उदो करण्याचा आणि इथल्या वंचितांसाठी गळे काढण्याच्या अमेरिकन 'मार्क्स'वादी मध्यमवर्गीय (आणि मार्गीय!) वृत्तीच्या पायाभरणीचा तो काळ.

तेंव्हा 'संस्कृत' हा 'स्कोअरिंग सब्जेक्ट' असल्याने तो १०० मार्कांसाठी घेऊन आपले (गुण)मूल्य वाढवून घ्यावे या मताचा रेटा प्रबळ होता. पण आम्ही पहिल्यापासूनच पुलंचे चाहते (भावनावेगात 'भक्त' लिहिणार होतो!) आणि त्यामुळे 'मार्क्सविरोधी' गटात असल्याने विषयांचा उपभोग मार्कांसाठी असतो हा मूल्यवर्धित विचार आमच्या 'मना'ला आजही समजलेला नसल्याने आणि विषय, त्यातही भाषा, अभ्यासण्यात अधिक रुची असल्याने आम्हाला 'बेस्ट ऑफ बोथ वर्ल्डस'चा पर्याय मोहवत होताच.

त्याच आशेने सदर मामला सुप्रीम कोर्ट अर्थात आमचे आजोबा अण्णा यांच्याकडे गेला असता, आम्ही काही वकिली करण्याअगोदरच अण्णांनी नेहमीच्या धोरणी, करारी, आणि नि:संदिग्धपणाने आपला फैसला सुनावला - 'संस्कृत सर्व भाषांची जननी आणि आपल्या संस्कृतीची धरोहर असल्याने ती अवगत असलीच पाहिजे तथापि हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्याने आणि बहुतांश भारतीयांची बोलीभाषा असल्याने ती देखील सवयीची असली पाहिजे. तस्मात, दोन्ही भाषांच्या ५०-५० मार्कांचा पर्याय निवडावा!'

आमची अवस्था 'आज मैं उपर...' अशी झाली नसती तरच नवल! पुढे या निर्णयाचा मान राखून आम्ही शाळेत असतानाच, अण्णांनी लिहिलेल्या संस्कृत 'जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरीयसी' हे प्रकटन आणि 'परदेसी पोस्टमन' या नाटुकलीतील हिंदी भाषिक पोस्टमनच्या भूमिकेतून, आमच्या दोन्ही भाषांवरील शालेय प्रभुत्वाचा दाखला देऊन अण्णांना आपल्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही याची काळजी घेतली. शिवाय दोन्ही विषयात अगदी स्कोअरिंग नसले तरी गौरवास्पद मार्क्स मिळवून त्याही आघाडीवर तो निर्णय सार्थ ठरवला.

आज हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे काल जाहीर झालेले ५८वे भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार - उर्दू साहित्यातील कार्याबाबत गुलजार यांना हा पुरस्कार देण्यात आला असून यासोबतच संस्कृत पंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांनाही ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.

भाषा हे विचारांचे माध्यम असले तरी ती तुम्हाला समृद्ध कशी करते याची दोन उदाहरणे म्हणजे या दोन भाषा. संस्कृतने आम्हांला संस्कार दिले, आणि आधी हिंदी आणी नंतर उर्दूने आमच्या संवेदना, जाणिवा समृद्ध केल्या. संस्कृतने आईच्या शिस्तीने वाढवले तर उर्दूने मावशीची प्रेमळ माया केली. या दोन्ही भाषांचा एकत्र होणारा सन्मान बघून आपल्या आजोबांच्या द्रष्टेपणाची पुन्हा एकदा प्रच्छन्न प्रचिती तर येते आहेच शिवाय स्वतःच्या भाग्याचा हेवा देखील वाटतो आहे. अगदी, '... पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति, कुतो मनुष्य:' असा !

या निमित्ताने 'अंधार सरो आणि उजेड पडो' या एकाच आशादायी भावनेचे या दोन्ही भाषांतील प्रकटीकरण किती मनोज्ञ आहे पहा...

‘असतो मा सत् गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय।’

आणि कोव्हीडच्या अत्यंत निराशेच्या काळात मानवी मनाला उभारी देण्यासाठी गुलज़ारांनी लिहिलेले 'धूप आने दो...'

धूप आने दो

मीठी मीठी है
बहुत खूबसूरत है
उजली रोशन है
जमीं गुड़ की ढेली है
गहरी सी सहमी हवा उतरी है
इस पर लगेना धुंध से
हटकर जरा से एक और ठहरो

धूप आने दो

आफताब उठेगा तो
किरणों से छानेगा वो
गहरी गहरी नीली हवा में
रोशनी भर देगा वो
मीठी हमारी जमीं
बीमार ना हो
हट के बैठो जरा
हटके जरा थोड़ी जगह तो दो

धूप आने दो...

तळटीप: गुलज़ारांबद्दल कितीही लिहिले तरी कमीच पडावे आणि 'दुबळी माझी लेखणी...'ची प्रचिती यावी अशी परिस्थिती. पण सर्व काही आपणच करावे / लिहावे असा 'अहं ब्रह्मास्मि...' अविर्भाव निदान या विषयात तरी असू नये. तेंव्हा, प्रथितयश लेखक त्यांच्या समर्थ लेखणीतून, जिवंत जाणिवेतून आणि नित्य प्रवाही संवेदनांतून जे लिहितात त्यानेही समृद्ध व्हावे म्हणून आतंरजालावरील हे दुवे...

रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४

सफर...!


हमसफर ही मन्नत हमारी,
वो ही थी हमारी आरजू...

सफर इतना खूबसूरत तो
मंजिलों की किसे जुस्तजू...!

रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४

मुक्त...!


माझ्या कालच्या दुर्दम्य आशावादाची त्वरित दखल घेऊन कविवर्य सन्मित्र दिनेशने 'स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग' ची मराठी आवृत्ती केवळ प्रसवली नाही तर तिच्यावर अत्यंत लयबद्ध अष्टाक्षरी संस्कार करण्याची किमया सुद्धा साधली याबद्दल त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच! 

या प्रकटनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ रूपांतरण किंवा निव्वळ अनुवाद नव्हे तर, मूळ बीजकल्पनेशी नाते सांगणारी संपूर्ण स्वतंत्र आणि स्व-छंद अभिव्यक्ती आहे कारण, यात डोकावणारी अनामिका रॉबर्ट फ्रॉस्ट यांना अभिप्रेत होती काय हे खात्रीने सांगता येणार नाही. 

ही कविता पाठयपुस्तकात 'धडा' म्हणून असल्याने, तो 'शिकविण्या'च्या उद्देशाने जे संदर्भ आढळतात त्यात, कवितेतील घर हे त्या जंगलाच्या मालकाचे(?) फार्म हाऊस(??) असल्याचे विवरण येते. शिवाय फ्रॉस्ट यांनीही 'हिज' असे पुरुषवचनी संबोधन वापरले आहे, त्याचाही संदर्भ या विवेचनास असावा असे वाटते.

तथापि, सन्मित्र दिनेशच्या कवितेचा आत्मा हा नेहमीच प्रेयसीच्या एका विरह-विव्हल प्रियकराचा राहिल्याने त्याला ते घर तिचे असावे असे वाटणे जेवढे स्वाभाविक तेवढेच रोमँटिक! त्या निमित्ताने एक वेगळाच 'ठहराव' बघायला मिळाल्याने रसिकांच्या आनंदानुभूतीत भरच पडेल यात शंका नाही! 

दिनेशच्या कवितेच्या आत्म्याला नेहमीच एक अध्यात्मिक किनारही अनुभवता येत असल्याने, त्याने त्याच्या आवृत्तीचा समारोप अध्यात्मिक पद्धतीने करणे क्रमप्राप्तच होते. फ्रॉस्टना ते देखील तसे म्हणायचे नसावे असे वाटते. फ्रॉस्टच्या, सामान्य माणसाला नित्य तोंड द्याव्या लागणाऱ्या व्यावहारिक, धोरणी द्वंद्वाला दिनेशने कर्म-धर्म-संयोगाचे एक वेगळेच परिमाण दिले, तेही कौतुकास्पद!

कार्यबाहुल्यामुळे इतर कवी मित्रांना अजून यावर प्रकटता आले नसावे असे मानून, यथावकाश आणखीनही काही आवृत्त्या अनुभवयास मिळतील ही अपेक्षा. पण तूर्तास आस्वाद घेऊ या सन्मित्र दिनेशच्या या खास अष्टाक्षरी अभिव्यक्तीचा...       

झाडी दाट ही कुणाची
आहे मलाही ठाऊक
घर गावात तिचे ते
उबदार अन् भावूक

थबकलो इथे असा
निरखत अश्या क्षणी
गोठलेले रान गार
नसेलही तिच्या मनी

घोडा अबलख माझा
थरारला तो ही खास
असा का थांबलो येथे
नसे घर आसपास

गोठलेला तलाव हा
अन् झाडी घनदाट
सांजवेळ कातर शी
पाही ती कुणाची वाट

चूक ना उमजे त्यास
करी घंटानाद मंद
घोंघावतो वारा फक्त
आणि बर्फवृष्टी कुंद

आहे सुंदर जंगल
घनदाट खोल जरी
काही शपथा जुन्या
सांभाळतो मी ही उरी

दूरवर चालणे माझे
कर्म हे कर्तव्ययुक्त
भोग सारे संपवून
व्हावे अखेर मी मुक्त!

- दिनेश चंद्रात्रे, धुळे

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

वादियां और वादे...!

‘हर घडी बदल रही है रूप ज़िंदगी…’ अशा भयाकारी वेगाने बदलणाऱ्या जगात नव्याचे जुने व्हायला हल्ली फार काळ लागत नाही. कळीचे फूल होऊन देवाच्या चरणस्पर्शाने त्याचे निर्माल्य व्हायला जेवढा काळ लागतो त्याहूनही कमी वेळात ‘नव्या’ गोष्टी ‘जुन्या’ होत चालल्यात, फक्त ‘देव’ (आणि 'भाव') तेवढे बदलले आहेत.

बरं, यात फक्त अन्नपदार्थ, कपडेलत्ते, खेळ-मनोरंजन, संस्कृती-उपक्रम, साधन-उपकरणेच नाही तर गाडी-घोडे, स्थावर-जंगम, सोयी-सुविधा यांच्यासह आवडी-निवडी, आचार-विचार, सखे-सोबती, सगे-सोयरे आणि मूल्य-तत्वे सारेच बुलेट ट्रेनच्या वेगाने आऊट डेटेड होतांना दिसते.

पूर्वी 'टूथ' हा फक्त विस्डम संदर्भातच असे त्यामुळे त्याच्याशी निगडित विस्डमही शाबूत होते. आता त्याची जागा 'ब्ल्यू' टूथ ने घेतल्याने त्याच्या उठवळ धरसोडपणाचे वैशिष्ट्यपूर्ण आणि बहुपयोगी लक्षण त्याच्या वापरकर्त्यात आढळले तर, ‘वाण नाही पण गुण लागला’ म्हणायचं. शिवाय सारे काही (प्र)दर्शनीय झाल्याने स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात ‘दिसेल ते’ कैद करण्याची चढाओढ पाहता, क्षणांचे अनुभव संवेदनेत रुजून त्यांच्या जोपासनेने जाणिवा समृद्ध होण्यासाठी आवश्यक तो संयम, ती स्थिरता, तो ठहराव, ते भान अभावानेच दिसते.

या भयावह वेगामुळे जे अपघात संभवतात त्यांचे दूरगामी परिणाम अधिक धोकादायक आहेत. 'पागल, ये मत सोच की जिंदगीमें कितने पल है, ये देख हर पलमें कितनी जिंदगी है...!' ही मुन्नाभाई फिलॉसॉफी सांगणारी उत्तान नाच करणारी नर्तकी असली तरी त्यामुळे त्यातले तत्व मुळीच हीन ठरत नाही, किंबहुना हे समजावून सांगायला तिच्याइतकी अधिकारी व्यक्ती दुसरी नाही असाही एक दृष्टिकोन असू शकतो. पण त्या एका क्षणात असलेली जिंदगी बघायची, आस्वादायची वृत्ती मात्र ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, कुठेच एक्सप्रेस डिलिव्हरीसाठी ऑर्डर करता येत नाही; ती जोजवावी, जोपासावीच लागते.

सौंदर्याचे, भव्यतेचे, उदात्ततेचे आस्वादन करण्यासाठी लागणारी रसिकता जगण्याच्या गरजांमध्ये कशी घुसमटते याचे क्लासिक उदाहरण असलेली रॉबर्ट फ्रॉस्ट यांची, आख्यायिका बनून उरलेली कविता 'स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग' १०२ वर्षांची झाली तरी आजही तेवढीच, किंबहुना अधिकच समर्पक आहे. आज जगण्याच्या धबडग्यातून वेळ काढून तिचे रसास्वादन करावे आणि जमेल तसा मुक्त भावानुवाद करावा म्हणून हा खटाटोप. आता हे प्रकटन राष्ट्रभाषेत का मातृभाषेत का नाही या मागे काही मोठी वैचारिक/तात्विक/'राज'कीय भूमिका वैगरे नाही तर या कवितेचा एकूण बाज पहाता तिला मातृभाषेत आणायला अधिक प्रतिभा, योग्यता आणि अभ्यास पाहिजे असे जाणवल्याने ही सोईस्कर पळवाट का म्हणानात! इतर कवी मित्रांनी या कामी मदत केली तर तेही लवकरच साधेल... हा दुर्दम्य आशावाद!

ये किसकी हसीं वादियां है जानता हूँ शायद मैं…
गावमेही घर है उसका पता हैं मुझे फिर भी
वो मुझे यहाँ ठहरा हुआ नहीं देखेगा 
इन वादियांके नजारे देखते हुए…
सालकी सबसे गहिरी शामके वक्त 
बर्फसी झील और वादियोंके बीच 
कोई बस्तीभी नजरमें नहीं ऐसी जगह...

क्यूँ रुका हूं मैं, मेरा घोडा है परेशान
उसने अपने गलेकी घंटीको हीलाया
ये जानने की कहीं कोई भूल तो नहीं
उतनी ही आवाज गुंजी
हवाकें हलके झोको और गिरती बर्फके सिवा...

वादियां हसीं हैं, गहिरी और लुभावनी भी
लेकिन जो वादे किये है जिंदगीसे, उन्हे निभाना होगा मुझे…
रोज सोनेसे पहले मिलोंका फासला तय करना होगा मुझे,
रोज सोनेसे पहले मिलोंका फासला तय करना होगा मुझे...!

या कवितेची जन्मकथा थोडी रंजक असल्याने इथे सांगणे उचित ठरावे. रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी जून १९२२ मध्ये, 'न्यू हॅम्पशायर' या कवितासंग्रहासाठी, त्याच नावाची दीर्घ कविता रात्रभर जागून लिहून काढली. कविता संपत आली तेंव्हा उजाडू लागले होते आणि त्या पहाटवाऱ्यात सूर्योदयाचा आनंद घ्यायला घराबाहेर उभे असतांना पूर्णपणे मुक्त, ताणविरहित (तुरिया?) अवस्थेत रॉबर्टना ही कविता सुचली आणि जणू काही झपाटल्यासारखी त्यांनी ती एकहाती लिहून काढली. म्हणजे विल्यम वर्ड्स्वर्थ यांच्या कवितेच्या व्याख्येत चपखल बसणाऱ्या आणि कवीची उदात्त निर्मितीनंतरची उत्कट भावावस्था तंतोतंत मांडणाऱ्या या कवितेने इतिहास रचणे विधिलिखितच होते...!

रॉबर्ट फ्रॉस्ट हे अमेरिकेचे एक अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्याबरोबरच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूं यांचे अत्यंत आवडते कवी होते. पंडित नेहरूंच्या शेवटच्या काळात त्यांच्या पलंगाच्या बाजूच्या मेजावर रॉबर्ट फ्रॉस्ट यांचे एक पुस्तक पडलेले असे आणि त्यातील या कवितेचे पान उघडे असे ज्यातील शेवटच्या चार ओळी त्यांनी अधोरेखित केलेल्या होत्या...

"...The woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep..."