गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

उन्मेष...!


कलाकार तो अदृश्य सर्वभर
ओळ उमटते कधी झर झर
पडद्यामागून रेखितो कुंचला
कधी चित्रातून निसर्ग निर्झर

गतस्मृतींनी दाटता गहिवर
उमटते भयचित्र पटलावर
नव्या चित्रात भरू रंग नवे
फुलपाखरांचा मुक्त वावर

सोसाट्याचे वारे नी वादळ
झाडे साहती जरी पानगळ
वसंताची लागताच चाहूल
कोंब नवा गर्भात सळसळ

नवा जन्म मनाच्या कुशीत
नवे कूजन नव्याने खुशीत
होऊ या सज्ज घडविण्या
येणाऱ्या वर्षा नव्या मुशीत

रविवार, २७ डिसेंबर, २०२०

निरोप...!


मित्राशी सुखदु:खाच्या मनसोक्त गप्पा झाल्यावर तो दिवेलागणीच्या वेळी घराकडे परत जायला निघाला. मित्र म्हणाला, आता थोड्या वेळातच अंधार पडेल, रात्रीचा अंधारात प्रवास करण्यापेक्षा मुक्काम कर. रात्री आणखी थोडे हितगूज करू, सकाळी ताजेतवाने होऊ आणि मग जा तू आपल्या मार्गाने...

तो म्हणाला, ‘नको! कारण, दोन गोष्टी – एक म्हणजे समारोप कधी लांबवू नये, निरोप नेहमी चटकन घ्यावा म्हणजे सहवासांच्या क्षणांचा मिळालेला आनंद दीर्घकाळ टिकतो. आणि दुसरे म्हणजे अंधाराची तमा त्यांना ज्यांना उजेडाची सवय आहे. माझ्यासारख्या जन्मांधाला कसला दिवस आणि कुठली रात्र, रात्रंदिन आम्हां तमाचाच सहारा...!’

त्याच्या स्वरातला विषाद मित्राला हेलावून गेला आणि मैत्रीच्या पोटी असलेल्या मायेच्या उबेतून मित्र म्हणाला, ‘ठीक आहे, जशी तुझी इच्छा पण थांब मी कंदील पेटवून देतो तेवढा सोबत ठेव म्हणजे माझ्या जीवाला घोर लागणार नाही.’
‘चेष्टा करतोयस का? अरे जिथे मला दिसतच नाही तिथे कंदिलाचा उजेड काय प्रकाश पाडणार...?’ तो म्हणाला.
‘मित्रा, तुला दिसत नाही हे मान्य पण तुझ्या समोरून कुणी अंधारातून आला तर कंदिलामुळे त्याला तर तू दिसशील...’

मित्राचा युक्तिवाद पटल्याने मित्राच्या इच्छेला मान देवून तो कंदील घेऊन मार्गस्थ झाला. रस्ता सवयीचा असल्याने तो झपाझप चालू लागला. बरेच अंतर पार केल्यावर आणि रात्र बरीच झाल्यावर अंधारातून अचानक कुणीसे त्याच्या अंगावर आदळले आणि तो भेलकांडला. अत्यंत सात्विक संतापाने तो ओरडला, ‘मुर्खा, दिसत नाही का...’

आपल्या अशा उद्धाराने चिडलेला वाटसरू म्हणाला,
‘हेच मीही तुला विचारू शकतो, डोळे फुटलेत का तुझे...?’
‘अरे बाबा, मी जन्मांध, माझे डोळे जन्मत:च गेलेले पण तुझ्या दृष्टीला काय झालं? तू तर बघू शकतोस ना?’
‘हो तर, मी बघू शकतो पण अमावस्येच्या रात्रीच्या एवढ्या मिट्ट काळोखात दिसायला दिव्यदृष्टी नाही मला!’
‘मित्रा, त्याची कल्पना आहे म्हणून मी हातात पेटता कंदील घेऊन चाललो आहे ना, त्याचा उजेड नाही दिसला?’
‘कंदील? कुठे आहे कंदील? अच्छा हा इकडे पडलेला होय?
त्याची वात केव्हाच निवलीय बुवा, तुम्हाला पत्ताच नाही!’

-------------------------------------------------------------------------------------
कुणाच्याही उसन्या प्रकाशाने आपला मार्ग थोडा काळ उजळल्यासारखा वाटू शकतो. मात्र वाटेतले अडथळे, खाच-खळगे टाळून दूरचा पल्ला गाठायचा तर उसना प्रकाश फार उपयोगाचा नाही, त्यासाठी ‘अप्प दीपो भव’ अर्थात ‘तूच तुझ्या मार्गाचा प्रकाश हो’ हा बुद्धाचा सल्ला मानायलाच हवा.
 
शेवटचे चार दिवस शिल्लक असलेले २०२० हे वर्ष त्या हितचिंतक मित्रासारखे आहे जे आपल्याला सहाय्यभूत ठरू शकतील अशी साधने देऊ इच्छिते. आपला पुढचा प्रवास सुखरूप व्हावा म्हणून या मित्राने आपल्याला त्यासाठी सिद्ध करण्याची एकही संधी सोडलेली नाही.

अगदी कठीण अशा घटक चाचण्या (आठवा: लॉकडाऊन), सहामाही परीक्षा (बघा: कोरोना चाचण्या) आणि आता वार्षिक परिक्षा (पक्षी: लसीकरण) घेऊन त्याने आपली चांगलीच तयारी करून घेतलेली आहे. आता आपली तयारी कितपत झाली आहे याचीच खरी परीक्षा आहे. आपण आपल्या अंत:चक्षुनी गेल्या वर्षभरातील अनुभवांकडे डोळसपणे पाहून काही शिकणार आहोत की आपल्या चर्मचक्षुंना दिसते तेच खरे मानून आंधळेपणाने भौतिकातच गुंतून पुन्हा त्याच दुष्टचक्रात अडकणार आहोत हा निर्णय सर्वस्वी आपला आहे.

एक वर्ष सरते आणि दुसरे सुरु होते म्हणजे खरतर फक्त भिंतीवरचे कालनिर्णय बदलते. वर्ष ‘बदलले’ किंवा ‘नवे’ वर्ष सुरु झाले असे तेव्हाच म्हणता येईल जेव्हा आपला दृष्टीकोन बदलेल, सवयी बदलतील, जीवनशैली बदलेल. दिवस तर रोजच नवा असतो पण त्या नव्या दिवसाचे आपण काय करणार हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर कुठल्याही पुस्तकात तर सोडा, गुगलकडे पण असू शकत नाही... ज्याचे त्यालाच शोधावे लागते. ज्याला सापडते तो सुखी-समाधानी होतो ज्याला नाही सापडत तो टीकाकार '(अतृप्त आत्मा?) होतो... बघा तुम्हाला कोण व्हायचे आहे?

...आणि हो, आपण जन्मांध असलो म्हणून काहीही बिघडत नाही, विवेकाने जगायला दूरदृष्टी लागते, डोळ्याने तर प्राण्यांनाही दिसते! दुसरे, आपल्या कंदिलाची वात विझली आहे हे समजायला उजेडाचीच गरज असते असे नाही, कंदिलाच्या काचेची ऊब कमी झाली यावरूनही ते समजायला हरकत नाही. पण त्यासाठी मन संवेदनशील हवे आणि जाणीवा प्रगल्भ... नव्या वर्षाचा कुठलाही दिखाऊ अल्पजीवी संकल्प करण्यापेक्षा हे साधता येईल...? आलेच तर सच्चिदानंद...

सरत्या वर्षाचा निरोप घेतांना त्याने दिलेला प्रकाश साठवून ठेवून स्वयंप्रकाशित होण्याचा प्रयत्न करू या... शुभम भवतु !

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

(जाय)बंदी...!

विकासाची हाव करी
नष्ट वने घनदाट...
दिशाहीन भटकता
प्राणी रोज चुके वाट !

'निती’च्या राज्याची
वाट चुकला रानगवा...
त्याला धडा शिकविण्या,
उन्मादी माणसांचा थवा !

बेबंद शहरीकरण
घुसमटतो रोज श्वास...
मृगजळामागे धावता
होती नित्य नवे भास !

कुणी गाठतो मरणा
ऊरस्फोड धावून...
अन कुणी साधतो ते
गळा फास लावून !

बहुतांचे आशास्थान
तरी वाटे मुक्ती हवी…
बदलता रचना सारी
व्यवस्थाही रोज नवी !

कोठे परंपरांचे जोखड
भक्तीची रिकामी कोठी…
तत्व हळूच गळून जाता
समष्टिहून व्यक्ती मोठी !

हत्येला वध म्हणण्याची
पुराणोक्त परंपरा आहे...
स्वसंरक्षणार्थ हिंसा येथे
सर्वच धमन्यांतून वाहे !

उरेल सापळाच फक्त
विरता मूक आकांत...
अन्वयार्थ समजविण्या
‘नीती’मान एक कांत !

सारे साऱ्यांच्या भल्याचेच
खोट संकल्पात नाही...
आमच्या नेक इराद्यांना
नडते अतिलोकशाही !

गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

पन्नाशी...!


नवा दिवस रोज बघावा अन प्राजक्त व्हावे
निर्माल्याच्या काळजीने का फुलणेच रहावे?

फुलांस नसते चिंता आपल्या प्रारब्ध योगाची
तळवे सुगंधीच करते निर्माल्यही सहज भावे!

क्षण थांबत नाही पळभर, काळ चालतो पुढे
सुखांनाही लागते जागा हे का मनास न ठावे?

चाफ्याच्या अबोल्याची नाळ बांधलेली वेदनेशी
मोहरण्याच्या चाहूलीने मुक्त गाणे स्वच्छंद गावे!

फुलं गळतात म्हणून कळीचं राहत नाही फुलणं
रिकाम्या गाभाऱ्यातही भक्तिरसच सर्वभर धावे!

प्रवास हा कोहम पासून सोहम पर्यंत एकलाच
‘नेती नेती’चे भान जपत प्रपंचात वैराग्य ल्यावे!

रंगूनी रंगात साऱ्या रंग असावा वेगळा
मुक्तात्मा स्वयंभू, जाणतो सारेच कावे!

निर्माल्याच्या काळजीने का फुलणेच रहावे?
नवा दिवस रोज बघावा अन प्राजक्त व्हावे...

प्रिय बंधुसखा योगाचार्य कुमार अर्थात रंगांचा किमयागार वैभव पुराणिक याचे
नाबाद अर्धशतकाबद्दल मनस्वी अभिनंदन आणि निरामय शतकासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

दुभंग


चित्रपट या सर्वात लोकाभिमुख आणि लोकप्रिय प्रबोधन मंचावर बुद्धीचा कस आणि जाणिवांची मशागत करीत पोसलेल्या समाजाला, ‘मेरे पास मां है...’ चा सोयीस्कर विसर पडला पण ‘जब तक एक भाई बोल रहा है एक भाई सुन रहा है, जब एक मुजरीम बोलेगा तब एक पुलीस अफसर सुनेगा...!’ यातील दुभंग मात्र चांगलाच मानवला. म्हणजे एकतर भावनावश होऊन इमोशनल ब्लैकमेल नाहीतर थेट कर्तव्य कठोरता... एक संवेदनशील माणूस दुसऱ्या संवेदनशील माणसाशी केवळ माणूस म्हणून, कुठलीही संधी न साधता, थेट संवाद साधू शकत नाही...?

नैतिकता, सचोटी, नीतिमूल्ये अशी सामाजिक लक्षणे कधीच कालबाह्य झाल्याने व्यवहारात कुचकामी ठरु लागली आणि बाजारशरणता, नफेखोरी, चंगळवाद आणि या सगळ्याला एका सूत्रात बांधून आधुनिक जगण्याची जणू काही संहिताच ठरलेली ‘हमाम मे सब नंगे...’ ही प्रगत मान’सिक’ता ‘नव-मूल्यव्यवस्थे’ची धरोहर ठरली. या व्यवस्थेमध्ये मूळ संतवचनाचा ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू कुपंथ किंवा होऊ श्रीमंत...’ असा पंथ-विचार प्रचलित झाला आणि नैतिकतेची केवळ व्याख्याच नव्हे तर परिमाण, आयाम आणि अर्थात परिणामही पूर्णत: बदलले.

अशा सभोवतालात, व्यक्ती, वृत्ती आणि कृती यात अभंग राहून, ‘मी आणि माझे कर्म’ म्हणजेच ‘माझे अस्तित्व आणि माझे कर्तृत्व’ या दोन निराळ्या गोष्टी नसून माझीच अभिन्न अभिव्यक्ती आहे असे मानणारे; तळ्यातल्या सुरेख  बदके पिल्लातले कुरुप वेडे पिल्लू ठरले नसते तरच नवल! स्वत:च्या सचोटीचा अभिमान बाळगणे म्हणजे अत्यंत मागासलेपणाचे लक्षण ठरणाऱ्या आजच्या अधिभौतिक काळात प्रामाणिकपणा जपणे हे निखालस धाडसाचे काम ठरावे... ही या सर्वात प्रगत जीव – होमो सेपियन अर्थात ‘शहाण्या माणसा’ची शोकांतिका!

सांप्रत सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय विषयांवर अत्यंत निर्भीडपणे परखड भाष्य करण्याची एकही संधी न सोडणारे आणि समाजातील सर्व स्तरातील घडामोडींवर आपल्या चाणाक्ष नजरेने बारीक लक्ष ठेवून त्यातील विसंगतीवर प्रत्यही मर्मग्राही विवेचन करणारे आमचे धुळ्याचे सन्मित्र वैद्यराज डॉक्टर सचिन चिंगरे यांची एकूणच साहित्यिक प्रतिभा आणि विशेषत: काव्यप्रतिभा हा स्वतंत्र प्रबंधाचा विषय असल्याने प्रस्तुत प्रस्तावना आटोपती घेऊन मूळ विषयाकडे वळावे हे उत्तम. आज आमच्या या प्रिय वैद्यराजांची एक अगदी रोखठोक, करकरीत आणि प्रत्येक विवेकी माणसाला विचार करायला भाग पाडणारी आणि संवेदनशील माणसाच्या काळजाला हात घालणारी रचना... विकार मर्यादेपलीकडे बळावला की त्याला शल्यकर्म हाच उपाय याची जाणीव करून देणारी, कोडग्या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आणि सुखासीनतेला कडूजहर डोस पाजणारी...

एक नाजा़यज प्रिस्क्रिप्शन

उन्हाळा, हिवाळा, पावसाळा...
साऱ्या ऋतुंमध्ये तेवढ्याच घोटवलेल्या व्यावसायिक उत्साहाने ओथंबून 
तो येतो औपचारिक अदबीने माझ्या केबिनमध्ये. 
नीटनेटका पोशाख, चेहेरा व देहाच्या मर्यादित हालचाली,
भाषेची सफाई आणि विक्रेत्याला आवश्यक आग्रही वृत्ती नी आर्जव या आयुधांनी सज्ज! 
भांडवलशाहीचा दूत, जागतिकीकरणाचा प्रतिनिधी, चंगळवादाचा चेला, 
व्यापाराचा नोकर, आणि प्रवाहपतीततेचा एक संसारी गृहस्थ गुलाम! 
तो वितरण व प्रबोधनाची फॅन्सी झूल पांघरुन येतो. 
मी पोटापाण्याच्या धंद्याला सेवेचा पांढराशुभ्र मुलामा पांघरुन बसलेलो...

पावसाळ्यात डायरिया-मलेरिया, उन्हाळ्यात डिस्-युरिया (उन्हाळी लागणे), हिवाळ्यात न्यूमोनिया... 
साऱ्या रोग-राक्षसांवर चालणारी अस्त्रं दाखवतो त्याच्या भात्यातली.
पूर्वी मुली भरपूर होत्या तेव्हा उपवर कन्येची गरजू माता
मुलीत असले-नसलेले सारे गुण खुलवून सांगायची,
तसं तो कौतुक करतो त्याच्या कंपनीच्या औषधांचं...
कधी किंमत, कधी चव, कधी वेष्टन, कधी नाविन्य, कधी उपयुक्तता, कधी काही... 
मग त्याच्या मजबूत चामडी बॅगेतून तो काढतो काही सँपल्स् आणि 
फळविक्रेता फळं छान रचून ठेवतो, तशी लयबद्ध सराईतपणे मांडतो माझ्या काचेच्या टेबलावर. 
सणासुदीला तो आणतो मिठाई, कधी दिवाळीत दिवे, पणत्या,अत्तर, परफ्यूम. 
अधूनमधून आणतो तो छानश्या भेटवस्तू... 
कधी पेन, कधी फुलदाणी, कधी किचनवेअर 
सतत आठवण येण्यासाठी त्यावर छापलेल्या कंपनीच्या नावासह.

मग तो सांगतो मला काही प्रोफेशनल स्कीम्स. 
इतकं लिहिल्यावर इतके भरपूर.. 
तितकं लिहिल्यावर या वस्तू पुरेपूर
आणि तितकं टार्गेट केलंत तर बँकॉक पट्टाया सिंगापूर...
त्याच्या परीटघडीच्या वस्रांतून पाझरत असतो आसमंतात एखादा मंद व्यावसायिक सुगंध. 
त्याच्या आशाळभूत नजरेत चमकतात आकर्षक आमिषं.

तसं सोपं असतं!
अ‍ॅसिडिटी नसतानाही प्रत्येकाला लिहिली अँटासिड कॅप्सूल, 
किंवा कमतरता नसूनही प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी लिहीलं एखादं सीरप, 
किंवा हिमोग्लोबिन कमी, अशक्तपणा पटवून देऊन लिहीलं एखादं टॉनिक 
सातत्याने, आयेदिन लिहीलं सर्वांना एखादं महागडं व्हिटॅमिन, किंवा प्रोटीन, 
तर अगदीच सोपं!
थेंबे थेंबे तळे साचे. 

पण नेमकं त्या क्षणी 
मला आठवतो जवळच्या खेड्यातून विश्वासाने लहानग्या नातवाला माझ्या दवाखान्यात आणणारा, 
भर उन्हात अनवाणी चालणारा कळकट मळकट पारधी पेरु भोसले... 
मला आठवते मायबाप सरकारच्या दोन चारशे रुपयांच्या पेंशनची चातकासारखी वाट पाहणारी 
आणि मग अशक्तपणासाठी एखादी 'शक्तीची सलाईन' लावून दे म्हणणारी भागिरथी आजी... 
किंवा डाळीसाळीच्या गुप्त डबाबँकेतून काढलेल्या दहावीसच्या नोटा पुन्हा पुन्हा मोजून,
चंची रिकामी करुन, मला देणारी एखादी गरीब मंगला गृहलक्ष्मी... 
कधी जुगारात हरलेल्याने निराश संथपणे पत्ते टाकावेत टेबलावर,
तसे जड हातांनी खिशातल्या आजच्या शेवटच्या नोटा काढून देणारा बाप राजू हमाल. 

त्यांना लिहू मी एखादं जास्तीचं औषध? 
त्यांच्या घाम रक्तावर की डोळ्यात तरळलेल्या पाण्याच्या इंधनावर 
उजळवू मी माझ्या उंची ऐषआरामी स्वप्नांचे दीप ? 
त्या अनवाणी, सायकलवर, लाल डब्याच्या एसटीत, 
जनावरासारखी माणसं कोंबलेल्या जीपगाडीत प्रवास करणाऱ्यांकडून
वसूल झालेल्या छोट्या छोट्या अनैतिक वर्गणीवर फिरु मी विमानात? 
त्या झोपडीवासियांच्या किंचित पण निरंतर शोषणाने फुलवू माझ्या बंगल्यात मी सुखाचा मळा? 

हिपोक्रॅटीस दु:खी होतो, भगवान धन्वंतरी डोळे वटारतो... 
नाही होता येत डॉक्टर आमटे, 
पण झालंच पाहिजे का डॉक्टर भामटे ? 
नाही तर नाही सिंगापूर 
पण होईल ना सहज शनी शिंगणापूर. 
आणी मी नम्रपणे नाकारतो ऑफर.
छोट्याश्या धैर्याने मी नाकारतो 
एक नाजा़यज प्रिस्क्रिप्शन...

...डॉ सचिन चिंगरे, धुळे 
७४९९६१३९१२, ९४२३४९३२१८

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

कविता...!


दिवाळीचे चार दिवस आणि इतरही बऱ्याच वेळा माझ्या व्हॉट्सऍप स्टेट्स मध्ये ज्या सजीव चित्रांची मुक्त पखरण असते त्या कलाकृतींमागचा सर्जक हात आणि योगगुरू असलेला माझा बंधुसखा कुमार हा नेमस्त गृहस्थ एरवी गंभीर भासत असला तरी आयुष्याकडे बघण्याची एक अम्लान, निकोप आणि मार्मिक दृष्टी बाळगून आहे हे त्याच्या अत्यंत निकटवर्तीयांना चांगलेच ठाऊक आहे. हे महाशय कधीतरी कविताही करतात हे गुपित मी फारसं कुणाला सांगू नये असा त्याचा आग्रह असल्याने मी ते कुणालाच न सांगता फक्त इथे इत्यादीवर प्रकाशित करतोय कारण इकडे फारसं कुणी फिरकत नाही असं मी त्याला पटवलयं आणि त्यालाही ते पटलंय! 

तेव्हा, कुणाला काही कळण्याच्या आत पटकन त्याची एक छोटीशी कविता...

पाऊस माती वारा पाणी...
पक्षी गातात सुरेल गाणी...
हिरवा निसर्ग निळे आकाश...
थांबून जरा पाहू सावकाश...
अरे ही तर कविताच झाली...
लिहू चार ओळी खाली...
-
-
-
-
खालच्या ओळी नाहीच सुचल्या...
वरच्या ओळी चिंब भिजल्या...
एक गोष्ट मात्र जाणवली...
एखादीच ओळ अगदी मनातली...
-       वैभव पुराणिक, नासिक

रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

गोताखोर...?

मुलांचं 'करीयर' चांगलं घडावं म्हणून...
लहानपणापासून त्यांना दिवसभर कुठल्या ना कुठल्या...
क्लास, ट्रेनिंग किंवा डेव्हलपमेंट ॲक्टीव्हीटी मध्ये गुंतवून,
सतत घड्याळाच्या काट्याला बांधून घ्यायला लावून आणि
ते जे जे काही करतील त्यात पुढे (पुढे?) राहण्यासाठी...
एका निरंतर स्पर्धेच्या अंतहीन गर्तेत लोटून,
अष्टोप्रहर जिंकण्याचा विचार आणि
त्यासाठी लागेल ती तडजोड करण्याचे
बाळकडू पाजणाऱ्या पालकांनी,
‘बेटा, आज तरी लवकर घरी ये...’ किंवा
‘मुले आम्हांला वेळच देऊ शकत नाही...’
असे म्हणणे हे गोताखोराने,
'मला पोहण्याचा आनंदच घेता येत नाही...'
असे म्हणण्यासारखे नव्हे काय...?

...दिवाळीच्या सुट्टीमध्ये फराळासोबत तेवढचं बुद्धीलाही खाद्य;

'डाएट'वर असाल तर सोडून द्या... दीक्षित आणि दिवेकरांवर!

शुभ दीपावली!

रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

निर्गुण...?



बोलभांड ते चिडीचूप
अळीमिळी गुपचिळी
लोकशाहीची नवी खेळी
देखीली गा !

काळ आला वेळ आली
तसे धुरंधरही धारातिर्थी
लाभार्थी झाले शरणार्थी
एकाएकी !

चढती कमान उतरतेही
निसर्गचक्र वलयाकार
त्यात निर्गुणही साकार
कधी कधी !

बाजू पालटता 
बदलाचे वारे 
भासती न्यारे 
सर्वालागी !

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

विजय...!


भक्ती-शक्ती, दया-माया, लक्ष्मी-बुद्धी ‘रूपेण संस्थिता’
अशा ‘देवी-स्वरूप’ मुलीस जन्मालाच न येऊ देण्यापासून,
तिच्या आयुष्यात पदोपदी काटे पसरण्यात धन्यता मानणाऱ्या,
निसर्गत: तिला भोगवस्तू म्हणून शुद्र लेखणाऱ्या दांभिक समाजात...

आपल्या मातृशालेचे संस्कार संवैधानिक उच्चपदावरून मिरविणाऱ्या
पालकांच्या जल्पकांनी सामाजिक सौहार्द्राला धार्मिक रंगात हिणवणे,
‘जय जवान जय किसान’ आणि ‘सत्यमेव जयते’ यांच्या थडग्यावर   
मतपेटीसाठी नागरिकांना त्यांच्या मुलभूत हक्कांचे प्रलोभन देणे...

काही दशकांच्या एकत्रित प्रयत्नांच्या फलश्रुतीला सुरुंग लावत  
प्रतिकात्मक गर्दीला अभिवादन करत अदृश्य मानवंदना स्वीकारणे
या साऱ्यात दशाननाचे नेमके कुठले प्रतिक दहन झाले आणि
कशात ‘राम’ उरला... या विचारात बुडालेली ‘विजयादशमी!’

रावणही आपल्यातच आहे आणि रामही,
मात्र अंती कोण जिंकेल हे ठरेल,
आतील विकार बळावतो की विवेक
आणि विखार वाढतो की विचार यावर!   

तोवर, खालावलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी
माध्यमातून ओसंडून वाहणाऱ्या साजऱ्या वस्तूंची
खरेदी करण्यासाठी लगबग करू या,
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर...!

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

मास्क...!



अलीकडे बोलत नाहीस म्हणे...

मास्क लावलाय ना जीव वाचवण्यासाठी... स्वत:चा; आत्मनिर्भर असायला हवे म्हणून!
तसा लावला कधीचाच आहे, आज दिसतोय सगळ्यांना... उघड उघड, एकमेकाचा 

म्हणजे असं बघा साधारण चलन आलं चलनात आणि
दळणवळण सुरू झालं... आडवळणानं, तेव्हापासून घालतोय मुखवटा!
आता तो मास्क म्हणून केवळ लब्धप्रतिष्ठितच नाही तर 
ब्रँडेड, अनिवार्य, कायदेशीर आणि वॉशेबल ही झाला! 
त्याच्याशिवाय जगायच म्हटलं तर होतो मुजोर कायदेभंग 
आणि एकटे पडण्याचा धोका... तो वेगळाच
काही बोलावे म्हणून तोंड उघडलं तर नुसतच मायमिंग... 
शब्द गिळावेच लागतात, काढयासोबत 
पण नाहीतरी बोलण्याची मुभा सगळ्यांना होतीच कधी...?
आणि बोललीच समजा उसासून...
ऐकतयं कोण आणि समजतयं कुणाला? 

धून वही सुनाई देती है जंहा ध्यान लगा हो!
बाकी... इतना सन्नाटा हमेशाका है भाई! 
बरं अस्वस्थ वर्तमानाचं भविष्यातील इतिहासासाठी चित्रण करावं तर,
कागद एसीतल्या कार्पोरेटचा आणि शाई उन्हात राबत्या मजूराची... 
कशी व्हावी युती आणि कशी घ्यावी आघाडी?
थोडे आगाडी बाकी पिछाडी अन चलती का नाम गाडी
असंच चाललंय युगानुयुग...

शेवटी तीनच चेहरे खरे... ययाती, देवयानी आणि कचाचे;
बाकी सगळेच मुखवटे 'कच'कड्यांचे... शुक्राचार्यांसह!
 
आणि लिहिलाही समजा इतिहास आजच्या वर्तमानाचा,
उद्याच्या भविष्यासाठी... कुणी काही शिकेल म्हणता...?  
अहो, जो ‘जाणता माणूस’ स्वत:च्या उत्क्रांतीपासून आणि
अनेकानेक राज्यक्रांत्यातून तर सोडाच,
अजूनही ज्याच्या सावटाखाली वावरतोय त्या
स्थानबद्ध साचलेपणातून काही शिकतांना दिसत नाही,
तो आपण ‘जाणते’ कसे झालो आणि नेणतेपणी 
उलट्या प्रवसास का लागलो समजून घेईल म्हणता?
नाव नको...!

तरी आशा सोडून चालणार नाही... 
'रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल...' एक कवि म्हणतो
आणि दुसरा म्हणतो ‘अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...’
मग उमेद हरून आणि प्रयत्न सोडून कसे चालेल?

मी नाहीच सोडलीय आशा आणि थोडी धुगधुगी आहे...
अजूनही उमेदीत शिल्लक... 
फक्त कधीतरी खूप विषाद दाटून येतो
माणुसपणाचा... अमानुष होतांना!
मग उचलावा वाटतो छिन्नी हातोडा, 
नको तो भाग फोडून काढण्यासाठी
आणि घडविण्यास ते शिल्प...
जे ‘माणूस’ शब्दात पहिले असेल नियतीने!

बघू, जमेलही म्हणे कधीतरी, कुणी सांगावं...!

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

मर्मबंधातली ठेव ही… २

बंडूकाकांच्या कविता इत्यादीवर याव्यात ही आमची इच्छा फलद्रूप होतांना खरेतर काकांना सरप्राइज द्यायचे म्हणून त्यांची मदत घ्यायची नव्हती. पण यासाठी आवश्यक ऐवज आमच्याकडे लिखित स्वरूपात सापडेना झाला आणि स्वत:च्या स्मृतीच्या (किंवा ‘भक्ति’-’भावा’च्या?) भरवशावर उगाचच चुकीचे काहीही दडपून छापून टाकायला हे काही कुणाचे मुखपत्र नसल्याने, काकांकडूनच या कविता संवादून घ्यायचे ठरले. काकांच्या या दुसऱ्या कवितेला निश्चितच अजून किमान दोन कडवी आहेत याची आम्हाला खात्री होती, पण काकांना त्या दिवशी या दुसऱ्या कवितेची एकूण तीनच कडवी आठवली. तथापि काकांचा सुपुत्र तन्मय याने काकांना आठवण करून दिल्याने उर्वरित तीन कडव्यांबद्दल काकांची खात्री झाली आणि आमचे समाधान!

मग त्या दडून बसलेल्या तीन कडव्यांची शोध मोहीम सुरू झाली आणि शेवटी काकांनाच त्यांच्या एका जुन्या वहीत ही संपूर्ण कविता सापडली आणि आम्हा सगळ्यांना ‘आज मुझे उस बूढ़ी अलमारी के अन्दर पुराना इतवार मिला है...!’ असे ‘गुलजार’ फिलिंग आले. शिवाय काकांच्या पहिल्या कवितेच्या निमित्ताने सुरू झालेल्या ‘डाऊन द मेमरी लेन...’ प्रवासात दरम्यान अनेक सहप्रवासी सामील झाले आणि अनेकानेक गतस्मृतींना उजाळा मिळाला. या समुद्रमंथनातून अर्थातच अनेक रत्ने हाती लागली, त्या साऱ्यांना देखील इत्यादीवर मानाचे पान यथावकाश मिळेलच; तूर्त काकांची दुसरी कविता...

या कवितेच्या जन्माची कथा मोठी रंजक असली तरी काका ती जशी खुलवून सांगतात तशी मला शक्य नसल्याने आणि माझ्या प्रतिभेच्या(?) मर्यादांची मला पुरेपूर जाण असल्याने मी अधिक फुटेज न खाता फक्त एवढेच सांगतो की ही कविता काकांनी चक्क इरेस पडून केली आहे. ‘कविता करणे ऐऱ्यागैऱ्याचे काम नव्हे, त्यासाठी दैवी प्रतिभा लाभावी लागते’ अशी अंधश्रद्धा (‘श्रद्धा डोळस कशी असेल, ती अंधच असावी लागते...’ इति काका!) बाळगणाऱ्या आणि त्या काळी गाजणाऱ्या (आणि आजही एक मानदंड असलेल्या) एका अत्यंत लोकप्रिय गझलेचे, ते जणू काही पसायदानच असावे अशी भलामण करत असलेल्या एका भक्ताच्या उद्बोधनासाठी अक्षरश: बसल्या बसल्या कागद पेन मागवून काकांनी ही गझल लिहिली आहे...

अशा तऱ्हेने जन्मलेल्या या नितांतसुंदर गझलेचे, काळाच्या ओघात राहून गेलेले, नामकरण करण्याची आणि तिला गीताचे रुपडे देण्यासाठी धृवपद आणि कडवी अशी रचना करण्याची क्रिएटिव्ह लिबर्टी (??) मी काकांच्या अनुमतीने घेतली आहे, त्यात काही न्यून आढळल्यास तो सर्वस्वी माझा दोष असल्याने मूळ रचनेच्या रसपरिपोषात त्याचा अडथळा मानू नये. आज सादर आहे काकांची ही दुसरी अभिजात रचना…

रात्र

शृंगार चांदण्याचा नेसून रात्र गेली,
निःशब्द यातनांना भेदून रात्र गेली II धृ II

श्वासांवरी हवाला जग शांत झोपलेले,
माझ्याच मंचकी या जागून रात्र गेली II १ II

जागेपणी कळेना मनी काय स्वप्न होते,
दारात स्वप्न तोरण बांधून रात्र गेली II २ II

दिवसा कधी न कळल्या ज्या सूक्ष्म तरल गोष्टी,
त्या सर्व भावनांना स्पर्शून रात्र गेली II ३ II

निद्रेस मीही जेव्हा बोलावण्यास धजलो,
निद्रेस दूर तेव्हा पळवून रात्र गेली II ४ II

मी 'थांब, थांब' म्हणता ती चालली निघाली,
'येते पुन्हा उद्या मी' सांगून रात्र गेली II ५ II

- गोपाळ बापू पुराणिक (१९८५)

रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

मर्मबंधातली ठेव ही...!

३० ऑक्टोबर २०१८ च्या ‘कवित्व’ या पोस्टमध्ये आमचे आजोबा अण्णा अर्थात ‘केशवतनय’ यांचा अत्यल्प परिचय झाला होता आणि अण्णांपासून सुरु झालेली साहित्यिक प्रतिभेची परंपरा आज पाचव्या पिढीत समृद्ध होतांना पाहून समाधान वाटते. आमच्या वडिलांची दुसरी पिढी आणि या पिढीतील ज्येष्ठ, आमचे थोरले काका, यांच्याबद्दल १ ऑक्टोबर २०१८ च्या ‘गदिमा’ या पोस्टमध्ये आपण वाचले. आज या दुसऱ्या पिढीतील सर्वात धाकटे काका गोपाळ पुराणिक अर्थात आम्हां तिसऱ्या पिढीतील सर्वांचे अत्यंत लाडके बंडूकाका यांच्या प्रतिभेची एक झलक पाहू या.

वर्तमानपत्रामध्ये बंडूकाकांनी पुष्कळ लिखाण केले आणि त्यांचे तत्कालीन राजकारणावर आणि इतरही सामजिक, सांस्कृतिक विषयांवर केलेले मार्मिक भाष्य हे त्या वर्तमानपत्राच्या स्थानिक आवृत्तीचा मानबिंदू (आजच्या बाजारू पत्रकारितेच्या भाषेत टीआरपी!) होते. काकांनी अनेक क्षेत्रात उमेदवारीही केली आणि मुशाफिरीही केली पण जीवनाचा चिंतनशील भाष्यकार तथा रसाळ कथाकथनकार ही त्यांची सगळ्यात आवडती भूमिका! कुठल्याही घटनेचे, प्रसंगाचे अथवा कथेचे अत्यंत तपशीलवार तरीही रंजक वर्णन करावे ते काकांनीच. या ग्रहणशक्ती आणि सादरीकरणाच्या कौशल्याचा त्यांना फारसा व्यावहारिक उपयोग झाला नाही (किंवा करता आला नाही) पण यामुळे लोकसंग्रह उदंड झाला!

आम्ही लहान असतांना तर बासरी, हार्मोनियम वाजवणारे, एकामागून एक धमाल गोष्टी सांगणारे, हिंदी चित्रपट आणि त्यातील गाण्यांचे इत्यंभूत ज्ञान असणारे आणि त्या काळातील प्रथेनुसार राजेश खन्नाचे फॅन असल्याने त्याची स्टाईल कॉपी करणारे 'काका' आम्हां मुलांचे हिरो नसते तरच नवल! काव्य-शास्त्र-विनोदाची गोडी आम्हांला लागली ती काकांमुळेच. वाचनाच्या व्यसनामुळे दिवाळी अंकांचे फिरते वाचनालय चालवायची आयडिया आम्हाला सुचली तिचे श्रेयही काकांचे. ते वाचनालय जरी फारसे चालले नसले तरी त्या निमित्ताने त्या वर्षीचे बहुतेक सारे दिवाळी अंक आम्हांला वाचायला मिळाले आणि शिवाय काही संग्रही ठेवता आले याचाच आनंद जास्त! कलाभान जपतांना व्यवहारज्ञानाचा सपशेल अभाव हा संस्कारही बहुदा काकांमुळेच नकळत घडला असावा... असो!

अशा आमच्या हरहुन्नरी, कलाकार आणि कबिरी वृत्तीच्या काकांनी काही पद्य रचना केल्या नाहीत असे कसे होईल? काकांच्या कविता हा एक स्वंतत्र विषय असला तरी त्यांच्या एका अतिविशिष्ट रचनेसाठी आजची पोस्ट. सर्वकालीन समाजव्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण दाखवून देतांना स्वत:च्या व्यक्तिमत्वाचे परखड परीक्षण आणि तेही ऐन तिशीमध्ये करणे हे सोपे काम नाही. या अभिव्यक्तीसाठी कर्णाहून सुयोग्य आणि चपखल रूपक कालत्रयी सापडणे शक्य नाही म्हणूनच काकांनाही तो मोह टाळता आलेला नाही. भल्या भल्या प्रतिभावंतांना भुरळ पाडणारी कर्णाची व्यामिश्र व्यक्तिरेखा काकांनी आत्मानुभवाच्या पातळीवर अशी काही प्रतिबिंबित केलीय की याला कर्णाचे लघुत्तम चरित्र म्हणण्यास खुद्द कर्णाचाही आक्षेप नसावा!

आयुष्याच्या भाष्यकाराची चिंतनशीलता, सिद्धहस्त गझलकाराची गेयता आणि प्रकटनातल्या प्रामाणिकपणाची मोहकता अशा त्रिगुणांनी सजलेल्या या रचनेला इत्यादीवर मानाचे पान देण्याची अनेक वर्षांची दुर्दम्य इच्छा आज पूर्ण होण्यास पुन्हा एकदा मदत झाली ती बंधुसखा योगगुरू कलाकार रंगवैभव अर्थात कुमारची! छापील स्वरुपात काकांकडे आणि हस्तलिखित स्वरुपात आम्हां दोघांकडे असलेल्या या रचनेच्या प्रती कुठल्या ना कुठल्या कारणाने गहाळ झाल्या आणि काही केल्या कुणालाही सापडेना. खुद्द काकांनाही संपूर्ण रचना मूळ स्वरुपात स्मरत असेल का अशा संभ्रमात खूपच कालापव्यय झाला.

शेवटी, कुठल्यातरी निमित्ताने काकांशी भ्रमणध्वनीवर संभाषण चालू असतांना योगगुरूंनी अत्यंत खुबीने या विषयी संवाद साधत काकांची कळी खुलवली आणि गतस्मृतींना उजाळा देत, ‘जलते है जिसके लिये...’ स्टाईलमध्ये काकांच्या डिक्टेशनने संपूर्ण गझल उतरवून घेतली! आपल्या छापील अक्षरात ‘होतो महारथी मी...’ कागदावर उतरवून त्याचा फोटो काढून तत्परतेने मला पाठवला तेव्हा तेवढ्याच तत्परतेने ती टंकलिखित करून ठेऊन लवकरात लवकर इत्यादीवर प्रकाशित करणे मला आगत्याचे वाटले! हे ‘नमनाला घडाभर तेल’ नसून, हिऱ्याला शोभिवंत करणारे कोंदण मिळावे म्हणून केलेला अट्टाहास आहे याची प्रचीती येईल ही अपेक्षा! तेव्हा, आजच्या मुहूर्तावरगोपाळ बापू पुराणिक अर्थात आमचे लाडकेबंडूकाका यांची ही एक अभिजात रचना...

कर्ण

होतो महारथी मी पण कर्ण नाव होते…
त्यांच्याच सोंगट्या अन् त्यांचेच डाव होते !

स्पर्धेत कोणत्याही माझा नसा प्रवेश... 
त्यांचेच पंच आणि त्यांचेच गाव होते !

सांभाळली सुबुद्धी अन रंक जाहलो मी... 
गेले लुबाडूनी जे सगळेच राव होते !

त्यांनीच मांडले हो घनघोर युद्ध जेव्हा... 
माझ्या शरांत तेव्हा गतिमान ठाव होते !

मी एकटाच होतो समरांगणी लढाया... 
त्यांच्याकडून लढण्या साक्षात देव होते !

भगवंत कृष्ण म्हणूनी जग वंदते जयाला... 
माझ्या समोर त्याचे फसवे ठराव होते !

होतो महारथी मी पण कर्ण नाव होते… 
त्यांच्याच सोंगट्या अन् त्यांचेच डाव होते !

- गोपाळ बापू पुराणिक (१९८५)

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

स्वतंत्र...?


मानवाने विकासाच्या मार्गावर,
अनेकानेक यशस्वीतेचे टप्पे गाठले म्हणून...
माणसाच्या साऱ्या विजयांची पताका मिरवावी की,
वाढत्या विषमतेने आणि असंवेदनशील स्वकेंद्रिततेने
बिघडत्या समाजस्वास्थ्याची चिंता वहावी...

रोज चढत्या-उतरत्या बाजाराची पर्वणी अनुभवावी की
ऊंच मनोऱ्यांच्या पायथ्याशी कोंडलेली घुसमट ऐकावी...
नित्य शेकड्याने वाढणाऱ्या कोट्याधीशांची की
कोटी कोटीने वाढत्या वंचितांची मोजदाद करावी...

प्रच्छन्न दांभिकतेचे नयनरम्य सोहळे मिरवावे की
मूकनायकांच्या निर्मम प्रशांत सादेस प्रतिसादावे...

स्वातंत्र्यदिन साजरा करावा की
'आत्मनिर्भर' व्हावे या संभ्रमात,

आज 'मी' स्वतंत्र...?

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

मैत्र...!



एक गुपित सांगू तुला...?

चिकटत गेल्या जन्माआधीपासून पाती
अन भेटत गेली जन्मल्यापासूनच नाती...
काही रक्ताची, काही हक्काची...
काही भक्तीची तर काही सक्तीची!

नातेवाईकही होते आणि तऱ्हेवाईकही...
सगे सोयरे तसे भक्त अन उपभोक्तेही
माझ्या स्वप्नांशी नव्हता त्यांचा संबंध,
माझ्या आकांक्षा तर त्यांच्या गावीही नव्हत्या
माझी विवंचना त्यांना वंचना वाटली आणि
माझ्या भविष्याच्या कल्पनांना तर
‘वेध’ सोड ‘वेड’ ही म्हटले नाही रे त्यांनी!
म्हणून मला प्रतीक्षा होती, आहे, राहील...

माझ्यातल्या वेडेपणाला समजून घेणाऱ्या,
मी जिंकलोच कधी तर माझ्याहून अधिक धन्य होणाऱ्या
आणि हरलोच नेहमी तरी तेवढेच खिन्न होणाऱ्या पण
‘धिस इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड...'
असं धीरोदात्त बाण्याने निक्षून सांगणाऱ्या
बाकी काहीच नाही तरी, ‘मी आहे रे...'
अशा आश्वासक शब्दांची फुंकर घालत,
माझ्या अव्यवहारी, अ-मूल्य धडपडीला तेवढीच
निर्हेतुक, निनावी पाऊलखुणांची सोबत करत,
न भेटता न बोलताही सतत उमेद देत आणि
कटू भावनांचे निर्माल्य नेमाने विसर्जित करीत...

पाणकळा लागलेल्या ढगाने उसासून बरसावे, मोकळे व्हावे
तसे ज्याच्यासमोर मोकळे उघडे रिते रिकामे होता येईल...
असा एक तरी नि:संदर्भ, बेहिशेबी, बेमतलबी किनारा असावा 
चित्रगुप्ताच्या चोपडीतून निसटलेला आणि
ऋणानुबंधाच्या जंजाळातून मुक्त असा भावबंध...
विशुद्ध, निखळ, निरागस, शहाण्या मैत्रीचा...

निरपेक्ष मैत्र... तू देशील?

रविवार, २६ जुलै, २०२०

उपसंहार...!



गेल्या चार महिन्यापासून कोरोना विषाणूच्या सावटाखाली, एकामागे एक ५ लॉकडाऊन भोगलेल्या पुणेकरांना उद्यापासून थोडा दिलासा मिळणार असला तरी, कोरोनाचे काय करायचे?’ या त्रिलोक व्यापून दशांगुळे शेष तात्कालिक प्रश्नासह, त्याच्याच अनुषंगाने काही मुलभूत प्रश्नांचा आढावा घेणे गरजेचे ठरते. या विषाणूशी लढण्यासाठी अनेक शासकीय व्यवस्था, स्वयंसेवी संस्था आणि अनेकानेक अनामिक करोना योद्धे अहोरात्र प्राणाची बाजी लावून लढत असले तरी, या विषाणूच्या अनिर्बंध फैलावाने अनेक घटनात्मक व्यवस्थांच्या आणि लोकाभिमुख संस्थापानांच्या मर्यादा उघड झाल्या’, हे सत्यही नाकारता येत नाही.

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदाबरहुकुम स्वत:ला ‘अहर्निशं सेवामहे’ उपलब्ध करून देणारे पोलीस दल आणि स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अखंडित आरोग्यसेवा देणारे वैद्यक, परिचारिका व त्यांचे सहाय्यक यांच्या निरपेक्ष कार्याला सलाम करून, त्यांना या परिस्थितीत ढकलणाऱ्या व्यवस्थेचे आणि त्यामागील कार्यकारण भावाचे विश्लेषण करणे आवश्यक वाटते. या विषयाच्या खोलात जातांना जागतिक अर्थकारण, भौगोलिक राजकारण, नवमूल्यव्यवस्थाधीन बाजारपेठ आणखीन भ्रामक विकासाचे घातसूत्र असे अनेक आयाम असले तरी त्या साऱ्याचा प्रस्तुत प्रकटनात अंतर्भाव न करता, व्यक्ती – समष्टी – सृष्टी यांचा मनुष्यधर्माच्या परिप्रेक्ष्यातून उहापोह करू या.

स्वत:च्या उत्कर्षासाठी, सोयीसाठी आणि सुरक्षित, आरामदायी जगण्यासाठीची धडपड अनुचित नसली तरी अशी अभिलाषा ही व्यक्तीनिष्ठ आणि परिणामी संकुचित असते. अशा स्वार्थी धडपडीने इतर कुणाचे दमन किंवा प्रसंगी नुकसानही होऊ शकते आणि या ‘इतर’मध्ये समस्त सृष्टीमधील कुणीही, अगदी ‘पर्यावरण’ही असू शकते. स्वत:च्या विलासी वास्तव्यासाठी कुणा धनिकाने बहुमजली प्रासाद बांधणे आणि समाजधनातून, सामुहिक श्रमदानातून गाडगेबाबांनी गावोगावी धर्मशाळा बांधणे यांचा तौलनिक अभ्यास केला तर हा मुद्दा सूर्यप्रकाशाइतका लख्ख समजू शकतो. अलीकडच्या कळीच्या शब्दांच्या अर्थात ‘कीवर्ड्स’च्या काळात ज्याला ‘कॉमन गुड’ म्हणतात त्याला आपल्या संस्कृतीमधील ‘वैश्विक कल्याण’ आणि त्यासाठी योग्य जीवनमूल्यांची जोपासना ही शिकवण चिरंतन आहे.

व्यक्तीनिर्माणाआधी (किंवा शिवाय) समाजधारणा अथवा राष्ट्रनिर्माण म्हणजे हलक्या प्रतीच्या तांदळाची बिरबलाची खिचडी शिजत का नाही म्हणून चिंतीत होण्यासारखे आहे. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार या न्यायाने, व्यक्तीतच न रुजलेली जीवनमूल्ये समाजात कुठून येणार आणि असा मूल्यहीन (पण मौल्यवान?) समाज मनुष्यधर्माची जोपासना करून वैश्विक कल्याण साधण्यासाठी सृष्टीशी त्याची जन्मजात बांधिलकी कशी जपणार हा मूळ प्रश्न आहे. ‘समूहप्रिय’ असलेल्या माणसाने आपल्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी ‘समाज’ नावाची व्यवस्था तयार केली आणि तिच्या धारणेसाठी काही नियम, कायदेकानून तयार केले असे मानले तर समस्त मनुष्यप्राण्यांचे काही समान हक्क मान्य करायला हवे. सामाजिक सुरक्षिततेच्या निकषांमध्ये केवळ दोनच मुलभूत गोष्टींचा समावेश करायचा ठरवला तरी, निरामय स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी निदान प्राथमिक आरोग्यसेवा आणि, सर्वांना समान संधी मिळावी म्हणून किमान शिक्षणसुविधा यांना अग्रक्रम मिळायलाच हवा.

प्राप्त परिस्थितीत नेमक्या याच दोन आघाड्यांवर आपण केवळ चीतपट झालेलोच नाही तर अगदीच भांबावलेलो आहोत हे त्या विषयीच्या रोजच्या बदलत्या निर्णयांमागील धरसोड वृत्तीने स्पष्ट दिसून येते. असे होण्याचे कारण हे दोन फसलेल्या नीतींचे फलित असावे काय? संकुचित लघुदृष्टी तात्कालिक योजनांमध्ये सर्वसमावेशक सर्वकालिक दूरदृष्टीच्या अभावामुळे भविष्यवेधी नियोजनातील निर्णायक त्रुटी आणि ‘शिक्षण’ या संकल्पनेच्या मुळातच अत्यंत चुकीच्या धारणेमुळे सपशेल फसलेले शिक्षणविषयक धोरण आणि त्याची तेवढीच निर्बुद्ध विध्वंसक कार्यवाही!

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणि स्मार्ट उपकरणांच्या काळात माणसे देखील स्मार्ट व्हायला हवी असतील तर शिक्षणाचा मूळ उद्देश हा स्मार्ट होणे एवढाच असायला हवा आणि स्मार्ट असण्याचे केवळ तीन निकष पुरेसे ठरावे –

१. प्रश्न पाडणारी जिज्ञासा आणि पडलेले प्रश्न विचारण्याचे, त्यांची समर्पक उत्तरे शोधण्याचे स्वातंत्र्य,
२. सुचलेल्या उत्तरांवर, कल्पनांवर कृती करण्याची धडाडी आणि अशा कृती आराखड्यांना पोषक वातावरण,
३. आपल्या कृतीच्या समग्र परिणामांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची सामाजिक बांधिलकी.

अशा प्रकारच्या तत्वनिष्ठ शिक्षणप्रणालीतून तयार झालेले युवक कुठल्याही क्षेत्रात गेले तरी स्वार्थापूर्वी (किंवा किमान स्वार्थाबरोबर तरी) समाजस्वास्थ्याचा म्हणजेच ‘यष्टी’ बरोबर ‘समष्टी’चाही विचार करतील आणि सृष्टीचे संवर्धन ओघानेच होईल. अशा तरुणांचे नियोजन हे अगदी परिपूर्ण (परफेक्ट) नसले तरी सर्वसमावेशक आणि भविष्यवेधी नक्कीच असेल. मग भले यासाठी आपल्याला एका संपूर्ण पिढीच्या परिवर्तनाची प्रतीक्षा करावी लागली तरी हरकत नाही!

आणि हो जाता जाता... कोरोनावर औषध सापडेपर्यंत, उपलब्ध साऱ्या संभाव्य उपायांचा भडिमार करण्यापेक्षा, केवळ एकच गोष्ट आपल्या हातात आहे – आपली प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) वाढवणे आणि हे करण्यासाठी ज्यांनी शरीर-बुद्धी-चित्त यांना सुदृढ राखण्यासाठी कायम किमान योगसाधना केली आहे, करीत आहेत त्यांना निश्चितच धोका कमी, खरतर नगण्य आहे. तद्वतच शिक्षण, प्रशिक्षण, शिबिरे, कार्यशाळा या ‘केजी ते पिजी’च्या माध्यमातून आपण मुलांवर, युवकांवर अक्षरश: हजारो प्रकारच्या ‘ज्याला स्कोप आहे’ अशा विषय-कौशल्यांचा भडीमार करत असतो. त्या सगळ्या ऐवजी एकच अत्यंत मुलभूत कौशल्य मुलांनी वृत्तीत बाणवले तर त्यांना आयुष्यात कधीच कशाचीही उणीव भासणार नाही... ते कौशल्य म्हणजे शिकायला शिकणे (लर्निंग टू लर्न!) आजच्या तथाकथित ‘शिक्षणा’चा सारा भर हा लर्निंग (शिकणे) सोडून ‘अर्निंग’ (कमावण्यावर) आहे आणि तो मुख्यत्वे बदलेली जीवनमूल्ये, अनाठायी आदर्श आणि अत्यंत आत्मकेंद्री विचार याचा परिपाक आहे.

‘मी म्हणजे व्यक्ती हा समष्टीचा अर्थात (मानव) समूहाचा भाग आहे आणि समष्टीचा सृष्टीशी अन्योन्य संबंध असल्याने माझ्या प्रत्येक विचार-विकार आणि कृती-रीतीचा एक तदनुषंगिक सर्वव्यापी परिणाम होत असतो आणि तो ‘पूर्णात्पूर्णमुदच्यते’ न्यायाने माझ्यापासून सुरु होऊन माझ्यातच विलय पावतो आणि तरीही शिल्लक राहतो...’ ही शिकवण मानवधर्माचे मूलतत्व आहे, ते समजून घेऊन धारण करणे यात विश्वकल्याण आहे हेच अंतीम सत्य!

शुभम भवतु!

बुधवार, १ जुलै, २०२०

टाहो...!


ना नाचल्या
दिंडी पताका 
टाळ-मृदूंगाचा
स्वरही मुका,
रिंगण न धरी
फेरा म्हणून
ज्ञाना विव्हल,
उदास तुका...!

विठ्ठल नामाचा रे टाहो...!

शनिवार, २७ जून, २०२०

गर्भ...!



थेंब साचला टपोरा,
पहिल्याच पावसात
नाही पाहिले तुला
किती एक दिवसात!

मन ओढाळ झाले,
पावसाच्या सरीगत
कसे जपावे हे जीणे
रोज वाढत्या दरीगत!

मेघ काळा-सावळा
नभी ओथंबून राहे
घननिळा कान्हा मग
मनी साचूनही वाहे!

पाऊस नितळ निर्मळ
नदी-झऱ्या जोडी पंख
डोळ्यातले पाणी खारे
त्याचे पाणी निवळशंख!

मोर फुलवी पिसारा,
भूमी उघडोनी चोच
वाट पाहे त्या थेंबाची
देण्या सृजनाची पोच!

बीज रुजावे जीवाचे
सडा मायेचा पडावा
मातीला गर्भ राहता
नवा माणूस घडावा!

पुन्हा एकदा सन्मित्र दिनेशच्या आग्रहाखातर
त्याच्या वाढदिवसाची सप्रेम भेट म्हणून सस्नेह...!

शनिवार, ६ जून, २०२०

बक्षीस...!


अधाशीपणाने खातांना लांडग्याच्या घशात हाड अडकलं.
जीव गुदमरू लागला म्हणून तो करकोचाकडे गेला.
म्हणाला, ‘तू तुझ्या लांब, टोकदार चोचीने माझ्या घशात अडकलेलं हाड काढून दिलंस तर मी तुला मोठ्ठं बक्षीस देईन!’
करकोच्याने मोठ्ठ्या बक्षिसाच्या मोहाने लांडग्याचा जीव वाचवायला त्याची मदत करायचं ठरवलं.
करकोच्याने अतिशय शिताफीने आपली चोच लांडग्याच्या घशात टाकून अडकलेलं हाड बाहेर काढलं.
घसा मोकळा झाल्यावर लांडग्याला हायसं वाटलं आणि त्याने मोकळा श्वास घेतला.
‘माझं बक्षीस?’ करकोचा म्हणाला. 
‘अरे, तुझी मान माझ्या जबड्यात असतांना मी तिचा लचका तोडला नाही याहून मोठं काय बक्षीस हवं तुला?’