बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८

विराणी...!


अबोल झाली सतार
आणि मूक संवादिनी,
नाते सुरांशी तव जसे
शब्द शब्द गुंफुनी...

शब्दप्रभूच्या विरहात
निस्तब्ध आज लेखणी
विव्हल भावगीत अन
करुण अधिक विराणी...!

मराठी गीत-संगीतातील शब्द, भाव आणि सूर यांचा 
‘देव’ असलेल्या ‘यशवंत’ स्वरसाधकास शतश: नमन!

मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८

कवित्व...!

बऱ्याच सुस्त, मरगळलेल्या आणि गढूळ काळानंतर काहीतरी उत्साहवर्धक घडण्याच्या अथांग प्रतीक्षेत एखाद्या रोमांचकारक सहलीची तयारी करावी, मोठ्या उमेदीने विविध पर्यायांचा विचार करून एक निसर्गरम्य ठिकाण [वळणवाटांचे घनगर्द डोंगररस्ते, उंच तुळतुळीत कडे-कपारी किंवा आनंदाची परमावधी म्हणजे समुद्र किनारा, अजून काय?] निश्चित करावे, आपल्या मुशाफिरीला मुक्त कंठाने गायन आणि प्रसंगोत्पात शेरो-शायरीने बहार आणू शकणाऱ्या समान-शिलेषु-व्यसनेषु कंपनीची अत्यंत चोखंदळपणे निवड करावी, कधी नव्हे तो खर्चाचा विचार न करता जे जे करावेसे वाटत होते ते करण्याचा दृढ निश्चय करावा आणि या, जणू काही ‘वन्स-इन-अ-ब्ल्यू-मून’ मिळालेल्या, संधीचा पुरेपूर उपभोग घ्यावा म्हणून तन-मन-धनाने सज्ज व्हावे आणि...

सहलीची सुरवात तर संभाव्य सुखाच्या कल्पनांनी अतिउत्साहात व्हावी पण सुरवातीचा ‘सहलीची मौज’चा भर ओसरल्यावर, टप्प्याटप्प्याने सगळ्यांना आपापल्या ‘स्पेस’ची आठवण व्हावी आणि आजूबाजूला जे घडतय त्याहून व्हॉट्स, फेसबुक, इन्स्टाग्रामवर काहीतरी अधिक मनोरंजक, अधिक अर्थपूर्ण आणि अधिक गुंतवून ठेवणारं सापडेल या आशेने, आपापल्या चौकोनाने प्रकाशलेला चेहरा खालमानेने आणि ‘डंब’ डोक्याने ‘स्मार्ट’फोनमध्ये खुपसून शांतता व्हावी आणि पहिला भ्रमनिरास व्हावा...

ट्रेकिंगमध्ये एक महत्वाचे वळण चुकल्याचे ‘म्होरक्या’ने निर्विकार चेहऱ्याने जाहीर करावे आणि त्यामुळे साधारण एक तास आणि ५ किलोमीटरचा डीटूर दत्तक घ्यायला लागावा आणि या दत्तकविधानामध्ये रखरखीत, तप्त जमीन आणि धूळमाखले रस्ते याशिवाय काहीही हाती लागू नये, उन्हाने जीव पाणी-पाणी झाल्याने पाण्याचा साठ्याने तळ गाठला तर भलताच पाणी प्रश्न निर्माण होण्याच्या कुशंकेने अधिकच कासावीस व्हायला व्हावे आणि त्यामुळे पोटात उसळलेल्या भुकेचा आगडोंब आणखीनच भडकावा...

लांबलेल्या प्रवासाने, त्रासलेल्या शरीराने आणि कोमेजल्या मनाने ‘डेस्टिनेशन’ला पोहचावे तर आपण जी बघितली ती फोटोशॉपच्या सहाय्याने केलेली प्रेझेन्टेशनशी कमाल होती आणि ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर...’ याची प्रचीती होती, प्रत्यक्षात जिवाला मोहून टाकेल असे कुठलेही ‘ठळक वैशिष्ट्य’ नसतांना कल्पनेने मयसभा सजविण्याला मार्केटिंग म्हणतात हे जुनेच ज्ञान ’निर्व्याज’ अक्कलखाती नव्याने जमा करावे आणि, बेड्या घातलेल्या तरी धीरोद्दातपणे वधस्तंभाकडे चालणाऱ्या, चारुदत्ताप्रमाणे मनात यावे... ये वो मंज़िल तो नहीं...’

...अलीकडे ही अशी चित्रमालिका वारंवार डोळ्यासमोरून सरकू लागली होती आणि मन कडू होऊन वैफल्यग्रस्त होण्याच्या मार्गावर होते आणि अचानक, कधीपासून साचून राहिलेले मळभ क्षणार्धात दूर सारत, उन्हाचा एक कवडसा मेघ भेदून धरणीचा ठाव घ्यायला धावावा तसे, एकामागून एक तीन मनोबल उंचावणारे अनुभव पदरात पडले आणि ‘मन पाखरू पाखरू...’ म्हणतात तसे पुन्हा नव्या जोमाने नव्या आभाळात नव्या भराऱ्या मारू लागले...


पहिला अनुभव अत्यंत वैयक्तिक आणि एका अर्थाने कौटुंबिक पण निराळ्या परिप्रेक्ष्यातून खरतर अत्यंत प्रातिनिधिक आणि वैश्विक!

८० च्या दशकात, आमचे आजोबा अण्णा अर्थात बापू केशव पुराणिक उर्फ कवि केशवतनय यांच्या समर्थ लेखणीतून साकारलेल्या ‘गीत ज्ञानेश्वर’ या चरित्र काव्याचे, स्वत: अण्णांच्या रसाळ निवेदनात व बाळासाहेब नाईक यांच्या अभिजात स्वरात, शंभराहून अधिक कार्यक्रम महाराष्ट्रभर सादर झाले. या कार्यक्रमाशी संबधित सर्वच दिग्गज एक एक करून काळाच्या पडद्याआड गेल्याने व बदलत्या काळात बहुतांची बदलती अभिरुची, समाजाची बदललेली मानसिकता, नवमूल्यव्यवस्था यामध्ये हा कार्यक्रम विस्मृतीत जाणे नवलाचे नसले तरी खेदाचे, आणि आमच्यासाठी विषादाचे, नक्कीच होते. म्हणूनच, संहितेच्या आणि संकल्पनेच्या मूळ गाभ्याला कुठेही धक्का न लावता, या कार्यक्रमाचे पुनरु:जीवन करावे आणि नव्या संचात, नव्या चालींसह आणि नव्या स्वरुपात हा कार्यक्रम पुन्हा एकदा रसिकांसमोर आणावा हा आमचा अनेक वर्षांचा मानस!

आमचे वडील पुण्यास कायमस्वरूपी स्थायिक झाल्यापासून गेल्या १० वर्षात त्यांनी अनेक लहानमोठ्या गायक-वादक-संगीतकारांशी या संदर्भात चर्चा केली तथापि अनेक कारणांनी या विषयात म्हणावी तशी प्रगती होऊ शकली नाही. आमच्या आईच्या पुढाकाराने, मुळच्या धुळ्याच्याच असलेल्या आणि बाळासाहेब नाईकांच्याच शिष्या असलेल्या मीनाताई ओक यांची योगायोगाने भेट होऊन त्यांच्याच हातून या कार्यक्रमाला परिणाम मिळाल्याने त्याला काव्यगत न्याय मिळाल्याची भावना आहे. या नवीन संचातील ‘गीत ज्ञानेश्वर’चा शुभारंभाचा प्रयोग एका छोटेखानी, घरगुती सोहळ्यात शनिवार, २७ ऑक्टोबर २०१८ रोजी तेजस सभागृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न झाला. या निमित्ताने काही जीवलगांची ओझरती का होईना भेट झाली हा स्वार्थ, आपल्या आजोबांची थोरवी नव्याने समजली हा भावार्थ आणि ज्ञानेश्वर माऊली अभिजाततेचा मानदंड असल्याने, रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेणाऱ्या या संतशिरोमणीच्या केवळ नामस्मरणाने आणि पसायदानाच्या सामुहिक पठणाने एकात्मतेची अनुभूती हा परमार्थ आणि सच्चिदानंद! या संपूर्ण कार्यक्रमाच्या डॉक्युमेंटेशनच्या पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सुरु असल्याने याविषयी आणखी एक सविस्तर पोस्ट इथे यथावकाश प्रकटू शकते!


दुसरी अत्यंत आनंदाची आणि ‘माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टांगलं...’ अशा बहिणाबाईच्या अभिनिवेशात सांगायची आणि मिरवायची गोष्ट म्हणजे 'अरुणा ढेरे' यांची, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच निवडणुकीशिवाय व एकमताने, ९२ व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी, झालेली निवड! यावर बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच लोकांनी अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केलेलं असल्याने आणि खुद्द अरुणा ताईंनी त्यांची भूमिका दूरदर्शनवरील काही वाहिन्यांच्या मुलाखतीत स्पष्ट केलेली असल्याने त्याचे विश्लेषण करण्याचे ना माझा हेतू आहे न अधिकार. एका सार्वजनिक लोकशाहीवादी आणि संवेदनशील प्रक्रियेस या निमित्ताने दिशा आणि बळ मिळेल आणि अनेकांना फेसबुकपलीकडे काही अस्सल, अभिजात तथा अस्खलित लिहिण्याची प्रेरणा मिळेल आणि वाचन संस्कृती देखील समृद्ध होईल... ही अपेक्षा!

मला या निमित्ताने झालेला मनस्वी आनंद तेवढा व्यक्त करायचा आहे. अरुणा ढेरे या संशोधक, साहित्यिक म्हणून किती मोठ्या आहेत, त्यांची ग्रंथ संपदा केवढी आहे आणि त्यांना कुठले कुठले पुरस्कार मिळाले आहे याची खानेसुमारी करून नैबंधिक [आणि नैमित्तिक] लिहिणे सहज शक्य आहे पण त्यातून भाव व्यक्त होईलच असे नाही; त्यासाठी कविताच हवी आणि अरुणाताई तिथेही आपला ठसा उमटवतात म्हणून आम्हांला फारच प्रिय! हा नमुना पहा...

‘गळून जाण्याच्या भीतीनं व्याकुळ पाकळ्यांनी
स्वत:मधल्या पोकळीलाच थरथरून पांघरून घ्यावं,
तसे शब्द पांघरून लपू बघतो.
आपण म्हणे कवी असतो...’

आणि हो, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायंचं असेल तर ते सर्वसामान्यांच्या मनात व्हावं...’ या त्यांच्या जाहीर मतामुळे त्या आम्हाला अधिकच जवळच्या वाटतात हे सांगणे न लगे...!

आमचे तिसरे आनंद निधान म्हणजे...

दिवाळीच्या आगमनाची चाहूल लागते दसऱ्याच्या रेंगाळलेल्या कवित्वातून आणि मोती साबणाच्या जाहिरातीतून, घराचा कानाकोपरा लख्ख करण्यासाठी झटणाऱ्या आणि फराळाच्या तयारीसाठी होणाऱ्या गृहलक्ष्मीच्या लगबगीतून, आकाशदिव्यांनी फुललेल्या बाजारातून आणि फटाक्यांच्या दुकानासाठी उभारण्यात येणाऱ्या गाळ्यांतून, बोनसचा वेध आणि खरेदीची ओढ लावणाऱ्या हुरहुरीतून आणि नव्या कोऱ्या वासासह चुरचुरणाऱ्या पानांच्या दिवाळी अंकांच्या वाचन मेजावानीतून!



यंदाच्या दिवाळीत पहिलाच अंक हाती आला तो अरुण शेवत्यांचा विशेषांक ‘ऋतुरंग’, त्याच्या ‘विशेष’ सूत्रासह – ‘बीज अंकुरे अंकुरे’! हे म्हणजे अगदीच ‘आंधळा मागतो एक डोळा...’ झाले! बरं, पान उलटावावे तर पहिलाच बीज संदेश मेघना गुलजार! म्हणजे अक्षरश: ‘मार डाला...’च की नाही? पण नाही, थोडे पुढे जावे तर खुद्द गुलजार त्यांच्या ‘सगेसारे’च्या किशोर मेढेंनी केलेल्या मराठी अनुवादाबद्दल त्यांच्या खास शैलीत टिप्पणी करताय... त्यातील गुलजार आणि ग्रेस यांच्या संबंधांवरच्या, कलबुर्गी आणि बापूंच्या कविता जरूर वाचा... बधीर!

आणि नागराज बाबुराव मंजुळे सुद्धा ‘पिस्तुल्या’च्या निमित्ताने आपली अंतस्थ भावना कवितेतून व्यक्त करतायत...
‘माझ्या हाती
नसती लेखणी
तर
असती छिन्नी
सतार बासरी
अथवा कुंचला
मी कशानेही
उपसतच राहिलो
असतो
हा अतोनात
कोलाहल मनातला’

गेले तीन दिवस हे असे आनंदाचे डोही आनंद तरंग असे चाललेय आणि ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत...?’ याचं उत्तर तूर्त तरी सापडल्यासारख वाटतय...

असो, अगदी रहावलं नाही म्हणून एवढं भरभरून लिहिलं, आता थांबायलाच हवं... गुलजार, नागराज, गिरीश कुबेर वाचून झाले असले तरी डॉक्टर आनंद नाडकर्णींची 'रेषामैत्री', दिनेश गुणेंचे 'इदं न मम...' आणि अजून खूप बीजांचे अंकुरणे वाचायचे आहे, अनुभवायचे आहे, जगायचे आहे! तेव्हा तूर्त इतकेच...

आणि हो, सर्व सग्या-सोयऱ्यांचे, साहित्यिक-रसिकांचे आणि अरुण शेवत्यांचे मन:पूर्वक आभार...!

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

दशानन...!


आज विजयादशमी, दसरा – दीपावली नामे तेजाच्या उत्सवाचे पहिले पाऊल! महिषासुरमर्दीनीने असुराचा, रामाने रावणाचा वध केला, पांडवांनी अज्ञातवास संपवून शमीच्या वृक्षावर लपवून ठेवलेली आपापली शस्त्रे पुन्हा धारण केली आणि कौत्साने आपले गुरु वरतंतू यांच्या गुरुदक्षीणेच्या अपेक्षेची पूर्तता केली अशा विविध धार्मिक, पौराणिक, अलौकिक धारणांचा संदर्भ असलेला, हिंदू मान्यतेनुसार साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी, एक मुहूर्त.

तथापि आजच्या संदर्भात या सर्व संकल्पनांचा सांकेतिक अर्थ लक्षात घेऊन सीमोल्लंघन का व कसे करायचे याचा जरा साक्षेपाने विचार करायला हवा. महिषासुरमर्दिनी, श्रीराम, पांडव आणि कौत्स हे शौर्य, सत्य, न्याय आणि निष्ठा यांची प्रतिके आहेत तर महिषासुर, रावण, कौरव आणि वरतंतू ही क्रौर्य, असत्य, अन्याय आणि दुराभिमान यांची प्रतिके आहेत. या सर्व प्रतीकांमधून जे समान सूत्र सांगितले आहे ते म्हणजे शौर्याचा क्रौर्यावर, सत्याचा असत्यावर, न्यायाचा अन्यायावर, सुष्टांचा दुष्टांवर म्हणजेच नीतीचा अनीतीवर आणि विवेकाचा विकारावर विजय! आणि असा विजय मिळविण्यासाठी आपल्याला ज्या सीमांचे उल्लंघन करावे लागते त्या सीमा म्हणजे आपल्या मनुष्यत्वाने आपल्याला बहाल केलेल्या मर्यादा.

या सर्व अनिष्ट प्रवृत्तींच्या रूपकामध्ये रावणाची दहा तोंडे ही मनुष्याच्या दहा विकारांची प्रतिमाने आहेत – काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर, मानस, बुद्धी, चित्त आणि अहंकार. यापैकी षडरिपू आपल्या परिचयाचे आहेत परंतु उर्वरित चार सकृतदर्शनी विकार किंवा वैगुण्ये न वाटता सामर्थ्य किंवा गुणवैशिष्ट्ये वाटतात. ती तशी भासतात कारण आपण त्यांचा तसा विचार कधी करीत नाही. आता असे पहा – विकृत मानस, भ्रष्ट बुद्धी, विचलित चित्त आणि विखारी अहंकार, अशा विशेषणांची जोड दिल्यास त्यांच्यातील अनिष्ट भाग त्वरित भासमान होतो. तेव्हा या सर्वच गुणवैशिष्ट्यांच्या सकारात्मक उपयोजनासाठी आवश्यक असतो तो ‘विवेक’!

माझे नाव-गाव-जात-धर्म, माझे कुटुंब-समाज-राज्य-राष्ट्र, माझी इच्छा-आकांक्षा-कामना-महत्वाकांक्षा, माझे सुख-दु:ख-लाभ-हानी, माझे आचार-विचार-निष्ठा-धारणा, माझी मान-मर्यादा-पत-प्रतिष्टा, ही त्या सूक्ष्म षडरीपुंची स्थूल प्रकटने आणि याच मनुष्यत्वाच्या सीमा-मर्यादा ज्यांचे या निमित्ताने, या शुभ मुहुर्तावर उल्लंघन करून विजयोत्सव साजरा करायचा! आपल्याला ज्या दशाननाचा वध करायचा आहे तो बाहेर इतर कुणी नसून या दशरिपूंच्या रूपात आपल्याच आत वसतो आहे आणि त्याचा वध करण्याचा आपला 'रामबाण' आहे विवेक, सद्सद्विवेक - चांगल्या-वाईटाचे भान!

आमच्या लहानपणापासून ‘दसरा’ ज्या आठवणींशी जोडला गेला आहे त्या म्हणजे झेंडूच्या फुलांची तोरणे, सरस्वतीची प्रतीकात्मक रांगोळी आणि तिचे पूजन, नवीन कपडे, गाव वेशीवरच्या देवीचे दर्शन आणि आपट्याच्या पानांना ‘सोने’ मानून त्याचे आदानप्रदान. यातील शेवटच्या ‘विधी’चा ‘शास्त्रार्थ’ आमच्या बालमनालादेखील तत्वत: कधीच पटला नाही आणि त्याचे समर्थन न पटल्याने तो करू नये याकडे नेणतेपणापासूनच असलेला आमचा कल जाणतेपणी दृढ झाला आणि हा ‘विधी’ आमच्या प्रातिनिधिक ‘विजयोत्सवा’तून कायमचा हद्दपार झाला. ‘नवीन कपडे’ हे नव-मूल्य-व्यवस्था आणि ‘एकावर एक (किंवा दोन, तीन) फ्री’च्या चंगळवादात आपले अप्रूप कधीच गमवून बसले तर देवी गाव वेशीवर न रहाता गावाच्या केंद्रस्थानी (आणि दूरदर्शनवरही) आल्याने दर शुक्रवारी दर्शन देवू लागली.

या सर्व संक्रमणात टिकून राहिला तो सरस्वती चिन्हाच्या पूजनाचा संस्कार आणि झेंडू फुलांच्या माळांचा सोपस्कार. आजही दसरा म्हटलं की या दोन गोष्टी प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे मन:पटलावर उमटतात आणि आपट्याच्या पानांचा स्पर्श बोटांना जाणवतो.

आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी सवंगड्यांना गळाभेट देवून आणि वडिलधाऱ्यांना पदस्पर्श करून दसऱ्याच्या शुभेच्छा देण्याची एक सुसंकृत पद्धत होती. अलीकडे बऱ्याचशा घरात वडीलधारेच नसतात, खुद्द आपल्याच जन्मदात्यांना ज्येष्ठतेचा मान देण्यात संकोच वाटतो तिथे दुसऱ्याच्या पालकांना वंदनीय मानणे अगदीच ओल्ड फॅशन्ड आणि आप्तेष्ट (म्हणजे काय रे भाऊ?) वगैरेंना भेटण्यास वेळ कुठाय? हर घडी वाढत्या समृद्धीच्या मुदलाचे घड्याळाच्या काट्याला बांधलेल्या व्याजाचे देणे कोण देणार...? आणि तसही निरुप'योगी' माणसांना भेटून काय साध्य होणार...? 

तेव्हा म्हणा 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल अनंतकोटी फेसबुक अन ब्रह्माण्डनायक व्हॉट्सॲप महाराज की जय' आणि पाठवा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा अगदी ताबडतोब, विनाखर्च आणि फोनपोच!

कारण, ‘व्हॉट्स ॲप’पे शेअर और 
‘फेसबुक’पे लाईक कर रहे हो,

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

‘गदिमा’...!



आम्ही शाळेत असतांना, स्थितप्रज्ञ या शब्दाचा अर्थ आणि संत माणूस या संबोधनाचे आकलन ज्यांच्या व्यक्तीत्वाकडे पाहुन कुणासही सहजच व्हावे अशा, आमच्या सगळ्यात थोरल्या काकांकडे एक फ्रेम केलेला फोटो असे. त्या फोटोतील भारदार व्यक्तीची स्निग्ध नजर आणि विचारी मुद्रा ही आम्हां मुलांना देवघरातल्या समई सारखी शांत पण अंधाराचा ठाव घेणारी वाटत असे. सदर गृहस्थ हे आपलेच कुणी पूर्वज अथवा कुणी संत महंत ज्ञानी वा समाजकारणी असावे अशी शंका आमच्या बालबुद्धीस येत असे. अन्यथा आमचे अत्यंत मितभाषी, विचारी आणि धीर-गंभीर काका त्यांचा फोटो ठेवते ना, असा आमचा दृढ विश्वास असे. आमच्या काकांच्या घराचे अगदी पहिल्यापासून जे एक सात्विक, शालीन आणि संयत रूप असे ते अनेक वादळ-वारे-उन्हं-पाऊस यांस अक्षरश: पुरून उरले आणि काळाच्या बदलत्या प्रवाहातही आपल्या मूळ स्वरुपात आणि संस्कारात तसूभरही दोलायमान झाले नाही याचे जेवढे श्रेय त्या घराच्या घडणीला, त्याच्या संस्कारी पाईकांना, तेवढेच त्या घराच्या आदर्शांना आणि मानदंडांनाही. हे फोटोतील गृहस्थ त्यापैकी एक.

त्या फोटोवर अत्यंत सुरेख वळणदार अक्षरात काव्यपंक्ती होत्या... ‘पराधीन आहे जगती...’ त्या शब्दांचा अर्थ अथवा त्याच्या रचनाकाराची महती समजण्याचे तेव्हां न आमचे वय होते ना प्रज्ञा. तरीही हे काहितरी वेगळे, अर्थपूर्ण आणि आपले आजोबा बोलतात, लिहितात तसे काहीतरी खूप भारी आहे एवढे समजण्याइतकी कुवत आमच्या संस्कारांनी दिली होती. शिवाय मुळात बोलायला अनुत्सुक असलेल्या काकांपाशी फाजील चौकशा करण्याइतके कुतुहूल असले तरी तो आगाऊपणा होईल एवढी समजही होती. तेव्हां ‘जनी वंद्य ते सर्व भावे करावे...’ या प्रात:स्मरणास स्मरून आम्ही त्या गृहस्थांचा आदर करू लागलो.

माध्यमिक शाळेच्या पुढल्या काळात घरात जेव्हा ‘टेपरेकॉर्डर’ नावाची चीजवस्तू आली तेव्हा तिच्यामध्ये वाजविण्यासाठी ‘कॅसेटी’ही आल्या. संस्कारी घरांमध्ये प्रत्येक नवीन वस्तूचे स्वागत जसे पूजा अर्चना औक्षण याने होत असे तसेच घरात आलेला प्रत्येक रुपया-पैसा हा प्रथम देवाला दाखविणे, नव्या वहीवर पहिले अक्षर ‘श्री’ काढणे, नवे कपडे घालून देवाला आणि घरातील वडिलधाऱ्यांना नमस्कार करणे, नव्या वाहनाला (बहुदा सायकल) मंदिरात देवदर्शनासाठी पहिली फेरी मारणे अशा बाळबोध आणि सरळ वळणाच्या साध्या माणसांचा सगळीकडे भरणा होता. याच न्यायाने नवीन ‘टेपरेकॉर्डर’वर प्रथम देवाचे काही वाजवले पाहिजे हा विचार अगदीच नेमस्त होता. देवांच्या आरत्यांची डिस्को भजने, गणपती उत्सवाचा इव्हेंट आणि गणपतीच्या गाण्यांचा डीजे होण्यापूर्वीचा काळ असल्याने तसल्या भाविक गाण्यांचा एवढा सुळसुळाट झालेला नव्हता आणि छोट्या गावातही रसिक शिल्लक असल्याने चांगल्या कसदार गीत-संगीताची केवळ जाणच नाही तर गोडीही होती आणि ओढही.

या पार्श्वभूमीवर एका भल्या पहाटे आमच्या कानावर सूर पडले... ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती...!’ त्या शब्दातील मोहक भाव आणि सुरातील प्रामाणिक साद आम्हाला वेडावून गेली आणि तो संबध संच ऐकण्याची उर्मी आम्हांला स्वस्थ बसू देईना. वडिलांना ऑफिसला जाण्याची गडबड असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते उपकरण न बिघडवता चालविण्याचा एक अतिशीघ्र कोर्स करून आम्ही तो सबंध संच ऐकण्याची परवानगी मिळवली. मग काय, ‘राम जन्मला ग सखे...’ पासून जी काही आमची समाधी लागली ती ‘सेतू बांधा रे सागरी...’ या आदेशाने आणि ‘जय गंगे जय भागीरथी...’ या  उद्घोषानेच भंगली. संध्याकाळी वडील ऑफिसमधून आल्यानंतर त्यांच्या त्या संगीत-संस्काराचे आमचे व्हर्जन आम्ही त्यांना साभिनय सादर केले आणि वडील ‘धन्य’ झाले. आम्हाला त्या विषयाच्या रसास्वादनाबरोबर त्याचा आशयही माहीत असावा म्हणून वडिलांनी आमच्या सामान्यज्ञानात भर घातली तेव्हा आम्हाला जे समजले ते म्हणजे, आपण जे ऐकले ते 'गीत रामायण' आणि ज्यांच्या स्वराने आपण वेडावलो ते 'बाबूजी' अर्थात 'सुधीर फडके'!

अमिताभ सिनेमात हिरो असतो म्हणजे तो सिनेमा अमिताभचा ही आमची काव्य-शास्त्र-विनोद-साहित्य-कला विषयातली पोच असल्या कारणाने सिनेमा नाटक हे दिग्दर्शकाचे माध्यम असते हेच समजण्याची पात्रता नव्हती तिथे लेखक या प्राण्याशी आणि त्याच्या एकूणच कलानिर्मितीतील अनन्यसाधारण महत्वाशी आमचा सुतराम म्हणतात तसा संबंध नव्हता. त्यामुळे पुढे अनेक वर्षं ‘गीत रामायण कुणाचे?’ तर ‘बाबूजींचे!’ अशीच आमची समजूत होती. स्वत: स्टेजवर नाटक करण्याचा आणि त्यासाठी लेखकाची परवानगी घेण्याचा प्रसंग आला तेव्हा आम्हाला लेखक महाशयांची, लंपनच्या भाषेत, ‘नीटच’ ओळख झाली. फूल समजल्यावर फळही समजते तसे लेखक समजल्यावर कवि, गीतकार देखील समजू लागले आणि पहिल्यांदाच साक्षात्कार झाला की बाबूजींनी गाण्यापूर्वी गीत रामायण कुणीतरी लिहिले असले पाहिजे, आणि असे काहीतरी लिहिणारा माणूस किती ग्रेट असला पाहिजे... तंतोतंत!

थोड्याशा संशोधनानंतर आम्हाला जो शोध लागला तो आमचा स्वत:चा खासगी आणि वैयक्तिक युरेका मोमेंट! सदर गृहस्थांचे नाव गजानन दिगंबर माडगुळकर असे असून हे हरहुन्नरी, अष्टपैलू, बहुश्रुत तथा बहुमुखी प्रतिभेचे धनी ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून ओळखले जातात व महाराष्ट्रास, ‘तुझिया जातीचा मिळो आम्हां कुणी...’ अशी आस लावून गेलेल्या एका अत्यंत सर्जक व मार्मिक ‘कोट्या’धीशाने त्यांच्या नावाचे लघुरूप ‘गदिमा’ म्हणजे केवळ महाराष्ट्राला लाभलेली – अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, रिद्धिमा सिद्धिमा, पराक्रमा, ईशमा या अष्टसिद्धींच्या यादीतील नववी सिद्धी आहे या पुलकित शब्दात गौरवलेली अलौकिक प्रतिभा आहे हे ज्ञात झाले तेव्हा आम्हांस जो हर्षवायू व्हायचा राहिला होता तो आमच्या काकांच्या हृदयमंदिरी मखरात विराजमान असलेले ते हेच महानुभाव हे समजताच झालाच! त्याच बरोबरीने ‘मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा; पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...!’ या संपूर्ण काव्याची अनेक पारायणे, आवर्तने आणि प्रवर्तने झाली आणि तत्वज्ञानाची गोडी केव्हा आणि कशी लागली ते समजले देखील नाही. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस!’ या भावाने गादिमांचा आणि आमचा स्नेहबंध ‘गीत रामायणाने’ जुळला आणि ‘दो आंखे बारह हाथ’ ने फळला, फुलला. हिंदी चित्रपट इतिहासातील अनेक अर्थाने मैलाचा दगड असलेला हा सर्वांगसुंदर चित्रपट सर्वात शक्तिशाली आहे तो त्याच्या अकल्पित, अनवट, भावनोत्कट कथेत आणि घडीव, सुस्पष्ट, गोळीबंद संवादात अर्थात पटकथेत – दोघांचे श्रेय गदिमांचे!

नाव-गाव-कार्य-कर्तुत्व समजण्याअगोदर, केवळ प्रतिमेतून गदिमांची आमच्याशी अबोल भेट घडविणारे आणि समग्र मानवी आयुष्याचे सार तीन शब्दात सांगता येऊ शकते हे ज्ञान असल्याने धीर गंभीर रहाणारे आमचे थोरले काका, गदिमांची विस्तृत ओळख झाल्यावर, आमच्यासाठी खूपच मोठे झाले...!     

आज हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आजपासून गदिमांच्या जन्मशताब्दीवर्षास सुरवात होत आहे आणि त्या निमित्त अत्यंत सुरेख कार्यक्रमांची भोवताली रेलचेल आहे. या सोहळ्यास यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील आजच्या ‘गदिमायन’ने जे नमन साधले आहे त्याचा रंग उत्तरोत्तर गहिरा होत जाईल ही अपेक्षा.

गदिमांचे बंधू व्यंकटेश माडगूळकर लेखनाबरोबर रेखाचित्रेही काढीत. त्यांनी गदिमांचे एक पाठमोरे रेखाचित्र काढले आणि त्याला शब्द दिले. 'या माणसाने कधीही घरादाराला पाठ दाखवली नाही...!' अशी एक आठवण आमचे मायाळू शुभचिंतक सन्मित्र प्रदीप रस्से सरांनी सांगितली. ती इथे सांगणे केवळ प्रस्तुतच नाही तर आवश्यक वाटले म्हणून, रस्से सरांची अनुमती गृहीत धरून, हा अगोचरपणा...!  

आणि हो, गदिमांचे नातू ‘सुमित्र सुधीर माडगुळकर’ यांनी गदिमांच्या आठवणी जपण्यासाठी एका संपन्न वेबसाईटची निर्मिती केली आहे व आपल्या फेसबुकपेजवर आजोबांची हृद्य आठवण सांगितली आहे, या दोन्ही लिंक्स आपल्या सोयीसाठी येथे देत आहे, अवश्य भेट द्या.