गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२

संचित...!

 चित्र:  वैभव  पुराणिक, नासिक

श्वासावर लक्ष असो
जगण्याचा वाटो सण
परतूनी येत नाही
आला क्षण गेला क्षण

चष्मा एका प्रतलाचा
रंग अनेक अदृष्य
भान राखून मितींचे
मौनातून व्हावे भाष्य

काय देणे काय घेणे
हिशोबाची वही बंद
संचिताच्या मार्गावर
चालण्याचा उरो छंद

चोरवाटा आडवाटा
विसरुनी हेवेदावे
संवेदना जागवून
स्वत:कडे परतावे

मन आत्मा की शरीर
कोठे शोधावे मीपण ?
अज्ञाताच्या वाटेवर
सारे प्रवासी आपण

श्वासावर लक्ष असो
जगण्याचा वाटो सण
परतूनी येत नाही
आला क्षण गेला क्षण

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

 शब्द: दिनेश चंद्रात्रे, धुळे

वाढदिवसाचे औचित्य साधून आपापल्या भावनांना चित्राक्षरांचा साज चढविणाऱ्या
सन्मित्रांच्या या भावगर्भ, अर्थगर्भ, सूचक तथा समर्पक अभिव्यक्तींनी
माझा अर्धशतकोत्तर प्रथम वाढदिवस अधिकच समृद्ध आणि सुफल झाला नसता तरच नवल...!
बालमित्रांच्या 'आभाराचा भार कशाला...?' नाही का गुरुजी ?

सादर प्रणाम !

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

कृष्णसखा...!

चित्र सौजन्य: वैभव पुराणिक, नासिक 

पंचेंद्रियरुपी पांडवांना
षडरिपूंच्या कौरवांशी लढतांना
सगळ्यात अवघड युद्ध
लढावे लागते ते कर्णाशी
कारण...
कायम उपेक्षल्याने
आत्म्याच्या अतृप्त वासनांना
आणि मनस्वी दुखावल्याने
मैत्रीच्या कोंदणात
विखार जोपासणाऱ्या
धुरंधराला जिंकणे सोपे नसते,
विवेकी सारथ्याशिवाय !
म्हणूनच...
विकार सांभाळायला
आणि कर्णाचा अर्जुन व्हायला,
सख्याच्या रुपातला
कृष्ण भेटायला हवा,
कृष्ण भेटायलाच हवा...!

जन्माष्टमीच्या शुभेच्छा...!

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

प्रतिज्ञा...?


कडक उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलातील तळ्याचे पाणी संपत चालले होते. तळ्यातील पाणीही आटले. हत्तीचा कळप पाण्याच्या शोधात होता . पाणी कोठेच मिळत नव्हते. हत्तीच्या कळपाचा राजा म्हणाला, मला दुसऱ्या जंगलातील सर्वात मोठे तळे माहित आहे आपण तिकडे जाऊयात. हत्तींना पिण्यासाठी पाणी हवेच होते. सगळे दुसऱ्या जंगलाकडे निघाले. तीन रात्री प्रवास केल्यानंतर हत्तीचा कळप त्या सर्वात मोठ्या तळ्याजवळ आले.

त्या सर्वात मोठ्या तळ्याच्या परिसरात ससे निवास करीत होते. तळ्याच्या आसपास मातीत बिळे करून ते राहत होते. तीन रात्रीचा प्रवास करून आलेल्या हत्तींना पाणी बघताच पाण्याच्या दिशेने धाव घेतली. आपल्यामुळे सशांची घरे नष्ट होत आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही. हत्तीच्या पहिल्या फेरीत खूप ससे मारले गेले रोजच हत्ती पाणी पायायला येऊ लागले आणि सशांची हानी होवू लागली. सशांना या परिस्थितीवर उपाय शोधणे भाग होते.

सशांच्या कळपातील एक हुशार ससा हत्तींच्या राजाला भेटायला गेला.
ससा म्हणला, 'महाराज आमचे थोर राजे चंद्रमहाराज यांनी आपणास तळ्यातील पाणी पिण्यास मनाई केली आहे.'
तेव्हा हत्तींच्या कळपाच्या राजाने त्याला विचारले, 'कोठे आहे तुमचा राजा?'
तेव्हा ससा म्हणाला, 'चला मी तुम्हाला त्यांच्या कडे घेऊन जातो.'

सशाने लांबच्या रस्त्याने हत्तीला तळ्यापर्यंत नेले. ते पोहोचेपर्यंत चंद्र आकाशात आला. तळ्यात चंद्राचे प्रतिबिंब पडले होते.
त्याकडे बोट दाखवून ससा म्हणाला, 'ते बघा आमचे महाराज रागाने थरथरत आहेत.'

हत्ती हे दृश्य पाहून घाबरला. पाण्यात हलणारे प्रतिबिंब पाहून हत्तीने सशाची क्षमा मागितली. सर्व हत्तींना घेऊन त्यांचा राजा जंगलाबाहेर पडला ससे आता आनंदाने तळ्याभोवती राहू लागले.

बुद्धिर्यस्य बलं तस्य निर्बुद्धेश्च कुतो बलम् ।
वने सिंहो यदोन्मत्तः मशकेन निपातितः ॥

'भाषण' (साभार: भाडीपा) आणखीन गोष्ट (साभार: पंचतंत्र) दोन्ही पूर्णपणे अराजकीय आहेत.

भारत मेरा देश है।
सभी भारतीय मेरे भाई-बहन हैं।
मैं अपने देश से प्यार करता हूं और मुझे इसकी समृद्ध और विविध विरासत पर गर्व है।
मैं हमेशा इसके योग्य बनने का प्रयास करूंगा।
मैं अपने माता-पिता, शिक्षकों और सभी बड़ों का सम्मान करूंगा और सभी के साथ शिष्टाचार का व्यवहार करूंगा।
मैं सभी जानवरों का सम्मान करता हूं और अपने देश और अपने लोगों के लिए, मैं अपनी भक्ति की प्रतिज्ञा करता हूं।
उनकी भलाई और समृद्धि में ही मेरी खुशी है।
जय हिन्द!


स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा !