रविवार, २४ डिसेंबर, २०२३

पुस्तकं...!


काल बऱ्याच वर्षांनी प्रापंचिक कर्मे आणि व्यावहारिक कर्तव्ये यातून जाणीवपूर्वक वेळ काढून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या विश्वविक्रमी 'पुणे पुस्तक महोत्सवा'ला भेट दिली. तेथील हजारो पुस्तकांपैकी शेकडो घ्यावीशी वाटली तरी काही मूलभूत मर्यादा - उदा. त्यासाठी लागणारा निधी, तेवढे सगळे वाचण्यासाठी लागणारा अवधी आणि एक पुस्तक एकदा वाचून झाल्यावर त्याचे काय करायचे ही उपाधी अशा सगळ्या मध्यमवर्गीय विवंचनांमुळे नेहमीप्रमाणे मध्यममार्ग काढून झेपतील तेवढीच पुस्तके घेतली, आता एकेक वाचून हातावेगळे करण्यासाठी वेळेचे नियोजन सुरु आहे.

कालचा संपूर्ण दिवस साहित्यिक, सांस्कृतिक आणि काव्य-शास्त्र-विनोदाने सुफळ सम्पूर्ण करावा म्हणून सायंकाळी २३ व्या कोथरूड साहित्यिक कलावंत सम्मेलनाला हजेरी लावली आणि अशोक नायगावकरांच्या अध्यक्षीय भाषणाचा लाभ (अक्षरश:) घेतला. अध्यक्षीय भाषणाची प्रत प्रेक्षकात वितरित करण्याची प्रथा आहे पण आम्हाला अद्याप ती मिळू शकलेली नाही, प्रयत्न सुरु आहेत, मिळताक्षणी येथे प्रसृत केली जाईल.

अध्यक्षीय भाषणानंतर यंदाच्या पुरुषोत्तम करंडक विजेत्या एकांकिकांचे सादरीकरण होते. त्यातील पहिली खडकी महाविद्यालयाची 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील...' ही, निसर्गाची हानी आणि वनवासींना लक्ष्य करून होणाऱ्या विकासावर जळजळीत भाष्य करणारी एकांकिका आशय-विषयात खोली असणारी असली तरी सादरीकरणात खूपच बालीश वाटावी अशी होती. अर्थात महाविद्यालयाच्या युवक-युवतींचा नवथर उत्साह आणि सादरीकरणातील मर्यादांचा विचार करता प्रयत्न स्तुत्यच म्हणायचा.

स. प. महाविद्यालयाची 'कृष्णपक्ष' ही नेहमीप्रमाणे साऱ्याच आघाड्यांवर उजवी असल्याने अधिक प्रभावी आणि रंजक असणे स्वाभाविकच होते. नाट्यशास्त्रातील साऱ्या नियम-आयामांचा उत्कृष्ट वापर आणि अत्यंत घोटीव, सुसंबद्ध टीमवर्क यामुळे, अॅसिड हल्ल्यात विद्रूप झालेल्या तरुणीची व्यथा असा गंभीर विषय, सावळ्या कृष्णाच्या रूपकातून मांडण्याची कल्पना जेवढी कल्पक तेवढेच त्याचे सादरीकरण मोहक करण्यात हे युवक यशस्वी झाले हे निश्चित.

कालचा दिवस असा अत्यंत प्रॉडक्टिव्ह आणि फुलफीलींग गेल्यामुळे आज काहीतरी चांगले लिहून त्याचे 'उद्या'पन करावे म्हणून गुलज़ारांच्या या आणखी एका अत्यंत भावस्पर्शी कवितेचा हा मुक्त भावानुवाद. गुलजारांच्या नखाचीही सर नसल्याने या प्रकटनाकडे मूळ कलाकृतीशी तुलनात्मकदृष्टया साधर्म्य न बघता भावार्थाच्या दृष्टीने तादात्म्य बघावे ही विंनती...

मोबाईल किंवा लॅपटॉपवर झरझर चालणाऱ्या माझ्या बोटांकडे
आशेने बघत राहतात पुस्तके काचेच्या बंद दाराआडून...
'किती दिवस झाले त्या बोटांचा ओलसर स्पर्श अनुभवून...'
या परित्यक्त भावनेतून केविलवाणी झालेली पुस्तके
आताशा झोपेत चालू लागली आहेत म्हणे...

पुस्तकांनी जी जीवनमूल्ये शिकवली
ज्या धारणा विकसित केल्या
ज्या जाणिवा समृद्ध केल्या
त्या आताशा बेघर झाल्यात.
जी नाती, जे ऋणानुबंध त्यांनी ऐकवले
ते सारे सारे आता विरलेत, उसवलेत वाटते...

पान उलटावं तर एक खोल उसासा स्पष्ट ऐकू येतो,
आणि बऱ्याच शब्दांचे तर अर्थच गळून पडलेत.
ज्यावर आता अर्थ उगवत नाहीत असे
निष्पर्ण पिवळ्या खोडासारखी भासते ती शब्दावली...

पेल्यांनी ज्यांना कालबाह्य अडगळ करून टाकले
अशी मातीच्या गडूसारखी इतस्ततः विखुरलेली
बरीचशी बोधवचने, सुविचार, सुभाषिते पण आहेत त्यात !

पान उलटवतांना जीभेला कागदाचा जो स्वाद यायचा,
आता प्लास्टिकच्या निर्जीव स्पर्शाने फक्त क्लिक होते
आणि एका पाठोपाठ एक तर
कधी एकमेकावर स्वार होणारी
असंख्य खिडक्यांची झडी लागते...

कधी छातीवर ठेऊन झोपी जात असू...
कधी मांडीवर घेऊन जोजवत असू...
कधी गुडघ्यांचे डेस्क करून वाचतांना
नतमस्तक होऊन त्यावरच माथा टेकत असू ...
पुस्तकांशी जे घट्ट गूळपीठ होतं त्याची चव गेली !

पुस्तकांतून मिळणारी माहिती, ज्ञान एरवीही मिळत राहील...
कदाचित आणखीन सोप्या प्रकारे,
जास्त भरभर, पण...

पुस्तकातून अवचित गवसणारी ती वाळलेली फुले
त्या सुगंधीत चिठ्ठया
ते मधुर चिठोरे...
पुस्तकं मागण्याच्या, पडण्याच्या, उचलण्याच्या मिषाने
बांधले, गुंफले, फुलले जाणारे अनुबंध
त्यांचं आता काय होणार यापुढे...?
तसं काही घडणार नाही...
बहुदा !
--------------------------------------

मूळ रचना...

रविवार, १७ डिसेंबर, २०२३

डिटॉक्स...!

कृत्रिम बुद्धिमत्तेने साकारलेली प्रतिमा 

'स्क्रीन टाईम' फार जास्त होतो या जाणिवेने,
माणसाला बऱ्याच काळात स्वयंप्रज्ञेने सुचलेली,
डिजिटल डिटॉक्सची आयडिया चांगलीच आहे...

पण त्यासोबत, किंवा तत्पूर्वी...

विकासाच्या अविवेकी कल्पना,
उपभोगधर्मी संवेदनाशून्य बाजारमूल्ये
द्वेषमूलक आणि अंधश्रद्ध धार्मिक कट्टरता
पुढे जाण्याच्या शर्यतीने गाठलेला अनावर वेग
दिवसेंदिवस निष्कारण टोकदार होत चाललेल्या अस्मिता
लोकाभिमुख संस्थांचे 'जनहितार्थ' होणारे सरसकट सपाटीकरण
या सगळ्याचा अत्यंत धूर्तपणे वापर करून घेणारे नफ्फड राजकारणी
...आणि ज्या शहाण्यांनी या साऱ्याला वेसण घालावी त्यांचे जाणीवपूर्वक लाभार्थी मौन...

या विषारी व्यवस्थेचेही निर्विषीकरण झाले पाहिजे, करायला हवे !

अन्यथा...
षडरिपूग्रस्त माणसांची व्यवस्थेला फार अडचण होते म्हणून,
एआयने ह्यूमन डिटॉक्स करण्याची वेळ फार दूर नाही...

सजीव सृष्टीच्या इतिहासातले ते ठरेल
पहिले आणि एकमेव...
सेल्फ-एक्स्टिंक्शन...!

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

गंधार...!


एके दिवशी तानसेनाच्या कर्णमधुर संगीताने तृप्त होऊन अकबर शयनगृहाकडे निघाला असता काही विचाराने थांबून तानसेनाला म्हणाला, 'तुझे संगीत केवळ स्वर्गीय आहे. तुझ्या गायन-वादनाने साऱ्यांचे चित्त प्रफुल्लित होते, चराचर उत्फुल्लित होतात. तुझ्या दर्जाचा असा दुसरा कलाकार या धरतीवर असूच शकत नाही. तू अद्भुत, अलौकिक, एकमेवाद्वितीय आहेस यात शंकाच नाही. परंतु माझ्या मनात असे आले की ही कला तुलाही कुणी तरी शिकवली असणार ना? याची साधना करण्याची प्रेरणा देणारा कुणी असेलच ना? तू ही गुरु केला असशीलच ना?'

तानसेन उत्तरला, 'महाराज, अर्थात मला गुरु आहेत आणि त्यांची योग्यता एवढी थोर आहे की मी तर त्यांच्या पायाची धूळ देखील नाही. तुम्ही फक्त मलाच पाहिलं, ऐकलं आहे म्हणून तुम्हाला मी थोर वाटतो. उंट जोपर्यंत पर्वताजवळ जात नाही तोपर्यंत त्याला खऱ्या उंचीची जाणीव होत नाही...'

अकबर म्हणाला, 'असे असेल आणि तुझे गुरु जर हयात असतील तर आत्ता, या क्षणी त्यांना दरबारात हजर कर, त्यासाठी जे करावे लागेल ते कर, जे द्यावे लागेल ते द्यायची माझी तयारी आहे. पण मला आत्ता, या क्षणी त्यांना भेटलेच, ऐकलेच पाहिजे...!'

तानसेन  म्हणाला, 'महाराज तीच तर अडचण आहे! माझ्या गुरूंना कुणीही काहीही देऊ करू शकत नाही कारण त्यांना कसलीच अपेक्षा नाही आणि कुणीही त्यांना आपल्याला हवे तेव्हा हवे ते करण्याची आज्ञाही देऊ शकत नाही कारण त्यांना कसली भीतीही नाही. तुम्हाला त्यांना पहायचे, ऐकायचेच असेल तर ते जिथे असतील तेथे जाऊन आणि ते जेंव्हा गातील तोपर्यंत संयमाने वाट पाहूनच ऐकायला लागेल...'

हरिदास फकीर - तानसेनांचे गुरु, यमुना किनारी रात्री तीनच्या सुमारास गातात, नाचतात असे समजल्यावर अकबर तानसेनासह यमुना किनारी लपून बसला. एका संगीततज्ञाला ऐकण्यासाठी अकबराच्या दर्जाच्या सम्राटाने रात्री-अपरात्री लपून-छपून बसण्याचे जगाच्या ज्ञात इतिहासातील हे एकमेव उदाहरण असावे.

अकबर आणि तानसेन रात्रीच्या थंडीत एका झोपडीच्या आडोशाला लपून बसले. जवळपास पूर्ण रात्र सरत आल्यावर, पहाटेच्या सुमारास अकबराच्या कानावर अशी एक धून पडली की त्याच्या डोळ्यातून पाणी झरू लागले. हरिदास फकीर देहभान विसरून तन्मयतेने गाऊ लागले, नाचू लागले आणि अकबराच्या शरीरावर त्याने पूर्वी कधीही अनुभवले नव्हते असे रोमांच उभे राहिले. 

सकाळी मंत्रमुग्ध, भारावलेल्या अवस्थेत अकबर महालापाशी परत आला तेव्हा तानसेनाला म्हणाला, 'मी आजवर समजत होतो की तू जगातला सर्वश्रेष्ठ संगीततज्ञ आहेस, तो माझा भ्रम आज मोडला. तू म्हणालास तसे खरोखरच तुझ्या गुरूंच्या समोर तू काहीच नाहीस. पण मला एक सांग, तू तुझ्या गुरूंसारखे का गाऊ, वाजवू शकत नाहीस...?'

तानसेन म्हणला, 'अगदी सोपी गोष्ट आहे महाराज, मी काही मिळावे म्हणून गातो तर माझे गुरु त्यांना काही मिळालेय म्हणून गातात. मला जे साध्य करायचे आहे त्यात माझा जीव अडकतो म्हणून मी प्राणपणाने गाऊ शकत नाही. मी स्वत:ला झोकून देऊ शकत नाही. मला जे मिळवायचे आहे ते अन्य मार्गाने मिळाले तर मी संगीत सोडून तो मार्ग पत्करेल कारण संगीत माझ्यासाठी काही मिळविण्याचे केवळ एक साधन आहे. त्यात प्राण फुंकणे मला जमणारच नाही. कारण पुढे काही मिळवायचे आहे म्हणून माझी साधनेची धडपड आहे. पण माझ्या गुरूंना काही मिळाले आहे, साध्य झाले आहे म्हणून ते देहभान हरपून, तल्लीन होऊन गातात, नाचतात. त्यांची उन्मनी अवस्था पूर्णत्वातून, वर्तमान क्षणातून आली आहे, कुठल्याही भूत-भविष्यातून नाही. म्हणून त्यांची सर मला येणे कालत्रयी शक्य नाही...' 

'...पण त्यांच्या या अवस्थेचे कारण काय, कशामुळे ते असे भरून वाहू शकतात...?'

'नदी का वाहते आहे? फुलं का उमलताहेत? सूर्य-चंद्र का तळपत आहेत? जीवनप्रवाह का चालू आहे? कारण सारी सृष्टी आतून जगते, उमलते, फुलते. फुलं फुलतात कारण फुलण्यात आनंद आहे, सूर्य उगवतो कारण उदयात आनंद आहे, पक्षी कूजन करतात कारण गाण्यात आनंद आहे, हवा वाहते, वृक्ष डोलतात, नदी वाहते, झरे खळखळतात... सगळीकडे आनंदी, उत्सवी वातावरण आहे. केवळ माणूसच दगडासारखा निर्जीव झालाय. त्याला हे समजत नाही आपले अस्तित्व हाच आनंदाचा ठेवा आहे, हाच जीवनोत्सव आहे आणि हीच जगण्याची उर्मी आहे... आत्ता, इथे, या क्षणी...!'

-----------------------------------------------------------------------     

हरिदासाची ही कथा आज आठवण्याचे कारण ठरलेली आरती प्रभूंची ही कविता... 

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा...


पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा... 

शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा... 

देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा... 

पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा... 

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात,
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा...


यातील घरदार टाकुनी दूर गावा जाणे म्हणजेच... लौकिकाचे स्तोम सोडून प्राप्त क्षणात उन्मनी अवस्थेला पोहचणे. ते साधले तरच विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडण्याची शक्यता... असे कवीच्या मनात असावे, असे मनाला वाटते!  

म्हणजे नक्की कसे हे सांगायचे तर, परवा कुठल्या एका टिपणासाठी काही संदर्भ शोधण्याचे रिकामे उद्योग करत असतांना, 'मोह मोह के धागे...' हाती लागले आणि, विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडणे म्हणजे काय याची प्रचिती तर आलीच पण त्या आधीच्या ओळींमधल्या तारा विजेच्या असाव्या असा जोरका झटका जोरसेच बसला जेव्हा वरुण ग्रोव्हरच्या मर्मग्राही शब्दांना आणि मोनाली ठाकूरच्या काळजात रुतणाऱ्या आवाजाला स्वरसाज, 'आग लगा दूंगा, आग लगा दूंगा...' वाल्या ज्वलनशील अन्नू मलिकने चढवलाय, हे समजले! अशा सटीसामाशी दिलेल्या मास्टरपीसमुळे या माणसाचे हजार गुन्हे माफ करावेच लागतात... 

मी म्हणतोय म्हणून नव्हे, स्वतः ऐकून ठरवा... 
'तू होगा जरा पागल तुने मुझको है चुना...' 
'के तेरी झूटी बातें मै सारी मान लुं...'
असले काळजात घुसणारे शब्द आणि तो मध्येच सनईचा पीस...
अरे देवा! डोळे मिटून ऐकले की होणारच अवस्था...
उन्मनी !

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०२३

द्वंद्व...!


आशा निराशेचा
खेळ जीवघेणा
द्वंद्व आणि बाणा
अविनाशी...

उजळाव्या नित्य
उषा आणि निशा
नव्या दाही दिशा
माझ्यासाठी...!

रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३

विवेकदीप...!

Life is a balance between holding on and letting go...! 
                                                                                                    – Rumi


जलपर्णीने आच्छादलेले पाणी अतिशय नेत्रसुखद वाटते. 

पाण्यावर हिरवागार गालिचा घालावा असे दृष्य मनाला गारवा देते. 
'किती ही निसर्गाची अद्भुत किमया...' असे ही मनास वाटू शकते. 
तथापि जलपर्णी कधीही शुद्ध, नितळ, वाहत्या पाण्यावर पोसली जात नाही. 
ती पोसली जाते पाण्यातील प्रदूषित घटकांवर.
त्यामुळे जलपर्णीचे अस्तित्व हे प्रदूषित पाण्याचे निदर्शक ठरते.
अर्थात जलपर्णी निळकंठासारखे पाण्यातील हलाहल पचवून घेते हेही खरे.
जलपर्णी दूषित पाण्याचे नैसर्गिक पद्धतीने शुद्धीकरण करते यातही तथ्यांश आहेच. 
परंतु जलपर्णीच्या अस्तित्वाने पाण्याचे मूळ प्रवाही, निवळशंख स्वरूप नष्ट होते. 
सूर्यकिरणे पाण्याच्या तळापर्यंत पोहचू शकत नाहीत. 
तेव्हा, 'जलपर्णी मारक की तारक' हा वाद आपण जलतज्ञ आणि पर्यावरणवाद्यांवर सोडून देऊ. 

पण अनिर्बंध 'विकासा'ने येणारी 'समृद्धी' ही या जलपर्णीसारखीच असल्याने तिचा विचार करायलाच हवा. पाणी प्रवाही, निर्मळ, नितळ आणि प्रदूषणमुक्त ठेवल्यास जलपर्णीला खाद्यच मिळणार नाही. कुठलाही सजीव खाद्याशिवाय जगणे, वाढणे शक्यच नसल्याने, शुद्ध पाण्यात जलपर्णी फोफावण्याची शक्यताच नाही... न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी !

विवेकशून्य विकास आणि अनैतिक समृद्धी यांचा लोभ आणि बडेजाव टाळता आला तर अशी दिखाऊ जलपर्णी उगवणारच नाही आणि मानवी संस्कृतीचा नितळ प्रवाह अखंड वाहता राहील.

म्हणूनच 'भावार्थदीपिके'च्या पंधराव्या अध्यायात माऊली म्हणतात...

सुर्ये आधिष्ठीली प्राची 
जगा जाणिव दे प्रकाशाची 
तैसी श्रोतया ज्ञानाची 
दिवाळी करी

मी अविवेकाची काजळी ।
फेडूनि विवेकदीप उजळी
ते योगिया पाहे दिवाळी
निरंतर

संपन्नता, समृद्धी, विकास आणि भरभराटीच्या दिवाळीत सद्विवेकाचा दीप उजळू दे 
हीच या तेजोत्सवी प्रार्थना आणि हाच या प्रकाशपर्वचा संदेश...! 

असतो मा सद्गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मा अमृतं गमय ।

शुभम भवतु !

रविवार, २९ ऑक्टोबर, २०२३

सु-बुद्ध...!


नको इर्षा नको दंभ
माणुसकीचा आरंभ
जपण्यास कालत्रयी
युद्ध नको बुद्ध हवा...

कहाण्या त्या उगाळती
संस्कृतीही डागाळती
जाते मानव्य जळूनी
रक्षिण्या संयम हवा... 

अत्याचार झाले फार
अघोरी सारा संहार
अनावर हे आघात
पुसण्या अ-शोक हवा...

जग धावे सैरावैरी
उतावीळ नरनारी
भुलूनी ज्या 'विकासा'स
त्यांसही विवेक हवा...

षडरिपूंचा विळखा
'अहं' वेळीच ओळखा
विखारी विकारी जग
माणूस सु-बुद्ध हवा...

युद्ध नको बुद्ध हवा...!

मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०२३

दश-हरा...!

 

कुठले सोने लुटायचे 
कुठली देवी पुजायची 
कसला उत्सव करायचा
कुठल्या सीमा उल्लंघायच्या...

याच्या सद्-विवेकाचा
दंभ-विकारावर  विजय...

हीच विजयादशमी... हाच दश-हरा...!

आत्मारामाने अहंकाराच्या विलयाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

शनिवार, १४ ऑक्टोबर, २०२३

बोध...!



जिंदा बाप कोई न पुजे,
मरे बाद पुजवाये |
मुठ्ठी भर चावल लेके,
कौवे को बाप बनाय ||

कांकर पाथर जोरि के,
मस्जिद लई चुनाय |
ता उपर मुल्ला बांग दे,
क्या बहरा हुआ खुदाय ||

मुंड मुड़या हरि मिलें,
सब कोई लेई मुड़ाय |
बार-बार के मुड़ते,
भेंड़ा न बैकुण्ठ जाय ||

जीवन में मरना भला,
जो मरि जानै कोय
|
मरना पहिले जो मरै,
अजय अमर सो होय ||

मैं जानूँ मन मरि गया,
मरि के हुआ भूत |
मूये पीछे उठि लगा,
ऐसा मेरा पूत ||

भक्त मरे क्या रोइये,
जो अपने घर जाय |
रोइये साकट बपुरे,
हाटों हाट बिकाय ||

जब लग आश शरीर की,
मिरतक हुआ न जाय |
काया माया मन तजै,
चौड़े रहा बजाय ||

- संत कबीर

रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

निरोप...!


'निघालास...?' 
'हो, थकलो. जातो आता.'
'बरंय, भेटू पुढल्या वर्षी!'
'प्रयत्न करतो, जमेलच असं नाही!'
'काय बोलतोस, 
तूच असं म्हणालास तर आम्ही अचकट-विचकट गाण्यांवर कुणापुढे नाचायचं...?'
'हा विचार त्यांनी करायचा ज्यांनी माझी अशी अवस्था केली!'
'त्यांनी म्हणजे कुणी, अशी म्हणजे कशी...?'
'किती प्रश्न विचारतोस, तुला भीती नाही वाटत?'
'वाटते ना म्हणून तर पार्थिवाला विचारतोय...!'
'तसा ऐकणार नाहीस तर तू...!'
'तू सांगून तर बघ...'

'त्यांनी म्हणजे ज्यांनी वि-सर्जनातल्या विवेक आणि विरक्ती ची विकृती केली...
त्यांनी म्हणजे ज्यांनी उत्सवातल्या उन्मेषला तिलांजली देऊन उन्मादाची सक्ती केली...
त्यांनी म्हणजे ज्यांनी सांस्कृतिक चळवळीला राजकीय शक्तिप्रदर्शनाचा आखाडा केला... 
त्यांनी म्हणजे ज्यांनी लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडला आणि भाविकांचे अंधभक्त केले... 
त्यांनी म्हणजे ज्यांनी देवाला सुपरहिरो, प्रार्थनेला फिल्मी केले आणि भक्तीचा इव्हेंट केला..
त्यांनी म्हणजे ज्यांनी अंधानुकरणाच्या बाळकडूने पिढ्या न् पिढ्या नासवल्या...
त्यांनी म्हणजे... जाऊ दे, तुला माझा हा विषाद सांगून काय उपयोग?
तू एक साधा सर्वसामान्य सहिष्णू संवेदनशील सपाट भारतीय... 
व्यवस्थेसाठी फक्त एक खर्चिक उपभोक्ता आणि मतिशून्य 'मत'...
तू त्यांचं काय करू शकणारेस?'

'देवा, मला असं अंडरएस्टीमेट करू नकोस, 
तू 'वेनस्डे' आणि 'सिर्फ एक बंदा काफी है' पाहिले नाहीस का रे?'
'हे कितीही फिल्मी वाटले तरी,
तुझ्या याच पॉझिटिव्ह थिंकिंग ने मला दरवर्षी पुन्हा येण्याची उमेद मिळते...!'
'मग, यायलाच लागेल तुला. 
दांभिक कितीही वाढले तरी तुला एकाही भाविकाला अंडरएस्टीमेट करून कसे चालेल...?'
'लब्बाड आहेस तू! जातो मी आता, राजवैद्यांना गाठायला हवं लवकर...'
'का रे? ऑल वेल...?'
'नथिंग सिरीयस रे, थोडे डोळे चुरचुरतायत आणि कानाला दडे बसल्यासारखं झालंय...!'
'तू पण ना देवा, 
उगाच सगळं डोळ्यात तेल घालून बघत बसतोस आणि कान देऊन ऐकतोस,
त्याचेच परिणाम आहेत हे...'
'हो का? मग तुझ्याकडे आहे का यावर काही उपाय...?'
'हो तर, आम्ही सगळे मर्त्य मानव झालो आहोत तसा हो की तूही...'
'कसा...?'
'बधीर...!'

रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

पोकळी...!


पोकळीने घेतली जागा स्वतःची
उत्सवाची सर्व गर्दी पांगल्यावर…

सन्मित्र शामने ‘मुसाफिर’ सदानंद बेंद्रे यांची ही अत्यंत दार्शनिक अल्पाक्षरी धाडली आणि तिच्या संपूर्णतेचा शोध घेतांना सापडले नचिकेत जोशींचे जागेच असलेले चांदणे.

अस्तित्वाच्या पूर्णतेच्या शोधात आपल्यापुरते आकलन झालेल्या जीवन-जाणिवा हेच अध्यात्म. कोहम् पासून सोहम् अर्थात अहं ब्रह्मास्मि पर्यंतचा प्रवास आणि नेति नेति ते इदं न मम याची प्रचिती हेच सामान्य संवेदनशील माणसाचे आत्मज्ञान. हे ज्ञान जेव्हा सभोवतालाची जाण आणि जगण्याचे भान देते तेव्हा त्या अनुभूतीची प्रचिती तथा अभिव्यक्ती भिन्न असली तरी त्यातील अंतस्थ सूत्र एकच असते याची जाणीव करून देणाऱ्या या गझल स्वरूपातील दोन रचना.

एक नचिकेत जोशी यांच्या ‘चांदणे जागेच आहे’ या त्यांच्या अलीकडे प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहातील...

एकटा आहे बरा मी, कोणत्या चर्चेत नाही
रात्र माझी, स्वप्न माझे झोप उसनी घेत नाही. 

मी तुझ्यावर प्रेम केले व्हायचे होऊन गेले
मी अशा क्षुल्लक चुकांना फार किंमत देत नाही. 

आखल्या रेषेत हल्ली बरसते आभाळ माझे
एकही वादळ आता त्याच्या सोबतीला येत नाही. 

आपुल्या नात्यास कोणी पाहिजे ते नाव द्यावे
ते तसेही कोरलेले या हातच्या रेषेत नाही. 

धूळ आहे, मळभ आहे, ही हवाही उष्ण आहे
उंच आकाशात उडण्याचा मनाशी बेत नाही. 

ताटवे फुलतात बाकी आजही बागेत माझ्या
फुल तू चुरगाळलेले आजही बागेत नाही. 

एक आहे विश्व माझे माणसांनी घेरलेले
फक्त मी सोडून का कुणी तुझ्या दुनियेत नाही. 

पालखी उठताच माझी दोन डोळे चिंब झाले
आणि विझण्याची तयारी माझी या राखेत नाही. 

वाहत्या गर्दीत माझा शोध घेणे व्यर्थ आहे
मुखवटे आहेत तेथे त्यात हा नचिकेत नाही.

आजची दुसरी गझल, आमचे सर्जक सन्मित्र डॉ. सचिन चिंगरे यांच्या 'एक नाजायज प्रिस्क्रिप्शन...' या मुक्तछंदातील प्रकटनाचे एक्स्टेंशन वाटणारी आणि भावगर्भिततेत नचिकेत जोशींच्या गझलेशी जुळी भासणारी पण केवळ आत्ममग्नतेत न रमता, डॉक्टरांच्या नेहमीच्या सर्वव्यापी आणि सर्वसाक्षी विचक्षण परिप्रेक्ष्यानुसार एकूणच मानव्यावर भाष्य करणारी...

इतके मिळवल्यावर कळते जगण्याला इतके लागत नाही
भरुन पावते तन बिचारे बुभुक्षा द्वाड मनाची भागत नाही.

लख्ख उजेडाची रात ही डोळ्यांनी उघड्या लोक झोपती
दिवस काळेकुट्ट तरी कुणी मिटून डोळेही जागत नाही.

कुठून शिकला मानव नकळे सराईत रोबोटता चलाख ही
राहिला ना मित्र मित्रासम शत्रूही शत्रूसम वागत नाही.

बेल वाजते उघडतो दरवाजा तितकेच सवयीचे खुले अल्पस्मित
पांढरपेशा शहरी नशिबी कडकडून गळाभेटीचे स्वागत नाही.

मुकाट मरतो रोज जितेपणी लोकतांत्रिक मरण मतदाता राजा
धनुष्य मोडले तोफा विझल्या आग कुणीच डागत नाही.

हवे लबाडांना रुपये चैनीला हा याचनेचाही धंदा झाला
व्रतस्थ माधुकरी, पोटार्थी भिक्षा कुणी मागत नाही.

या दोन्ही रचना एकत्र सादर करण्यामागे तुलना अथवा स्पर्धेचा भाव नसून रविवारच्या काव्यमैफिलीचा नमुना पेश करण्याचा मानस आहे. शिवाय ‘मुसाफिर’सह तीनही कविवर्यांची आणि अर्थात शामचीही अनुमती गृहीत धरलेली आहे, कुणाचीही याविषयी हरकत नसेल ही अपेक्षा !

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३

वरदान...!



जवळपास १५ वर्षांपासून ही खंत व्हायरल होते आहे. दर वर्षी गणेश चतुर्थीला तर तिची हमखास आठवण येते. 'इत्यादी'वरच ही वेदना आजपर्यंत दोनदा प्रकटलीय, आज तिची ही तिसरी वेळ. याची कारण दोन - 

एक म्हणजे, दिवसेंदिवस समाजाच्या भौतिकतेत भौमितिक प्रमाणात वाढणाऱ्या रुची आणि वृद्धीने या देव आणि भक्ताच्या काल्पनिक संवादातील समर्पकता वाढून या अभिव्यक्तीतील विषाद अधिकच गहिरा होत चाललाय. 

दुसरे असे की, काव्यशास्त्र तथा पद्याच्या यमनियमात चपखल बसणारी ही काव्यरचना नसली तरी तिचा आशय-विषय आणि भाव-भान हे थेट काळजाला भिडणारे असल्याने त्याची 'प्रेरित' अथवा 'संपादित' आवृत्ती बनविण्याची गरज नाही.

तेंव्हा, या रचनेच्या अज्ञात कर्त्याला पुन्हा एकदा शतश: नमन करून आणि माऊलींच्या 'जो जे वांच्छिल तो ते लाहो, प्राणिजात' या पसायदानास स्मरून, त्याने देवाकडे मागितलेले वरदान सकळ मानव जातीस लाभो ही बाप्पाचरणी प्रार्थना ! 

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
'दोन क्षण दम खातो' म्हणून माझ्या घरी टेकला
'उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला'
मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला…

तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस?
मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस?
मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक…

'इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो
काय करू आता सार मॅनेज होत नाही
पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाही

इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सिस्टीम झालीये हॅंग
तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग
चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात'

माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन
मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन
एम बी एचे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे?
डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस का रे?

असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेउन टाक
तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक
म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको
परत येउन मला दमलो म्हणायला नको

माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्प झाला खुश
'माग' म्हणाला 'हवं ते एक वर देतो बक्षिस
सी ई ओ ची पोझिशन, टाऊनहाऊस ची ओनरशिप
ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप'

मी हसलो उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं?

'पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं'
'सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं'
'हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव'
'प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव'

'देशील आणून परत माझी हरवलेली नाती'
'नेशील मला परत जिथे आहे माझी माती'
'इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं'
'आईबापाचं कधीही न फ़िटणारं देणं'

'कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर'
'भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार'
'य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान'
'देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान?'

"तथास्तु" म्हणाला नाही सोंडेमागून नुसता हसला,
सारं हाताबाहेर गेलंय पोरा… "सुखी रहा" म्हणाला !

या रचनेचा रचयिता जसा आजवर अज्ञात आहे तद्वत सदर रचना निनावी असल्याने, हत्ती आणि आंधळ्यांच्या गोष्टीनुसार ज्याला जो बोध झाला किंवा जो भाव भावला तसे नामकरण या रचनेच्या नशिबी आहे. माझे गेल्यावेळचे आकलन हे 'दहा दिवसाच्या खातिरदारीनंतर भक्त बाप्पाची त्याच्या संदेशासह बोळवण करतात म्हणून बाप्पाने नुसत्या आशिर्वादावर भक्ताची बोळवण केली...' असे असल्याने तेव्हा मी 'बोळवण' असे बारसे केले होते तथा आज मला यातील आशेची उमेद अधिक भावल्याने आजचे या रचनेचे नाव आहे... 'वरदान...!' 

काव्यरसिकांना, याच संदर्भातली माझी 'ऐकतोयस ना...?' ही एका फोटोवरून सुचलेली रचना इथे वाचता येईल.

शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३

आशा...!


"गुलजार, आरडी आणि आशाताई या त्रिवेणी संगमाच्या स्निग्ध प्रवाहात जे मोती वेचले त्यातील ‘मेरा कुछ सामान...’ हा शीर्षस्थ शुभ्र मौक्तिक. याच्या तोडीचे पुन्हा कधी आयुष्यात मिळेल, गवसेल, लाभेल असे काही वाटले नव्हते. पण या आमच्या गोताखोर स्नेह्यांनी पुन्हा एकदा कलासागरात डुबकी मारून काढले काय तर हे अमृत... “तुमुल कोलाहल कलह में मैं ह्रदय की बात रे मन...” आता याबद्दल या माणसाचे आभार कसे मानावे...?"

एप्रिल २०१९ मध्ये लिहिलेल्या या 'कोलाहल' पोस्टचा विषय बोजड, तत्वचिंतनात्मक धाटणीचा असला तरी त्याला सुभग, सुनीत आणि सुश्राव्य करणारा मोहक स्वर काल ९० वर्षांचा झाला. लतादीदींचा स्वर अलौकिक, दैवी तथा असामान्य होता हे निर्विवाद पण आशाताईंनीच एका मुलाखतीत साभिनय (मिमिक्री हा आशाताईंचा आणखी एक कलागुण ज्यास म्हणावा तसा वाव मिळाला नाही) सांगितले तसे, लतादीदींचा स्वर हा देवघरातल्या समईसारखा सात्विक, स्निग्ध आणि सालस होता त्याला, 'दम मारो दम...' चा ठसका जसा झेपला नसता तशी 'रात अकेली है...' मधले उन्मादक आव्हानही पेलवले नसते आणि 'मेरा कुछ सामान...' च्या मुक्तछंदातला छांदिष्टपणाही मानवला नसता. या सगळ्यांना अक्षरश: पुरून उरणारा एकमेव आवाज म्हणजे आशा भोसले !

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही कदाचित गायन प्रकारात एकमेव असलेल्या या गांधर्वकन्येने सुमारे २० भाषांमध्ये ११,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केल्याची नोंद २०११ सालातील आहे. पुढील १२ वर्षात त्यात अजून किती भाषा आणि गाणी यांची भर पडली असेल हे एक तो मंगेशीच जाणे ! आजही स्टेजशो करण्याची उर्मी, ऊर्जा आणि उत्साह असलेल्या या चमत्काराचे नाव 'आशा' शिवाय निराळे काय असू शकले असते...! 

थेट सचिनदा, ओ पी नय्यर, खैय्याम पासून पंचम, इलायाराजा, ए आर रहमान पर्यंत अशी दिग्गज संगीतकारांची आणि, 'पिया तू अब तो आ जा...' अशा उन्मादक पासून 'इन आँखोंकी मस्ती...' अशा आव्हानात्मक, ते मराठीतील, 'जिवलगा राहिले दूर घर माझे...' अशा आर्ततेची रेंज पदरी बाळगणारी आणि तेवढ्याच डौलाने मिरवणारी आशा काल नव्वदीची झाली असे तिला बघून कुणालाही पटणार नाही ! म्हणूनच विंदांच्या शब्दात थोडा बदल करून सांगायचे तर,

'आशा'त आजच्या ही गाणे असे उद्याचे,
स्वप्न चिरंतनाचे इतकेच जाणतो मी...!'

बाय द वे, उडत्या, फिल्मी गितांशिवाय क्लासिकल अर्थात शास्त्रीय प्रकारात आशाने फार काही केले नाही असे मानणारे वेळ काढून वरील अल्बममधील चीजा जरूर ऐकतील ही...आशा !

आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृङ्खला । 
यया बद्धा: प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङ्गुवत् ॥

सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

बोझा...!

नसरुद्दीन जंगल में लकड़ी काटने गया था।

दिन के अंत में, उसने लकड़ियों का बंडल बनाया, लेकिन गट्ठर को गधे पर रखने के बजाय, उसने बंडल को अपने सिर पर रख लिया। फिर वह गधे पर चढ़ गया और शहर में चला गया।

“नसरुद्दीन!” उसका एक दोस्त चिल्लाया। “तुम लकड़ी का गट्ठर अपने सिर पर क्यों ले जा रहे हो? क्या इससे दर्द नहीं होता?”

"इससे दुख होता है," नसरुद्दीन ने स्वीकार किया, "लेकिन मैं भार साझा करने में मदद करना चाहता था।"

“मुझे अभी भी समझ नहीं आया,” नसरुद्दीन के दोस्त ने हैरान होकर कहा।

“गधा मुझे ले जा रहा है,” नसरुद्दीन ने समझाया, “लेकिन मैं लकड़ी ढो रहा हूँ।”

----------------------------------------------------------

“इस कहानी के सभी पात्र और घटनाए काल्पनिक है, इसका किसी भी व्यक्ति या घटना से कोई संबंध नहीं है। यदि किसी व्यक्ति या प्राणी से इसकी समानता होती है, तो उसे मात्र एक संयोग कहा जाएगा।”

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

रानकवी... गानकवी !


आम्ही शाळेत असतांना एकमेव करमणुकीचे साधन म्हणजे रेडिओ. या उपकरणाला कारण माहित नसतांना उगाचच ट्रान्सिस्टर म्हणण्याचीही फॅशन त्या काळी होती. समस्त जगात काय चाललेय हे सांगणाऱ्या बातम्यांपासून चित्रपट गीते, भावगीते, आणि 'नभोनाट्य' असे भारदस्त नाव धारण करणारे श्रवणीय नाटक असे मनोरंजनपर कार्यक्रम यातूनच आमचे सामाजिक भान, सांस्कृतिक जडणघडण आणि वैश्विक आकलन यांचे संवर्धन होत असे. आजच्या 'चाट जीपीटी' तंत्रज्ञानाच्या आवाक्याने च्याट्म चाट पडण्याच्या जमान्यात आमची वाढ खुजी वाटत असली तरी ती निकोप होती आणि आमच्या नेमस्त 
आयुष्याला पुरली देखील !

तर या आकाशवाणीवर मराठी गीतांच्या कार्यक्रमात अनेकदा लागणारे एक ठेकेबाज गाणे आम्हाला फार आवडायचे, ते म्हणजे - 'जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी..!' यातील शब्दांचा ग्रामीण बाज, दोन्ही गायकांनी लावलेला सूर आणि घोळवलेले स्वर, त्याला अधिकच परिणामकारक करणारी पारंपरिक वाद्यांची साथ आणि एकूणच श्राव्यानुभव अधिकच समृद्ध करणारा अफलातून कोरस... या साऱ्याची संस्कारक्षम 'मना'स भूल पडली नसती तरच नवल. हे 'मना'वर गारुड करणारे गीत कुणी लिहिले आहे याची बालसुलभ कुतुहूलाने चौकशी करता आमच्या अबोध साहित्यिक जाणिवेत भर पडली एका नावाची - ना. धों. महानोर ! ही आमची आणि त्यांची पहिली ओळख. पण ती गाण्याच्या माध्यमातून झाल्याने आमच्यासाठी त्यांची पहिली ओळख 'गानकवी' !

ग्रामीण जीवनाबद्दलचे आमचे निमशहरी भान हे शेती, बैलजोडी आणि बैलगाडी यापुरते मर्यादित असल्याने आणि ग्रामीण कवितेचा आमचा पैस विठ्ठल वाघांच्या, 'काळ्या मातीत मातीत...' याच्या पलीकडे पोहचत नसल्याने, शंकर पाटलांची खरीखुरी ग्रामीण कथा जशी आम्हाला उशीराने भेटली, तसेच रानवाटा दाखविणारे ना. धो. हे 'रानकवी' आहेत ही यथावकाश झालेली बोधी !

'जैत ते जैत' हा अनेक कारणांसाठी कायमच आमचा आवडता राहिलेल्या चित्रपटातील गेय गीते, बोल गाणी ही याच रानकवींनी लिहिली आहेत एवढी शिदोरी त्यांच्याशी नाळ जुळायला पुरेशी होती. पुढे आम्ही 'किशोर' वयातून 'कुमार' वयात आलो तसे, 'गोऱ्या देहावरती कांती...', 'नभं उतरू आलं...', 'घन ओथंबून येति...', 'चिंब पावसानं रान झालं आबादानी...' पासून थेट, 'भर तारुण्याचा मळा', 'राजसा जवळी जरा बसा...' अशा बैठकीच्या लावण्यांपर्यंत गानकवी आमचे दैवत झाले नसते तरच नवल !

पण याही साऱ्या, आकाशातली नक्षत्र खिशात घेऊन फिरण्याच्या मोरपंखी काळात, विंदा, कुसुमाग्रज, बाकीबाब यांच्यासह  कबीर, रुमी, गालिब आम्हाला भुरळ घालत असतांना आमच्या अलवार 'मना'वर फुंकर घालायला आला डॉ. जब्बार पटेलांचा 'मुक्ता' ! 'जैत रे जैत' नंतर तब्बल १६ वर्षांनी या अत्यंत क्रिएटिव्ह जोडगोळीने पुन्हा एकदा रानकवितांची मेजवानी दिली. मुक्ता मध्ये सोनाली, अविनाश, विक्रम गोखले यांच्या अभिनयाच्या तोडीचे किंबहुना अधीकच भुरळ घालणारे काही असेल तर ती सगळी गीते आणि मधून मधून सुकामेव्यासारख्या पेरलेल्या कविता. जयश्री शिवराम यांच्या अत्यंत वेगळ्याच धाटणीच्या करकरीत आवाजाने सजलेल्या 'जाई जुईचा गंध मातीला...' या गीताच्या सुरवातीचे आलाप कधीही केव्हाही कानावर पडले तर अंगावर सरसरून काटा येतो. यात आवाजाची जादू आहे हे नि:संशय पण मुळात ते शब्द तेवढे काळजाचे ठाव घेणारे नसते तर हा परिणाम साधलाच असता असे नाही. बघा कसे आहेत ते शब्द...


एकेका शब्दात आणि रूपकात एवढी ताकद आहे की याला कविकल्पना म्हणावे की सकल मानवी जीवनाचा 'नैसर्गिक' साक्षात्कारी दृष्टांत, असा प्रश्न पडावा. आणि हे झाले फक्त प्रसिद्धी पावलेल्या गीतांबद्दल. महानोरांच्या साऱ्याच काव्याविष्काराचा समग्र धांडोळा घ्यायचा तर ही जागा अपुरी पडायची आणि असे धाडस करू म्हणणाऱ्या पामराच्या मर्यादित व्यासंगाचे पितळ उघडे पडायचे. 

काल ना. धों. महानोर नावाच्या रानकवीने अखेरचा श्वास घेतला, आपल्या अवीट गोडीच्या अफाट रानमेव्याचे असीम भांडार मागे ठेऊन. ज्याच्या प्रत्येक उद्गारात निसर्ग आणि विशेषतः पाऊस कायम ओसंडून वाहत राहिला त्याला देहातून मुक्त करण्यासाठी निसर्गाने चिंब पावसाळी वेळच निवडावी याला नियती म्हणावे की निसर्गाची काव्यत्मकता...?

आमच्यासाठी गानकवी असलेल्या या कविश्रेष्ठास आम्हांला प्राणप्रिय असलेल्या 'मुक्ता'मधील त्यांच्या एका नितांत सुंदर आणि अत्यंत रोमांचक पावसाळी कवितेची शब्दांजली...

मन चिंब पावसाळी, झाडांत रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले

पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी
शिडकाव संथ येता झाडें निळी कुसुंबी

घरट्यात पंख मिटले झाडांत गर्द वारा
गात्रांत कापणारा ओला फिका पिसारा

या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे

रानात एककल्ली सुनसान सांजवेळी
डोळ्यांत गल्बतांच्या मनमोर रम्य गावी

केसांत मोकळ्या त्या वेटाळुनी फुलांना
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे

मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यांत गुंतलेले.

मंगळवार, २५ जुलै, २०२३

शिरिषासन...!

बरोब्बर ५ वर्षांपूर्वी ६ जून २०१८ ला शिरीष कणेकर सरांना याच ठिकाणी त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त शतायुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या, त्यांच्याबद्दल इतक्या लवकर असं काही लिहावं लागेल असं दु:स्वप्नातही वाटलं नव्हतं. अर्थात कालाय तस्मै नमः म्हणून साऱ्याच गोष्टी पचवाव्याच लागतात. अलीकडेच लिहिले तसे, घेतलेला श्वास सुद्धा धरून ठेवता येत नाही, आवडत्या गोष्टीही त्यागाव्या लागतात, एवढेच काय, प्राणपणाने जपलेल्या आणि साऱ्यांचा रोष पत्करून घट्ट धरून ठेवलेल्या तत्त्वांना देखील मुरड घालावी लागते तर आवडती माणसं कशी धरून ठेवता येणार...?

ज्या माणसांनी आपलं आयुष्य केवळ सुसह्यच नाही तर समृद्ध केलं आणि आपल्या नेहमीच्या 'पाणक्या'च्या जगण्याला काही क्षण का होईना 'चाणक्या'च्या अविर्भावाची झळाळी दिली त्यांच्या जाण्याचा त्रास होणे स्वाभाविक असले तरी, त्यांनी आपल्या आयुष्यात येऊन अजरामर करून ठेवलेल्या क्षणांचे आणि केव्हाही त्यांच्या सहवासाचा लाभ घेता येईल अशा शब्दरूपी खजिन्याचे सान्निध्य-सौख्य नाकारून कसे चालेल?

कणेकर सरांबद्दल लिहिण्यासारखे अजूनही खुप काही असले तरी, त्यांच्या एकूणच मिश्किल, खोडसाळ, 'लगाव बत्ती' म्हणत 'चहाटळकी' करणाऱ्या लिखाणात त्यांनी कधीतरी असे जे गंभीर, आत्मचिंतनपर लिहिले ते 'मना'ला जास्तच भिडले. आता ते 'ये हृदयीचे ते हृदयी...' या तादाम्यामुळे की त्यातील 'करुणे'च्या स्पर्शाने ते सांगता नाही येणार! 

'डॉ. कणेकरांचा मुलगा'मध्ये त्यांनी आठवण सांगितली की त्यांचे वडील त्यांना म्हणायचे, 'मिस्टर शिरिष, एवढं लिहिता तुम्ही, पण वाचतं का कुणी?' याच आत्मकथनात त्यांनी लिहून ठेवलयं - 'डॉ. कणेकरांचा मुलगा एवढीच माझी आयुष्यभर ओळख राहिली आणि एवढी ओळख मला एका आयुष्याला पुरली देखील...!' 

आयुष्यात भेटलेल्या माणसांबद्दल, मित्रांबद्दल ते लिहितात, ‘देवानं नामी नग जन्माला घातलेत. मला त्यांचा आणि त्यांना माझा सहवास घडवून देवानं आमच्यावर अनंत उपकार केलेत. आम्ही सगळे मिळून जगात धुमाकूळ घालीत असू. देवाच्या सर्कशीतले आम्ही विदूषक आहोत. आम्ही हसवतो. आम्हांला हसतात. आम्ही अश्रूंना पापण्यांवर रोखून धरतो. घुसखोरी करू देत नाही. आम्हांला इरसाल म्हणा, वाह्यात म्हणा, नग म्हणा... आयुष्याचं ओझं वाहण्यासाठी असे साथीदार हवेत.’      

आणि शेवटी, जिवंतपणी आपल्या मृत्युलेखाची कल्पना करणारा हा अवलिया लिहून ठेवतो...

"माझा एपिटाफ लिहायचा झालाच तर लिहा की प्रत्यक्ष मरण येण्यापूर्वी हा माणूस खुप आधीच मेला होता, फक्त ही गोष्ट त्याने जगापासून लपवून ठेवली..."  

शिरीष कणेकरांना श्रद्धांजली वैगरे लिहिणे फारच अवघड वाटते तेंव्हा, '...तुझिया जातीचा मिळो आम्हां कुणी...' आणि 'तुमचा वसा आम्हां मिळो, सांभाळता येवो...' या प्रार्थनेपलीकडे फार काही लिहवत नाही...

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावकः। 
न चैनं क्लेदयन्त्यापो 
न शोषयति मारुतः।I

शिरीष कणेकर सरांबद्दल आंतरजालावरील काही दुवे :  

https://www.saamana.com/author-journalist-shirish-kanekar-80th-birthday-on-6-june/
https://eetyadee.blogspot.com/2018/06/102-not-out.html
https://www.esakal.com/saptarang/atul-parchure-write-article-saptarang-121107
https://prahaar.in/the-name-shirish-kanekar-is-enough/
https://www.esakal.com/saptarang/miliind-ghangrekar-wrtie-article-saptarang-121095
https://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118327.html?1161380086
http://shireeshkanekar.blogspot.com/
https://en.wikipedia.org/wiki/Shirish_Kanekar

गुरुवार, २० जुलै, २०२३

'सुशि'...!




११ जुलै ला 'सुशि'ला जाऊन २० वर्षे झाली. 

काल 'दुनियादारी' या संजय जाधव यांच्या मराठी चित्रपटाला १० वर्षे झाली. 

'वाढत्या' वयामुळे काळ फारच भरभर सरकतो आणि 'रात ढल जाये पर दिन ना जाये...' अशी परतवारीची प्रचिती प्रबळ होत राहते. अगदी कालच लिहिल्यासारखी वाटणारी 'दुनियादारी' ही पोस्ट आज दहा वर्षांची झाली. ही पोस्ट लिहिण्याचे निमित्त ठरलेल्या दिपक दादा आणि, आज याची आठवण करून देऊन 'इगो-वाईज'वरील या पोस्टचा दुवा 'इत्यादी'वर देण्याचे निमित्त ठरलेले सहकारी डॉ. नितीन जाधव, यांचे 'मना'पासून आभार ! 

खरं तर सुशिच्या 'समांतर'वर वेबसेरीज बनविण्याचा सतीश राजवाडेंचा धाडसी प्रयोग कसा 'सम अंतर'च राहिला आणि प्रेक्षकांशी सोडा, कथेशीही तादात्म्य कसा पावू शकला नाही या वरही एक पोस्ट लिखना बनता है. पण असे प्रयोग, ज्यांना 'सुशि' नावाचे गारुड काय आहे याची कल्पनाही नाही त्यांना 'सुशि'ची निदान तोंडओळख होण्यासाठी 'निमित्तमात्र' ठरतेय म्हणतांना अशा धाडशांचे (खलाशांच्या धर्तीवर) स्वागतच करायला हवे.  

समग्र 'सुशि' समजणे येरागबाळ्याचे काम नोहे आणि ते 'जाता... येता' इतके सहजसाध्यही नव्हे, नुसतीच 'लटकंती' व्हायची ! तरी 'सुशि'च्या रेंजची साधारण 'झलक' मिळण्यासाठी वाचायची पुस्तके:
१. दुनियादारी (उपरोल्लेखित चित्रपट पाहणे हा पर्याय नाही!)
२. समांतर (पहा: वरील सूचना, वेब सिरीज नव्हे!)
३. तलखी 
४. कल्पांत 
५. लटकंती 
६. दास्तान
७. वास्तविक       

'सुशि'ला लौकिकार्थाने ऐहिक जगातून जाऊन २० वर्षे झाली असली तरी त्याचे निकट सान्निध्य जाणवून देतो तो त्याने मागे ठेवलेला 'खजिना'. मनावर 'क्रमशः' 'बरसात चांदण्याची' करीत 'क्षण क्षण आयुष्या'तले 'मूड्स' आणि 'शेड्स' सांभाळीत 'असीम' 'अंमल' करणाऱ्या आणि कठीणातल्या कठीण प्रसंगीही 'हाSत तिच्या' 'एवरीथिंग... सोSसिम्पल' वाटेल असा 'माहौल' बनविणाऱ्या 'उस्ताद' सुशि नावाच्या 'मानवाय तस्मे नमः' असाच भाव 'सुशि'च्या चाहत्यांच्या 'मना'त 'कणा कणाने' फुलत राहतो...

किशोरदा, अमिताभ पासून नवाज, सचिन पर्यंत, जे 'आपले' वाटतात त्यांचाबद्दलच्या स्नेहादरात कुठेही कसर न करताही ज्यांचा, मानभावी आदरपूर्वक उल्लेख टाळून, सहजभावाने एकेरी उल्लेख होतो त्या यादीत 'सुशि'चे स्थान केवळ उच्चच नाही तर अढळ ! 'आदरणीय सुहास शिरवळकर' असे म्हणणे म्हणजे, बायकोला 'हर हायनेस' किंवा 'माय लॉर्ड' संबोधीत वेडावून दाखविल्यासारखे कर्णकटू वाटते. किशोर जसा आपला, सचिन जसा आपला तसा 'सुशि'ही आपलाच. या लोकांचे आपल्या मनातील स्थान आणि वय दोन्ही अबाधीत, जणू गोठवून (आणि साठवूनही) ठेवलेले... कालजयी !

तेंव्हा 'सुशि'चा मुलगा असला तरी श्री. सम्राट सुहास शिरवळकर यांचा नुकताच झालेला परिचय हा त्यांना थेट अरेतुरे करण्याइतपत मुरलेला नसल्याने तिथे संस्कार आडवे येतात. यांवर खुद्द 'सुशि' काय म्हणाला असता यावरचे कट्टामंथन उद्बोधक ठरावे. तेही 'सुशिप्रेमेच्छा बलीयसी...!' या लघुसूक्तानुसार लवकरच घडेल ही अपेक्षा !

सुशिच्या संपूर्ण लेखनसूचीसाठी हा ब्लॉग पहा:
http://suhasshirvalkar.blogspot.com/

रविवार, ९ जुलै, २०२३

चातक...?


इष्क-विष्क, दिल-मोहोब्बत, प्यार-व्यार आणि ह्रदय पिळवटणारी वेदना यांच्या खालोखाल (किंवा बरोबरीने), 'पाऊस' हा संवेदनशील कविमनांचा कदाचित सर्वात लाडका विषय असावा. शिवाय या भावनांचा ओलावा रसिकाच्या थेट काळजाला भिडण्यासाठी पावसाचा जो मुक्तहस्ते वापर होतो, तो जमेस धरता, काव्यप्रेरणेच्या विषयात पावसाने पहिला नंबर काढायला हरकत नसावी. सन्माननीय, प्रथितयश कवीश्रेष्ठांपासून, प्रत्येक पहिल्या पावसात कावळ्याच्या छत्री टाईप उगवणाऱ्या, 'कवी काय म्हणतो...' अशा अविर्भावाच्या हौशी कवींपर्यंत, पावसाला विषयवस्तू बनविण्याचा मोह कुणालाही टाळता आलेला नाही. या साऱ्या कवितांची नोंद घ्यायची म्हटली तर खंड-काव्य-सूची करायला लागेल आणि त्या प्रबंधासाठी ही जागा आणि व्यासंग दोन्ही अपुरे पडतील.

अलीकडे साऱ्याच गोष्टी बेभरवशाच्या, अनियमित आणि तऱ्हेवाईक झाल्या असल्याने पावसालाही त्याची लागण झाल्यास नवल नाही. 'नेमेचि येतो मग पावसाळा...' हे 'सृष्टीचे कौतुक' आता केवळ छापील ओळीतूनच शिल्लक असल्याने आणि 'बाळा'ने आपले वेगळ्याच विषयातील कुतूहल शमविण्यासाठी भलत्याच मार्गांची निवड केली असल्याने त्याला कसलेच कौतुक वाटणे कधीच बंद झाले आहे. त्याला आता फक्त 'वॉव मोमेंटचे क्रेव्हिंग' असते, यु नो !

अशा परिस्थितीत, कितीही पारंपरिक, संस्कृतीजन्य आणि 'अभिजात' असले तरी, 'ये रे ये रे पावसा...' ला रिटायर होण्याशिवाय पर्याय नाही. पण त्यामुळे पोकळी वैगरे तयार होण्याचे कारण नाही, आजच्या अत्याधुनिक जीवनशैलीत, लोकल-मेट्रो-बस पासून मंदिर-शाळा-हॉटेल साऱ्या ठिकाणी पुढच्याला हुसकावून आपला नंबर लावण्याची इतकी 'चढा'-'ओढ' आहे की शहरात कुठेही ब्रिथिंग स्पेसही शिल्लक नाही याचा प्रत्यय पदोपदी येतो. बऱ्याच अर्बनाईट्सना तर पाऊस ही अनावश्यक कटकट वाटते, बघा: सौमित्रची कविता - 'त्याला पाऊस आवडत नाही...'

तर मुद्दा असा की प्रत्येक पावसाळ्यात पाऊस या विषयावर कवितांचा अक्षरश: पाऊस पडतो पण सगळ्याच कविता 'मना'ला भिडतात, पापणी भिजवतात किंवा हृदय ओलावतात असे नाही. सवडीने निवड करू म्हटलं तर ऋतू बदलून गुलाबी थंडीच्या कवितांचा सिझन उगवायचा ! पण सन्मित्र प्रसादने पाठविलेल्या या कवितेने काही घाव ताजे केले आणि बऱ्याच जुन्या जखमा नव्याने भळभळू लागल्या. 'गेले ते दिन गेले...' ची आर्त जाणीव अधिक गहिरी करणाऱ्या आणि दाहक वर्तमानाच्या वास्तव चित्रणाबरोबर, भविष्यातील धोक्यांचे सूचन करणारी ही कविता.

अत्यंत बारकाईने शोध घेऊनही, सदर कवितेमागील भावना आणि तिचे प्रत्ययकारी सृजन करणाऱ्या दार्शनिक कविमनाचा थांगपत्ता लागू शकलेला नाही. एक अगदीच क्षीण दुवा सापडला तो फेसबुकावर Unofficial: Poetry या पेजवर पण तिथेही विश्वासार्ह, सप्रमाण नामोल्लेख आढळत नाही. प्रत्येक कलाकाराला त्याच्या कलाकृतीच्या श्रेयसौजन्याचं भाग्य लाभतच असं नाही आणि त्यामुळे त्या कलाकृतीच्या रसास्वादनात काही उणीव राहते असंही नाही, पण त्या काव्यानुभवात चिंब झाल्यावर मनाच्या तळाशी राहते ती, ...मऊ पिसांच्या सात थरांच्या गादीवर झोपतांना, त्याच्या तळाशी असलेला इवलासा मोती टोचणाऱ्या राजकन्येच्या टोचणीसारखी... त्या अदृश्य निर्मात्याला जाणून घेण्याची हुरहूर ! 

काही समजले तर जरूर कळवा, चातकाप्रमाणे वाट पाहतोय...! 

पाऊस

चोचीने कोरले नखांनी ऊकरले
तरी जमिनीत झरा लागत असे,
व्याकुळलेल्या जिवांची पूर्वी
सहज तहान भागत असे !

'येरे येरे...' म्हणताच
पाऊस येत असे मोठा,
त्यालाही ठाऊक असे
पैसा आहे खोटा !

पैसा खोटा होता तरी
माणूस मात्र खरा होता,
प्रत्येकाच्या काळजात
जिव्हाळ्याचा झरा होता !

'ये गं ...ये गं' म्हणताच
सर यायची धावून,
चिमुकल्यांच्या मडक्याला
तीही न्यायची वाहून !

एकदा पाऊस आला की
मुक्कामी राहत असे,
निघून जा म्हटलं तरी;
मुद्दाम जात नसे !

हल्ली 'येरे येरे...' म्हटलं तरी
पाऊस साद देत नाही,
ख-या पैशालाही
मुळीच दाद देत नाही !

कत्तल केली जंगलांची
पशू-पक्षी राहिले नाही,
जमिनीला भोसकताना
मागेपुढे पाहिले नाही !

हौद हरवले गुरांचे
पाणपोई दिसत नाही,
बाजार मांडलाय पाण्याचा
ह्यावर विश्वास बसत नाही !

कॅन, बाॅटल, टँकर आले
मडके केंव्हाच फुटले,
कशी येणार सर धावून
नाते आपुलकीचे तुटले !

कुठे राहिली ओढ्याला
सांग बरं ओढ ?
कितीही प्रगती केली विज्ञानाने
पाऊस होतो का डाऊनलोड ?

तुझ्या स्वार्थासाठी
पाऊस येईल तरी कशाला ?
तुझ्यामुळेच कोरड पडली
नदी-विहिरीच्या घशाला !

तूच भोग तुझी फळे
फेड तुझे तूच पातक,
बघ कसा शाप देतोय
तहानलेला चातक !

- अनामिक