मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

मानवांनो आंत या रे !

आज महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विंदांची ही विश्वाचे आर्त मांडणारी कविता...

मानवांनो आंत या रे !


पर्वतांनो दूर व्हा रे ! सागरांनो दूर व्हा रे !
उघडिलें मी दार माझें; मानवांनो आंत या रे.

वादळांची काय भीती?
तींच माझें गीत गाती;
वादळांना जन्म देती श्वास माझें पेटणारे.

भूक माझी वाढलेली;
प्राण माझा वाढलेला;
वाढलेलें पंख माझें या नभीं ना मावणारे.

कालसर्पाला अतां मी
जिंकिलें जावूनी व्योमीं !
वीज ही रे चोंच माझी, मेघ हे माझी पिसें रे.

आज माझा देह साधी
विश्वऐक्याची समाधी;
कोंडले जातील आतां मानवा या कोंडणारे.

दुर्बलांना, दु:खितांना,
शापितांना, शोषितांना
आज क्षितिजाच्या करांनी देत मी आलिंगना रे.

पर्वतांनो दूर व्हा रे ! सागरांनो दूर व्हा रे !
उघडिलें मी दार माझें; मानवांनो आंत या रे.

आसुड...!


नीतीविना तत्व गेले,
तत्वाविना विवेक गेला,
विवेकाविना विचार गेला,
विचाराविना विकार वाढले,
विकारांनी सत्ता भ्रष्टली,
‘लोक’ खचले ‘शाही’ राहिली;


परचक्र गेले गुलामी राहिली!

‘शेतकऱ्याचा आसुड’ आणि ‘गुलामगिरी’कर्त्या महात्म्याची क्षमा मागून;
त्याच्या युगप्रवर्तक स्मृतीस सादर समर्पित...

सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

विंदा जन्मशताब्दी...!

२४ ऑगस्ट २०१७ रोजी विंदांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरु केलेला ‘रोज एक कविता...’ उपक्रम लवकरच शंभरी गाठेल (एकूण ९५ कविता झाल्या, आजची ९६वी!) माझा हा उपक्रम आता माझ्या या ब्लॉगवरून अव्याहत सुरु राहील. तथापि, मी वेगवेगळ्या माध्यमातून या कविता मिळवून, त्यातून माझ्या काही विशिष्ट निकषांवर निवडून, त्यांचे शक्य तितक्या शुद्धतेने टंकलेखन करून हा उद्योग करीत असल्याने, रोज एक कविता इथे सादर होईलच असे नाही. तेंव्हा जसे जमेल तसे प्रकटण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल याबद्दल विंदांच्या चाहत्या काव्यरसिकांनी खात्री बाळगावी व लोभ असू द्यावा... आज ‘काजवे’ मधील शलाका

...असेंच जग हें !...
सत्कार्यास्तव अधम नरांचा
अनुनय करिती जगतीं सज्जन
असेंच जग हें ! शिवालयांतहि
नंदिस्पर्षाविण ना दर्शन !

Photo Credit - Mukund Utpat

सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

प्रिय पालक,


आपल्या पाल्याच्या कुतुहलात आणि जिज्ञासेत शाळा आणि अभ्यासाचा अडसर होऊ देऊ नका आणि तुमच्या महत्वाकांक्षांसाठी त्याला काही कमी न पडू देण्याच्या नादात त्याची वाढ खुरटवून त्याला कायमचे पंगू करू नका...! 

बस, इतकेच...

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

चित्रपती...!

महाराष्ट्राच्या औंध संस्थानामध्ये साताऱ्याजवळ, खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा झालेल्या सहा कैद्यांचे पुनर्वसन करून त्यांना आणखी एक संधी देण्याच्या, ‘स्वतंत्रपूर’ अशा अत्यंत समर्पक नाव धारण केलेल्या ‘मुक्त कारागृह’ अर्थात ‘Open Prison’ या मानसशास्त्रीय प्रयोगाबद्दल संवेदनशील साहित्यिक गदिमा (ग. दि. माडगुळकर) यांनी प्रतिभावान आणि सामाजिक जाणिवांचे भाष्यकार निर्माते-दिग्दर्शक शांताराम बापू अर्थात व्ही. शांताराम यांना सांगितले आणि जन्म झाला एका अजरामर चित्रकृतीचा – ‘दो आंखे बारह हाथ!’ १९५७ साली प्रदर्शित झालेल्या या भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिजात कलाकृतीला बर्लिनच्या ८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सिल्व्हर बीअर’ पुरस्कार मिळाला आणि ‘गोल्डन ग्लोब अवार्ड’ मधील ‘सैम्युअल गोल्डविन अवार्ड’ या श्रेणीत नामांकन देखील मिळाले. १९७५ साली या चित्रपटाचा तामिळ रिमेक ‘पलांदू वाझगा’ (एम. जी. रामचंद्रन व लता) आणि १९७६ साली तेलगु रिमेक ‘मा दैवम्’ (एन. टी. रामाराव व जयचित्रा) प्रदर्शित झाला.

या चित्रपटातील एका दृष्यात व्ही. शांताराम एका बैलाशी झुंज देतांना दिसतात. हा प्रसंग चित्रीत करतांना शांताराम बापूंच्या डोळ्याला इजा झाली पण सुदैवाने त्यांची ‘नजर’ अखेरपर्यंत शाबूत राहिली! ‘ऐ मलिक तेरे बंदे हम’ ही भरत व्यासांची जेवढी निर्मळ तेवढीच व्याकूळ रचना वसंत देसाईंच्या आर्त सुरांनी, लतादिदींच्या स्वर्गीय स्वराने आणि संध्याच्या अप्रतिम मुद्राभिनयाने अजरामर केली ती याच चित्रपटात. ‘इंडिया टाईम्स मुव्हीस्’ने २००५ साली प्रकाशित केलेल्या ‘भारतीय चित्रपट सृष्टीतील चुकवू नये असे २५ चित्रपट’ या यादीत ‘दो आंखे बारह हाथ’ला मानाचे स्थान देण्यात आले असले तरी माझ्यासाठी या चित्रपटाचे स्थान कायम अविस्मरणीय, अतुलनीय आणि अलौकिक असे आहे व राहील. त्याची कथा पुन्हा कधीतरी...

आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे आज चित्रपती व्ही. शांताराम अर्थात शांताराम बापूंचा ११६ वा जन्मदिन! कृष्ण-धवल चित्रीकरणाच्या (आणि आणखी विविध) मर्यादांमध्ये, मानवी आयुष्याचे इतके कंगोरे, कुठल्याही मोठ्या ‘स्टार’शिवाय, इतके लख्ख उजळवून दर्शकांचे डोळेच नव्हे तर भानही दिपवून टाकणाऱ्या आणि ‘चित्रपती’ अशी सार्थ उपाधी धारण करणाऱ्या शांताराम बापूंना... सलाम! असे चित्रकर्ते आणि त्यांच्या संवेदनशील मुक्त अभिव्यक्तीला ‘श्वास’ घेण्याचे स्वातंत्र्य, स्वतंत्र भारताला निरंतर लाभो हीच प्रार्थना...


जब जुल्मोंका हो सामना
तब तूही हमे थामना...
वो बुराई करे हम भलाई भरे 
नही बदले कि हो कामना...
बढ उठे प्यारका हर कदम 
और मिटे बैरका ये भरम...

ऐ मलिक तेरे बंदे हम 
ऐसे हो हमारे करम
नेकीपर चले और बदिसे टले 
ताकी हसते हुयें निकले दम...!