शनिवार, २७ जानेवारी, २०२४

परिच्छेद...!


"...शाळेच्या त्या छोट्या जगातून बाहेरच्या मोठ्या जगात पाऊल टाकल्याला आता अकरा वर्षे झाली. पण अजूनही सर्वत्र मला विषमतेची तीच ओंगळ आणि भयंकर दृश्ये दिसत आहेत. बाजारात, देवळात, विद्यालयात, नाटकगृहात, प्रवासात, सभासंमेलनात, लग्नमंडपात, स्मशानभूमीत - कुठेही पाहा. जीवनाच्या या महारोगाने आपल्याला पुरे ग्रासून टाकले आहे, समाजपुरुषाचे शरीर त्याने विलक्षण विद्रूप आणि बधिर करून सोडले आहे, या शारीरिक विकृतीचा परिणाम त्याच्या आत्म्यावरही झाला आहे असेच दिसून येईल. डोळे मिटून भारतीय संस्कृतीचा जप करीत आणि आपल्या आध्यात्मिक वारशाची स्थानी-अस्थानी प्रौढी मिरवीत आपण गेली शेकडो वर्षे एका स्वप्नसृष्टीत वावरत आलो आहो. धर्म व व्यवहार, विचार व आचार, इच्छा व कृती यात उभारलेली राक्षसी भिंत धुळीला मिळविण्याकरिता करावी लागणारी प्रचंड धडपड आमच्यापैकी एखादाच थोर आत्मा क्वचित करतो. जमल्यास त्याचा आणि आणि ते साधले नाही तर त्याच्या शिकवणुकीचा मुडदा पडून आम्ही पुन्हा स्वप्नसृष्टीतल्या आपल्या मोठेपणात मश्गूल होऊन जातो. आम्हाला सर्वोदय हवा, आम्हाला रामराज्य हवे! 'सर्वे तु सुखिनः सन्तु' या मंत्राचा उद्घोष कानांवर पडला की, आमच्या अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहतात! पण हे सारे शेख महंमदाचे मनोराज्य सत्यसृष्टीत उतरविण्याकरिता आर्थिक आणि सामाजिक समतेची जी बैठक तातडीने निर्माण व्हायला हवी, ती उभारण्याचे अवघड आणि कष्टप्रद काम करायला आम्ही तयार नाही. परंपरागत स्वार्थावर निखारे ठेवल्यावाचून समता या शब्दाला काही अर्थ नाही, जीवनविषयक दृष्टिकोनातली क्षुद्रता नाहीशी झाल्याशिवाय खरीखुरी सामाजिक क्रांती अवतार घेऊ शकणार नाही हे सनातन कटू सत्य आहे. पण आजच्या झटपट सुधारणेच्या काळात याचा विचार करायला मंत्र्यांपासून विचारवंतापर्यंत कुणालाच वेळ नाही. आजकालची आपली सारी धडपड सत्प्रवृत्त आहे असे मानले, तरी पायावाचून उभारलेल्या चित्रपटातल्या क्षणभंगुर लाकडी मंदिरावर सोन्याचा कळस चढविण्यापेक्षा तिची किंमत अधिक नाही. कळत-नकळत सामाजिक विषमतेचे खरेखुरे राक्षसी स्वरूप लपविण्याचीच अद्यापि आपण कोशीस करीत आहोत! कुणी तिला तत्वज्ञानाच्या सात पडद्यांआड  ठेवतो, कुणी तिला धार्मिक बुरखा पांघरायला  देतो, कुणी तिला पांडित्याच्या अलंकारांनी झाकून टाकतो. पण कुठलीही व्याधी - मग ती वैयक्तिक असो वा सामाजिक असो - लपवून कधीच बरी होत नाही! या दृष्टीने मी 'पूजास्थान' ही गोष्ट चाळू लागलो म्हणजे तिच्यात एकप्रकारचा दुबळेपणा मला आता जाणवतो! तिच्यातले सत्य अधिक तीव्रतेने, अधिक उग्रतेने आणि अधिक विशाल अशा पार्श्वभूमीवर चित्रित करण्याचा मी पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे..."       
वि. स. खांडेकर
११.५.४९

'गुणा: पूजास्थानं गुणिषु नच लिंग नच वय: I
इयत्ता पाचवीला संस्कृत शिकवितांना धडयात आलेल्या या वचनाने जन्म दिला 'पूजास्थान' या लघुकथेला आणि तिला 'अश्रू आणि हास्य' या संग्रहात सामील करतांना तिच्या जन्मकथेनिमित्त जे चिंतन झाले त्या प्रदीर्घ प्रस्तावनेतील; साऱ्या धोरणी धारणा, अद्भुतरम्य कल्पना आणि स्वप्नरंजित आभास - यांना छेद देणारा हा परिच्छेद! पंचाहत्तर वर्षात देश खूप पुढारला, प्रगती झाली, विकास झाला, ओबडधोबड जगण्याला मऊमुलायम आधुनिकतेचा स्पर्श झाला... सारे खरेच. पण बरोब्बर ७५ वर्षांपूर्वीच व्यक्त झालेल्या या चिंतनीय वास्तवाचे काय? वि. स. खांडेकर या लेखकाच्या माध्यमातून व्यक्त झालेला पण कुणाही विचारी, संवेदनशील आणि विवेकी माणसाचा असू शकणारा हा विषाद पंचाहत्तर वर्षात किती कमी झाला... की वाढला? आणि तसे असेल तर एक प्रगत समाज म्हणून आपणही ७५ वर्षांची ही गाथा अधिक विशाल पार्श्वभूमीवर नव्याने चितारायला नको...?

निदान प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? 

ये जो शहतीर है पलकों पे उठा लो यारो
अब कोई ऐसा तरीका भी निकालो यारो

दर्दे—दिल वक़्त पे पैग़ाम भी पहुँचाएगा
इस क़बूतर को ज़रा प्यार से पालो यारो

लोग हाथों में लिए बैठे हैं अपने पिंजरे
आज सैयाद को महफ़िल में बुला लो यारो

आज सीवन को उधेड़ो तो ज़रा देखेंगे
आज संदूक से वो ख़त तो निकालो यारो

रहनुमाओं की अदाओं पे फ़िदा है दुनिया
इस बहकती हुई दुनिया को सँभालो यारो

कैसे आकाश में सूराख़ हो नहीं सकता
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो

लोग कहते थे कि ये बात नहीं कहने की
तुमने कह दी है तो कहने की सज़ा लो यारो

- दुष्यंत कुमार

रविवार, २१ जानेवारी, २०२४

रामराया...!


रामजन्मभूमी राष्ट्रोत्सवाच्या निमित्ताने,

"कल्पनेचा प्रांत तो माझा एकांत।
तेथें मी निवांत बैसेईन बैसेईन सुखरुप क्षणैक।
पाहिन विवेक राघवाचा स्वरुप राघवाचे अत्यंत कोमळ।
जेथें नाही मळ, माईकांचा माईकांचा मळ जाय तत्क्षणीं ।
रामदरुशणीं रामदास।"

या 'समर्थ' भावनेने, समर्थ रामदासांनी सकल जनहितार्थ 
प्रभू रामचंद्राला घातलेली ही आर्त साद...

कल्याण करी रामराया ।
जनहित विवरी ।।
तळमळ तळमळ होतची आहे ।
हे जन हाति धरी दयाळा ।।

अपराधी जन चुकतची गेले ।
तुझा तूचि सावरी दयाळा ।।
कठीण त्यावरी कठीण जाले ।
आतां न दिसे उरी दयाळा ।।

‘कोठे जावे काय करावे ।
आरंभिली बोहली दयाळा ।।’
दास म्हणे आम्ही केले पावलो ।
दयेसी नाहीं सरी दयाळा ।।

जय जय रघुवीर समर्थ 


शनिवार, ६ जानेवारी, २०२४

रहस्य...!


त्या दुकानदाराने आपल्या मुलाला जगाचे ज्ञान व्हावे म्हणून जगातल्या शहाण्या माणसाकडे पाठवले.

शहाणा म्हणजे ज्ञानी आणि ज्ञानी म्हणजे कुणी साधू-तपस्वी अशी अटकळ बांधून मुलगा त्याच्या शोधात निघाला.

वाळवंटातल्या ४० दिवसांच्या प्रवासानंतर मुलगा पोहोचला ती कुण्या साधूची कुटी नव्हती तर धनिकाचा प्रशस्त महाल होता. तिथे ध्यान-धारणा, मंत्र-जाप, पूजा-साधना असले काहीही चाललेले नव्हते तर खूप वर्दळ होती. लोक येत जात होते. सौदे ठरत होते, व्यवहार पार पडत होते. जगातल्या सर्वोत्तम खानपानाची रेलचेल होती. वातावरणात संगीत होते, सुगंध होता, उल्हास होता. शहाणा (आणि श्रीमंत) माणूस साऱ्यांशी आपुलकीने बोलत होता, हवे-नको बघत होता.

मुलाकडे लक्ष जाण्यास त्याला जवळपास दोन तास लागले. मुलाचा येण्याचा उद्देश त्याने समजून घेतला पण त्याला जे हवे होते ते, 'सुखाचे रहस्य' समजावून सांगण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता म्हणून त्याने मुलाला त्याचे घर पाहून दोन तासाने परत भेटू असे सुचवले. मुलाला फक्त एकच गोष्ट करायची होती, यजमानाने दिलेला चमचा आणि त्यातले तेलाचे दोन थेंब पूर्ण वेळ सांभाळत घर पहायचे होते.

मुलाने महालाचे संगमरवरी खांबांनी सजलेले रुंद वऱ्हांडे, मखमली पायघड्या घातलेले उंच जिने, फुलांच्या ताटव्यांनी सजलेले गवाक्ष, भरजरी रेशमी पडद्यांनी नटलेले नक्षिकाम केलेले भव्य दरवाजे खिडक्या या साऱ्यांच्या साक्षीने घराचा दौरा पूर्ण केला - सारे लक्ष हातातील चमच्यावर लक्ष केंद्रित करून दोन तासांनी शहाण्या माणसाकडे परतला!

शहाणा माणूस म्हणाला, 'मग, कसे वाटले माझ्या शयनगृहातील गालिचे, मुदपाकखान्यातील लाकडी कारागिरी, वाचनालयातील पुस्तके आणि कल्पकतेने सजवलेल्या भिंती, माळीबुवांनी १० वर्षांच्या अथक मेहनतीने फुलवलेला आणि निगुतीने राखलेला बगीचा आणि त्यातील थुई थुई नाचणारे कारंजे...?'

मुलगा फारच शरमला आणि वरमून म्हणाला, 'माझे सारे लक्ष चमच्यातील तेलाकडे असल्याने मी यातील काहीही बघू शकलो नाही, त्याचा सुखद अनुभव घेऊ शकलो नाही, मला माफ करा...!'

'मग पुन्हा एकदा जा आणि मी जगभरातून जमविलेल्या साऱ्या किमती, कलात्मक आणि सुंदर गोष्टींचा आनंद घेऊन पुन्हा मला भेट. ज्या माणसावर विश्वास ठेवायचा त्याचे घर नीट निरखून बघायलाच हवे, नाही का...?'

मुलाने समाधानाने पुन्हा चमचा उचलला आणि या वेळी साऱ्या गोष्टी नीट बघून, त्यांच्या सौंदर्याचे आस्वादन करीत घराचा फेरा पूर्ण केला आणि अतिशय सुखावत सुस्मित चेहऱ्याने शहाण्या माणसास सामोरा गेला.

'... पण चमच्यातले तेल कुठेयं...?' शहाण्या माणसाने मुलाच्या हाताकडे बघत विचारले. मुलाचे तिकडे लक्ष जाताच त्याचा आनंदाने फुललेला चेहरा क्षणार्धात खर्र्कन उतरला...

'असं बघ मुला, मी तुला एवढाच सल्ला देऊ शकतो..', शहाणा माणूस अत्यंय शहाणिवेने म्हणाला, 'तू शोधतोयस त्या सुखाचे रहस्य एवढेच आहे की जगातील साऱ्या चांगल्या, हव्याशा गोष्टींचा मनसोक्त उपभोग घ्या, रसास्वादन करा पण ते करताना हातातल्या चमच्यातील तेलाचे दोन थेंब कधीही विसरू नका, नजरेआड होऊ देऊ नका...!'

---------------------------------

पावलो कोएलो यांच्या 'दि अल्केमिस्ट' या अप्रतिम पुस्तकातील ही अत्यंत बोधप्रद गोष्ट आज नव्याने आठवण्याचे कारण म्हणजे नव्या वर्षाचा संकल्प नव्हे. असे काही संकल्प करायचे नाही असा संकल्प सोडण्याइतकी शहाणीव आम्हाला अल्केमिस्टच्या आधीच आली होती. तेव्हा तसे काही प्रयोजन नाही.

फक्त गेल्या वर्षाचा अखेरचा काळ खूपच घडामोडींचा, धावत्या का होईना गाठीभेटींचा आणि...
"कभी पास बैठो तो कहूं दर्द क्या है,
अब यूँ दूर से पूछोगे तो खैरियत ही कहेंगे..!"
याचा एहसास होण्याचा,
असा संमिश्र भावनांचा ठरला म्हणून पुन्हा एकदा 'पावलो'ची आठवण बाकी काही नाही... 

तेव्हां, मी माझ्या जीवनशैलीत सकृतदर्शनी कुठलेही बदल केलेले नसल्याने पण विचारशैली अधिक मुक्त, प्रवाही आणि चिंतनशील करण्याच्या धोरणामुळे बौद्धिकांसाठी, बुद्धिप्रामाण्यवादासाठी कायमच उपलब्ध आहे, राहीन...!

ताल्लुकात बढ़ाने हैं तो कुछ,
आदतें बुरी भी सीख ले गालिब,
कोई ऐब न हो तो लोग,
महफ़िलों में नहीं बुलाते...!

बस इतना ही...