मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

'मेरे पास माँ हैं...!'


आमची जडण घडण ज्या चार घटकांवर झाली त्यातले पहिले होते आमचे कुटुंब, स्नेही, मित्रपरिवार - म्हणजे रूढार्थाने समाज, दुसरी होती शाळा - म्हणजे शिक्षण, तिसरे होते वाचन, लिखाण - म्हणजे साहित्य आणि शेवटचे चवथे पण अतिशय महत्वाचे आणि आत्यंतिक आवडीचे म्हणजे नाटक - सिनेमा! त्यातही, सोईस्कर, किफायतशीर आणि भव्य-दिव्य यासह इतर अनेक व्यावहारिक कारणांसाठी सिनेमा अधिक प्रिय आणि जवळचा! ६५ पैसे तिकिटावर आम्ही समोरच्या पडद्याला नाक लावून, मान उंचावून सिनेमा बघितला आहे हे आता कुणाला खरे देखील वाटणार नाही. आमच्या काळात 'मूल्य शिक्षणा'ची टूम निघाली नाही त्याचे कारण या सगळ्या घटकांच्या एकत्रित अस्तित्वाने आमचे 'मूल्य शिक्षण' अत्यंत सापेक्षभावाने अष्टौप्रहर चाललेले असे. 

आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे शशी कपूर यांचे निधन! अमिताभने आम्हाला व्यवस्थेतील अन्यायाविरुद्ध उभे रहायला आणि निर्भीडपणे लढायला शिकविले तर शशी कपूर यांनी आम्हाला, 'हमारे खयालात कितने मिलते है...' म्हणत लोभसवाणे फ्लर्टींग करत 'मोहोब्बत बडे कामकी चीज है...' हे तर शिकवलेच पण त्याबरोबरच खाण कामगारांच्या हक्कासाठी इंजिनियरच्या नोकरीत असून खाण मालकाशी लढायला शिकवले आणि सांस्कृतिक अभिजातता म्हणजे काय याचा सर्वोत्तम नमुना 'उत्सव'च्या रूपाने सादर केला. 

हे सगळे असले तरी, आमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा, आयुष्याकडे बघण्याच्या परिप्रेक्ष्याचा आणि एकूणच अस्तित्वाचा डोलारा ज्या प्रसंगावर आणि डॉयलॉग वर उभा राहीला तो होता... 'मेरे पास माँ हैं...!' आमच्या हृदयांचा अनभिषिक्त शहेनशहा असलेला अमिताभ या प्रसंगात खजील आणि निरुत्तर होत असला तरी आम्हाला हा प्रसंग त्याच्या, ...'मैं आजभी फेके हुए पैसे नही उठाता...' इतकाच प्रभावशाली आणि प्रेरणादायक ठरत आलेला आहे, आणि हे कसब जेवढे लेखक-दिग्दर्शक यांचे आहे तेवढेच, तो खुद्दार प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्ष करारीपणा, संयमी दृढनिश्चय आणि नीतिमत्ता सांभाळणारे चारित्र्य, केवळ चार शब्दांच्या एका डॉयलॉग डिलिव्हरीतून व्यक्त करू शकणाऱ्या शशी कपूर यांचे आहे. आज त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून एवढेच म्हणावेसे वाटते... 'हमारे पास आपके दिये हुए आदर्श है...!'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा