रविवार, २३ जून, २०१९

अजून...!



मातीला अजून येतो गंध
जळली नाही तिची माया,
थेंब पडता पापणीवर अन्
बहरुन येते अजून काया...!

फुलांमध्ये मध शाबुत आहे
चाफाही फुलतो बिनबोभाट,
नारळात भरते पाणी अन्
अजून नागमोडी चालते वाट...!

परतावा न बघता पहिला
बीज अजूनही देते फळ,
चोचीला मिळतोच दाणा
इवल्या पंखात भरते बळ...!

सूर्यबिंब टेकता क्षितिजावर
धरणी लेवते केशरी साज,
नदी अवखळ अजून वाहते
समुद्र घालतो गंभीर गाज...!

निसर्गाचे निरंतर चक्र
माणूस असेल हरवला,
'सुखाचा मंत्र' त्याच्या
मनी कुणी भरवला...?

जल जमीन जंगल सृष्टी
निसर्गच इथे ईश्वर आहे,
कितीही रुद्र भासला तरी
माणूस सुद्धा नश्वर आहे...!

सौदा झाला सगळ्याचा म्हणून
जगण्याची त्यावर भिस्त नाही,
माणसाने सोडले असेल ताळतंत्र
सृष्टी मोडीत तिची शिस्त नाही...!

येतोपाऊस अजून तरी
घेऊन सोसाट्याचा वारा,
हिंमत अशी हरु नकोस
भिऊन जगण्याला पोरा...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा