शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१९

तुझिया जातीचा..



महाराष्ट्राचाविनोदआज शंभर वर्षांचा झाला. यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती नाही; श्लेष, वक्रोक्ती किंवा दर्पोक्ती तर दूरची बात. अशोक कुमारने भारताला विनासंकोच (आणि विनाकारण!) सिगारेट ओढायला शिकवले, दिलीपकुमारने संयत अभिनय म्हजे काय हे दाखवले (हं, आता त्याचं अश्राव्य बोलणं समजून घ्यायला सगळे प्राण कानात गोळा करायला लागायचे तो गोष्ट वेगळी!), राज-देव-शम्मी-राजेश यांनी रोमान्सची पायाभरणी केली (आणि चॉकलेट कुमारांचा मार्ग सुकर केला!). अमिताभने तरुणांना न्यायाविरुद्ध पेटून उठायला शिकवले (त्याच्या पुढच्या तीन पिढ्या थकल्या तरी तो अजूनही ऐन्ग्री यंग मैनच्या रुबाबात आपले स्थान राखून आहे!). लतादीदींनी आम्हाला गाणे ऐकायला, आशाताई आणि किशोरदाने ते गुणगुणायला आणि सचिनने क्रिकेट पहायला शिकवले.

आमच्यावरील हे सगळे संस्कार मान्य केले तर पुल नावाच्या गारुडाने आम्हाला निखळ, निरागस आणि निष्कपट हसायला शिकवले हे वरील सर्वाला पुरून उरणारे शत प्रतिशत सत्य! म्हणजे पुलंच्या आधी महाराष्ट्र हसतच नव्हता असे नाही. अगदी बाळकराम गोविंदाग्रज गडकऱ्यांपासून चिविं जोशी ते आचार्यांपर्यंत ‘विनोदी’ साहित्य महाराष्ट्राने बघितले, वाचले होतेच. पण, मुळातच धीर-गंभीर, नेमस्त आणि पंतोजींच्या शिस्तीत आणि वडिलांच्या धाकात वाढलेल्या मराठी घरावर, स्वातंत्र्याच्या काही दशकांपर्यंत प्रात:स्मरणीय श्रीराम, ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी महाराज आणि बलोपासक समर्थ रामदासस्वामी यांची चरित्रे आणि साने गुरुजींच्या बाळबोध कथा यांच्या संस्काराने, आदर्श व्यक्तिमत्व घडवतांना उद्दात ध्येय बाळगण्याचा जो प्रघात पडला त्याला विनोदाचे (आणि आणखीन बऱ्याच गोष्टींचे!) नाही म्हटले तरी थोडेसे वावडेच होते. दासबोधात खुद्द समर्थांनीच विनोदाची ‘टवाळा आवडे विनोद...’ अशी संभावना (कि निर्भत्सना?) करून ठेवली असल्याने विनोद हा काव्य-शास्त्र-विनोदाचा अविभाज्य भाग असला तरी जनसामान्यांना त्याचा सहज लाभ होणे जिथे दुष्कर होते तिथे पुलंनी ती वाट नुसती मोकळीच नाही तर वाहती करून दिली आणि त्यांच्यानंतरही खळाळती राहील याची सोय करून ठेवली.

राम गणेशांचा आणि चिविंचा बाळबोध विनोद हा अत्यंत मर्यादाशील, सोज्वळ, सात्विक आणि कुलीन होता तर त्याच्या बरोब्बर विरुद्ध अत्र्यांचा विनोद हा इरसाल, धसमुसळा आणि हुकुमी होता. या दोन्ही प्रकारांनी महाराष्ट्राला भुरळ घातली या बद्दल शंकाच नाही. तरी विनोद आपला वाटावा इथवर प्रगती होण्यास महाराष्ट्रास ८ नोव्हेंबर १९१९ या दिवसाची वाट बघावी लागली. लक्ष्मणराव देशपांड्यांच्या घरात जन्मलेल्या कुलदीपकाने वयाच्या पाचव्या वर्षी, आजोबांनी लिहून दिलेले १५-२० ओळींचे भाषण हावभावासहीत खणखणीत आवाजात शाळेत म्हणून दाखवून आपले पुरुषोत्तम नाव सार्थ असल्याचे सिद्ध केले आणि महाराष्ट्राच्या हातावर मनोरंजनाची एक नवीन ठसठशीत रेषा उमटली!

मुंबईला इतर कोणत्याही ‘भाई’ची ओळख होण्यापूर्वी, ‘बंबईका डॉन कौन...?’ असले उद्दाम प्रश्न न विचारता आणि ‘मनोरंजन करण्याची कला’ एवढ्या एकमेव हत्याराच्या जोरावर फक्त मुंबईच नाही तर अवघ्या मराठी प्रजेवर राज्य केल ते पुलं नावाच्या जन्मजात भाईने! मुलांचे मनोरंजन करणाऱ्याचे नाते प्रभुशी जडेल असा आशावाद बाळगणाऱ्या साने गुरुजींनी, सकल मानवतेचे सर्व प्रकारे मनोरंजन करणे हे आपले जन्मसिद्ध, एकमेव आणि स्वीकृत कर्तव्य आहे इतकेच नव्हे तर तीच आपल्या आत्म्याच्या देहधारणेची इतिकर्तव्यता आहे अशा विश्वासाने लोकांना रिझविण्यासाठी एकामागेएक कार्यक्रमांची पुरचुंडी सोडून आपला खेळ मांडणाऱ्या या विदूषकाचे कुणाकुणाशी काय आणि कसे नाते जडले असेल त्याची मोजदाद विश्व्वेश्वरालाही अशक्य!

एक माणूस एका आयुष्यात जेवढ्या म्हणून अभिजात गोष्टी करू शकतो आणि ज्या ज्या म्हणून भूमिका निभावू शकतो त्या साऱ्या तर पुलंनी निभावल्याच आणि त्या साऱ्याबद्दल अनेकांनी अनेक वेळा, अनेक प्रसंगी अनेक ठिकाणी सांगितले, लिहिले देखील आहे. आजच्या दिवशी तर सर्वच माध्यमांवर पुलंबद्दल इतके काही बघायला, ऐकायला, वाचायला मिळेल की पुलंची स्वत:ची समग्र साहित्यसंपदाही बहुदा त्यापुढे तोकडी पडेल... पण हेच ते श्रेयस जे कमवावे लागते. त्यासाठी कधी 'गुळाचा गणपती' होऊन 'बटाट्याच्या चाळी'त वास्तव्य करावे लागते तर कधी ब्लॉकमध्ये शिफ्ट झालेल्या असा मी असामी'च्या माध्यमातून 'खेळीया' होऊन 'विदूषका'चे सोंग रंगवावे लागते...

मला स्वत:ला पुलंचा एक अतिशय भावलेला किस्सा सांगून पुलंच्या जन्मशताब्दी समारोप दिनाचे औचित्य साधतो. किस्सा अर्थातच पुण्यातला आहे. पुलंनी भलेही मोठ्या मनाने महाराष्ट्राच्या जनतेला विचारले असेल, ‘तुम्हाला कोण व्हायचे आहे, मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?’ पण त्यांचे पुण्यावर ‘विशेष’ प्रेम होते हे, ‘मी राहतो पुण्यात, विद्वत्तेच्या ठाण्यात...’ या त्यांच्या परखड ‘अभिव्यक्ती’तून चांगलेच व्यक्त होते! तर किस्सा असा...

एक रिक्षा डेक्कन जिमखान्यावरील एका बंगल्यापाशी थांबली. रिक्षातून वयाने प्रौढ, शरीराने गुटगुटीत हसऱ्या बाळचेहऱ्याची एक व्यक्ती उतरली आणि म्हणाली, ‘किती झाले?’ रिक्षावाला म्हणाला, ‘पावणेतीन रुपये.’ गोंडस छबीने  तीन रुपये दिले आणि चार आणे परत येण्याची वाट पाहिली. कालत्रयी न बदलणारा रिक्षावाला नेहमीच्या सहजभावाने म्हणाला, ‘सुटे नाहीत.’ ‘अरे, इतक्या वेळेपासून रिक्षा चालवताय, जमली असेल कि चिल्लर, बघा जरा.’ ‘ओ साहेब, असेल तर द्यायला आम्हाला काय दुखतय होय? नाही म्हटलं तर सोडा जाऊ द्या की! कुठ चाराण्यात जीव अडकवताय?’ ‘हे बघा तुमच्याकडे खरंच नसतील तर सांगा. दोन मिनिटे थांबा मी वरून सुटे पावणेतीन रुपये घेऊन येतो.’

रिक्षावाला ‘काय पण येडचाप कद्रू आहे...!’ अशा भावनेने बघतच राहिला. ‘माझे तीन रुपये...!’ भानावर येत रिक्षावाल्याने तीन रुपये परत केले आणि सद्गृहस्थ दोन जिने चढून वर गेले, पाच मिनिटाने धापा टाकत परतले आणि रिक्षावाल्याच्या हातावर सुटे २ रुपये ७५ नये पैसे ठेवले. कपाळाला हात मारून रिक्षावाला आपली नेहमीची मन:शांतीची स्तोत्रे पुटपुटत रिक्षा फिरवून निघाला आणि दुसऱ्या प्रवाशाने त्याला हात केला, ‘स्टेशनला येणार का?’ मगाच्या गिऱ्हाईकाने मुडाफ केला तर लांबचं गिऱ्हाईक भेटलं या आनंदात रिक्षावाल्याने मिटर टाकला आणि आपली टकळी सुरु केली. ‘काय राव, इमानदारीचा जमानाच राहिला नाही बघा!’ ‘का? काय झालं?’ ‘बघा ना एवढं घराच्या दरवाजात सोडलं, जिमखान्यावर बंगल्यात राहतात तरी चाराणे सुटं ना बघा या चिंगूस मक्खीचूस माणसाकडून!’

‘ते गृहस्थ कोण आहेत कल्पना आहे का तुम्हाला?’
‘नाही बुवा. का, तुम्ही ओळखता का त्यांना?’
‘बाबा रे अख्खा महाराष्ट्र ओळखतो त्या माणसाला. नुसता ओळखत नाही तर जीव ओवाळून टाकतो त्यांच्यावरून!’
‘असं! का बर? काय करतात म्हणायचे ते साहेब?’
‘ते लिहितात, नाटक-सिनेमा करतात, मनोरंजनाचे कार्यक्रम करून लोकांना हसवतात, दु:ख विसरायला लावतात.’
‘काय सांगताय? मग एवढ मोठा माणूस मला चाराणे का सोड ना?’
‘कारण ते तुझे नव्हते! तुझ्या हक्काचे नव्हते. असेच पैसे साठवून ते शाळा-महाविद्यालये-वाचनालये-इस्पितळे यांना देणग्या देतात जेणे करून ज्यांची पैसे खर्च करण्याची ऐपत नाही त्यांचे शिक्षणावाचून, इलाजावाचून अडू नये, काय समजलास?’

स्टेशनवर या गिऱ्हाईकाला सोडतांना किती पैसे झालें, किती घेतले आणि किती परत दिले रिक्षावाल्याला काही समजलं नाही कारण त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता गेल्याच आठवड्यात इस्पितळात त्याच्या आईचा विनाखर्च झालेला उपचार आणि राहून राहून आठवत होता त्या लहान मुलासारख्या निरागस चेहऱ्यावरचा निर्मम भाव!

[श्री. राजा गोसावी यांनी एकदा अनौपचारिक गप्पात सुहृदांना सांगितलेला पुलंचा एक किस्सा]

तर पुन्हा एकदा पुलंना त्रिवार वंदन करून ‘...तुझिया जातीचा मिळो आम्हां कोणी...’ एवढीच प्रार्थना!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा