शनिवार, १० जानेवारी, २०२६
अर्थ…?
रविवार, २४ ऑगस्ट, २०२५
‘मना’पासून…!
अण्णांच्या १२१वी जयंती, भारताचा ७९वा स्वातंत्र्यदिन आणि जन्माष्टमी तथा ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीची पूर्वसंध्या असा चौरस मुहूर्त असल्याने असा योग पुन्हा जुळून येणे शक्य नव्हते म्हणून हा सोहळा याच दिवशी करण्याचे अनेक दिवसांपासून योजिले होते आणि तो संकल्प सिद्धीस जाण्यास अनेकांचा हातभार लागला, त्या सर्वांचा हा ‘मना’तला…
ऋणनिर्देश
आपल्या आजच्या या अनौपचारिक कौटुंबिक सोहळ्याला लाभलेले अभ्यासू, व्यासंगी पाहुणे, सर्व गीताप्रेमी रसिक आणि केशवतनय परिवाराचे सदस्य, त्यांचे आप्त, स्नेही व सुहृद, नमस्कार!
कौरवांचे ११ आणि पांडवांचे ७ असे १८ औक्षहिणी सैन्य सलग १८ दिवस लढले ते महाभारताचे युद्ध संपले. पांडवांनी युद्ध जिंकले असले तरी पार्थसारथी श्रीकृष्णाने आपला रथ भरधाव वेगाने दौडवत कुरुक्षेत्रापासून बऱ्याच लांब अंतरावर नेऊन एका निर्मनुष्य ओसाड-उजाड माळरानावर उभा केला आणि अर्जुनाला आज्ञा केली, “पार्था, सर्वप्रथम रथाच्या शीर्षस्थानी लावलेली हनुमंताची पताका उतरव आणि ती हातात घेऊन तू पायउतार हो. हनुमंताची पताका घेऊन रथापासून दूर सुरक्षित अंतरावर जाऊन उभा रहा.”
गेले अठरा दिवस भगवंताच्या अगाध लीलांसह त्याचे विराटरूप दर्शन याची देही याची डोळा घेतले असल्याने, यामागेही त्याची काही योजना असेल याची खात्री असल्याने, रथावरील हनुमंताची पताका उतरवून अर्जुन दूर जाऊन उभा राहिला. श्रीकृष्णाने रथातील एक पाऊल उचलून जमिनीवर ठेवले तसे रथ डगमगू लागला. मोडेल की काय असे वाटू लागले. भगवंताने जसे दुसरे पाऊल उचलले तसा रथ उन्मळून पडला, कोसळला. भगवंतांचे दुसरे पाऊल जमिनीवर टेकून भगवंत जसा एक पाऊल पुढे सरकला तसा अर्जुनाचा रथ भस्म झाला, रथ उभा होता त्या जागी राखेचा एक मोठा ढीगारा तेवढा उरला!
निमिषार्धात घडलेल्या या सगळ्या घटनाक्रमाकडे भयचकित होऊन पाहणाऱ्या अर्जुनाला श्रीकृष्ण कधी त्याच्या बाजूला येऊन उभा राहिला त्याचा पत्ताही लागला नाही. पार्थाकडे नेहमीच्या सुस्मित वदनाने आणि स्नेहार्द नजरेने पाहणाऱ्या स्थिर-चित्त भगवंताला अर्जुन विचारता झाला, “योगेश्वरा, हा रे काय आणखीन एक चमत्कार?”
तेव्हा शांत, संयमित स्वरात कृष्ण म्हणाला, “हा शेवटचा चमत्कार! पार्था, तुला काय वाटले तू धुरंधर, रणवीर, सर्वश्रेष्ठ धनुर्धर असलास तरी कौरवांकडे महायोद्धयांची कमी होती काय? अरे, सूर्यपुत्र कर्ण हा युद्धकौशल्यात तुझ्यापेक्षा तसूभरही कमी नव्हता. त्याने आणि त्याच्या तोडीच्या योद्धयांनी डागलेल्या सर्व अस्त्र-शस्त्रांचा तुझ्या रथावर प्रभाव होता. केवळ सर्व देव-देवतांचा प्रतिनिधी हनुमंत त्यांच्या आशीर्वादरूपाने रथावर उंच फडकत होता आणि साक्षात मी रथाचे सारथ्य करीत होतो म्हणून ती सारी शस्त्रे त्याक्षणी निष्प्रभ ठरत होती. पण हनुमंताची पताका उतरवल्याने आणि मी पायउतार होताच त्या सर्व अस्त्र-शस्त्रांचा परिणाम एकाएकी प्रभावी होऊन तुझा रथ त्यात भस्म झाला...”
कुठलीही गोष्ट यशस्वी झाली तर ती मी केली हा माणसाचा भ्रम दूर होऊन त्याचे पाय जमिनीवर रहावेत म्हणूनच योगेश्वराने ही माया रचली असावी. सर्वप्रथम ‘अहं’चा त्याग करायला शिकायचे आहे आणि तेव्हढी एकच गोष्ट साधण्यासाठी मनुष्य जन्म अपुरा पडतो…
या तथाकथ्य प्रसंगातून कृष्णाने दिलेली ही शिकवण मला माझ्यापुरते गीतासार वाटते. संसारातही असेच अनेक अदृष्य हात आपल्या रथाचे रक्षण करीत असतात, आपल्याला मार्ग दाखवीत असतात. म्हणूनच समर्थ म्हणतात,
सामर्थ्य आहे चळवळीचे I
जो जो करील तयाचे I
परंतु तेथे भगवंताचे I
अधिष्ठान पाहिजे II
जय जय रघुवीर समर्थ!
कदाचित यासाठीच आपल्या संस्कारात चार प्रकारचे ऋण सांगितले आहे - देव ऋण, ऋषी ऋण, मातृपितृ ऋण आणि समाज ऋण. हे ऋण फेडण्यापेक्षा ते जाणणे, मानणे आणि त्या ऋणात रहाणे अधिक श्रेयस्कर कारण त्यामुळे ऋणानुबंध दृढ होतात असे आपली संस्कृती सांगते. तेव्हा आम्ही या ऋणात राहू इच्छित असलो तरी ऋणनिर्देशास प्रत्यवाय नसावा.
समर्थांनी मूर्ख लक्षणांमध्ये ‘सांगे वडिलांची कीर्ती…’ असेही एक लक्षण सांगितले असले तरी आजोबांबद्दल काही म्हटल्याची कुठे नोंद आढळली नाही तेव्हा ते धारिष्ट्य करायला हरकत नसावी. शिवाय या उद्योगाला स्वार्थाबरोबरच सांस्कृतिक आणि सामाजिक किनारही आहे.
अण्णांनी ‘केशवतनय’ या उपनामाने अध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक विषयांवर विविध साहित्यप्रकारात विपुल लेखन केले. धुळ्याच्या मीरा धाराशिवकर यांनी २५ वर्षं संशोधन करून अथक मेहनतीने लिहिलेल्या आणि राजवाडे संशोधन मंडळाने प्रकाशित केलेल्या ‘खान्देशातील साहित्यिक व त्यांचे साहित्य – एक अवलोकन’ या शोधनिबंधात अण्णांच्या कार्याची दखल घेतली आणि गेल्या हजार वर्षातील खान्देशातील साहित्यिकांच्या यादीत अण्णांच्या साहित्याला चार विभागात स्थान मिळाले ही आमच्यासाठी भूषणावह बाब!
दुसरे म्हणजे मराठी भाषा जगविण्याबद्दल जे ‘राज’कारण चालते त्यात ‘वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे…’ असेही एक पालुपद असते. यासंदर्भात पुलंचा एक किस्सा सांगतात. पुलंनी ही ओरड ऐकली तेंव्हा ते म्हणाले, ‘वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे असे मला वाटत नाही, फक्त वाचण्याचा क्रम चुकतो. तारुण्यात फॅन्टसी वाचण्यात काय हशील, तेव्हा ती घडविण्याची रग असते, असायला हवी. आणि आयुष्य कसे जगावे सांगणारा दासबोध म्हातारपणी वाचून काय उपयोग? तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि फॅन्टसी वाचण्याशिवाय गत्यन्तर नसते!’
पुलंना चुकीचा वाटलेला हा क्रम ठिक करायचा तर योग्य वयात सुयोग्य गोष्टी वाचायला हव्या आणि त्यासाठी त्या आकर्षक स्वरुपात सहज उपलब्ध असायला हव्या. आजच्या, एआय कडून अतार्किक मालिकांच्या सुमार भागांचा रतीब घालण्याच्या काळात सृजनशील नवनिर्मितीवर किती विसंबून रहावे हा प्रश्नच असल्याने, आपल्यापाशी जे काही अभिजात उपलब्ध आहे त्याची पुनर्निर्मिती करावी असे वाटले. पण ही सदिच्छा झाली, तिचा उपक्रम करण्यासाठी अनेक हातांची गरज होती. कुठलाही विधायक, सर्जक उपक्रम सिद्धीला नेण्यासाठी अनेकांच्या आशीर्वादाची, आधाराची, सहकार्याची, किमान सदिच्छांची गरज असते.
ओवी-गीतेची छापील प्रत काढण्याचे ठरविले तेव्हा अनेक प्रश्न होते, शंका होत्या आणि अर्थातच थोडीशी हुरहुरही होती. हो, अण्णांनी बऱ्याचदा निभावली असली तरी आम्ही ही प्रकाशकाची भूमिका पहिल्यांदाच निभावणार होतो! विद्याताई, तिचे यजमान मदनराव यांनी त्यांचे चिरंजीव हर्षदच्या मदतीने संपूर्ण ओवीगीता स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर टाईप करून मोठेच काम केलेले असले तरी त्याला पुस्तकरूपात आणणे सोपे नव्हते. पुस्तक छपाईला जाण्यापूर्वी करावयाचे मुद्रित शोधन अर्थात प्रूफ रिडींगचे अत्यंत जिकिरीचे काम अण्णांचा नाशिकस्थित नातू वैभव शामकांत पुराणिक अर्थात आमचा बंधुसखा कुमार याने नेहमीच्या नेमस्तपणे पार पाडले. एव्हढी सगळी सिद्धता झाल्यावर मुखपृष्ठ, मलपृष्ठाचे डिझाईन आणि पृष्ठ-मांडणीचे छोटेसे पोषाखी काम अस्मादिकांनी पार पाडले.
मुद्रण व्यवसायाची तोंडओळख असली तरी बारकावे माहीत असण्याचे कारण नव्हते. या कामी मदतीला धावून आला अण्णांचे बंधू अप्पाकाकांचा नातू प्रसाद प्रभाकर पुराणिक. धुळ्याच्या का. स. वाणी संस्थेशी अनेक वर्षे निगडित असल्याने आणि मुद्रण व्यवसायातील अभ्यासक्रमांना मार्गदर्शनाचा अनुभव असल्याने त्याने मुद्रणाची जबाबदारी समर्थपणे पेलली. निर्मितिमूल्यात कुठलीही तडजोड न करण्याची कल्पना कितीही रम्य असली तरी वपुंच्या पार्टनरने, ‘काव्याची दुसरी बाजू व्यवहाराचीच’ असे बजावले असल्याने जमाखर्चाचा ताळमेळ जमविण्यासाठी काही एक देणगी-मूल्य ठरविणे क्रमप्राप्त असले तरी ते पुस्तकावर छापू नये, आपण हवे ते योगदान करू असे सर्वानुमते ठरल्याने पुस्तकावर कुठेही किमतीचा उल्लेख नसला तरी या आवृत्तीसाठी एक प्रत १०० रुपयांना असे मूळ देणगीमूल्य आणि अधिक प्रतींसाठी यथोचित सवलत देण्याचे ठरले.
पुस्तकाचे साहित्यिक मूल्य ठाऊक असले तरी त्याचे भौतिक वजन किती असते याबद्दल अनभिज्ञ असल्याने या छापील पुस्तकांचे गट्ठे अंदाजे १५० किलो भरल्याने ते धुळ्याहून पुण्याला आणणे हे एक दिव्यच होते. ती जबाबदारी स्वखुशीने स्वीकारून नेहमीप्रमाणे काळजीपूर्वक पार पाडली ती आमचे साडू मकरंद शिंगणवाडे यांनी! पुण्यासारख्या ठिकाणी कार्य सिद्धीस नेण्याचे सामर्थ्य ‘श्रीं’नी व्यवस्थापकाकंडे आऊटसोर्स केलेले असते. या कार्यक्रमासाठी हे सभागृह सर्व सुविधांसह उपलब्ध करून देणारे देशपांडे दाम्पत्य देखील मूळ खान्देशचेच आहे आणि या कार्यक्रमाचे चित्रिकरण करण्यासाठी लाभलेला युवक हा एरवी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे बुवा यांच्या ‘कीर्तनविश्व’ या युट्युब चॅनलसाठी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळतो हा एक सुभग योगायोग!
साहेबाच्या भाषेत सांगायचे तर ‘लास्ट बट नॉट द लिस्ट’ म्हणजे आमचे सर्व कुटुंबीय ज्यांनी आपापल्या परीने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लावला. त्यातही साहेब म्हणतो तसे, ‘बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन, देअर इज अ वुमन… टेलिंग हिम यू आर रॉंग!’ आता साहेबाने ही वुमन नक्की कोण, म्हणजे आई, बहीण, मैत्रीण की बायको याचा खुलासा केला नसला तरी आपल्या संस्कृतीत तिला ‘गृहिणी’... संपूर्ण गृह जिचे ऋणी आहे ती गृहिणी, असा मान देण्याची पद्धत आहे! नित्य दिनक्रमात आमचे घर आणि अशा प्रासंगिक उपक्रमात त्याच्या सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या माझ्या बेटर हाफच्या भक्कम आधाराशिवाय असे धाडस करणे तर लांब, त्याची कल्पनाही करता येणे मला शक्य नाही. तेंव्हा या उपक्रमाला आई-पपा, बायको-मुलगी यांची साथ अमूल्य!
जाता जाता…
द्वितीय आवृत्ती विमोचनाच्या आठवडाभरात संपली आणि तृतीय आवृत्तीची नोंदणीही सुरु झाली आहे…
भगवंताची कृपा, अण्णांचा आशीर्वाद, कुटुंबीयांचा पाठींबा आणि आपला स्नेह यामुळेच हे शक्य झाले…
…अजून काय हवे!
धन्यवाद!
शुभम भवतु !
सोमवार, ९ डिसेंबर, २०२४
स्मरणरंजन...!
रविवार, ३ नोव्हेंबर, २०२४
बहिणाबाई...!
तोंडओळख म्हणजे ओळख नव्हे. ओळख आहे म्हणजे मैत्र असेलच असे नाही. मैत्र जुळले तरी स्नेह वाढेल असे नव्हे आणि स्नेह जोपासला तरी नातं तयार होईलच याची खात्री नाही. तद्वतच केवळ नातं आहे म्हणून माया, स्नेह असेलच असं नाही. नातं असल्याने मैत्र, ओळख असेलच याची खात्री नाही. याऊलट काही ओळखी, नाती ही जवळची, सख्खी नसूनही तिथे नाळ जुळलेली असते. ते संबंध कुठल्याच नात्याच्या, निमित्ताच्या, नियोजनाच्या बांधील नसतात, तिथे फक्त बांधिलकी असते.
बऱ्याचदा विशिष्ट प्रसंगात जवळच्या, सख्ख्या नात्यातल्या, जिवलग मैत्रीच्या व्यक्तींचे वागणे अनाकलनीय वाटते आणि ती ओळख नवीन भासते. आणि अशा वेळी प्रश्न पडतो… हीच का ती व्यक्ती जिला आपण ओळखून आहोत असे आपल्याला वाटत होते…? वेळीप्रसंगी ज्यांची भेट घडते, सहवास लाभतो त्यांची ही कथा तर आभासी माध्यमांवरील काँटॅक्ट्स, कनेक्ट्स, फॉलोअर्स बद्दल न बोललेलेच बरे… त्यातले कित्येक प्रत्यक्ष भेटले तर ठार ओळखू येत नाहीत किंवा ओळख देत नाहीत असा अनुभव आहे!
आज या नात्याच्या विश्लेषणाचे निमित्त म्हणजे आजचा दिनविशेष - भाऊबीज! लौकिक अर्थाने दिवाळसणाची सांगता करणारा भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सव. महाराष्ट्रात आज ‘लाडक्या बहिणी’साठी बकध्यानाचे प्रयोग कितीही जोरात चालले असले तरी त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्व कमी होत नाही. राजकीय प्रयोगांचे कवित्व ‘वर्षा’अखेरीस संपेल पण मुक्ताई-ज्ञानोबाचे भावबंध कालातीत होते, आहेत आणि राहतील. त्यासाठी भाऊबीजेला अभिजात दर्जा मिळून शासकीय व्हायची गरज नाही.
इगो म्हणजे सर्च फॉर अनडिव्हायडेड अटेंशन आणि हा इगो कागदाला चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते… इति वपु. सर्टिफिकेटचे कागद जेवढे जास्त तेवढा इगो मोठा. सर्टिफिकेट्स आणि त्यायोगे येणारा इगो आहे म्हणून माणूस जाणता असेल, सूज्ञ असेल, संवेदनशील किंवा समंजस असेलच असे नाही कारण यातले कुठलेच गुण शिकून येत नाहीत; जाणीवेने जगण्यातून येतात. आमच्या सकल खान्देशची बहिणाबाई शाळेची पायरीसुद्धा चढली नव्हती पण तिच्या जगण्याची जाण बघा…
जगतभगिनी असलेल्या बहिणाबाईंनी त्या काळी अत्याधुनिक मानल्या गेलेल्या जळगावातल्या पहिल्या ‘स्टीम प्रिंटिंग मशीन’, म्हणजे आजच्या संदर्भात सांगायचे तर ‘मशीन लर्निंग’ बद्दल आपल्या प्रगल्भ जाणीवेतून आणि काळाच्या पलीकडे पाहणाऱ्या द्रष्ट्या नजरेतून जो विचार मांडला आहे तो आजच्या किती सुशिक्षित, उच्चशिक्षित तथा उच्चपदस्थ, शीर्षस्थ नेतृत्वांच्या पचनी पडेल सांगणे कठीण आहे.
कोरा कागद देखील त्यावर उमटलेल्या शब्दांमुळे शहाणा होतो आणि इगो चिकटलेले कितीही कागद साठवून माणूस कसा ‘येडजाना’ राहतो ही कल्पनाच किती हृद्य आणि ही जाणिव किती मनोज्ञ आहे... सकल मानव्याच्या विश्वाचे आर्त ज्यांच्या मनी प्रकाशले अशा संत ज्ञानदेव-मुक्ताई ही भावंड आणि त्यांची परंपरा चालविणाऱ्या, सकल जनांची बहिणाबाई यांची ही कालातीत भाऊबीज आजच्या मुहूर्तावर !
बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४
वि-सर्जन...!
‘इतक्या वर्षांच्या या परंपरेची ‘मना’ला सवयच होत नाही बघ, दर वेळी कंठ दाटून येतो! तुझ्या, आणि अशा सणावारांच्या निमित्ताने घरी येणाऱ्या जिवलगांच्याही, सहवासाचे क्षण कापरासारखे उडून गेल्यासारखे वाटतात…!’
‘तू शेवटी तत्वमसि… बुद्धीची देवता! तत्वज्ञानाचे दाखले देऊन आम्हां पामरांची समजूत काढणे तुला काय कठीण?’
‘प्रश्न समजुत काढण्याचा नाही, प्रश्न समजून घेण्याचा, सर्जन आणि वि-सर्जन दोघांचे भान असण्याचा आहे!’
‘म्हणजे?’
‘सांगतो.’
‘सप्तचिरंजीवांपैकी एक, पराशरपुत्र वेदमुनी महर्षी व्यासांनी वेद, पुराणं, महाभारत अशा अनेक प्राज्ञ रचना केल्या. ब्रह्मदेवाच्या सल्ल्यानुसार लेखनिक म्हणून त्या कार्यात सहकार्य करण्याची त्यांनी मला विनंती केली. खरं सांगायचं तर हे काम करण्यास मी काही फारसा उत्सुक नव्हतो. ते शक्य तितके लवकर आटोपावे म्हणून मी अट घातली की त्यांनी अखंड, विनाविराम श्लोक रचित जावे जेणेकरून मला न थांबता माझे लेखनकार्य सत्वर सिद्धीस नेता येईल. माझी चलाखी महामुनींनी क्षणार्धात ओळखली आणि त्यांनीही एक अट घातली…
‘हे सगळे चमत्कारिक आणि अलैकिक आह! अर्थात हे महामुनी आणि बुद्धीदेवातले आदान-प्रदान असल्याने ते तसे असणारच म्हणा, आम्हां सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे…!’
‘मुळीच नाही! कुठलाही शास्त्रविचार हा विद्वत्ता मिरविण्यासाठी मांडला जात नसतो, तो अंतिमतः सर्वसामान्यांच्या हितासाठीच योजलेला असतो, फक्त जजमेंटल न होता आणि कुणालाही जज न करता तो समजून घेता यायला हवा.’
‘आता तूही आम्हांला ‘जज’ न करता यातले आमचे ‘हित’ समजून सांगितलेस तर बरे!’
‘असं बघ, खळखळत्या पाण्यासारखे प्रवाही जीवन हे सोप्या श्लोकांसारखे आहे, ते सहज, अखंड वाहत असते. पण प्रवाहाचा रेटा अनियंत्रित होऊन विनाशकारी ठरू नये म्हणून त्याचे नियोजन करणे, त्या प्रवाहाच्या वेगाला कुठेतरी बांध घालणे आवश्यक असते. ते नियमन, तो बांध म्हणजे अवघड श्लोक, जे वाटेत आले म्हणून गडबडून जायचं नसतं, त्या निमित्ताने आपली जाण, आपले भान अधिक सजग करायचे असते. मिळालेला वेळ, जे घडले त्याच्या विश्लेषणात, अन्वयार्थ लावण्यात, समजून घेण्यात सत्कारणी लावायचा असतो.’
‘म्हणजे आमच्या सिग्नल किंवा स्पीडब्रेकर्ससारखं म्हण की, देवा!’
‘मलाही ती प्रतिमा वापरण्याचा मोह झाला होता, पण त्या वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या रंगात भेद न करणारे उदंड रंगनिरपेक्ष वाहनचालक आणि काही काही अशास्त्रीय तथा विध्वंसक गतिरोधक पाहून - ते वाहनांची गती रोखण्यासाठी आहेत, समस्त वाहनच निर्दाळण्यासाठी आहेत की चालकाच्या मेरुदंडाची परीक्षा घेण्यासाठी - हे न कळल्याने मी तो मोह टाळला. असो.’
‘देवा, तुझीही विनोदबुद्धी दूरदर्शनवरील हास्यास्पद कार्यक्रम बघून फारच तल्लख झालेली दिसते. तर तू सांगत होतास…’
‘हो, उगाच राजकारण्यांसारखं विषय भरकटवू नकोस! खरी गंमत तर पुढेच आहे.’
‘यात गंमतही आहे?’
‘ती असतेच, फक्त पाहण्याची निकोप, मिश्किल दृष्टी हवी!’
‘तर असे आमचे लेखनकार्य सुरु असतांना, सतत लिहिण्याच्या ताणाने म्हण किंवा जे लिहितो आहे त्याच्या आशयभाराने म्हण, माझी पिसाची लेखणी मोडली!’
‘काहीतरीच काय देवा, तुझी लेखणी मोडायला तो काय चायनीज स्वस्त आणि टाकाऊ बॉलपेन होता काय?’
‘अरे, गोष्टी पडायच्या, मोडायचा किंवा कोसळायच्या असतात तेव्हा कसलेही निमित्त पुरते, समुद्र किनाऱ्यावरच्या खोपटाचे झावळ्यांचे छप्परही न उडवू शकणाऱ्या वाऱ्याच्या वेगाचे देखील… काय समजलास?’
‘…आणि त्यायोगे आणखी काहीतरी भव्यदिव्य घडणार असते, ते मी विसरलोच! सॉरी, काहीही जज करायचं नाही असं ठरलंय नाही का आपलं, चुकलो!’
‘तर मुद्दा असा की माझी लेखणी मोडली पण दिलेल्या शब्दाला जागणे भाग होते. तेंव्हा स्वीकृत जबाबदारीत हेळसांड नको आणि तत्परतेने काही करायला हवे म्हणून मी माझा एक दात उपटून काढला आणि त्याची लेखणी केली. त्यामुळे तेव्हापासून मला ‘एकदन्त’ हे नवीनच नामाभिदान मिळाले ते वेगळेच.’
‘तू पण ग्रेटच आहेस हं देवा! साधी सही करायला सुद्धा दुसऱ्याचे पेन वापरणाऱ्या आणि जमले तर ते आपल्याच खिशाला लावून घेणाऱ्या आम्हां माणसांकडून तू काहीच कसे शिकत नाहीस? चक्क स्वतःचाच दात उपटलास? सतत दुसऱ्याचे दात उपटण्यात किंवा त्याच्याच घशात घालण्यास सिद्ध असलेल्या मानवांकडून एखादीतरी ‘सिद्धी’ मिळवायचीस!’
‘लेको, तुम्ही कितीही फाजील लाडाने ‘बाप्पा, बाप्पा’ करून मला माणसावळण्याचा प्रयत्न केलात तरी मला पार्थिवातही माझे देवत्व जपायला नको? आपला ‘धर्म’ पाळायला नको? ‘सारेच करतात!’ आणि ‘चलता है!’ म्हणत, निष्ठा-मूल्य-तत्व सोयीस्कररीत्या मागच्या खिशात टाकून कळपात सामील व्हायला आणि खुर्चीवर बसतांना ते पडलेच तर, ‘गडबडीत कुठे हरवले कुणास ठाऊक!’ म्हणायला मी ना हाडामांसाचा मानव आहे ना हाडाचा राजकारणी! आणि ‘सिद्धी’च कौतुक तू मला नको सांगूस…!’
‘सॉरी देवा, माणसांत राहून त्यांच्यासारखा क्षुद्र विचार करायची सवय झाल्याने माझ्याकडून आगळीक झाली. वन्स अगेन माय सिन्सिअर अपॉलॉजी. तू नसलास तरी मी मर्त्य मानवच असल्याने माफी मागून मोकळं होण्याची सिद्धी मी साधलीय… त्यांच्याकडून!’
‘असो! या विषयांना ना खोली आहे, ना अंत, ना अर्थ, निष्कारण माझा खोळंबा तेवढा व्हायचा, निघू दे आता मला…’
‘हो, तुला आत्ता निरोप दिल्याशिवाय, ‘पुढच्या वर्षी लवकर या' कसे म्हणणार…? पण ते गमतीचं काय?’
‘कुठल्या गमतीचं?’
‘तू देणार होतास ना जातांना, विसरलास?’
‘अरे, आपले आगत-स्वागत-कौतुक होत असतांना हुरळून जाऊन तोंडाला येईल ते बोलायला आणि वेळ आली की ‘तो मी नव्हेच’ म्हणायला मी अजून कुठलीच नाटक कंपनी जॉईन केली नाहीये आणि कुठलाच फॉर्म भरला नाहीये. शिवाय, ना मी व्यापारी आहे ना दलाल. मी माझ्या भक्ताला फसवेन कसा? तर ती गंमत म्हणजे… विवेक!’
‘विवेक…?’
‘हो, विवेक!
आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बेगडी काळात, दिसते किंवा कानावर पडते त्यावर भक्तिभावाने अंधविश्वास न ठेवता ते अभ्यासाने पारखून पाहण्याचा… विवेक!
आयुष्यात अडचणीचे प्रसंग आले की विमनस्कता दाटून येणारच. अशा परीक्षा पाहणाऱ्या क्षणांना गुरु करण्याचा… विवेक!
आपल्या जीवनधारणांशी प्रामाणिक राहून आपली स्वीकृत जबाबदारी निष्ठेने, प्रेरणेने आणि चिकाटीने पार पाडण्याचा… विवेक!
‘परिवर्तन ही संसार का नियम है’ - सर्जनाबरोबर विसर्जनही येते याचे भान ठेवून संयम बाळगण्याचा, धीरोदात्तपणे प्राप्त परिस्थिती स्वीकारण्याचा… विवेक!
महाभारताच्या युद्धामध्ये, दानशूर, धुरंधर योद्धा आणि अर्जुनापेक्षा कणभर सरसच असलेल्या कर्णाचा पराजय काय सांगतो. सतत इतरांची असूया, इर्षेने वाढणारा द्वेष, जे आपले नाही ते बळकविण्यासाठी संघर्षाची खुमखमी बाळगली तर विवेकाचा नाश होतो आणि विनाशाला आमंत्रण होते. म्हणून धैर्य-शौर्याबरोबर जपायचा तो… विवेक!
‘विश्वाचे आर्त…’ जाणून ज्ञानदेवांनी केलेली विश्वप्रार्थना आणि ‘बुडतां हे जन न देखवे डोळां’ हे तुकोबारायांचे समाजभान जागृत ठेवून स्वयंप्रेरणेने जनजागृतीसाठी जो जागर करता येईल तो करत राहण्याचा… विवेक!
‘देवा, आपल्या ऋणानुबंधातले, ऋण सारे तुझे आणि बंध सारे माझे हे आज मला नव्याने जाणवले… मधले ‘अनु’सरणीय ते शोधण्याचा माझा प्रयत्न असाच निरंतर चालू राहील, लेखणीला तुझा आशिर्वाद तेवढा असू दे…’
शनिवार, ७ सप्टेंबर, २०२४
स्वागत...!
‘दहा दिवसांसाठी पाहुणा म्हणून आला आहेस, उगाच आमच्या भोगांच्या खोलात नको शिरूस. मस्त रहा, मजा कर! ढोल-ताशे, गाणी ऐक, आवडतील त्या फ्लेवरचे मोदक मनसोक्त खा, भक्तांना आशीर्वाद दे आणि आपल्या घरी रवाना हो. आम्हाला आमचे जिणं भोगू… आपलं, जगू दे!’
गाव-खेडे किंवा छोटे-मोठे शहर नाही, ‘स्मार्ट सिटी’ म्हटल्या जाणाऱ्या शहरांच्या रस्त्यांची आणि वाहतुकीची ही दयनीय, शोचनीय अवस्था…
नाल्यांवर होणाऱ्या अतिक्रमणांनी पाण्याचे बदलते प्रवाह आणि ओढे-नाल्यांपेक्षा वाईट अवस्था नदीची, समुद्राची आणि एकूणच पर्यावरणाची…
सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरांमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यांसारखे रोज वाढणारे गंभीर, हिडीस गुन्हे…
महापुरुषांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करण्यास जराही न कचरणारे आणि शक्तिप्रदर्शनासाठी वाट्टेल त्या थराला जाणारे वाचाळ, संवेदनाहीन, अविवेकी राजकारणी…
कशा कशाला ठिगळं लावायचं आणि कुणी…?’
‘तू फारच त्रासलेला दिसतोस साऱ्या परिस्थितीने? अशा उद्विग्न मनाने माझं स्वागत करणार आहेस…?’
‘वेडा आहेस का? माफी कसली मागतोस…? मला काय तुझी मनस्थिती समजत नाही? आणि तू मला नाही तर कुणाला सांगणार आहेस…?’
पुढचे दहा दिवस या कशाचाही विचार न करता निखळ, निकोप मनाने माझा पाहुणचार करायचा.
रविवार, २५ ऑगस्ट, २०२४
रफू...!
हे ओरखडे कसले
अनुभवांनी जाणिवांवर घातलेले घाव
की मला घडवण्याचा आयुष्याचा प्रयत्न…?
आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने नेहमीप्रमाणे कालपासूनच शुभेच्छांचा ओघ सुरु झाला. गुगल, जीमेलचे आपल्या लॉगीनला रंग उधळत शुभेच्छा देण्याचे पर्सनलाइज्ड जेस्चर असो, आपण ज्या ज्या गोष्टीत ‘इन्व्हेस्ट’ केले आहे त्या ‘म्युच्युअल’ रिलेशनच्या कराराला जागून आपल्या विशेष ‘फंडां’ची… आपलं, दिवसांची नोंद ठेऊन ऑटोमेटेड का होईना शुभेच्छा वेळच्या वेळी पाठवणारे अत्यंत व्यावहारिक संबंध असोत की कुठल्याच विधिनिषेध, नीतिनियमांची तमा न बाळगता थेट ‘मना’ला भिडणारे तरल भावगर्भ काव्यमय ऋणानुबंध असोत… कुठ्ल्याही सदिच्छांनी एक वेगळीच ताकद, एक अनामिक ऊर्जा, एक अक्षय्य उमेद आणि निखळ आनंद मिळतो हे निश्चित! एसेमेस, फोन आणि सोशल मीडियावरील संदेश हे औक्षणाचे तबक असले आणि त्यांना बर्थडे केकची गोडी असली तरी स्वहस्ताक्षरातल्या पत्ररूपी काव्यात्म शुभेच्छा या, औक्षणाच्या तबकातल्या तेज:पुंज दिव्यासारख्या मुहूर्ताचा क्षण अन क्षण झळाळून टाकतात… मंगल, उत्फुल्ल, प्रकाशमान करतात; केकवरल्या आईसिंग आणि चेरीच्या अवीट माधुर्यासारख्या!
सन्मित्र दिनाने आमच्या पत्रव्यवहारात पडलेल्या बऱ्याच काळाच्या खंडानंतर, मधली दरी सांधून घेण्यासाठी बर्थडे गिफ्ट म्हणून जो पूल बांधला त्यावर किती झुलावे आणि किती नाही असे झालेय. शिवाय हे त्याचे छापील हस्ताक्षरातले पत्र त्याने अगदी मुहूर्तावर स्वहस्तेच डिलिव्हर केल्याने त्याची खुमारी अधिकच वाढली. त्या पत्रात जागोजागी पेरलेल्या चारोळ्या माझ्याच काही जुन्या अभिव्यक्ती असल्याने त्या इथे पुन्हा उधृत करण्यात काही हशील नाही. तथापि दिनाने या निमित्ताने केलेली कविता नवी, कोरी-करकरीत आणि आस्वादनीय असल्याने तिचा उल्लेख इथे आवश्यक ठरतो…
पर्णहीन झाडाने अबोल गूढ संदेश दिला
जाताजाता शिशिराने वसंतास मार्ग दिला.
वसंताची खोड जुनी, आल्या आल्या जातो म्हणाला
प्रफुल्लीत मोहर सृष्टीला अन् मोगऱ्यास गंध दिला.
ग्रीष्म झळाळे शाश्वत, सूर्यास आकाशी नेमला
पारावरल्या सावलीने, उन्हास टेकण्या आधार दिला
बरसण्यास आतुर ढग, आभाळी तुंबला
रोमारोमात भरून घेण्या, वर्षावाने मग थेंब दिला
नवरात्र शरदाची रंगीत, उत्सवाचा भरवी मेळा
कोजागिरीच्या आभाळास, शुभ्र दुधाळ चंद्र दिला
हुडहुडीला उब शेकोटीची, पहाटेस उटणे अभ्यंगाला
फराळाच्या ताटासोबत, हेमंताने स्नेहभाव दिला
गुच्छ सहा ऋतूंचा असा, ‘मना’स मी अर्पिला
आनंदाच्या दिवसासाठी, कवितेत गुंफून शब्द दिला !
नेहमीप्रमाणे दिनाने प्रेरणा आणि क्ल्यू दिल्यावर मला कविता न रचून कसे चालेल…?
तेंव्हा आजच्या निमित्ताने आजवरच्या आयुष्याने दिलेली ही शहाणीव…
चिरंजीव…?
निरंतर वाहणे हेच जीवन
तुंबून साचण्याचा सोस कशाला,
सुख कुठलेच नसते चिरंजीव
गमावले त्याचा अफसोस कशाला!
जन्म-मृत्यू एका श्वासाचे अंतर
धरून ठेवण्याचा अट्टाहास कशाला,
‘मना’स रमण्याची साधने कितीक
जे न साधते त्याचा उपहास कशाला!
सृजन जर हे स्वान्त-सुखाय
हवी उसनी ती दाद कशाला,
भरभरून मिळता सौख्य जगण्याचे
जे निसटले त्याची मोजदाद कशाला…?
गेल्या रविवारी वयाची नव्वदी पूर्ण केलेल्या गुलझार सरांचे शब्द आठवून वाढत्या वयात उमेद जोपासावी हे उत्तम…
“थोड़ा सा रफू करके देखिये ना,
फिर से नयी सी लगेगी,
ज़िन्दगी ही तो है…”
आजच्या प्रसंगी आठवणीने मला शुभेच्छा देणाऱ्या साऱ्या स्नेही-सुहृदांचे 'मना'पासून आभार!
स्नेह आहेच, तो निरंतर वृद्धिंगत व्हावा हीच अपेक्षा...
शुभम भवतु !
रविवार, १० मार्च, २०२४
गुफ्तगू ...!
कई रोजकी खयालोंसे
मन के अलमारीयोंमें जो बंद रखें हुए हैं !
वो पल जिसमें सुकून और शांती होती थी
जब हम मासूम और खुश हुआ करते थे,
जब सबके चेहरोंपर नकाब नहीं थे,
जब हम आझाद थे, बंधे हुए थे सिर्फ मनमर्जीयोंसे !
बस ढुंढता रहता हैं मन उन्हें,
जिंदगीके खामोशीयोंमें…!







