रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

गझल आरतीचा...


श्रीयुत चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांच्या मातोश्री कोकणातल्या कुठल्याशा गावात खानावळ चालवीत. हे महाशय तेथें गल्ल्यावर बसून कविता करीत. खानावळीत जेवायला येणाऱ्या काही काव्यरसिकांनी त्यांच्या कविता म्हणे चोरून ‘मौज’मध्ये प्रकाशनासाठी ‘आरती प्रभू’ या नावाने धाडून दिल्या आणि त्या चक्क छापून आल्या. एवढेच नव्हे तर रसिकांना खूपच भावल्या देखील आणि मराठी सारस्वताला ‘आरती’ विना हा ‘प्रभू’ गमला...! विंदानी आपल्या या सन्मित्राला उद्देशून एक कविता लिहिली आणि ती वाचतांना गझलच्या अंगाने गेल्यासारखी वाटली म्हणून तिचे नामकरण केले, ‘गझल आरतीचा!’... तोच हा गझल...

निस्तब्ध टिंबाभोवती बिंबावले ज्याचें जिणे
त्याची न निरखा पाऊले; काही अती, काही उणे.

ज्याला अनोखे जाहले हे ओळखीचे चेहरे,
त्याच्या खुळ्या शब्दांतुनी त्याची कथा का शोधणे?

आकाश कातळ जाहले तेव्हाच पूरहि संपला;
धरित परके वाहते; काठास का तें आणणे?

शोधीत गेली जी गती आकाशगंगेची मुळें,
कां तिला या फूटपट्या लाकडाच्या लावणे?

ध्यास नव्हता त्याजला तुमचें भलें करीनसा;
उसनी भलाई कासया पदरांत त्यांच्या बांधणे?

अध्यास ध्यासाचाच तो; श्वास तो असण्यांतला;
उपकार श्वासाचे न या निश्वास सोडुन संपणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा