सोमवार, २८ मे, २०१८

तात्याराव...!

स्वतंत्र भारत आणि मातृभूमीच्या प्रेमास समर्पित विशिष्ट हिंदुत्वाचा विचार मांडणारे, आद्य क्रांतिकारक, धीरोद्दात्त स्वातंत्र्यसेनानी, मुत्सद्दी राजकारणी, विद्याननिष्ठ तत्वज्ञ, जातीअंताचे तत्वज्ञान मांडणारे समाजसुधारकांचे प्रणेते आणि असीम प्रतिभा तथा अफाट बुद्धिमत्ता यांचा अनोखा संगम असलेले भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धीचे चळवळींचे द्रष्टे धुरीण - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उर्फ तात्याराव यांची आज १३५वी जयंती. 

‘१८५७चा स्वातंत्र्य समर’ या ग्रंथात या दैवी प्रतिभेच्या साहित्यिकाने, ब्रिटीशांनी ज्याचा 'फसलेले बंड' अशी नोंद करून बेदखल करण्याचा प्रयत्न केला, तो 'स्वातंत्र्यसंग्राम' कसा होता याची अत्यंत तर्कशुद्ध आणि शास्त्रीय मांडणी करून देशवासीयांच्या अस्मितेला केवळ आवाहनच केले नाही तर स्वातंत्र्यलढ्याच्या यज्ञकुंडातला वन्ही चेतविण्यासाठी आपल्या आयुष्याच्या समिधा केल्या.

ओजस्वी विचार, अमोघ वक्तृत्व, अभिजात प्रकटन, अलौकिक ध्येर्य आणि असाधारण प्रतिभा लाभलेल्या या एकमेवाव्द्वितीय पुरुषोत्तमाने सुमारे १०,००० पाने मराठीत आणि १,५०० पाने इंग्रजीत एवढे विपुल आणि समृद्ध लेखन केले आहे. ते वाचण्याचा, समजून घेण्याचा आणि आचरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हीच या महापुरुषास खरी आदरांजली ठरेल.

श्री. नित्सुरे सरांनी स्वातंत्र्यवीरांच्या १००व्या जयंती निमित्ताने रचलेली कविता आज या प्रसंगी स्वत: गाऊन दाखवली त्याचे चित्रीकरण सर्वांसाठी...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा