रविवार, १७ मे, २०२०

झू...!



निवांतपणे रवंथ करीत बसलेल्या उंटाच्या पिल्लाने अचानक काही सुचून आपल्या आईला विचारले,
‘आई, आपले पाय असे लांबडे, फताडे, पसरट का आहेत?’
‘बाळा, वाळवंटात धावतांना पाय वाळूत रुतून आपला वेग कमी होऊ नये म्हणून आपले पाय असे आहेत, बरं!’
थोड्या वेळाने आणखी काही सुचून पिल्लू म्हणाले,
’आई, आपल्या पापण्या या अशा एवढ्या जाड्याभरड्या आणि ओबडधोबड का आहेत; नाजूक, रेखीव का नाहीत?’
‘अरे, वाळवंटात कधीही वाळूचे वादळ सुटते, त्यामुळे उडणारी वाळू आपल्या डोळ्यात जाऊ नये, आपल्या डोळ्यांना त्यामुळे इजा होऊ नये म्हणून आपल्या डोळ्यांच्या सुरक्षेसाठी आपल्या पापण्या अशा आहेत!’
या उत्तराने समाधान झालेसे वाटून गप्प झालेले पिल्लू थोड्या वेळाने पुन्हा म्हणाले,
‘आई, आपल्या पाठीवर हे असे भले मोठ्ठे कुबड का आहे, मला ते मुळीच आवडत नाही! घोड्यासारखी आपली पाठ तुळतुळीत का नाही?’
‘बेटा, वाळवंटात पाण्याचं दुर्भिक्ष असते की नाही? दिवसेंदिवस पाणी न मिळता रहावे लागते. मग अशा काळात तहानेने आपला जीव जाऊ नये म्हणून आपण पाठीवरील या कुबडात पाणी साठवून ठेऊ शकतो, नाही का?’

पिल्लाला खुपणाऱ्या आपल्या सगळ्या शारीरिक व्यंगांचे महत्व आईने समजावून सांगितल्यावर पिल्लाला अगदी वेगळाच आणि भलताच भाबडा प्रश्न पडला...

‘आई, तू सांगतेयस ते सारे खरे असेल तर आपण इथे 'झू'मध्ये काय करतोय...?’

-----------------------------------------------------------------------

प्राप्त परिस्थितीत, कुंठीत झालेल्या बुद्धीला आणि गोठलेल्या भावनांना विधायक दिशा आणि कृतीशील  विचार देण्याशिवाय या गोष्टीचे काहीही प्रयोजन नाही आणि आपल्या सभोवातली घडणाऱ्या घटना आणि त्यांचे स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय वा जागतिक पातळीवर तथा आर्थिक, सामाजिक, राजकीय परिप्रेक्ष्यातील पडसाद यांच्याशी काही अनुषंगिक संदर्भ आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा