रविवार, ३ मे, २०२०

सृजन...!


कुठलाही आघात कधी
कालजयी ठरू नये;
बाकी सारे संपले तरी
कवितेने मरू नये...!

मायेचा पान्हा आटला,
कवितेत विषाद दाटला;
शिगोशिग भरले जरी
दु:ख आत झरू नये...!

‘मना’ला कधी मरगळ येईल
उदासवाणे सारे होईल;
कवितेने गोंजारता मात्र
डोळे पुन्हा भरू नये...!

प्रवास लांबचा वाटला,
एकटेपणाही दाटला;
कवितेची पायवाट
पायी कधी सरू नये...!

दु:ख आभाळाएव्हढे,
मनी आक्रंदून वाहे;
कविता उसासली जरी
सल उरी उरू नये...!

काळ कठीण भासला,
वाट सुचेना जाहले;
कवितेला साथ घ्यावे
मनी मुळी डरु नये...!

समोर डोंगर ठाकला,
रस्ता संपला वाटला;
वाट ठरली जागी जरी
कवितेने ठरू नये...!

भरकटेल कधी थोडी
थकेलीही कधी मधी;
व्यवहाराने कवितेला
तरी कधी वरू नये...!

कविता म्हणजे श्वास असतो
कविता म्हणजे आशावाद;
कविता रुसली कधी तरी
रुसवा मनी धरू नये...!

कविता बोलते, कविता गाते
नाचते कविता बेभान होऊन;
हरेलही कविता कधी पण
काव्य कधी हरू नये...!

शिशिरात पानगळ
पुन्हा वसंता बहर;
सृजनाचा द्रोह कधी
कवितेने करू नये...!

कुठलाही आघात कधी
कालजयी ठरू नये;
बाकी सारे संपले तरी
कवितेने मरू नये...!

[सन्मित्र दिनेशच्या प्रेरणेस अर्पण]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा