शनिवार, २० जानेवारी, २०१८

रे खिन्न मना...!



‘मरणात खरोखर जग जगते...’ केवळ चार शब्दात समग्र मानवी आयुष्याचा आशय मांडणाऱ्या कवीची ताकद त्याच्या अत्यंत प्रभावी आणि समृद्ध शब्दांनी ‘जगण्याला’ सहज कवेत घेते! हे लिहिणाऱ्या भा. रा. तांब्यांच्या, अशाच एका आशय’घन’ रचनेला पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरसाज चढवून मराठी भावविश्वात अजरामर केले. अलीकडे आलेल्या ‘हाय वे – एक सेल्फी आरपार’ या उमेश कुलकर्णीच्या आणखी एका दर्जेदार निर्मितीच्या माध्यमातून आणि, चेहऱ्याइतकाच गळ्यातही गोडवा असलेल्या, रेणुका शहाणे यांच्या गुणगुण्यातून या जवळपासविस्मृतीत गेलेल्या गीताला स्मृतीपटलावर प्रवेश मिळाला होताचं; कालच्या सावनी रविंद्र प्रस्तुत ‘स्वर हृदयांतरी’मध्ये खुद्द पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांच्या तोंडून या भावगीताची महती निरुपण सदृश विवेचनातून ऐकतांना रसिकांना आपल्या भाग्याचा हेवा न वाटता तरच नवल! या गीतातील शेवटचा अंतरा सहसा गायला जात नाही अशी खंत व्यक्त करतांना पंडितजींनी तो संपूर्ण अंतरा विशद करून दाखविला आणि तो ऐकतांना आम्हाला वात्सल्य, प्रेम, प्रपंच, अध्यात्म असा सगळा भावानुभव एकत्रित मिळाला याचे कारण सूज्ञांस सांगणे न लगे...!

भा. रा. तांबेच्या ज्या गीताच्या नमनाला हे घडाभर तेल घातले ते गीत...

‘घन तमीं शुक्र बघ राज्य करी,
रे खिन्न मना, बघ जरा तरी...!’

आणि सहसा स्वरांत न गुंफलेला हा शेवटचा अंतरा...

'मना, वृथा कां भीशी मरणा?
दार सुखाचें तें हरि–करुणा!
आई पाही वाट रे मना,
पसरोनी बाहु कवळण्या उरीं...'


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा