बुधवार, ३ जानेवारी, २०१८

जाग...!

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही विदारक सामाजिक परिस्थिती, सुशिक्षित समाजाची संस्कारहीन वर्तणूक, 
'विकसित' देशाचे 'भारत' आणि 'इंडिया' हे सर्वमान्य विभाजन असे विचलीत करणारे वास्तव आणि 
समाजमन दुभंगण्याची साक्ष देणाऱ्या ताज्या घटना या पार्श्वभूमीवर; 
भारतातील शालेय शिक्षणाच्या आणि स्त्री मुक्तीच्या आद्य पुरस्कर्त्या, 
जाणीवजागृतीसाठी काव्यलेखन करणाऱ्या आणि सर्व स्तरावरील समस्त घटकांच्या तीव्र विरोधाची पर्वा न करता आपले कार्य अखंड चालू ठेवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रिबाई फुलेंचा आज १८७ वा जन्मदिन... 
त्यांच्या अलौकिक धैर्यास आणि अतुल्य कार्यास सादर समर्पित! 


कोण शुद्र कोण भद्र
माणूस पशुसम जगी,
व्यर्थ बलिदान सारे
विभागून द्वेष भोगी...!

नाही काही फरक जणू 
माणूस असो की तण,
एका काडीने येथे अन
वणवा पेटतो रणरण...!

संतांचे पुकार व्यर्थ होतील
आचरली ना जर शिकवण
नावातच भेद शोधता नित्य
पंथ उदंड वांझोटी वणवण...!

विवेक विचार वाढवावा
झेंडा हाती हाच गुन्हा,
मुर्दाड समाज भाळी
गुलामीच येईल पुन्हा...!

शिकल्या अडाणी जनांत
वैर भाव जागतो आहे,
इतिहास दोनशे वर्षांचा
आज जाग मागतो आहे...!

पुन्हा यावा शिवबा
मेली मने जागवाया
जन्मावी नवी सावित्री
माणूसपण शिकवाया...!

********

सावित्रीबाईंच्या स्मृतीस शतश: नमन...! त्यांचा असीम कर्तृत्वाचा हा अल्प परिचय...    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा