रविवार, ३ मार्च, २०१९

स्मृतीचिन्ह...!


विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यास कटिबद्ध असलेले आशा फाउंडेशनचे डॉ. एपीजे अब्दुल कलाम इनोव्हेशन सेन्टर. या सेंटरद्वारे आयोजित, ‘I have no special talent, I am only passionately curious!’ म्हणणारा जगविख्यात शास्त्रज्ञ Albert Einstein जे तत्व सांगू पाहतो ते, ‘विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला चालना देवून त्यांची creativity प्रत्यक्ष प्रयोगात आणणे’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ‘इमॅजीन इंडिया’ ही राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धा! ‘इमॅजीन इंडिया’ या राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेच्या पहिल्या वर्षीची theme ही ‘पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधून त्यांचे प्रत्यक्ष उपयोजन करणे’ अशी असल्याने या पहिल्यावहिल्या प्रयोगाची सांगता पुण्यात व्हावी आणि या समारंभाला शैक्षणिक, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन लाभावे अशी आमची इच्छा होती.

 


आमच्या इच्छेनुसार खरोखरच, पुण्यातील भारतीय विद्या भवनची ‘मुक्तांगण विज्ञान शोधिका’ Exploratory, वर्ध्याचे ‘बजाज सायन्स सेंटर’ यांच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेले आणि Olympiad साठी हजारो विद्यार्थ्यांना तयार करणारे श्री. सी. के. देसाई सर विज्ञान शिक्षक म्हणून तर Persistent समूहाचे CSR Projects Director श्री. श्रीपाद जोशी सर व्यवसाय व्यवस्थापन तज्ञ म्हणून लाभले. शिक्षण आणि व्यवसाय यांचा मेळ घालून समाजोपयोगी कार्यास वाहून घेतलेल्या संस्थांचे प्रतिनिधी म्हणून महर्षी स्त्री शिक्षण संस्थेचे सचिव श्री. पी. व्ही. एस शास्त्री सर आणि समाजातील सर्व थरातील, विविध पातळ्यांवरील भिन्न भिन्न क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण आणि परस्पर समन्वयन हे अत्यंत कौशल्याचे काम विवेकाने करणारे विवेक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेशजी पोहनेरकर हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.


 
जवळपास दोन महिने चाललेल्या या प्रकल्पातील अगदी संकल्पनेपासून समारोपापर्यंत माझा सक्रीय सहभाग ही खरतर कर्तव्यपूर्ती. त्यात माझे वेगळे विशेष असे योगदान काही नाही. तथापि केवळ माझ्यावरील निरपेक्ष स्नेहापोटी आणि व्यावहारिक संबंधांपेक्षा ‘न्यू सिटी हायस्कूलचे विद्यार्थी’ म्हणून झालेला संस्कार आणि गुरुबंधू हे नाते अधिक दृढ असल्याने गिरीशने माझाही सन्मान करणे उचित समजले असावे. खरे तर उपचार हा काही माझा प्रांत आणि मला मानवणारा विषय नव्हे. पण अशा प्रकारच्या प्रोत्साहनाने केलेल्या कामाचे सार्थक झाल्यासारखे वाटते हे नाकारून कसे चालेल? शिवाय स्पर्धेत सहभागी जिज्ञासूंच्या कल्पना आणि त्यावर अथक परिश्रम घेण्याची तयारी यामुळे तर सगळ्याच उपक्रमाचे चीज झाल्यासारखे वाटते आणि कितीही समस्या असल्या तरी त्यांवर उपाय शोधणारे नवसंशोधक innovators होतच राहतील याची ‘आशा’ वाटते आणि यंग ‘इंडिया’ सक्षम आहे या जाणीवेने अशा अजून शंभर उपक्रमांसाठी हजार हत्तींचे बळ मिळते!


रीत म्हणते की या (अनावश्यक) सन्मानासाठी गिरीश आणि ‘आशा’चे आभार मानावे, पण पुन्हा एकदा नाशिकच्या कविमनाच्या कलाकार मित्राचा सहारा...
आभाराचा भार कशाला,
आता फुलांचे हार कशाला!
हृदयामध्ये घर बांधू या,
अशा घराला दार कशाला!

आणि हो, जाता जाता एक महत्वाचा मुद्दा... आभार राहू देत पण ‘आशा’च्या संपूर्ण टीमचे मन:पूर्वक अभिनंदन आणि कौतुक! एका वेगळ्या मोठ्या, चिकित्सक आणि चोखंदळ शहरात जाऊन पहिलाच कार्यक्रम इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडणे म्हणजे चेष्टा नव्हे! केवळ ६ लोकांच्या टीमने हे साधणे म्हणजे टीम SHARP असावी लागते आणि ‘महोत्सव’ व ‘मेळावे’ यात आपापली भूमिका ‘अभिनित’ करण्याची कला साधलेली असावी लागते. Well done Team ‘आशा’, ‘Indeea’ is with you!
 
Thank you very much, All the best and a Very Long Way to Go…!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा