शनिवार, ८ मे, २०२१

शीर्षकगीत...!


भारताचा ५००० वर्षांचा इतिहास एका ग्रंथात सामाविणे हीच मुळात थोर कामगिरी. हे शिवधनुष्य पेलले पंडित जवाहरलाल नेहरू या स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया अशा अत्यंत सूचक व समर्पक ग्रंथाच्या रूपाने! कुठल्याही परंपरेचा बडेजाव किंवा सांस्कृतिक अभिनिवेषाशिवाय भारताचा भूतकाळ अत्यंत साक्षेपी पद्धतीने मांडण्याच्या आणि तो भारताच्या आजबरोबरच उद्याशीही जोडून देण्याच्या त्यांच्या या द्रष्टया प्रयत्नाला सोन्याचे कोंदण दिले ते श्याम बेनेगल या अत्यंत प्रतिभावंत, मर्मग्राही आणि विचक्षण दिग्दर्शकाने! आणि, आम्हाला आमच्या संस्कारक्षम वयात अतिशय प्रगल्भ अशा संस्कारांनी मूल्यशिक्षणाची जी पर्वणी लाभली तिच्यात एक अमूल्य भर पडली भारत एक खोज! उण्यापुऱ्या ५२ भागांच्या या मालिकेने आमचे शालेय जीवन तर समृद्ध केलेच पण आम्हाला आपल्या स्वत:च्या संपृक्त इतिहासाची जाणीव करून देवून आमचे जगण्याचे भान विस्तारले, आम्हाला शोध घेण्याची, स्वतंत्र, वेगळा विचार करण्याची सवयही लावली आणि गोडीही!

मुळातच संहितेपासून सादरीकरणापर्यंत अगदीच विलक्षण असलेल्या (आपादमस्तक निळ्या रंगात रंगविलेला कृष्ण – सलीम घोस, नसीरउद्दीन शाह यांनी साकारलेले शिवाजी महाराज आणि ओम पुरींनी जीवंत केलेला औरंगजेब, हे आजच्या भारतीय सामाजिक अवकाशाच्या संदर्भात निषेधार्य ठरणारच नाही असे नाही!) या प्रयोगातून आमची साहित्यिक-सांस्कृतिक वाढ तर झालीच पण त्यानिमित्ताने आम्हाला दृकश्राव्य माध्यमाची एक वेगळीच जाण विकसित व्हायला मदत झाली. अत्यंत मर्यादित साधन-सुविधांच्या आधारे, एका अभ्यासपूर्ण संहितेची विवेकी हाताळणी करून काहीतरी अभिजात घडवता येते याचा वस्तुपाठ आम्हाला ज्या अनेक उपक्रमातून मिळाला त्यात ‘भारत एक खोज’चे नाव नेहमीच अग्रभागी राहील. आणि हे नमनाला घडाभर तेल ज्यासाठी घातले ते ‘भारत एक खोज’चे शीर्षक गीत अर्थात टायटल सॉन्ग...

एवढ्या सशक्त रचनेला, तत्कालीन भारतीय मनाला पटेल, पचेल आणि रुचेल असे नाट्यरूपांतरण करणे हेच अत्यंत अद्भुत, उल्लेखनीय आणि वंदनीय कार्य, त्याला चार चाँद लागले ते त्याच्या शीर्षक गीताने. ब्रह्मांडच्या निर्मितीचा ऊहापोह करणाऱ्या, ऋग्वेदातील नासदीय सूक्ताच्या एका ऋचेची यासाठी योजना करण्याची कल्पना ज्याला सुचली त्या निर्मात्याच्या संवेदनशील प्रज्ञेची केवळ कल्पनाच करता येईल आणि तिला शतश: नमन करता येईल! सृष्टीचा कर्ता कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणारी ही ऋचा खऱ्या अर्थाने आदिम – आद्या, आत्मरूपा, स्वसंवेद्या आणि वेदप्रतिपाद्या ठरावी. शब्दांनीच गारुड करावे अशी ही रचना पण तिची मोहिनी अधिकच गर्द गहीरी केली ती तिला लाभलेल्या अक्षरश: स्वर्गीय स्वरसाजाने! ही किमया साधली ती अलौकिक प्रतिभेचा धनी असलेल्या अवलिया संगीतकार  वनराज भाटीया यांनी... काल वयाच्या ९३ व्या वर्षी या किमायागाराने या जगाचा निरोप घेतला आणि त्या निमित्ताने, लहानपणी एका वर्षात ५२ वेळा ऐकलेला आणि संगणकावर हवे ते बघण्याची, ऐकण्याची युक्ती सापडल्यावर आम्ही प्रभातगीतांची जी सूची बनवली त्यात मानाचे स्थान मिळवल्याने, गेली सुमारे १२-१५ वर्षे जवळपास रोज सकाळी कानावर पडणाऱ्या या फिलॉसॉफिकल लीरिक्स आणि फिनॉमिनल मेलडीनीने आठवणींचा आणि ‘मना’चाही तळ ढवळून काढला...

जे आमच्या भावनांशी तादात्म्य पावू शकतील त्यांच्यासाठी निखळ आनंदाचा पुन:प्रत्यय म्हणून आणि ज्यांना अद्याप या विषयाची ओळखही नाही त्यांच्यासाठी एका अमूल्य खजिन्याची चावी म्हणून, भारत एक खोज चे संपूर्ण शीर्षक गीत इथे देत आहे... त्याचा शब्द अन् शब्द आणि स्वर अन् स्वर रंध्री भरून घेणे हीच त्या अगाध प्रतिभेच्या संगीतकाराला स्वरांजली...                       

सृष्टी से पहले सत् नहीं था
असत् भी नहीं 
अन्तरिक्ष भी नहीं 
आकाश भी नहीं था 
छिपा था क्या
कहाँकिसने ढका था
उस पल तो अगम अतल जल भी कहाँ था?

1 टिप्पणी: