सोमवार, २० मार्च, २०२३

चिवचिवाट...?

चित्र: वैभव पुराणिक, नासिक 

चार वर्षांपूर्वी आजच्या जागतिक चिमणी दिवशी लिहिलेल्या 'चिऊताई...!' या पोस्टची आठवण झाली ती सन्मित्र शामने चिमण्यांची ठवण करून दिलेल्या इंद्रजित भालेराव यांच्या या हृद्य कवितेने...

बाप म्हणायचा काढलेली नखं
दारात कधीच नयेत टाकू
दाणे समजून खातात चिमण्या
आणि मरतात आतडी फाटू फाटू

सुगी संपली की बाप
देवळात नेऊन कणसं बांधायचा
सुगीत हाकललेल्या चिमण्यांसाठी
पाण्याचं मडकं बांधून पुण्य सांधायचा

पाखरं असल्या तरी ओळखायच्या
बापाच्या मनीचा भाव
तेव्हा सुगी संपली तरीही
चिमण्या सोडीत नसायच्या गाव 

अंगणातले दाणे टिपायला आता चिमण्या येत नाहीत कारण (प्र)गतीशील माणसाला ना अंगण उरलं ना त्यात बागडणाऱ्या चिमण्या. अलिकडे बाळाला घास भरवायला, जोजवायाला चिऊ-काऊची गरजच उरली नाही, मोबाईलवर क्लिक केलं की हव्या तेवढ्या चिमण्या आणि हवा तेवढा चिवचिवाट... असा आभासी संस्कार पिढी घडवेल...?

आजच्या 'मटा गोल्ड'मध्ये खुद्द चिमणीनेच 'काय चाल्लंय काय...' हा माणसाला पत्रातून विचारलेला प्रश्न ऐकून थोडतरी अंतर्मुख व्हायला होत का बघा...!

1 टिप्पणी: