बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

बाबा...!

मुरलीधर देविदास अर्थात बाबा आमटे यांची आज १०४ वी जयंती. 'आधुनिक भारताचे संत' असा सार्थ सन्मान लाभलेल्या बाबांचे कुष्ठरोग निर्मुलन, नर्मदा बचाओ आंदोलन तथा वन्यजीवन संरक्षण यातील अलौकिक कार्य अवघ्या जगाला ठाऊक आहे आणि हेमलकसा आणि आनंदवन येथे बाबांची चौथी पिढी या महान कार्याची पताका आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलते आहे. आज गुगलने देखील आपल्या डूडलच्या माध्यमातून बाबांना आदरांजली देत त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे, त्याबद्दल गुगलचे अभिनंदन आणि आभार!



बाबांनी आपल्या कार्यात व्यस्त असतांनाच वाचन, लिखाण, भ्रमंती आणि विविध  प्रांतात जावून लोकांना भेटणे देखील सातत्याने सुरु ठेवले होते. यामुळेच अमृतसरच्या सुवर्णमंदिरातील खलिस्तानवादी नंग्या तलवारी चमकवणाऱ्या शिखांच्या गराड्यातील निर्भय, निडर आणि अविचल बाबांच्या असामान्यत्वाचे किस्से अत्यंत नतमस्तक भावाने सांगू शकतात.

बाबांनी ज्या कविता केल्या त्यांचा संग्रह 'ज्वाला आणि फुले' अशा अत्यंत समर्पक नावाने प्रसिद्ध झाला आणि रसिकांची दादही मिळवून गेला. हा संपूर्ण संग्रहच केवळ वाचनीय आणि संग्रहणीयच नाही अक्षरश: प्रात:स्मरणीय आणि संपूर्णत: अनुकरणीय आहे. या संग्रहातील माझी सगळ्यात आवडती मुक्त छंदातील कविता आज बाबांच्या स्मृतिप्रित्यर्थ...

गांधी : एक युगाचा चेहरा
ज्यांच्या  नजरेला तो जगत असलेल्या शतकाची हिंस्त्र स्वप्ने कैद करू शकली नाहीत
आणि इतिहासाच्या दर्पणात ज्याच्या समर्पणाचीच प्रतिमा भावी पिढ्यांना दिसेल, असा.

गांधी: एक हिमनग
धृवभूमीवरून शितप्रवाहांच्या सोबतीने व उष्ण्वृत्तांच्या रोखाने निघालेला
ज्याचे प्रचंड प्राचीन सात अष्टमांश पाण्याखाली आणि जो फक्त एका ठेंगण्याश्या उंचवट्या इतका वर.

त्याने क्षितिजाशी डोके वर काढले तेव्हां अफाट समुद्रात वाट चुकल्यासारखे
बावळट वाटण्याइतपत साधे  सरळ त्याचे ध्यान होते.
तेव्हा पुष्कळांनी त्याच्याकडे गमतीने पाहून आपली करमणूक करून घेतली
पण त्याच तुच्छतेनं सर्व समुद्रावर राज्य करणाऱ्या जहाजांचा एक काफला जेव्हा त्याच्यावर चालून गेला
तेव्हां जगाने असे पाहिले की त्या हिमनगाच्या चेहेऱ्यावरचे बालिश हास्य ढळलेले नाही
आणि त्या लढाऊ जहाजांना जलसमाधी मिळालेली आहे.

गांधी: एक कलाकार,
देश एका कोऱ्या चित्रफलकासारखा त्याच्यासमोर होता.
आणि त्या रीत्या चौकटीने त्याला बैचैन केलं होते, आव्हानिले होते.
कुंचला घेतलेला त्याचा हात प्रारंभी काहीसा थरथरत होता
तो पेलण्याचा आत्मविश्वास अजून आलेला नव्हता.
चित्रफलकावर तो टेकवण्याचे साहस अजून होत नव्हते.
म्हणून रंगत बुडवून त्याने दुसरीकडे कोठे तरी काही फटकारे ओढले.
अखेर रंगांची एक संगती त्याने साधली त्यात दारिद्र्याचा मिट्ट काळा रंग होता,
श्वेत राजनीती आणि गुढ निळे अध्यात्मही होते.
नव-विचारांच्या अनेक रंगच्छटाही होत्या.
पन्नाशी गाठता गाठता त्याला आपली स्वतःची रेषा - व्हर्जिन लाईन ऑफ क्शन - गवसली
आतून उचंबळणारा आपला टोन त्याला सापडला
सर्व गृहीतांच्या सरहद्दी पुढे ढकलणारा हाही एक पॉप आर्टिस्ट होता.
चार तपांच्या तयारीने दोन तपांच्या आत त्याने ते चित्र पुरे केले. 
एका युगमुद्रेचे चित्र !

जे एका देशाच्या चित्रफलकात मावू शकत नाही.
ज्यात एकीकडे राजधानीतल्या विजयोन्मादाचा दिखाऊ दीपोत्सव आहे
आणि दुसरीकडे रक्तलांछित अंधारात -
(जेव्हा छायाही घाबरून मागे सुटलेली, तेव्हा )
विश्वासानं काठी टेकीत टेकीत
धानाच्या बांधावरून तोल सावरीत निघालेली
एका कोटीशीर्ष विराट पुरुषाची वाटचाल आहे-
आणि एक गरजणारी नि:शब्दता आहे.
एक जहाज: बंदर गाठण्याच्या बेतात असतानाच
किनाऱ्यापाशी येऊन फसलेले.
आणि बरगड्यांना साखळ्या बांधून तो ते ओढीत आहे
एकटाच !
खेचू शकला नाही तो हे रुतलेले जहाज.
खेचण्याच्या प्रयत्नांत उर फुटून कोसळला.
नव्हे!
जहाज ओढण्याच्या शक्तीलाच
तो ओढण्याचा प्रयत्न न समजलेल्या
एका मुर्ख आवेगाने डागले !
आणि आजही ते जहाज तेथे वाट पाहत पडले आहे 
कोणी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रेन लावून
ते ओढण्याचा प्रयत्न केला आहे.
कोणी मुक्तीसेनेची वाट पाहत थांबले आहेत.
कोणी धर्मचक्र फिरवून या जहाजाचे चक्र 
फिरवण्याच्या प्रयत्नात आहेत.
कोणी ते कोळीष्टकातच फसले आहे असे समजून
अध्यात्माच्या हलक्या हातांनी ते काढू पाहताहेत.
हा गुंतावळा काढण्यासाठी ते जातात
आणि फक्त एक गोतावळा जमा करतात!
आणि सोडवण्याचे श्रेय कोणाला - म्हणून आधीच
आपसात भांडत सुटतात!!

स्वराज्यात जन्मलेली पिढीच
हे रुतलेले जहाज काढू शकणार आहे
आणि जे त्या पिढीला पकडू शकतील
तेच त्याचे खरे वारसदार ठरणार आहेत.

तप्त शलाकेसारखी ही पिढी कोण पकडील?
ती पकडण्यासाठी हवी असते अलिप्त यांत्रीकाची हिकमत!
ही हिकमत त्याच्यात होती.
त्याने प्रथम एका मिठाच्या पुडीला हात घातला
आणि मग एक साम्राज्य
मिठाच्या सात समुद्रांपलीकडे फेकून दिले.
त्याने सुतातून सुरुवात केली
आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला.
याच साध्या सुताने त्याने एक पिढीच्या पिढी आणि 
एक देशच्या देश बांधून दाखवला
पण एक देशच्या देश आणि एक पिढीच्या पिढी पकडण्यासाठी
नुसतीच हिकमत पुरी पडत नाही
त्यासाठी ताकदही लागते
भारी वजनाचा एक क्रूस वाहण्याची ताकद!
गांधी: ती हिकमत असलेला मानव
आणि ती ताकद असलेला प्रेषित
अखेर एक मानवच तर होता.
त्याने सामान्य मानवासारखे प्रमाद केले
पण सामान्य माणूस जे कबुल करीत नाही
ते त्याने जगजाहीर केले!
माणसाच्या आदिम समस्यांशी
त्यालाही धडक द्यावी लागली
मानवाच्या वास्तवतेचे रूप बुरखा काढून पाहण्याचा
त्यानेही प्रयत्न केला
आणि या प्रयत्नात पहिल्यांदा
खुद्द आपला बुरखा त्याने फाडून फेकला!

बरगड्या दिसणाऱ्या त्याच्या छातीवर दोन बिरुदे होती;
आणि एक नंगा फकीर असल्यामुळे ती बिरुदे त्याच्या मांसालाच चिकटली होती.
त्यापैकी एक होते वेदनेचेआणि दुसरे विश्वासाचे.
वेदना हा वर्तमानाचा स्वीकार होता विश्वास हे भविष्याचे आश्वासन होते.
अखेरपर्यंत वेदना आणि विश्वास या दोन किना-यातून 
त्या संतमानवाचा प्राणनद वाहत गेला.
पण त्याला तिसराही एक किनारा होता
शाश्वताचा!
आणि या तिसर्या किनार्याने प्रारंभापासून दिली होती
एक परिपक्वता!
ही परिपक्वता असली
तरच आपल्या प्रेषितत्वाचे ओझे वाटत नाही.
आणि चेहऱ्यावर कायम वसलेले असते
ते तसले शिशुचे हास्य!
जे प्रेषिताला माणसाच्या जवळ ठेवते.
तेव्हांच तो नेत्यांचा नेता
आणि जेत्यांचा विजेता होतो.

सामान्य माणसावर त्याचा असामान्य विश्वास असतो
सामान्य माणसातली असामान्य साहसे तो जागवतो
आहेत त्याच साधनातून तो आपल्या युद्धनौका घडवतो
आणि मिळतील त्याच माणसातून तो
त्यांच्या काफिल्याचे कप्तान आणि खलाशीही तयार करतो.
तो समाजसखा होऊन येतो.
मित्रभावाशिवाय दुसरी कोणतीही जादू त्याच्याजवळ नसते
म्हणून त्याच्या इतकी लगट
अज्ञान समाजाशी दुसरा कोणीही करू शकत नाही.

समाजमातेच्या  गर्भातून महान कल्पनेचे सुदृढ मुल
बाहेर पडायचे असते
तेव्हा तिची वीण उसवण्याचीही शक्यता असते.
अशा वेळी तिचे दायित्व करणारा तोच असतो
स्वरांच्या गोंधळातून गोंधळी एक लय तयार करतो
तसेच गर्दीच्या गोंधळातून
त्याचे आव्हान मंत्र उमटतात

हा संतमानव मरगळलेल्या जीवनात
वसंत फुलवीत येतो.
नेते आणि जेते हे त्याची कडू-गोड फळे
गोळा करणारे असतात.
ते भारती ओहोटीचे स्वार असतात
त्याचे स्थान मात्र भरती-ओहोटीत वाट दाखवणाऱ्या
धृवासारखे निश्चल असते.
समाज त्याच्या पालख्या घेऊन
शतकानुशतके नाचत सुटतो
जगज्जेत्यांच्या जन्मतिथ्या मात्र
शाळकरी पोरांकडून घोकंपट्टी करून लक्षात ठेवाव्या लागतात !

तुमच्या आमच्या जीवनातली शक्ती प्रतिक्रियेत खर्च होते.
त्याच्या जवळ विशुद्ध क्रिया असते.
म्हणून धबधब्यापेक्षा हजारपट मोठी
श्रावणझडीची उंची त्याला दिसते!
रोग्यात तो योगी पाहतो
आणि अस्पृश्यात त्याला हरिजन दिसतो.
आणि म्हणून तो कर्मकांडी राहू शकत नाही.
जीवनाचे संदर्भ तोडून कृतींचे अर्थ तो लावीत नाही.
गफारखानांच्या मुलासाठी तो मांसाहाराची व्यवस्था करतो 
हिंसक क्रतीकारांच्या धैर्याची तो पूजा करतो.
आणि प्रतिस्पर्ध्यांशीही वागताना त्याची मान ताठ
पण माथा झुकलेला असतो.
म्हणून त्याच्या उपवासाने
त्याला प्रतिस्पर्ध्याच्या हृदयात वास मिळतो
त्याची विशुद्ध क्रिया नसली
तर उपवासाचा उपहास होतो !
(बहुधा अशा उपवासांचा उपद्रवही होत असतो.)
त्याचा मंत्र जवळ नसला
म्हणजे त्याच्या यंत्रावर विणलेली खादी 
वैफल्याची नग्नता झाकू शकत नाही.
आणि त्याच्या तत्वांचे घटपट करत चालणारे 
बौद्धिक हस्तमैथुन
समाधानाचा फक्त भास देऊ शकते.
त्याने निर्मिती होत नाही.
विकृती मात्र निर्माण होते...

पण खांद्यावर जेव्हा क्रूस असतो
आणि डोक्याला कफन गुंडाळून जेव्हा जीवन निघालेले असते
तेव्हा त्याचा श्वासाश्वासात संकल्प असतात.
त्याच्या आचाराच्या पायाशी सिधी लोळण घेत येतात.
आणि त्याच्या विचारातून क्रांतीचा जन्म होत असतो.

आपली भूमिका संपली
म्हणजे दैदिप्यमान मृत्यूने आसमंत उजळीत
तो निघून जातो
पण बेचिराख झालेली त्याची राखही हसत असते
आणि तिच्यातून कित्येक किंग आणि ड्यूबचेक उठत असतात.
ज्याला तो क्रूस वागवता येतो
त्याच्या सोबत बारा अनुयायी असले तरी त्याचे
प्रेषितत्व घाबरत नाही.
पण खांद्यावर क्रूस नसता कोणी बारा लाख बाजारबुणगे
घेऊन निघाला.
तरी त्याचा महंत होतो
आणि महंत फक्त गादी चालवू शकतात
मन्वंतरे घडवू शकत नाहीत
(नव्या युगाचा चेहेरा कोणत्याही जुन्या साच्यात
घडवला जाऊ शकत नाही.)

गांधी महात्म्य सांगून गांधी सांगता येणार नाही.
आणि उद्याच्या पिढ्यांना त्याची ओळख पटण्यासाठी
क्वचित कॉम्प्यूटर लागेल !
पण काळाच्या भाळावर उमटलेली
ही तप्त युगमुद्रा
कोणत्याही इतिहासाला पुसून काढता येणार नाही !

- बाबा आमटे
(ज्वाला आणि फुले)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा