मंगळवार, २५ जुलै, २०२३

शिरिषासन...!

बरोब्बर ५ वर्षांपूर्वी ६ जून २०१८ ला शिरीष कणेकर सरांना याच ठिकाणी त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त शतायुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या, त्यांच्याबद्दल इतक्या लवकर असं काही लिहावं लागेल असं दु:स्वप्नातही वाटलं नव्हतं. अर्थात कालाय तस्मै नमः म्हणून साऱ्याच गोष्टी पचवाव्याच लागतात. अलीकडेच लिहिले तसे, घेतलेला श्वास सुद्धा धरून ठेवता येत नाही, आवडत्या गोष्टीही त्यागाव्या लागतात, एवढेच काय, प्राणपणाने जपलेल्या आणि साऱ्यांचा रोष पत्करून घट्ट धरून ठेवलेल्या तत्त्वांना देखील मुरड घालावी लागते तर आवडती माणसं कशी धरून ठेवता येणार...?

ज्या माणसांनी आपलं आयुष्य केवळ सुसह्यच नाही तर समृद्ध केलं आणि आपल्या नेहमीच्या 'पाणक्या'च्या जगण्याला काही क्षण का होईना 'चाणक्या'च्या अविर्भावाची झळाळी दिली त्यांच्या जाण्याचा त्रास होणे स्वाभाविक असले तरी, त्यांनी आपल्या आयुष्यात येऊन अजरामर करून ठेवलेल्या क्षणांचे आणि केव्हाही त्यांच्या सहवासाचा लाभ घेता येईल अशा शब्दरूपी खजिन्याचे सान्निध्य-सौख्य नाकारून कसे चालेल?

कणेकर सरांबद्दल लिहिण्यासारखे अजूनही खुप काही असले तरी, त्यांच्या एकूणच मिश्किल, खोडसाळ, 'लगाव बत्ती' म्हणत 'चहाटळकी' करणाऱ्या लिखाणात त्यांनी कधीतरी असे जे गंभीर, आत्मचिंतनपर लिहिले ते 'मना'ला जास्तच भिडले. आता ते 'ये हृदयीचे ते हृदयी...' या तादाम्यामुळे की त्यातील 'करुणे'च्या स्पर्शाने ते सांगता नाही येणार! 

'डॉ. कणेकरांचा मुलगा'मध्ये त्यांनी आठवण सांगितली की त्यांचे वडील त्यांना म्हणायचे, 'मिस्टर शिरिष, एवढं लिहिता तुम्ही, पण वाचतं का कुणी?' याच आत्मकथनात त्यांनी लिहून ठेवलयं - 'डॉ. कणेकरांचा मुलगा एवढीच माझी आयुष्यभर ओळख राहिली आणि एवढी ओळख मला एका आयुष्याला पुरली देखील...!' 

आयुष्यात भेटलेल्या माणसांबद्दल, मित्रांबद्दल ते लिहितात, ‘देवानं नामी नग जन्माला घातलेत. मला त्यांचा आणि त्यांना माझा सहवास घडवून देवानं आमच्यावर अनंत उपकार केलेत. आम्ही सगळे मिळून जगात धुमाकूळ घालीत असू. देवाच्या सर्कशीतले आम्ही विदूषक आहोत. आम्ही हसवतो. आम्हांला हसतात. आम्ही अश्रूंना पापण्यांवर रोखून धरतो. घुसखोरी करू देत नाही. आम्हांला इरसाल म्हणा, वाह्यात म्हणा, नग म्हणा... आयुष्याचं ओझं वाहण्यासाठी असे साथीदार हवेत.’      

आणि शेवटी, जिवंतपणी आपल्या मृत्युलेखाची कल्पना करणारा हा अवलिया लिहून ठेवतो...

"माझा एपिटाफ लिहायचा झालाच तर लिहा की प्रत्यक्ष मरण येण्यापूर्वी हा माणूस खुप आधीच मेला होता, फक्त ही गोष्ट त्याने जगापासून लपवून ठेवली..."  

शिरीष कणेकरांना श्रद्धांजली वैगरे लिहिणे फारच अवघड वाटते तेंव्हा, '...तुझिया जातीचा मिळो आम्हां कुणी...' आणि 'तुमचा वसा आम्हां मिळो, सांभाळता येवो...' या प्रार्थनेपलीकडे फार काही लिहवत नाही...

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावकः। 
न चैनं क्लेदयन्त्यापो 
न शोषयति मारुतः।I

शिरीष कणेकर सरांबद्दल आंतरजालावरील काही दुवे :  

https://www.saamana.com/author-journalist-shirish-kanekar-80th-birthday-on-6-june/
https://eetyadee.blogspot.com/2018/06/102-not-out.html
https://www.esakal.com/saptarang/atul-parchure-write-article-saptarang-121107
https://prahaar.in/the-name-shirish-kanekar-is-enough/
https://www.esakal.com/saptarang/miliind-ghangrekar-wrtie-article-saptarang-121095
https://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118327.html?1161380086
http://shireeshkanekar.blogspot.com/
https://en.wikipedia.org/wiki/Shirish_Kanekar

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा